सोमवार, २७ मे, २०१३

'त्या' बारा दिवसांमधली 'ती' !

 'त्या' बारा दिवसांमधली 'ती' ! 

आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. आयुष्यभर आपल्या मुलींच्या सहवासात राहिलेली ती, शेवटचा श्वासही मुलीच्या मांडीवर डोके ठेवूनच घेत होती. आज तिच्यासोबत सगळे होते. नित्यनेमाचे उद्योग धंदे सोडून प्रत्येकजण फक्त आणि फक्त तिच्यासाठीच आला होता, हॉस्पिटल मध्ये. हजारदा आमंत्रणे पाठवून विनवण्या करूनही असे सगळे कोणासाठी एकत्र जमले नसते.

रात्र जागून काढली तिने हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातनांनी.हार्ट अट्याक असेल असे तिलाही जाणवले नसावे. "थोडे दुखते आहे छातीत, कशाला ह्यांना उठवा झोपेतून." शेवटपर्यंत काही तिने दुसऱ्याचा विचार करणे सोडले नाही.
"तुम्ही लवकर घेऊन यायला पाहिजे होते ह्यांना"  हे वाक्य डॉक्टर बोलले ते ऐकायला ती होतीच कुठे? तिला ऐकू तरी काय येत असावे? आणि ऐकताना त्याचा किती बोध होत असावा?
बारा दिवस ती ICU मध्ये होती. आयुष्यातले हेच ते बारा दिवस, जेव्हा तिला सगळे न मागता हातात मिळत होते. यापूर्वी स्वतःसाठी म्हणून ती होतीच कुठे? चार मुलींची लग्ने लावून दिली तिने. त्याच्यातच झिजून गेली होती ती. आज त्याच चार मुली रात्रंदिवस तिच्या जवळच बसून होत्या.

कसे वाटत असावे सर्वांदेखत असे खोल खोल जाताना? काय वाटत असावे हळू हळू प्रत्येक अवयवाला कार्यमुक्त करताना? काय होत असावे मनात स्वतःचे मन सोडून जाताना?
आता, बाकीच्यासाठी ति तीच असावी , पण तिच्यासाठी सगळे जग  रात्रीत बदलले नव्हते काय?

आज तिला आपण किती दिवस येथे आहोत हे माहितीही नसेल.सकाळी चहा प्यायचा असतो आणि तो आपण वर्षानुवर्षे पीत आलोत हे हि माहीत नसेल कदाचित. पण "विजूला मात्र दुधाचाच चहा लागतो" हे कसे माहीत असावे? मी दिसलो की औषधाच्या हजार बाटल्यामागे ठेवलेले दही मला द्यावे हे तिला कोण सुचवत असेल?

बारा दिवस एवढी माणसे भोवती हजर असून आतून एकटीच असावी का ती? काय विचार करत असावी वा काही आठवत असावे तिला.
भोर मधील माहेर आणि  घरासमोर बसून सागरगोटे खेळायचा तो कट्टा?
पुण्याहून सायकलवरून भोरला येणारा तिचा चाहता आणि मैत्रिणीच्या घरी त्याची राहायची व्यवस्था करून दिलेले ते दोन दिवस?
ज्याकाळी प्रेम हा शब्द उघड उच्चारला जात नव्हता अश्या काळातील तिचा तो प्रेमविवाह?
लहान वयात लग्न होऊन दक्षिण भारतात गेल्यावर  फक्त भात खाऊन काढलेले ते सहा दिवस?
पानशेतच्या पुरात उभारता संसार वाहून गेल्यावर झालेली जीवाची तळमळ?
मुलांचा जन्म ते त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास ?
नातीच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीचा तिच्या चेहऱ्यावरचा तणाव?
नातीच्या लग्नानंतर परत तिच्या सासरी आणि स्वतःच्या माहेरी भोर ला गेल्यावर जिवंत झालेले तिचे ते बालपण?
पणजी होऊन नातीच्या मुलीला तोंडभरून पापा देताना तिचे केलेले कोडकौतुक आणि तिच्या वाढदिवसाला दिलेला दोन पायांचा लाकडी घोडा?
लग्नानंतर सलग अठ्ठावीस वर्षे औसरीच्या देवीचे केलेले नवरात्र आणि गावजेवण देऊन लोकांचे तृप्त चेहरे?
का, भर दुपारी अनवाणी पायांनी जाताना भाजणारे पायाचे तळवे ?
का, गेले बारा दिवस वेगवेगळ्या नळ्या आणि मास्क लावून काळी पडलेली तिची नितळ अशी त्वचा?
का, कालची भयानक कळा देऊन गेलेली रात्र?

कशालाच उत्तर नव्हते, कोणाकडेच !

आज मात्र गेली त्रेशष्ठ वर्षे चाललेली तिची तपश्चर्या थांबली .पोटच्या गोळ्याच्या मांडीवर शांतपणे डोके ठेवून.  खरंच, आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल.

सोमवार, २० मे, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस  झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला होता बहुतेक.घरचीही ओढ लागली होती.
पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते.
ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. हे कळायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. आता साधे उभे राहण्याचेही पायात बळ नव्हते, अशात आम्ही सुमारे तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून, गड हिंडून परत तेवढ्याच पायऱ्या उतरणार होतो. चेहऱ्यावरच्या वाढलेल्या आठ्या काही आम्हाला मदत करणार नव्हत्या, म्हणून त्या पुसल्या, फ्रेश झालो, पाय बदलले ( म्हणजे जोडे बदलले) आणि सगळे सामान तेथील ऑफिस रूम मध्ये ठेवून फक्त पाण्याची बाटली आणि थोडे खाद्यपदार्थ घेऊन निघालो.
 
पौराणिक संदर्भ :
मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र आहे. सिद्ध-क्षेत्र याचा अर्थ असा की सिद्धी/ मोक्ष मिळवण्याचा मार्ग (gateway to the state of enlightenment.).
ह्या जैन समाजाच्या सिद्ध क्षेत्री, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि इतर रामायणातील ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला. 

ऐतिहासिक संदर्भ : 
इ. स. ६०० साली कोरलेल्या बुद्ध मूर्ती येथे असून त्या लेप देऊन जतन करून ठेवलेल्या आहेत. 

भौगोलिक संदर्भ : 
मांगी-तुंगी किल्ला ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी पर्वत रंगांमध्ये/ डोंगररांगेतील हा महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिणेचा शेवटचा किल्ला आहे. येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान हि आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. 

नकाशात दाखवल्याप्रमाणे तीन गोल केलेले किल्ले साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा, आणि मांगी-तुंगी हे आहेत. पांढरी रेषा हि महाराष्ट्र सीमा दर्शवते.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की, या रेषेच्या अलीकडे म्हणजे महाराष्ट्रात मोठी पर्वतरांग दिसते, तर रेषेच्या पलीकडे गुजरात चालू होते, तेथे दूर दूरपर्यंत डोंगर दिसत नाहीत.

बघण्यासारखी ठिकाणे आणि सद्यस्थिती :
हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा , शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात.
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी  फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्ट च्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे. येथे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि तरीही यासाखी सेवा- सुविधा आणि स्वच्छता इतर कोणत्याही मंदिरात व तीर्थक्षेत्री नसेल. 

मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.
तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.
मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.
तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवाड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.

मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? ) 
( पण इतक्या सुंदर ठिकाणी चाललेली हि अशी डोंगरफोड आम्हाला काय पटली नाही बुवा !) 

आमचा ट्रेक अनुभव :

मुल्हेर मधून सकाळी सकाळी ६ वाजता स्थानकावर आलो. पाच पेक्षाही कमी तापमान असावे, फुल टू थंडी. त्यात गरम गरम चहा. लगेच बस आली. त्यात बसून सात वाजता ताहाराबाद.
आता येथे येऊन कळले की मांगी-तुंगी ला जाणारी पहिली बस हि १० वाजता आहे. आता ३ तास येथे थांबून काय करणार? म्हणून निघालो स्थानकाबाहेर.
एका रिक्षावाल्याशी वाटाघाटी करून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत  पोहोचलो. रिक्षावाला सकाळपासूनच फॉर्म मध्ये होता. ह्याला हाक मार. त्याला चिडव, थोड्या थोड्या टाइम इंटर्वलने थुंकणे,  मध्येच गाणी म्हण (आणि याच्या जोडीला रिक्षांतला अजय देवगण आणि कुमार सानू. ).  हे महाराज, भाडे येत नाही म्हणून अर्धा तास थांबले होते.  मी कंटाळून चालत जाऊ म्हणालो ( फक्त म्हणालो, तयारी अजिबात नव्हती) तेव्हा ५ रु जास्त देण्याच्या बोलीवर हे साह्येब निघाले.
मांगी-तुंगी फाट्यापासून जाणाऱ्या ट्रस्ट ची गाडीने आम्हाला मंदिरात आणून सोडले. ( त्याला "किती  द्यायचेय?" असे विचारल्यावर त्याने चक्क 'नाही' म्हणून तो परत निघून गेला. )

 मांगी-तुंगी फाटा 
येथूनच मांगी-तुंगी सुळक्यांचे प्रथम दर्शन झाले. 
आता मंदिरात जाऊन फ्रेश होऊन आदिनाथाचे मंदिर पाहायला लागलो. तेथे फोटो काढायला बंदी होती.
तसेही सगळ्या मुर्त्या मला सेमच वाटत होत्या म्हणून मी कॅमेरा ठेवून दिला. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर भटकून मग आमच्याकडचे सामान तेथील कचेरीमध्ये ठेवले. पाणी भरून घेतले आणि मग निघालो आमच्या बागलाण ट्रेकच्या शेवटच्या डेस्टिनेशन ला.

१५ रु. देऊन गाडी होती पायथ्यापर्यंत, पण आम्ही ती नाकारली आणि चालतच सुटलो. अंगात जीव नव्हता पण ३० तासांची चढाई केलेले पाय हळू हळू का होईना पण निघाले.

 हा मांगी-तुंगी डोंगराकडे जाणारा रस्ता, हा फोटो 'ग्रांड क्यानोन ची ट्रेल " म्हणूनही खपला असता.
आता गावापासून जर लांब आलो होतो. मागे वळून पहिले तर गाव मस्त धुक्यात हरवले होते. आणि फोटोत दिसणारा डोंगर ओलांडला की मागे लगेच मुल्हेर गाव. 


येथूनच समोर पाहिले तर अतिशय नयनरम्य असे मांगी-तुंगीचे जुळे किल्ले नजरेस पडले. डाव्या बाजूस मांगी आणि उजवीकडे तुंगी.


पायथ्याशी अजून एक विश्रामगृह होते. येथे पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रसाद मिळतो. तेथून निघाले की मग अत्यंत सुबक आणि सुस्थितीतील पायऱ्या चालू झाल्या. कोणीतरी अमेरिका निवासी जैन बांधवाने त्या तीन हजाराहून अधिक पायऱ्या बांधल्या असा तेथे  बोर्ड होता. 'अमेरिका निवासी' असे आवर्जून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.

 
वृद्ध आणि अपंग माणसांना वरती नेण्यासाठी डोली ची हि व्यवस्था आहे. वरती लिंबू-सरबताचे थांबे असल्याने ती लोकही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आमच्या बरोबर होतीच.


मांगी कडे जाता जाता तुंगी चा हा नयनरम्य सुळका सारखे आमचे लक्ष वेधून घेत होता. या दोन डोंगर जोडणारी मधली वाटही अभेद्य वाटत होती.


मांगी गिरी हे आमचे प्रथम लक्ष्य होते. अजून बराच बाकी होता. ऊन जाणवू लागले होते. आणि पायही संपले होते.

 बरेच अंतर चालू आलो की आपण…. 

आवरा …. अजून एवढे जायचे आहे. :) 

काही अंतर चालून गेल्यावर पहिली गुहा लागली. त्या गुहेत काही मंदिरे होती. आणि अनेक कोरलेल्या जैन प्रतिमा होत्या.
पहिला थांबा 



जवळ जवळ दीड तासात आम्ही बरेच वर आलो होतो. आता येथून पश्चिमेकडे साल्हेर- सालोटा दिसत होते. दोन दिवसांपूर्वी आपण त्या सर्वोच्च शिखरावर होतो या जाणिवेनेही अंगावर काटे आले. साल्हेरच्या आठवणी मनातून कधी पुसल्या जाणेच शक्य नाही. भूषण ला म्हटले की अजून एक दिवस सुट्टी वाढवू, प्लान रीवाईज करू आणि परत साल्हेर ला जाऊ यार !


खाली बघितले तर आता या पायऱ्या चीनच्या भिंती सारख्या दिसू लागल्या. पायऱ्या मुळे आपल्याला जास्त दम लागतो तर पाय अजून दुखायला लागले. यापेक्षा पायऱ्या सोडून परत ट्रेकिंग करत जाऊया असे मनात आले.


येथून तुंगी चे बरेच फोटो काढले. मोह काही आवरत नव्हता.

अजून तासभर चालून शेवटी पहिल्या कमानी पाशी पोहोचलो.

येथे एक विश्रांती थांबा आणि लिंबू सरबताचे काही स्टॉल होते. येथे एक पायपोई पण होती, पण येथे पाणी ठेवले तर या लोकांचे लिंबू सरबत कोण पिल? म्हणून त्या चाप्टर लोकांनी त्यात पाणी ठेवले नव्हते.

 येथूनच डावीकडे मांगी गिरीकडे तर उजवीकडे तुंगी साठी मार्ग होता. सहलीसाठी आलेली लोक येथूनच परत जात होती. तर काही तुंगी कडे जात होती. म्हणून आम्ही गर्दी टाळण्यासाठी मांगी ला निघालो.

'वर' जाणारा रस्ता :)

एव्हाना दोन हजार पायऱ्या होऊन गेल्या असाव्यात. आता पुढे काही थांबे नव्हते. गर्दीही नव्हती.

मांगी गिरी वर पाण्याचे एक टाके दिसले. बाकी येथे पाण्याची काही सोय नाही.


त्यानंतर वरती पोहचल्यावर आम्ही जे काही पहिले ते केवळ अशक्य होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या थकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत.

काय वर्णन करू शकणार अश्या निसर्ग रूपाचे?

येथून उत्तरेकडे गुजरात सुरू होतो. प्रदूषण कमी असल्याने दूरपर्यंत नजर जात होती. महाराष्ट्रात एकाला एक लगटून अश्या पर्वत रांगा. आणि गुजरातेत मोदिकाकांकडे एकाही डोंगर पण नाही राव. अरेरे ! ( आणि म्हणूनच गुजरात मधले ( नाशिक गुजरात बॉर्डर) एकमेव हिल स्टेशन "सापुतारा" त्यांनी अप्रतिम असे वसवले आहे. )

मान्गीगिरी वरून तुंगी ला जाणारी वाटही आता स्पष्ट दिसत होती.

आता वेळही हाती होता त्यामुळे फोटोग्राफी किडे चालू झाले.

येथे असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या दिसल्या. दोन्ही ठिकाणी कोरीवकाम केलेल्या बऱ्याचं मुर्त्या आहेत. काही मुर्त्या पडझड झाल्या आहेत तर काही ट्रस्ट ने कोटिंग करून जपलेल्या आहेत. पण कोटिंग करून त्याची नैसर्गिक /ऐतिहासिक ओरिजीनालीटी राहिलेली नाही.


एवढ्या उंचावर पायऱ्या नसताना असे कोरीवकाम करायला कोणते कामगार व स्थापत्यअभियंते छिन्नी हातोडा घेऊन आले असतील देव जाणे.



आता मांगी उतरून आम्ही परत पहिल्या प्रवेशद्वाराशी आलो आणि तुन्गीकडे प्रयाण केले. पूर्ण वाटेत रेलिंग लावलेले होते. 


 मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडीतच एक संगमरवरी मंदिर होते. बहुतेक ते कृष्णाचे होते. 
मंदिर आणि मागे मांगी गिरी.

थोडे अंतर चालून खिंड पार केल्यावर पुढे तुंगीवर जायच्या पायऱ्या दिसल्या. कोणी आणि कश्या बधल्या असतील या पायऱ्या? या विचाराने आमचे डोके चक्रावले.
 
 
 आमच्या स्वागतासाठी पूर्वज आधीच उपस्थित होते. त्यांनी आमच्या पिशवीतला चिवडा खाण्यासाठी हल्ला चढवला.

येथेही काही मुर्त्या कोरलेल्या होत्या आणि ३ मंदिरे होती. मला तेच तेच बघून बोर झाले म्हणून कॅमेरा ठेवला आणि पुढे निघालो.

२ वाजेपर्यंत खाली उतरलो. पायथ्याशी प्रसादाची विनामूल्य सोय होती. तेथे खाऊन आणि पाणी भरून निघालो. आता पायथ्यापासून गाडी करावी म्हटले तर गाडी नव्हती. परत पायपीट. मग शेतातूनच शॉर्टकट काढत आलो. मंदिरातून जेवणाचा पास घेऊन जेवायला गेलो. जेवण बरे होते पण चाळीस रुपयांच्या मानाने चांगले होते.
भरपेट जेवण झाल्यावर लगेच घरी जायचे वेध लागले. पाणी एकच बाटली भरली आणि मंदिराच्या माहेर येऊन एका घराच्या सावलीत डेरा टाकला. बुधवारीच आमचा हा स्वप्नवत ट्रेक संपला असल्याने आणि पूर्ण आठवड्याची सुट्टी असल्याने आता कधीही रिक्षा येऊदे आणि पुढे केव्हाही बस मिळूदे अश्या मानसिकतेने आम्ही चक्क तेथेच झोपून घेतले.
 दहा मिनिटांनी असणारी रिक्षा सुमारे अडीच तासांनी आली. दुपारी रिक्षांची वारंवारता कमी असते असे कळले. जी एक आली ती पकडून ताहाराबाद गाठणे गरजेचे होते. रिक्शांत घुसलो आणि आणि अजून एक जीवघेणा प्रवास सुरू. सहा आसनी रिक्शांत,  कल्पना करू शकणार नाही पण तब्बल सोळा लोक. काही कोंबून बसलेली, तर काही बाजूच्या पाय ठेवायच्या जागेवर उभी राहून. तुफान प्रवास होता तो. 

टपावर टाकलेले सामान काढून ताहाराबाद बस स्थानकावर बराच वेळ काढला. तेथून एक गुजरात महामंडळाची बस पकडून निघालो नाशिकला. येथून नाशिक म्हणजे अजून ४ तास. पण तीन दिवस एकत्र असूनही आमच्या गप्पा आणि विषय संपले नव्हते. 

या ब्लॉग चा जन्म यावेळी गाडीत बसून मनात आलेल्या विचारातून झाला हे मला नमूद करायला आवडेल. ह्याच ट्रेक नंतर असे वाटले की ह्या सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी आपण शब्दबद्ध केल्या तर, लोकांनाही या सुरेल निसर्गकवीतेचा अनुभव घेता येईल. साल्हेर-मुल्हेर च्या ट्रेक ला जाऊन आल्यानंतर ब्लॉग चालू केलेला माझ्या पाहणीमधला मी तिसरा. ती जागाच अशी आहे, ते अनुभवच इतके उत्कट आहेत की मनातील विचारांना लेखरूपी कोंदण हे मिळणारच. ( तुमचाही बरेच दिवसांपासून काहीतरी नवे करायचा व लिहायचा मानस असेल आणि तो प्रत्यक्षात येत नसेल तर हा ट्रेक नक्की कराच. ) 

अजून एक असे की जेव्हा खूप नैराश्य येते आणि स्वतः साठी वेळ काढणे गरजेचे आहे असे वाटते. त्याला उपाय असा की, शनिवारचे सटाण्याचे तिकीट आरक्षित करून यावे. विंडो सीट. सकाळी सातची ST दुपारी ४ ला पोहोचते तेथे. (येथे राहून वा ५ ची पुण्याची ST परत रात्री २ वाजता पुण्यात. )
खच वेळ मिळतो आपल्याला स्वतःला न्याहाळायला. स्वतःचे अनालिसिस करायला. सोबतीला लोकांची ओढाताण आणि जगणे जाणवते. आपले झापड लावलेले जगणे म्हणजे जगणे का? असा प्रश्न पडतो. 
(मी जेव्हा लोकांना समुपदेशन करतो तेव्हा हा हि उपाय घुसडतो. )

एक मात्र जाणवत होते की कितीतरी दिवसांनी आपण एवढी माणसे पाहतोय. जरा माणसांमध्ये आल्याचा फील आला. मागील ३ दिवस फक्त मुक्त डोंगररांगा, किल्ले, निसर्ग, सूर्यास्त, पूर्व-इतिहास  आणि सगळे पाश ( निदान ३ दिवस तरी ) सोडून आल्यासारखे आम्ही दोघेच. सोबत रिकामे पोट, रापलेला चेहरा, तुटायला आलेले पाय, ओरखडलेले हात पण तृप्त असे मन आणि स्वप्नपूर्ती झालेले डोळे. सगळे केवळ स्वप्नातीत.

नाशिक ला पोहोचून मुंबईकर आणि पुणेकर म्हणजे भूषण आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या. संपूर्ण ट्रेक ला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास नाशिक वरून पुण्याला येताना झाला. अखेरीस पहाटे तीन वाजता शिवाजीनगर. बाबांना फोन करून घ्यायला बोलावले.ते जेव्हा आले तेव्हा मी पहाटे साडे तीन वाजता शिवाजीनगर च्या फुटपाथ वर मांडी घालून बसलेलो होतो. अवतार तर भिकाऱ्याच्याही वरताण असा झाला होता. 

पाच दिवस, अडतीस तासांपेक्षा जास्त चढाई करून शरीर खिळखिळे झाले होते. पण तेव्हा ट्रेकची धुंदी असल्याने जाणवले नाही. आता घरी पोहोचलो तर पेन किलर घेऊन झोपणे हा एकाच पर्याय.
 'एवढा त्रास होतोय तर जायचेच कशाला, सुखाचा जीव दुःखात घालून" इति आई. पण बाबांनी चेहऱ्यावरचे भाव तेथे फुटपाथ वर बसलो असतानाच ओळखले होते. 
" तेथे काय पहिले?" या प्रश्नाला निदान माझ्याकडे तरी उत्तर नव्हते. केवळ निःशब्द.
 बूट काढून बघितले तर पायाच्या तळव्यातील रक्त पेशी सुट्टीवर गेल्याचे दिसले. बोटांना छोटे फोड आले होते. स्याक मध्ये रॉकेल सांडले होते म्हणून त्याचा खतरनाक वास येत होता. त्याहूनही खतरनाक वास माझा मलाच येत होता. ( पाच दिवस विदाऊट अंघोळ :) ).  बुटाचा सोल शेवटचा श्वास मोजत होता. पण राजे ( म्हणजे आम्ही ) गडावर ( म्हणजे आमच्या घरी) पोहोचुपर्यंत त्याने बाजीप्रभूसारखा जीव राखून ठेवला होता. 
मस्त गरम गरम दूध न मागताच समोर आले. त्या परिस्थितीत, त्या वेळी ते गरम दूध जे काही लागले न…. अहाहा स्वर्ग ! 
पहाटे सहा पर्यंत गप्पांची मैफिल रमली. पुढचा पूर्ण दिवस विश्रांती घेऊन, शुक्रवारी सुट्टी असूनही हापिसात हजर. "साल्हेर-सालोटा- मुल्हेर ट्रेक पूर्ण करून पुढच्या दिवशी आजारी न पडता हापिसात येऊन दाखव" हि पैज जिंकण्यासाठी. 

सगळ्यात ब्रेकिंग न्यूज हि की, तब्बल साडे सहा किलो वजन कमी झाले होते. वर्षानुवर्षे कपाटात पडलेले हाफ शर्ट आता बाहेर यायला लागले. बारीक झाल्याने आता मी कुतूहलाचा विषय होतो हे हि मला कळले. ( आता परत "पहिले पाढे पंचावन्न" झाल्याने लोकांचे कुतूहल शमले आहे.) पण माझे या ट्रेकचे कुतूहल अजूनही शमलेले नाही. 

असो, या ट्रेकच्या आठवणी माझ्या मनात तर आयुष्यभरासाठी कोरल्या गेलेल्या आहेतच. आपणा सर्वांना हि या ट्रेकचा आनंद घरबसल्या मिळावा म्हणून चालवलेला हा चार भागांचा खटाटोप आता संपला आहे. 

---समाप्त---
सागर

बुधवार, ८ मे, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३  - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी

कुतूहल हि खरंच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवायला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगांत माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अद्भुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.
आता आम्ही निघालो होतो आमच्या स्वप्नवत ट्रेक च्या दुसऱ्या टप्प्यात. मुल्हेर किल्ला.
सकाळी ६  वाजता  चहा घेऊन आम्ही पोहोचलो शुक्ल काकांकडे, दुपारचा डबा घ्यायला. रात्रीच सांगून ठेवला असल्याने डबा तयारच होता. तो घेऊन स्वारी निघाली मुल्हेरच्या किल्ल्याच्या दिशेने.
मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे. सकाळी सकाळी आल्हाददायक हवा आणि स्वच्छ वातावरण. सगळीकडे शांतता पसरलेली, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिंचांनी डवरलेली झाडे, पक्ष्यांचा मुक्त वावर, गावातल्या बायकांची पाण्यासाठीची पळापळ तर काही "अड्ड्यांवर" गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या गप्पा टप्पा, मुलांची शाळेत जायची लगबग, तर दुकानदारांचे दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून दिवसाची जय्यत तयारी. सगळे अनुभवत आम्ही गावाच्या बाहेर येऊन किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.
किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती काढलेलीच होती. किल्ल्यावर विविध प्रकारची झाडे सापडतात असे ऐकले होते. काटेरी , औषधी, खाज येणारी, विषारी, रक्त गोठवणारी झाडे.
किल्ल्याची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था हि चोख होती. ७ दरवाजे एका बाजूने चढताना लागणार होते. तर मोरागडावर ३ दरवाजे. पायथ्यापासून निघणाऱ्या वाटा मुल्हेर माचीकडून तर दुसरी थेट मोरागडावर जाणारी होती. या सगळ्या माहितीने आमची उत्सुकता वाढली तसे आमच्या पावलांचा वेगही वाढला.

ऐतिहासिक संदर्भ : 
मुल्हेर चा उल्लेख रत्नपूर म्हणून महाभारतात आढळतो.हि राजा मयुरध्वज याची राजधानी होती.त्यामुळे गावाला मयुरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले.फार काळापूर्वी येथे नाईक आणि भिल्ल  सत्ता होती. इ. स. १०२९ काळात यादव घराण्याची सत्ता आली. पुढे १३०८ मध्ये कनोज येथील राठोड बागुल यांनी येथील सत्ता काबीज करून या प्रांताला बागलाण असे नाव दिले. पुढे ३५० वर्षे त्यांची सत्ता चालली.  इ.स. १६३८ रोजी वैभवशाली हिंदूंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली.औरंगजेबाने येथील सत्ता घेतल्यावर किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेर ही बागलणची परंपरागत राजधानी होती म्हणून मुल्हेरजवळ 'ताहीर' नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद/ताहाराबाद असे नामकरण झाले. नंतर ४० वर्षांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेताना मुघल साम्राज्याचा पाडाव करून शिवाजींनी अमाप दौलत मिळवली . पुढे ब्रिटिशांनी हा प्रांत विभाजन करून सटाणा हे बागलाण चे मध्यवर्ती जिल्हा ठिकाण केले. 
प्राचीन काळातील सोमेश्वर मंदिर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असून त्याचा गाभारा हा पाताळात आहे.  त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. अशी अनेक मंदिरे आणि स्थापत्य कलेचे आविष्कार देशोधडीला लागले आहेत. 
 
भौगोलिक संदर्भ :
मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी साधन आहेत. 
शेती मोठ्या प्रमाणावर चालत असून भात, ऊस आणि इतर हंगामी पिके घेतली जातात. 

नकाशा :
 आंतरजाला वरून साभार …

आमचा ट्रेक अनुभव :
किल्ल्याच्या पायथ्याशी शेत असलेली मंडळी आमच्याबरोबर होतीच. सकाळी न्याहारी करून आणि दुपारचा डबा डोक्यावर घेऊन, हातात सायकल, तर बाई माणसांच्या कडेवर लहान मुले. 
आता आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य झाला होता. सगळीकडे अतीव शांतता पसरलेली. सहज मागे वळून पहिले तर गाव खूपच लांब राहिले होते. आणि दिसत होत्या त्या फक्त दूरवरच्या डोंगर रांगा. 
उजवीकडून पाहिल्यास ओळीने मांगी-तुंगी, ताम्बोळया, न्हावी रतनगड अशी डोंगर रंग दिसते.
जरा थोडे उंच आल्यावर आजूबाजूच्या टेकड्या हि छोट्या वाटत होत्या. 
मजल दरमजल करत आम्ही अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. रस्त्यात एक कूपनलिका दिसली. तिथे थोडे पाणी भरून घेतले आणि पुढे निघालो.
रात्रीच थोडे खायचे समान घेऊन ठेवले होते. त्यात आवर्जून बोंबी घेतल्या होत्या. लहानपणीचे दिवस आठवले. मग लगेच प्रत्येक बोटात एक घालून "माझी बोटे किती मोठी" याचा डेमो झाला.

आता भूक हि लागली होती म्हणून तिथेच असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून न्याहारी चालू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बाहेर येऊ लागले. मी मात्र माझा सगळ्यात प्राणप्रिय पदार्थ "शंकरपाळ्या" खाण्यात गुंतलो होतो. चहा बरोबर शंकरपाळ्या म्हणजे खरेच स्वर्ग सुख आहे. अहाहा !!
 

न्याहारी आटोपून आता गडाची चढाई चालू झाली. पायथ्याशी एक मस्त घर होते. कितीतरी वर्षांनी मी बैलगाडी पहिली त्यामुळे ती कॅमेरात कैद करून ठेवली.
या घरापासून पुढे २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट : सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  


थोडे चालून जाताच किल्ल्याचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास व्हायचा प्रश्नच नव्हता. हिरव्या गार अश्या गर्द वनराईत वसलेला अजस्त्र असा किल्ला. सकाळचे कोवळे ऊन  अंगावर झेलत निश्चल असा उभा होता. किल्ल्याच्या खिंडी मधून सूर्याची कोवळी किरणे डोकावत होती. थंडगार अशी हवेची झुळूक. अशा वातावरणात आम्हाला हुरूप चढला. आणि मग चालू झाली स्वप्नवत अश्या किल्ल्याची चढाई.

मोबाईल मध्ये नकाशा ठेवलाच होता. तो बघत बघत पुढे निघालो. थोडे अंतर गेल्यावर पहिले प्रवेशद्वार लागले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली. या किल्ल्यावर गुरांच्या वाट बऱ्याचं असून त्या जास्त ठळक वाटतात त्यामुळे चुकायची शक्यता जास्त आहे. 


किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी नुसत्या प्रवेशद्वारावरून आणि तटबंदी वरून किल्ल्याच्या अभेद्यतेची प्रचीती येते.
पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेला ( रंगवलेला) दिसला. शेपूट डोक्यावरून गोल असा मारुती हा नाशिक मधल्याच किल्ल्यामध्ये दिसतो. असाच मारुती हातगड आणि तिकोना (पुणे) किल्ल्यावर  हि आहे.


रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली आणि आमची स्वारी जोषातच पुढे निघाली. अजून एक प्रवेशद्वार भेदून पुढे जर मोकळे पठार लागले. 
काही क्षणातच डोळ्याचे पारणे फिटेल असे गणेश मंदिर दृष्टीस पडले. खरेतर हे मंदिराचे फोटो बघूनच मुल्हेर चा ट्रेक फिक्स केला होता. 

गर्द अश्या झाडीतून पुढे आल्यावर पाण्यात पडलेले गणेश मंदिराचे प्रतिबिंब मनाला समाधान देऊन गेले. कुठे येऊन काय बघायला मिळेल आणि कशाने आपले मन आणि डोळे सुखावून जातील सांगणे अवघड आहे. मस्त असे वातावरण, छान हवा, योग्य प्रकाश … काय … अजून काय वर्णन करू शकणार होतो आम्ही.
पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. बराच वेळ हाताशी होता. आता निसर्ग आणि आम्ही यामध्ये दुसरा कोणताही अडथळा नव्हता.



गणेश मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब 

थोडा वेळ फोटो काढण्यात घालवून आम्ही रस्ता सोडून या मंदिराकडे निघालो. मंदिराच्या आत मध्ये अत्यंत सुरेख असे कोरीवकाम आणि रचना केली होती. मंदिराच्या दर्शनी भागात चक्र कोरलेले होते. ते अजूनही तेवढेच स्पष्ट आहे की त्याच्या प्रत्येक आर्र्या दिसू शकतात.


काही भाग ढासळून पाण्यात पडलेला आहे. समोरील तलावातील पाणीही प्रतिबिंब दिसेल एवढे स्वच्छ आहे.


 मोठे मोठे दगड एकमेकांमध्ये गुंफून या मंदिराची रचना केलेली वाटली. पूर्ण मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरीवकाम केले होते. १४०० साली जेव्हा गाव किल्ल्यामध्येच वसलेले होते तेव्हा हे गावातील मंदिर होते.


 गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत मंदिराचे स्थापत्यकला बघायला लागलो. पूर्ण मंदिरात आवाज घुमत होता. जरासे ऊन आल्याने फोटो साठी उपयुक्त रंगसंगती जुळून आली.


हे मंदिराचे छत घुमटाकार आकाराचे होते. एकावर एक रचलेल्या दगडांनी ते जास्तच आकर्षक दिसत होते.
पूर्वीच्या काळी युद्धात मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंदिरे नष्ट केली जात असत. हा घुमट हा अश्या  पद्धतीने बांधला आहे की घुमटा मधील मधला दगड काढला की  आपोआप घुमट पडून जाईल.


आता मन आणि डोळे भरून मंदिराचे सौंदर्य पाहून परत बाहेर आलो. मंदिराच्या मागे हरगडा ने दर्शन दिले.


येथून आता किल्ला दृष्टिपथात आला होता. तरीही किल्ला एवढा अजस्त्र आहे की एकाच फोटोत पूर्ण येणे अवघड आहे.


तेथून लगेच उजवीकडचा रस्ता पकडून निघालो ते १४०० सालचे पाताळातील सोमेश्वर मंदिर बघायला. 
१४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो.


मंदिरामध्ये प्रवेश करताच मोठ्या कमानी च्या अगदी मधोमध असलेला पुरुषभर उंचीचा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. पूर्णतः दगडात कोरलेला हा नंदी असून त्याच्या पुढेच दगडात कोरलेले कासव दिसते. आज पर्यंत कोणत्याही मंदिरात मी नंदी आणि कासव एकत्र पाहिलेले आठवत नाही.
हे कासव जरा वेगळे होते.


मंदिराच्या बाहेरच पादुकांचे दर्शन झाले.  लाकडी पादुका होत्या. अश्या लाकडी पादुका घालून अश्या दुर्गम भागात कोण महाभाग आला असावा याने आमची उत्सुकता वाढली.


मंदिरातून सहज वर बघितले तर  डेस्टिनेशन आम्हाला खुणावत होते. अजून एवढे चढायचे आहे या विचाराने आताचं जीव मेटाकुटीला आला.


सोमेश्वर मंदिर हे पूर्णतः भुयारात आहे. याला पाताळी मंदिर पण म्हणतात. नंदीपासून सरळ जाऊन आम्ही साहजिकच हात जोडले तर पुढे देवच नाही. नुसती भिंत उभी. डावीकडे पहिले तर छोट्या पायऱ्या खाली भुयारात जात होत्या.


आता मोबाईल चे दिवे पेटवले आणि अंधारात चाचपडत जात राहिलो. मंदिराचा गाभा पाताळात असल्याचे ऐकले होते पण प्रथमच पाहत होतो. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. म्हणून हि रचना होती असे कळले.
खालून वर बघितले तर वरच्या खिडकीतून नंदी दिसत होता. काय मस्त रचना केली होती बांधणाऱ्या कलाकाराने. 


आत हे पुजारी काका पिंडेची पूजा करण्यात मग्न होते. त्यांचा जप मंदिरामध्ये घुमत होता. आम्ही इतके सुदैवी होतो की, रोज सकाळी सात ला होणारी पूजा आज पुजारीकाका बदलून आल्याने साडे नऊ ला होत होती. आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि पूजा चालू झाली.
म्हटले हि देवाचीच इच्छा असावी.
त्यानंतर पुजारी काकांनी शंख हातात घेतला आणि ३ वेळा तो असाकाही वाजवला की, रामानंद सागर च्या सीरियल मध्ये देव आला की जसे सप्त वाद्यांचे संगीत चालू होते तसे वाटले.
हात आपोआप जोडले गेले.
पहिल्यांदा वाजवलेला शंख गाभाऱ्यात घुमू लागला तोच दुसरा त्यापेक्षा तीव्र असा ध्वनी त्याला भेदून जात होता. जे काही पाहिलं आणि ऐकले ते केवळ अद्भुत होते.


पूजा झाल्यावर बाहेर येऊन फोटोग्राफी चालू केली. मंदिराबाहेरच मोठी पिंड आणि शेंदूर लावलेली गणपती मूर्ती दृष्टीस पडले.


सोमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला साफ सफाई चे काम चालू होते. मालेगाव चा एक ग्रुप ते डागडुजीचे काम करत होता. ते मंदिरामध्येच मुक्कामी होते. ( त्यामुळेच मंदिर अफाट गचाळ झाले होते. सगळी कडे अंथरूण, कपडे, खाण्याचे पदार्थ).
बराच वेळ घालवल्यानंतर घड्याळाकडे लक्ष गेले. पाहतो तर काय दहा वाजत आले होते आणि अजून आम्ही पायथ्याशीच होतो. आता आमची पळापळ चालू झाली. किल्ला चढायला ४-५ तास लागतील या हिशोबाने चढाई चालू झाली. 
सोमेश्वर सोडून उजवी वाट ठरली आणि मोती टाक्यांपाशी पोहोचलो. मोती टाक्यांवरून वरती उजवीकडे जायचे असे माहीत होते. पण येथून पुढे रस्ताच सापडेनासा झाला.

 

प्रत्येक ट्रेक ला जाताना आधी एकदा वाट चुकून अतिरिक्त पायपीट झालीच पाहिजे असे बहुतेक आमच्या कुंडलीत लिहूनच ठेवले असावे. 
येथून पुढे रस्ताच सापडला नाही. येथून अनेक वाट फुटत होत्या. त्या गुरांच्या वाटा होत्या हे त्या वाटेने जाऊन ती वाट मध्येच संपली की आम्हाला उमगायचे. बराच वेळ तेथेच घुटमळत राहिलो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला मारुती (खालच्या फोटोत )आम्हाला दिसत होता. पण तेथपर्यंत जायचा रस्ता काही केल्या सापडत नव्हता. 
आता वाट फुटेल तिकडे आम्ही जात होतो. कॅमेरे ठेवून दिले आणि झाडे तोडत, घसरत  आम्ही जागा मिळेल  तेथे मुसंडी मारत होतो. आता किल्ल्यावरील झाडांची विविधता आमच्या लक्षात आलीच होती. त्या विविध प्रकारच्या झाडांना आपण भेटूनच आलोय असे शरीराचे हाल व्हायला लागले. काटेरी झाडांनी हात पायाचे चुंबन घेऊन रक्तवर्णीय नक्षी काढलीच होती. खाजरी झाडे त्या रक्तातूनच "खाज" करीत होती. काट्या कुट्यातून जाऊन दोन्ही हात, दंड ओरखडे उठून रक्ताने लाल झाले होते. चेहऱ्यावर टर्मिनेटर मधल्या अर्नोल्डसारख्या कापल्याच्या खरचटल्याच्या खुणा. :) 
शेवटी पाण्याचा मार्ग पकडला आणि बरेच वर चढून गेलो. पण तेथूनही मार्ग सापडेना म्हणून परत फिरलो. उतरताना मात्र घसरतच उतरावे लागले.  इतकी वाईट हालत झाली की चालताही येईना आणि सांगताही येईना :)
जाताना वाटेत आम्ही अजून दोन टाकी आणि एका गुहेचा शोध लावला असावा, कारण या टाक्यांबद्दल कुठेच वाचलेले नव्हते . तसेच  उल्लेख हि नव्हता. बळेच २ तास हिंडून आम्ही माहीत नसलेल्या वास्तू हि पाहून घेतल्या.  वाट चुकल्याचा निदान एवढा तरी उपयोग झाला :)


आता १२ वाजून गेले होते आणि आम्ही अजून पायथ्याशीच होतो. आता पेशन्स संपला होता. आता कधी किल्ला चढणार आणि उतरणार असे वाटू लागले होते. तरी बरे की मुल्हेर ची चढण हि साल्हेर, सालोटा प्रमाणे पश्चिमेकडूनच असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. 
सरळ परत उतरून सोमेश्वर मंदिर गाठले. तेथील पुजारीकाकाना विचारले पण त्यांना कमी ऐकू येत असल्याने आम्ही काय म्हणतोय हेच त्यांना कळत नव्हते.  शेवटी ते पण आमच्याबरोबर निघाले. मोती टाक्यांपर्यंत येऊन त्यांनी पुढे आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही वर जोपर्यंत ते तेथेच थांबले होते. 
 आता साडे बारा झाले होते. आता आम्ही पळतच सुटलो होतो. कॅमेरे ठेवूनच दिले होते. पोटात आग पडली होती, तरी वर पोहोचल्यावरच जेवायचे असा निर्धार करून पळू लागलो.
काही वेळातच मुख दरवाजा दिसला आणि जर हायसे वाटले.  सात दरवाजे तेही ओळीने, एका-आड-एक पाहून सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा असावा हे लक्षात आले.



यापुढे आम्ही जे काही पहिले ते शब्दात सांगणेच शक्य नाही. भक्कम तटबंदी, पाच दरवाजे ओळीने, कोरलेल्या गुहा, स्थापत्याशिल्पे, गर्द सावली, शांत वातावरण. 

दुसरे प्रवेशद्वार  :
तिसरे प्रवेशद्वार :
कोरलेल्या गुहा :
चौथे प्रवेशद्वार :

खालून दिसणारा कातळात कोरलेला मारुती आता जवळ आला होता. त्याची उंची पुरुषभर म्हणजे ५ ते ६ फूट होती.


अभेद्य अशी प्रवेशद्वारे ओलांडून आल्यावर भक्कम अशी तटबंदी चालू झाली.

आजूबाजूचे उंच डोंगर आता बुटके वाटू लागले.  जवळपास तीन हजार फूट एवढ्या उंचीवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. 


पाचवे प्रवेशद्वार :

पाचवे प्रवेशद्वार :( आतून )

सहावे प्रवेशद्वार :

सातवे प्रवेशद्वार :


 दहाव्या शतकातल्या पूर्वजांचा इतिहास पाहायला गेलो होतो आणि येथे त्याहीपेक्षा पूर्वीचे असे पूर्वज आमच्या स्वागतास तयारच होते. प्रत्येकांनी निराळी पोझ दिली आणि कामगिरी फत्ते म्हणून धूम ठोकली. 



हे शेवटचे प्रवेशद्वार ओलांडून एकदाचे आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. विस्तीर्ण असे पठार लागले. आव्हान दोन वाजत आले होते. आता बऱ्यापैकी वेळ हातात होता. संपूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. मनसोक्त हिंडत होतो. थोडे चालत जाऊन सगळ्या दिशांचे नजारे डोळ्यात साठवून घेतले.


किल्ल्यावर ओळीने नऊ अशी पाण्याचे टाकी होती. भर उन्हाळ्यातही त्यातले  आटले नव्हते.


येथे पाण्याची टंचाई कधीच जाणवत नसावी. हे नऊ टाकी सोडून अजून तीन मोठे तलाव दिसले. त्यातले पाणी आटून गेले होते.


आता काय पाहू आणि किती पाहू असे झाले होते. एवढ्या उंचावरून आजूबाजूचे दृश्य भान हरपून टाकणारे होते. बऱ्याचं वेळ फोटो काढून शेवटी सरळ कॅमेरा ठेवून दिला आणि शांतपणे निसर्ग अनुभवत बसलो.


दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नव्हत्या. अश्या ठिकाणी कॅमेरा बापडा काय टिकाव धरणार ?




विस्तीर्ण अश्या पठारावर पुढे चालत सुटलो. येथे राजवाड्याचे भग्न अवशेष दिसले.


आता जोरदार वरही सुटला होता. आजूबाजूचे वाळलेले गावात वाऱ्यामुळे झु ssss झु ssss असा आवाज करत होते. गवताच्या मुळाशी घरटे असलेले पक्षी आमची चाहूल लागताच रॉकेट सारखे आकाशात झेप घेत होते.
येथून जाताना मात्र भीती वाटत होती, की गवतात साप वैगरे असला तर शेवटच ट्रेक ठरायला नको :)


आता कडाडून भूक लागली होती. सुदैवाने  मोठे डेरेदार झाड दिसले. त्याच्या खाली भडंग नाथाचे मंदिर होते. दर्शन घेऊन आम्ही जरा झोप काढली आणि जेवायला बसलो.



ट्रेक स्पेशल व पेटंट अशी बटाटा भाजी पोळी. आज जेवणात गोड काही नसल्याने भूक असूनही जेवण जात नव्हते .कसेबसे चार घास पोटात ढकलले.


आता जेवण झाल्यामुळे एनर्जी आली होती. जवळपास अर्धा किल्ला पाहून झाला होता. छोटीशी झोप काढली त्याच झाडाखाली आणि मग परत मोरा गडाकडे कूच केले. लांबून तो अजून एक डोंगर दिसत होता. म्हटले की अजून एक डोंगर …. अरे काय… बस आता…
असे म्हणता म्हणता समोर पहिले तर लांबूनच दगडात खोदलेले प्रवेशद्वार दिसले. खरेच, कुठे जाऊन काय बघायला मिळेल याची शाश्वती नाही. "अरे वाह sss" आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडले. पावलांचा वेग आपोआप वाढला. कॅमेरे सरसावून तयार झाले.


गर्द अश्या गवतातून शॉर्ट कट वाटला म्हणून घसरतच निघालो. ते एकदम मुल्हेर किल्ल्याच्या (नशिबाने) शेवटीच येऊन थांबलो. आता जवळून तो उभ्या कातळात खोदून केलेल्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार भन्नाट दिसत होते. त्या काळाच्या लोकांची काय मानसिकता असावी नाही?? आपल्या राजासाठी हे काम करायचे आहे, ते उत्कृष्टच झाले पाहिजे असे ठरवून ते काम करीत असावेत.


मोरा गडाचा प्रवेशद्वार दिसले पण मुल्हेर वर तेथे जाण्यासाठी रस्ता शोधाशोध झाली. एक  जिना सदृश कातळ घसरून गेल्यावर मुल्हेर किल्ल्याच्या शेवटच्या दरवाज्याशी आम्ही पोहोचलो. दरवाज्यातच दरड ( land slide) कोसळली असल्याने खाली फोटोत दिसतोय तेवढीच जागा बाकी होती. आता एकंदर माझा आकार बघून येथून मागे फिरावे लागते की काय अशी शंका भूषण ला आली, पण मी मात्र शिफातीने तेथून निसटलो.


हाच वरचा दरवाजा बाहेर आल्यानंतर आपोआप मोठा दिसत होता. ते गणित काय मला उलगडले नाही.


आता मोरा आणखीनच डेंजर दिसायला लागला. कातळात खोदलेल्या पायऱ्या सुरवातीला फारच अरुंद आणि छोट्या होत्या. पहिल्या दोन पायऱ्या चढणे अवघड होते. शेवटी कॅमेरे एकमेकांकडे देऊन आम्ही वरती गेलो.


आता मोरा गडाचा पहिला दरवाजा भक्कमपणे आमच्यासमोर उभा होता. पूर्णतः एकाच कातळात कोरलेला हा दरवाजा बुरुजांनी अधिक अभेद्य बनला होता.


प्रवेश्वदाराशीच कोरलेला गणपती हा खाली सोमेश्वर मंदिरामधल्या गणपतीसारखा हुबेहूब होता. फरक ओळखा सांगितले असते तर त्याचा शेंदरी रंग यापलीकडे काहीच फरक नव्हता.


पहिले प्रवेशद्वार ओलांडून पुढे चालू लागलो. जसे जसे वर जाऊ तसा रस्ता निमुळता होत चालला होता. खालच्या फोटोवरूनच कल्पना येईल. हा एक मस्त स्पॉट होता. भर उन्हातही थंड वारा वाहत होता. आजूबाजूला मोठमोठ्या डोंगररांगा पसरलेल्या आणि आम्ही दोघे फक्त. काय मजा !


येथे एक माणूस जाऊ शकेल एवढीच पायवाट होती.


येथेही एक गुहा दिसली. आतून ती जास्त प्रशस्त होती. आत जाऊन उजवीकडे अजून एक खोली होती.


मोरागडावरून मागे आकाशाची निळाई पांघरून बसलेला हरगड तुफान दिसत होता.


आता पोहोचलो मोरा गडाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वाराशी. आव्हान साडे चार वाजले होते, किल्ला बघून साडे पाच पर्यंत आम्ही परत येथे पोहोचलो. मग येताना बराच वेळ येथे बसून होतो. कुठून, कसे, काय ठाऊक, पिक्चर चा विषय निघाला. मग "Vantage Point" ची स्टोरी सांगणे झाले. नंतर जेव्हा भूषण ने तो मूव्ही बघितला तेव्हा त्याला हि याच दरवाज्याची आठवण झाली.


या दरवाज्यातूनच खाली पायथ्याचे सोमेश्वर मंदिर दिसत होते (फोटोत चौकोन केलेला भाग)


याच दरवाज्याचा आधी पायथ्यापासून सोमेश्वर मंदिरामधून काढलेला फोटो.  ओह ६ तासात आम्ही कुठल्या कुठे पोहोचलो होतो.


आता पुढे निघायची तयारी चालू झाली. मागे दिसणारा मुल्हेर आणि हरगड किल्ला.


मोरा गडावर या झेंड्या खेरीज पायाचे टाके आहे. बाकी काही खास बघण्यासारखे (म्हणजे आवर्जून बघण्यासारखे) वेगळे काही नाही.

पाण्याचे टाके :


किल्ल्यावर प्रचंड गवत/झाडी होती. आणि रुळलेल्या वाटाही दिसेनात. म्हणून मग अंदाजे कोठेही चालू लागलो. काही ठिकाणी छातीपर्यंत झाडी होती. त्यातही जाऊन फोटो काढून झाले.


आता पुढे जे काही दिसत होते, ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते. फक्त डोळ्यात साठवून ठेवण्या पलीकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो.खरेच,  निसर्ग सुखाची अनुभूती हे ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.




आता तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळ चढाई करून पाय अक्षरशः हातात आले होते. झाडी झुडपातून चालत असल्याने अंदाज घेण्यासाठी जी काठी हातात घेतली होती. ती काठीच आमचा आधार बनली.



आता परतीची वाट चालू झाली.मुल्हेर आणी मोरागड यांना जोडणाऱ्या "V" शेप खिंडी मधून दुसऱ्या वाटेने आम्ही उतरायला लागलो. एका बुरुजाच्या मागून जाण्यास एवढीच जागा होती.


मुल्हेर आणि मोरा यांना खिंडीत जोडणारी तटबंदी. खिंडीत तटबंदी यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. जवळ जवळ दहा फूट उंचीची तटबंदी अत्यंत भक्कम आणि अभेद्य वाटत होती. इतक्या वर्षात अजून याचा एकाही दगडही हाललेला नाही.


दुसरी वाट माहीत नसल्याने खाली सोमेश्वर मंदिर लोकेट केले आणि त्यानुसार खाली उतरत राहिलो. उतरणीचा हा मार्ग तसा छोटा होता.


आता येथून संपूर्ण मुल्हेर किल्ला दृष्टिपथात आला होता.
दहा तासात आपण कोठून कोठेपर्यंत कसे गेलो याचा अंदाज घेतला. येथून किल्ला जास्तच रौद्र आणि अजस्त्र वाटत होता.
सुरवातीची पांढरी रेघ जेथे काटकोनात वळली तेथे सोमेश्वर मंदिर होते.



येथून उतरून परत सोमेश्वर मंदिरात गेलो. तेथील पुजारीकाकाना योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद देऊन पुढे देवीच्या मंदिराकडे निघालो. तेथून अजून एक अज्ञात रस्ता पकडून अंदाजे निघालो तर डायरेक्ट गणेश मंदिरात पोहोचलो.
मुल्हेर माचीवरून उतरून परत सर्व प्रवेशद्वारांना निरोप देऊन पायथ्याशी आलो.

आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. सकाळी आमच्याबरोबर शेतापर्यंत आलेली मंडळी घरी जायच्या लगबगीत होती. तर काही येथे राहणारी मंडळी गावातून काम करून परत घरी निघाली होती. कामावरून घरी जाताना कडेवर मुले बाळे, हातात डबा, रोजंदारीची हत्यारे आणि चेहऱ्यावर सुखी हास्य. मला माझे हापिस सुटल्यानंतरचे माझे आविर्भाव आठवले. खरेच निसर्गाच्या कुशीत राहून ही माणसे किती सुखी होती.

काही गोळ्या, चॉकलेटे शिल्लक होती, ती रस्त्यात खेळणाऱ्या मुलांना दिली तर बराच डबा उरला होता, तो वाया जायला नको म्हणून तेथील गरिबांना दिला. 

भव्य, दिव्य, अभेद्य, अशक्य, तुफान, फाडू अश्या सगळ्या विशेषणांचा अनुभव आम्हाला या एकाच ट्रेक  मध्ये आला होता. तरीही मुल्हेर-मोरा बरोबर अजून एक दिवस असता तर हरगडही झाला असता असे राहून राहून वाटत होते. हरगडावर काही टन वजनाच्या ३ तोफा आहेत असे ऐकले होते. त्या बघायचा आज काही योग नव्हता. एका वेळी वाटले की मांगी-तुंगी रद्द करून उद्या हरगडालाच जाऊया, पण प्लान आधीच ठरला होता तसेच आता अंगातही त्राण उरले नव्हते.

आता आम्ही परत गावात शिरलो आणि थेट बाजारातच गेलो उद्याच्या मांगी-तुंगी ट्रेकची तयारी करण्यासाठी. उद्याची मांगी-तुंगीला जायची सोय बघून जर गावात टंगळ- मंगळ करीत निवांत वेळ  काढला. आज संध्याकाळी परत समाधीला न जाता गावातील ओळखीच्या माणसाकडे त्याच्या आग्रहास्तव जेवायला गेलो. "गोड काजू शिरा" अजूनही जिभेवर रेंगाळतोय.

आयुष्यात एकदा तरी ह्या किल्ल्यावर जाऊन यावे असे माझे मत आहे.याआधी जर मला कोणी "तुझा सर्वोत्तम ट्रेक कुठला?" असे विचारले असते तर 'हरिश्चंद्रगड' हेच उत्तर दिले असते. आता मात्र माझे मत बदलले होते.
निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत हे जाणवतानाच आपले पूर्वज माणसे कोणत्याही प्रकारचे तंत्र अस्तित्वात नसतानाही कित्येक मैल आपल्या पुढे होती असे  जाणवत राहते.

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस  झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला  होता बहुतेक. :) . घरचीही ओढ लागली होती. 
पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते. 
( ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. त्याबद्दल पुढच्या भागात -
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४  - मांगी-तुंगी आणि परतीचा प्रवास )

सागर