गुरुवार, २६ मे, २०२२

सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड पदभ्रमंती मोहीम [ SRTR Trek ]

 शिवजयंती २०२२ विशेष


सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड अशी ९२ किलोमीटर्सची पदभ्रमंती मोहीम  [ SRTR Range Trek ]


दिवस १ : आतकरवाडी - सिंहगड किल्ला - कल्याण दरवाज्याने विंझर - साखर - गुंजवणे - राजगड किल्ला - भुतोंडे खिंड [ ३०.४  किलोमीटर्स ] 

दिवस २ : भुतोंडे खिंड - तोरणा किल्ला - वाळंजाई दरवाज्याने भट्टी - गेळगाणी - हरपुड -  ब्राम्हणवाडा - मोहरी  - रायलिंग पठार - मोहरी   [ ३५ किलोमीटर्स ]

दिवस ३ : मोहरी - बोराट्याची नाळ - लिंगाणा पायथा - लिंगणमाची - पाने - वारंगी - टकमकवाडी - रायगडवाडी - नाणे दरवाज्याने रायगड - चित्त दरवाज्याला मोहीम समाप्त. [ २७ किलोमीटर्स ]




।। हर हर महादेव ।।

आपल्या आयुष्यरुपी अत्तराच्या कुपीत कधीही न विसरता येणाऱ्या अनुभवांचे अत्तर नियमित टाकायला हवं. त्याचा दरवळणारा सुगंध म्हणजेच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगायला ऊर्जा देतात. आजची आमची ही शिवजयंती विशेष मोहीम अगदी तशीच अत्तरासमान आहे. जेव्हा जेव्हा शिवजयंती येईल तेव्हा ह्या मोहिमेची आठवण आल्याशिवाय काही राहायची नाही. महाराजांच्या पराक्रमाचे मूक साक्षीदार आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातील या वाटांनी शिवजयंती दिनी श्री दुर्गदुर्गेश्वराला जाता येणे यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले? 

सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड हे किल्ले वेगवेगळे केले होते पण एकसलग डोंगरधारेवरून तीन दिवसाची मोहीम आजपर्यंत झाली नव्हती. रायगड प्रभावळीतील वाटा आणि प्रदक्षिणेच्या निमित्ताने सलग तीन रविवार रायगड जाणे झाले होते पण तीन दिवसात नव्वद किलोमीटर्सचा पल्ला ऐकून आजपर्यंत त्याचे कधी धाडस केले नव्हते. आज तो योग आला आणि दैवी रचना म्हणतात तसे सगळे काही जुळून आले. ते म्हणतात ना .. "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है ... कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है !!"

मोहिमेत कुठेही वाटाड्या घेतला नव्हता पण काही मार्ग आधी केले असल्याने माहित होते. विंझर ते गुंजवणे गाडीरस्ता टाळून शेतातून जाणारा मार्ग, तोरण्याचा वाळंजाई दरवाज्याने भट्टी गावात उतरणारा ते पुढे मोहरी पर्यंत हे रस्ते माहित नव्हते त्यामुळे तेथे वाटा शोधण्यात काही वेळ जाईल या हिशेबाने नियोजन आखले होते. आदल्या रविवारी घाटमाथ्यावरील माणगाव /चांदर पासून निसणी वाटेने पाने गावात जाऊन आलो तेव्हा बोराट्याच्या नाळेचा भूभाग थोडा लक्षात आला. पाने गावातून रायगड किती वेळ लागू शकतो याचा थोडा अंदाज घेतला. तिन्ही दिवस सुमारे १५ किलो वजन पाठीवर घेऊन रोजची ३० किमी चढाई-उतराई होती आणि त्यात शेवटच्या दिवशीचे वेळेचे नियोजन महत्वाचे होते कारण रायगडाचे द्वार संध्याकाळी पाच वाजता बंद होतात. अश्या तयारीने मोहिमेस सुरुवात झाली. .gpx फाईल्स बरोबर होत्या पण त्याची फार काही गरज पडली नाही. स्थानिक लोकांशी बोलून पुढची वाटचाल ठरायची. भटकताना जिथे जिथे वाट चुकलो तेथे सुदैवाने कोणीतरी स्थानिक व्यक्ती देवासारखी धावून यायची. मोहीम यशस्वी होण्यात त्या "अनामिक" व्यक्तींचा खूप मोठा वाटा आहे. 

असो. तर तीन दिवसाची भर उन्हातली खडतर मोहीम पार पडली ती अशी - 


दिवस १ : आतकरवाडी - सिंहगड किल्ला - कल्याण दरवाज्याने विंझर - साखर - गुंजवणे - राजगड किल्ला - भुतोंडे खिंड [ ३०.४  किलोमीटर्स ] 

पहाटे चार वाजता गजाननाला नमस्कार करून मंडळी सिंहगडाच्या दिशेने निघाली. पाठीवर १४-१५ किलोची बोचकी घेऊन बरोबर सव्वा-पाचला सिंहगडाचा चढाई चालू झाली. पुणे दरवाजा पोहोचलो तेव्हा तांबडफुटीला सुरुवात झालेली. नियमिय सिंहगडावरआलेली  मंडळी आमच्या पाठीवरील बिऱ्हाडं पाहून आमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन गेली. तडक कल्याण दरवाजा गाठून खालच्या डोंगरधारेने विंझर गावाची वाट धरली तोपर्यंत झुंजार बुरुज सकाळच्या सोनसळी किरणांनी न्हाऊन निघालेला. नारायणाला वंदन करून पुढे निघालो तसे पुढचे लक्ष्य दृष्टीक्षेपात आलेले ते म्हणजे गडांचा राजा... राजांचा गड..  "राजगड"!

पहिले लक्ष काबीज! किल्ले सिंहगड!

कल्याण दरवाज्याने विंझर कडे उतरताना. समोर दिसणारा राजगड. 

सिंहगड कल्याण दरवाज्याने 

दोन अडीच तासात विंझर गावात पोहोचलो तेव्हा उन्हे चांगलीच तापू लागलेली. एका शाळेत पाणी भरून क्षुधाशांती झाली. येथून आता राजगडाचे पायथ्याचे गाव गुंजवणे गाठायचे होते. गाडीरस्ता लांब पडेल म्हणून शेतातून साखर गावाची वाट धरली. नदीमार्ग ओलांडून साखर गावात पोहोचलो तेव्हा मध्यान्ह उलटून गेलेली. पुराणपुरुष भासावं असं एक मोठ्ठालं आंब्याचं झाड एक बांधाच्या कडेला ऊन्ह थोपवून उभं होतं. त्याखाली पथाऱ्या पसरल्या. तीन गुळाच्या पोळ्या साजूक तुपाशी चोपून चांगली तासभर झोप पदरात पाडून घेतली. 

वामकुक्षी 

दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्याने आजूबाजूच्या गावात खास माहौल होता. प्रत्येक गावातून मोठाले लाऊडस्पिकर लावलेले. त्यातली "रमणीय?" गाणी ऐकत आता आमची गुंजवण्याच्या दिशेने वाटचाल चालू झाली.

"कोरोनाने जाशील मरून! .... घे रे प्रेम करून!"
हे अद्वितीय गाणे जेव्हा ऐकले तेव्हा मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा का मिळालेला नाही याचा बोध झाला. जेवण झाल्याने जड पावले उचलत गुंजवणे पोहोचलो आणि भर दुपारी साडे-तीन वाजता राजगड चढाई चालू केली. ऊसाचा रसाने दमलेल्या शरीरात थोडेफार प्राण फुंकले तर् इलेक्ट्रॉल, काकड्या, चिक्की इत्यादी मंडळींनी पाठपिशवीतून पोटात बदल्या करून घेतल्या तेव्हा कुठे ऊर धपापत का हॊइना पण पद्मावती माची गाठता आली. 

राजगड चोर दरवाजा 

राजगड बालेकिल्ला 

पद्मावती देवीचे दर्शन घेऊन पुढील वाटचाल यशस्वी होऊदे म्हणून मनोमन साकडे घातले. टाक्यातले थंडगार पाण्याने जरा जिवात जीव आला. किल्ल्यावर खूप गर्दी होती. ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकत होते. सदरेवरून संजीवनी माचीचा मार्ग पकडला तेव्हा जनता शून्य झाली होती. आजचा टप्पा हा सगळ्यात मोठा आणि अवघड होता. तो वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. ग्रुपमधील काही मंडळी मागे पडल्याने त्यांची वाट बघत संजीवनी माचीवर बसलो तेव्हा संजीवनीवरून सूर्यास्त पाहायची खूप वर्षांपासूनची मनीषा आज पूर्ण होत होती. 

संजीवनी माचीवरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा काय वर्णावा? अहाहा ! मंगलमय सोहोळाच जणू! संजीवनी माचीचे आजही अभेद्य असे ते रूप, त्यापुढे अलगद पसरलेले सह्याद्रीचे असंख्य पदर, पश्चिमेला आभाळी आलेली केशरी झालर, मिनिटागणिक लालबुंद होत जाणारे सूर्यदेवाचे बिंब, घामाने डबडबलेल्या अंगावर येणारा पश्चिमेचा थंड वारा, दरीत कोसळणाऱ्या कड्यांमधून घुमणारा छत्रपतींचा जयघोष! केवळ शब्दातीत! छंदातून स्वप्नाकडे नेणारा आनंद!

संजीवनी माचीवरून दिसणारा सूर्यास्त 

मागे राहिलेले भिडू जमले तेव्हा सूर्यास्त झालेला. सिंहगडावर सूर्योदय ते संजीवनीवर सूर्यास्त. आता भुतोंडे खिंडीपर्यंत वाटचाल अंधारात करावी लागणार होती. वाट मळलेली असल्याने विजेरी घेऊन निघालो भुतोंडे खिंडीत कचरेवस्तीत आलो तेव्हा रात्री नऊ झाले. आजचा मुक्काम खिंडीत एका घरात होता. गरमागरम पिठलं -भाकरी समोर आली तेव्हा जेवायचेही भान उरले नव्हते. पण दिवसभराच्या पायपिटीने बेक्कार भूक लागलेली. छान जेवण झाले. आज दिवसभरात ३२ किमी भटकंती झाली होती. त्यात दोन किल्ले चढाई -उतराईने शारीरिक क्षमतेचा खरा कस लागला.  पहिला टप्पा तर यशस्वी ठरला होता. भिडूंची संख्या १३ वरून अर्ध्यावर आलेली. उद्याचे लक्ष होते रायलिंग पठार. पुढचे सगळे जगदीश्वराच्या मनात असेल ते होईल या विचाराने निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

उद्याचे लक्ष : किल्ले तोरणा 

दिवस २ : भुतोंडे खिंड - तोरणा किल्ला - वाळंजाई दरवाज्याने भट्टी - गेळगाणी - हरपुड -  ब्राम्हणवाडा - मोहरी  - रायलिंग पठार - मोहरी

घरात झोपल्याने खूप छान झोप लागली. पहाटे चारला थंडीशी दोन हात करत उठलो तेव्हा पायाचा घोटा दुखत होता. काही प्रॉब्लेम आला तर येथून पुढे परतायला संधी नव्हती. गजाननाचे स्मरण करून आणि चालायला चालू केले कि थांबेल या विचाराने पहाटे पाचला तोरण्याच्या दिशेने चढाई चालू केली.

भुतोंडे खिंडीतून चढताना दहा मिनिटातच घामाने अंघोळ झाली. वातावरण थंड होते. दरीखोरे हळूहळू जागी होत होती. पक्षांचे आवाज आणि डोईवर पूर्णचंद्र अनुभवत रडतोंडी बुरुजाच्या खालच्या धारेवर पोहोचलो. आता सूर्योदयाची वेळ झाली होती. राजगडाच्या अवकाशात त्याचे पडघम उमटू लागलेले. पहिल्या सूर्याच्या किरणांनी आळसावलेल्या प्रचंडगडाच्या खोऱ्यात नवी तरतरी आणली. रडतोंडी बुरुजाचा काळाकभिन्न कातळ अजूनच चमकू लागला. तो मंगलमय सोहोळा अनुभवून शेवटच्या टप्प्यातील शिडी चढून कोकण दरवाज्याने तोरणा किल्ल्यात प्रवेश झाला. मेंगाई देवीला बुधला माचीवरूनच मनोमन नमस्कार केला. बुधला माचीला महाराजांची शिवगर्जना देऊन वाळंजाई दरवाजा शोध चालू झाला. या वाटेने आपण वेल्हे-केळद मार्गावरील भट्टी गावात पोहोचतो. मळलेल्या पाऊलवाटेने वाळंजाई दरवाजा शोधायला फार कष्ट पडले नाहीत. येथून जोरदार घसाऱ्याने घसरत खाली उतरायला चालू केले. खाली भट्टी गाव जवळ दिसत होते पण रस्ता काही सापडेना. gpx फाईल उघडून त्याआधारे रस्ता शोधायचा प्रयत्न केला. अखेरीस दीड-दोन तासांच्या चालीने भट्टी गावात पोहोचलो तेव्हा दहा वाजत आलेले. 

राजगडावरून होणारा सूर्योदय . 


सकाळचा नाश्ता 

पॅनोरामाची कमाल. 

वाळंजाई दरवाजा, किल्ले तोरणा 

भट्टी गावात विश्रांती झाली, पाणी भरून घेतले. गावात रामाचे फार सुंदर मंदिर आहे. कधी जाणे झाले तर आवर्जून बघायला हवे असे. रामरायाच्या आशीर्वादाने समोरची डोंगरधार पकडून गेळगाणी गावाच्या दिशेने प्रयाण केले. भर बाराच्या टळटळीत उन्हात गेळगाणीत पोहोचलो. शांत टुमदार असे गाव पण कुत्र्यांनी अवघे गाव दणाणून सोडले. एक घरात तांदूळ पाखडणी चालू होती. त्या मामांना फोटो काढू का विचारले तसे मामा घरात जाऊन शर्ट घालून हातात तांब्याभर पाणी घेऊन आले. जेवणाचं काय? येता का जेवायला? इति मामा! त्यांचे आभार मानून पुढे निघालो. गावापुढे जाऊन एका मोठ्या झाडाखाली जेवणं झाली आणि तासभर ताणून दिली. गावात विचारले तेव्हा येथून "मोहरी" गाव दोन तास आहे असे समजले म्हणून अडीच वाजेपर्यंत विश्रांती झाली. इतकी दमणूक झालेली कि पाठ टेकताच काही मंडळींनी घोरण्याचा वरचा "सा" धरला. 

मोहरीकडे जाताना दुपारची वामकुक्षी 

अडीचच्या सुमारास पुढची वाटचाल चालू झाली. गाव सोडून विहिरीवर पाणी भरले. तेथे एक मावशी कपडे धुवत होत्या. त्यांना मोहरीचा रस्ता विचारून पुढे निघालो. जसे एका डोंगरावर आलो तेथून पुढे वाट मिळेना. कुठल्या दिशेला जायचंय हेही नक्की माहित नव्हतं. अर्धा तास प्रयत्न केला पण वाट काही सापडली नाही. परत विहिरीपाशी आलो तेव्हा त्या मावशी धुतलेले कपडे भरून निघालेल्या. त्यांनी परत वाट समजावली आणि आम्ही योग्य वाटेला लागलो. 

त्या मावशी म्हणजे देवच उभा होता असे म्हटले तरी समर्पक. अर्ध्या-एक तासाने चुकून आम्ही परत आलो तेव्हा त्यांची निसटती भेट होणे केवळ कृपा. त्या जर तेव्हा तिथे परत भेटल्या नसत्या तर आज तुम्हाला हा ब्लॉग फक्त गेळगाणी गावापर्यंतच वाचायला मिळाला असता. आणि संध्याकाळची त्या निर्मनुष्य जंगलात आमची जी काय दिशाहीन अवस्था झाली असती ते निराळं. 

दोन तास चालल्यावर अपेक्षेप्रमाणे गाव आले पण ते "मोहरी" नव्हते तर "हरपुड" होते. येथून मोहरी अजून दिड तास. पायातले अवसान गळून गेलेले पण पर्याय नसल्याने देह ढकलत पाऊले निघाली. आता माती रस्ता चालू झाला. अडीच ते सहा चालून शेवटी मोहरी गाव आले. येथे एक घरात आधीच सांगून जेवायची व्यवस्था केली होती. घडाळ्यात बघतो तर सहा वाजलेले. येथून रायलिंग पठारावर सूर्यास्त पाहायला जावे ह्या इच्छेने घरात बॅग ठेवली आणि पळत रायलिंगकडे सुटलो. ३० किलोमीटर्स चालणं झाले होते त्यापुढे पळत अडीच किलोमीटर जाणे दिव्य होते पण एवढी मजल मारल्यावर रायलिंगवरचा सूर्यास्त सोडायचा नव्हता. 

मोहरीतून दिसणारा लिंगाणा, रायगड, कोकणदिवा परिसर 

साडेसहाला रायलिंग पठारावर पोहोचलो तेव्हा सूर्यनारायण मेघातून आपली किरणे सोडवण्यात मग्न होते. लिंगाणाच्या माथ्यावरील भगवा केशरी आसमंतात डौलाने फडकत होता. लिंगाणाच्या माथ्यावर पोहोचलेल्या लोकांचा महाराजांचा जयजयकार कडेकपारीत घुमत होता. रायगडाच्या भाळी टिळा लावल्यासारखे सूर्याचे लालबुंद बिंब मनमोहक भासत होते. सूर्यनारायण हळू हळू रायगडाच्या पाठीशी अस्ताला गेले. काळ नदीचे खोरे आता अंधाराच्या स्वाधीन होऊ लागेलेले. एक नेत्रदीपक सोहोळा संपन्न होत होता. 

लिंगाणा 

रग्गड फोटो काढून परत मोहोरीला आलो. एव्हाना आजचे ३५ आणि एकूण ६७ किलोमीटर्स झालेले. पाय उचलायचीही ताकद नव्हती. सरपंचांकडे जेवण झाले आणि त्याशेजारी घरात पथाऱ्या पसरल्या. सगळे झोपले पण मला काही शेजारचाच्या घोरण्याने झोप लागेना. मग मी घराच्या आत ओसरीवर पहुडलो. समोर बघतो तर सगळी गुरं मस्त रवंथ करत माझ्याकडे बघत होती. घरातून ताक घुसळण्याचा आवाज येत होता. त्या मावशींना विचारल तस एक ग्लास ताज ताज ताक समोर आलं. मग जे काही झोप लागली ते कशाचेही भान उरले नाही. 

आजचा दुसरा दिवसही यशस्वी ठरल्याचे मनोमन समाधान होते. आता हत्ती गेला अन शेपूट राहिले अशी भावना होती. उद्या रायगडखेरीज कुठेही चढाई नाही ह्या विचाराने मनोमन आनंद होता. आता महाराजांच्या पद्स्पर्शाची आणि जगदीश्वराच्या आशीर्वादाची ओढ लागलेली. 


दिवस ३ : मोहरी - बोराट्याची नाळ - लिंगाणा पायथा - लिंगणमाची - पाने - वारंगी - टकमकवाडी - रायगडवाडी - नाणे दरवाज्याने रायगड - चित्त दरवाज्याला मोहीम समाप्त. [ २७ किलोमीटर्स ]

तिसरा दिवस खास होता. बोराट्याची नाळ लिंगाणा पायथ्यापर्यंत माहित होती आणि तेथून पाने गावापर्यंत समजून घेतली होती. पाने गावापासून पुढे अनेक गावं लागणार होती जिथे वाट विचारायला माणसे आजूबाजूला दिसतील. शेवटचा पर्याय गाडीरस्त्याचा होताच. सगळ्या गोष्टी अनुकूल वाटत होत्या. एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे वेळेचा. पाचच्या आत रायगडाच्या महादरवाजांशी पोहोचणे गरजेचे होते. मध्ये कोठे वाट चुकलो किंवा काही कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर वेळेशी स्पर्धा अजून तीव्र होणार होती. या सगळ्याचा विचार करून उजाडू पर्यंत न थांबता पहाटे चारला बोराट्याची नाळ उतराई चालू केली. लिंगाणा आरोहण करणाऱ्या दोन संस्था आल्याने रस्त्यावर मार्किंग केलेले होते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. 

रोज रात्री पायाला आणि गुडघ्याला तेल लावू या विचाराने विंझर गावातून एक रुपयांचे नवरत्न तेल खरेदी केलेले. रात्री पायाला ते तेल लावून त्यावर मोजे घालून झोपलो. सकाळी दोन दिवसांच्या मोज्यांचा आणि नवरत्न तेलाचा मिळून जो काही वास तयार झाला तो म्हणजे "देशी ऍनेस्थेशिया" म्हणून खपला असता. ते मोजे तसेच पॅक करून ठेवले ना जाणो बोराट्याची नाळ उतरताना अंधारात कुठला प्राणी समोर उभा ठाकलाच तर त्याला कमी कष्टात बेशुद्ध पाडता येईल. जगात काही निरूपयोगी नाही हेच खरं. 😁😁

पहाटे साडे-तीन ला उठून आवराआवर करायला चार वाजले. सरपंचांकडे चहा पिऊन रायलिंग पठाराच्या दिशेने चालायला चालू केले. सुमारे अर्धा तासात बोराट्याच्या नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. येथून आता अवघड उतरण असल्याने विजेरीच्या प्रकाशात हळू हळू उतरायला लागलो. जिथे अवघड टप्पा होता तेथे जाड लोखंडी साखळी लावलेली असल्याने फार काही कसरत करावी लागली नाही. सगळे जंगल निद्रिस्त होते. नाळेच्या शेवटी खाली दापोली गावातील काही दिवे दिसत होते बाकी संपूर्ण काळोख. दोन टप्पे ओलांडून आता तिसऱ्या अवघड टप्प्यावर पोहोचलो. येथून उजवीकडे लिंगाणा किल्ल्यांच्या पायथ्याशी जाता येते. येथूनच आपण पुढे जाणार होतो. उजव्या हाताने कातळाला बांधलेली दोरी पकडून एकमेकांच्या साथीने हाही टप्पा पार झाला. येथून दहा मिनिटात लिंगाणा आणि रायलिंग पठाराच्या मधल्या खिंडीत आलो. 

बोराट्याची नाळ उतरताना पहाटे. 

खिंडीतल्या सुळके देवतेला वंदन करून पुढे नाळेनेच पुढची वाटचाल चालू झाली. अंधारात काही लोक लिंगाणा चढाई करत होते त्यांचे काही दिवे दिसत होते. एकूणच मान ९० अंशात करावी लागेल अशी चढाई आमच्यातल्या एका सदस्याने कोणत्याही साधनांशिवाय केली होती, त्याचे सर्व सदस्यांनी मनभरून कौतुक केले. लिंगाण्याच्या डोईवर पूर्णचंद्र आमच्या वाटचालीवर लक्ष ठेऊन होता. तांबडफुटीची वेळ झाली तशी घाटमाथ्यावरील शिखरांना सोनेरी साज चढू लागला. नाळेतून समोर निसणीची वाट, गायदरा, बोचेघोळ, कोकणदिवा आसमंतात उंच उंच जाताना दिसत होते. मागच्या रविवारी या वाटांवरील जंगलं भटकत होतो आज त्याच्या समोरच्या. एक छोटेखानी वर्तुळ पूर्ण होत होते. 

निसणीची वाट, गायदरा, बोचेघोळ, कोकणदिवा

एक दीड तासांच्या नाळेच्या उतराईने लिंगणमाचीच्या पठारावर पोहोचलो. टुमदार घरे आता रिकामी दिसत होती. येथील घरे सरकारने खाली पाने गावात विस्थापित केली. आजही ते लोक देवीला आणि होळीला पाच दिवस लिंगणमाचीला येऊन साजरी करतात. सगळीकडे करवंदांच्या फुलांचा मोहक वास सुटला होता. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यात आपल्या सुवासाने अधिकची भर घालत होता. असे शुचिर्भूत वातावरण आणि समोर आवाक्यात दिसू लागलेले आमचे लक्ष. किल्ले रायगड! 

इथे मोहरीतून बनवून घेतलेला भाकरी-भाजीचा नाष्टा झाला. उरलेला पुढे गावात कोणालातरी देता येईल या विचाराने पॅक करून घेऊन पुढे निघालो. येथून खाली उतरताना रस्ता चुकला आणि आम्ही थोडे भरकटलो. पाने गाव खाली दिसत असल्याने कुठे जायचंय हे माहित होत. "काळ" नदीच्या पात्रात कुठूनही उतरलो तरी पाने गाव गाठता येईल या विचाराने सरळसोट पाण्याच्या वाटेने नदी पात्रात उतरायला सुरुवात केली. अर्धी वाट तर घसरगुंडी करूनच उतरलो आणि जवळपास तासभराच्या खड्या उतराईने आमचे घोडे "काळ" नदीच्या सुकलेल्या पात्रात नाहले.  

लिंगणमाचीत नाश्ता 

दहा वाजता पाने गावात पोहोचलो तसे शाळेच्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून घेतले. आज शेवटचा दिवस होता त्यामुळे बॅगेतले सगळे खायचे पदार्थ एक एक करून पोटात बदली करून घेऊ लागले. पाने गावात रामाचे फार सुंदर मंदिर आहे. रामरायाच्या दर्शनाने वारंगी गावाची पायवाट धरली. येथून वाघेरी गाव जाऊन तेथून जंगलातून रायगडाच्या परिक्रमा मार्गात जात येते असे ऐकलेले पण कोणी जाणकार बरोबर नसल्याने तो मोह टाळला. पाने गावात लोकांनी वाघेरी न जाता वारंगीला जाऊन धरणाच्या पुलावरून जाण्याचा बहुमोल सल्ला दिला. त्यांचा शब्द प्रमाण मानून तासाच्या चालीने वारंगीत पोहोचलो. इथे गावातून रस्ता विचारून धरणाच्या कॉलनीच्या दिशेने निघालो. रस्त्यातून जाताना आमच्या पाठीवरची बोचकी आणि चित्रविचित्र रूप पाहून दोन जाणं थांबली. त्यांना आम्ही सिंहगड पासून चालत इथपर्यंत आलोय हे सांगितल्यावर गाडीवर मागे बसलेला माणूस खाली उतरला आणि त्याने प्रत्येकाचे नाव विचारत हात हातात घेत आमचे अभिनंदन केले. "वारंगीत आमच्या गावात तुमचे स्वागत आहे. तुमच्यासारखी लोक आमच्या गावात येतात याचा अभिमान वाटतो!" आजच्या दिवसाचा हा खास क्षण होता. 


                                                            पाने गावातून दिसणारा सहयाद्री 

धरणाच्या कॉलनी पासून एक पुलाने आम्ही रायगडाच्या प्रभावळीत आलो. एका सुरक्षारक्षक केबिनमध्ये एक वयस्कर व्यक्ती बसलेली त्यांना सकाळी नाष्टासाठी घेतलेले भाजी-भाकरी दिले तसे त्यांनी जवळ बोलावून चेहेऱ्यावरून हात फिरवला. जपून जा रे पोरांनो, टकमक टोकांवरून वाकू नका! लहानपणीची आज्जीची अशी माया हि अशी डोळ्यासमोर तरळली. त्यांचे आशीर्वाद घेऊन आता पोहोचलो टकमकवाडी.येथून पुढे अर्धा तास रायगडवाडी. एक घरात पाणी भरून घेतले आणि नाणे दरवाज्याने रायगड चढाई चालू झाली. 

नाणे दरवाजा , रायगड 

उन्हे डोक्यावर आलेली. वेळ रामराया जन्मला ती टळटळीत बाराची! नाणे दरवाज्याच्या पायऱ्यांशी आमची इंच-इंच लढाई चालू झाली. पावलागणिक देह ढकलणे हा एकच विचार मनात! एव्हाना ८५ किलोमीटर्स चालणे झाले होते. दोन दिवसात एवढे थकलो नव्हतो पण आता कोकणातल्या दमट हवेने प्राण कंठाशी आणलेले. छान आवरून आलेली लोक आमच्याकडे चित्रविचित्र नजरेने पहात होती. आता केव्हा महाराजांचे दर्शन घेतोय आणि जगदीश्वराच्या पायाशी डोकं टेकतोय असं झालेलं. 

दर थोड्या वेळाने थांबत एकदाची आमची पालखी महादरवाजा पोहोचली. भगवे झेंडे घेऊन फोटो झाले. तीन दिवसांचा प्रवास संपायचे सूतोवाच होऊ लागले. महादरवाजा, होळीचा माळबघून महाराजांच्या समोर नतमस्तक झालो. अमाप गर्दी उसळली होती पण त्याची आता पर्वा नव्हती. समोर फक्त मेघडंबरीत विराजमान महाराजांची मूर्ती दिसत होती. मी आजपर्यँत रायगड गेलो नव्हतो तो या सोनेरी क्षणांसाठीच कि काय? स्वराज्याच्या दोन राजधान्या चालून येथे येण्याचे भाग्य आज लाभले. आज आम्ही आलो त्या राजगड ते रायगड या मार्गाने स्वतः महाराज किती वेळा गेले असतील. आज आम्हाला वाटा शोधण्यास कष्ट पडले त्या स्वराज्याच्या वाटांवर त्याकाळी बहिर्जी नाईकांची तुकडी वाटा पिंजून काढत रात्रंदिवस लक्ष ठेऊन असतील.अश्या अनेक विचारांचा गलबला मनात घेऊन जगदीश्वर मंदिराकडे गेलो. गाभाऱ्यात जाऊन शिवपिंडीवर डोकं टेकले. या क्षणाला आमच्या "सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड" संकल्पाची पूर्ती झाली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर "हिरोजी इंदलकर" यांच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख पाहून परतीची वाट धरली. 


महाराज ! मुजरा!

महाराजांची समाधी 

 

मागील ३ दिवस फक्त मुक्त डोंगररांगा, किल्ले, निसर्ग, सूर्योदय, सूर्यास्त, इतिहास, सह्यादीच्या अंगाखांद्यांवरून भटकणे बस इतकेच सोबत होते. आत्ता कुठे पोहोचलो आणि अजून किती चालायचंय याखेरीज मनात कोणतेही विचार नव्हते. सोबत रिकामे पोट, रापलेला चेहरा,संधी मिळताच वेदनांची जाणीव करून देणारे पाय, तृप्त असे मन आणि स्वप्नपूर्ती झालेले डोळे. सगळे केवळ शब्दातीत. 
पावनखिंड पिक्चर मध्ये बाजी म्हणतात- " या दमलेल्या शरीराकडून, तारवठलेल्या डोळ्यांकडून, ऊर धपापणाऱ्या छातीकडून बक्षिसी वसूल करा! " आम्हाला तीन दिवसात अनेक बक्षिसी न मागता मिळाल्या होत्या. संजीवनी माचीवरचा सूर्यास्त, रडतोंडी बुरुजावरून राजगडाच्या डोईवरून होणारा सूर्योदय. गेळगाणीत वाट दाखवणाऱ्या त्या मावशी, २० मिनिटात पळत गाठलेले रायलिंग आणि तेथून दिसणारे सायंकाळचे दृश्य, तोरण्याच्या कडेकपारीत घुमणारा शिवगर्जनेचा निनाद आणि बरच काही! 

असो! तर ९२ किलोमीटर्सचा, तीन दिवसाच्या प्रवासाचा वृत्तांत आता संपतो आहे. काही भाग मोठे झालेत पण पुन्हा कधीतरी हे वाचले जाईल तेव्हा हे तीन दिवस डोळ्यासमोर तरळून जातील हे नक्की!

 

याच साठी केला होता अट्टाहास! 


महत्वाच्या नोंदी : 

१. आमचा तीन दिवसाच्या ट्रेकचा एकूण खर्च - १३०० रु.  झाला. 

( यामध्ये पहिल्या दिवशी सिंहगड पायथ्यापर्यंत येण्याचे टेम्पोभाडे, भुतोंडे खिंडीतील रात्रीचे जेवण [ १५०], मोहरीतील रात्रीचे जेवण, रायगड ते पुणे टेम्पो ट्रॅव्हलर प्रवास आणि मध्ये जेवण ) 

२. पूर्ण वाट मळलेली असल्याने वाट्याड्याची गरज नाही. गेळगाणी ते मोहरी आणि बोराट्याची नाळ उतरून पाने गावात जाणारी वाट आधीच स्थानिकांकडून समजावून घ्यावी. 

३. "Rambler" अँप वर SRTR .gpx फाईल मिळतील त्या डाउनलोड करून नेव्हिगेशन आप्लिकेशन मध्ये ठेवा . वेळेला उपयोगी येतात. 

४. पहिला दिवस जास्त दमणूक होते. दुसरा, तिसरा दिवस त्यामानाने कमी दमणूकीचे आहेत. 

५. टकमकवाडी वरून नाणे दरवाज्याने रायगड जाणे सोपे आहे. चित्त दरवाजा जाऊन वर यायला अजून जास्त वेळ लागू शकतो. 

६. पाने गावात उतरल्यावर डांबरी रस्त्याने न जाता स्थानिकांना विचारून पाने ते वारंगी किंवा पाने ते वाघेरी या वाटांनी जावे. पाने ते वाघेरी रस्ता माहित नसल्यास वाटाड्या घेणे उत्तम. 


विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।

कथा निरूपाने चर्चा । सार्थके काळ जातसे ।।

 

इति लेखनसीमा! 

सागर शिवदे 

साखर गावातील नदी. 
झुंजार बुरुजावरील सूर्योदय 

वाळंजाई दरवाज्याने भट्टी गावात उतरणारी वाट 
भट्टी गावातले राम मंदिर 
बोराट्याची नाळ उतराई 

फक्त नतमस्तक!

निरोप. 

रविवार, १७ एप्रिल, २०२२

किल्ले दुर्गभांडार | ब्रह्मगिरी | "हत्तीची मेट" वाट | मेटघर किल्ला | नाशिक

 

अपरिचित अशी "हत्तीची मेट" वाट | मेटघर किल्ला



२०२२ या वर्षाची सुरुवात काही खासच झाली होती. वर्षाच्या शेवटच्या दिवशीचा मुक्काम किल्ले कावनईवर ठरलेला. इगतपुरी भागात भटकंती असल्याने किल्ले मोरधन, कावनई , गडगडा , रांजणगिरी व बहुला असा भरगच्च प्लॅन होता. नाशिकवरून एक मित्र आणि मी असे दोघेच असल्याने सगळी भटकंती बाईकवर. फुल्ल मजा. तर दोन दिवस मनोसक्त भटकल्यानंतर मित्राला घरी तातडीने येण्याचा निरोप आला. तिसऱ्या दिवशीचा रविवार किल्ले बहुलासाठी राखीव ठेवलेला कारण इथे फक्त रविवारीच जाता येते असे ऐकलेले. आता तिसऱ्या दिवशी मी एकटाच असल्याने दोन पर्याय समोर उभे राहिले - ठरल्याप्रमाणे बहुला जायचं किंवा मग त्रंबक गाठून ब्रह्मगिरी दुर्गभांडार जायचं, दुपारी नाशिक येऊन रात्रीपर्यंत पुण्यात. मग यामध्ये दुसऱ्या पर्यायाने जायचं ठरवलं. 

गाडी मित्राच्या घरी लावून सकाळी सातला नाशिक पालिकेच्या बसची वाट बघत स्टॉपवर आलो. डुगुडूगु चाललेल्या बसने त्रंबक पोहोचलो. मागे बसलेल्या काकू सकाळपासून कावलेल्या होत्या. "कालचा डायवर गाडी फास्ट मारत होता, सायकलवाले पण पुढे निघून गेलेत"  हे वाक्य चौथ्यांदा कानी पडले तेव्हा अंजनेरी फाट्यावर बस दम खात उभी होती. अखेरीस त्रंबक पोहोचलो, महादेवास दुरूनच नमस्कार करून ब्रह्मगिरीचा रस्ता पकडला. पाठीवरचं १५ किलोचं बिऱ्हाड एका दुकानात ठेवून काठी घेऊन चढाई चालू केली. 

रविवारीच ब्रम्हगीरी म्हणजे गर्दीच गर्दी. पण ही गर्दी मात्र धोपट मार्गाने जाते हे बरे. वाटेत एका धर्मशाळेच्या मागे चांगली पंचवीस तीस फूट खोल पायऱ्यांची फार सुंदर विहीर होती तेथे कोणीही भटकत नव्हते. इथे छोटासा ब्रेक घेऊन दोन सफरचंदांना न्याय देऊन पुढे निघालो. सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात जिथुन होते असे मानतात , गोदावरीच्या उगमाचे पवित्र असे हे स्थान जागोजागी पडलेल्या कचऱ्याने बकाल झालेले  होते. जसे वरती चढून गेलो तसे मात्र शिळेत अखंड कोरलेल्या दोन दरवाज्याने आणि त्यावर कोरलेल्या सुबक शिल्पांनी मनाचा ताबा घेतला. उभा कातळ कापून काढलेला मार्ग, मारुतीची भलीमोठी कोरलेली मूर्ती, त्याच्या पायाखालील राक्षसाचे हावभाव, ब्रह्मदेवाचे शिल्प, कोरलेली गुहा आणि त्याबाहेर दगडाचेच कोरलेले ऋषींच्या दोन मुर्त्या, दरवाज्याच्या वरती वेलबुट्टीचे कोरीवकाम तर खाली हत्तीचे शिल्प. एक बघून अचंबित व्हावं तर दुसरे आश्चर्य समोर. 

माथ्यावर पोहोचलो तेव्हा दहा वाजत आलेले. एका लिंबू सरबत विकणाऱ्या काकांना किल्ल्यावर काय काय बघता येईल ते विचारले. ब्रह्मगिरी मंदिर, जटा मंदिर, दुर्गभांडार किल्ला हे तर बघायचेच होते पण "पंचगंगा शिखराच्या मागे एक हट्टीमेटाचा बुरुज म्हणून जागा आहे. त्याकाळी तीन टप्प्यात बांधकाम केलेली वाट आहे. त्याकाळी हत्ती त्या वाटेने येत असावेत. दगडी तटबंदी बघाल तर डोळे विस्फारातील" - इति काका. 
"किती लोक आहेत? "
"मी एकटाच आहे."
"मग जाऊ नका हो एकट्याने. एकट्याने हरवलात तर काय आणि माकडांचा खूप त्रास आहे तिकडे." 

हे ऐकून हट्टीमेटाचा बुरुज हे प्रकरण काय आहे याचे कुतूहल चाळवले. दुर्गभांडार भटकताना कोणी ट्रेकर ग्रुप भेटला तर त्यांना घेऊन जाऊ या विचाराने निघालो. जटा मंदिर पाहून दुर्गभांडार किल्ल्याच्या दिशेने निघालो. दुर्गभांडार किल्ल्याला जायची कातळातून खोदलेल्या पायऱ्यांची वाट आणि किल्ल्याला जोडणारा नैसर्गिक पूल म्हणजे काय वर्णावा. त्याकाळी कोणतीही साधने नसताना हे सर्व कसे काय खोदले असेल या विचारातच किल्ला भटकत राहिलो. किल्ला भटकून परत ब्रह्मगिरी मंदिरात आलो तेव्हा बाराच वाजले होते अजून दोन-तीन तास हातात होते. एका ग्रुपला हत्तीबुरुज बघायला येता का विचारले तर "इथपर्यंतच कसं आलोय आम्हाला माहित ! " 

ब्रह्मगिरीच्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे एका मंदिरात दगडाखाली गुप्त शिवलिंग आहे तेथे आलो. गर्दी संपल्यावर पुजारीकाकांना हत्तीमेटाची वाट विचारली. "एकटे असल्याने काय होतंय ? काठी घेऊन बिनधास्त जा!" या शब्दाने धीर आला. जशी येथून पुढची वाट धरली तशी जनता शून्य झाली. औषधालाही कोणी नाही. पंचगंगा शिखर वळसा घालून पुढे जायचे होते त्या दिशेने जवळपास तासभर चालत गेल्यावर दूरवर एक झेंडा दिसला. तो झेंडा बघताच मनात एक सुरक्षिततेची भावना आली. आपल्या हिंदू संस्कृतीची एक गोष्ट मला फार आवडते ते म्हणजे कितीही दुर्गम ठिकाणी जा, एखादे छोटेसे मंदिर वा कातळात कोरलेले मारुतीबाप्पा दिसतातच. वीस मिनिटात झेंड्यापाशी पोहोचलो. भैरवनाथाचे छोटेसे मंदिर होते. मनोमन नमस्कार करून आणि देवाला साथीला घेऊन मेटाला निघालो. 

इथून आता पंचगंगा शिखराचे अनेक पदर उलगडत होते यामध्येच कुठेतरी हत्तीमेटाची वाट असणार या उत्साहाने पुढे निघालो. माकडांचेच एक काय ते टेन्शन होते पण त्यांचा अजून मागमूसही नव्हता. तीन-चार पदर ओलांडून जसा पुढे गेलो तसं शेवटच्या पदरातला काळाकभिन्न कातळ चकाकू लागला. बस्स! युरेका! हीच ती वाट! बरेच जण सापडणार नाही म्हणाले होते पण शोधायला फार काही अवघड झाले नाही. 

जे काही डोळ्यासमोर उलगडत होते ते काय वर्णावें? खिंडीतून वरती येताना तीन टप्प्यात बांधलेली तटबंदी वरूनच लक्ष वेधून घेत होती. पहिला दरवाजा चांगला १०-१५ फूट असावा पण पूर्ण मातीखाली गाडला गेलाय. हेच महाद्वार असावे. सध्या आपण त्या द्वारावरून उडी मारून खाली येऊ शकतो. उभा कातळ कोरून बांधलेले प्रवेशद्वार त्यावर दगडाची कोरलेली कमान, बरोब्बर मध्यभागी कोरलेला गजानन. त्यावर दोन फुलांची शिल्पे आणि त्यामध्ये कोरलेली घंटा. घंटेची साखळी आजही तेवढीच उठावदार आणि त्रिमितीय भासावी अशी! कमानीच्या वर दोन्ही बाजूला दोन "शरभ" शिल्पे आणि मध्यभागी द्विदलीय कमलपुष्प त्यात कोरलेला कलश! त्यावर परत वेलबुट्टीचे कोरीवकाम आणि एक मुखशिल्प. एकाच प्रवेशद्वारावर केलेला एवढा कलाविष्कार . अहाहा! काय ती कलात्मकता! काय ती प्रतिभा!

येथून आता खाली खिंडीत उतरायला सुरु केले. प्रवेशद्वारावरून नजर वळवली तसे बाजूला कोरलेला भलामोठा मारुतीबाप्पा आणि त्या शेजारी कोरलेला भैरव वा गडदेवता ! हि शिल्पे आता पडझड झाल्याने अर्धी मातीत गाडली गेलीयेत काही वर्षात नामशेषही होतील. कातळात केलेल्या खोबण्या, अगदी देवाचे वाहन घोडादेखील स्पष्ट दिसतो. शेजारी हात जोडलेला बुद्ध वाटावा अशी मूर्ती व त्यावरही मंदिराचे कोरीवकाम. खूप म्हणजे खूप सुंदर! 

ह्या सगळ्या कोरीवकामाच्या वर बुलंद असा बुरुज आणि अखंड तटबंदी. येथून खाली नाळेत उतरायला चालू केले. हा पहिला टप्पा! येथून थोडं खाली गेलो तसे दोन बुरुज दिसले आणि गुहा. त्याशेजारी महादेवाचे मंदिर आणि त्यात सुबक अशी पिंड. गुहेत थोडा काळ विश्रांती घेऊन पुढे निघालो. येथून पूर्ण नाळ ढासळून गेलेली होती. दगडांचा अंदाज घेत खिंडीतच्या मधल्या तटबंदीजवळ पोहोचलो. येथून आता खाली "मेटघर" गाव दिसू लागले. या गावातील लोक याच रस्त्याने ब्रह्मगिरीला येतात. येथून तिसऱ्या टप्प्यात खाली उतरायला मस्त २०-२५ फुटाची शिडी बसवलेली आहे. पूर्वी खिंडीच्या मधल्या तटबंदीखालून दरवाजा असावा असे अवशेषांवरून वाटते. शिडी उतरून खाली उतरलो आणि नाळेच्या अर्ध्यात आलो. पुढची वाट मेटघर गावात उतरत असल्याने येथून परत फिरायचे ठरवले. तिन्ही टप्प्यात नाळेच्या दोन्ही बाजूनी आजही भक्कम अशी तटबंदी आहे. त्याकाळी या वास्तूचे वैभव काय असावे? या विचारात शिडी चढून गुहेत आलो. 

सकाळी लिंबू-सरबतवाले काका म्हणाले तसे हे सगळे दुर्गवैभव पाहून खरंच डोळे विस्फारलेले. हे सगळे बघण्यात एकटा असलेली भीती कुठे पळून गेलेली. पण हे एवढे सोपे होणे नव्हते. गुहेतून परत नाळ चढायला लागलो तसा एक मोठा दगड वाटेत पडलेला. त्याला वळसा घालून थोडासा वर आलो तर समोर हि मोठ्ठाली माकडाची टोळी जमलेली! "पोटात गलबला येणे" या वाक्याचा अर्थ त्याक्षणी मला पुरेपूर उमगला. जे पाहायचे होते ते सगळे पाहून झाले होते. मग मारुतीबाप्पाचे स्मरण करून जिवाच्या आकांताने पळतच नाळेतून चढाई चालू केली. हातात काठी असल्याने थोडा फायदा झाला खरा पण जसे माकडाचे एकमेकांना दिलेले "कॉल" ऐकू येऊ लागले तसे मला समस्त "देवगण" आठवले. तीन टप्पे उतरायला जेव्हा वीस एक मिनिटे लागली होती ते टप्पे पळतच पाच-सहा मिनिटात चढलो आणि एकदाचे पहिल्या टप्प्याच्या बुरुजावर येऊन थांबलो. येथून दोन घोट पाणी पिऊन जे सुटलो ते येताना लागलेल्या झेंड्यापाशी थांबलो. मागे आता कोणीही नाही हे लक्षात आल्यावर जमिनीवर बसकण मारून छातीभर श्वास घेतला. शेवटच्या काही क्षणात चांगली पाकपुक झालेली !

येथून ब्रह्मगिरी जाऊन परतीचा मार्ग पकडला. सुमारे दोन-अडीचच्या सुमारास ब्रह्मगिरी उतरून आलो आणि बस पकडून नाशिक निघालो. तीन दिवस छानपैकी सार्थकी लागले होते. नाशिकला शिवशाही बसच्या तिकीटाची आराधना करण्यात तब्बल अडीच तास घालवले आणि पुण्यनगरीस रवाना झालो. 

असो! जे काही दुर्गवैभव पाहता आले त्याचा व्हिडिओ बनवलाय. ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारचे असंख्य व्हिडीओ युटूबवर आहेत म्हणून त्यात माझी भर घातली नाही. ब्रह्मगिरी गेलात तर आवर्जून जावे असे हे ठिकाण आहे. दुर्गसंवर्धनची इथे खरी गरज आहे. चिखलाने भरून गेलेला दरवाजा मोकळा झाला तर त्याखाली अजून काय काय दडलेले असेल हा कुतूहलाचा भाग आहे. 

युट्युब व्हिडीओ मध्ये पूर्ण शिल्प आणि वास्तू आलेल्या आहेत. खाली फोटोंमध्ये काही शिल्पांचे फोटो नाहीत. युट्युब व्हिडीओ आवर्जून बघा. 

हट्टीमेटाच्या वाटेचा युट्युब व्हिडीओ बघा - 



ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या धर्मशाळेमागील बारव 

धर्मशाळा 


दुर्गभांडार किल्ला 

हट्टीमेट कडे जाताना वाटेत लागणारे छोटेसे मंदिर 


वाटेतले पाण्याचे टाके 


हट्टीमेटाचे प्रथम दर्शन -बुलंद अशी तटबंदी 


ब्रह्मगिरीची मागील बाजू 


हट्टीमेटाचा महादरवाजा .. सध्या पूर्ण मातीखाली गाडला गेलाय . कमानीवर गणपती आणि घंटेचे कोरलेले शिल्प. त्यावर शरभ शिल्प आणि त्यामध्ये मध्यभागी द्विदलीय कमलपुष्प त्यात कोरलेला कलश!


वेलबुट्टीची कोरीवकाम 

सुमारे वीस फुटांची तटबंदी आजही शाबूत आणि बुलंद आहे 


येथून खाली दुसरा , तिसरा टप्पा आणि खाली मेटघर गाव. 


तटबंदी , बुरुज आणि गुहा. निवडुंगाच्या मागे मंदिर आहे


छोटेसे मंदिर 


पंधरा वीस माणसे राहू शकतील अशी गुहा 


तिसरा टप्पा उतरताना .. 




मेटघर गाव 


मध्यभागी मोठी कामं आणि प्रवेशद्वार असावे असे वाटते 




फोटोच्या खाली उजवीकडे बघा येथेही तटबंदी बांधलेली आहे. येथे एक खोली सारखे आहे. 


या डोंगराच्या मागे आपण होतो 


ब्रह्मगिरी मंदिरापासून समोर दिसणारे हरिहर आणि भास्करगड 



वाचत रहा! भटकत रहा !
सागर शिवदे