दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव २०२४
।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।
।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।
'हर हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अश्या जयघोषांनी दुर्ग चंदन - वंदन वरील अवघा आसमंत व्यापला होता. आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीचा पवित्र दिवस. साडे तीनशे वर्षांपूर्वी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभून हा प्रदेश स्वराज्यात सामील झाला होता. गुलाल, भंडाऱ्याने जयघोषांच्या तालावर स्वार होऊन चंदन-वंदन या जोडगोळीच्या किल्ल्यांना जोडणाऱ्या पठारावरचे सारे वातावरण शुचिर्भूत केले होते. भगवे ध्वज निळ्याशार आसमंतात उंचच उंच भिडू लागलेले. मध्येच एखादा प्राणप्रणाने फुंकलेला शंख या सर्व जल्लोषाच्या सीमा भेदून उपस्थित मावळ्यांना स्फुरण चढवत होता. तुतारीच्या ललकारी आणि टाळांचा गजराने वातावरण भारलेले होते. स्वराज्याचा कर्ता मूर्तरूपात मानाच्या पालखीत बसून हा सर्व सोहोळा बघत होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखी भेटीचे औचित्य साधून अवघे भगवे फेटेधारी धारकरी आज चंदन-वंदन किल्ल्यावर जमले होते. निमित्त होते ते म्हणजे दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखीची चंदन-वंदन गडाच्या पठारावर भेट झाली आणि अवघा मुलुख पिवळ्या भंडाऱ्याने पावन झाला.
 |
छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी |
 |
चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी अफजुल्ल्याचा कोथळा बाहेर काढतानाची रांगोळी |
तीनशे चौसष्ठ वर्षांपूर्वी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करून जावळीचा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्ग जोडी चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून आपल्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात केली. याच घटनेचे स्मरण म्हणून दुर्ग चंदन-वंदन गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाई तालुक्यातून अमृतवाडी - पाचवड-किकली-बेलमाची गावातून वंदन गडाच्या पठारावर चढते तर धर्मवीर संभाजी महाराजांची पालखी कोरेगाव तालुक्यातून पळशी फाटा - आंबवडे मार्गाने गणेशखिंडीतुन पुढे चंदन गडावरून वंदन गडावर येते. दोन्ही पालख्यांची दोन्ही गडांना जोडणाऱ्या पठारावर भेट होऊन त्यांची आरती होते आणि त्यानंतर वंदन गडावरील प्रवेशद्वार, माची, आणि श्री वंदनेश्वर शिवालयाच्या पुढे अशी प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्या गावातून जमलेल्या मावळ्यांच्या हस्ते आरती होते. पाहुण्यांचे उद्बोधक विचार ऐकून लाठीकाठीचे प्रात्यक्षिकाने आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 |
पालखी खिंडीत येताना |
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी हा सगळा सोहोळा घडवून आणण्यात अपार मेहनत घेतली आहे. अगदी जनरेटर पासून मांडवाचे साहित्य, प्रसादापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सगळ्या वस्तू या मावळ्यांनी खांद्यावर उचलून आणल्या होत्या.वंदनगडाचे पूर्णपणे मातीत गाडले गेलेले दुसरे प्रवेशद्वार श्रमदान करून मोकळे केले आहे. श्री वंदनेश्वर शिवालयाच्या शिवपिंडीवर वाहायला बेलाची पाने हवीत म्हणून मंदिरासमोर बेलाचे झाड लावून किल्ल्यांच्या पायथ्यापासून हंड्यात पाणी उचलून आणून झाडाला घातलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहे. गेली आठ वर्षे या मावळ्यांनी वंदनगड संवर्धनासाठी कष्ट घेतले असून प्रसंगी स्वतःच्या खिशाला कात्री लावून वंदनगडाचे अस्तित्व जपले आहे. गडावर झालेल्या हिरव्या चादरींचे अतिक्रमण आणि वनखाते / तत्कालीन सरकारचे दुर्लक्ष्य या सगळ्याशी लढत आजवर संस्थेने वंदनगड विकासासाठी सर्वोतोपरी कार्य केले आहे.
शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील आज अजून एक किल्ला हिरव्या अतिक्रमणामुळे आपल्यापासून दूर जातोय कि काय अशी स्थिती आहे सध्या मित्रांनो. चंदनगड हा पूर्ण हिरव्या चादरींनी वेढलेला आहे आणि वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेला आहे. वंदनगडावर काही दिवसांपूर्वी दर्ग्याखाली शिवपिंडी सापडल्याने प्रशासनाने वंदनगड पर्यटन बंद केले आहे. आज अजून एक किल्ला आपल्यासाठी बंद झाला आहे. अश्या स्थितीत महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्यात मिळवलेल्या या गडकोटांची जपणूक हि आपले कर्तव्य आणि जबाबदारी दोन्हीही आहे. पुढील वर्षी आठ डिसेंबर रोजी हा नेत्रदीपक सोहोळा पुन्हा अनुभवाची संधी आहे तेव्हा आपण मोठ्या संख्येने जमुयात आणि भगवा उंचच उंच जात राहील यासाठी प्रयत्न करूयात.
तळटीप : कोणाला जर या दुर्गसंवर्धन कार्यास कोणत्याही स्वरूपात हातभार लावायची ईच्छा असल्यास माझ्याशी अथवा श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान यांच्याशी संपर्क साधावा.
 |
किल्ले वंदनगड प्रवेशद्वार |
 |
पालखीचे आगमन |
 |
धर्मवीर संभाजी महाराज पालखी |
 |
पालखी नाचवताना |
 |
वंदनेश्वर महादेव |
 |
जल्लोष |