शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

घाटवाटा भटकंती : आग्याची नाळ - फणशीची नाळ

एकलगाव - फणशीची नाळ उतराई - आग्याची नाळ चढाई - एकलगाव 


                  

फणशीची नाळ 


रामराया जन्मला त्या टळटळीत , आग ओकणाऱ्या उन्हात आग्या नाळेची चढाई चालू होती. सूर्याच्या उष्णतेने दगड अन दगड तापवलेल्या आग्या नाळेच्या पोटातून पुढे सरकण्याची इंच-इंच लढाई चालू होती. समूहातील मंडळी लांबपर्यंत पांगली होती आणि त्यांना दिलेल्या हाकाऱ्या परावर्तित होऊन दुमदुमत होत्या. इलेक्ट्रॉल, काकड्या संत्री इत्यादींची आवर्तने करून उसनी एनर्जी एकवटून मंडळी पायाखालील प्रत्येक दगड तपासत मान खाली घालून मार्गक्रमण करीत होती. सुमारे आठशे मीटरच्या चढाईत उष्णतेने दमटपणाने कस पाहिला होता. दूरवर नाळेच्या मध्यभागी वर्षानुवर्षे भक्कमपणे तळ ठोकून बसलेले उंबर आणि आग्या नाळेच्या कड्यांवर बेमालूमपणे लटकलेली आज्ञा माश्यांची पोळी हि सगळी आमची करामत बघत असाव्यात. दोन तासांच्या चढाईनंतर कसेबसे उंबरापर्यंत पोहोचलो तोच बाकीच्या गाड्यांसाठी थांबलेल्या वाटाड्याने पुढे जाऊ नका म्हणून गलका केला. येथूनच आता पायाचे फक्त पुढचे पाऊल ठेवता येईल आणि ते घसरले तर उजवीकडे असलेल्या घळीत समाधीस्थ होता येईल अशी काहीशी घसाऱ्याची एक वाट कमी वेळात एकलगावात नेईल म्हणून ते पकडायचे ठरले. नाळेतून तसेच पुढे गेलो तर सिंगापूर गावाच्या अलीकडे निघून पाच किलोमीटर्स वाढतील हे शब्द ऐकून मंडळी तयार झाली काट्याकुट्याच्या वाटेतून दोन हात चालवीत आणि उरलेले धैर्य एकवटून एक एक भिडू घसारा, रणरणते ऊन आणि चढाई अश्या तीन गोष्टींशी झुंजू लागला. 



एकलगावं वरून दिसणारा नजारा . लिंगाणा आणि मागे रायगड 

             

                                                                                            फणशीची नाळ उतराई 


हे सगळे क्रमप्राप्त होत असताना निसर्ग रानावनातून वसंताच्या चाहुलीने मोहरलाआहे. रात्री छोट्या होऊन दिवस हळूहळू मोठे होऊ लागले आहेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. एकलगावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय. काटेसावर भडक अश्या फुलांचा जिरेटोप घालून बसलाय तर अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. येथील एक अन एक वाट तुडवीत स्वराज्याचे मावळे स्वराज्याच्या पंढरीत, स्वराज्याच्या विठूमाऊलींचे दर्शन साक्षात श्रीमान रायगडी घेण्यासाठी कोणे एके काळी पोहोचले असतील. रायगड प्रभावळीतील अनेक वाटांचे आणि तेथील वाड्यांमध्ये वसलेल्या सह्याद्रीपुत्रांचे नशीब किती थोर असावे ज्यांना तिन्ही त्रिकाळ रायगडावरील देवाचे दर्शन घडत असावे. आग्या नाळ, फणशीची नाळ, बिंब नाळ, जननीची नाळ, फडताळ नाळ, तवीची नाळ, भिकनाळ , बोराट्याची नाळ अश्या अनेक देशावरून कोकणात उतरणाऱ्या नाळा, त्यांच्या संरक्षणासाठी भक्कम उभे ठाकलेले लिंगाणा, कोकणदिवा असे उत्तुंग दुर्ग रायगडाच्या घेऱ्यात उठावलेले डोंगर ते समोर कोकणदिव्याच्या जवळपास गायनाळ , बोचेघोळ , निसणी अश्या वाटा, काळ नदीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या सहयाद्रीच्या कड्यांचे रौद्रभीषण रूप आणि त्यांनी उजळलेले हे सह्याद्रीचे दुर्गवैभव. अश्या या सहयाद्रीतील पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


            
वाटेत लागलेला पाण्याचा डोह 


तत्पूर्वी, प्रातः प्रहरी मंडळी एकलगाव येथून वाटाड्या घेऊन निघाली आणि फणशीच्या नाळेने उतराई करण्यासाठी जननीच्या डोंगर माथ्यावर पोहोचली. आजपर्यंत मोहोरी गावातून दिसणारा सरळ धारेचा लिंगाणा आणि जिरेटोप दिसणारा रायगड पहिला होता. आज फणशीच्या नाळेतून लिंगाण्याचे आणि रायगडाचे वेगळे रूप पाहावयास मिळाले. ताम्हिणीतील कमलबॅक सारखा लिंगाणा भासत होता तर त्याखालील तवीच्या नाळेतील डोंगर रोहिदास वाटत होता. तासाभरात माथ्यावर पोहोचून जननी मातेच्या ठाण्याशी नतमस्तक होऊन फणशीच्या नाळेने ओढ्यात उतरायला चालू केले. सहयाद्रीच्या धारेवरून फणशीकडे जाताना एका ठिकाणी खाली कोकणपट्ट्याचे आणि जननीच्या नाळेचे दर्शन जाहले. फणशीच्या नाळेतून उतराई चालू झाली तसे चालण्याच्या वेग मंदावला. उतरताना त्यातल्या त्यात मोठा दगड बघून त्यावर पाय ठेवताच तो असहकार पुकारून जागेवरून विस्थापित व्हायचा आणि नाळेचा प्रसाद मिळायचा. ठराविक अंतराने असे प्रसाद घेत घेत पुढे चाललो होतो. फणशीच्या नाळेत गार्ड झाडी आणि जंगल असल्याने उन्हाची काही चाहूल लागली नाही. पूर्ण उतराई मध्ये फणशी नाळेने मान वर करू दिली नाही. सुमारे दिड तासात फणशीची नाळ उतरून आल्यावर खाली ओढ्यात पाण्याचा प्रवास सापडला. येथेच पेटपूजा करून पाठीवरची वजने पोटात ढकलली. नितळ स्वच्छ पाणी भरून त्याच ओढ्याच्या मार्गाने बिंब नाळ सोडून देत पुढे आग्या नाळेला लागलो. 


जननी देवीचे ठाणे 

पाण्याचा एकमेव स्रोत 




जननी देवीचे ठाणे फणशीची नाळ मार्गे 

आग्या नाळ चढाई 




चिरंजिवांच्या व्रतबंध सोहोळ्यामुळे दिड महिना ब्रेक झाला होता तो या घामाच्या बदल्या भरणाऱ्या ट्रेकने भरून काढला. सकाळी सात वाजता सुरु केलेली बारा किलोमीटर्सची भटकंती दुपारी चार वाजता एकलगावात शाळेपाशी पोहोचून संपली. विहिरीवर अंघोळ करून श्रमपरिहार झाला आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. 


असो, फोटोंचा आनंद घ्या