शनिवार, २२ मार्च, २०२५

कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती : भाग २ [कोपेश्वर - बानूरगड - शुक्राचार्य - किल्ले कोळदुर्ग ]

 कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती


पूर्व भटकंती : 
 कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती : भाग १ 

=================================================

भाग २ : 
नरसोबा वाडी - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर -  बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - शुक्राचार्य देवस्थान - किल्ले कोळदुर्ग - पळशीचे सिध्दनाथ मंदिर - पुणे [ ३३० किमी ]

=================================================


कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर: 

सकाळी सकाळी कृष्णा नदीमध्ये स्नान करून देवाचे दर्शन घेऊन नरसोबा वाडी मधून निघालो खिद्रापूर दिशेने. खूप दिवस मनात असलेले कोपेश्वर मंदिर आज बघायचे असल्याने उत्साह होता. वीस किमी अंतर कापून खिद्रापूर पोहोचलो. मंदिराच्या कमानींमधून आत शिरताच त्या अप्रतिम शिल्पकलेचे दर्शन झाले. 

 चालुक्य राजवटीत मंदिराचे काम चालू झाले. त्यानंतर शिलाहार राजांनी हा प्रदेश जिंकून मंदिराचे काम पुढे नेले. सुमारे तीन पिढ्यांची आणि सातशे वर्षांची मेहनत इथे दगडा दगडात जाणवते.खिद्रापूरचे मूळ नाव कोप्पम होते. मुघल काळात हे मंदिर तोडण्यासाठी 'खिद्राम  खान" हा सरदार येथे आला होता आणि दुर्दैवाने त्याच्याच नावाने आज खिद्रापूर ओळखले जाते. 

मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच पहिल्यांदी गोलाकार स्वर्गमंडपाचे दर्शन होते. मंदिराची रचना चार टप्प्यात असून - स्वर्गमंडप - सभामंडप - अंतराळ - गर्भगृह अशी विभागलेली आहे.  स्वर्गमंडपाच्या मध्यभागी येताच आपल्या माना उंचावतात. १३ फूट व्यासाचे दगडी गोल छत नसलेले स्वर्गमंडप बांधले कसे असेल या विचारात आपण पडतो.  जेवढा छताचा व्यास आहे तेवढाच गोलाकार दगड बरोब्बर मध्यभागी लावला आहे. हे कसे काय साधले असेल याचे उत्तर वर्षांतून एकदा दगडी छताच्या मध्यभागी येणारे चंद्र सूर्य देतात. कोजागिरी पौर्णिमेला बारा वाजता चंद्र खुल्या गोलाच्या मध्यभागी येतो. तर तसेच त्यानंतर उत्तरायण सुरु झाल्यावर पाच ते सात मे सुमारास सूर्य भर दुपारी बारा वाजता मंडपाच्या मध्यभागी येतो. बरोब्बर याच दिवशी खालच्या १३ फूट व्यासाच्या दगडावर पूर्ण प्रकाश पडतो यावरून वरचे आणि खालचे व्यास सेम आहेत याचा साक्षात्कार होतो. स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर, उंदीर, हत्ती इत्यादी दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात. मध्यभागी, आपण गर्भगृहात स्थित शिव कोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो. त्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव 'ब्रह्मा महेश विष्णू' पाहू शकतो. हे दर्शन सुद्धा एका नेमक्या जागेवरूनच होते बाकी कुठूनही होऊ शकत नाही एवढे प्रिसाईज शिल्पकाम केलेलं आहे. 


स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. सभामंडपात जाताना द्वाराच्या वरती मकर कोरलेले आहेत. मकर म्हणजे काल्पनिक प्राणी असून विजयनगरच्या सामाज्याचे प्रतीक दर्शवते. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. यातील एक द्वारपाल मूर्ती तुटलेली असून ती ज्या खोबणीवर उभी केली आहे ते फक्त दिड फुटांची आहे. अश्या खोबणीत दगड बसवून इंटरलॉक पद्धतीने पूर्ण मंदिराची रचना केली आहे. एक द्वारपाल सुमारे दहा फूट उंचीचा आहे तर तेवढा मोठा दगड आणून तो मिरर इमेज कोरून उचलून खोबणीत कसा बसवला असेल या विचारानेच मती गुंग होते. येथे काही कन्नड भाषेतील शिलालेख कोरलेले दिसतात. ते बघून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. 


येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्याचे काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन लिंगस्वरूप आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. हरिहर रूपातील शिव म्हणजे शिव + विष्णू रूपातील शिव लिंगस्वरूपात फक्त येथे पाहायला मिळतात. मे महिन्यात पाच ते सात मे दरम्यान जेव्हा सर्योदय होतो तेव्हा त्याची किरणे दोनशे फूट आत मंदिराच्या आत चार वस्तू ओलांडून पिंडीवर पडतात. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी जसा किरणोत्सव होतो तसाच इथेही होतो. त्याच दिवसात शून्य सावलीचा दिवस म्हणजे "झिरो शॅडो डे" असतो तेव्हा स्वर्गमंडपात आपली सावली दिसत नाही आणि स्वर्गमंडपात पडणारा बर्रोब्बर १३ फूट व्यासाचा असतो. 

या मंदिराचे दुसरे एक वैशिष्ट्य असे की नंदी नसलेले हे एकमेव शिवमंदिर असावे .ह्या मंदिराचा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. मंदिर आतून जेवढे सुंदर आहे तेवढेच बाहेरून सुद्धा छान आहे, पूर्ण मंदिरास गजधारी शिल्पे, विष्णूप्रतिमा कोरलेल्या आहेत. सातशे - आठशे वर्षांपूर्वी आपल्याकडे कोणत्याही साधनांशिवाय प्रगत असलेली शिल्पकला पाहून खरखर आश्चर्यचकित व्हायला होते. 







सुमारे दोन अडीच तास आम्ही तेथे होते पण पाय काही निघत नव्हता. आताशा बारा वाजत आले असल्याने अखेरीस काढता पाय घेऊन आम्ही नरसोबावाडी येथे जेवणास पोहोचलो. वाडीत विठ्ठल मंदिराच्या शेजारी सोमण खानावळीत हि भलीमोट्ठी गर्दी होती. एक तास थांबून उदरम भरणम करून मिरजच्या दिशेने निघालो. भरपेट जेवण झाल्यावर आता लक्ष्य होते ते म्हणजे दोन किल्ले -  बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - किल्ले कोळदुर्ग


पुढच्या भागात : 

बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी :

शुक्राचार्य : 

किल्ले कोळदुर्ग :  







गुरुवार, २० मार्च, २०२५

कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती : भाग १ [सदाशिवगड - मच्छिन्द्रगड - मल्लिकार्जुन - बहादूरवाडी - बागणी ]

 कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती


शनिवारी कराडला एक काम असल्याने बसने जायचा बेत होता. शुक्रवारी रात्री घरची मंडळी आम्हीपण येतो म्हणाली तसे पटकन ट्रेकक्षितीज वेबसाइट उघडून कराड परिसरात अजून काही पाहता येईल का बघितले. नरसोबाच्या वाडीला आणि खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरास खूप दिवस जायचे होतेच मग काय कराड आणि सांगली असा प्लॅन करून तेथील जमतील तेवढे किल्ले आणि मंदिरे बघून आलो. 

सहलीचा प्लॅन : 
=================================================================

दिवस १ : 
पुणे - कराड - किल्ले सदाशिवगड -  किल्ले मच्छिन्द्रगड - कोळे नरसिंगपूर मंदिर - रामलिंग बेट - किल्ले विलासगड उर्फ मल्लिकार्जुन - बहादूरवाडी भुईकोट - बागणी भुईकोट - नरसोबा वाडी मुक्काम [ २९० किमी] 


दिवस २ : 
नरसोबा वाडी - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर -  बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - शुक्राचार्य देवस्थान - किल्ले कोळदुर्ग - पळशीचे सिध्दनाथ मंदिर - पुणे [ ३३० किमी ]

=================================================================



भाग १ :  

किल्ले सदाशिवगड -  किल्ले मच्छिन्द्रगड - कोळे नरसिंगपूर मंदिर - रामलिंग बेट - किल्ले विलासगड उर्फ मल्लिकार्जुन - बहादूरवाडी भुईकोट - बागणी भुईकोट


किल्ले सदाशिवगड - 
भल्या पहाटे पुण्यनगरीतून निघून कराड पोहोचलो. तेथील काम आटोपून प्रीतिसंगमावर गेलो. ते बघून डायरेक्ट पोहोचलो ओगलेवाडीच्या जवळचा सदाशिवगड. 
अफजलखानाच्या वधानंतर जावळी कराड प्रदेशामध्ये लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सदाशिवगड बांधलेला आणि त्यावर सदाशिवाची पिंड स्थापित केली. किल्ल्याच्या आजूबाजूला माचीवर गस्तीसाठी सैनिकांची वस्ती वसवली. शत्रूचा पहिला सामना या मेटावरील लढाऊ वृत्तीच्या लोकांशी होत असे. आज त्याच वस्त्या बाबरमाची, हजारमाची, राजमाची, गडमाची म्हणून ओळखतात. यापैकी हजारमाची गावातून बांधीव पायऱ्यांनी आपण सुमारे तासाभरात गडावर पोहोचतो. माथ्यावर सुरुवातीला मोठे चिंचेचे झाड आणि कोरडा तलाव दिसतो. या तलावास पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि मध्ये शिवपिंड आहे. हे पाहून सदाशिव मंदिराकडे गेल्यास भर उन्हात थंडगार वाटेल असे दगडी शिवमंदिर बघण्यासारखे आहे. समोर हनुमान मंदिर आणि विहीर आहे तर  येथून पुढे ईशान्य दिशेला मोठा झेंडा रोवलेला दिसतो. येथे जवळपास सहा टाकी आहेत. एवढे पाहून अर्ध्या तासात आपली गडफेरीपूर्ण होते. 




मच्छिन्द्रगड :  
सदाशिवगड पाहून पुढे मच्छिन्द्रगड कडे मोर्चा वळविला. इथपासून पुढे सांगली जिल्हा चालू होतो. मच्छिन्द्रगड येथे मच्छिन्द्र नाथांचे मंदिर असल्याने गडावर वरपर्यंत गाडी जाते. गाडी रस्त्यास अध्या वाटेत पायवाट येऊन मिळते. चार बुलंद बुरुजांनी भक्कम केलेला , शंभर वर्षे जुने मच्छिन्द्रनाथांचे ठाणे असलेला किल्ले मच्छिन्द्रगडावर येण्यास तीन वाटा आहेत. मंदिरासमोरच तीन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे दोन समाध्या असून चार दिशेला चार बुरुज आहेत त्यावर सिमेंटच्या छत्र्या बांधून पक्क्या केल्या आहेत. 





कोळे नरसिंगपूर / रामलिंग बेट

चुन्याचा घाणा, गहिनीनाथांचे मंदिर मारुती मंदिर इत्यादी पाहून तेथेच सावलीत बसून पेटपूजा करून घेतली. उन्हे डोक्यावर आली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आईस्क्रीमच्या दुकानात थंड होऊन सरळसोट रस्ता पकडून पोहोचलो कोळे नरसिंगपूर. कोळे नरसिंगपूर येथे नरसिंहाचे सुंदर दर्शन घेऊन त्याशेजारी असलेल्या भुयारातून आतपर्यंत गेलो. हे भुयार पुढे नरसिंह गाभाऱ्यात निघते. रणरणत्या उन्हात कमालीचा थंडावा येथे जाणवतो. 

येथूनच पुढे पाच किलोमीटर्सवर रामलिंग बेट आहे. येथे महादेवाचे पिंड आणि रामाची मूर्ती आहे. पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावरून सुमारे एक किलोमीटर चालत जाऊन आपण मंदिरापाशी पोहोचतो. येथेच श्री रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींपैकी एक बाहू मारुती आहे. 

कोळे नरसिंगपूर

                  
रामलिंग बेट : 

          


विलासगड उर्फ मल्लिकार्जुन : 
एव्हाना तीन वाजत आले होते. अजून तीन किल्ले होणे बाकी होते म्हणून घाईघाईने विलासगड कडे कूच केले. विलासगड हा स्थानिक लोकांमध्ये मल्लिकार्जुन म्हणून ओळखतात. पायथ्याहूसी गाडी लावून साडे सातशे पायऱ्या चढायला लागलो तोच परत घामेघूम झालो. अर्ध्या तासात पोहोचून मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि माथ्यावर निघालो. येथे किल्ल्यावर मल्लिकार्जुन मंदिर त्यामागे चुन्याचा घाणा, माथ्यावर विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे. त्यासमोरच भग्न असे श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिर मोडकळीला आल्याने शिरिकृष्णची मूर्ती विठ्ठल मंदिरात ठेवली आहे. या मंदिराला जोडूनच दर्गा आहे. मंदिर आणि दर्गा एकाच जोडलेल्या वास्तूत पाहून माझी मती चक्रावली. याचसाठी किल्ल्यावर कायम पोलीस बंदोबस्त असतो असे कळले. 




बहादूरवाडी भुईकोट : 
विलासगडाची गडफेरी पूर्ण करून पळतच खाली आलो आणि गाडीला टांग मारून बहादूरवाडी गावात शिरलो. गावात आत विचारात विचारात किल्ल्यापाशी पोहोचलो तोच शेवटच्या घटक मोजत उभा बहादूरवाडी किल्ला दिसला. खुद्द पेशव्यांनी बांधलेला हा किल्ला सध्या पूर्ण दुर्लक्षित आणि पडझड झालेला आहे. किल्ल्यामध्ये गणपतीचे मंदिर केले असून किल्ल्यातील गणपती म्हणतात. किल्ल्याभोवतीचे खंदक , घोड्याच्या पागा , भक्कम बुरुज, देवाचे कोनाडे, विहीर तुळशी वृंदावन असे अनेक इतिहासाची साक्ष देणारे अवशेष निश्चल ऊन खात पडलेले होते. जोरदार झाडोरा माजल्याने हे सगळे पाहणेही अवघड झाले आहे. 



बागणी भुईकोट
गडफेरी संपवून बागणी किल्ल्याची चौकशी केली तेव्हा गणपती मंदिराच्या पुजारी काकांनी सांगितले कि तेथे आता काहीही उरलेले नाही. किल्ला ओळखूही येणार नाही इतकी आतमध्ये घरे बांधली आहेत. तरीही ऑन द वे असल्याने अट्टाहास करून गेलो आणि फक्त बाहेरची तटबंदी दिसली. किल्ल्यात मोठी घरे झाल्याने आता काहीही अवशेष दिसणे शक्य नाही. आलो तशी गाडी वळवून नरसोबाची वाडी प्रस्थान केले. पाच किल्ले आणि दोन मंदिरे बघत वाडीला पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आले होते. रूम घेतली, प्रसाद घेऊन बाजारपेठेत फिरून चार-पाच फ्लेवरच्या बासूंदी पिऊन जीवाला थंड केले आणि आजचा दिवस संपवला. 


पुढच्या भागात : 

दिवस २ : 
नरसोबा वाडी - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर -  बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - शुक्राचार्य देवस्थान - किल्ले कोळदुर्ग - पळशीचे सिध्दनाथ मंदिर - पुणे [ ३३० किमी ]