सोमवार, १ जानेवारी, २०२४

बागलाण दुर्गभ्रमंती भाग 7- मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा

  



अपरिचीत बागलाण मोहीम ७


नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : भाग २ - 

उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव:


मुल्हेर किल्ल्याचे मूळ नाव मयूरगड!  महाभारतकालीन राजा मयूरध्वज याची राजधानी! आख्यायिकेनुसार,  मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने रासक्रीडेचा उत्सव सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. श्री काशीराज महाराज यांना साक्षात श्रीकृष्णाने दिव्य चक्षूंनी रासक्रीडा दर्शन दिले. असे ऐकिवात आहे. रासक्रीडे दरम्यान रासचक्र म्हणजेच 'मंडळ' हे रासस्तंभावर चढवले जाते. सात फुटी लाकडी रासचक्राला बांबू जोडून त्याचा व्यास चौपट म्हणजे २८ फुटी केला जातो. चक्राच्या बाजूला गोलाकार जे खांब लावले जातात ते सात फूट जमिनीत आणि १४ फूट वरती असे सात फुटांच्या हिशेबात असते. रासचक्रावर केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजावट होते. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. रात्रभर हे रासचक्र हाताने फिरवले जाते. त्याचाही खास मान विशिष्ट समाजाकडे असतो. 


या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. कोजागिरीच्या रात्री रासचक्र चढविल्यानंतर रात्री दहा पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत न थांबता हे भजन गायन केले जाते. मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, वाद्यांच्या गजरात देवघरापासून ते समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. 


या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा न्हावी,तेली कुंभार यांकडे कापसाच्या वाटी बनवणे, दिव्यांना तेल पुरवणे आणि मातीचे दिवे बनवणे अशी अनुक्रमे कामे दिलेली होती. आदिवासी बांधवांकडे जंगलातून केळीची पाने आणि फुले आणायचे काम. शिंपी लोकांकडे रासचक्र बांधण्याचे काम, मराठा समाजातील लोकांना रासचक्र सजावट,मंदिरावर झेंडा लावणे आणि परिसर देखरेखीचे काम, अशी सर्व समाज समावेशक उत्सव काशीराज महाराजांनी सुरु केला. जर कोणाला नवसाने मुलगा झाला असेल तर त्याला गोपिका बनवून त्यांना देव मानून त्यांची मुरवणूक काढली जाते. असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. 


हे सगळे डोळ्यात साठवून आजचा दुसरा दिवस संपवला. रात्रभर चालणारी भजने ऐकत केव्हा डोळा लागला आठवत नाही. सकाळी सहाला उठलो तेव्हाही त्याच उत्साहाने भजन गायन चालू होते. मंदिरातील गर्दी आता सरली होती. शांत चित्ताने उद्धव महाराज समाधीचे दर्शन घेऊन मुल्हेरचा निरोप घेतला. आज दुसरा दिवस आणि आजचे लक्ष होते बागलाणमधून खानदेशी भाटकायचा. धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला - किल्ले भामेर आणि स्थानिक लोकांनाही माहितीत नसलेला किल्ले रायकोट. मुल्हेर येथे कार्यक्रमासाठी जवळच्याच धनेर आमळी नावाच्या गावातून एक ग्रुप आला होता त्यांनी आमचा अवतार बघून विचारपूस केली आणि त्यांच्या गावातील लक्ष्मी नारायणाचे अप्रतिम मंदिर आहे आहे सांगितले. शेषशायी विष्णूच्या एका अखंड दगडातील कोरलेल्या मूर्तीच्या बेंबी मधून सदैव पाणी येते म्हणून लोक त्याला जिवंत विष्णू म्हणतात. अनायसे आज गाडी होतीच तर हे मंदिर बघायचे नक्की करून मंडळी भामेर किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 





रासनाहणाचे चक्र बांधताना 



केळीच्या पानांनी आणि फुलांनी सजावट करताना 


उद्धव महाराज समाधी 

 संपतकाली रस चक्र उचलण्यासाठी जमलेली भाविक मंडळी.  


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: