शुक्रवार, १४ जून, २०१३

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. 
त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार. आपणच त्याला मवाली ठरवून मोकळे होतो.

आता जरा या या दोन व्यक्तिरेखांची अदलाबदल करूयात. 
मी पहिल्या भेटीपासून कोणालातरी मवाली वाटतोय याची मी कधीच कल्पना केली नसेल. नावाप्रमाणेच तसा मी एकदम सुज्ञ. सरळमार्गी आणि सरळतोंडी. सरळ तोंडी हे अशासाठी की जे तोंडात येईल ते सरळ सरळ बोलून मोकळे होतो. त्याला मी मवाली कशामुळे वाटलो हे त्यालाही आज सांगणे अवघड आहे.

बारावीत पहिल्यांदा सौरभला भेटलो. गोरा गोमटा, थोडासा लाजाळू.
कशी ओळख झाली आठवत नाही, पण आठवतो "तो" दिवस.
नुकतेच कॉलेज सुरू झालेले, काही काम ना  धाम, बोंबलत हिंडत होतो आम्ही सगळे. त्या दिवशी त्याची बहीण त्याला घ्यायला आली होती. तिने त्याला माझ्याबरोबर पहिले आणि घरी जाऊन त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
"अश्या मवाली मुलांबरोबर अज्जिबात राहायचे नाही हा सौरभ !"

का कसे ठाऊक नाही, त्यानंतरही आमची मैत्री टिकली.पण, माझ्याविषयीचे हे जहाल मत अजून जहाल व्हायला अजून दोन तीन प्रसंग घडले.

मिड टर्म परीक्षा होऊन पुढची टर्म चालू झाली होती. रिझल्ट केव्हाही लागू शकतो असे दिवस. साडेचार-पाच ची वेळ. आज सौरभ काही कॉलेज ला आला नव्हता. एकाने नवीन मोबाईल घेतल्याने त्यावर किडे करण्याचे पहिले प्रात्यक्षिक म्हणून मी सौरभ ला फोन केला.
"रिझल्ट लागला आहे आणि बेक्कार रिझल्ट आहे. पुढच्या दहा मिनिटात कॉलेजला ये" असे म्हणून मी फोन ठेवला. त्याचा दुसऱ्या कोणालातरी फोन होईल मग त्याला खरे सांगू म्हणून आम्हीही निवांत.
पुढच्या आठ मिनिटात सौरभ कॉलेजात उभा!,
हॉल तिकीट सापडले नाही म्हणून तो आख्खी फाइल घेऊन आला होता. गाडी नव्हती म्हणून त्याने पुढच्या मिनिटाला बहिणीला फोन लावला. बहीण बँकेत कामाला होती. तिने तातडीची रजा (हाफ-डे) घेऊन बँकेतून निघून सौरभ ला घरून घेऊन कॉलेज मध्ये सोडले.
तो खरंच खूप टेन्शन मध्ये आला होता. आणि आम्ही दात काढत निवांत पडलो होतो.

रिझल्ट नाही ना लागला?
नाही!
मग ............................................. !!!!!!!

पुढच्या संभाषणात काहीही अर्थ नव्हता.

"माझे सोड रे…  माझी बहीण गेट बाहेर थाबलीये, आणि हाफ-डे घेऊन आलीये ती."

त्याचा (भयानक) चेहरा भयानक असा पडला होता. चेहऱ्यावर नामुष्की आणि डोक्यात आता बहिणीला काय कारण सांगायचे असा विचार करतच तो बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने "रिझल्ट देणे बंद केले आज" असे सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे साहेब रिझल्ट न घेता  घरी गेले तेव्हा खरे काय ते कळले.

एक दिवशी हे साह्येब एका मुलीकडून पुस्तक घेण्यासाठी थांबले असताना मी हि त्याच्याबरोबर थांबलो होतो. जसे ती पुस्तक घेऊन आली तसे मी तेथून निघायला लागलो. आणि तेही गुपचुप नाही तर आरडा ओरडा करत.
"येड्या, मजा आहे बाबा एका मुलाची, मी निघतो बाबा, उगाच कबाब मी हड्डी नको"
असे अनेक टुकार डायलॉग मारून त्याला इतका भंडावून सोडला की नंतर तो तिच्याशी काय बोलला हे त्याला स्वतःला हि आठवत नाही.

नंतर, जसे येणेजाणे वाढले तसे दृष्टिकोनही बदलला.पण त्याच्या दृष्टीतला मवालीपणा मी तसाच बाळगून होतो.
असेच एकदा LAB मध्ये प्रयोग करताना त्याला ओळखणारी एक मुलगी त्याला "तू 'लय' घाई करतो रे" असे म्हणाली तेव्हा मी फुटून फुटून हसलो होतो दोघांच्या समोर. त्यावेळची त्याची "ऑकवर्ड सिच्युएशन" मला आजही लक्षात आहे.

पोस्ट ग्र्याज्युएशनला प्रवेश घेतला तेव्हा फॉर्म भरताना या साहेबांनी " Principle Signature" च्या जागीच सही ठोकून दिली होती. त्यानंतर जेव्हा प्रिन्सिपल सही ठोकायला गेला तेव्हा तेथे आधीच याची सही पाहून तो वेडाच झाला. आणि याला "… आणि तुला MCA करायचाय हम्म" अश्या शब्दांनीच ठोकला होता. ते "आणि" तो ज्या फ्रस्टेशनने बोलला त्या सगळ्याचा साक्षीदार मी,… तेथेही (प्रिन्सिपल ऑफिस मध्ये) पडून पडून हसलो होतो असे आठवतेय.

छोटा ट्रेक म्हणून ह्याला एकदा डायरेक्ट हरिश्चंद्राला नेले होते. त्याचा पहिलाच ट्रेक होता तो. जर तेथे 'कोकणकडा' नामक अद्भुत निसर्गरूप नसते तर तो त्याचा शेवटचा ट्रेक आणि आमच्या मैत्रीचा शेवटचा दिवसही  ठरला असता.

मध्ये बरेच दिवस गेले, तो 'मवालीपणा' पण कुठे अदृश्य झाला कुणास ठाऊक !

आता नोकरीला लागल्यापासून सगळ्या गोष्टी सभ्यतेत केल्या जातात. याच सभ्यते पोटी महिना महिना बोलणे होत नाही. कधी तरी चाटिंग करताना स्मायली पाठवूनच काय ते हसणे होते.
चष्मा लावलेल्या स्मायली पाठवणेच अधिक सोयीचे. त्याने डोळ्यातल्या या जुन्या आठवणी डोळ्यातून ओसंडून वाहत असल्या तरी दिसत नाहीत चष्म्यामुळे.

आजही मी मात्र त्याच्याबरोबर तसेच राहणे पसंत करतो. "मवाली" "मित्राप्रमाणे" .
जेणेकरून तेच जुने दिवस परत आठवतात आणि मनाला ओलावा देऊन जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: