कराड आणि सांगली परिसरातील किल्ले भटकंती
दिवस १ :
पुणे - कराड - किल्ले सदाशिवगड - किल्ले मच्छिन्द्रगड - कोळे नरसिंगपूर मंदिर - रामलिंग बेट - किल्ले विलासगड उर्फ मल्लिकार्जुन - बहादूरवाडी भुईकोट - बागणी भुईकोट - नरसोबा वाडी मुक्काम [ २९० किमी]
दिवस २ :
नरसोबा वाडी - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर - बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - शुक्राचार्य देवस्थान - किल्ले कोळदुर्ग - पळशीचे सिध्दनाथ मंदिर - पुणे [ ३३० किमी ]
=================================================================
भाग १ :
किल्ले सदाशिवगड - किल्ले मच्छिन्द्रगड - कोळे नरसिंगपूर मंदिर - रामलिंग बेट - किल्ले विलासगड उर्फ मल्लिकार्जुन - बहादूरवाडी भुईकोट - बागणी भुईकोट
किल्ले सदाशिवगड -
भल्या पहाटे पुण्यनगरीतून निघून कराड पोहोचलो. तेथील काम आटोपून प्रीतिसंगमावर गेलो. ते बघून डायरेक्ट पोहोचलो ओगलेवाडीच्या जवळचा सदाशिवगड.
अफजलखानाच्या वधानंतर जावळी कराड प्रदेशामध्ये लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सदाशिवगड बांधलेला आणि त्यावर सदाशिवाची पिंड स्थापित केली. किल्ल्याच्या आजूबाजूला माचीवर गस्तीसाठी सैनिकांची वस्ती वसवली. शत्रूचा पहिला सामना या मेटावरील लढाऊ वृत्तीच्या लोकांशी होत असे. आज त्याच वस्त्या बाबरमाची, हजारमाची, राजमाची, गडमाची म्हणून ओळखतात. यापैकी हजारमाची गावातून बांधीव पायऱ्यांनी आपण सुमारे तासाभरात गडावर पोहोचतो. माथ्यावर सुरुवातीला मोठे चिंचेचे झाड आणि कोरडा तलाव दिसतो. या तलावास पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि मध्ये शिवपिंड आहे. हे पाहून सदाशिव मंदिराकडे गेल्यास भर उन्हात थंडगार वाटेल असे दगडी शिवमंदिर बघण्यासारखे आहे. समोर हनुमान मंदिर आणि विहीर आहे तर येथून पुढे ईशान्य दिशेला मोठा झेंडा रोवलेला दिसतो. येथे जवळपास सहा टाकी आहेत. एवढे पाहून अर्ध्या तासात आपली गडफेरीपूर्ण होते.
मच्छिन्द्रगड :
सदाशिवगड पाहून पुढे मच्छिन्द्रगड कडे मोर्चा वळविला. इथपासून पुढे सांगली जिल्हा चालू होतो. मच्छिन्द्रगड येथे मच्छिन्द्र नाथांचे मंदिर असल्याने गडावर वरपर्यंत गाडी जाते. गाडी रस्त्यास अध्या वाटेत पायवाट येऊन मिळते. चार बुलंद बुरुजांनी भक्कम केलेला , शंभर वर्षे जुने मच्छिन्द्रनाथांचे ठाणे असलेला किल्ले मच्छिन्द्रगडावर येण्यास तीन वाटा आहेत. मंदिरासमोरच तीन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे दोन समाध्या असून चार दिशेला चार बुरुज आहेत त्यावर सिमेंटच्या छत्र्या बांधून पक्क्या केल्या आहेत.
कोळे नरसिंगपूर / रामलिंग बेट
चुन्याचा घाणा, गहिनीनाथांचे मंदिर मारुती मंदिर इत्यादी पाहून तेथेच सावलीत बसून पेटपूजा करून घेतली. उन्हे डोक्यावर आली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आईस्क्रीमच्या दुकानात थंड होऊन सरळसोट रस्ता पकडून पोहोचलो कोळे नरसिंगपूर. कोळे नरसिंगपूर येथे नरसिंहाचे सुंदर दर्शन घेऊन त्याशेजारी असलेल्या भुयारातून आतपर्यंत गेलो. हे भुयार पुढे नरसिंह गाभाऱ्यात निघते. रणरणत्या उन्हात कमालीचा थंडावा येथे जाणवतो.
येथूनच पुढे पाच किलोमीटर्सवर रामलिंग बेट आहे. येथे महादेवाचे पिंड आणि रामाची मूर्ती आहे. पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावरून सुमारे एक किलोमीटर चालत जाऊन आपण मंदिरापाशी पोहोचतो. येथेच श्री रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींपैकी एक बाहू मारुती आहे.
कोळे नरसिंगपूर
विलासगड उर्फ मल्लिकार्जुन :
एव्हाना तीन वाजत आले होते. अजून तीन किल्ले होणे बाकी होते म्हणून घाईघाईने विलासगड कडे कूच केले. विलासगड हा स्थानिक लोकांमध्ये मल्लिकार्जुन म्हणून ओळखतात. पायथ्याहूसी गाडी लावून साडे सातशे पायऱ्या चढायला लागलो तोच परत घामेघूम झालो. अर्ध्या तासात पोहोचून मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि माथ्यावर निघालो. येथे किल्ल्यावर मल्लिकार्जुन मंदिर त्यामागे चुन्याचा घाणा, माथ्यावर विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे. त्यासमोरच भग्न असे श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिर मोडकळीला आल्याने शिरिकृष्णची मूर्ती विठ्ठल मंदिरात ठेवली आहे. या मंदिराला जोडूनच दर्गा आहे. मंदिर आणि दर्गा एकाच जोडलेल्या वास्तूत पाहून माझी मती चक्रावली. याचसाठी किल्ल्यावर कायम पोलीस बंदोबस्त असतो असे कळले.
बहादूरवाडी भुईकोट :
विलासगडाची गडफेरी पूर्ण करून पळतच खाली आलो आणि गाडीला टांग मारून बहादूरवाडी गावात शिरलो. गावात आत विचारात विचारात किल्ल्यापाशी पोहोचलो तोच शेवटच्या घटक मोजत उभा बहादूरवाडी किल्ला दिसला. खुद्द पेशव्यांनी बांधलेला हा किल्ला सध्या पूर्ण दुर्लक्षित आणि पडझड झालेला आहे. किल्ल्यामध्ये गणपतीचे मंदिर केले असून किल्ल्यातील गणपती म्हणतात. किल्ल्याभोवतीचे खंदक , घोड्याच्या पागा , भक्कम बुरुज, देवाचे कोनाडे, विहीर तुळशी वृंदावन असे अनेक इतिहासाची साक्ष देणारे अवशेष निश्चल ऊन खात पडलेले होते. जोरदार झाडोरा माजल्याने हे सगळे पाहणेही अवघड झाले आहे.
बागणी भुईकोट
गडफेरी संपवून बागणी किल्ल्याची चौकशी केली तेव्हा गणपती मंदिराच्या पुजारी काकांनी सांगितले कि तेथे आता काहीही उरलेले नाही. किल्ला ओळखूही येणार नाही इतकी आतमध्ये घरे बांधली आहेत. तरीही ऑन द वे असल्याने अट्टाहास करून गेलो आणि फक्त बाहेरची तटबंदी दिसली. किल्ल्यात मोठी घरे झाल्याने आता काहीही अवशेष दिसणे शक्य नाही. आलो तशी गाडी वळवून नरसोबाची वाडी प्रस्थान केले. पाच किल्ले आणि दोन मंदिरे बघत वाडीला पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आले होते. रूम घेतली, प्रसाद घेऊन बाजारपेठेत फिरून चार-पाच फ्लेवरच्या बासूंदी पिऊन जीवाला थंड केले आणि आजचा दिवस संपवला.
पुढच्या भागात :
दिवस २ :
नरसोबा वाडी - कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर - बानूरगड - बहिर्जी नाईक यांची समाधी - शुक्राचार्य देवस्थान - किल्ले कोळदुर्ग - पळशीचे सिध्दनाथ मंदिर - पुणे [ ३३० किमी ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा