समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेली मोरघळ
शांत ती भूमी, जिथे चित्त स्थिरावे,रामरूपी ध्यान तिथेही सापडावे ।भाग्यवंत जनचं पोहोचती त्या ठायी , मोरघळासम पवित्र तपोमयी ।।
अगदी हेच विचार आपल्या मनात येतात जेव्हा आपण समर्थांच्या वास्तव्याने पुनीत अश्या मोरघळीत प्रवेशते होतो. मोरघळीच्या आजूबाजूचे आल्हाददायक वातावरण तर घळीच्या आतमधील थंडगार पण तितकेच धीरगंभीर वातावरण पाहून समर्थाची अश्या घळींची निवड का बरं केली असेल याची प्रचिती येते. घळीत जाणाऱ्या वाटेवर करवंद, जांभळं अश्या रानमेव्याची दुतर्फा लगडलेली झाडे, घळीमधले शिवमंदिर, आवर्तने घडवणारा घंटानाद, एकाला जोडून एक अश्या जोड प्रकारच्या गुहेत जाणवणारा थंडपणा, शिखरावर वाऱ्याशी स्पर्धा करीत फडकणारा भगवा, आजूबाजूच्या निरव शांततेला चाल देणारे पक्षांचे कुंजन, घळीच्या माथ्यावरील सड्यावरून अवचित ऐकू येणारा आणि पावसाची चाहूल देणारा मोराचा केका. 'जय जय रघुवीर समर्थ ' अशी आरोळी देताच घळीत दुमदुमणारा स्वर! असे सगळे जुळून आले तर "रामरूपी ध्यान तिथेही सापडावे" ह्याचा अर्थ उमगतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आद्य गुरु समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड पाहिला नसेल असा शिवप्रेमी विरळाच. सज्जनगड किल्ल्यापासून अवघ्या बारा किलोमीटर्स अंतरावर मोरघळ स्थित आहे. सज्जनगडपासून ठोसेघर जाणाऱ्या रस्ताने पांगरे फाट्यातून उजवीकडे वळावे. पुढे पांगरे , पळसवडे धरणांच्या बाजूने आपण अर्ध्या तासात मोरघळीजवळ पोहोचतो. ताकवली गावाच्या थोडेसे अलीकडे एक वाट मोरघळीकडे जाते. वाटेत लागणाऱ्या जांभळे, करवंदाचा आस्वाद घेत येथून सुमारे दहा मिनिटात मळलेल्या पायवाटेने आपण घळीत पोहोचतो. घळीत महादेवाचे दर्शन घेऊन घळीच्या माथ्यावरून आपण सड्यावर येतो. येथून लांबवर दिसणारे हिरवीगर्द जंगल अनुभवत आपली हि छोटेखानी भटकंती संपते. येथूनच पुढे सांडीवली , केळवली धबधबा जात येते.
तर, यंदाच्या पावसाळ्यात सज्जनगड आणि परिसरातील या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!
सागर शिवदे
महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेला हा लेख :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा