बुधवार, २३ जानेवारी, २०१३

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 


( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा  ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच  मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा  पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. 
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला  जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है  ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया  करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...



माझ्या नोकरीच्या आयुष्याशी कित्येक वर्षे अगदी अटळ असा जोडलेला भाग म्हणजे आमची लाडकी लालपिवळी. खुद्द एस.टी.च्या कर्मचार्‍यांनी जेवढे प्रेम केले नसेल इतके मी एस.टी. वर [त्यात अर्थात साधी, निमआराम आणि एशियाड यांचा समावेश आहेच...डावेउजवे कधी केले नाही....] प्रेम केले आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर तर नित्याचाच प्रवास आणि आज जरी रस्ते चौपदरी आहे, उद्या सहा पदरी रस्ता झाला, तरी ज्या दिवसात एकपदरीच....म्हणजे नित्यनेमाने समोरून वाहने येजा करायची तो काळ... रस्ता होता त्याकाळी ड्रायव्हरमामाचे गाडी नेण्याचे कौशल्य पाहताना त्याच्याविषयी आदरमिश्रीत कौतुक मनी निर्माण होत असे. मी कधीही गाडीच्या अवस्थेविषयी तक्रार केली नाही.... कधी रस्त्यात रुसून जरी बसली तरी त्याबद्दल नापसंती दर्शविली नाही.... दरात कितीही फरक पडला तरी एस.टी. ही कायमपणे तोट्यात जाणारे व्यवस्थापन असूनही अथकपणे जनतेच्या सेवेसाठी तयार असते हे माहीत असल्याने एस.टी.कारभाराविषयी कधीही माझे मत 'डावे' होणार नाहीत. खाजगी व्होल्व्होजचे कुणी कितीही गुणगाण गावो, पण लालपिवळीला 'माहेरपणा'चा जो गंध आहे तो अन्य कुठल्याही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला येणे शक्य नाही.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांची मुख्यालये तर राहू देतच पण येथील तालुका पातळीवरील ठिकाणी जात असताना मी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात [ऑफिसची सरकारी जीप नसताना] एस.टी. ने इतका प्रवास केला आहे की अक्षरशः डझनावारी कंडक्टर्स ड्रायव्हर्स यांच्या अगदी अरेतुरेच्या ओळखी तर झाल्याच होत्या पण कित्येक प्रसंगी त्यांच्या डब्यातील पिठलं भाकरी, मसाला भरून त्यांच्या आईने केलेली भरलेल्या वांग्याची चमचमीत भाजी, ओल्या मिरच्यांचा ठेचा....यांचा आनंदही घेतला आहे..... सायंकाळी एखाद्या तालुक्यातील काम संपले आणि एस.टी. सुटण्याची वेळ झाली तरीही सकाळी जाधव कंडक्टरला सांगून ठेवलेले असल्याने तो गाडी सुटण्याची नित्याची वेळ टळून गेली तरी बाकीच्या पॅसेन्जर्सना [त्याच्या भाषेत पाशिंजर] 'थांबा हो पावणं वाईच, आमचं ऑडिटवालं पाटीलसर येतील आता दोन मिन्टात...' असं सांगून बोलण्यात गुंतवून ठेवत असे. गाडीत बसलेल्या बर्‍याच लोकांना 'हे ऑडिटचे पाटीलसर' माहीतच असल्याने मग तेही तकार न करता, 'आस्सं व्हय, बरं बरं, थांबू या....' म्हणत नव्याने तंबाखू मळायला सुरुवात करीत..... ही खरी आपुलकी निर्माण होत गेली ती एस.टी.च्या नित्याच्या प्रवासामुळे.

एस.टी. हे एक चालतेबोलते 'घर' च बनते ग्रामीण भागातून जाताना... [वर फोटोत दाखविलेल्या बसप्रमाणे]. हाय वे वरील गाड्यांमध्ये एकप्रकारचा 'बिझिनेस' पणा जाणवतो....कोल्हापूर-पुणे २७४ चे तिकिट टरकावून झाले की प्रवाशाचा आणि कंडक्टरचा संबंध संपला....तोही दरवाजा बंद करून ड्रायव्हरशेजारील सीटमध्ये जाऊन विसावतो...., पण ग्रामीण भागात लालपिवळी हे तुमच्या सुखदु:खाचे एक निश्चित ठिकाण बनते. एस.टी.च्या आवाजावरही ताण करीत कंडक्टरला सामील करून घेत मोठ्याने गप्पा हाणणारे रामभाऊ, संभाजीराव, जोतिबा, यल्लाप्पा, तुक्या आणि त्या कान देवून ऐकणार्‍या त्यांच्या डोईवरून पदर घेऊन अंग चोरून बसलेल्या कस्तुर्‍या..... वा ! संभाषणात भाग न घेताही मी कित्येक घरातील संसारांच्या भांड्यांचे विविध आवाज ऐकले आहेत. चालत्या गाडीत पोराच्या वागण्याने खंगलेले आईवडील जसे पाहिले तसेच पोरगीला त्रास देणारी सासू भेटली म्हणून डोळ्यातून पाणी काढणारी राधाक्काही पाहिली. जावयाच्याबाबतीत गणित पक्के जमल्याची खुशी जशी गणपतरावाच्या चेहर्‍यावर पाहिली तशीच धाकट्या भावाने वसंताने चारचौघात उसाच्या बिलावरून थोरल्याचा अपमान केल्यामुळे धक्का बसलेला यशवंताही पाहिला. असल्या दु:खावर खरे तर फुंकर घालायची नसतेच, कारण हे तर रोजचेच....पण इंग्रजीमध्ये ज्याला 'व्हेन्ट' म्हणतात त्यानुसार आपल्या वेदनेला कुठेतरी वाट करून दिल्याशिवाय मन मोकळे होत नसते.....

....आणि असे मन मोकळे करून देणारी हक्काची एक जागा म्हणजेच एस.टी. ~

श्री.सुज्ञ माणूस यानी अतिशय अचूकपणे घडवून आणलेला 'एस.टी.' चा प्रवास भावला असेच मी म्हणेन.

अशोक पाटील