शनिवार, ११ जानेवारी, २०१४

राणीचा देश : पूर्वतयारी आणि प्रयाण

राणीचा देश १: पूर्वतयारी आणि प्रयाण 

"ज्या गोष्टीची मनापासून आस असते ज्याचा मनात अखंड ध्यास असतो ती वैश्विक ऊर्जा आपण रात्री झोपलो की आसमंतात फेकली जाते आणि आसमंतातील ग्रह ताऱ्यांपासून परावर्तित होऊन सकाळी परत आपल्याकडे येते. या द्विगुणित होणाऱ्या ऊर्जेने मनातील गोष्ट कधीतरी नक्कीच प्रत्यक्षात येते." 
याच आशयाचे वाक्य अब्दुल कलामांच्या 'अग्निपंख' या पुस्तकामध्ये आहे. नक्की वाक्य आत्ता आठवत नाही पण साधारणता अर्थ हाच  अभिप्रेत असावा.

खरेतर असे परदेशगमनाचे लेखच विनोदी लेखांपेक्षा जास्त विनोदी असतात. असे लेख मुक्तपीठ मध्ये वाचायला मिळतात.आणि मग तेच वाचकांना अगदी वीट आणतात. पण आमच्यासाठी हे मात्र स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच होते. म्हणून मग यावर काही(ही) लेख खरडले गेलेच पाहिजेत.
असो, तर आमच्या पहिल्या वाहिल्या परदेशगमनाची बातमी आम्हाला कळली आणि मग आमच्या आनंदास पारावर उरला नाही.८ जुलै रोजी आमचे उड्डाण निश्चित झाले होते. त्यामुळे जून महिन्यापासूनच खरेदी आणि इतर तयारी चालू झाली. एवढी खरेदी मी दिवाळीला सुद्धा केली नसेल. छोट्या छोट्या गोष्टींपासून यादी सुरू झाली. नंतर ती यादी इतकी वाढली की त्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये भरायला कसरत झाली. घरातल्या प्रत्येक माणसाचा उत्साह दांडगा होता. पायमोज्या पासून ते जर्किन पर्यंत आणि शंकरपाळी पासून ते फ्रोजन पोळ्यांपर्यंत सगळे काही उपस्थित झाले आणि एकदाचे काय ते आमचे परदेश प्रवासाचे घोडे 'गंगेत' ….  नाही नाही 'थेम्स'मध्ये नाहिले.

आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसणारे आम्ही बघायला संपूर्ण लंडन शहरवासीय केस काळे करून आणि हातातील काम सोडून येणार होते जणू.

सगळी तयारी झाली. सगळ्यात अती खडतर असा पुणे -मुंबई प्रवासही पार पडला. आता फक्त पुढात काय येतेय असे आमचे डोळे विस्फारलेले होते. काही असले तरी पहिला परदेश गमनाचा अनुभव कायम लक्षात राहतो. 
कंपनीचे काम करण्यासाठी आम्ही चाललोय असा कंपनी समज असावा बहुदा. पण आमची मात्र सुरू झाली स्वप्नवत सफर.
आयुष्यात पहिल्यांदी असे जवळून पाहिलेले 'खरे' विमान! फोटो काढायचा आणि इथे टाकायचा मोह काही आवरला नाही. 


आख्खे बोईंग ७७७ विमान आम्हाला घ्यायला आले होते. लोकांना वैमानिकाला भेटून देत नाहीत हे फारच बरे करतात. नाहीतर आमच्या बरोबर असणारे लोक त्याला "हळू चालव रे" वैगरे बोलून मोकळे झाले असते.

मला जे काही टेम्प्टिंग वाटत होते ना ! मजा येत होती.  काय काय भारी असेल असा विचार करून विमानात शिरलो. प्रत्यक्ष बघितल्यावर असे वाटले की 'एवढेही काय भारी नाहीये'!.
ST सारखी सीट्स बघून वाटले की हि उडणारी ST आहे की काय! मग पट्टे वैगरे बांधून बसल्यावर विमान डूगुडूगु चालू झाले. म्हटले असे कधी पोहोचायचो आपण? वैमानिक काहीतरी बोलायला लागला. ऐकू तर काही स्पष्ट येत नव्हते. वाटले की 'पेट्रोल कमी आहे' असे काही सांगतोय की काय ? ( आम्ही एवढ्याच दूरचा विचार करू शकणार. )
रन-वे ला विमान लागले आणि मग वैमानिक काय एकदम पेटला, की बुंग sssssssssss ! माझी दोन्हीही ब्लड प्रेशरे एकदम सुरू झाली.
पण खिडकीतून खाली बघितले तर काय! जन्नत !
जमीन सोडून क्षणार्धात आकाशाच्या कवेत विमान निघाले होते. मनाची, डोळ्यांची सगळी जळमटे काढायची वेळ झाली होती म्हणजे माझे एकसुरी जग सोडून, विस्तारणारे जग बघायची वेळ झाली होती.


आजपर्यंत बऱ्याच ठिकाणांना स्वर्ग म्हणून तो शब्दच गुळगुळीत झाला होता. कोकणकडा पाहिला की स्वर्ग, माळशेज पाहिला की स्वर्ग, साल्हेरवरून धुक्यात न दिसणारा आजूबाजूचा परिसर हि स्वर्गच. थोडक्यात काय तर ५-६ स्वर्गाची नोंदणी आम्ही आधीच करून ठेवली होती. आणि ती सुद्धा तेव्हा, जेव्हा खरोखर ढगांच्या खूप खूप वर असलेला स्वर्ग आम्ही पहिलाच नव्हता.
आयुष्यात किती गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो हे जाणवले. 

हा विमानाचा पंख उगाच मध्ये-मध्ये येत होता. एक वेळ वाटले की वैमानिकाला सांगावे की "तो जरा दुमडून ठेवा हो काका!" पण मोह आवरला. नाहीतर त्याने मला जिथे होतो तिथेच नारळ आणि शाल देऊन उतरवून दिले असते आणि माझे वजन झेलायला कोणी ढग तयार झाला नसता.


बघता बघता पाकिस्तानात पोहोचलो. 

 तेहरान, इराणमध्ये आलो. तिथेही एकदा जायचे आहे राव. काय खतरु दिसत होते वाळवंटातील डोंगर.






आता जे दिसेल त्याला आम्ही मनाला वाटेल ती नावे देत होतो. 
 
व्हिअन्ना शहर 

९ तासाने हिथ्रो ला पोहोचलो. हिथ्रो ला जगातला व्यस्त एअरपोर्ट का म्हणतात ते कळले. आमचे विमान उतरून जर रन वे च्या बाजूला झाले तेवढ्यात हे दुसरे विमान उतरले पण होते.
 

आता तर सगळेच अप्रूप वाटायला लागले. जे काही दिसेल सगळीकडे खच्याक खच्याक क्लिकक्लीकाट केला.
डबल डेकर बस लहान असताना पहिली होती ते थेट आताच पाहिली. 

 मग तिथेही थोडी कारागिरी चालू झाली.


फोटो काढलेले चालतात का नाही हे माहीत नसल्याने थोडेच फोटो काढले. नेहमीप्रमाणे आमच्या कंपनी चा उथळ कारभार इथेही समजला. इथून ३-४ तास असलेल्या केंब्रिज ला जायला बुक केलेली टॅक्सी कोण जाणे का रद्द झाली होती. मग अनोळखी शहरात वा देशात कशीबशी कार मिळवली आणि हॉटेल वर रवाना झालो. पहिलाच हा क्लायमॅक्स बघून जाणवले की आपली हि ट्रीप अद्भुत होणार आहे :)

हे हिथ्रो विमानतळ. 

गाडीत बसलो आणि आमच्या इच्छित स्थळी निघालो. बरी सेंट एडमंड ( Bury St. Edmands). केंब्रिज पासून अर्धा तासावर हे गाव आहे. पुण्यात जसे सगळी मराठी लोक पण सदाशिव पेठी म्हणजे "पक्के पुणेरी" असा समज आहे तसेच काहीसे 'बरी सेंट एडमंड' बाबत आहे. पक्के ब्रिटिश लोक (म्हणजे जुने इंग्लंड मध्ये जशी हॅट आणि कोट घातलेली माणसे दिसतात तसे) येथे दिसतात. बाहेरचे म्हणजे ब्रिटिश सोडून इतर लोक येथे खूप कमी आहेत.

संध्याकाळी ९-१० च्या सुमारास आमची गाडी मस्त, सुसाट रस्ता कापत चालली होती. १४ तासांपेक्षा जास्त प्रवास झाल्याने डोळे मिटायला चं आले होते. कार चा ड्रायवर पाकिस्तानी होता. त्याला जरा आम्हाला पाहून बरे वाटले असावे. चांगला माणूस होता. त्याने (आम्हाला रस्ता न विचारता )हॉटेल वर सोडल्यावर आम्ही त्याचे आभार मानले. आम्ही आत जाऊन चेक इन करुपर्यंत थांबला होता.

कुठेतरी त्याने आणून सोडले होते. रात्री दीड वाजता हॉटेलचे नाव वैगरे तपासायच्या भानगडीत न पडता सरळ आत जाऊन आमच्या खोल्या बुक असल्याचे बघून बरोबर ठिकाणी आल्याचे कळले. चाव्या घेतल्या आणि गुड नाइट.

मग सकाळी उठून कसले हॉटेल आहे ते तरी बघू म्हणून बाहेर पडलो. संपूर्ण सागवानी लाकडाचे, जुन्या इंग्लंड ची आठवण करून देणारे, टुमदार हॉटेल होते.
सकाळी सकाळी मस्त मीस्ट असे वातावरण होते. थोडेसे दव पडलेले होते. हॉटेलच्याच बागेत जरा वेळ हिंडलो.

"The Grange Hotel" नावाचे हे हॉटेल फार जुने आहे. म्हणजे जवळपास १९८०-९० च्या आसपासचे असावे. पूर्ण हॉटेल सागवानी लाकडाचे आहे आणि फार म्हणजे फारच अप्रतिम आहे. विशेष म्हणजे 'बरी' या टाऊन मधल्या  सगळ्यात जुन्या  हॉटेलचा मालक (फक्त नावाने का होईना) भारतीय आहे. आजपर्यंत तो कधीच भारतात आलेला नव्हता. 

हापिसात तोंड दाखवून "मी आलोय" अशी वर्दी दिली, थोड्याश्या गाठी भेटी होऊन परत घरी.

रात्रीचे ९ वाजत आले तरी बाहेर पुरेसा उजेडच होता. सकाळी सहाला ड्यूटी वर आलेले सूर्यनारायण इथल्या उन्हाळ्यात थोडी ओवर टाइम  करतात आणि थंडीत थोडे लवकर जाऊन तो ओवर टाइम कॉम्पेनसेट करतात असे कळले. एकूणच आमच्यासाठी ते आश्चर्यच होत. हेच काय, आता जे वेगळे दिसेल ते आम्ही आश्चर्य या सदरातच टाकत होतो.
"तुम्ही खरंच लकी आहात जे समर मध्ये इथे आला आहात. " ते वाक्य मला समोरची चालती, बोलती आणि 'ड' जीवनसत्त्व मिळवण्यासाठी चित्र विचित्र पोशाख केलेली (??) प्रेक्षणीय स्थळे पाहून लगेचच पटले.

असो, तर पुढचे २ महिने खरंच अविस्मरणीय असे जाणार आहेत याची प्रचीती आली. सगळी आवश्यक तयारी केलेली असल्याने काही त्रास नाही झाला.
थोडे स्थिर स्थावर झाल्यावर मग मात्र येथेही भटकंती सुरू झाली. पुढच्या २ महिन्यात केलेली परदेश भटकंती या लेखमालेतून आपल्यासमोर आणत आहे. लवकरच पुढची ठिकाणे दृश्य स्वरूपात आणतो.

पुढचे लेख :
राणीचा देश : बरी सेंट एडमंडस टाऊन  (Bury St. Edmunds)
राणीचा देश : केंब्रिज- पुण्याचे वडील( Cambridge)
राणीचा देश : लंडन(London)
राणीचा देश : ब्रिटिश म्युझियम ( British Musium)
राणीचा देश : फेलिक्सस्टोवे समुद्र किनारा ( Felixstove sea Beach)
राणीचा देश : इप्सविच आणि  नॉटन पार्क(Ipswich & Nowton Park)
राणीचा देश : स्टो- मार्केट आणि एली( Stowemarket & Ely)



---------------------------------------------------------------------------------------------------------------------
दोन-तीन लेखनमालिका चालू करून पूर्ण न करताच अजून नव्या लेख मालिका चालू करत आहे याबद्दल क्षमस्व. वाचकांची लिंक तुटत असेल याची कल्पना आहे. पण सध्या येथून लेखन चौर्याचे काही प्रसंग दिसून आले. या ब्लॉगवर जसे विषय, भटकंतीचे लेख वा ऐतिहासिक माहिती मी देत आहे त्याच थीमने थोडे फोटो बदलून साधारण एक दीड महिन्याने काही ब्लॉगवर/फेसबुक ग्रुपमध्ये लेख/फोटो  प्रसिद्ध होत आहेत असे लक्षात आले.
असो, याचे वाईट वाटून घेण्यापेक्षा कोणीतरी आपली कॉपी करत आहे म्हणजे नक्कीच आपली प्रगती होत आहे असे समजून आमचे पुढचे लिखाण चालू आहे आणि असेच राहील.
या ब्लॉग वरचे लेख वाचून,घरबसल्या तुम्हाला किल्ल्यांची,पुरातन मंदिरांची, त्यांच्या इतिहासाची ,पुण्यातल्या जवळच्या ठिकाणांची ते अगदी परदेशाची सैर घडेल अशी अपेक्षा करतो. वाचकहो, तुमचा असाच लोभ असू द्या. 

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

पुढचे भाग पोस्ट केलेत तर आणखी आनंद होईल. खवचट प्रतिक्रिया न देता परदेश गमनाचे लेख वाचता येतात हे मी विसरलोच होतो. परवा पूर्वरंग वाचताना मी पुल देशपांडेंवर (हुबेहुब नव्हे, अस्सल) काहीतरी कॉमेंट केली होती. राग येऊन बायकोनं पुस्तक फेकुन मारलं मला. बरं झालं पुलंनी २५० पानी पुस्तक लिहीलं ते, नाहीतर पंचाईत झाली असती.
-मा० एव्हरेस्ट