शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल

आंबी-काळ नदीचे खोरे :   घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल [ १५ किमी. ]




पहाटे पहाटे भर पावसात मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली अजून एक वेगळ्या वाटेवरची भटकंती.

घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. दोन दिवसात एकदा मुक्कामी एसटी येते. पण पानशेतचा रस्ता खचल्याने सहा दिवस गाडी आलेली नव्हती. पावसाळी शस्त्रे अंगावर चढवून, चहा घेऊन खिंडीची वाट धरली. खिंडीतून उजवीकडे चढत सुमारे तासाभराच्या चढाईने माथ्यावर येऊन पोहोचलो. येथून डोंगरांनी वेढलेला आजूबाजूचा नजारा आणि कोकणपट्टा बघणे म्हणजे नेत्रसूखच पण आज पावसाच्या कृपेने हे होणे नव्हते.




माथ्यावर एके ठिकाणी सतीमंदिर लागते ते सोडले तर पूर्ण घनदाट जंगल. इथे हरवला तर आठवडाभर भेट होणे नाही असा भाग. त्यात जोरदार पावसाने चिखलमय झालेल्या वाटा तुडवत, घसरगुंडी करत जायची मजाच वेगळी. सती मंदिरापाशी नमन करून उजवीकडच्या धारेने आंबे धनगरवाडीची वाट धरली. स्थानिक आंब्याचा दांड म्हणतात. येथे वाटाड्या नसेल तर अवघड आहे. सगळ्या वाटा पावसाने मोडून गेलेल्या आहेत. वाट काढत आणि असंख्य प्रवाहांमधून प्रवास करत अंदाजे तीन चार तासांनी धनगरवाड्यात पोहोचलो.



येताना घरून लहान मुलांचे दोन पोती कपडे आणले होते. घोल आणि गारजाईवाडी गावात एकही लहान मुलं नाहीये. लहान काय तरुण लोकही सगळी बाहेर. म्हणून मग ग्रुपमधील सवंगड्यांच्या मदतीने ती दोन पोती इथपर्यंत आणली होती. भर पावसात- सोसाट्याच्या वाऱ्यात बिनधास्त बागडणाऱ्या छोट्या मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून आजची पायपीट वसूल झाली म्हणता येईल.

आंब्याचा दांड येथे पोटोबा करून धारेवरून खाली उतरायला चालू केले. दिवसभर पाऊस येत-जात होता पण जशी उतराई चालू झाली तशी आमची मजा बघायला तो पुन्हा जोरात आला. डोक्यावर अखंड पाऊस सोसत, लाल मातीच्या चिखलातून सटकत, प्रसाद घेत मंडळी एकदाची गारजाईवाडीत पोहोचली. गावात जाऊन दोन फणस डोईवर घेऊन यात्रा पुढे निघाली. आता येथून मोठाल्या धबधब्याची रांग लागलेली. कुठे भिजू कोठे नाही असे झालेले. शेवटचा जलप्रपात तर केवळ कमाल. अर्धा तास तेथे डुंबत राहिलो. गावात पोहोचलो, येथील इंद्रायणी तांदूळ म्हणजे अहाहा! मग इंद्रायणी,नाचणी, वरई खरेदी झाली. चहा पिऊन सात तासांची १५ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: