सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

पुरंदर ते कात्रज [ P2K]

 कालचा वर्षाविहार - P2K [ पुरंदर, नारायणपूर ते कात्रज ]



सध्या पावसाने दडी मारली असली तरी पावसाळी बेडकं मोठया प्रमाणावर बाहेर पडलीयेत. वर्षाविहाराचा आनंद घ्यायचा म्हणजे कुठेतरी आडवाटेवर तुफान तंगडतोड करायला हवी या विचाराने दहा भिडू लोक्स घेऊन पुरंदर ते कात्रज चा प्लॅन ठरला. पहाटे पाचला नारायणपूर पोहोचून पावसाची आभूषणे चढवली आणि गणेशाचे नाव घेऊन पायपीट चालू केली. रस्ता काही माहित नव्हता आणि त्यात अंधार. त्यात अजून भर म्हणजे  ढगांनी व्यापलेला आसमंत. कुठून कुठे जायचे माहित नाही आणि आजूबाजूला माणसाचा मागमूसही नाही. मग अश्या वेळेस gpx फाईल कामाला आली. आमच्या काही ट्रेकर दोस्तांनी मागच्या वर्षी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी दिलेल्या gpx फाईल मुळे पुढचे मार्गक्रमण करता आले. 



सुरवातीलाच पावसाने स्वागत केले म्हणून रेनकोट चढवला होता. आता जशी चढाई चालू झाली तशी निवडुंगाच्या आणि काटेरी झाडांच्या मधून वाट काढताना त्यांनी आणि रेनकोटची गळाभेट व्हायची. "मी फ़ाटेन पण अडकणार नाही"  अश्या रेनकोटच्या भूमिकेमुळे संघर्ष टिपेला पोहोचण्याआधी बॅगेत घालून ठेऊन दिला. सुमारे एक दिड तासात अंगावरचा चढ चढत, चिखलातून सटकून प्रसाद घेत घेत कानिफनाथ मंदिरात पोहोचलो. जोरदार वारा आणि दृश्यमानता शून्य. येथून पुढे चिखलातून घसरा-घसरी करत पुढे खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. येथून पुढे उतराई चालू झाली आणि दूरकर वाडी गावाच्या दिशेने मंडळी निघाली. 



दूरकर वाडीत उतरलो तेव्हा आता कुठे वातावरण स्वच्छ व्हायला लागले. पाच तास पाऊस आणि ढगांमधून वाट काढत आलो आणि पुढे पावसाचा मागमूस नव्हता. दूरवर चतुर्मुख मंदिर दिसू लागले तसे चालण्याचा उत्साह अजून वाढला. वाटेत एका आंब्याचा झाडाचा शेवटचा स्टॉक रिकामा करून हापेवाडीत पोहोचलो. पाणी भरून घेऊन दरे गावाच्या दिशेने प्रस्थान केले. 



आताशा १६ किमी चालणे झाले होते. डोक्यावर सूर्यदेव तळपू लागले होते. भर उन्हात दरे गाव ते चतुर्मुख मंदिराची चढाई घाम काढत होती. चतुर्मुख  मंदिरात पोहोचलो तसं सात आठ कुत्र्यांनी जोरदार गलका केला. त्यांना गाडीतून येणाऱ्या टापटीप सेल्फी लोकांची सवय असल्याने चिखलाने हातपाय माखलेली मंडळी आली तरी कुठून हा प्रश्न पडला असावा. येथे मस्त पेटपूजा करून अर्धा तास निद्रादेवीची आराधना केली. दुपारी दिड वाजता जड झालेले पाय उचलत गोगलवाडी गावाच्या दिशेने उतरायला लागलो. म्हशी वळायला आलेल्या ग्रामस्थांनी पुढची वाट समजावून सांगितली आणि आम्ही कात्रज खिंडीच्या दिशेने निघालो. 




मी महिन्यात रेहेकुरी अभयारण्यात गेलेलो तेव्हा दिसले नाही तेवढे प्राणी कालच्या ट्रेकमध्ये दिसले. बिबट्याच्या पायाचे ठसे/ विष्ठा , हरीण, घोरपड, मुंगूस , घोणस, आणि ट्रेकच्या शेवटी अगदी कात्रजच्या मागच्या डोंगरवर झुपकेदार शेपटीची कोल्ह्याची जोडी. कात्रज पोहोचलो तेव्हा चार वाजत आले होते. दिवसभरात पहाटे पाच ते दुपारी चार अशी अकरा तासांची आणि २६ किलोमीटर्सची छान भटकंती झाली. 


असो! फोटोंचा आनंद घ्या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: