शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा

 गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा 

भुतोंडे खिंड - संजीवनी माची - पाली दरवाजा - पद्मावती माची - सुवेळा माची - संजीवनी माची


मध्यरात्री दिडच्या सुमारास गाडी वाजेघर गावाच्या दिशेने मार्गस्थ होत होती. मार्गासनी पासून साखर कडे वळल्यावर संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. साखर गावापासून गाडीच्या टायरचे मेदुवडे बनतील असा रस्ता सुरु झाल्याने अनेकांच्या एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर डोलणाऱ्या साखरझोपा मोडल्या. भुतोंडे खिंडीत पोहोचलो तेव्हा आमच्या स्वागताला फक्त रातकिडे उपस्थित. पाठपिशव्या चढवल्या, विजेरी हातात घेऊन भुतोंडे खिंडीतून संजीवनी माचीच्या दिशेने चढाई चालू केली. रात्री अडीच वाजता संजीवनी माचीच्या तटबंदी खाली पोहोचलो तेव्हा माचीचा बुरुज अंधारातही उंच उंच आकाशाला भिडलेला. 

आजपर्यंत अनेक वेळा राजगडी जाण्याचा योग आला. अळू दरवाज्याने राजगडाचा निरोप घेऊन संजीवनी माचीच्या अभेद्य तटबंदीखालून तोरण्याकडे जाताना अनेकदा संजीवनीचे रूप मनात भरायचे. साडे तीनशे वर्षे अभेद्य अशी दुहेरी तटबंदी पाहता त्याकाळी येथील दगडा -दगडाने काय दुर्गवैभव पहिले असावे या विचारातच भुतोंडे खिंड यायची. तेव्हाच असे सुवेळा माचीच्या खालून त्याचे दुर्गवैभव पाहताना काय मजा येईल असे वाटायचे. डोंगरदेवांच्या कृपेने आज तो योग आला.

रात्री अडीच वाजता "अमानवीय" वाटावी अशी काही टाळकी घामाच्या धारा पुसत माचीवर पोहोचली. एका मोठ्या दगडावर महाराजांची प्रतिमा स्थापित करून त्या प्रतिमेची पूजा केली. महाराजांनी आयुष्यातला मोठा काळ राजगडावर घालवला असल्याने महाराजांचा जयघोष करून प्रदक्षिणेला सुरुवात केली. "आज आपण उभे आहोत तेथे महाराजांची पावले अनेकदा पडली असतील", "अश्याच रात्रीच्या प्रहरी बहिर्जी नाईक यांसारखे मावळे अनेकदा रूप बदलून टेहळणी करत असतील" अश्या विचारातच कारवीच्या जंगल घुसलो आणि पाली दरवाज्याच्या दिशेने प्रस्थान केले. 




आज आम्ही गडावर जाणार नव्हतो तर संजीवनी, पद्मावती, सुवेळा माचीच्या बुरूजाखालून कड्यांवरून भटकणार होतो. पूर्ण वाटचालीमध्ये विश्वास ठेवावा असा दोस्त बरोबर ते म्हणजे कारवीचे जंगल! कित्येक जागा अश्या होत्या कि येथे हे झाड नसते तर येथून पुढे जाणे अवघड. तासाभरात पाली दरवाज्याच्या वाटेला लागलो. सुमारे दहा पंधरा पायऱ्या चढून परत जंगलात प्रवेश केला. येथून पुढचा टप्पा होता तो चोरदरवाजाच्या वाटेचा. एका ठिकाणी वाट चुकली आणि विजेरीच्या प्रकाशात काही वाट सापडेना,मग जेमतेम उभं राहत येईल अश्या ठिकाणी उभ्यानेच एक डुलकी काढली आणि उजेडायची वाट बघत बसलो. 

झुंजूमुंजू झाले तसे वाट दिसू लागली आणि पुढची वाटचाल चालू झाली. पद्मावती माची खालून चोर दरवाज्याच्या वाटेल पोहोचलो. आज सूर्यनारायांनी ओझरते दर्शन देऊन ढगांच्या मागून आमची मजा पाहायचे ठरवलेले. कालच्या पावसाने ढग खालपर्यंत उतरलेले. भर एप्रिल मध्ये उन्हाळ्यात आपण आहोत यावर विश्वास बसेना असे वातावरण. हि सगळी दैवी योजनाच आहे असे समजून सुवेळा माचीच्या दिशेने प्रस्थान केले. 



बालेकिल्ला उंचीकडे डोक्यावर ठेऊन नेढ्याच्या दिशेने पावले चालू लागली. वाटेत मोठ्ठाली १२-१३ मधमाश्यांची पोळी होती आणि दोन दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडलेली ऐकून येथून हळुवार प्रस्थान केले. दिड तासाच्या चालीत नेढ्याच्या खाली पोहोचलो. "मळे" गावातून येथे एक वाट येते तेथे पोहोचलो. नेढं आणि डुब्याचे काही वेगळेच रूप येथून पाहायला मिळाले. येथून पुढे पोहोचलो सुवेळा माचीच्या बुरुजाखाली. येथून मागे उजवीकडे बालेकिल्ला , मध्ये सुवेळा बुरुज, उजवीकडे काळेश्वरी बुरुज असे दृश्य! काय ते राकट रूप. अहाहा !

येथे थोडी पेटपूजा करून सुवेळा ते संजीवनी हा सगळ्यात अवघड टप्पा चालू केला. सत्तर अंशातले कडे, त्यावर तिरपे पाय टाकत चालण्याने पायात आलेले गोळे, जोडीला दोन्ही हाताशी गळाभेट घेणारे कारवीचे जंगल या सगळ्याचा सामना करत एकदाचे अळू दरवाज्याखाली पोहोचलो आणि महाराजांना वंदन करून भुतोंडे खिंडीत उतरून ट्रेकची सांगता झाली. आजपर्यंत न पाहिलेले राजगडाचे रूप या प्रदक्षिणेच्या निमित्ताने पाहता आले. सुवेळा माची ते संजीवनी माची यामध्ये अशी एकही जागा नाही जेथे तटबंदी नाही. आणि आजही तेवढीच बुलंद तेवढीच अभेद्य! काळेश्वरी बुरुजाखालून दिसणारे बालेकिल्ल्याचे रुपडे हि खासच! 

एकंदर १५ किमीची चाल झाली आणि पावसाळी वातावरणामुळे फार मजा आली. असो! फोटोंचा आनंद घ्या!











वाचत राहा !

सागर  



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: