गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]

दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : रामगड - भरतगड - भगवंतगड 


दरवर्षी दिवाळीनंतरची सुट्टी म्हणजे कर्नाटकाची रोडट्रीप असे झालेले समीकरण यावर्षी साधता आले नाही. जून मधली स्पिती आणि ऑक्टोबर मधली तीन केदार ट्रिप नंतर आता अजून सुट्टी मागितली असती तर शाल आणि श्रीफळ घरी कुरियरने आले असते म्हणून त्यातल्या त्यात शॉर्ट ट्रिप म्हणून मालवणची रोड ट्रिप ठरवली. सिंधुदुर्ग मधील समुद्री किल्ले झाले होते पण घाटातले किल्ले करायचे बाकी होते. हि अशी आडवाटेवरची ठिकाणे व  किल्ले भटकताना कोकणातल्या खऱ्या सुंदरतेचे दर्शन होते. राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नव्याने प्रकाशात आलेली अश्मयुगीन कातळशिल्पे म्हणजे मती गुंग करणारी अद्भुत आणि कला आवर्जून पाहायची होतीच. राजापूर म्हणजे खास आवडीची जागा असल्याने तेथेही जाणे होईल म्हणून खास प्लॅन झाला तो असा - 

=================================================================

दिवस १ : कोथरूड - कोल्हापूर - राधानगरी येथील राऊतवाडी धबधबा - दाजीपूर अभयारण्य - किल्ले रामगड - किल्ले भरतगड - किल्ले भगवंतगड - चिवळा बीच मालवण मुक्काम  [ ४२० KM ]


दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]


दिवस ३ : कुणकेश्वर बीच - पोखरबाव दाभोळे येथील कातळशिल्प - श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव - श्री विमलेश्वर मंदिर - साखर गावातील कातळशिल्पे - निवळी कातळशिल्पे - किल्ले यशवंतगड ( नाटे) - किल्ले आंबोळगड - गगनगिरी महाराज मठ ( आंबोळगड ) - रुंधे कातळशिल्पे - देवीहसोळ कातळशिल्पे - देवाचे गोठणे कातळशिल्पे - राजापूर - माणगाव . [ ४२५ KM ]


दिवस ४ : किल्ले तळागड - कुडा लेणी - ताम्हिणीने कोथरूड [ १२५ KM ]

=================================================================

मालवण आणि तेथील हे माहित नसलेले किल्ले करताना पाहायला मिळालेले हे आडवाटेवरचे कोकण जे काही आहे ना ते म्हणजे कमाल. नारळ-पोफळीच्या बागांमधून जाणारे चिंचोळे रस्ते, कोकणी मालवणी भाषेचा हेल, चिऱ्याच्या भक्कम तटबंदीचे पण निर्मनुष्य असे किल्ले, खाडी आणि समुद्राचा संगम, ऐसपैस कौलारू टुमदार घरे, प्राचीन मंदिरे, घनदाट जंगले, देवराई, त्यांचे राखणदार त्यांची मंदिरे. सोलकढी मोदकाची मेजवानी.. सगळे काही केवळ लाजवाब! 

दिवाळीच्या चार दिवस आधी गेल्याने कुठेही गर्दी लागली नाही. सगळ्यात जास्त ट्राफिक लागले ते १२०० किमी जाऊन आल्यानंतर भूगाव मध्ये. येताना राजापूर ते घर असा मोठा पल्ला गाठायचा होता पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचलो तरी चालण्यासारखे होते म्हणून माणगाव येथे गाडीतच दोन-तीन तास झोप काढून तळगड, घोसाळगडचा ऐनवेळी प्लॅन केला. 

पहिल्याच दिवशी मध्यरात्री तीन वाजता निघून थेट राधानगरी गाठली. राऊतवाडी नावाचा कोकणात उतरणाऱ्या रस्तावरच असलेला धबधबा अजूनही खळाळत वाहत होता. बऱ्यापैकी पाणी होते बघून कावळ्याची अंघोळ उरकली. उंचावरून वेगाने पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हाने छानसे इंद्रधनुष्य रेखाटले होते.  येथे एक कॉलेजचा मित्र खास आमच्यासाठी दाजीपूर अभयारण्यातील शिवगड फिरवण्यासाठी कोल्हापूरवरून आलेला होता. खूप दिवसांनी भेटीगाठी झाल्या आणि मंडळी शिवगडच्या दिशेने निघाली. 

दाजीपूर अभयारण्यातील शिवगड किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला निर्मनुष्य प्रदेश. उन्हाळ्यात गावात कमी झाल्यावर लोक इथे येतात. पावसाळ्यानंतर येथे येणारे आम्ही पहिलेच असल्याने सकाळच्या वेळेत अस्वले असू शकतील असे दाजीपूरमधल्या एक माणसाने सांगितले. फॅमिली बरोबर असल्याने आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने तो बेत रद्द करून राधानगरी बॅकवॉटर जवळ थोडी भटकंती केली. येथून पुढे कणकवली मार्गे कोकणात उतरून पुढे तीन चार किल्ले करायचे असल्याने पुढे निघालो. 

राऊतवाडी धबधबा 

                 

रामगड किल्ला : 

कणकवलीतुन आचऱ्याच्या दिशेने जाताना पहिला किल्ला लागतो तो किल्ले रामगड. मॅप लोकेशन अगदी बरोबर आपल्याला पायथ्याशी आणून सोडते. अर्ध्या -पाऊण तासाचा छोटासा किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन आम्ही निघालो. गावातून दहा मिनिटात सड्यावर येताच सुंदर असे भैरव मंदिर लागते. मंदिराच्या समोरच गजशिल्पे आहेत. येथून पुढे दहा मिनिटांच्या चढाईने आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असून गोमुखी बांधणीचे आहे त्याच्या बाजूस १८ फूट बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायवाटेने सरळ गेल्यास आपण होळीच्या माळावर पोहोचतो. येथे सात पुरातन तोफा निकामी करून जमिनीत उलट्या गाडून ठेवलेल्या दिसतात. तोफा चोरीस जाऊ नये म्हणून कोणीतरी नामी शक्कल केलेली दिसते. त्यासमोरच दुसरे प्रवेशद्वार असून त्याची वाट नामशेष झाली आहे. किल्ल्याच्या मध्यभागी चौथऱ्यावर गणपतीची मूर्ती आहे. तटबंदीवरुन चालत आपली गडफेरी पूर्ण होते. 






किल्ले भरतगड : 

रामगड पाहून मसुरेचा भरतगड पाहायला निघालो. एव्हाना तीन वाजत आले होते. भरतगड पाहून भगवंतगड जायचे होते आणि तेथून तोंडवळी किंवा मालवण पोहोचायचे होते. मॅपने गंडवले म्हणून विचारात विचारत मसुरे येथे गावात पोहोचलो. गाडी लावून चढाईस सुरुवात केली. सिंधुदुर्ग मधली हि अशी निर्मनुष्य पण अनवट ठिकाणे खऱ्या  अर्थाने कोकणातल्या सौन्दर्याची जाणीव करून देतात. पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो. पुरुषभर उंचीचे गवत, त्यातून वाट काढत किल्ल्यात पोहोचलो. याही किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे असून तटबंदी भक्कम आणि सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या मध्ये एक मंदिर असून तटबंदीने भटकून आपली गडफेरी पूर्ण झाली. पूर्ण किल्ला हा झाडोऱ्याने वेढलेला आहे. 

                




किल्ले भगवंतगड :  

मसुरे गावातून आता भगवंतगड जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक फार लांबचा आणि एक जवळचा पण छोट्याश्या बंधाऱ्यावरून जाणारा. रस्ता सांगतानाच लोक म्हणायची कि तुम्हाला जमणार असेल गाडी काढायला तरच जा नाहीतर वांधे होतील म्हणून. बघून तर येऊ मन्नत बंधाऱ्यापाशी पोहोचलो. छोटी कार कट-टू-कट जाईल एवढ्या पुलावरून गाडी घालायची म्हणजे जाम टेन्शन आले. वेळेचं अभाव बघता देवाचं एनव्ही घेऊन गाडी घातली. बायको बाहेरून डावीकडे-उजवीकडे घे म्हणून गाईड करत होती तर मुलगा - "बाबा नीट चालवा नाहीतर गाडी खाडीत पाण्यात पडेल" म्हणून भीती वाढवत होता. शेवटी कशीबशी गाडी दुसऱ्या साईडला पोहचली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. येथेच खाडीपाशी गाडी लावून समोरच्या भगवंतगडाकडे पळत पळत प्रस्थान केले. अंधार पडायला आल्याने धावपळ करीत एकट्याने किल्ल्यावर पोहोचलो. येथे किल्ल्यावर फक्त एक मंदिर आहे आणि एक पडक्या स्थितीत प्रवेशद्वार आहे. सकाळी अस्वलाची कहाणी ऐकल्याने आणि इथे एकटाच असल्याने  थोडी पाकपुक झाली पण पटकन गडफेरी उरकून खाली आलो. 




भगवंतगड येथून आता तोंडवळी बीचला मुक्काम करू असं आपलं ठरला होता पण मालवण येथे राहण्याची जास्त सोया असेल विचार करून मालवण गाठले. चिवळा बीचच्या अगदी समोर खोली घेऊन जेवायला गावातल्या एकमेव अश्या व्हेज हॉटेलच्या शोधार्थ निघालो. एव्हाना ४२५ किलोमीटर्स झाले होते. आता अजून गाडी चालवण्याचा पेशन्स नसल्याने आणि हॉटेल जवळ असेल म्हणून चालत निघालेलो तर ते दीड किलोमीटर होते. पायाचे तुकडे पडायचे बाकी अश्या स्थितीत येऊन परत समुद्रावर जाऊन दिवस संपवला. 



भगवंतगड येथे जाणारा बंधारा. 


तिन्ही किल्ल्यांवर आमच्याखेरीज चिटपाखरू पण नव्हते. सगळे किल्ले प्रचंड झाडोऱ्याने वेढलेले आहेत. पावसाळ्यानंतर लगेच गेल्यामुळे असेल बहुतेक. हे शक्यतो उन्हाळ्यात करायला हवेत पण घामाने आणि उकाड्याने वाट लागेल हे नक्की. 


पुढच्या भागात - 

मालवण मधील भटकंती , स्कुबा डायविंग ची मजा आणि भर जंगलातील निर्मनुष्य असा सिद्धगड आणि चकवा लावणारा वेताळगड. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: