दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले :
सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड
पूर्व लेख :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]
=================================================
दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]
दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त मालवणच्या किनाऱ्यावर फिरायचं आणि वॉटर स्पोर्ट्स करायचा प्लॅन होता. सकाळी हे सगळे आटोपून पुढे ओवळिये येथील सिद्धगड आणि पेंढुर येथील वेताळगड बघून धामापूर तलाव बघत संध्याकाळी सूर्यास्ताला तारकर्ली किंवा देवबाग जाऊ असा प्लॅन केलेला.
सकाळी सकाळी कुटुंबासहित डॉल्फिन राईडने दिवसाची सुरुवात झाली. सात पॉईंट दाखवणार म्हणून सुरुवातील सांगितलेल्या राइडने सगळी ठिकाणे लांबूनच दाखवुंन अपेक्षेप्रमाणेच गंडवले होते. काहींच्या काही पॉईंट स्वतः ठरवून बोटीतूनच ते बघा हा तो अमका पॉईंट, हा बघा तमका पॉईंट असे दोन तास फिरवून आठशे रुपयांनी खिसा हलका करून आम्ही परतलो. येताना डॉल्फिन दिसले म्हणून त्यातल्या त्यात समाधान मानून स्कुबा डायविंग साठी निघालो. ऑफ सिझन असल्याने म्हणजे दिवाळीपूर्व असल्याने चारशे रुपयात स्कुबा सांगत होता. हे म्हणजे फक्त पाण्यात बुडवून खाली दहा पंधरा फूट नेऊन मास्यांना खायला देऊन त्यांच्यासमवेत काढलेल्या व्हिडिओचे पैसे होते. पण तरीही पहिल्यांदाच केल्याने मजा आली. बरीचशी लोक पैसे भरूनही घाबरून तळाशी जात नव्हती. माश्याना पावाचे तुकडे टाकून मासे आपल्या जवळ आणतात आणि व्हिडिओ काढतात. असो पाचच मिनिटात स्कुबा झालं आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. राजकोट येथील महाराजांचा पुतळा पडल्याने पोलीस तेथे सोडत नव्हते तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग आधी पाहून झाल्याने रॉक गार्डन बघून आम्ही निघालो सिद्धगड आणि वेताळगड.
ओवाळिये येथील सिद्धगड:
दरवर्षी कोकणात यायचं म्हणजे कितीवेळ समुद्र बघणार म्हणून आज दोन किल्ले ठरवले होते. मालवण पासून ३५ किलोमीटर्स वर कसाल गाव आणि तेथून सात किमी ओवाळिये येथील सिद्धगड पाहण्यास आम्ही निघालो. वाटेत दोन कामगार बसची वाट पाहत होते त्यांना उचलून गाडीत घेतले तर एक सिद्धगडाच्या जवळील सिद्धगड वाडीतीलच निघाला. त्याने आम्हाला सड्यापर्यंत सोडून राम राम केला. सड्यावरून सर्वत्र पुरुषभर उंचीचे गवत उगवलेले त्यातच गाडी पार्क करून वाट शोधत किल्ल्याला निघालो. दुर्गवीर संस्थेने बोर्ड लावल्याने किल्ला सापडतो नाहीतर नवख्या माणसाला सापडणे अवघड आहे.
संपूर्ण किल्ला झाडाझुडुपांनी वेढलेला आहे. एक ठिकाणी तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. येथे माणसांचा वावर नसल्याने सरपटणाऱ्या जनावरांचा धोका आहे. एकटाच असल्याने मोबाईल वर गाणी लावून धाडस करून किल्ल्यात निघालो. मोठमोठाली झाडे, त्यावरील मुंग्यांचे वारूळ, पायात अडकणाऱ्या वेली, उध्वस्त अश्या वास्तू, वानरांचा आवाज अश्या हॉरर पिक्चर मध्ये शोभेल अश्या परिस्थितीत किल्ल्यात घुसलो. एका ठिकाणी महाराजनची मूर्ती पाहून थोडेसे बळ मिळाले. पुढे थोड्या अंतरावर पुरातन असे देवीचे मंदिर आणि त्यासमोरील दगडी द्विपमाळा आपले लक्ष वेधून घेतात. पंधरा मिनिटात गडफेरी आटोपून आल्या मार्गाने परत निघालो पेंढुर गावातील वेताळगडाकडे.
पेंढुर येथील वेताळगड :
हा किल्ला मॅप्स वर किंवा नेटवर शोधला तर संभाजीनगर मधील वेताळवाडी किल्ला दाखवतो म्हणून पेंढुर शोधात तेथून पत्ता विचारात जावे. कट्टा गावातून पेंढुर पुढे मोगरणे फाट्याने गावडेवाडी येथे जावे. पायथ्यापर्यंत गाडी जाते. येथून एक घरातून कसे जायचे विचारून एकटाच किल्ल्यावर निघालो. घरातील आजींनी तुम्हाला सापडणार नाही जाऊ नका म्हणून पहिल्यांदाच सांगितले. तरीही ट्राय करू म्हणून निघालो. वेताळगड संपूर्ण जंगलाने वेढलेला असून माथ्यावरची उंचच उंच झाडांमुळे कुठून कुठे जायचा हाच पत्ता लागत नाही. पावसाळ्यानंतर अजून येथे कोणीही फिरकले नसल्याने आणि गावकरीही जात नसल्याने वाटा सापडत नव्हत्या. तासभर गावत तोडत भटकलो आणि कसातरी माथ्यावर पोहोचलो. आता येथून पुढे गेलो तर परत येताना मार्ग सापडणार नाही अशी परिस्थिती पाहून परत मागे फिरलो. माथ्यावरील वेताळाचे स्थान आणि कोरीव पाऊले बघायची राहिली. असो! पुन्हा कधीतरी येऊ.
एव्हाना संध्याकाळ होत आली होती. वेताळगडावरून आल्यामार्गे कट्टा पोहोचून परत मालवणचा रस्ता धरला. सूर्यास्त पाहण्यासाठी खास जागा म्हणून देवबाग संगम येथे पोहोचलो. देवबाग तारकर्ली येथील फेमस किनारे फिरत सूर्यास्त झाला. आजची मुक्कामाची सोय म्हून हॉटेल्स विचारता कमीत कमी पाच हजार रेट होता. उद्या देवगड वरून रत्नागिरी आणि राजापूर जवळची कातळशिल्पे पाहायचा प्लॅन असल्याने मालवण आणि रस्त्नागिरी यांच्या मध्ये कुठे तरी राहू म्हणून विचार करतानाच कुणकेश्वर आठवले. दोन वर्ष्यांपुर्वी कोस्टल कर्नाटकची ट्रिप करून येथेच राहिलो होतो. मग काय मालवणला जेवण करून दोन तासात कुणकेश्वर गाठले आणि भक्तनिवात रूम घेऊन आजचा दिवस संपवला. आज जास्त न फिरताही ९० किमी झाले होते. आता पुढचे डेस्टिनेशन खुणावत होते ते म्हणजे राजापूर! अश्वयुगीन कालखंडात कोरलेल्या कातळशिल्पांचा मागोवा घेत त्या अपरिचित वाट शोधण्याचा !
पुढचा भाग :
अपरिचित वाटांवरून भटकताना अश्मयुगीन कालखंडात आदिमानवाने कोरलेल्या भन्नाट, अगम्य अश्या कातळशिल्पांचा शोध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा