रविवारची भटकंती : उंबर्डी - देवघाट - धामणओहोळ - निसणीची वाट - उंबर्डी
मार्ग : उंबर्डी - तळाचे पाणी - तलाव अवशेष - चौऱ्याची नाळ चढाई - सातनाळ व्हयू पॉईंट - पाण्याची टाकी - दुर्गाडीची नाळ चढाई - धामणओहोळ विहीर - मुंबई पॉईंट - निसणी वाट उतराई - तळदेव - कोळीवाडा अवशेष - हेमांडपंथी मंदिर उंबर्डी - उंबर्डी [ १७ KM ]
मागील आठवड्यात देवघाट करायचा ट्रेकभिडूंचा प्लॅन झाला आणि बरेच वेळा कुर्डुगडाच्या घेऱ्यात जाऊनही आपण कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष पाहिले नाहीयेत याचा साक्षात्कार झाला. या भागातले एवढेच काय ते पाहायचे राहायले आहे असे आजपर्यंत वाटत होते. ट्रेकला लागलीच नाव नोंदवून टाकले आणि नकाशावर वाटा शोधू लागलो. आंतरजालावर थोडेकाही उपलब्ध लेख वाचताना, सातनाळ, चांदीचा होळ , व्हाव्हळाची धार, मंडप , खालचा रहाट, वरचा रहाट , तळच पाणी, तलाव , माडाची नाळ, धामणाची नाळ , कल्कीची पट्टी , दीपाचे रान असा अगम्य नावे असलेला भलामोठा खजाना मिळाला. एका ट्रेकमध्ये एवढ्या गोष्टी बघायला आहेत म्हंटल्यावर उत्सुकता अजूनच वाढली आणि "हा भाग झालाय" या भ्रमाचा भोपळा फुटला.
भल्या पहाटे तीन वाजता काही अमानवीय वाटावी अशी टाळकी ताम्हिणी घाटाने उंबर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळी सहा वाजता गावात पोहोचून वाटाड्या काकांना जोडीला घेऊन लिंग्या घाटाचा रौद्र असा प्रपात ज्या प्रवाहातून मार्गस्थ होतो त्याच्या कडेने चौऱ्या डोंगराला डोळ्यासमोर ठेवत चौऱ्याची नाळ पकडली. दोन दिवसाच्या पावसाने दमटपणा शिगेला पोहोचला होता. झाडाचे पानही हालत नव्हते अश्या वातावरणात चौऱ्या नाळेची चढाई चालू झाली. जसे जसे नाळ चढून वर जात होतो तसे घामाने बादल्या भरत होत्या.
देवघाटाच्या दिशेने वाटचाल चालू
वाटेत एक बारमाही पाणी लागते त्याला "तळाचे पाणी" म्हणतात. येथूनच पुढे काही अवशेष आहेत त्यास "तलाव" म्हणतात. येथे चौकोनी दगडाचे पडझड झालेले काही अवशेष दिसले. येथेच सुंदर कोरीवकाम केलेला पण भग्न अवस्थेतला मोठा नंदी होता. समोरच पदके मंदिर आणि त्यात पाचोळ्यात लपलेली शिवपिंड दिसली. आजूबाजूला अनेक वीरगळ आणि सतीशिळा पाहून तत्कालीन वैभव काय असावे या विचारात पडलो. असे कित्येक अवशेष आपल्या श्रेष्ठ सनातन संस्कृतीचे मूक साक्षीदार आहेत.
एकदाचे कसेबसे पठारावर पोहोचलो आणि सातनाळ व्हयू पॉईंटला गेलो. संपूर्ण पठार हिरव्यागार गवताने बहरले होते. जणू पावसाळ्याचा ट्रेक असावा असे दृश्य !
चौर्या पठारावरून दिसणारे दृश्य
चौऱ्या पठारावरून आता चौफेर नजारा खुलला होता. खाली लांबवर उंबर्डी पाहून आपण दोन तासात एवढे चालून आलो याचा आनंद झाला. दक्षिणेला कुर्डूगड आणि त्यामागे लांबवर पसरलेली घोळ येथील डोंगररांग. मागे उत्तरेला गेलो तर डोळे विस्फारतील असे दृश्य! वाटाड्या काकांनी एक एक वाट आणि ठिकाण सांगायला चालू केले. आजपर्यंत ऐकलेले वाचलेले अगम्य नावे असलेली ठिकाणी आता अशी समोर पाहत होतो. खरगोलीची नाळ, माडाची नाळ, मंडप, त्याखालील तवी, चांदीचा होळ , कल्कीची पट्टी समोर दिसत होती. मंडपाला जायचा रस्ता सतनाळेतून मोडला असल्याने अजून कुठल्या मार्गाने जात येईल याची चाचपणी चालू होती. अश्या सात नळामधून खळाळत येणारा प्रवाह आणि आणि त्यात लिंग्या घाटाचा प्रपाताचा प्रवाह म्हणजे पावसाळयात येथे कहर पाणी असेल या विचारानेच पोटात गलबला आला.
सातनाळ दृश्य
सातनाळ दृश्य पाहून पश्चिमेकडे आलो. येथे कोळीराजाची ऐकीव कहाणीतली भांडी कुठे मिळायची याची जागा सोपानकाकानी दाखवली. कुर्डुगडाच्या पंचक्रोशीत जर कोण घरी लग्नकार्य असेल तर त्या घरची मंडळी चौर्याच्या समोरच्या डोंगरावर जेथे आधी गुहा होती तेथे येईल कोळीराजाला साकडे घालायची, लग्नकार्यात काही कमी पडू नये म्हणून पण-सुपारीचा मान ठेऊन कार्यासाठी लागणारी भांडी मिळोत या आशेने निघून जायची. दुसऱ्या दिवशी परत येताच त्यांना तिथे गुहेच्या दरवाजापाशी भांडी ठेवलेली मिळायची. ती घेऊन जाऊन कार्य आटोपले कि हि मंडळी ती भांडी पुन्हा गुहेपाशी आणून ठेवायची. वर्षानुवर्षे हे चालू होते असे म्हणतात. नजरचुकीने जर कुठले भांडे राहिले तर कोळीराजा स्वप्नात येईन त्याची आठवण करून द्यायचा असे काका आवर्जून म्हणाले. पुढे कडा कोसळून तिथे असलेला दरवाजा बंद झाला म्हणतात. आजही तिथे अमावास्येला ताशा नगाऱ्यांचे आवाज येतात असे ऐकले. अश्या ऐकीव कहाणीवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कोकणात जसे राखणदार असतो तसे डोंगरदऱ्यात हि नक्की कुठले तरी अनामिक डोंगरदेव असावे हे नक्की!
डोळ्यासमोरच्या सुळका दिसतोय तेथे पूर्वी दरवाजा होता आणि तेथे भांडी मिळायची..
दुर्गाडीची नाळ चढाई
हे सगळे पाहून चौऱ्यावरील पाण्याच्या टाकीपाशी आलो आणि पेटपूजा करून घेतली. समोर कोरडेठक्क पण तेवढाच रौद्र 'लिंग्या घाट' दिसू लागला. येथून आता दुर्गाडीच्या नाळेने घाम पुसत चढाई सुरु झाली. खतरनाक गचपणातून वाट काढताना 'बरे झाले वाटाड्या घेतला' असे वाटले. Gpx वर शक्यच झाले नसते. बारा वाजता मंडळी घाटमाथ्यावर पोहोचली.
चौऱ्यावरील पाण्याची टाकी
दुर्गाडीची नाळ माथा
एव्हाना आकाश भरून आले होते. धामणओहोळ येथील विहिरीपासून वाट वळवून , करवंद चाखीत मुंबई पॉइंटला पोहोचलो. कुर्डुगडाच्या डोक्यावर काळ्या ढगांनी केलेली गर्दी आज आम्हाला ट्रेकमध्ये अंघोळ घालणार या तयारीने निसणीच्या वाटेने उतरायला चालू केले. सर्व भिडू चालायला ताकदीचे असल्याने तासाभरात निसणी उतरून तळदेव करून खालच्या रहाटाला पोहोचलो. येथेही पुरातन वाड्याचे अनेक अवशेष पहिले. चार-पाच वाड्यांचा समूह असावा. प्रत्येक पडलेल्या दगडांवरही इंटर-लॉकिंग साठी खाचा पाहून स्तब्ध झालो. हे असे काम करायला कोणता इंजिनियर आला असावा? थोडेसे खाली वाड्याकडे येणाऱ्या मार्गावर पायऱ्या दिसल्या. पालापाचोळ्यात लपलेल्या एका दगडाचे शिल्प बघितले असता "शरभ" शिल्प दिसले. शेजारीच अजून एक देवतेचे शिल्प पाहून येथे मुख्य कमान असावी असे वाटून गेले.
निसणीच्या वाटेने उतराई
शिवमंदिर, उंबर्डी
तत्कालीन वैभवाचे आता उरलेले भग्न अवशेष पाहून उंबर्डीचा रस्ता धरला. अजून तासाभरात गावातील हेमांडपंथी शिवमंदिरात आलो. फोटो काढून अंघोळीला विहिरीवर जातो तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. भर पावसात विहिरीवर अंघोळ करून हौस भागवून घेतली. सोपानकाकांना त्यांची बिदागी सुपूर्त करून पुण्यनगरीचा रस्ता धरला. अजून एक सुंदर अशी भटकंती आयुष्याच्या बेरजेत जमा झाली.
सागर शिवदे