गुरुवार, २३ मे, २०२४

ट्रेक : लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट

घामाच्या बादल्या  भरणारा ट्रेक - 

लायन्स पॉईंट - पायमोडी घाट - मृगगड - करवंदी नाळ - शिवलिंग पॉईंट 



    वळवाच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात सुसह्य केलेल्या उन्हातून भटकंतीसाठी लोणावळ्याजवळील दोन घाटवाटांचे नियोजन ठरले. मागच्याच आठवड्यात घोडेजिन- वाघुरघळ ट्रेकवरून परत येताना पश्चिमेच्या केशरी आभाळी उंचावलेला शिवलिंग पॉईंट खुणावत होता. टूरिस्टी पब्लिकच्या गर्दीमुळे कधी या पॉईंट्स वर थांबायलाच जमले नाही. शिवलिंग पॉईंटवर उभे राहिले असता आसमंतात उंचच उंच जाणारा महादेवाच्या पिंडीप्रमाणे भासणारा डोंगर म्हणजे शिवलिंग. त्याचा डावा हात धरून उभा, कोकणातून देशावर येणाऱ्या दोन घाटवाटांचा रक्षक तो मृगगड. 


आजचा दोन घाटवाटा आणि एक किल्ला करायचा प्लॅन झाला आणि लगोलग पंधरा वीस मंडळी आपापले रापलेले चेहेरे अजून काळेकुट्ट करण्यासाठी तयार झाली. भल्या पहाटे पुण्यनगरीतून प्रस्थान करून लोणावळा वरून लायन्स पॉइंटला पोहोचलो तेव्हा उन्हाळी ट्रेक आहे का पावसाळी असा प्रश पडावा असे वातावरण होते. मृगगडाच्या दरीतून निश्चल पहुडलेले ढग आता लगबगीने घाटमाथ्यावर येऊ लागेलेले. या सृष्टी सोहोळ्यात सूर्यदेवांचे आगमन जरा लांबलेच. शिवलिंग डोंगर या ढगांच्या जंजाळात ताठ मानेने उभा होता. मागे लांबवर नागफणीच्या डोंगर अधून मधून दर्शन देत होता. मृगगडाचे मात्र इतक्या लवकर दर्शन होणे नव्हते. थोडक्यात काय तर असे सुंदर वातावरण दिवसभर राहील या अपेक्षेने आनंदित झालेली ट्रेकर मंडळी पायमोडी घाटाच्या दिशेने निघाली. 


ढगात हरवलेला शिवलिंग डोंगर 

काही वर्ष्यापुर्वी जेव्हा एसटीने ट्रेक करायचो तेव्हा मृगगड करणे म्हणजे बारा तासांचा प्रवास आणि बारा मिनिटांचा किल्ला असा सिन होता. कोथरूड ते शिवाजीनगर भल्या पहाटे गाडी हाणत जाऊन तेथून खोपोली. खोपोली ते पाली बसने, भेलीव फाट्यावर उतरून वडाप ने भेलीवच्या अलीकडचे गाव, त्याहून चालत भेलीव मग किल्ला आणि रिटर्न हेच सगळे असला दमवणारा कार्यक्रम असायचा. आजही तसाच दमवणारा कार्यक्रम होता पण आजची पायपीट घाटमाथ्यावरून होती. असो! हौसेला मोल नाही हेच खरे! 

पायमोडी घाट  उतराई 

पायमोडी घाटाच्या वाटेने आम्ही कोकणात उतरण्यास सुरुवात केली. ढगाळ वातावरण आता कमी होऊन त्याची जागा उष्म्याने घेतली. घामाच्या धारा पुसत पुसत मंडळी शिवलिंग डोंगराच्या दिशेने निघाली. दोन तीन ट्रॅव्हर्स मारल्यावर वाट संथपणे पायथ्याशी उतरते. वाटेने गुलमोहराची लालबुंद झाडोरा आणि बहाव्याची पिवळीधमक फुले निसर्गातल्या रंगपंचमीची भूल घालत होते. मध्ये एखादा हुप्प्याचा आवाज सोडला तर अत्यंत निरव शांतता.   सुमारे दीड तासाच्या चालीत आम्ही दरीमध्ये उतरलो आणि मृगगडाच्या दिशेने चालू लागलो. पायमोडी घाट तसा सोप्या श्रेणीतील म्हणता येईल. सुरवातीला असलेल्या कातळकोरीव पायऱ्या हि वाट फार पूर्वीपासून प्रचलित असावी याची साक्ष देतात. 


पायमोडी वाटेने उतरून आल्याचा फायदा हा झाला कि भेलीव गावात न जाता मधूनच मृगगडाची चढाई करता आली. आव्हान सूर्यदेव घाटावरच्या कड्यावरून वरती आल्यामुळे घामाच्या धारा दुप्पट झाल्या होत्या. घाम पुसत मंडळी मृगगडाची चढाई करू लागली. दहा मिनिटांच्या चढाईतच आम्ही गुहेपाशी पोहोचलो. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा गुहा मिस झाली होती. तेव्हा गुहेत आत जाऊन किती मोठी आहे बघून तरी  येऊ म्हणून गुहेत शिरलो. 

गुहेत शिरतानाच समोरून काही येईल का या विचारानेच पाकपुक झाली. तरी डेरिंग करून आतपर्यंत जाऊन आलो त्याचा हा विडिओ बघा :




गुहेत शिरलो तसे संपूर्ण धुळीचे साम्राज्य. वाघुळांचा घाण वास आणि जाळी  जळमटे तोडत आत पोहोचलो. चांगली ३०-४० फूट आत खोदलेली हुह पुढे जाऊन डावीकडे वळते. तेथे एक माणूस उभे राहू शकतो अवधी जागा आणि त्यापुढेही थोडीशी १० फूट खोदलेली. एकंदर थ्रिलिंग अनुभव होता. 



गुहेतून बाहेर येऊन गडाच्या दिशेने मोर्चा वळवला. कातळकोरीव पायऱ्यांवर फोटोबाजी करत वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो.  येथे पेटपूजा करून गडफेरी उरकली. खाली उतरून गुहेतून थोडीफार फोटोग्राफी करून फल्यांण गावाच्या बाजूला उतरायला चालू केले. गडावरूनच उतरल्याने भेलीव आणि फल्यांण दोन्ही गावात जायची गरज लागली नाही. गडावरून उतरून फल्यांण नाळेत आलो.  येथे परत एक ब्रेक घेऊन मग चालू झाली करवंदी घाटाची खतरनाक चढाई. 

मृगगडाच्या कातळकोरीव पायऱ्या 

वाटेच्या नावाप्रमाणेच सुरुवातील करवंदीची जाळी लागली. करवंद अजून पिकली नसल्याने मंडळींचा हिरमोड झाला पण त्यातही कच्ची करवंदे खाऊन स्वारी करवंदीच्या नाळेने निघाली. या वाटेत अजूनही म्हणजे भर उनहाळ्यातही पाणी असते. INS शिवाजी येथे जे छोटे धरण बांधले आहे त्याचे पाणी वर्षभर पाझरत असते. आताशा सूर्यदेव डोईवर येऊन ठेपले होते. रामराया जन्माला ती भर दुपारी बाराची वेळ. टोप्या हातपाय पाण्यात ओले करून मंडळी खिंड लढवण्यास सज्ज जाहली. 


जोरदार झालेले जेवण आणि डोईवर वाढते उन्हाने काही ट्रेकर मंडळींच्या गाड्या मंदावल्या. संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते आणि अंगावरचा चढ संपायचे नाव घेत नव्हता. सुदैवाने बरीचशी वाट जंगलातून असल्याने चढाई सुसह्य होत होती. पाच लिटर पाणी संपून वाहत्या प्रवाहातून भरल्या पाण्याची अनेक आवर्तने जाहली. जसा जसा माथा जवळ येऊ लागला तशी वाट बिकट होऊ लागली. डोक्यावर राक्षसी उन्हे आणि तापलेले रॉक पॅच यांनी घामाच्या बदल्या भरू लागल्या. काकडी, कोकम , चिक्की, इलेक्ट्रॉल इत्यादी मंडळींनी काही काळ खिंड लढवली पण खड्या चढाईमुळे सगळ्यांचीच चाल मंदावली. 



सुमारे सत्तर टक्के चढाई झाल्यावर एका ठिकाणी घनदाट जंगल लागते. तेथे वर्षानुवर्षे उभी असलेली महाकाय अशी झाडे पाहून सर्व मंडळी उत्साहित झाली. करवंदी नाळेच्या चढाई सुरु झाल्यापासून कोणीही फोटो काढले नव्हते. तब्बल हजार दोन हजार वर्षे वयाची हि झाडे असावीत. पाहताच अचंबा झाला. येथे यथेच्छ फोटोग्राफी करून शेवटच्या टप्पा चढाई चालू झाली. 


घाटमाथा जवळ येऊ लागला तसा वाटेवर सर्वत्र कचरा सुरु झाला. स्वर्गसुख देणाऱ्या सह्याद्रीत असा कचरा करणारे आपणच किती करंटे आहोत या विचारातच माथा गाठला. भर उन्हातही गार वारा आता आल्हाददायक वाटत होता. बाकीचे भिडू येईपर्यंत दोन तास लागले तोपर्यंत एक झोप पदरात पडून घेतली. दोन घाटवाटा आणि किल्ला असूनही ट्रेक संपला तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. परतीच्या प्रवासात मोरगिरी, जवण मार्गे  जाताना पवना धरणातल्या वाघेश्वर मंदिराला गेलो. येथेही रिल्स पाहून आलेल्या लोकांची गर्दी पाहून जे सटकलो ते सातच्या आत घरात. 


वाघेश्वर 


 असो!,  तर एकंदर २२ किलोमीटर्सची, घामाच्या बदल्या भरणारी, दोन घाटवाटांची भटकंती सुफळ संपूर्ण जाहली !


महत्वाचे असे काही : 

  • दोन्ही वाटा मळलेल्या आणि सुस्थितीत आहेत त्यामुळे गाईडची गरज नाही. 
  • घाटमाथ्यावरून समोर भेलीव आणि फल्यांण गाव दिसते त्यामुळे वाट चुकली तर भरकटण्याची शक्यता नाही. 
  • gpx फाइल्स ramble.com वर उपलब्ध आहेत. 
  • करवंद नाळ चढताना जो पाण्याचा प्रवाह आहे त्यावरच वरती एक सुंदर कुंड आहे. भर उन्हाळ्यातली तेथे वहाते पाणी असते. हे कुंड पाहून परत करवंदी नाळेला दोन तासात येता येते. 
भटकंतीचा नकाशा : 










तळटीप : 
या लेखातील काही फोटो सौजन्य : ऑफबीट ट्रेकर्स 


रविवार, १४ एप्रिल, २०२४

तैलबैल - घोडेजिन घाट - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल


तैलबैल - घोडेजिन घाटाने उतराई - सुधागड दिंडी दरवाजा - सुधागड - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल  [ २४ किलोमीटर ] 

 तळपत्या उन्हातील दोन घाटवाटा आणि दोन किल्ल्यांची अनवट भटकंती - तैलबैल - सुधागड - तैलबैल रेंज ट्रेक . 

=================================================================

"रुपेश , ए रुपेश ऊठ रे जरा ! त्यो बघ तिथे एक साप आहे ती माणसे झोपलीयेत तिथे. मार जा तो ! ती माणसं घाबरतील " 

या काकूंच्या एका वाक्याने तैलबैल गावातील मारुती मंदिरात घोरणाऱ्या ट्रेकर्सची झोप तीन ताड उडाली. पहाटे साडे चारची किर्रर्र वेळ. रुपेशने शांतपणे  "काय शिंची कटकट ए! " अश्या अविर्भावात उठून हातात दंडुका घेऊन सापाला पुढच्या दिड मिनिटात यमसदनी धाडले आणि पुन्हा निद्रादेवीची आराधना करण्यास सुरुवात केली. झोप उडालेली ट्रेकर मंडळी कधी नव्हे तो "आज लवकर ट्रेक चालू करू" म्हणत आवरायला लागली.

=================================================================


    मागच्या आठवड्यात कोंडनाळ-हातलोट घाट असा फक्कड बेत झाल्याने भर उन्हात अजून काळे पडायला आपण सिद्ध आहोत याचा साक्षात्कार झाला. तैलबैला वरून कोकणात उतरणाऱ्या चार-पाच घाटवाटा सतत खुणावत होत्या. या आधी दोन वेळा ठाणाळे लेणी शोधण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते.  घोडेजिन - भोरप्याची नाळ किंवा वारसदार - वाघजाई घाट या दोनपैकी,  घोडेजिनने उतरून वाघूर घळ ने चढायचा प्लॅन फिक्स केला. यामध्ये सुधागड दिंडी दरवाजा पण करता येईल या हिशेबाने भल्या पहाटे ट्रेक सुरु झाला. सुरुवातीला फक्त दोन घाटवाटा करू असे ठरले मग नंतर महादरवाजा बघून परत मागे फिरू आणि मग पूर्ण सुधागड करून  दोन्ही वाटा करू असा मारुतीच्या शेपटीसारखा वाढत गेलेला ट्रेकने भटक्या मंडळींची चांगली पाकपुक केली. 


चैत्र पालवीचे दिवस, सकाळी सहा वाजताच तैलबैलाच्या कातळभिंती आसमंतात सूर्याची पहिली कोवळी किरणे लेवून सोनेरी जिरेटोप परीधान करून होत्या. वर्षानुवर्षे अभेद्य अश्या कातळभिंती आणि त्यामधोमध स्थानाप्पन्न असे भैरव यांना मनोमन नमस्कार करून घोडेजिन घाटाची वाट पकडली. तैलबैला गावातून कोकणात उतरायला वाघजाई. सवाष्णी, घोडेजिन , वारसदार अश्या चार वाटा आहेत. घोडेजिनही सुधागड ला जाणारी सगळ्यात जवळची वाट.  हि वाट तैलबैला पठार आणि सुधागड यातील गणेश खिंडीत उतरते, येथून पुढे नाळेने सुधागडच्या दिंडी दरवाज्याला जाऊन किल्ल्यावरून दुसरे टोक ठाकूरवाडी गाठायचे ठरले. भोरप्याची नाळ उर्फ वाघुरघळ स्थानिक कातकरी सोडून कोणीही वापरत नसल्याने वाट अशी नाहीच. जंगलातून काटेरी झाडांचा प्रसाद घेत अंदाजाने चढाई करणे क्रमप्राप्त. 


गावातून अर्ध्या तासात घोडेजिन घाटाच्या तोंडाशी आलो. वाटाड्या घेणे गरजेचे आहे पण या वाटांचा अभ्यास केल्याने gpx फाईलच्या जीवावर जायचे ठरले. तैलबैला कातळभिंती मागच्या बाजूने आता अजून रौद्र भासत होत्या. सकाळचे शुचिर्भूत वातावरण, आंब्याला आलेला मोहोर, कातळामागून उगवणारे सूर्यदेव. वाळलेल्या गवताच्या पात्यांवर कोवळे किरण पडल्यावर चमकणारे गवताचे भाले. पळसाच्या झाडावर चढलली पिवळेधमक तोरणं. समोर स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला भोरप्याचा डोंगर, त्यामागे तळगड, उजवीकडे सरसगड तर मागे बघता घनगड, केवणीचे पठार, नाणदांड घाट असे दुर्गवैभव. डोळे भरून हा निसर्गाचा सोहोळा बघून रामरायाचे नाव घेऊन घोडेजिनच्या घसाऱ्याने उतरायला सुरुवात केली. 

                                       घोडेजिन घाटमाथ्यावरून समोर दिसणारा सुधागड 

"आमचे रेल्वेच्या इंजिनात रिसर्वेशन झाले असले तरी आम्ही चुकीने गार्डाच्या डब्यातच शिरणार" या उक्तीप्रमाणे नाळ उतरताना  पहिल्यांदाच रस्ता चुकला. पूर्ण नाळ उतरून गणेश खिंडीत आलो तर रस्ता गायब. gpx ओरडून ओरडून थकलं कि "बाबांनो रस्ता चुकलाय".  मग काय धोंडसे गावातून सुधागड येणाऱ्या वाटेच्या समोर आल्यावर करवंदाच्या जाळीशी दोन हात करत गचपणातून मार्ग काढत कसेबसे योग्य त्या नाळेत आलो. रस्ता चुकल्यामुळे का होईना पण जंगलात घुसून उतरल्याने कमी वेळात धोंडसे गावातून येणाऱ्या वाटेला लागलो. सुरुवातीला वाटले होते कि दिंडी दरवाजा जवळ असेल. तो बघून याच रस्त्याने उतरून गणेश खिंड ओलांडू आणि भोरप्याच्या नाळेला जाऊ. घड्याळात बघता अकरा वाजत आलेले. या प्लॅनने दोन-तीन पर्यंत तैलबैला गावात पोहोचलो असतो पण भर उन्हाचा तडाखा अजून बसला नव्हता म्हणून दिंडी दरवाज्याने चढून सुधागड करून ठाकूरवाडी म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला उतरायचा निर्णय घेतला. 

                        

सुधागड दिंडी दरवाज्याच्या दिशेने चढून आलो. वाटेत एक मारुतीचे सुंदर मंदिर लागते. त्यापुढे भैरव आणि चॅन पाण्याची टाकी आहेत. महादरवाज्याचे सौन्दर्य ते काय वर्णावे? महाराजांनी रायगडा आधी सुधागडची निवड का केली असावी याची प्रचिती येते. आजही बुलंद असा गौमुखी पद्धतीचा दिंडी दरवाजा डोळ्याचे पारणे फेडतो हे नक्की.  

महादरवाज्याच्या वाटेत असणारे पाण्याची टाकी आणि भैरव 

महादरवाजा उर्फ त्रंबक दरवाजा 

              

यथेच्छ फोटो काढून भोराई देवीच्या मंदिरात पोहोचलो. पाठीवरची वजने पोटात ढकलून सचिव वाडा बघून ठाकूरवाडीच्या दिशेने उतरायला लागलो. आत्तापर्यंत झाडीतून चढाई होती म्हणून मंडळी आनंदात भटकत होती. सुधागडच्या माथ्यावरून समांतर जाताना जळता सूर्य डोक्यावर येऊन ठेपला होता. पाठीवरच्या आठ लिटर पाण्याचा साठा अर्ध्यावर आलेला. त्यात पाच्छापूर दरवाजाची वाट चुकून आम्ही पुन्हा भरकटलो. सुधागडची gpx नसल्याने दोन वेळा वाट चुकून कड्यावर उतरलो. एक ठिकाणी अगदी खालपर्यंत उतरून कडा लागल्याने परत उलटी चढाई करणे आले तेथे मंडळींचा पेशन्स संपला. तेवढ्या एक तासात जी काही एनर्जी , वेळ आणि पाणी  खर्च झाले त्यांची किमंत पुढे चुकवावी लागणार होती. 

सुधागडावरून दिसणारा तैलबैला .. बापरे एवढे अंतर अजून जायचे आहे. 


आत्तापर्यंत रमत गमत चाललेली मंडळीची दिड  तास वाया गेल्याने वेळेशी स्पर्धा चालू झाली. ठाकूरवाडीत उतरलो तेव्हा तीन वाजत आले होते. पूर्ण सुधागड ट्रॅव्हर्स मारून मागे परत तिवईचा वेढा आणि तेथून वाट शोधत भोरप्याची नाळ चढाईची होती. गावात पोहोचायला रात्र होणार हे नक्की झाले होते. आता झपाझप पाय उचलणे गरजेचे होते पण सुधागडच्या पट्ट्याने आणि उन्हाच्या तडाख्याने ट्रेकर मंडळी पुरती गळपटली होती. एकोले दरीतल्या नाळेत लागलो तेव्हा थोडीशी पेटपूजा करून घेतली. रस्त्यात आत्तापर्यंत कुठेही पाणी मिळालेले नव्हते. भोरप्याच्या नाळेत पाणी मिळेल हि एक अपेक्षा होती. भोरप्याच्या नाळेला स्थानिक वाघुरघळ म्हणतात. म्हणजे वाघ पाणी प्यायला येतो ती वाट. सुमारे तासभर चालल्यावर एक मोठा डोह दिसला. मिनिटा-मिनिटाला येणार घाम दिवसभर पुसत चाललेली मंडळी आहे तशी डोहात डुंबू लागली. 

                      


वेळेची आठवण झाल्यावर मंडळी निघाली आणि वाघूळघळ च्या शोधात जंगलात घुसली. असंख्य करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे रस्ता थोपवून उभी होती. अंग-खांद्यावर काट्यांची सही घेत मार्गक्रमण चालू झाले. gpx फाईल दाखवत असलेला मार्ग सोडायचा नाही म्ह्णून चालत होतो पण मध्ये मध्ये पडलेली झाडे, लॅन्ड्स्लाईड मार्ग बदलायला भाग पंडित होती. मध्येच एक ठिकाणी भलामोठा रानरेडा आमच्यावर नजर रोखून उभा होता. त्याचे अविर्भाव बघून पुन्हा वाट सोडली आणि नाळेत उतरलो.  दोन अडीच तासांच्या काट्याकुट्यांच्या मार्गाने एकदाचे भोरप्याच्या नाळेत पोहोचलो. 

gpx route 

भोरप्याची नाळ चढाई 


आताशा सगळ्यांचे पाणी संपत आले होते. दिवस पश्चिमेकडे कलू लागलेला. समोर केवणीचे पठार मावळतीचे रंग धारण करू लागलेला. येथून आता नाळेतून उभी चढाई करायची होती. प्रत्येक पाऊलागणिक श्वास फुलत होता. पाण्याने आणि उकाड्याने जीव बैचैन झाला होता. प्रत्येकाची इंच इंच लढाई चालू झाली. जवळपास अर्धी नाळ चढून झाली तेव्हा सूर्यनारायण ड्युटी संपवून निघून गेले होते. शेवटच्या संधी प्रकाशात सोळावा ब्रेक घेऊन बॅटरी काढून मंडळी पुन्हा चढाईला जुंपली. 

कोंडनाळची आठवण करून देणारी वाघुरघळ चढून माथ्यावर आलो तेव्हा तैलबैल खोरे अंधारात गुडूप झालेले. कातळावरील एकच भैरवाच्या मंदिरातला दिवा चमकत होता. सगळी मंडळी त्यांच्या सगळ्या अवयवांसकट सुखरूप असल्याची खात्री करून गावाच्या दिशेने निघालो. रणरणत्या उन्हातील २४ किलोमीटर्सचा ट्रेक संपवून रापलेल्या चेहऱ्याने घरी पोहोचलो तेव्हा घड्याळ दुसऱ्या दिवसाची तयारी करीत होते. 

"लाईफ मैं बहोत कुछ पेहली बार होता है रे " या मुन्नाभाईच्या वाक्याप्रमाणे आठ लिटर पाणी लागलेला हा पहिलाच ट्रेक म्हणावा लागेल. पूर्ण भटकंतीत प्यायला एक घोट पाणी नाही मिळाले पण पोहायला मिळाले अशीही पहिलीच वेळ. सकाळी साप तर संध्याकाळी रानरेड्याशी भेट हेही प्रथमच. असो आयुष्य समृद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या देणग्या आम्हाला वेळोवेळी मिळोत हीच रामराया चरणी प्रार्थना ! 

शेवटी काय तर ... तू रख यकीन बस अपने इरादों पर ........  तेरी हार तेरे होसलों से बडी नही होगी ! 


वाचत राहा . 


महत्वाच्या नोंदी : 
१. एवढा मोठा ट्रेक करायचा नसेल तर घोडेजिन ने उतरून गणेश खिंडीने भोरप्याच्या नाळेत जात येईल. साधारण तीन ते चार तास आणि सुधागड चढाई वाचेल. 
२. भर उन्हाळ्यातली हि माजमोडी भटकंती करताना कमीतकमी ६ ते ८ लिटर पाणी जवळ असणे महत्वाचे. 
३. गाईड शिवाय सुद्धा ट्रेक करता येईल. वेळेचे नियोजन मात्र महत्वाचे. 
४. सुधागड उतरून ठाकूरवाडी न जाता थोडे अलीकडून भोरप्याच्या नाळेत जाऊ शकतो. वाटेत पोहायला मस्त पाणी आहे. 
५. भोरप्याची नाळ म्हणजे वाट नाहीच. समोर नाळ बघून त्यादिशेने काट्याकुट्यातून चालत राहायचे आहे. वाटेत काही मोकळी जनावरे ( म्हशी रेडे ) सोडलेली आहेत. त्यांना सरप्राईज दिले तर जंगलात पळापळी अवघड होईल याची दाखला घेऊन जावे. 



भटकंतीचा नकाशा : 






रविवार, ३१ मार्च, २०२४

मधू-मकरंदगड - रौद्रभीषण कोंडनाळ - हातलोट घाट


भर उन्हातली भटकंती - 

हातलोट - मधू-मकरंदगड - रौद्रभीषण अश्या कोंडनाळने कोकणात उतराई - बिरमणी मुक्काम - हातलोट घाटाने देशावर चढाई - हातलोट ( २४ किलोमीटर्स )


    रानावनात वसंताची चाहूल लागलीये. दिवस हळूहळू मोठे होऊ लागलेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. हातलोट गावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय त्यामुळे अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. मकरंदगडाच्या माथ्यावरून समोर दिसणारा चकदेव पर्वत, कांदट खोरे, डावीकडे गगनचुंबी सुमारगड , महिपतगड मागे महाबळेश्वर. या पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


उन्हाच्या झळा वाढू लागल्या तसे भटकंतीच्या नव्या जंगलवाटा शोधायला चालू केले. उन्हाळ्यात पायपीट करायची तर महाबळेश्वरचे जावळीचे खोरे म्हणजे बेश्ट! मागच्या ट्रेकला एका भिडूने कोंडनाळचा विषय काढला. आजपर्यंतची सर्वात आवडलेली आणि रौद्रभीषण अशी कोंडनाळ वर्णन ऐकूनच दोन दिवसांचा प्लॅन बनला. बरेच वाचन केल्यावर सगळ्या लेखात एक कॉमन उल्लेख होता तो म्हणजे कोकणातल्या आमचा जेथे मुक्काम असणार होता त्या गावातील आदरातिथ्याचा. ट्रेक भिडूंना तेथे आलेल्या माणुसकीच्या अनुभवांचा. हे सगळे वाचून उत्सुकता अजूनच वाढली. जोडीला वेळ मिळाला तर मधू-मकरंदगड पण होणार होते. मकरंद गडाच्या माथ्यावरून दिसणारे जावळीचे घनदाट जंगल म्हणजे काय वर्णावे ? निव्वळ कमाल ! 


सात मंडळी जमवून रात्री दहाच्या सुमारास गाडी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली. महाबळेश्वरपर्यंत रात्री जायचे काही टेन्शन नव्हते. रात्री एक वाजता सुद्धा रस्ते अडवून तिकीट घेणाऱ्याला फाट्यावर मारून आंबेनळी घाटाने उतरायला सुरवात केली. अर्धा घाट उतरून पार गावाच्या कमानीतून डावीकडे वळलो तेव्हा जावळीचे जंगल निद्रिस्त झाले होते. पार ते हातलोट रस्त्याने रात्री दोन वाजता जाताना कुठे तरी जंगलात डोळे चमकतील या आशेने मंडळी चालली होती. अडीच वाजता हातलोट गावात पोहोचून गावातील प्रशस्त अश्या कुंबलंजाई मंदिरात झोपून गेलो. 


तीन तासाची झोप पदरात पडून सकाळी सात ला मकरंदगडाच्या दिशेने निघालो. मकरंदवाडीत एक घरात इंद्रायणी तांदळाची ऑर्डर देऊन घोणसपूर दिशेने निघालो. तासात माचीवरील मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचलो. घामाने अंघोळ तर झालीच होती.  तसेच महादेवाच्या चरणी माथा टेकवून पाठीवरची वजने पोटात ढकलली. 


मल्लिकार्जुन मंदिर, घोणसपूर 


"कोंडनाळ तुम्हाला सापडणार नाही आणि खूप अवघड आहे गावातलं पण कोण येणार नाही. त्यापेक्षा परत गावात जाऊन हातलोट घाटाने जा" असे तीन सल्ले मिळाले. आता गावकरी अवघड आहे जाऊ नका म्हणतायत तर आमची काय अवस्था होईल याची पुसटशी कल्पना येऊ लागलेली. "कोंडनाळ अवघड तर आहेच पण नाळेचे तोंड कसे शोधणार हो तुम्ही? असे करा मंदिराच्या जवळ एक धनगराचा झाप आहे त्याला घेऊन जा बरोबर तो नाळेचे तोंड दाखवेल" या एकाच्या आशादायी बोलण्यावर मंडळी निघाली. जो लक्ष्मण नामक धनगर आमच्या कोंडनाळ उतरायच्या आशेचा किरण होता तोच आम्हाला मंदिरात भेटला आणि आमच्या समोर रानात निघून गेला. "आत्ता  तुम्ही नाळेच्या तोंडाशी पाहिजे होतात आता उन्हामुळे पुरते बेजार व्हाल" इति लक्ष्मण !  त्याला विनवणी केल्यावर तुम्ही किल्ल्यावर जाऊन या मी दिड तासात इथे मंदिरात येतो म्हणून निघून गेला. 


मकरंदगडावरून दिसणारा नजारा 


ग्रुपमधल्या बरेच लोकांचा मकरंदगड राहिला होताच मग हि संधी साधून किल्ल्यावर जाऊन कोंडनाळेचं जरा अंदाज घेतला.  तासाभरात खाली मंदिरात आलो तरी लक्ष्मण आलेला नव्हता. आमचा शेवटचा आशेचा किरण सुद्धा भर उन्हात मावळला. आता gpx आणि वाचलेल्या माहितीच्या आधारे नाळेचे तोंड शोधणे होते. अजून वेळ न घालवता मंडळी झपाझप निघाली.अर्ध्या तासात मकरंदगडाच्या मागील बाजूस पोहोचलो. येथून घसाऱ्याच्या वाटेने पश्चिम टोकाला पोहोचलो. येथून खाली धारदार, दरीत कोसळणारे सह्याद्रीचे कडे लक्ष् वेधून घेत होते. येथून पुढे वाट संपली आणि कोंडनाळच्या तोंडाशी पोहोचलो. सर्वात पहिल्यांदा येथून माणूस उतरू शकेल यावर विश्वासच बसत नव्हता. ग्रुपमधील काही मंडळी तर येथू जाऊच शकत नाही परत जाऊन वाटाड्याला आणू म्हणाली. gpx वर हाच उतरायचा बिंदू दाखवत होता मग काय ? रामरायाचे नाव घेऊन नाळेत उतराई सुरु केली. कोंडनाळ म्हणजे मराठीत एकाच शब्द ! रौद्रभीषण!


रौद्रभीषण 


एकमेकांना हाकाऱ्या देत,  अंतर ठेवत, gpx बघत उतराई चालू झाली. प्रचंड घसाऱ्याची उतराई बघून डोळे आणि डोके दोन्हीही फिरले. एक पाय ठेवल्यावर डझन दगड गडगडाट खाली जायचे. मग खालच्याला वॉच आऊट,वॉच आऊट च्या आरोळ्या चालू झाल्या. मोठे मोठे खात्रीचे दगड पाय ठेवताच आपली जागा सोडून विस्थापित होऊ लागले. प्रत्येक जण नियमित प्रसाद घेत काळजीपूर्वक उतरू लागला. बरे खाली दगड बघून उतराई करायची तर कारवीचे जंगल टोपी उडवायचे. या दोन्ही आघाडीवर लढाई करत उतरताना चाल मंदावली. सुमारे तासभर हा खेळ चालला आणि मग नाळेचा कातळमार्ग लागला. येथे मंडळींनी सगळे अवयव जागेवर आहेत याची खात्री करून मनाचा ठिय्या करून पुढची वाटचाल चालू केली. गावातील तीन चार लोकांनी अवघड आहे म्हणून सांगितलेली वाट खरंच खतरनाक निघाली. अगदीच हैराण वा वाईट अवस्था झाली नाही हि दैवी कृपा! 


वाटेतील एकमेव पाण्याचा स्रोत 


सुमारे पाच तास उतराई करून आम्ही सपाटीला पोहोचलो. चार लिटर पाणी संपत आले होते. आता हातलोट घाटाची नाळ पण येऊन मिळाली होती. येथूनच डावीकडे बिरमणी गावात जाणारा रस्ता होता पण तो न दिसून आम्ही नाळेने बिरमणी गावाच्या पुढे कळमणी गावापर्यंत पोहोचलो. gpx बेंबीच्या देठापासून तुम्ही चुकले आहात सांगत होते पण नाळ गावात जाईल या विचाराने आम्ही चाललो होतो. शेवटी नाळेतून क्रॉस मारून एक डोंगर चढून कसेबसे बिरमणी गावात पोहोचलो. गाव सुंदर आणि प्रसन्न होते. गावातील मुले क्रिकेट खेळात होती त्यांनी गावातील मारुती मंदिराची वाट दाखवली. आज आमचा मुक्काम याच मंदिरात होणार होता. पाच वाजता आम्ही वेळेत गावात पोहोचलो. सकाळी सात ते संध्याकाळी पाच अशी दहा तासांची चाल आज झाली. मंदिरासमोरच एक छोटेसे घर आणि दुकान आहे तेथे चहा आणि  जेवणाचे सांगून भटकायला निघालो. दोन क्रिकेटच्या मॅच खेळून परत आलो तेव्हा सायंकाळ झाली होती. बरोब्बर सातच्या ठोक्याला मंदिरात आरती करून रामरक्षेचा पाठ म्हंटला. गरम गरम रस्सा भात खाऊन मंडळी गुडूप होतील असे वाटले होते पण गावातील काही थोर मंडळी गप्पा मारायला आली आणि रात्री अकरा पर्यंत गप्पांचा फड जमला. 


आज अवघड अश्या कोंडनाळेची भटकंती कोणत्याही वाटाड्याशिवाय करता आली याबद्दल समाधान वाटले. खाली गावातून वरती कोंडनाळ बघता अजूनही येथू आपण उतरून आलो यावर विश्वास बसत नव्हता. चार पाच महिन्यांपूर्वी एकाला कोंडनाळेतून बेशुद्ध पडल्यामुळे रिस्क्यू केले होते त्या कहाण्या उतरताना सारख्या आठवत होत्या. लेखात वाचलेल्या गावातील आदरातिथ्याचा आम्हालाही अनुभव आला. चहाला दूध नव्हते तर एक घरातील काकांनी त्यांचे भांडभर दूध आणून दिले असे अनेक सुंदर अनुभव गाठीशी घेत आजचा दिवस संपवला. 


आजचा मुक्काम बिरमणी गावातील मारुती मंदिरात 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर हातलोट घाट चढून निघायचे ठरले जेणेकरून महाबळेश्वरचे पब्लिक टाळता येईल. सात वाजता निघालो तसे गावातील काळ क्रिकेट खेळणारी मुले आम्हाला हातलोट घाटाच्या सुरुवातीला सोडवण्यास आली. त्यांचे आभार मानून हातलोट घाटाची चढाई चालू केली. 


"कोंडनाळ" हा जर दहावीच्या बोर्डाच्या पेपरमधील "ड" गटाचे गणित असेल तर हातलोट घाट एकदम "अ" गटाचं गणित निघाले. मस्त गर्द झाडीमधून हळू हळू चढणारी वाट सुमारे अडीच तासात माथ्यावर घेऊन आली. माथ्यावर कातळकोरीव पायऱ्या आणि पाण्याचे टाके बघून ही वाट वहिवाटीची प्राचीन वाट असेल याची खात्री झाली. येथून रमतगमत हातलोट घाटात पोहोचलो तेव्हा अकरा वाजत आले होते. गावात एक घरात जेवण सांगितले होते. चवदार मुळ्याची भाजी, कोरडी मिरची असे पदार्थ खाऊन हातलोट गावातून निघालो. वाटेत महाराजांनी कोयना नदीवर बांधलेला शिवकालीन पूल बघून पार गावातील "रामवरदायिनी" देवीच्या दर्शनाला गेलो. 

हातलोट घाट चढाई 


आता महाबळेश्वर जायचे तर स्ट्रॉबेरी तर आणलाच पाहिजे नाही का? मग हातलोट गावाच्या जवळच एक शेतात जाऊन उरलेल्या स्ट्रॉबेरी तोडल्या आणि मग विनाथांबा पुण्यनगरीचा रस्ता धरला. अश्या प्रकारे एक कायम लक्षात राहील असा रौद्रभीषण अश्या कोंडनाळेचा ट्रेक सुफळ संपन्न जाहला. 


महत्वाचे असे काही :

  1. कोंडनाळ शक्यतो उतरावी आणि हातलोट घाटाने चढाई करावी. कोंडनाळ उतरताना पहिल्यांदा खूप घसारा आहे योग्य ते अंतर ठेऊन उतराई करावी. 
  2. उन्हाळ्यात नाळ सगळ्या बाजूने तापून दगड तापतो आणि जीव हैराण होतो असे दोन तीन अनुभव ऐकले होते. तयारीचे भिडू असल्याने आम्हाला तस्से काही वाटले नाही. 
  3. गाईड घेतला नसेल तर मल्लिकार्जुन मंदिराकडून पुढे आल्यावर एकधनगराचा झाप आहे तो ५०० रु घेऊन नाळेच्या तोंडाशी सोडू शकतो. 
  4. बिरमणी गावात राहायची आणि जेवायची उत्तम सोय आहे. खायचे काही नेले नाही तरी चालेल. आम्हाला हे माहित नसल्याने आम्ही दोन दिवसांचे जेवण नेले होते. 
  5. बिरमणी गावात जायला हातलोट घाट आणि कोंडनाळ जेथे संगम होतो तेथून लगेच डाव्या हाताला वळावे. सरळ गेल्यास कलामणी गावात पोहोचतो. 
  6. कोंडनाळ उतरायला अंदाजे पाच ते सहा तास लागतात तर हातलोट चढाई ३ तासांची आहे. 
  7. https://www.ramblr.com/web/explore येथे gpx फाईल मिळेल. 


असो! फोटोंची मजा घ्या!

सागर शिवदे 









भिडू लोक्स 

श्रमपरिहार 

रानमेवा 





सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

रविवारची अनवट भटकंती : पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड

रविवारची अनवट भटकंती : 

पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड  


रात्री दोनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. कोतुळ - ब्राम्हणवाडा - कोथळे अशी गावे मागे पडत होती. रात्री दहाला निघालेली मंडळी झोपेची थकबाकी गोळा करत करत पाचनई गावात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील रौद्रभीषण असा कोकणकडा त्यासमोरील सीतेच्या डोंगरावरून मनसोक्त न्याहाळणाचा. त्याचे विलोभनीय असे रुपडे डोळ्यात साठवून घेण्याचा, आणि कलाडगडावरुन दिसणारे दुर्गवैभव अनुभवण्याचा. 

 

जेव्हा जेव्हा कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहायचो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला जाताना नाफ्ता -डोमा, कलाडगड या शिखरांच्या मागे केशरी झालर चढलेली असायची. नाफ्ता-डोमाचे गगनचुंबी शिखरे कायम साद घालायची. कोकणकड्यावरून खाली बघताना डोळे फिरायचे पण त्यावेळेस कोकणकड्याचे अद्भुत अंतर्वक्र रूप समोरून पाहता येत तर काय मजा येईल या विचारताच सूर्यास्त व्हायचा. आज ते वेळ आली आणि ट्रेकभिडुनी प्लॅन ठरवल्यावर लागलीच पाच भटकी मंडळी निघाली. 


रात्री तीनला पाचनई गावात पोहोचून एक मंदिरात पथारी टाकली. तीन नंतर गाड्या भरून भरून पब्लिक यायला लागल्यावर थोडीफार तरी झोप होईल हि अपेक्षा सोडून दिली. साडे तीनच्या सुमारास रील बघून हरिश्चन्द्रगड "ट्रेकिंग" नव्हे तर "ट्रॅकिंग" करणारी मंडळींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. हिंदी पब्लिक आणि उत्साही पोरींनी पहाटे तीन वाजता हासत -खिदळत गावातील शांततेचा बाजार उठवला. थंडी असल्याने पांघरून ओढून पडून राहिलो. सकाळी सर्व आवरून पुढे निघालो. 


हरिश्चंद्र गडाच्या डोईवरून मनसोक्त विहार करणारे ढग 


पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले. आसमंतात जमलेले ढगांचे छोटे-छोटे पुंजके पश्चिमेच्या  प्रवासास लागले होते. सकाळची कोवळी किरणे लेंडी जांभळाच्या सदाहरित हिरव्यागार पानांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. समोर कलाडगड निश्चल ऊन खात पहुडलेला तर त्यामागे घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. सीतेचा डोंगर समोर बघून नाळेतून चढाई चालू केली. ओळीने येणाऱ्या मोठ्या मोठ्या गुहा पाहून पावसाळ्यात येथे काय कमाल वातावरण असेल या विचारात यथेच्छ फोटो काढत मंडळी दोन तासात डोंगरावर पोहोचली. 


थोडी उंची गाठली तसे कलाडगड खुजा वाटू लागला तर पश्चिमेकडे नाफ्ता शिखराचे दर्शन होऊ लागले. समोर शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव , आजोबा पर्वत लक्ष वेधून घेत होते. जसे डोंगर चढून माथ्यावर पोहोचलो तसे वरून दिसणारे दुर्गवैभव पाहून डोळे तृप्त झाले. नाणेघाटापासून ते हटकेश्वर पर्यंतची सगळी जुन्नर दिशेची डोंगररांग आता एका दृष्टीक्षेपात आली. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच काय ते आपल्या हातात!. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या. 


समोर आहे तो कलाडगड. त्यामागे घनचक्कर रांग. 

माथ्यावर चढाई मागे रोहिदास शिखर 

खिंडीतून छोटीशी चढाई करून सीतेच्या डोंगराचा माथा गाठला. समोर आता कोकणकडा दिसत होता. तारामती, बालेकिल्ला उन्हाचा सोनेरी मुकुट धारण करून ध्यानस्थ बसलेले. माकडनाळ, रोहिदास शिखर आणि त्याला लागून एकमेवाद्वितीय असा अंतर्वक्र कोकणकडा. बरोबर रोहिदास शिखराच्या मागे देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर दिसला. केवळ अद्भुत अशी निसर्गचित्रे! येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सुंदरतेच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस!


नाफ्ता - डोमा शिखरे. मध्ये हपट्याचा कडा 


देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर येथून दिसला. 

रोहिदास शिखर आणि माकडनाळ 

नाफ्ता-डोमा समोर तर मागे आजोबा - करंडा, कात्राबाई - गवळदेव - घनचक्कर- भैरवगड शिरपुंजे 


घड्याळात अकरा वाजलेले पाहून परतीचा रस्ता धरला. दिड तासात परतून कलाडगडाकडे कूच केले. एव्हाना आता उन्हाचा जोर वाढल्याने कलाडगडाची चढाई दम काढू लागली. वीस मिनिटात चढाई करून गेल्यावर कातळकोरीव पावट्यानी स्वागत केले. अश्या उंच ठिकाणी अशी कारागिरी करणाऱ्या त्या अनामिक हातांना सलाम! येथून पुढे चढून भैरव मंदिरात पोहोचलो. नमस्कार करून गड फेरीस निघालो तशी या माथ्यावरून मगाशी न दिसलेली नाफ्ता-डोमाच्या मागील दुर्गशृंखला उलगडत गेली.



येथून पॅराशूट जम्प केली तर डायरेक्ट वल्हीवरे गावात उतरता येईल .  


 कात्रा,करंडा,आजोबा ते मागे पाबरगड सगळी रेंज एका ओळीत दिसू लागली. पुन्हा एकदा हे अप्रतिम वैभव मनाच्या कप्प्यात साठवत कलाडगड उतरून खाली आलो. एक सुंदर मोठ्य्या झाडाशी जेवण करून अर्धा तास वामकुक्षी घेतली आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 


चक्रासन 




प्रथम फोटो आणि हे शेवटचे काही फोटो सौजन्य : श्री विनीत दाते. 


महत्वाचे असे काही : 
  • हरिश्चंद्रगडाचे आणि जुन्नर पर्वतरांगेचे  रौद्र सौन्दर्य आणि पाहायचे असेल तर यासारखी जागा नाही. 
  • पावसाळ्यात मोठे धबधबे असल्याने चढाई अवघड होईल.  उत्तम. 
  • हपट्याचा कडा हा सीतेचा डोंगर उतरून अर्धा पाऊण तास चाल आहे.