सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.


जीर्णनगरी मुशाफिरी :  चावंड किल्ला
बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. 
सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती. 

या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्री च्या बौद्ध लेणी, मानमोडी डोंगरातील जैन गुंफा , ५ धरणे आणि वाघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे. 

यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर  ST ने नवीन जुन्नर स्थानकावर उतरावे. जवळपास अडीच तास लागतात. तिकीट ९८रु. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. नवीन जुन्नर ST स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर  ST पकडून चावंड फाट्यावर उतरावे.
चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. 

बघायचे काय ?
किल्ल्यावर जाताना लागणारा दगडात खोदलेल्या वाटा, पुष्करणी तलाव, २१ पाण्याची टाकी, सप्ततलाव, प्राचीन असे महादेव मंदिर, चावंडा देवी मंदिर, महादेव मंदिरावरील शिल्पे.,किल्ल्यावरून दिसणारे माणिकडोह धरण व आजूबाजूचा प्रदेश, वऱ्हाडी डोंगर, हडसर किल्ला. 
किल्ला चढून पूर्ण फिरायला ४-५ तास पुरतात. 


आम्ही दोनच टाळकी ट्रेक ला असल्याने काही ठरवावे लागले नाही. शनिवारी मी पुण्याहून सकाळच्या निवांत गाडीने साडे दहाला जुन्नर पोहोचलो. आणि मित्र कल्याणवरून साडे आठ च्या गाडीने जुन्नरला आला. तिथून लगेच अंजानावळ गाडी पकडून उतरलो चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी.




पायथ्या पासून किल्ला फारच साधा वाटत होता. कॅमेरे बाहेर काढले, सामान तिथल्या एका घरात ठेवले आणी पायपीट चालू झाली.
रस्ता फारच सोपा असल्याने चुकणे झाले नाही. जाताना एक ग्रुप भेटला तो नुकताच वर जाऊन आला होता. त्यांच्याकडून टिप्स घेऊन आम्ही पुढे निघालो.
पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.

जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. 

सुमारे अर्धा-पाऊण तासात आपण या रेलिंग पर्यंत येतो. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.

एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही.


उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांना आधार म्हणून मध्येच ही तोफ रोवलेली आहे.
दूरवर पसरलेला माणिकडोह धरणामुळे आजूबाजूचा परिसर अजूनही हिरवा होता. तसेच भर उन्हात हलकी थंडीही वाजत होती.

अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागल्या. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात.
पहिले प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो.

प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे. ह्या किल्ल्याच्या सर्वच द्वारांवर कोरलेले गणपती  अजूनही तसेच सुबक आहेत. हे काम पेशव्यांचे असावे असे वाटते. 


इथे मस्त जागा पाहून जरा वेळ निवांत बसलो. मग येथेच समान ठेवून फक्त कॅमेरे घेतले आणी पुढे निघालो.
थोडे पुढे येताच घोड्यांसाठी पाण्याची सोय दिसली. याचा अर्थ एखादे तरी पाण्याचे तळे जवळपास असणार असा अंदाज लावताच समोर पुष्करणी तलाव नजरेस पडला. 
येथून गडाला प्रदक्षिणा मारत आम्ही निघालो. तलावाच्या मागून बाजूने जाताना अजून दोन मोठी टाकी दिसली. या किल्ल्यावर तब्बल २१ पाण्याची टाकी असल्याने पाण्याचा नो प्रॉब्लेम.
आता इथूनच वरती दिसणाऱ्या छोट्याश्या टेकडीवर आम्ही निघालो. याच टेकडीवर चावंडादेवीचे मंदिर आहे. 
सुमारे पंधरा मिनिटात आम्ही वरती पोहोचलो.

देवीचे दर्शन घेऊन जरा वेळ टेकलो. मस्त सावली पडली होती आणि गार वारा वाहत होता. मंदिरासमोरील दगडावर हे महाशय निवांत पडले होते. 
गडाच्या सर्वोच्च असलेल्या चावंडा देवीच्या मंदिरापासून समोरच हडसर किल्ला दिसत होता. किल्ल्यावरच खाली बघितले तर सप्ततलाव दृष्टीस पडले.

याबाजुला हे बिचारे झाड एकटेच उभे होते. वन ट्री पॉइंट म्हणूनही हा खपला असता.

 आजूबाजूला बघितले तर भटोबा, नवरा-नवरी सुळक्यांची रांग दिसत होती.
ऊन सावलीचा खेळ चालूच होता. 

आता इथून उतरून खाली आलो. थोडेसे पुढे जाऊन लगेचच महादेव मंदिर लागले. याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते. हे मंदिर हि खूप जुने असले पाहिजे. जुन्या काळचे कोरीवकाम आणि दगडांची रचना केवळ अद्भुत.

 हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मंदिरे ही एकाच 'शिलाहार' राजघराण्याच्या झांजराजाच्या कारकीर्दीत बांधली गेली असल्याने त्यांची सप्त-देवतांची रचना सारखी असावी. खाली फोटोत असल्याप्रमाणेच सप्तदेवता असलेले दगडात आत खोदून केलेली छोटी मंदिरे जुन्नर मधील बऱ्याच किल्ल्यावर आढळतात.

साधारण इस. ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे  मंदिर बांधले असावे. महादेव मंदिरात ही एकाच दगडात कोरून तयार केलेली पिंड दिसते. 

मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.

मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. ते पाहून मनात प्रश्न पडतो की त्या वेळचे कारागीर सुद्धा किती लॉयल, प्रामाणिक असतील राजाशी. एवढ्या उंचावर चढत येऊन असे काही कोरीवकाम करायचे यावरून त्यांची राजावर किती निष्ठा असावी हे कळते. 

आणखी खोलात जाऊन त्या नक्षीकामाची महानता लक्षात येते. एवढे डिटेल काम करायला किती वेळ लागत असेल? पण "आपल्या राजाचे काम करायचेय" अश्या भावनेनेच अशी कामे होत असावीत. केवळ अद्भुत !

येथे जोडूनच जवळपास १० तळी आहेत. बहुतांश तळ्यात पाणी शेवाळामुळे हिरवट झाले आहे. ( दामले मास्तरांची आठवण झाली. :) ) 

येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की सप्ततलाव दिसतात. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत. एकाला एक जोडून असे सात तलाव असून पहिल्याच्या सुरवातीस प्रवेशद्वार आहे. त्यावरही मस्त असा गणपती कोरलेला आहे.
थोडे वरून पाहिल्यास केवळ २ टाकी आहेत असे वाटते. 
पडक्या कोठाराच्या अवशेष पाहून थोडे पुढे गेल्यास हे एकाला एक जोडलेले सप्ततलाव दिसतात. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
सप्ततलाव: 

या सप्त-तलावाच्या सुरवातीला पहिल्या तलावास प्रवेशद्वार खोदलेले असून त्यावरही एकदम सुबक असा गणपती कोरला आहे. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवले की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे. 



'स्वतःच प्रतिबिंबात माणूस एवढा का रमतो हे काही अजून उलगडले नाहीये. 
 

दीड वाजता चढायला सुरुवात करूनही ५ वाजेपर्यंत संपूर्ण किल्ला पाहून झाला. मग किल्ला उतरून कुकडेश्वर मंदिराकडे प्रयाण केले. रस्त्यात ST वा जीप मिळावी म्हणजे पायपीट वाचेल असा विचार आला तेवढ्यात 'जगातील दहावे आश्चर्य' अवतरले. पण आमचा हा खास मित्र नेमकी उलट्या दिशेने चालला होता. त्याने हॉर्न वाजवूनच आम्हाला पुढच्या ट्रेक ला शुभेच्छा दिल्या. 

मग अजून कोणाची वाट न बघता सरळ कूकडेश्वर मंदिराचा रस्ता धरला आणि चालत सुटलो. 

बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी : 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर  सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

अजून काही : 
१. चावंड आणि हडसर किल्ला पण एका दिवसात होतो. चावंड गावातून बोटीने माणिकडोह धरणातून पलीकडे जाता येते.
२. हडसर किल्ल्याच्या बाजूस, राजूर पासून थोड्या अंतरावर वाघ्र प्रकल्प आहे. माणिकडोह परिसरात सापडलेले वाघ, बिबटे पकडून येथे ठेवले जातात. सध्या तेथे तब्बल २८ वाघ आहेत.
३. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबा ला हि जाऊ शकतो.
४. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
 जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह  वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर 

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड 

४ टिप्पण्या:

Sushant Rocks!!! म्हणाले...

Chaan lekh Sagar.! :)

विचारमंथन म्हणाले...

तुमची photography फारच छान आहे, अर्थात तुम्ही लिहिताही छान. तुमची ही भटकंती अशीच चालू राहो, आम्हा वाचकांना चांगली परिक्षण वाचण्यास मिळो हीच आशा. या लेखामुळे मलाही जुन्नर ला भेट द्यावीशी वाटतेय. अशावेळी, ST चे वेळापत्रक फारच उपयोगी पडेल.अशीच मुसाफिरी करता करता आमच्या औरंगाबादला या , दौलताबाद च्या किल्ल्याचे परिक्षण वाचकांना उपलब्ध करून द्या.

if you are interested then please visite by blog saurabhsuradkar.blogspot.in/?m=0

विचारमंथन म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
sagarshivade07 म्हणाले...

सौरभ धन्यवाद.
आपण आवर्जून कमेंट करून दाद दिलीत याबद्दल आभार.
औरंगाबाद ला यायचे बरेच दिवस मनात आहे बघु कधी मुहूर्त लागतोय.
आपल्या ब्लॉगची सुरवात चांगली आहे. लिहित रहा :)