वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली

  

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली 




ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस गणपती बाप्पा पेण वरून घरी आले तेव्हापासून महिनाभर भटकंतीला विराम मिळाला होता. जसे बाप्पा कैलासी परतले तसे मग आमच्या पण दिंड्या सह्याद्रीकडे परतायला सुरुवात झाली. पाऊस पण अजून मस्त लागून राहिलाय तर मग एका छोटेखानी पिकनिक ट्रेकला जायचे ठरले. सकाळी सहाला मंडळी ताम्हिणी घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पौड सोडताच ढगांच्या दुलईत अलगद पहुडलेल्या डोंगररांगा स्वागतास सज्ज जाहल्या. प्लस व्हॅली मध्ये उतरून मजा करून पुढे सावळ घाटाने अर्ध्यात उतरून ताम्हिणी परिसराचा निसर्ग न्याहाळणे एवढाच आजचा बेत असल्याने मंडळी निवांत होती. 


   


सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते. 





 "य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली. 


घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत  वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती.  सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.  



आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.  


असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला. 
वाचत राहा. 













शुक्रवार, १४ जून, २०१३

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. 
त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार. आपणच त्याला मवाली ठरवून मोकळे होतो.

आता जरा या या दोन व्यक्तिरेखांची अदलाबदल करूयात. 
मी पहिल्या भेटीपासून कोणालातरी मवाली वाटतोय याची मी कधीच कल्पना केली नसेल. नावाप्रमाणेच तसा मी एकदम सुज्ञ. सरळमार्गी आणि सरळतोंडी. सरळ तोंडी हे अशासाठी की जे तोंडात येईल ते सरळ सरळ बोलून मोकळे होतो. त्याला मी मवाली कशामुळे वाटलो हे त्यालाही आज सांगणे अवघड आहे.

बारावीत पहिल्यांदा सौरभला भेटलो. गोरा गोमटा, थोडासा लाजाळू.
कशी ओळख झाली आठवत नाही, पण आठवतो "तो" दिवस.
नुकतेच कॉलेज सुरू झालेले, काही काम ना  धाम, बोंबलत हिंडत होतो आम्ही सगळे. त्या दिवशी त्याची बहीण त्याला घ्यायला आली होती. तिने त्याला माझ्याबरोबर पहिले आणि घरी जाऊन त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
"अश्या मवाली मुलांबरोबर अज्जिबात राहायचे नाही हा सौरभ !"

का कसे ठाऊक नाही, त्यानंतरही आमची मैत्री टिकली.पण, माझ्याविषयीचे हे जहाल मत अजून जहाल व्हायला अजून दोन तीन प्रसंग घडले.

मिड टर्म परीक्षा होऊन पुढची टर्म चालू झाली होती. रिझल्ट केव्हाही लागू शकतो असे दिवस. साडेचार-पाच ची वेळ. आज सौरभ काही कॉलेज ला आला नव्हता. एकाने नवीन मोबाईल घेतल्याने त्यावर किडे करण्याचे पहिले प्रात्यक्षिक म्हणून मी सौरभ ला फोन केला.
"रिझल्ट लागला आहे आणि बेक्कार रिझल्ट आहे. पुढच्या दहा मिनिटात कॉलेजला ये" असे म्हणून मी फोन ठेवला. त्याचा दुसऱ्या कोणालातरी फोन होईल मग त्याला खरे सांगू म्हणून आम्हीही निवांत.
पुढच्या आठ मिनिटात सौरभ कॉलेजात उभा!,
हॉल तिकीट सापडले नाही म्हणून तो आख्खी फाइल घेऊन आला होता. गाडी नव्हती म्हणून त्याने पुढच्या मिनिटाला बहिणीला फोन लावला. बहीण बँकेत कामाला होती. तिने तातडीची रजा (हाफ-डे) घेऊन बँकेतून निघून सौरभ ला घरून घेऊन कॉलेज मध्ये सोडले.
तो खरंच खूप टेन्शन मध्ये आला होता. आणि आम्ही दात काढत निवांत पडलो होतो.

रिझल्ट नाही ना लागला?
नाही!
मग ............................................. !!!!!!!

पुढच्या संभाषणात काहीही अर्थ नव्हता.

"माझे सोड रे…  माझी बहीण गेट बाहेर थाबलीये, आणि हाफ-डे घेऊन आलीये ती."

त्याचा (भयानक) चेहरा भयानक असा पडला होता. चेहऱ्यावर नामुष्की आणि डोक्यात आता बहिणीला काय कारण सांगायचे असा विचार करतच तो बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने "रिझल्ट देणे बंद केले आज" असे सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे साहेब रिझल्ट न घेता  घरी गेले तेव्हा खरे काय ते कळले.

एक दिवशी हे साह्येब एका मुलीकडून पुस्तक घेण्यासाठी थांबले असताना मी हि त्याच्याबरोबर थांबलो होतो. जसे ती पुस्तक घेऊन आली तसे मी तेथून निघायला लागलो. आणि तेही गुपचुप नाही तर आरडा ओरडा करत.
"येड्या, मजा आहे बाबा एका मुलाची, मी निघतो बाबा, उगाच कबाब मी हड्डी नको"
असे अनेक टुकार डायलॉग मारून त्याला इतका भंडावून सोडला की नंतर तो तिच्याशी काय बोलला हे त्याला स्वतःला हि आठवत नाही.

नंतर, जसे येणेजाणे वाढले तसे दृष्टिकोनही बदलला.पण त्याच्या दृष्टीतला मवालीपणा मी तसाच बाळगून होतो.
असेच एकदा LAB मध्ये प्रयोग करताना त्याला ओळखणारी एक मुलगी त्याला "तू 'लय' घाई करतो रे" असे म्हणाली तेव्हा मी फुटून फुटून हसलो होतो दोघांच्या समोर. त्यावेळची त्याची "ऑकवर्ड सिच्युएशन" मला आजही लक्षात आहे.

पोस्ट ग्र्याज्युएशनला प्रवेश घेतला तेव्हा फॉर्म भरताना या साहेबांनी " Principle Signature" च्या जागीच सही ठोकून दिली होती. त्यानंतर जेव्हा प्रिन्सिपल सही ठोकायला गेला तेव्हा तेथे आधीच याची सही पाहून तो वेडाच झाला. आणि याला "… आणि तुला MCA करायचाय हम्म" अश्या शब्दांनीच ठोकला होता. ते "आणि" तो ज्या फ्रस्टेशनने बोलला त्या सगळ्याचा साक्षीदार मी,… तेथेही (प्रिन्सिपल ऑफिस मध्ये) पडून पडून हसलो होतो असे आठवतेय.

छोटा ट्रेक म्हणून ह्याला एकदा डायरेक्ट हरिश्चंद्राला नेले होते. त्याचा पहिलाच ट्रेक होता तो. जर तेथे 'कोकणकडा' नामक अद्भुत निसर्गरूप नसते तर तो त्याचा शेवटचा ट्रेक आणि आमच्या मैत्रीचा शेवटचा दिवसही  ठरला असता.

मध्ये बरेच दिवस गेले, तो 'मवालीपणा' पण कुठे अदृश्य झाला कुणास ठाऊक !

आता नोकरीला लागल्यापासून सगळ्या गोष्टी सभ्यतेत केल्या जातात. याच सभ्यते पोटी महिना महिना बोलणे होत नाही. कधी तरी चाटिंग करताना स्मायली पाठवूनच काय ते हसणे होते.
चष्मा लावलेल्या स्मायली पाठवणेच अधिक सोयीचे. त्याने डोळ्यातल्या या जुन्या आठवणी डोळ्यातून ओसंडून वाहत असल्या तरी दिसत नाहीत चष्म्यामुळे.

आजही मी मात्र त्याच्याबरोबर तसेच राहणे पसंत करतो. "मवाली" "मित्राप्रमाणे" .
जेणेकरून तेच जुने दिवस परत आठवतात आणि मनाला ओलावा देऊन जातात.

शुक्रवार, ७ जून, २०१३

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी


टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

या लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत. 

येथे आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!)  हेतूने लिहायचा प्रयत्न आहे.

असो, तर घडले असे की, बऱ्याचं दिवसात 'चांगला' सिनेमा पहिला नाही असा सगळ्यांचा सूर निघाला. मग लोकांची मते घेऊन कुठल्यातरी सिनेमाला जाऊ असे ठरले. 
मग कुठून माहीत नाही पण 'एक' नाव कळले. हा सिनेमा म्हणे तुफान चालला होता. थेटरच्या बाहेरून 'तुफान चाललाय' असे काही वाटले नाही.  पण वाटले की आत पहिल्यांदा पिच्चर मधली माणसे एकमेकांना बेफाम बदडून काढत असावीत आणि नंतर तिकीट काढून अश्या टुकार पिच्चरला तुझ्यामुळे  आलो म्हणून प्रेक्षक एकमेकांना बदडून काढत असावीत.
मी स्वतःच्या जबाबदारी वर आत गेलो आणि मित्राकडून बदडून घ्यायचाच बाकी राहिलो.

पिच्चर तर ठरला पण आता जायचे कुठल्या थेटरात? एक म्हणाला कोथरूड सिटीप्राईड ला जाऊ.  पण म्हटले 'मीशिभोबो' बघण्यासाठी फारतर २० किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे  ३० रुपडे ठीक आहेत. दीडशे रुपडे घालवायच्या लायकीचा पिच्चर तरी असतो का त्या 'मांजरीचा' ?

मग त्या दिवशी आमची उभ्या वीस वर्षात न झालेली 'प्रभात' वारी घडली. 

एक मित्र पहिल्यापासूनच नाखूष होता. "कुठेही आणता मला तुम्ही" असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आख्खे ३० रुपडे मोजून तो पहिल्यांदाच अश्या मराठी पिच्चर ला आला होता. 

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने  घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते. ( या सगळ्यामागचा दाखवायचा, समजवायचा आणि खरा मूळ मुद्दा वेगळाच होता. )

त्यातला 'दाखवायचा' जो हेतू होता त्याने चित्रपट गृहातील माणसे चार्ज झाली होती. सगळ्यांना स्वभाषा, स्वधर्म अशी गोष्टीचा ताप आला होता. मिनटा मिनिटाला मराठीच्या महानतेचा घाम फुटत होता. पण त्यातून 'समजण्याचा' व बोध घेण्याचा मुद्दा लक्षात घेण्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते. 

तो टकला तेथे पेटला होता तर, माझ्या शेजारी माझा हा मित्र पण पेटला होता, पण दुसऱ्या मुद्द्यावर. तो मिनटा मिनटाला फ्रस्टेट होत होता. वास्तविक हा आमचा मित्र उत्तम कविता करतो, उत्तम वाद्ये वाजवतो, स्टेज शो हि करतो.जाहिरातींना आवाज देतो. आणि हे सगळे मराठीतच. त्यामुळे त्याचे मराठीवरचे प्रभुत्व वादातीत आहे. पण त्याला जो काही समोर भाषेचा बाजार मांडला होता तो बघवत नव्हता. बराच वेळ तो आमच्यातच कमेंट देत होता.

शेवटी एका प्रसंगात, सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
हा मध्येच उठून उभा राहिला आणि आम्हाला जोरजोरात ओरडायला लागला. 
ती तिथे पेटली होती आणि हा इथे. 
" कसल्या भंगार पिच्चर ला आणता रे मला तुम्ही?? आत्ताच्या आता माझे तीस रुपये परत द्या. फुकट तीस रुपये घालवले माझे वाया. त्यापेक्षा मी ते भिकाऱ्याला दिले असते. "Big smile

आम्ही  ओढून त्याला खाली बसवला. त्याला म्हटले "शांत बस बाबा, लोकांना इथे मराठीचे स्फुरण चढलेय, हाणतील तुला इथेच!"

तो नाईलाजाने बसला. 
नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्यॅक करते म्हणे. Big smile Laughing out loud
आता मला खरी मजा यायला लागली. माझा हाच मित्र 'एथिकल ह्यॅकींग' शिकला असल्याने तो हे पाहून संपलाच. तो ताडकन उभा राहिला. 

"च्यायला बापाची वेबसाइट आहे का घरबसल्या ह्याक करायला? काहीही दाखवतात का हे साले? अरे वेबसाइट ह्याक करायला इंटरनेट लागते का नाही हे तरी माहीत आहे का ह्यांना? सिम्पली रीडीक्युलस "
त्यानंतर तो पाच सहा टेक्निकल शब्द टाकून 'ह्याने हे होते का?" त्याला हे लागते का?" लोक बघतात म्हणून काहीही दाखवतात का हे लोक?" असे किंचाळू लागला. ते टेक्निकल शब्द ऐकून त्याच्या शेजारच्या माणसाने हातातल्या पुरचुंडी मधले सगळे पोपकोर्न  पोटात ढकलले. (स्वतःच्या !)

तो थेटराबाहेर निघून गेला. आम्ही पिच्चर संपवून बाहेर गेलो तर गाडीवर बसला होता.
"तुम्ही सगळे मिळून माझे तीस रुपये परत द्या, नाहीतर जाऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आमच्या गाड्याच पकडून ठेवल्या होत्या.

हा पिच्चर "टकल्याची अ‍ॅक्शन-पब्लिकला घाम" म्हणूनही खपला नसता हो !
यातला 'पब्लिकला घाम' हे ठीक (कारण तो आलाच होता)  पण तो टकला 'अ‍ॅक्शन' पण नव्हता करत हो (स्माईल)
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून) (घोड्या)समोरच हंटर घेऊन बसला होता.  (स्माईल)


तो मी बघितलेला शेवटचा मराठी पिच्चर असावा .परत कधी ह्या मित्राच्या शिव्या ऐकायची हुक्की आली की त्याच पिच्चरच्या दिग्दर्शक म्हणविणाऱ्या माणसाचे इतर पिच्चर पाहायची ऑफर आम्ही त्याला देतो. आणि मग भगीरथाने गंगा आणावी तसे हजारो ऐकिवात नसलेले मराठीतील अवजड असे (अप)शब्द वायू वेगाने एका नंतर लगेच एक असे ऐकायला मिळतात. 
खरंच,  मराठी भाषा ही शब्दसंपन्न भाषा आहे. हे तेव्हा आम्हाला स्मरते. Big smile

(तळ)टीप :
१. चांगला' सिनेमा : हि व्याख्या व्यक्तीसापेक्ष होऊ शकते.
२. लेखन (वाचणाऱ्याला वाटले नाही तरी(ही)) विनोदी प्रकारातील आहे. येथे कोणत्याही चर्चा, अपमान व अभिमान अपेक्षित नाही.
३. टीप वरती का नाही लिहिली हे विचारू नये. उत्तर मिळणार नाही. ( कारण, याचे उत्तर लेखकाकडे(ही) नाही)

सोमवार, २७ मे, २०१३

'त्या' बारा दिवसांमधली 'ती' !

 'त्या' बारा दिवसांमधली 'ती' ! 

आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. आयुष्यभर आपल्या मुलींच्या सहवासात राहिलेली ती, शेवटचा श्वासही मुलीच्या मांडीवर डोके ठेवूनच घेत होती. आज तिच्यासोबत सगळे होते. नित्यनेमाचे उद्योग धंदे सोडून प्रत्येकजण फक्त आणि फक्त तिच्यासाठीच आला होता, हॉस्पिटल मध्ये. हजारदा आमंत्रणे पाठवून विनवण्या करूनही असे सगळे कोणासाठी एकत्र जमले नसते.

रात्र जागून काढली तिने हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातनांनी.हार्ट अट्याक असेल असे तिलाही जाणवले नसावे. "थोडे दुखते आहे छातीत, कशाला ह्यांना उठवा झोपेतून." शेवटपर्यंत काही तिने दुसऱ्याचा विचार करणे सोडले नाही.
"तुम्ही लवकर घेऊन यायला पाहिजे होते ह्यांना"  हे वाक्य डॉक्टर बोलले ते ऐकायला ती होतीच कुठे? तिला ऐकू तरी काय येत असावे? आणि ऐकताना त्याचा किती बोध होत असावा?
बारा दिवस ती ICU मध्ये होती. आयुष्यातले हेच ते बारा दिवस, जेव्हा तिला सगळे न मागता हातात मिळत होते. यापूर्वी स्वतःसाठी म्हणून ती होतीच कुठे? चार मुलींची लग्ने लावून दिली तिने. त्याच्यातच झिजून गेली होती ती. आज त्याच चार मुली रात्रंदिवस तिच्या जवळच बसून होत्या.

कसे वाटत असावे सर्वांदेखत असे खोल खोल जाताना? काय वाटत असावे हळू हळू प्रत्येक अवयवाला कार्यमुक्त करताना? काय होत असावे मनात स्वतःचे मन सोडून जाताना?
आता, बाकीच्यासाठी ति तीच असावी , पण तिच्यासाठी सगळे जग  रात्रीत बदलले नव्हते काय?

आज तिला आपण किती दिवस येथे आहोत हे माहितीही नसेल.सकाळी चहा प्यायचा असतो आणि तो आपण वर्षानुवर्षे पीत आलोत हे हि माहीत नसेल कदाचित. पण "विजूला मात्र दुधाचाच चहा लागतो" हे कसे माहीत असावे? मी दिसलो की औषधाच्या हजार बाटल्यामागे ठेवलेले दही मला द्यावे हे तिला कोण सुचवत असेल?

बारा दिवस एवढी माणसे भोवती हजर असून आतून एकटीच असावी का ती? काय विचार करत असावी वा काही आठवत असावे तिला.
भोर मधील माहेर आणि  घरासमोर बसून सागरगोटे खेळायचा तो कट्टा?
पुण्याहून सायकलवरून भोरला येणारा तिचा चाहता आणि मैत्रिणीच्या घरी त्याची राहायची व्यवस्था करून दिलेले ते दोन दिवस?
ज्याकाळी प्रेम हा शब्द उघड उच्चारला जात नव्हता अश्या काळातील तिचा तो प्रेमविवाह?
लहान वयात लग्न होऊन दक्षिण भारतात गेल्यावर  फक्त भात खाऊन काढलेले ते सहा दिवस?
पानशेतच्या पुरात उभारता संसार वाहून गेल्यावर झालेली जीवाची तळमळ?
मुलांचा जन्म ते त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास ?
नातीच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीचा तिच्या चेहऱ्यावरचा तणाव?
नातीच्या लग्नानंतर परत तिच्या सासरी आणि स्वतःच्या माहेरी भोर ला गेल्यावर जिवंत झालेले तिचे ते बालपण?
पणजी होऊन नातीच्या मुलीला तोंडभरून पापा देताना तिचे केलेले कोडकौतुक आणि तिच्या वाढदिवसाला दिलेला दोन पायांचा लाकडी घोडा?
लग्नानंतर सलग अठ्ठावीस वर्षे औसरीच्या देवीचे केलेले नवरात्र आणि गावजेवण देऊन लोकांचे तृप्त चेहरे?
का, भर दुपारी अनवाणी पायांनी जाताना भाजणारे पायाचे तळवे ?
का, गेले बारा दिवस वेगवेगळ्या नळ्या आणि मास्क लावून काळी पडलेली तिची नितळ अशी त्वचा?
का, कालची भयानक कळा देऊन गेलेली रात्र?

कशालाच उत्तर नव्हते, कोणाकडेच !

आज मात्र गेली त्रेशष्ठ वर्षे चाललेली तिची तपश्चर्या थांबली .पोटच्या गोळ्याच्या मांडीवर शांतपणे डोके ठेवून.  खरंच, आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल.

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

निमित्त फक्त एका भेटीचे

 निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे  बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.  अश्या साध्या आणि अतिशय निरव अश्या स्थितीतून वेळ काय वेड पांघरते हे त्या विधात्यालाच ठाऊक. नजरेला नजर भिडते अन कुठल्या जन्मांची आणि नात्यांची क्षणात लय जुळते. काहीबाही भूतकाळातील प्रसंग आठवतात.काही थोड्या शब्दांची देवघेव होते. कुठेतरी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल्या आठवणी क्षणात दाटतात.  बऱ्याचं वेळ सांभाळलेला संयम सुटून मन आनंदाच्या उचंबळ्या खाऊ लागते. आता शब्द असतात ते फक्त भार वाहायला निरोपाचा, खरी देवाण घेवाण हि हृदयाशीच चालू होते. आणि मग काही क्षणात शब्दांची देवाण घेवाण थांबते आणि संवाद सुरू होतो फक्त डोळ्यातील डबडबलेल्या आठवणीने, अनुभवाने, कृतज्ञतेने.

विजू अशीच बस ची वाट बघत उभी होती घरी येण्यासाठी. साधारणता रात्री आठ, सव्वा आठ ची वेळ असावी. दिवसभर राबून तिने पुरणपोळ्या बनविल्या होत्या. आज वडिलांसाठी पुरणपोळ्या बनवून घेऊन गेली होती बऱ्याचं दिवसांनी, तशी तिची दर शनिवार, रविवार एखादी तरी चक्कर असतेच, पण आज वडिलांच्या आवडत्या पुरणपोळ्या वयाच्या शह्यन्शिव्या वर्षी खाताना बघून तिला वेगळेच समाधान लाभणार होते. आज त्यांचा वाढदिवस हे निमित्त तर होतेच पण आज ती जरा जास्तच आनंदात होती. त्या आनंदात तिला  आपला पाय दुखत असून आपण बस थांब्यापर्यंत चालत आलो हेही जाणवले नसेल. आनंदात माणूस वेदना विसरतो हेच खरे.

खरेतर तिला एकेरी विजू म्हणावे असे तिचे वय नव्हे. पण अशी लोक इतक्या सहजतेने सर्वांना सामावून घेतात की नजरेनेच मनातले भाव कळले तर नावाची गरजच लागत नाही. खरेच ती नावाप्रमाणेच एकापेक्षा एक अश्या सुयोग्य रत्नांची गुंफलेली मालाच. म्हणून रत्नमाला.

विजूची घरी लवकर जायची घाई पाहून का काय माहीत, बसने वेळेत जायचे नाही असा चंगच बांधला. 
मग इकडे तिकडे बघत तिचे काही क्षण गेले. समोरच एक बाई उभ्या दिसल्या. तिच्यापेक्षा जास्तच वयाच्या, साधारणता सत्तर बाहत्तर या वयातील. त्यांनाही घरी जायची लगबग. त्यापण सैरभैर. विजूने त्यांच्याकडे बघताच ती कित्येक वर्ष मागे भूतकाळात हरवून गेली. मेंदूच्या आणि मनाच्या कप्प्यात कित्येक वर्षे जपून ठेवलेल्या त्या नावाने क्षणार्धात मेंदू ते तोंडापर्यंतचा प्रवास केला. श्वास फुलला गेला.

ती कितीतरी वर्षे भूतकाळात वाहत गेली आणि तिचा शाळा सोडतानाचा प्रसंग चटकन तिच्या समोर जिवंत झाला. साधारणता तीस ते पस्तीस वर्षापूर्वीच्या आठवणींच्या दवबिंदूंनी तिच्या मनाचे पर्णपत्र भिजून निघाले.
खरेच, दवबिंदूच ते, कुठून कसे आले कोणास ठाऊक नाही आठवणींसारखे . सुखात वाऱ्याशी मैत्री करत झुलत राहतात आठवणींसारखे, दुसऱ्याचा भावनारूपी प्रकाश घेऊन तोच परावर्तित करत राहतात. उन्हाच्या तप्ततेची चाहूल लागताच विरून जातात का-कु न करता, कोणताही आक्रोश न करता , कधी मातीत तर कधी हवेत.

शाळेचा शेवटचा दिवस हा असा तिच्या पुढ्यात उभा राहिला. आता परत आपण या शाळेत येणार नाही, परत कधीही आपल्या आवडत्या बाई आम्हाला भेटणार नाहीत म्हणून सगळ्या मुलींचे डोळे पाणावलेले. विजूची नजर मात्र "मराठे बाई'ना शोधत भिरभिरत होती. फक्त शिक्षक- विद्यार्थी असे त्यांचे नाते नव्हते. त्याच्याही पलीकडले जपलेले आणि शब्दात न व्यतीत करण्याजोगे असे होते. काहीही घडले तरी विजू मराठे बाईंकडे धाव घेई. आणि त्याही मुलीप्रमाणे तिला जपून घेत.
नेमका त्याच दिवशी योगायोगाने बहुदा, विजूचा वाढदिवस पण होता. त्याच दिवशी मराठे बाईंनी विजूला वाढदिवसाबरोबरच पुढच्या आयुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या. नुसत्या कोरड्या शुभेच्छा न देत त्यांनी तिला एक शुभेच्छापत्रकच दिले होते. त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात.  तेव्हा,
त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
त्या दिव्याचा प्रकाश हाच खरा मान, 
आणि त्याच्याशीच प्रामाणिक राहून आपल्या जीवनमार्ग निश्चलपणे आक्रम,
म्हणजे पाऊल कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर त्याचा मार्ग कायम योग्यच असेल."

विजुसाठी या केवळ काव्यपंक्ती नव्हत्या. तिच्यासाठी ते सूत्र होते जगण्याचे. त्या चार ओळी तिने त्या दिवसानंतर लक्ष वेळा वाचल्या असतील. आतातर तिला त्या पाठही झाल्या होत्या.

शाळा सोडून पुढचे शिक्षण चालू झाले. अर्थात ते हि मराठेबाईंच्या सल्ल्यानेच.नंतर कधीतरी पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबते की काय अशी परिस्थितीत मराठे बाईंनी दिलेला मदतीचा हात. जो ती कधीच विसरू शकणार नव्हती. तिच्या शैक्षणिक कारकीर्दीत 'मराठे बाई' या दोन शब्दांनी कितीतरी आमूलाग्र बदल आणला होता.

लग्न होऊन संसार चालू झाला. आर्थिक परिस्थिती तशी काही जास्त खास नव्हती. मध्ये बरीच वर्षे गेली. संसाराच्या रहाटगाड्याला एकदा जुंपून घेतले की स्वतः साठी जगणे काही प्रमाणात राहूनच जाते. नवी स्वप्ने, नवे जगण्याचे मानदंड.

आता बरीच वर्षे उलटली होती. या कोणत्या गोष्टींचा मागमूसही राहिला नव्हता.परत कोण कोणाला आयुष्यात परत भेटेल अश्या अपेक्षाही मनात नव्हत्या.

काही क्षण गतकाळातील रम्य आठवणींमधून सैर करत, तिचे मन एकदम भानावर आले.

"मराठे बाई"
दोनच शब्द तिच्या मुखातून उत्कटपणे बाहेर पडले. त्या बाईंचे क्षणात लक्ष वेधले गेले अन त्याच वेळेस त्यांच्या डोक्यातील एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली शोधण्यात गुंतले.

"कोण गं तू ?" डोळ्यावरील जड काचेचा चष्मा सरसावत त्यांनी विचारले.
"मी … मी … " आता विजूचे शब्दही तिच्या मनातल्या भावनांसारखे जड झाले होते.
"मी रत्नमाला पुराणिक … तुमची विद्यार्थी होते. तुम्ही SNDT च्या शाळेत शिकवायचात न तेव्हापासून."
"अग हो गं हो। तुला कशी विसरेन मी. बऱ्याच वर्षांनी भेटीचा योग आला म्हणून थोडीशी विचारमग्न झाले."
"बाई, तुम्हीच मला घडवले, तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीमुळेच मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण करू शकले."
"असे काही नसते गं, आपण फक्त निमित्त असतो."
"बाकी बोल, कसे चालले आहे तुझे?"
"सगळे काही व्यवस्थित."
प्रत्येक शब्दागणिक त्या दोघी एकरूप व्हायला लागल्या. मग काही अपेक्षित प्रश्न आणि त्यांची अपेक्षित अशी उत्तरे. 

"आयुष्यातला खूप मोठा काळ खर्ची घालावा लागला, तुमची भेट होण्यासाठी."
"हे चालतच असते गं, ताज्या राहतात त्या आठवणी."
हे ऐकताच विजूच्या मनाचा बांध फुटला.
"बाई, तुम्हाला आठवते का तुम्ही मला शाळेच्या शेवटच्या दिवशी एक शुभेच्छा पत्रक दिले होते. त्याच दिवशी माझा वाढदिवस हि होता."
"हो, त्यात मी काही ओळीही लिहिल्या होत्या तुझ्यासाठी, त्या ओळी मात्र आता काही आठवत नाहीत गं."
"त्या ओळी आजही मला पाठ आहेत. "

या आनंददायी आठवणी जर वस्तुमानाचा आकार घेऊ शकल्या असत्या तर किती बरे झाले असते, असे विजूला वाटले. तसे असते तर तिने त्या असंख्य वेळा कवेत घेतल्या असत्या. त्यांना जर वास असता तर तो तिने मनसोक्त हुंगला असता.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात" 
विजूला कसलेही भान उरले नव्हते.खरेतर, तिला त्या ओळी आठवायची हि गरज नव्हती.पण तरीही त्या ओळी उच्चारणे तिच्यासाठी कष्टप्रद होऊ लागले होते. शब्द तोंडापर्यंत येऊन ठेपले होते पण बाहेर पडत नव्हते.

या एका ओळीतच मराठे बाईंना पुढील ओळी आठवल्या असाव्यात. अनपेक्षित पणे काही तरी घडावे आणि आपल्याला अतीव आनंद देऊन जावे अशी त्यांची स्थिती झाली असावी. तोच भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरूनही  सरसर सरला असावा. त्यांचा हात त्यांच्याही नकळत डोळ्यावरील जाड काचेच्या चष्म्यावर गेला. त्यांच्याही डोळ्यात आता पाणी तरारले होते.

त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
 आता दोघींच्या डोळ्यामधील निर्धाराचा पारा फुटला. त्यांची मूक स्पंदने दोघींमधील शांतता ताडीत  होती. 

त्या दिव्याचा प्रकाश  …… 
आता विजूला पुढे बोलावले नाही. तशी तिला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. दोघींच्या मनात उमटलेल्या एकाच आकृतीला त्यांना प्रत्यक्षात आणायची गरजच नव्हती. 

आज मात्र विजूला बस वेळेवर न आल्याचाही आनंद झाला असेल हे नक्की.

खरंच, निमित्त होते ते फक्त एका भेटीचे…
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : या लेखातील "विजू" हे पात्र म्हणजे खुद्द आमच्या मातोश्रीच .
सागर 
sagarshivade07@gmail.com
9975713494

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

लाल पेरु

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे. तुम्हाला ते जाणवणार नाही पण नुसते त्या दोन शब्दांच्या उच्चारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते. "मोठेपणी तू कोण होणार बाळा?" अश्या बाळबोध प्रश्नांना मी 'डॉक्टर, इंजिनिअर अशी टिपीकल उत्तरे न देत "पेरूवाला" होणार असे उत्तर देऊन सर्वांना चकित करायचो. ( आई वडिलांना लाज आणायचो असेही म्हणता येईल). पण खरंच, लहानपणापासून माझे स्वप्न होते ते पेरूवाला बनण्याचे. "किती मनसोक्त पेरू खायला मिळत असतील न या पेरूवाल्या काकांना? आणि त्यामुळेच हे एवढे चांगले असावेत का? पेरूवाल्या काकांचे गाव कोणते असावे?  नंतर भूगोल शिकल्यानंतर,  अमेरिकेमधील "पेरू" हा देश त्यांच्यामुळेच उदयास आले असावे का ?' असे असंख्य प्रश्न मला पडत असत.
२ रुपयांना मिळणारे पेरू हे जसे अमृताचा गोळा वाटायचे तसे, त्याचे ४ काप करून त्यात तिखट मीठ घालून हिरवागार पेरू देणारे काका हेच मला ईश्वराचे रूप भासायचे.

हिरवेगार तर कधी लाल पेरू खायची इच्छा झाली की मग आम्ही गावात घराच्या मागील पेरूच्या बागेत धूम ठोकायचो. मनसोक्त पेरू खाऊन  झाले की मग त्यातल्या बिया दाताने कडकड चावून कोणाचे दात जास्त चांगले याची स्पर्धा लागायची. गावातील जत्रेमध्ये व बाजारामध्ये पेरूवाले दिसले की प्रत्येकाला भाव विचारायचा आणि घ्यायचा मात्र  एखादाच. पण तो हि घ्यायला पराकोटीची हुज्जत, जिकीर.
एकदा एका झाडाला मोठा पाऊण किलोचा पेरू आल्याची बातमी कळली. ती म्हणजे आताच्या onsite पेक्षा मोठी बातमी होती. विकणाऱ्या व्यक्ती कडून त्याची इथम्भूत माहिती मिळवल्यावर तो आपल्याला परवडणार नाही असे वाटून झालेला हिरमोड, आई कडे त्याच्यासाठी धरलेला हट्ट, त्या काकांनी "आवडल्याय न पोराहो, मग जा की घेऊन " असे म्हणत फुकट देऊ केलेला तो मोठा पेरू, तत्क्षणी "You made my day" असे चेहऱ्यावर उमटलेले भाव, त्यानंतर तो घरी आणल्यानंतर लगेच खाऊन  संपायला नको म्हणून लपवून ठेवलेले ते दोन दिवस, आणि दोन दिवसांनी कापल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले आस्वाद. कधीही विसरू शकत नाही असे ते क्षण.

नंतर परत इथे शिक्षण चालू झाले की सगळे चोचले बंद व्हायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या पेरूवाल्या काकांकडे धाव घ्यायचो. पण खिशात पैसे नसल्याने अधाशी नजरेने ते बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पेरू कापताना त्याच्या देठाचा भाग जर जास्त कापला गेला की तो खाऊन त्या पेरूची चव "predict" करण्याचा प्रयत्न करायचो. यातच मग " कोणाचे दात जास्त चांगले?" या स्पर्धेचे "कोण लवकर झडप घालून देठाचे काप जास्त खातो" यामध्ये रूपांतर व्हायचे.

त्यानंतर बरेच वर्षे गेली. आयुष्य सावरण्याच्या गडबडीत हि माझी आवड कुठे लुप्त झाली कुणास ठाऊक? त्यानंतर परत माझा पेरू शी संबंध आला तो विमानतळावर. तेथील सामान तपासणी करणाऱ्या माणसाने " You can't take this with you" असे म्हणत माझ्या सामानातील पेरू बाहेर काढून चक्क फेकून दिले. आईने मला खूप आवडतात म्हणून आवर्जून आणून दिले होते. क्षणात माझ्या मस्तकात रागाची भावना उमटली. अनेक विनवण्या करूनही यश आले नाही. शेवटी माझ्या या जिवलगाशिवायच मी देश सोडून गेलो.

असाच एके दिवशी  मित्राची वाट बघत कार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती, अगदी फुटपाथ ला चिकटून. तेवढ्यात एक पेरू गाडीच्या डाव्या खिडकीतून आत गाडीत पडला."न्यूटन" ला सफरचंद पडल्यावर आणि त्यानंतर शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटींनी आनंद मला झाला. वाकून बघितले तर एक पेरू विकणारी मुलगी टोपलीत पेरू घेऊन फुटपाथवरून जात होती. अन जागा नसल्याने खेटून जाताना तो पेरू गाडीत पडला असावा.

 " साह्येब घ्या ना  एक पेरू,  छान हिरवेगार आहेत."
  " नाही नको "
" अहो साह्येब घ्या, लाल पेरू बी आहे. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा, थोडेच उरलेत ५-६, घ्या एखादा "

पटकन सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यातून झरझर सरला. मी काही रुपडे देऊन सगळे टोपलीतले पेरू खरेदी केले . लगेच खायला सुरवात केली. वेदनेने विव्हळ  झाल्यावर आठवले की बहुतेक दातांचे "रूट क्यानोल" झाले आहे. जेव्हा पेरूसाठी मी व्याकूळ व्हायचो अन दात चांगले होते , तेव्हा ते कधीच मिळाले नाहीत. आता टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे !!

अजूनही ते पेरू फ्रीज मध्येच आहेत. त्या लाल पेरूची चव मी अजूनही चाखली नाहीये.
कारण, आता स्पर्धा लागते ती दातांमध्ये, कोणी पहिला तुकडा तोडायचा याची.

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 


( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा  ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच  मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा  पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. 
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला  जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है  ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया  करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

रविवार, २० जानेवारी, २०१३

काचेचा लोलक

काचेचा लोलक


कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा ....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ...........
अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक. 
मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार ! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले. लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये. जवळ जवळ दर रविवार आपण दुर्गभ्रमंतीसाठी बाहेरच आहोत. मग म्हंटले चला  त्याचेच अनुभव शब्दांकित करूया. म्हणून बसलो ब्लॉग लिहायला.

असे का?

खरेतर मलाही नाही माहित असे का... हे म्हणून ते   की  ते म्हणून हे .....पण ..."If there is a cause, there is an effect".... असे बरेच "असे का" मला भेडसावत असतात .. मी जेव्हा जेव्हा नाव्ह्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही  न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे ?" असे का विचारतो ..आणि पुण्याचाच म्हंटल्यावर पुढचे काहीच न बोलता (स्वताच्या मनानीच) केस कापायला लागतो...( पु.ल. चे पुणेकर त्याने ऐकलेले  असावे बहुतेक...त्यात मी दुकानदार आहे हे हि त्यास ठाऊक असावे ....त्यामुळे पुणेरी बोली भाषे प्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करण्याची "कला " मला अवगत असावी असे त्यास वाटत असणार बहुतेक....)

परवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा ...."आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये ..आपल्यासाठी कोण काय करते ??? कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे ..." हे वाक्य बोलतानाच मी समोर पहिले कि एक मध्यमवयीन कामगार श्रेणीतला  माणूस आपली सायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून दुकानात  गेला..आणि एक बिस्कीट पुडा घेऊन आला. कामावरून घरी जाताना दमला असेल बहुतेक..लगेच  त्याच्याजवळ तीन चार कुत्री जमली आणि तो त्यांना ती बिस्किटे खाऊ घालू लागला....बऱ्याच  दिवसांची मैत्री असावी त्यांची बहुतेक..बिस्किटे संपल्यावर शांतपणे सायकल काढून तो गाणी म्हणत निघून गेला .."कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे" असे बोलेलेले वाक्य तोंडातच अडकून पडले ..हे मी कसे बोललो हे माझे मलाच आठवेना .... मी हे करू शकतो का ?? मी रस्त्यात थांबून त्या कुत्र्यांना खायचा घालेन का ? पैशाच्या मागे धावून आपण नक्की काय गमावतोय हाच प्रश्नाचा विचार करतो झोपले ...त्याचे उत्तर मला अजून कसे सापडले नाही... असे का ????

मध्यंतरी मोठ्या दुर्गा भ्रमंतीस  गेलो होतो .. नाशकातल्या बागलाण जिल्ह्यातले उत्तुंग असे मोठे किल्ले माझ्या एका मित्राबरोबर धुंडाळून  काढले...तिथे जाताना 'वाघाम्बे' नावाच्या गावात आम्ही मुक्काम ठोकला .. गावात राहण्याची सोय विचारताच  २-३ माणसे पुढे आली आणि त्यांनी एका मंदिराचा आश्रय दिला .. कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांनी आमची  राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था करून दिली..कोणाच्याही चेहऱ्यावर अपेक्षेचा लवलेश हि नव्हता .. गावात अजून माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला. आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट  पैशात तोलण्याचा स्वभावाचे बळी .. किती घेणार? हा प्रश्न आम्हास सुटेना... किल्ला चढून गेल्यावर दरवेळी प्रमाणे वाट चुकल्यानंतर ( इथे पु.ल.चा एक विनोद आठवला ...कि आमचे रिझर्वेशन खुद्द इंजिनात झाले असले तरी चुकून आम्ही पहिल्यांदी गार्डच्या डब्यातच शिरणार ..) आम्हास एक गुराखी भेटला ..पूर्णतः निर्मनुष्य अश्या डोंगर रांगा  मध्ये तो आम्हाला देवासारखा भेटला...त्याने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला आणि परत आंम्ही जाऊन येइपर्यत आमच्या सामानाची  राखण केली...आम्ही त्याला आमच्याबरोबर जेवायला बसवले ..बरेच प्रश्न विचारले तरी तो मोजकीच उत्तरे देत होता ..त्याला संकोच वाटत असावा असे वाटले म्हणून मी त्याला "अरे खा रे पोटभर" असे म्हणत गुळाची पोळी दिली...गुळाची पोळी तो प्रथमच खात होता असे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले.. थोड्या वेळाने तो बोलता झाल्यावर म्हणाला कि तो 'महाधर' नावाच्या गावात राहतो आणि शेळ्या घेऊन डोंगरावर येतो .पोटापाण्यासाठी रोजंदारी करायला तालुक्याच्या गावास जातो काधीकाही..पण जायचे पैसे नसले कि उपाशीच बसून राहतो..."सकाळी भाकरी खाऊन आलों होतो रानात आणि संध्याकाळी ५ वाजता घरी परत गेल्यावर खाईन आता" .... आणि पाण्याचे काय ???? "गावामध्येच पिण्यासाठी पाणी नाही आमच्या . इथे कसे घेऊन येऊ ???गावात साधे किरणा  दुकानही नाही तर रोजचा काय शिधा आणणार? आणि कामही काय करणार ? आकाश पांघरून बसतो आणि आणि एखाद्या ओढ्याने तहान भागवतो ... तुमचे बरे  असते कि तुम्हाला नोकरी असते"..हे  त्याचे वाक्य ऐकून  मी खरेच विचारात पडलो. रोजच्या टेन्शन मधून बाहेर पडायचे म्हणून असे फिरण्याचे उपाय अवलंबतो रे आम्ही...खरेच आमचे बरे आहे??? निसर्गाच्या सहवासाचा मागमूसही नाही रे आम्हाला??? चिवचिवणारी चिमणी मी कधी शेवटची बघितली बरे ??? आकाशात चंद्र आणि लुकलुकणारे तारे असतात याची आठवण होते आम्हाला घराच्या भिंतीवरचे रेडियम चे तारे बघून रे.... कपडे आणि बूट भिजतील म्हणून पावसाला किती वेळा डावलले आम्ही???  बहिणाबाई च्या कवितेची आजीची गोधडी अजून कशी ठीगळे  लावलेली ??? टायर खेळतानाची मजा आता फक्त कॅमेरात बंदिस्त करतो आम्ही ...
व्ह्यर्र्र्र्र्र्र्र्र्र ....... अरे हा कुठला आवाज ?????  तो शेळ्या च्या मागे धावत केव्हाच गेला होता .....आमच्या करून कहाण्या ऐकण्यात  त्यालाही रस नसवा बहुतेक...जाताना म्हणाला कि माझे तेवढे मोबाईल चे रिचार्जे करता का तालुक्याच्या गावाला  गेल्यावर ?? नाहीतर मला तेवढ्यासाठी जावे लागेल तिथे ..आम्ही त्याचा क्रमांक घेतला आणि जातो म्हणालो पुढे किल्ल्यावर ... उतरताना दुसरया  गावातून उतरीन म्हणतो किल्ला ... असे म्हणत खिशाकडे हात टाकला .... नको  म्हणत तो जाऊ लागला ..तरीही ६० रुपये देऊ केले आम्ही .. तालुक्याच्या गावास गेल्यावर त्याचे २० रूपयांचे रिचार्जे केले तोच त्याचा फोन आला..धन्यवाद म्हणून....किल्ला उतरताना आमच्या गावाहून.. आमच्या घरी या  ...हे त्याचे वाक्य मनात मात्र घर करून गेले .. ज्याला रोज या दोन वेळच्या जेवणा साठीची मारामार.. तरीही त्याचे मन मोठे होते ... नंतर मात्र भटकंती झाल्यावर जाताना प्रवास हिशोब करताना आम्ही  दोघांनी ते ६० रुपये अर्धे अर्धे खर्च म्हणून वाटून घेतले ....
असे का ????

कित्येक दिवस बाहेरचे खायला न मिळाल्यामुळे मोर्चा Macdi कडे वळवला ...शे पाचशे रुपडे असे उडले. येताना मात्र एक प्रसंग आठवला ..मुंबई ला गेलो असतानाचा.. आमचे खास मित्र आणि भ्रमंतीचे फोटोग्राफर कोतकर साहेब हे दिमतीला हजर होते. गेटवे ऑफ इंडिया ला जायचा प्लान करून आम्ही तिथे पोहोचलो .. खरेच हौशे आणी  गौशे दोघांसाठीची हे स्थान .. एक माणूस काकडी विकत उभा होता.. विकण्यासाठी त्याने काढलेल्या काकड्या च्या साली हि त्याने तिखट मीठ लाऊन विकण्याचा घाट  घातला होता.. १ रु च्या ५ साली ...आणि खाणारी मंडळीही १ रु देऊन त्या ५ साली खात होती ... मी वेडाच झालो हे बघून .. रोजचा संघर्ष म्हणजे काय असतो .. प्रत्येकाच्या पाजवी ला हा पुजलेला कसा ?
असे का ???

सर, आज मी शाळेतून लवकर घरी जाऊ  का?
आजीबात नाही का ???
सर माझे  पाय खूप दुखत आहेत हो सर.. मला उभे पण राहवत नाहीये ..तुम्ही प्लीज माझ्या घरी फोन करा सर ....
आता काही नाही मधल्या सुट्टीत बघू...गपचूप बस जागेवर ....
सर मला काहीच सुचत नाहीये ...खूप पाय दुखातायेत हो सर ..पायातली शक्ती गेलीय ...त्याचे डोळे पाणावले ..
आजीबात फालतूपणा नकोय....शाळा सुटेपर्यंत  थांब आणि जा मग .. आणि माझ्याकडे फोन साठी पैसे नाहीयेत मोबाईल मध्ये ....
अखेरीस शाळा सुटेपर्यंत त्याला मी थांबवलेच ... मुलांना शिस्त नाहीये...
४-५ दिवसांनी .... अहो सर तुमच्या वर्गातला तो "..." नावाचा मुलगा येत नाही का हो???
नाही .. तो सध्या येत नाही..आणि आता येऊ शकेल असे वाटत नाही.....
का ????
पोलिओ झालाय त्याला .. ट्रीटमेंट  चालू आहे ...
ओह्ह ... जर मी त्याला लवकर सोडले असते त्या दिवशी तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला असता ??
शिस्त म्हणून त्याला आयुष्यभराचा नको असलेला सोबती मिळाला ...
असे का ???

आपल्यातील चंचलता वाढली आहे .. घरी गरम वरण भात तूप लिंबू असताना आपण नाक्यावर जाऊन वडापाव खातो ...वडापाव रोज खावा लागणाऱ्याची चेष्टा यात नाही ..पण कुठेतरी "चांगल्याला" सुरवात करण्याची गरज आहे असे जाणवले...
असे का ?

परवाच एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी म्हणाला कि.. शांता शेळ्के यांच्या कवितेतला तो देवळातील झुंबरातील काचेचा लोलक (Prism) आपण आपल्या आयुष्यातून हरवत चाललोय...
देवळातील  झुंबरातुन सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून ....
आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा माणसासारखी ...गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे ..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली आणि म्हणाली , आजी , गवत नसते नुसतेच  हिरवे आणि आकाश नसते नुसतेच निळेशार . आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली ...
अरेच्चा माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे ??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक ?



उत्तराच्या शोधार्थ मी आहेच ....आपणास काही सुचते का याचे उत्तर ????