ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय?
काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. !
नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा.  देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर!

सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच !
असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी. पण च्यायला, एका रात्रीत जाऊन तो सिंहगडचा गाडीरस्ता खोदून यायला पाहिजे. 

पाऊस चालू झाला की, लोकांमध्ये विशेतः अमराठी लोकांमध्ये काय खाज सुटते कळत नाही. सगळे निघाले उंडारायला सिंहगडावर वा भूशी तलाव. तेही एक बरेच आहे म्हणा, सगळे तिकडे गेल्याने बाकीची ठिकाणे चांगली राहतात. 
हे हि असो, आपले काय त्यांच्याशीही वैर नाहीये. जाऊदे बापड्यांना, घेऊदे आनंद त्यांनाही, एका छोट्या डबक्यात १०-१५ जणांचा घोळका करून आणि डोक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अर्ध्या क्षेत्रफळा एवढे मोठाले गॉगल घालून एवरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात फोटो काढण्याचा.

आता आपण मूळ भजी वर येऊयात म्हणजे मूळ मुद्द्यावर येऊयात. 

आमचा एक मुंबई चा मित्र बरेच दिवस मागे लागलाय की सिंहगडावर जाऊयात म्हणून. 
"तुझ्या घरापासून किती जवळ आहे रे ! चल जाऊन येऊ !"
त्याची ही  मागणी आजपर्यंत मी नानाविध कारणे देऊन थोपवून धरली आहे. 
कारण असे की, जेव्हा मी पहिल्यांदी मुंबई फिरायला गेलो तेव्हा याने मला पहिल्यांदाच 'हाजी आली' ला नेले होते. म्हणजे तो नेतच नव्हता. म्हणत होता की, "आता येशील तिथे पण "कुठे पण नेतो' म्हणून हेच आयुष्यभर ऐकवशील मला". तरीही मीच हौसेने गेलो होतो. पण ते जे काही होते ते कहर होते. त्याचे वर्णन मी आता इथे लिहितं नाही ( त्यासाठी दुसरा लेखच लिहीन, विनोद आणि अपमान एकाच लेखात नको म्हणून !) 
त्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत त्याला आम्ही ज्या अमाप शिव्या दिल्या आहेत, त्याची साभार परतफेड तो एकाच ट्रेक मध्ये करू शकतो. तो म्हणजे सिंहगड !

त्याने बरेच कौतुक करून म्हणजे प्लस पॉइंट सांगून मला तयार केले किल्ल्यावर जायला की मी त्याला तेवढीच स्ट्रॉंग कारणे देतो. पण जेव्हा जेव्हा कोण सिंहगडावरील भजी पिठलं आणि दही याबद्दल बोलते तेव्हा मग आमची फ़ेमस रेसिपी चालू होते. ती म्हणजे "मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी "!

कोणी पिठलं भाकरी, भजी च्या नावाने मिटक्या मारल्या तर आम्ही "ती भजी कशी बनते?" हे रसग्रहण त्याला इतके आक्रमकपणे, पूर्वग्रहदूषितपणे, विरोधात्मक पटवून देतो की तो माणूस सिंहगड जाणे रद्द करतो. त्यातही तो अजून चिकट असेल तर गडावर जातो पण भजी मात्र खात नाही. 
अजून कोणी कहरच असेल तर भजीही खातो, पण मग आम्हाला त्याचा सुगावा लागू देत नाही. उदा. म्हणजे तेवढे भजीचेच फोटो वैगरे कॉम्पुटर वरून हाईंड वैगरे करणे वैगरे. 
काय म्हणता, "भजीचे फोटोज"?? 
अहो हो, पहिल्यांदाच जो तिथे गेलेला असतो तो नुसते भजीचेच काय तर वरून प्रदूषणाने अंधुक दिसणाऱ्या खडकवासला धरणापासून ते देव टाक्यांतले अंधारातील पाणी आणि दूरदर्शन च्या टॉवर पासून ते 'या चटई वर आम्ही बसलो होतो' इथपर्यंत फोटो काढतो.
( तरीही एकदा एकाने घेतलेल्या भजी चे फोटो दाखवले होते तेव्हा त्याला मी " हि भजी जर जास्त पिवळी वाटतीये नाही? " अशी कमेंट दिली होती. त्यानंतर बरेच दिवस आमचे संभाषण बंद होते. कारण कळेल लेखाच्या शेवटी!) 

असो तर ती समजुतीची वाक्ये ( भजीची रेसिपी) अशी काहीतरी असतात. 

"अरे नको जायला सिंहगडावर! तो काय गड आहे का ? दुकान आहे ते शिवकालीन इतिहासाचे!
"नाही रे चल मला जायचे आहे रे खूप दिवसापासून. "
"अरे मग दुसरीकडे जाऊ ना , राजगड चल बेस्ट आहे. "
"नको रे तो हेक्टिक होईल हा निवांत आहे. प्लस जेवणाचीही सोय होईल. "
"अ पळ हा, तिथे एकतर जायचेच नाहीये आणि वरती जेवायचे बिवायचे तर अजिबातच नाहीये. "
"मला भजी आणि पिठले भाकरी खायचीये तिकडची"
"अरे गंडला आहे का तू, किल्ल्यावर जाऊन कसली भजी वैगरे खातोस? घरी कधी भाकरी खात नाहीस!"
"अरे तिकडची 'भारी ssssssss' असते म्हणे. "

( आता आमची गाडी मेन गियर वर येते. पण जरा वेगळ्या वळणाने जाते. )
"कसली भारी असते? काही भारी बिरी नसते.
पण एक खरे आहे. ती विकणारी लोक हि तिथेच गावात राहणारी लोक आहेत. गरीब बिचारी! खूप कष्ट करतात रे ती ! रोज सकाळी लागणारा शिधा गोळा करायचा. तो गावातून वाण्याकडून घरी आणून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल तीन तास गड चढून वर जायचे ते पण सामान घेऊन. अरेरे किती कष्ट !
नुसते एकटे नाही तर कुटुंबासहित वरती यायचे. बाया योग्य जागी 'चूल' आणि अयोग्य जागी 'मूल' मांडून ठेवतात.  तर बापडे गडाच्या प्रवेशद्वाराशीच सावज टिपत असतात. तू त्यांच्याकडे नुसते बघून भूतदयेने हसलास जरी, तरी तू त्यांचा(च) 'गिऱ्हाईक'(च) होऊन(च) जातोस(च). मग तुला नो ऑप्शन. तुला त्यांच्याकडे नसले खायची भजी तरी गप्प गुमाने खायला लागणारच."

"असू दे की मी नाही म्हणेन त्यांना !"

"नाही,  मग तू ज्यांच्याकडे भजी खाशील त्यांच्या 'भज्या' म्हणजे त्यांनी बनवलेल्या 'भज्या' तुझ्या तोंडात असतानाच त्यांच्याशी ती पहिली बाई आणि बापडा इतकी सुमधुर भांडणे करतील की ज्याने तुझी मराठी भाषा अजून प्रगल्भ तर होईलच. पण भजी तोंडात असल्याने तू एक अवाक्षर बोलू शकणार नाहीस.आणि हे प्रकरण इथे न संपता तुला त्या पहिल्या बाई कडे 'सर्दी झाली असली तरी' वा 'पाऊस असला तरी' कमीत कमी 'दही' नामक पाणी तरी प्यायलाच लागेल."

"असू दे रे, चालायचेच!. कोणाकडे तरी खायचीच आहे भजी. कोणाला तरी द्यायचेच आहेत न पैसे मग पहिलीलाच देऊ. काय फरक पडतोय. "

एवढा चिकट माणूस असला तरी त्या समोर पराभूत झालो तर पुणेकर कसले?  मग पराभवाचे सूतोवाच होऊ लागले की हुकमी अस्त्र बाहेर काढतो. 

"नाही रे चांगली नसते तिच्याकडची भजी म्हणूनच ती गिऱ्हाईक भांडून मिळवते ना. हे बघ ती सकाळी उठून किल्ला चढून येते. माहीत पण नाही अंघोळ वैगरे केलीये का नाही. घाईने येते म्हणून स्वयंपाक करताना आवरते केस वैगरे ! ते जाऊदे !
खालून येताना फक्त शिधाच आणते म्हणजे भांडी इथेच असतात पर्मनंट, कधी धूत असेल ती काय माहीत?
तिच्याकडे फक्त १ पातेले, १ जग आणि ४-५ प्लेट्स आणि पेले असतात. ज्या पातेल्यात ती तुझे  पिठले करते त्यातच ती दुसऱ्यांचे पिठले करते. भाकरी सांगितलीस तर पीठही त्यातच मळते. हात धुतले असतीलच याची खात्री नाही. हे पण जाऊदे !
कोणी नॉन व्हेज सांगितले तर अंडीही त्या पातेलीतच फोडते. याउप्पर कोंबडी हि त्यातच कापते. ज्याने कोंबडी कापते त्यानेच कांदे, बटाटे कापते. म्हणूनच भजी थोडीशी लालसर असते. हे ही असो.
ज्या 'जगात' तुला पाणी देते त्यातच सरबत करते, ताक करते. तोच काहीजण तोंड लावून पितात. एकानी तर त्या 'जगा'मध्ये बेडूक पकडून आणला होता एकदा. तर काही तंबाखू खाल्लेली माणसे तोच 'जग' घेऊन गुळण्या करतात. काही तर त्यानेच तोंड धुतात.
यातच कहर म्हणजे जर 'जगा'च्या मालकांना निसर्गाची हाक आली तर तोच जग घेऊन .............. !"

"हरामखोरा, गप्प बस आता ! नाही न्यायचेय तर नको नेऊस ! पण तोंड बंद कर !"

या त्याच्या उत्स्फूर्त दादेने सिंहगडावर जायचा विषय त्याच्यापुरता तरी कायमचा संपतो!  

सागर

गुरुवार, २० जून, २०१३

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

 गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. 

आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.

असो, सांगायचा मुद्दा हा की,  एकदा का तुम्ही सायकल शिकलात की पुढच्या आयुष्यभर त्या दोन पायांना जी काही भिंगरी लागते की शेवटी या दोन पायांखेरीज तिसरा आधार म्हणून काठी आली की ती थांबते. पण पोहोण्याचे मात्र तसे नाही .
आता मी पण पोहोण्याचा क्लास जॉईन केला तो हि गरजेपोटीच. तेव्हा करियर ची एकंदरीतच बोंबाबोंब. त्यामुळे नौदलात जाऊ असा विचार करून अस्मादिकांनी कॉलेजातील 'NCC' नावाचा प्रकारात आपले नाव नोंदवले. कोणीही फालतू माणूसही भारतीय सैन्यात जाऊ शकतो असे आम्हाला कळले असल्याने आपली वर्णी सहज लागेल असा आत्मविश्वास.

या 'NCC' पेक्षा भिकार या जगात अजून दुसरी गोष्ट आहे यावर माझा विश्वासच नाहीये. आता हे निरीक्षण अर्थात तेथे काही दिवस जाऊन आल्यानंतरचे आहे. काही गोष्टी मला अजूनही नाही कळाल्या त्या अश्या की,
१. सगळ्या लोकांची डोकी भुंडी का असतात? जरा बरे केस असलेला आणि व्यवस्थित भांग बिंग पाडलेला माणूस या लोकांना का पचत नाही?
२. प्रत्येक गोष्टीला बेडूक उड्या मारणे किंवा लोळत क्रॉलिंग करणे हीच शिक्षा असू शकते का?
३. एकाही शिवी न देणारा ( आणि दिलेली ऐकून न घेणारा) माणूस किती दिवस येथे टिकू शकतो?

हे हि असो, तर कहाणी होती आमच्या पोहोण्याची. NCC मध्ये गरजेचे म्हणून आम्ही पोहोण्याचा क्लास लावला. बरोबर १ महिन्याने त्यांची पोहोण्याची परीक्षा होणार होती आणि ती पण ५० फुटी तलावात. आता पाण्यात पडल्यावर ते पन्नास फुटी खोल असो व दहा फुटी काय फरक पडतोय? पण या लोकांना भारी हौस मिरवायची.

पूर्ण एक महिना क्लास ला जाऊन 'शेवटी' म्हणजे क्लास चे पैसे संपायच्या शेवटी आम्ही कसेबसे हातपाय झोडत पाण्यात तरंगायला लागलो. आता आमचा कोन्फीडन्स का काय म्हणतात ते भलताच वाढला होता. शेवटचे काही दिवस तर आम्ही  'भाड्याने' आणलेल्या (म्हणजे भाडे देऊन आणलेल्या, गैरसमज नको !") उसन्या, पोहायच्या टोप्या आणि गॉगल लावून पोहू शकत होतो.

अखेर तो दिवस उजाडला जेव्हा आमची परीक्षा होणार होती. शे दीडशे लोक जमली होती एका ठिकाणी. लगेचच म्हणजे दीड तासाने मिलेटरीचे तीन ट्रक आले. मग भाज्या कोंबतात तसे आम्हाला कोंबून ते ट्रक निघाले. मिलेटरीचे मळके पट्या-पट्या चे शर्ट घालून आलेले ती लोक जेवढा करता येईल तेवढा मग्रूरपणा  करीत इतर लोकांना 'हाकत' होते. 

आता पोहोण्याची परीक्षा देण्यासाठी आम्ही तलावात उतरलो. ३०० मीटर तलावात ३ फेऱ्या मारून एका ३० फुटी भागात फ्लोटिंग करायचे होते. 
अस्मादिकांची हि पहिलीच परीक्षा असल्याने आम्ही पोहोण्याचा चष्मा, टोपी वैगरे घालून तयार. माझ्या बरोबरीच्या लोकांना अचानक न्यूनगंड का काय ते वाटायला लागले असावे. एकंदर माझी तयारी आणि हौस बघून हा "भारी स्विमर" असेल असे लोकांना वाटले. मी फुल टू टोपी-बिपी गॉगल घालून. पण खरी परिस्थिती नंतर लोकांच्या लक्षात आली. 

हि पोहोण्याची स्पर्धा नव्हती.  फक्त ३ फेऱ्या पूर्ण करून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते. पण शेवटचा माणूस फेरी पूर्ण करून जेव्हा फ्लोटिंग ला येईन तेव्हापासून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते नाहीतर फेल. 

फ्लाग उडाला आणि सगळी लोक पोहायला चालू झाली. सगळी इतर मुले 'बटरफ्लाय' व 'गावठी' पोहोत होती.ती सपासप पोहत पुढे निघून गेली. मी मात्र नुकतेच शिकलो असल्याने 'ब्रेथ स्ट्रोक'मारत हळूहळू. पोहत जेव्हा मी अर्ध्या अंतरावर आलो तेव्हा काही लोक ती फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीसाठी पोहत होती. 
काही वेळ पोहल्यानंतर माझे तलावाच्या बाहेर लक्ष गेले. एक गार्ड माझ्या पोहोण्याच्या स्पीडने वरती चालत होता. की कधी हा माणूस बुडेल आणि कधी उडी टाकून याला एकदाचे बाहेर काढेन या उद्देशाने. 

पहिल्या फेरीतच मला दम लागलाय हे पाहून तो म्हणाला की "टेक युवर ओन टाइम". 
हे वाक्य मी इतके मनावर घेतले की माझा वेग अजून कमी झाला. मी दुसऱ्या फेरीसाठी निघालो तेव्हा काही लोक फ्लोटिंग पर्यंतही पोहोचली होती. 

वेळ माहीत नाही पण बऱ्याचं वेळाने मी फ्लोटिंग ला पोहोचलो. अंगातला जीव तर गेलाच होता. पण येथे जर मी हातपाय गाळले असते तर गॉगल आणि टोपी सकट माझा "टायट्यानिक" झाला असता. आणि माझे सोडा पण ज्यांची चष्मा, टोपी मी आणली होती त्यांच्या आत्म्यालाही  शांती लाभली नसती. 

मी पोहून गेलो आणि फ्लोटिंग ची वेळ चालू झाली. जी लोक लवकर पोहोचली होती त्यांच्यावर माझ्यामुळे २५  मिनिटांपेक्षा जास्त वेळ तरंगत राहायची वेळ आली होती. काही मस्तपैकी पाण्यात उलटी झोपली होती. काही नाईलाजाने तरंगत होती. काही पाण्यात काहीतरी हरवलेय असे काहीतरी करीत होती. तर माझ्यासारखे नवशिके ज्यांना पोहणे शिकवले होते पण तरंगणे नाही, असे लोक जीवाच्या आकांताने हातपाय झोडीत होते. 
काहींना एवढा वेळ तरंगणे न जमल्याने काहींनी तलावाच्या कडेला पकडले आणि नापास झाले. 

मी तरंगायला चालू केले आणि पुढची ती दहा मिनिटे माझ्या आयुष्यातली मी कधीच विसरणार नाही. मिनिटा-मिनिटा गणिक माझे हातपाय झोडणे कमी होत होते. अंगातली शक्ती संपली होती. बाहेरचा माणूस आठ, सात, सहा, पाच गणती करत होता. तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांची गणती करतोय असे वाटू लागले. 
आता आकडा चारवर आला. एका वेळेला वाटले, गेले उडत करियर-बिरीयर. आपण जगलो तर करियर होईल ना? मोठ्या कष्टांनी तलावाच्या शेजारचा पाइप धरायला हात पुढे केला. पाइप धरला की नापास हे तेथेही आठवत होते.
तो 'तीन' म्हणाला. मी पाइप धरायला गेलो आणि एकदम मागील महिन्यात या पोहोण्यासाठी केलेले क्लास, त्याचे पैसे सगळे आठवले. म्हटले बस्स, आता नापास झालो तर येथून बाहेर आणि हे सगळे एफर्टस वाया. 

देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता. 
लगेच "फिनिश" असा शब्द आला आणि मी सुस्थ पडलो. मला त्या तलावाच्या बाहेर कोणी काढले हेही मला आठवत नाही. मला राहून राहून आजही वाटते की माझी हि एकंदर परिस्थिती बघूनच तीन ते एक अंतर लवकर काटले गेले असावे. 

मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मी पास झालो होतो पण माझ्यामुळे जास्त वेळ तरंगायला लागल्यामुळे आणि ते न जमल्याने तीन मुले नापास झाली होती. बरे झाले की मी गॉगल घातला होता की त्यामुळे मला त्यांच्याकडे काणाडोळा करता आला. कुठल्याही क्षणी ती आपल्याला पकडून परत तलावात टाकतील असे मला वाटायला लागले. 

गॉगल, टोपी घालून पोहोण्याआधी मी लोकांना 'मायकेल फेल्प्स' वाटलो होतो म्हणे, पण नंतर माझी पत पार्ट-टाइम 'वाघ' होणाऱ्या 'राहुल रॉय' एवढीही शिल्लक नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो उधारीचा चष्मा आणि टोपी देऊन टाकली.

तेथे पास होऊन मी NCC जॉईन केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षात सोडली. ते जर तेव्हा सोडले नसते तर मी अजूनही 'सावधान, विश्रामच' करत बसलो असतो.  आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट?

भविष्यात, मी जर माझे वर्तमानपत्र चालू केले(च) तर मी रोज(च) दोन(च) बातम्या हेडलाईन म्हणून(च) छापेन(च).
१. NCC पेक्षा भिकार जगात काहीच नसून सुज्ञांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. 
२. सिंहगडावर जाणारा गाडीरस्ता कालच्या मंद लहरी भूकंपांनी नामशेष. आता सिंहगड चढून जाण्यासाठी पर्याय नाही.

त्यानंतर बऱ्याचं वर्षांनी फिटनेस साठी म्हणून पोहायचा क्लास लावला. पोहता येते म्हणून पहिल्याच दिवशी 'स्विमिंग टेस्ट' द्यायला मी परत पाण्यात उतरलो. पूर्ण एक तास प्रयत्न करूनही मला पोहता आले नाही. "आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते. दुसऱ्या दिवशी मी गप्प माझे रजिस्ट्रेशन रद्द केले आणि उरलेले पैसे परत घेऊन आलो. 

आता मी चुकूनही पोहोण्याच्या नादी लागत नाही.समुद्रकिनारी गेलो तरी जास्त रमत नाही. हुशारीने पावसाळ्यात मुंबईला जात नाही. "मी मासा असतो तर" अश्या आशयाचे निबंध हि वाचणे मी आता बंद केले आहे. डिस्कवरीवरची माणसे समुद्रात पोहायला लागली की, मी वाहिनी बदलतो आणि अन्नू मलिकची हिडीस गाणी लावतो.
"उची है बिल्डिंग, ट्या नाआआअ "
लिफ्ट तेरी बंद है ट्या नाआआअ "

( दुःख पचवायला हो ! कारण अस्मादिक कोणतेही व्यसन करत नाहीत.आणि म्हणतात ना "लोहे को लोह काटता है".)
असो, पण हा एवढा छोटा प्रसंग, माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.

सागर

शुक्रवार, १४ जून, २०१३

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. 
त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार. आपणच त्याला मवाली ठरवून मोकळे होतो.

आता जरा या या दोन व्यक्तिरेखांची अदलाबदल करूयात. 
मी पहिल्या भेटीपासून कोणालातरी मवाली वाटतोय याची मी कधीच कल्पना केली नसेल. नावाप्रमाणेच तसा मी एकदम सुज्ञ. सरळमार्गी आणि सरळतोंडी. सरळ तोंडी हे अशासाठी की जे तोंडात येईल ते सरळ सरळ बोलून मोकळे होतो. त्याला मी मवाली कशामुळे वाटलो हे त्यालाही आज सांगणे अवघड आहे.

बारावीत पहिल्यांदा सौरभला भेटलो. गोरा गोमटा, थोडासा लाजाळू.
कशी ओळख झाली आठवत नाही, पण आठवतो "तो" दिवस.
नुकतेच कॉलेज सुरू झालेले, काही काम ना  धाम, बोंबलत हिंडत होतो आम्ही सगळे. त्या दिवशी त्याची बहीण त्याला घ्यायला आली होती. तिने त्याला माझ्याबरोबर पहिले आणि घरी जाऊन त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
"अश्या मवाली मुलांबरोबर अज्जिबात राहायचे नाही हा सौरभ !"

का कसे ठाऊक नाही, त्यानंतरही आमची मैत्री टिकली.पण, माझ्याविषयीचे हे जहाल मत अजून जहाल व्हायला अजून दोन तीन प्रसंग घडले.

मिड टर्म परीक्षा होऊन पुढची टर्म चालू झाली होती. रिझल्ट केव्हाही लागू शकतो असे दिवस. साडेचार-पाच ची वेळ. आज सौरभ काही कॉलेज ला आला नव्हता. एकाने नवीन मोबाईल घेतल्याने त्यावर किडे करण्याचे पहिले प्रात्यक्षिक म्हणून मी सौरभ ला फोन केला.
"रिझल्ट लागला आहे आणि बेक्कार रिझल्ट आहे. पुढच्या दहा मिनिटात कॉलेजला ये" असे म्हणून मी फोन ठेवला. त्याचा दुसऱ्या कोणालातरी फोन होईल मग त्याला खरे सांगू म्हणून आम्हीही निवांत.
पुढच्या आठ मिनिटात सौरभ कॉलेजात उभा!,
हॉल तिकीट सापडले नाही म्हणून तो आख्खी फाइल घेऊन आला होता. गाडी नव्हती म्हणून त्याने पुढच्या मिनिटाला बहिणीला फोन लावला. बहीण बँकेत कामाला होती. तिने तातडीची रजा (हाफ-डे) घेऊन बँकेतून निघून सौरभ ला घरून घेऊन कॉलेज मध्ये सोडले.
तो खरंच खूप टेन्शन मध्ये आला होता. आणि आम्ही दात काढत निवांत पडलो होतो.

रिझल्ट नाही ना लागला?
नाही!
मग ............................................. !!!!!!!

पुढच्या संभाषणात काहीही अर्थ नव्हता.

"माझे सोड रे…  माझी बहीण गेट बाहेर थाबलीये, आणि हाफ-डे घेऊन आलीये ती."

त्याचा (भयानक) चेहरा भयानक असा पडला होता. चेहऱ्यावर नामुष्की आणि डोक्यात आता बहिणीला काय कारण सांगायचे असा विचार करतच तो बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने "रिझल्ट देणे बंद केले आज" असे सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे साहेब रिझल्ट न घेता  घरी गेले तेव्हा खरे काय ते कळले.

एक दिवशी हे साह्येब एका मुलीकडून पुस्तक घेण्यासाठी थांबले असताना मी हि त्याच्याबरोबर थांबलो होतो. जसे ती पुस्तक घेऊन आली तसे मी तेथून निघायला लागलो. आणि तेही गुपचुप नाही तर आरडा ओरडा करत.
"येड्या, मजा आहे बाबा एका मुलाची, मी निघतो बाबा, उगाच कबाब मी हड्डी नको"
असे अनेक टुकार डायलॉग मारून त्याला इतका भंडावून सोडला की नंतर तो तिच्याशी काय बोलला हे त्याला स्वतःला हि आठवत नाही.

नंतर, जसे येणेजाणे वाढले तसे दृष्टिकोनही बदलला.पण त्याच्या दृष्टीतला मवालीपणा मी तसाच बाळगून होतो.
असेच एकदा LAB मध्ये प्रयोग करताना त्याला ओळखणारी एक मुलगी त्याला "तू 'लय' घाई करतो रे" असे म्हणाली तेव्हा मी फुटून फुटून हसलो होतो दोघांच्या समोर. त्यावेळची त्याची "ऑकवर्ड सिच्युएशन" मला आजही लक्षात आहे.

पोस्ट ग्र्याज्युएशनला प्रवेश घेतला तेव्हा फॉर्म भरताना या साहेबांनी " Principle Signature" च्या जागीच सही ठोकून दिली होती. त्यानंतर जेव्हा प्रिन्सिपल सही ठोकायला गेला तेव्हा तेथे आधीच याची सही पाहून तो वेडाच झाला. आणि याला "… आणि तुला MCA करायचाय हम्म" अश्या शब्दांनीच ठोकला होता. ते "आणि" तो ज्या फ्रस्टेशनने बोलला त्या सगळ्याचा साक्षीदार मी,… तेथेही (प्रिन्सिपल ऑफिस मध्ये) पडून पडून हसलो होतो असे आठवतेय.

छोटा ट्रेक म्हणून ह्याला एकदा डायरेक्ट हरिश्चंद्राला नेले होते. त्याचा पहिलाच ट्रेक होता तो. जर तेथे 'कोकणकडा' नामक अद्भुत निसर्गरूप नसते तर तो त्याचा शेवटचा ट्रेक आणि आमच्या मैत्रीचा शेवटचा दिवसही  ठरला असता.

मध्ये बरेच दिवस गेले, तो 'मवालीपणा' पण कुठे अदृश्य झाला कुणास ठाऊक !

आता नोकरीला लागल्यापासून सगळ्या गोष्टी सभ्यतेत केल्या जातात. याच सभ्यते पोटी महिना महिना बोलणे होत नाही. कधी तरी चाटिंग करताना स्मायली पाठवूनच काय ते हसणे होते.
चष्मा लावलेल्या स्मायली पाठवणेच अधिक सोयीचे. त्याने डोळ्यातल्या या जुन्या आठवणी डोळ्यातून ओसंडून वाहत असल्या तरी दिसत नाहीत चष्म्यामुळे.

आजही मी मात्र त्याच्याबरोबर तसेच राहणे पसंत करतो. "मवाली" "मित्राप्रमाणे" .
जेणेकरून तेच जुने दिवस परत आठवतात आणि मनाला ओलावा देऊन जातात.

शुक्रवार, ७ जून, २०१३

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी


टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

या लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत. 

येथे आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!)  हेतूने लिहायचा प्रयत्न आहे.

असो, तर घडले असे की, बऱ्याचं दिवसात 'चांगला' सिनेमा पहिला नाही असा सगळ्यांचा सूर निघाला. मग लोकांची मते घेऊन कुठल्यातरी सिनेमाला जाऊ असे ठरले. 
मग कुठून माहीत नाही पण 'एक' नाव कळले. हा सिनेमा म्हणे तुफान चालला होता. थेटरच्या बाहेरून 'तुफान चाललाय' असे काही वाटले नाही.  पण वाटले की आत पहिल्यांदा पिच्चर मधली माणसे एकमेकांना बेफाम बदडून काढत असावीत आणि नंतर तिकीट काढून अश्या टुकार पिच्चरला तुझ्यामुळे  आलो म्हणून प्रेक्षक एकमेकांना बदडून काढत असावीत.
मी स्वतःच्या जबाबदारी वर आत गेलो आणि मित्राकडून बदडून घ्यायचाच बाकी राहिलो.

पिच्चर तर ठरला पण आता जायचे कुठल्या थेटरात? एक म्हणाला कोथरूड सिटीप्राईड ला जाऊ.  पण म्हटले 'मीशिभोबो' बघण्यासाठी फारतर २० किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे  ३० रुपडे ठीक आहेत. दीडशे रुपडे घालवायच्या लायकीचा पिच्चर तरी असतो का त्या 'मांजरीचा' ?

मग त्या दिवशी आमची उभ्या वीस वर्षात न झालेली 'प्रभात' वारी घडली. 

एक मित्र पहिल्यापासूनच नाखूष होता. "कुठेही आणता मला तुम्ही" असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आख्खे ३० रुपडे मोजून तो पहिल्यांदाच अश्या मराठी पिच्चर ला आला होता. 

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने  घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते. ( या सगळ्यामागचा दाखवायचा, समजवायचा आणि खरा मूळ मुद्दा वेगळाच होता. )

त्यातला 'दाखवायचा' जो हेतू होता त्याने चित्रपट गृहातील माणसे चार्ज झाली होती. सगळ्यांना स्वभाषा, स्वधर्म अशी गोष्टीचा ताप आला होता. मिनटा मिनिटाला मराठीच्या महानतेचा घाम फुटत होता. पण त्यातून 'समजण्याचा' व बोध घेण्याचा मुद्दा लक्षात घेण्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते. 

तो टकला तेथे पेटला होता तर, माझ्या शेजारी माझा हा मित्र पण पेटला होता, पण दुसऱ्या मुद्द्यावर. तो मिनटा मिनटाला फ्रस्टेट होत होता. वास्तविक हा आमचा मित्र उत्तम कविता करतो, उत्तम वाद्ये वाजवतो, स्टेज शो हि करतो.जाहिरातींना आवाज देतो. आणि हे सगळे मराठीतच. त्यामुळे त्याचे मराठीवरचे प्रभुत्व वादातीत आहे. पण त्याला जो काही समोर भाषेचा बाजार मांडला होता तो बघवत नव्हता. बराच वेळ तो आमच्यातच कमेंट देत होता.

शेवटी एका प्रसंगात, सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
हा मध्येच उठून उभा राहिला आणि आम्हाला जोरजोरात ओरडायला लागला. 
ती तिथे पेटली होती आणि हा इथे. 
" कसल्या भंगार पिच्चर ला आणता रे मला तुम्ही?? आत्ताच्या आता माझे तीस रुपये परत द्या. फुकट तीस रुपये घालवले माझे वाया. त्यापेक्षा मी ते भिकाऱ्याला दिले असते. "Big smile

आम्ही  ओढून त्याला खाली बसवला. त्याला म्हटले "शांत बस बाबा, लोकांना इथे मराठीचे स्फुरण चढलेय, हाणतील तुला इथेच!"

तो नाईलाजाने बसला. 
नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्यॅक करते म्हणे. Big smile Laughing out loud
आता मला खरी मजा यायला लागली. माझा हाच मित्र 'एथिकल ह्यॅकींग' शिकला असल्याने तो हे पाहून संपलाच. तो ताडकन उभा राहिला. 

"च्यायला बापाची वेबसाइट आहे का घरबसल्या ह्याक करायला? काहीही दाखवतात का हे साले? अरे वेबसाइट ह्याक करायला इंटरनेट लागते का नाही हे तरी माहीत आहे का ह्यांना? सिम्पली रीडीक्युलस "
त्यानंतर तो पाच सहा टेक्निकल शब्द टाकून 'ह्याने हे होते का?" त्याला हे लागते का?" लोक बघतात म्हणून काहीही दाखवतात का हे लोक?" असे किंचाळू लागला. ते टेक्निकल शब्द ऐकून त्याच्या शेजारच्या माणसाने हातातल्या पुरचुंडी मधले सगळे पोपकोर्न  पोटात ढकलले. (स्वतःच्या !)

तो थेटराबाहेर निघून गेला. आम्ही पिच्चर संपवून बाहेर गेलो तर गाडीवर बसला होता.
"तुम्ही सगळे मिळून माझे तीस रुपये परत द्या, नाहीतर जाऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आमच्या गाड्याच पकडून ठेवल्या होत्या.

हा पिच्चर "टकल्याची अ‍ॅक्शन-पब्लिकला घाम" म्हणूनही खपला नसता हो !
यातला 'पब्लिकला घाम' हे ठीक (कारण तो आलाच होता)  पण तो टकला 'अ‍ॅक्शन' पण नव्हता करत हो (स्माईल)
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून) (घोड्या)समोरच हंटर घेऊन बसला होता.  (स्माईल)


तो मी बघितलेला शेवटचा मराठी पिच्चर असावा .परत कधी ह्या मित्राच्या शिव्या ऐकायची हुक्की आली की त्याच पिच्चरच्या दिग्दर्शक म्हणविणाऱ्या माणसाचे इतर पिच्चर पाहायची ऑफर आम्ही त्याला देतो. आणि मग भगीरथाने गंगा आणावी तसे हजारो ऐकिवात नसलेले मराठीतील अवजड असे (अप)शब्द वायू वेगाने एका नंतर लगेच एक असे ऐकायला मिळतात. 
खरंच,  मराठी भाषा ही शब्दसंपन्न भाषा आहे. हे तेव्हा आम्हाला स्मरते. Big smile

(तळ)टीप :
१. चांगला' सिनेमा : हि व्याख्या व्यक्तीसापेक्ष होऊ शकते.
२. लेखन (वाचणाऱ्याला वाटले नाही तरी(ही)) विनोदी प्रकारातील आहे. येथे कोणत्याही चर्चा, अपमान व अभिमान अपेक्षित नाही.
३. टीप वरती का नाही लिहिली हे विचारू नये. उत्तर मिळणार नाही. ( कारण, याचे उत्तर लेखकाकडे(ही) नाही)

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

निमित्त फक्त एका भेटीचे

 निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे  बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.  अश्या साध्या आणि अतिशय निरव अश्या स्थितीतून वेळ काय वेड पांघरते हे त्या विधात्यालाच ठाऊक. नजरेला नजर भिडते अन कुठल्या जन्मांची आणि नात्यांची क्षणात लय जुळते. काहीबाही भूतकाळातील प्रसंग आठवतात.काही थोड्या शब्दांची देवघेव होते. कुठेतरी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल्या आठवणी क्षणात दाटतात.  बऱ्याचं वेळ सांभाळलेला संयम सुटून मन आनंदाच्या उचंबळ्या खाऊ लागते. आता शब्द असतात ते फक्त भार वाहायला निरोपाचा, खरी देवाण घेवाण हि हृदयाशीच चालू होते. आणि मग काही क्षणात शब्दांची देवाण घेवाण थांबते आणि संवाद सुरू होतो फक्त डोळ्यातील डबडबलेल्या आठवणीने, अनुभवाने, कृतज्ञतेने.

विजू अशीच बस ची वाट बघत उभी होती घरी येण्यासाठी. साधारणता रात्री आठ, सव्वा आठ ची वेळ असावी. दिवसभर राबून तिने पुरणपोळ्या बनविल्या होत्या. आज वडिलांसाठी पुरणपोळ्या बनवून घेऊन गेली होती बऱ्याचं दिवसांनी, तशी तिची दर शनिवार, रविवार एखादी तरी चक्कर असतेच, पण आज वडिलांच्या आवडत्या पुरणपोळ्या वयाच्या शह्यन्शिव्या वर्षी खाताना बघून तिला वेगळेच समाधान लाभणार होते. आज त्यांचा वाढदिवस हे निमित्त तर होतेच पण आज ती जरा जास्तच आनंदात होती. त्या आनंदात तिला  आपला पाय दुखत असून आपण बस थांब्यापर्यंत चालत आलो हेही जाणवले नसेल. आनंदात माणूस वेदना विसरतो हेच खरे.

खरेतर तिला एकेरी विजू म्हणावे असे तिचे वय नव्हे. पण अशी लोक इतक्या सहजतेने सर्वांना सामावून घेतात की नजरेनेच मनातले भाव कळले तर नावाची गरजच लागत नाही. खरेच ती नावाप्रमाणेच एकापेक्षा एक अश्या सुयोग्य रत्नांची गुंफलेली मालाच. म्हणून रत्नमाला.

विजूची घरी लवकर जायची घाई पाहून का काय माहीत, बसने वेळेत जायचे नाही असा चंगच बांधला. 
मग इकडे तिकडे बघत तिचे काही क्षण गेले. समोरच एक बाई उभ्या दिसल्या. तिच्यापेक्षा जास्तच वयाच्या, साधारणता सत्तर बाहत्तर या वयातील. त्यांनाही घरी जायची लगबग. त्यापण सैरभैर. विजूने त्यांच्याकडे बघताच ती कित्येक वर्ष मागे भूतकाळात हरवून गेली. मेंदूच्या आणि मनाच्या कप्प्यात कित्येक वर्षे जपून ठेवलेल्या त्या नावाने क्षणार्धात मेंदू ते तोंडापर्यंतचा प्रवास केला. श्वास फुलला गेला.

ती कितीतरी वर्षे भूतकाळात वाहत गेली आणि तिचा शाळा सोडतानाचा प्रसंग चटकन तिच्या समोर जिवंत झाला. साधारणता तीस ते पस्तीस वर्षापूर्वीच्या आठवणींच्या दवबिंदूंनी तिच्या मनाचे पर्णपत्र भिजून निघाले.
खरेच, दवबिंदूच ते, कुठून कसे आले कोणास ठाऊक नाही आठवणींसारखे . सुखात वाऱ्याशी मैत्री करत झुलत राहतात आठवणींसारखे, दुसऱ्याचा भावनारूपी प्रकाश घेऊन तोच परावर्तित करत राहतात. उन्हाच्या तप्ततेची चाहूल लागताच विरून जातात का-कु न करता, कोणताही आक्रोश न करता , कधी मातीत तर कधी हवेत.

शाळेचा शेवटचा दिवस हा असा तिच्या पुढ्यात उभा राहिला. आता परत आपण या शाळेत येणार नाही, परत कधीही आपल्या आवडत्या बाई आम्हाला भेटणार नाहीत म्हणून सगळ्या मुलींचे डोळे पाणावलेले. विजूची नजर मात्र "मराठे बाई'ना शोधत भिरभिरत होती. फक्त शिक्षक- विद्यार्थी असे त्यांचे नाते नव्हते. त्याच्याही पलीकडले जपलेले आणि शब्दात न व्यतीत करण्याजोगे असे होते. काहीही घडले तरी विजू मराठे बाईंकडे धाव घेई. आणि त्याही मुलीप्रमाणे तिला जपून घेत.
नेमका त्याच दिवशी योगायोगाने बहुदा, विजूचा वाढदिवस पण होता. त्याच दिवशी मराठे बाईंनी विजूला वाढदिवसाबरोबरच पुढच्या आयुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या. नुसत्या कोरड्या शुभेच्छा न देत त्यांनी तिला एक शुभेच्छापत्रकच दिले होते. त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात.  तेव्हा,
त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
त्या दिव्याचा प्रकाश हाच खरा मान, 
आणि त्याच्याशीच प्रामाणिक राहून आपल्या जीवनमार्ग निश्चलपणे आक्रम,
म्हणजे पाऊल कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर त्याचा मार्ग कायम योग्यच असेल."

विजुसाठी या केवळ काव्यपंक्ती नव्हत्या. तिच्यासाठी ते सूत्र होते जगण्याचे. त्या चार ओळी तिने त्या दिवसानंतर लक्ष वेळा वाचल्या असतील. आतातर तिला त्या पाठही झाल्या होत्या.

शाळा सोडून पुढचे शिक्षण चालू झाले. अर्थात ते हि मराठेबाईंच्या सल्ल्यानेच.नंतर कधीतरी पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबते की काय अशी परिस्थितीत मराठे बाईंनी दिलेला मदतीचा हात. जो ती कधीच विसरू शकणार नव्हती. तिच्या शैक्षणिक कारकीर्दीत 'मराठे बाई' या दोन शब्दांनी कितीतरी आमूलाग्र बदल आणला होता.

लग्न होऊन संसार चालू झाला. आर्थिक परिस्थिती तशी काही जास्त खास नव्हती. मध्ये बरीच वर्षे गेली. संसाराच्या रहाटगाड्याला एकदा जुंपून घेतले की स्वतः साठी जगणे काही प्रमाणात राहूनच जाते. नवी स्वप्ने, नवे जगण्याचे मानदंड.

आता बरीच वर्षे उलटली होती. या कोणत्या गोष्टींचा मागमूसही राहिला नव्हता.परत कोण कोणाला आयुष्यात परत भेटेल अश्या अपेक्षाही मनात नव्हत्या.

काही क्षण गतकाळातील रम्य आठवणींमधून सैर करत, तिचे मन एकदम भानावर आले.

"मराठे बाई"
दोनच शब्द तिच्या मुखातून उत्कटपणे बाहेर पडले. त्या बाईंचे क्षणात लक्ष वेधले गेले अन त्याच वेळेस त्यांच्या डोक्यातील एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली शोधण्यात गुंतले.

"कोण गं तू ?" डोळ्यावरील जड काचेचा चष्मा सरसावत त्यांनी विचारले.
"मी … मी … " आता विजूचे शब्दही तिच्या मनातल्या भावनांसारखे जड झाले होते.
"मी रत्नमाला पुराणिक … तुमची विद्यार्थी होते. तुम्ही SNDT च्या शाळेत शिकवायचात न तेव्हापासून."
"अग हो गं हो। तुला कशी विसरेन मी. बऱ्याच वर्षांनी भेटीचा योग आला म्हणून थोडीशी विचारमग्न झाले."
"बाई, तुम्हीच मला घडवले, तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीमुळेच मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण करू शकले."
"असे काही नसते गं, आपण फक्त निमित्त असतो."
"बाकी बोल, कसे चालले आहे तुझे?"
"सगळे काही व्यवस्थित."
प्रत्येक शब्दागणिक त्या दोघी एकरूप व्हायला लागल्या. मग काही अपेक्षित प्रश्न आणि त्यांची अपेक्षित अशी उत्तरे. 

"आयुष्यातला खूप मोठा काळ खर्ची घालावा लागला, तुमची भेट होण्यासाठी."
"हे चालतच असते गं, ताज्या राहतात त्या आठवणी."
हे ऐकताच विजूच्या मनाचा बांध फुटला.
"बाई, तुम्हाला आठवते का तुम्ही मला शाळेच्या शेवटच्या दिवशी एक शुभेच्छा पत्रक दिले होते. त्याच दिवशी माझा वाढदिवस हि होता."
"हो, त्यात मी काही ओळीही लिहिल्या होत्या तुझ्यासाठी, त्या ओळी मात्र आता काही आठवत नाहीत गं."
"त्या ओळी आजही मला पाठ आहेत. "

या आनंददायी आठवणी जर वस्तुमानाचा आकार घेऊ शकल्या असत्या तर किती बरे झाले असते, असे विजूला वाटले. तसे असते तर तिने त्या असंख्य वेळा कवेत घेतल्या असत्या. त्यांना जर वास असता तर तो तिने मनसोक्त हुंगला असता.

"जीवनात उठतात जेव्हा विचारांची वादळे,सर्व दिवे मालवून जातात" 
विजूला कसलेही भान उरले नव्हते.खरेतर, तिला त्या ओळी आठवायची हि गरज नव्हती.पण तरीही त्या ओळी उच्चारणे तिच्यासाठी कष्टप्रद होऊ लागले होते. शब्द तोंडापर्यंत येऊन ठेपले होते पण बाहेर पडत नव्हते.

या एका ओळीतच मराठे बाईंना पुढील ओळी आठवल्या असाव्यात. अनपेक्षित पणे काही तरी घडावे आणि आपल्याला अतीव आनंद देऊन जावे अशी त्यांची स्थिती झाली असावी. तोच भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरूनही  सरसर सरला असावा. त्यांचा हात त्यांच्याही नकळत डोळ्यावरील जाड काचेच्या चष्म्यावर गेला. त्यांच्याही डोळ्यात आता पाणी तरारले होते.

त्यावेळी एकाच दिवा तेवत असतो अखंडपणे ; स्वतःच्या मनाचा !
 आता दोघींच्या डोळ्यामधील निर्धाराचा पारा फुटला. त्यांची मूक स्पंदने दोघींमधील शांतता ताडीत  होती. 

त्या दिव्याचा प्रकाश  …… 
आता विजूला पुढे बोलावले नाही. तशी तिला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. दोघींच्या मनात उमटलेल्या एकाच आकृतीला त्यांना प्रत्यक्षात आणायची गरजच नव्हती. 

आज मात्र विजूला बस वेळेवर न आल्याचाही आनंद झाला असेल हे नक्की.

खरंच, निमित्त होते ते फक्त एका भेटीचे…
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : या लेखातील "विजू" हे पात्र म्हणजे खुद्द आमच्या मातोश्रीच .
सागर 
sagarshivade07@gmail.com
9975713494

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते. 
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.
कुठेतरी माळरानात सहा सहा तास भटकत राहायचे, जळता सूर्य डोक्यावर घेऊन फिरून ग्लुकॉन डी चे पुडे च्या पुडे संपवायचे आणि तरी तरतरी येत नाही मग रस्त्यात मिळेल तिथे मांडी घालून बसून एकदाची ती गुळाची पोळी हाणली की मग मात्र गड सर झाल्याचेच सूतोवाच. अहाहा.
असेच एकदा सरसगडाला चढताना डी-हायड्रेशन झाले म्हणून एकटाच बसलो होतो पायथ्याशी पोळ्या खात!!

पण यावेळची गोष्ट जरा वेगळी होती. आठवडाभर उर फुटेस्तोवर काम करून पाठीची हाडे आणि मणके खिळखिळे व्हायला आले होते. अमाप वेदना झाल्यावर शुक्रवारी कौटुंबिक वैद्य बुवाकडे गेल्यावर त्यांनी चक्क मला ताकीद दिली. मणक्याचा आजार झाला असून, खांद्यामधले वंगण ( Body Oil ) कमी झाले आहे. २ आठवडे सक्त विश्रांती घ्यावी लागेल. बरीच औषधे  आणि मलम यांचा भडिमार करूनही खांदादुखी काही थांबेना. शेवटी क्ष- किरण चाचणी करायचा सल्ला दिला गेला. X -Ray काढल्यावरच नक्की निदान होणार होते. मग गप्पपणे क्ष- किरण चाचणी करायला दुसऱ्या डॉक्टर कडे…. तिथे जवळ पास ३ तास पुरतील एवढी लोक आणि समोर एक सूचना वजा फलक. "मराठी भाषेत एका वाक्यात जास्तीत जास्त किती चुका आपण करू शकतो?"  अश्या स्पर्धे मधूनच त्या फलकाची निर्मिती झाली असावी. सुमारे तब्बल तीन तास तोच फलक वाचून वाचून मी इतका पकलो की जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी का आलो आहे हेच आठवेना. मग एका
"खली" सदृश माणसाने मला त्या दिव्याच्या प्रकाशात जवळ जवळ ढकलूनच दिले. खिसा शे पाचशे रुपड्यांनी नी रिकामा झाल्यावर हातात एक फोटो निगेटिव घेऊन मी घरी आलो आणि झोपून गेलो. 
कालच्या औषधांच्या भडिमाराने सकाळी उठल्यावर जरा बरे वाटायला लागले.  सकाळी सकाळी जाऊन मी तो 'क्ष- किरण' अहवाल डॉक्टर बुवांना दाखवला.  ट्रेक तर रद्द झालाच होता, पण तो माझ्यामुळे रद्द झाल्याने सकाळी सकाळी शिव्या सदृश फोन येतच होते. यातच २ आठवडे विश्रांतीच्या विचाराने मी तर वेडाच झालो होतो. आता यात अजून काही निघाले तर वाटच लागेल म्हणून मी कुतूहलाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. 
काय बरं वाटतंय का ?
हो आता बरे आहे जरा …. 
अरे, काही नाही झालेय, फक्त 'Muscular Spasm' आहे. दोन दिवसात होईल बरा.

मी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. तडक घरी गेलो, म्हणालो काही झाले नाहीये आता मी बरा आहे.
हे ऐकून भाची ने तिची शाळेचा "घ. अ." म्हणून थर्माकोल चे कमळ बनवायचे आहे असे फर्मान सोडले. मग आमची स्वारी कमळाच्या मागे… ४ थर्माकोल चे ग्लास, आणि असंख्य रंगांच्या पेट्या तिने उपलब्ध करून दिल्यावर माझी कारागिरी चालू झाली. २-३ तासांच्या (अथक) प्रयत्नांनंतर ते कमळ तयार झाले.


तेवढ्या वेळात भाची चे अजून एक चित्र काढून पूर्ण झाले.


खूप चेष्टा उडवल्यानंतर, चित्र नीट पाहिले. लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. बालमनाने साकारलेले ते पक्षी आणि कुत्रा( का मांजर) पाहून विचार आला की, तिच्या मनात "पक्षी दिसतो कसा" याचा फक्त साचा होता त्याला पंख वैगरे काढावे असे तिला वाटले नसावे. पण, त्यातही त्याला खाण्यासाठी दाणे द्यायला हि ती विसरली नव्हती.

असो,हि कामगिरी झाल्यावर जरा वामकुक्षी साठी टेकलो.

आता मात्र बरे होऊन मी दुसऱ्या संकटात सापडलो ते म्हणजे "दाखवायचा"फोटो काढून यायच्या. बऱ्याचं दिवस मातोश्री मागे लागल्या होत्या की लग्नाचे बघायला चालू करू.  जरा (तरी) बरा फोटो काढून आण तुझा, पण मी मात्र दरवेळी टाळाटाळ करत होतो. यासाठीच का, पण शनिवार- रविवार दोन दिवस मी झोपूनच घालवतो. हा दाखवायचा फोटो म्हणजे एक करामतच असते. शक्य तेवढे बरे कपडे अंगावर चढवून, चेहऱ्यावर २-३  किलो पावडर थापून, ( काहींच्या बाबतीत हि लिस्ट अजुन वाढते, एक दीड किलो लिपस्टिक, अर्धा लीटर नेलपॉलिश, वाटी भरून काजळ … असो.  ),चेहऱ्यावर उसने सोज्वळ भाव आणून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतरही विश्वाची आणि पर्यायाने आपली उत्पत्ती करणाऱ्याच्या आपल्यासाठीच्या "ब्लु प्रिंट" ची आणि त्या फोटोची तडजोड झाली नाही तर फोटोशॉप ची करामत सुरू … त्यात खाली परत ती करामत करणाऱ्या कारागिराचे नाव वळणदार अक्षरात …

जमेल तेवढी टाळाटाळ करून जरा निवांत बसलो तेवढ्यात आमच्या बहिणीचे आगमन झाले. एरवी माझ्याबरोबर कुठेही न येणाऱ्या आमच्या भगिनी, फोटो चा विषय निघाल्यावर " चल मी पण येते तुझ्याबरोबर, तो निळ्या चेक्स शर्ट घाल हा… आणि "अशी" पोझ दे" असे म्हणत त्या पोझ चे हि मार्गदर्शन झाले. आता मात्र गप्प जावे लागणार या विचारातच फोन वाजला.

"ए काय करतोयेस, बरेच दिवस गेलो नाही कुठे चल आपल्या तिकोना पॉइंट ला जाऊ" असे म्हणत मित्राचा फोन आला, मग म्हटले ट्रेक नाही तर नाही आपला आवडता "पॉइंट" तरी का सोडा?" पाठदुखी थांबून, आणि आपल्याला अजून काही झालेले नाही या आनंदाने निघालो आम्ही आमच्या पेटंट पॉइंट ला.
"हो" म्हणून फोन ठेवला. पुढच्या १०  मिनटात तो हजर. लगेच जर्किन,हेल्मेट वैगरे आभूषणे चढवून आमची यात्रा निघाली.

तिकोना पॉइंट म्हणजे एक अद्भुत जागा आहे. छोटा ब्रेक पाहिजे असेल तर यासारखी उत्तम जागा नाही. कोथरूड पासून ४५ - ४८  किमी अंतर असून एकदा पौड गाव सोडले की जास्त रहदारीही लागत नाही. खर्च तर जवळ जवळ नाहीच काही. फक्त पेट्रोल काय असेल ते.
कोथरूड पासून पौड गावाकडे जाताना, गावातूनच उजव्या हाताला "हाडशी" कडे जाणारा रस्ता पकडायचा. हाडशी येथे "श्री सत्य साईबाबा" यांचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे.  त्यामुळे हि जागा बऱ्याचं लोकांना माहीत असते. ४ वाजायच्या सुमारास कोथरूड, पुणे वरून निघालो, की पुढचं दीड तासात हाडशी मंदिरा ला आपण पोहोचतो. तिथून वरती मंदिरात न जाता पुढे 'पवना नगर" च्या दिशेने जावे. हाडशी पासून पुढे ७ किमी जाताना छोटा घाट लागतो. आणि मग एकदा 'तिकोना' किल्ल्याचे दर्शन झाले की की पुढे जात राहायचे. दहा मिनटे गेल्यावर एक निसर्गरम्य असे ठिकाण येते. तोच हा तिकोना पॉइंट.

  तिकोना पॉइंट वरून दिसणारे तुंग किल्ल्याचे मनोहारी दृश्य. 

पश्चिमे कडे तोड करून आपण उभे असतो. समोर उत्तुंग असा 'तुंग" किल्ल्याचे शिखर दिसते. त्याच्या भोवताली पवना धरणाचे निळेशार पाणी… मागे पहिले तर अजस्त्र असा तिकोना उभा. कोणताही गजबजाट  नाही. शांत अश्या जागेत पक्ष्यांचे किलबिलाट…. बघता बघता पश्चिमे कडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो.  फक्त आपण, तुंग, तिकोना, आणि सूर्यास्त.  खरंच निसर्गाच्या महानतेची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.
हा अनुभव मी असंख्य वेळेस घेतला असेल, पण प्रत्येक वेळी या निसर्ग कवितेचा निराळाच अर्थ मला लागतो. मी इथे प्रत्येक ऋतूत आलो असेन. पण प्रत्येक वेळेसच इथले मनोहारी दृश्य मनाला आनंद देऊन जाते.

बघता बघता पश्चिमेकडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो.

  मग जरासे फोटोग्राफी किडे चालू झाले.

तुंग आणि पवना धरणाचे सूर्यास्ताचे चित्र. 

फोटो काढता काढता काहीतरी आवाज झाला म्हणून बघितले तर हे सरडे बुवा हि आमच्या जोडीला होते सूर्यास्त बघायला . 

तिकोना किल्ला आणि साक्षीला चंद्र. 

मित्राच्या याच गाडीवर आम्ही आलो होतो. नवीन गाडी घेतल्यापासून कुठेही लांब गेलो नसल्याने तो तुफान गाडी पिदडत होता . घरातून निघताना तो बहुतेक " भीमरूपी महारुद्रा" वाचूनच आला असावा. आणि त्यातले " गतीशी तुलना नसे" हेच वाक्य लक्षात ठेवून तो वायू वेगाने गाडी हाकत होता. मागे बसण्याची सवय नसल्याने माझी मात्र पुरती पळापळ झाली होती. रस्त्यातले ट्राफिक, मिरवणुका, गावठी पब्लिक कोणालाच त्याने दाद लागू दिली नाही. रस्त्यात सैरावैरा धावणाऱ्या कोंबड्या हि आमच्या धास्तीने खुराड्यात जाऊन विसावल्या. ८० - ९० किमी वेगाने गाडी हाकताना, मध्ये एक ताबूत मिरवणूक चालली होती. पूर्ण ट्राफिक जाम असताना हे साह्येब वाट काढत जोरातच चालले होते. ताबुताला "कट" मारून आम्ही पसार झालो.रस्त्यात एके ठिकाणी चाललेली भांडणे हि त्याने मन वळवू शकले नाही. 

आता सूर्यास्त झाल्यावर वेध लागले ते हाडशी मंदिरात जायचे. मग ७ वाजेपर्यंत आम्ही मंदिरात पोहोचलो. अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था असलेले हे मंदिर कुटुंबाला घेऊन येण्यासाठी एकदम योग्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारची लूटमार, धार्मिक उदो उदो, बाजार नाही. देवाचा बाजार मांडलेल्या ( की ज्याच्यातून तो स्वतः, साक्षात देव हि सुटू शकत नाही अश्या ) "सो कॉल्ड" धार्मिक स्थळा सारखे हे नाही. इथे अत्यंत स्वच्छता, पार्किंग पासून सगळ्या सोयी ह्या विनामूल्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ऊद वाहकाची ( लिफ्ट) ची सोय आहे. रात्री अंधार पडल्यावर रंगेबेरंगी कारंजे चालू होतात. मंद आवाजात देवाचे श्लोक चालू असतात. सर्वत्र नेमलेली माणसे मदत करण्यास तत्पर. मंदिराच्या मागे असलेल्या तळ्यात पांढरी शुभ्र अशी बदके. पवनचक्क्या, ग्रंथालय, हिरवळ, शुद्ध पाणपोई. एकदम झकास असे दृश्य.

हेच ते हाडशी चे साई मंदिर. ( हा फोटो मागच्या खेपेस पावसाळ्यातील आहे. )

गणपती मंदिर आणि कारंजे
उंदीर मामांच्या हातातील भलामोठा लाडू बघून आम्हालाही भूक लागली.

 तडक मोर्चा खानावळीकडे वळवला. चहा जर बरा होता पण भेळ पुरती 'नापास' झाली होती. 


आता मात्र निघायची तयारी चालू झाली. परत सगळी आभूषणे चढवून आम्ही परत निघालो. आता जाताना मित्राचा वारू ( गाडी) मी हिशोबानेच हाकत होतो. 

घरी आल्यावर उद्याच्या हापिसाची तयारी चालू केल्यावर लक्षात आले की विकेंडला करू म्हणून थकवलेली सगळी कामे तशीच "आ" वासून उभी आहेत. आता खांदा अजून जोरात ठणकायला लागलाय. 'दाखवायचा फोटो " कधी बघायला मिळेल याची अपेक्षा विरून गेलीय.
पण मन मात्र रिफ्रेश झालेय. 
आता हीच स्फूर्ती मला बळ देईल, पुढचा आठवडाभर काम करण्यासाठी. 

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

लाल पेरु

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे. तुम्हाला ते जाणवणार नाही पण नुसते त्या दोन शब्दांच्या उच्चारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते. "मोठेपणी तू कोण होणार बाळा?" अश्या बाळबोध प्रश्नांना मी 'डॉक्टर, इंजिनिअर अशी टिपीकल उत्तरे न देत "पेरूवाला" होणार असे उत्तर देऊन सर्वांना चकित करायचो. ( आई वडिलांना लाज आणायचो असेही म्हणता येईल). पण खरंच, लहानपणापासून माझे स्वप्न होते ते पेरूवाला बनण्याचे. "किती मनसोक्त पेरू खायला मिळत असतील न या पेरूवाल्या काकांना? आणि त्यामुळेच हे एवढे चांगले असावेत का? पेरूवाल्या काकांचे गाव कोणते असावे?  नंतर भूगोल शिकल्यानंतर,  अमेरिकेमधील "पेरू" हा देश त्यांच्यामुळेच उदयास आले असावे का ?' असे असंख्य प्रश्न मला पडत असत.
२ रुपयांना मिळणारे पेरू हे जसे अमृताचा गोळा वाटायचे तसे, त्याचे ४ काप करून त्यात तिखट मीठ घालून हिरवागार पेरू देणारे काका हेच मला ईश्वराचे रूप भासायचे.

हिरवेगार तर कधी लाल पेरू खायची इच्छा झाली की मग आम्ही गावात घराच्या मागील पेरूच्या बागेत धूम ठोकायचो. मनसोक्त पेरू खाऊन  झाले की मग त्यातल्या बिया दाताने कडकड चावून कोणाचे दात जास्त चांगले याची स्पर्धा लागायची. गावातील जत्रेमध्ये व बाजारामध्ये पेरूवाले दिसले की प्रत्येकाला भाव विचारायचा आणि घ्यायचा मात्र  एखादाच. पण तो हि घ्यायला पराकोटीची हुज्जत, जिकीर.
एकदा एका झाडाला मोठा पाऊण किलोचा पेरू आल्याची बातमी कळली. ती म्हणजे आताच्या onsite पेक्षा मोठी बातमी होती. विकणाऱ्या व्यक्ती कडून त्याची इथम्भूत माहिती मिळवल्यावर तो आपल्याला परवडणार नाही असे वाटून झालेला हिरमोड, आई कडे त्याच्यासाठी धरलेला हट्ट, त्या काकांनी "आवडल्याय न पोराहो, मग जा की घेऊन " असे म्हणत फुकट देऊ केलेला तो मोठा पेरू, तत्क्षणी "You made my day" असे चेहऱ्यावर उमटलेले भाव, त्यानंतर तो घरी आणल्यानंतर लगेच खाऊन  संपायला नको म्हणून लपवून ठेवलेले ते दोन दिवस, आणि दोन दिवसांनी कापल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले आस्वाद. कधीही विसरू शकत नाही असे ते क्षण.

नंतर परत इथे शिक्षण चालू झाले की सगळे चोचले बंद व्हायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या पेरूवाल्या काकांकडे धाव घ्यायचो. पण खिशात पैसे नसल्याने अधाशी नजरेने ते बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पेरू कापताना त्याच्या देठाचा भाग जर जास्त कापला गेला की तो खाऊन त्या पेरूची चव "predict" करण्याचा प्रयत्न करायचो. यातच मग " कोणाचे दात जास्त चांगले?" या स्पर्धेचे "कोण लवकर झडप घालून देठाचे काप जास्त खातो" यामध्ये रूपांतर व्हायचे.

त्यानंतर बरेच वर्षे गेली. आयुष्य सावरण्याच्या गडबडीत हि माझी आवड कुठे लुप्त झाली कुणास ठाऊक? त्यानंतर परत माझा पेरू शी संबंध आला तो विमानतळावर. तेथील सामान तपासणी करणाऱ्या माणसाने " You can't take this with you" असे म्हणत माझ्या सामानातील पेरू बाहेर काढून चक्क फेकून दिले. आईने मला खूप आवडतात म्हणून आवर्जून आणून दिले होते. क्षणात माझ्या मस्तकात रागाची भावना उमटली. अनेक विनवण्या करूनही यश आले नाही. शेवटी माझ्या या जिवलगाशिवायच मी देश सोडून गेलो.

असाच एके दिवशी  मित्राची वाट बघत कार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती, अगदी फुटपाथ ला चिकटून. तेवढ्यात एक पेरू गाडीच्या डाव्या खिडकीतून आत गाडीत पडला."न्यूटन" ला सफरचंद पडल्यावर आणि त्यानंतर शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटींनी आनंद मला झाला. वाकून बघितले तर एक पेरू विकणारी मुलगी टोपलीत पेरू घेऊन फुटपाथवरून जात होती. अन जागा नसल्याने खेटून जाताना तो पेरू गाडीत पडला असावा.

 " साह्येब घ्या ना  एक पेरू,  छान हिरवेगार आहेत."
  " नाही नको "
" अहो साह्येब घ्या, लाल पेरू बी आहे. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा, थोडेच उरलेत ५-६, घ्या एखादा "

पटकन सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यातून झरझर सरला. मी काही रुपडे देऊन सगळे टोपलीतले पेरू खरेदी केले . लगेच खायला सुरवात केली. वेदनेने विव्हळ  झाल्यावर आठवले की बहुतेक दातांचे "रूट क्यानोल" झाले आहे. जेव्हा पेरूसाठी मी व्याकूळ व्हायचो अन दात चांगले होते , तेव्हा ते कधीच मिळाले नाहीत. आता टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे !!

अजूनही ते पेरू फ्रीज मध्येच आहेत. त्या लाल पेरूची चव मी अजूनही चाखली नाहीये.
कारण, आता स्पर्धा लागते ती दातांमध्ये, कोणी पहिला तुकडा तोडायचा याची.

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 


( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा  ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच  मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा  पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. 
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला  जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है  ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया  करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

रविवार, २० जानेवारी, २०१३

काचेचा लोलक

काचेचा लोलक


कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा ....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ...........
अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक. 
मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार ! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले. लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये. जवळ जवळ दर रविवार आपण दुर्गभ्रमंतीसाठी बाहेरच आहोत. मग म्हंटले चला  त्याचेच अनुभव शब्दांकित करूया. म्हणून बसलो ब्लॉग लिहायला.

असे का?

खरेतर मलाही नाही माहित असे का... हे म्हणून ते   की  ते म्हणून हे .....पण ..."If there is a cause, there is an effect".... असे बरेच "असे का" मला भेडसावत असतात .. मी जेव्हा जेव्हा नाव्ह्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही  न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे ?" असे का विचारतो ..आणि पुण्याचाच म्हंटल्यावर पुढचे काहीच न बोलता (स्वताच्या मनानीच) केस कापायला लागतो...( पु.ल. चे पुणेकर त्याने ऐकलेले  असावे बहुतेक...त्यात मी दुकानदार आहे हे हि त्यास ठाऊक असावे ....त्यामुळे पुणेरी बोली भाषे प्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करण्याची "कला " मला अवगत असावी असे त्यास वाटत असणार बहुतेक....)

परवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा ...."आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये ..आपल्यासाठी कोण काय करते ??? कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे ..." हे वाक्य बोलतानाच मी समोर पहिले कि एक मध्यमवयीन कामगार श्रेणीतला  माणूस आपली सायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून दुकानात  गेला..आणि एक बिस्कीट पुडा घेऊन आला. कामावरून घरी जाताना दमला असेल बहुतेक..लगेच  त्याच्याजवळ तीन चार कुत्री जमली आणि तो त्यांना ती बिस्किटे खाऊ घालू लागला....बऱ्याच  दिवसांची मैत्री असावी त्यांची बहुतेक..बिस्किटे संपल्यावर शांतपणे सायकल काढून तो गाणी म्हणत निघून गेला .."कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे" असे बोलेलेले वाक्य तोंडातच अडकून पडले ..हे मी कसे बोललो हे माझे मलाच आठवेना .... मी हे करू शकतो का ?? मी रस्त्यात थांबून त्या कुत्र्यांना खायचा घालेन का ? पैशाच्या मागे धावून आपण नक्की काय गमावतोय हाच प्रश्नाचा विचार करतो झोपले ...त्याचे उत्तर मला अजून कसे सापडले नाही... असे का ????

मध्यंतरी मोठ्या दुर्गा भ्रमंतीस  गेलो होतो .. नाशकातल्या बागलाण जिल्ह्यातले उत्तुंग असे मोठे किल्ले माझ्या एका मित्राबरोबर धुंडाळून  काढले...तिथे जाताना 'वाघाम्बे' नावाच्या गावात आम्ही मुक्काम ठोकला .. गावात राहण्याची सोय विचारताच  २-३ माणसे पुढे आली आणि त्यांनी एका मंदिराचा आश्रय दिला .. कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांनी आमची  राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था करून दिली..कोणाच्याही चेहऱ्यावर अपेक्षेचा लवलेश हि नव्हता .. गावात अजून माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला. आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट  पैशात तोलण्याचा स्वभावाचे बळी .. किती घेणार? हा प्रश्न आम्हास सुटेना... किल्ला चढून गेल्यावर दरवेळी प्रमाणे वाट चुकल्यानंतर ( इथे पु.ल.चा एक विनोद आठवला ...कि आमचे रिझर्वेशन खुद्द इंजिनात झाले असले तरी चुकून आम्ही पहिल्यांदी गार्डच्या डब्यातच शिरणार ..) आम्हास एक गुराखी भेटला ..पूर्णतः निर्मनुष्य अश्या डोंगर रांगा  मध्ये तो आम्हाला देवासारखा भेटला...त्याने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला आणि परत आंम्ही जाऊन येइपर्यत आमच्या सामानाची  राखण केली...आम्ही त्याला आमच्याबरोबर जेवायला बसवले ..बरेच प्रश्न विचारले तरी तो मोजकीच उत्तरे देत होता ..त्याला संकोच वाटत असावा असे वाटले म्हणून मी त्याला "अरे खा रे पोटभर" असे म्हणत गुळाची पोळी दिली...गुळाची पोळी तो प्रथमच खात होता असे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले.. थोड्या वेळाने तो बोलता झाल्यावर म्हणाला कि तो 'महाधर' नावाच्या गावात राहतो आणि शेळ्या घेऊन डोंगरावर येतो .पोटापाण्यासाठी रोजंदारी करायला तालुक्याच्या गावास जातो काधीकाही..पण जायचे पैसे नसले कि उपाशीच बसून राहतो..."सकाळी भाकरी खाऊन आलों होतो रानात आणि संध्याकाळी ५ वाजता घरी परत गेल्यावर खाईन आता" .... आणि पाण्याचे काय ???? "गावामध्येच पिण्यासाठी पाणी नाही आमच्या . इथे कसे घेऊन येऊ ???गावात साधे किरणा  दुकानही नाही तर रोजचा काय शिधा आणणार? आणि कामही काय करणार ? आकाश पांघरून बसतो आणि आणि एखाद्या ओढ्याने तहान भागवतो ... तुमचे बरे  असते कि तुम्हाला नोकरी असते"..हे  त्याचे वाक्य ऐकून  मी खरेच विचारात पडलो. रोजच्या टेन्शन मधून बाहेर पडायचे म्हणून असे फिरण्याचे उपाय अवलंबतो रे आम्ही...खरेच आमचे बरे आहे??? निसर्गाच्या सहवासाचा मागमूसही नाही रे आम्हाला??? चिवचिवणारी चिमणी मी कधी शेवटची बघितली बरे ??? आकाशात चंद्र आणि लुकलुकणारे तारे असतात याची आठवण होते आम्हाला घराच्या भिंतीवरचे रेडियम चे तारे बघून रे.... कपडे आणि बूट भिजतील म्हणून पावसाला किती वेळा डावलले आम्ही???  बहिणाबाई च्या कवितेची आजीची गोधडी अजून कशी ठीगळे  लावलेली ??? टायर खेळतानाची मजा आता फक्त कॅमेरात बंदिस्त करतो आम्ही ...
व्ह्यर्र्र्र्र्र्र्र्र्र ....... अरे हा कुठला आवाज ?????  तो शेळ्या च्या मागे धावत केव्हाच गेला होता .....आमच्या करून कहाण्या ऐकण्यात  त्यालाही रस नसवा बहुतेक...जाताना म्हणाला कि माझे तेवढे मोबाईल चे रिचार्जे करता का तालुक्याच्या गावाला  गेल्यावर ?? नाहीतर मला तेवढ्यासाठी जावे लागेल तिथे ..आम्ही त्याचा क्रमांक घेतला आणि जातो म्हणालो पुढे किल्ल्यावर ... उतरताना दुसरया  गावातून उतरीन म्हणतो किल्ला ... असे म्हणत खिशाकडे हात टाकला .... नको  म्हणत तो जाऊ लागला ..तरीही ६० रुपये देऊ केले आम्ही .. तालुक्याच्या गावास गेल्यावर त्याचे २० रूपयांचे रिचार्जे केले तोच त्याचा फोन आला..धन्यवाद म्हणून....किल्ला उतरताना आमच्या गावाहून.. आमच्या घरी या  ...हे त्याचे वाक्य मनात मात्र घर करून गेले .. ज्याला रोज या दोन वेळच्या जेवणा साठीची मारामार.. तरीही त्याचे मन मोठे होते ... नंतर मात्र भटकंती झाल्यावर जाताना प्रवास हिशोब करताना आम्ही  दोघांनी ते ६० रुपये अर्धे अर्धे खर्च म्हणून वाटून घेतले ....
असे का ????

कित्येक दिवस बाहेरचे खायला न मिळाल्यामुळे मोर्चा Macdi कडे वळवला ...शे पाचशे रुपडे असे उडले. येताना मात्र एक प्रसंग आठवला ..मुंबई ला गेलो असतानाचा.. आमचे खास मित्र आणि भ्रमंतीचे फोटोग्राफर कोतकर साहेब हे दिमतीला हजर होते. गेटवे ऑफ इंडिया ला जायचा प्लान करून आम्ही तिथे पोहोचलो .. खरेच हौशे आणी  गौशे दोघांसाठीची हे स्थान .. एक माणूस काकडी विकत उभा होता.. विकण्यासाठी त्याने काढलेल्या काकड्या च्या साली हि त्याने तिखट मीठ लाऊन विकण्याचा घाट  घातला होता.. १ रु च्या ५ साली ...आणि खाणारी मंडळीही १ रु देऊन त्या ५ साली खात होती ... मी वेडाच झालो हे बघून .. रोजचा संघर्ष म्हणजे काय असतो .. प्रत्येकाच्या पाजवी ला हा पुजलेला कसा ?
असे का ???

सर, आज मी शाळेतून लवकर घरी जाऊ  का?
आजीबात नाही का ???
सर माझे  पाय खूप दुखत आहेत हो सर.. मला उभे पण राहवत नाहीये ..तुम्ही प्लीज माझ्या घरी फोन करा सर ....
आता काही नाही मधल्या सुट्टीत बघू...गपचूप बस जागेवर ....
सर मला काहीच सुचत नाहीये ...खूप पाय दुखातायेत हो सर ..पायातली शक्ती गेलीय ...त्याचे डोळे पाणावले ..
आजीबात फालतूपणा नकोय....शाळा सुटेपर्यंत  थांब आणि जा मग .. आणि माझ्याकडे फोन साठी पैसे नाहीयेत मोबाईल मध्ये ....
अखेरीस शाळा सुटेपर्यंत त्याला मी थांबवलेच ... मुलांना शिस्त नाहीये...
४-५ दिवसांनी .... अहो सर तुमच्या वर्गातला तो "..." नावाचा मुलगा येत नाही का हो???
नाही .. तो सध्या येत नाही..आणि आता येऊ शकेल असे वाटत नाही.....
का ????
पोलिओ झालाय त्याला .. ट्रीटमेंट  चालू आहे ...
ओह्ह ... जर मी त्याला लवकर सोडले असते त्या दिवशी तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला असता ??
शिस्त म्हणून त्याला आयुष्यभराचा नको असलेला सोबती मिळाला ...
असे का ???

आपल्यातील चंचलता वाढली आहे .. घरी गरम वरण भात तूप लिंबू असताना आपण नाक्यावर जाऊन वडापाव खातो ...वडापाव रोज खावा लागणाऱ्याची चेष्टा यात नाही ..पण कुठेतरी "चांगल्याला" सुरवात करण्याची गरज आहे असे जाणवले...
असे का ?

परवाच एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी म्हणाला कि.. शांता शेळ्के यांच्या कवितेतला तो देवळातील झुंबरातील काचेचा लोलक (Prism) आपण आपल्या आयुष्यातून हरवत चाललोय...
देवळातील  झुंबरातुन सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून ....
आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा माणसासारखी ...गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे ..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली आणि म्हणाली , आजी , गवत नसते नुसतेच  हिरवे आणि आकाश नसते नुसतेच निळेशार . आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली ...
अरेच्चा माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे ??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक ?



उत्तराच्या शोधार्थ मी आहेच ....आपणास काही सुचते का याचे उत्तर ????