बुधवार, २३ जानेवारी, २०१३

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 


( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा  ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच  मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा  पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. 
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला  जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है  ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया  करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

रविवार, २० जानेवारी, २०१३

काचेचा लोलक

काचेचा लोलक


कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा ....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ...........
अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक. 
मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार ! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले. लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये. जवळ जवळ दर रविवार आपण दुर्गभ्रमंतीसाठी बाहेरच आहोत. मग म्हंटले चला  त्याचेच अनुभव शब्दांकित करूया. म्हणून बसलो ब्लॉग लिहायला.

असे का?

खरेतर मलाही नाही माहित असे का... हे म्हणून ते   की  ते म्हणून हे .....पण ..."If there is a cause, there is an effect".... असे बरेच "असे का" मला भेडसावत असतात .. मी जेव्हा जेव्हा नाव्ह्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही  न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे ?" असे का विचारतो ..आणि पुण्याचाच म्हंटल्यावर पुढचे काहीच न बोलता (स्वताच्या मनानीच) केस कापायला लागतो...( पु.ल. चे पुणेकर त्याने ऐकलेले  असावे बहुतेक...त्यात मी दुकानदार आहे हे हि त्यास ठाऊक असावे ....त्यामुळे पुणेरी बोली भाषे प्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करण्याची "कला " मला अवगत असावी असे त्यास वाटत असणार बहुतेक....)

परवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा ...."आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये ..आपल्यासाठी कोण काय करते ??? कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे ..." हे वाक्य बोलतानाच मी समोर पहिले कि एक मध्यमवयीन कामगार श्रेणीतला  माणूस आपली सायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून दुकानात  गेला..आणि एक बिस्कीट पुडा घेऊन आला. कामावरून घरी जाताना दमला असेल बहुतेक..लगेच  त्याच्याजवळ तीन चार कुत्री जमली आणि तो त्यांना ती बिस्किटे खाऊ घालू लागला....बऱ्याच  दिवसांची मैत्री असावी त्यांची बहुतेक..बिस्किटे संपल्यावर शांतपणे सायकल काढून तो गाणी म्हणत निघून गेला .."कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे" असे बोलेलेले वाक्य तोंडातच अडकून पडले ..हे मी कसे बोललो हे माझे मलाच आठवेना .... मी हे करू शकतो का ?? मी रस्त्यात थांबून त्या कुत्र्यांना खायचा घालेन का ? पैशाच्या मागे धावून आपण नक्की काय गमावतोय हाच प्रश्नाचा विचार करतो झोपले ...त्याचे उत्तर मला अजून कसे सापडले नाही... असे का ????

मध्यंतरी मोठ्या दुर्गा भ्रमंतीस  गेलो होतो .. नाशकातल्या बागलाण जिल्ह्यातले उत्तुंग असे मोठे किल्ले माझ्या एका मित्राबरोबर धुंडाळून  काढले...तिथे जाताना 'वाघाम्बे' नावाच्या गावात आम्ही मुक्काम ठोकला .. गावात राहण्याची सोय विचारताच  २-३ माणसे पुढे आली आणि त्यांनी एका मंदिराचा आश्रय दिला .. कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांनी आमची  राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था करून दिली..कोणाच्याही चेहऱ्यावर अपेक्षेचा लवलेश हि नव्हता .. गावात अजून माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला. आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट  पैशात तोलण्याचा स्वभावाचे बळी .. किती घेणार? हा प्रश्न आम्हास सुटेना... किल्ला चढून गेल्यावर दरवेळी प्रमाणे वाट चुकल्यानंतर ( इथे पु.ल.चा एक विनोद आठवला ...कि आमचे रिझर्वेशन खुद्द इंजिनात झाले असले तरी चुकून आम्ही पहिल्यांदी गार्डच्या डब्यातच शिरणार ..) आम्हास एक गुराखी भेटला ..पूर्णतः निर्मनुष्य अश्या डोंगर रांगा  मध्ये तो आम्हाला देवासारखा भेटला...त्याने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला आणि परत आंम्ही जाऊन येइपर्यत आमच्या सामानाची  राखण केली...आम्ही त्याला आमच्याबरोबर जेवायला बसवले ..बरेच प्रश्न विचारले तरी तो मोजकीच उत्तरे देत होता ..त्याला संकोच वाटत असावा असे वाटले म्हणून मी त्याला "अरे खा रे पोटभर" असे म्हणत गुळाची पोळी दिली...गुळाची पोळी तो प्रथमच खात होता असे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले.. थोड्या वेळाने तो बोलता झाल्यावर म्हणाला कि तो 'महाधर' नावाच्या गावात राहतो आणि शेळ्या घेऊन डोंगरावर येतो .पोटापाण्यासाठी रोजंदारी करायला तालुक्याच्या गावास जातो काधीकाही..पण जायचे पैसे नसले कि उपाशीच बसून राहतो..."सकाळी भाकरी खाऊन आलों होतो रानात आणि संध्याकाळी ५ वाजता घरी परत गेल्यावर खाईन आता" .... आणि पाण्याचे काय ???? "गावामध्येच पिण्यासाठी पाणी नाही आमच्या . इथे कसे घेऊन येऊ ???गावात साधे किरणा  दुकानही नाही तर रोजचा काय शिधा आणणार? आणि कामही काय करणार ? आकाश पांघरून बसतो आणि आणि एखाद्या ओढ्याने तहान भागवतो ... तुमचे बरे  असते कि तुम्हाला नोकरी असते"..हे  त्याचे वाक्य ऐकून  मी खरेच विचारात पडलो. रोजच्या टेन्शन मधून बाहेर पडायचे म्हणून असे फिरण्याचे उपाय अवलंबतो रे आम्ही...खरेच आमचे बरे आहे??? निसर्गाच्या सहवासाचा मागमूसही नाही रे आम्हाला??? चिवचिवणारी चिमणी मी कधी शेवटची बघितली बरे ??? आकाशात चंद्र आणि लुकलुकणारे तारे असतात याची आठवण होते आम्हाला घराच्या भिंतीवरचे रेडियम चे तारे बघून रे.... कपडे आणि बूट भिजतील म्हणून पावसाला किती वेळा डावलले आम्ही???  बहिणाबाई च्या कवितेची आजीची गोधडी अजून कशी ठीगळे  लावलेली ??? टायर खेळतानाची मजा आता फक्त कॅमेरात बंदिस्त करतो आम्ही ...
व्ह्यर्र्र्र्र्र्र्र्र्र ....... अरे हा कुठला आवाज ?????  तो शेळ्या च्या मागे धावत केव्हाच गेला होता .....आमच्या करून कहाण्या ऐकण्यात  त्यालाही रस नसवा बहुतेक...जाताना म्हणाला कि माझे तेवढे मोबाईल चे रिचार्जे करता का तालुक्याच्या गावाला  गेल्यावर ?? नाहीतर मला तेवढ्यासाठी जावे लागेल तिथे ..आम्ही त्याचा क्रमांक घेतला आणि जातो म्हणालो पुढे किल्ल्यावर ... उतरताना दुसरया  गावातून उतरीन म्हणतो किल्ला ... असे म्हणत खिशाकडे हात टाकला .... नको  म्हणत तो जाऊ लागला ..तरीही ६० रुपये देऊ केले आम्ही .. तालुक्याच्या गावास गेल्यावर त्याचे २० रूपयांचे रिचार्जे केले तोच त्याचा फोन आला..धन्यवाद म्हणून....किल्ला उतरताना आमच्या गावाहून.. आमच्या घरी या  ...हे त्याचे वाक्य मनात मात्र घर करून गेले .. ज्याला रोज या दोन वेळच्या जेवणा साठीची मारामार.. तरीही त्याचे मन मोठे होते ... नंतर मात्र भटकंती झाल्यावर जाताना प्रवास हिशोब करताना आम्ही  दोघांनी ते ६० रुपये अर्धे अर्धे खर्च म्हणून वाटून घेतले ....
असे का ????

कित्येक दिवस बाहेरचे खायला न मिळाल्यामुळे मोर्चा Macdi कडे वळवला ...शे पाचशे रुपडे असे उडले. येताना मात्र एक प्रसंग आठवला ..मुंबई ला गेलो असतानाचा.. आमचे खास मित्र आणि भ्रमंतीचे फोटोग्राफर कोतकर साहेब हे दिमतीला हजर होते. गेटवे ऑफ इंडिया ला जायचा प्लान करून आम्ही तिथे पोहोचलो .. खरेच हौशे आणी  गौशे दोघांसाठीची हे स्थान .. एक माणूस काकडी विकत उभा होता.. विकण्यासाठी त्याने काढलेल्या काकड्या च्या साली हि त्याने तिखट मीठ लाऊन विकण्याचा घाट  घातला होता.. १ रु च्या ५ साली ...आणि खाणारी मंडळीही १ रु देऊन त्या ५ साली खात होती ... मी वेडाच झालो हे बघून .. रोजचा संघर्ष म्हणजे काय असतो .. प्रत्येकाच्या पाजवी ला हा पुजलेला कसा ?
असे का ???

सर, आज मी शाळेतून लवकर घरी जाऊ  का?
आजीबात नाही का ???
सर माझे  पाय खूप दुखत आहेत हो सर.. मला उभे पण राहवत नाहीये ..तुम्ही प्लीज माझ्या घरी फोन करा सर ....
आता काही नाही मधल्या सुट्टीत बघू...गपचूप बस जागेवर ....
सर मला काहीच सुचत नाहीये ...खूप पाय दुखातायेत हो सर ..पायातली शक्ती गेलीय ...त्याचे डोळे पाणावले ..
आजीबात फालतूपणा नकोय....शाळा सुटेपर्यंत  थांब आणि जा मग .. आणि माझ्याकडे फोन साठी पैसे नाहीयेत मोबाईल मध्ये ....
अखेरीस शाळा सुटेपर्यंत त्याला मी थांबवलेच ... मुलांना शिस्त नाहीये...
४-५ दिवसांनी .... अहो सर तुमच्या वर्गातला तो "..." नावाचा मुलगा येत नाही का हो???
नाही .. तो सध्या येत नाही..आणि आता येऊ शकेल असे वाटत नाही.....
का ????
पोलिओ झालाय त्याला .. ट्रीटमेंट  चालू आहे ...
ओह्ह ... जर मी त्याला लवकर सोडले असते त्या दिवशी तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला असता ??
शिस्त म्हणून त्याला आयुष्यभराचा नको असलेला सोबती मिळाला ...
असे का ???

आपल्यातील चंचलता वाढली आहे .. घरी गरम वरण भात तूप लिंबू असताना आपण नाक्यावर जाऊन वडापाव खातो ...वडापाव रोज खावा लागणाऱ्याची चेष्टा यात नाही ..पण कुठेतरी "चांगल्याला" सुरवात करण्याची गरज आहे असे जाणवले...
असे का ?

परवाच एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी म्हणाला कि.. शांता शेळ्के यांच्या कवितेतला तो देवळातील झुंबरातील काचेचा लोलक (Prism) आपण आपल्या आयुष्यातून हरवत चाललोय...
देवळातील  झुंबरातुन सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून ....
आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा माणसासारखी ...गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे ..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली आणि म्हणाली , आजी , गवत नसते नुसतेच  हिरवे आणि आकाश नसते नुसतेच निळेशार . आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली ...
अरेच्चा माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे ??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक ?



उत्तराच्या शोधार्थ मी आहेच ....आपणास काही सुचते का याचे उत्तर ????