खिरेश्वर - टोलारखिंड - हरिश्चंद्र बालेकिल्ला - नेढं - जुन्नर दरवाजा / राजनाळ - खिरेश्वर ( १३ किमी. )

खिरेश्वर - टोलारखिंड - हरिश्चंद्र बालेकिल्ला - नेढं - जुन्नर दरवाजा / राजनाळ - खिरेश्वर ( १३ किमी. )
डिगेवस्ती मुक्कामी, 40 किलोमीटरची, देशावरच्या खतरनाक थंडीची तर कोकणातल्या कमालीच्या उकाड्याची अफलातून अशी भटकंती.
रात्रीच्या गर्द अंधारात थंडीशी दोन हात करत काही अमानवीय टाळकी घोळ च्या दिशेने मार्गक्रमण करीत होती. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. गाडीच्या टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच श्वान मंडळींनी त्यांना आम्ही एवढ्या रात्री झोपमोड केल्याचे रुचले नसल्याचे जाणवून दिले. आसमंतात लाखो ताऱ्यांची नक्षी उमटलेली अनुभवत गावातील विठ्ठल मंदिरात पथारी पसरली. पाठ टेकली तसे दहा वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक दामटत आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. उद्याच्या रग्गड पायपिटीची मनोमन तयारी करून डोळे मिटले.
पहाटे पाच वाजता आवरून रामभाऊंचे दार ठोठावले. पुढचे दोन दिवस सत्तर वर्षांचे रामभाऊं आम्हाला या निर्बीड जंगलात मार्गदर्शन करणार होते. सुमधुर चहा-पोहे यांचा पोटोबा करून पाठपिशव्या चढवल्या आणि गारजाई वाडीच्या वाटेने मंडळी निघाली. आत्तापर्यंत अनेक वेळा या रस्त्याने येणे झाले होते पण येथे पुरातन महादेवाचे मंदिर आहे हे ज्ञात नव्हते. रामभाऊंनी खास वाट वाकडी करून हे मंदिर दाखवले. तासाभरात गारजाईवाडीत पोहोचून कावळ्या घाटाने कोकणात उतराईस प्रारंभ केला. कोकणदिव्याला वळसा घालून उजवीकडून कावळ्या घाटात पोहोचलो. या घाटातली वाट कारवी पासून मोकळी करायची जबाबदारी घोळ आणि सांदोशी येथील लोकांनी घेऊन मोठी प्रशस्त वाट बनवलीये. वाटेत एक मोठा आंबा लागला तेव्हा रामभाऊंनी खास थांबून ती जागा दाखवली. पंचक्रोशीत जेव्हा लग्न असते आणि लग्नाचे वऱ्हाड घाटातून जाते तेव्हा या आंब्याच्या झाडाशी वऱ्हाडाची पाण्याची सोय करायची जबाबदारी असते नवऱ्या मुलाची! काही जागा खास आपले अस्तित्व टिकवून असतात त्या अश्या!
कावळ्या घाटाने उतरून पोहोचलो कोकणातील सांदोशी गावात. अलीकडे दोन फाटे फुटतात तेथून उजवीकडील वाट कावळे गावात जाते तर डावीकडील सांदोशी गावात. येथे मागे कोकणदिवा तर समोर अभेद्य असा दुर्गदुर्गेश्वर रायगड. रामभाऊंचे सासरचे गाव म्हणून त्यांना आम्हाला गाव दाखवायचे होते पण आदल्या दिवशी गावात निधन झाल्याने गावात जाऊन पाणी भरणे योग्य नाही या विचाराने गावाबाहेरूनच वरात निघाली. गावाबाहेरील मंदिरात हरिनामसप्ताह असल्या कारणाने प्रसाद आयोजित केला होता. तेथील मंडळींनी एवढाली मोठी बोचकी पाठीवर घेऊन चाललात तरी कुठे? म्हणत मंदिरात प्रसादास बसवले. नुकतेच शाळेतील विद्यार्थी आले होते ते छान हात जोडून देवाचे स्तोत्र म्हणत होते. प्रेमाने दिलेल्या त्या प्रसादाने पोटाला आधार आला. उपमा, चहा, पाणी भरून गप्पागोष्टी झाल्या. "पॅन्ट पन्नास रुपयांची असो वा पाच हजाराची, चेन साठी जागा सोडावीच लागते हो" या अश्या भन्नाट वाक्यांनी काकांनी "आयुष्यातली गोळाबेरीज सारखीच" हे चपखल पटवून दिले.
सांदोशी मधून नमस्कार-चमत्कार करून मंडळी निघाली ती वारंगी च्या दिशेने. रायगडाच्या प्रभावळीतील ही गावे. रायगडाला वेढा पडायचा तेव्हा या प्रभावळीतील गावांमध्ये मुक्काम पडायचा. म्हणून येथे अनेक पुरातन अवशेष आणि वीरगळी दिसल्या. नारायण आताशा डोईवर येऊन ठेपलेले. वाढते ऊन आणि कोकणातील दमटपणा यांची ट्रेकर मंडळींची परीक्षा सुरु झाली. सांदोशी गाव सोडताच दोन मोठे मारुती बाप्पा आणि दहा बारा वीरगळी दिसल्या. त्या पाहून "बावळे" गावात गेलो. येथील वारंगी. मागच्या वर्षी "सिंहगड ते रायगड" गेलेलो तेव्हा वारंगी गावातून गेलेलो याची आठवण झाली.
रामभाऊंनी प्रत्येक गावात ओळख असल्याने सांदोशीत उपमा चहा झाला तर वारंगीत परत चहा झाला. आता येथून भर उन्हातली बोचेघोळ वाटेची चढाई म्हणजे खरी सत्त्वपरीक्षा. पाणी भरून, बाप्पाचे नाव घेऊन बोचेघोळ चढाई चालू केली. सर्वांगावर घामाच्या धारा सुरु झाल्या. धपापत्या छातीने श्वास फुलला होता. दुपारी एक वाजता चढाई सुरु केली ती बोचेघोळ माथ्यावर पोहोचायला पाच वाजले. आताशा १८ किलोमीटर्स होत आले होते आणि चढाईने अंगातले त्राण संपत आलेले होते. मागील वर्षी निसणीची वाट - बोचेघोळ केली असल्याने वाट परिचयाची वाटत होती पण माथ्यावर आल्यावर एका अश्या स्पॉट ला आलो जेथून कुठे जायचे समजेना. रामभाऊ जवळपास दहा वर्षाने येथे येत असल्याने त्यांनाही खात्रीशीर माहित नव्हते. आताशा सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पश्चिमेला उमटलेल्या केशर झालरीत कोकणदिवा आणि पोमाड्याच्या डोंगर उठून दिसू लागलेला. इतक्यावेळ ऊन आणि चढाईशी चालू असलेला सामना आता तिरंगी झाला. आता वेळेशी ही सामना सुरु झाला. आत्ता जर वाट चुकलो तर अंधारात डिगेवस्ती शोधावी लागणार होती.
अश्या वेळेस एक युक्ती कामाला आली. दोन-तीन वेळा जोरात शिट्टी वाजवली. तिसऱ्या शिट्टीला उत्तरेकडून कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज आला आणि येथे वस्ती असल्याची खात्री झाली. धावत तेथे पोहोचलो तेव्हा हेच डिगेवस्ती आहे वाटले होते पण तेथे गेलो तेव्हा कळले कि या वस्तीचे नाव आहे "बिंडाची वाडी" आणि डिगेवस्ती अजून तास-दिड तास आहे. हे ऐकल्यावर ट्रेकर मंडळींचे अवसान गळाले पण उपाय नसल्याने जड पावले उचलत मंडळी अंधारात डिगेवस्तीच्या दिशेने निघाली.
बिंडाची वाडी येथून एका तरुणाने वाट दाखवली आणि एक डोंगर चढून आलो तसे लांबवर दिवे दिसू लागले. हीच ती खानू डिगेवस्ती. वस्तीत पोहोचलो तेव्हा आठ वाजलेले. सकाळी सात ते रात्री आठ असा तेरा तासांची आजच्या दिवसाची भटकंती पूर्ण झाली. आजचा मुक्काम नवीन तयार झालेल्या शाळेत होता. आजच शाळेचे उदघाट्न झाले होते. आमदार आले असल्याने गावजेवण होते. आम्ही नशीबवान म्हणत जेवणाची सोय झाली. जेवण करून नवीन शाळेतील पहिला मुक्काम आमचाच म्हणत पथारी पसरली. जोरदार थंडी आणि वारा यामुळे मुक्कामास चार चाँद लागले. आज पंचवीस किलोमीटर्स ची पायपीट झाली होती. एका दिवसात दोन फक्कड घाटवाटा पदरात पाडून घेतल्याने मंडळी खुशीत निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.
दिवस दुसरा : खानु डिगेवस्ती - टेकपोळे - हिर्ड्याचा दांड - घोळ.
सरपंचाच्या घरी चहा आणि नाश्ता करून दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. आज त्यामानाने छोटी चाल होती. वस्तीच्या थोडे मागे गेलो तसे सूर्योदयाच्या सोहोळ्याचे पडघम वाजू लागलेले. समोर रायलिंग पठार-लिंगाणा आणि त्याखाली ढगांची चादर. नारायणाच्या आगमनाने संपूर्ण परीसर सोनसळी किरणांनी नाहून निघाला. डिगेवस्तीतून आता प्रयाण केले ते टेकपोळेच्या दिशेने. सरपंचाचे वडील आम्हाला जंगलात घुसणारी वाट दाखवायला आले. ती वाट अश्या ठिकाणी होती कि आम्हाला कधीच सापडली नसती. येथून आता मातीचा गाडीरस्ता सोडून घोळ गावाच्या दिशेने जाणारी वाट धरली.
येथून आता पहिल्यांदी एक डोंगर चढून-उतरून टेकपोळे गावात उतरायचे होते आणि तेथून दोन वाटा घोळ ला जायला - आंब्यांचा दांड किंवा हिरड्याचा दांड. यातील आंब्याचा दांड वाट मागे झाली असल्याने आणि बरीच लांब असल्याने हिरड्याचा दांड वाटेने जायचे ठरविले. हिरड्याचा दांड वाट सती मंदिरापासून घोळ गावात उतरते तर आंब्याचा दांड वाट सती मंदिरापासून मोठा वळसा घालून गारजाई वाडीत उतरते. वाटेत दोन छोट्या वस्त्या लागल्या तेथे थंडगार ताक मिळाले. येथील लोकांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष पाहून जड अंतकरणाने येथून निरोप घेऊन सती मंदिर दिशेने चालू लागलो.
सती मंदिर पाहून घोळच्या दिशेने शेवटची चाल चालू झाली. पानशेत धरण दिसू लागले तसे आपल्या इलाक्यात आल्याची जाणीव झाली. तासाभरात धारेने चालत घोळ खिंडीतल्या डोंगरावर आलो तेव्हा चहुबाजूनी डोंगराने वेढलेले घोळ गाव दिसले. हाच तो आनंदाचा क्षण. आजची छोटी छोटी म्हणत चाल सोळा किलोमीटरची भरली. खिंडीतून खाली उतरून गावात आलो तेव्हा ४२ किलोमीटर्स भरत आले होते. रामभाऊंच्या घराच्या समोर बादलीभर पाणी डोक्यावर ओतून घेतले आणि ट्रेकची सांगता झाली. शारीरिक कसोटी पाहणारा, ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार असलेल्या घाटवाटांच्या चढाई-उतराईचा, असंख्य आठवणी आणि दुर्गम वस्तीतल्या निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारा असा सर्वांगसुंदर ट्रेकची समाप्ती जाहली.
YouTube Link :
वाचत राहा.
सागर
रविवारची भटकंती :
भटकंती सह्याद्रीच्या कुशीतील अवघड पण अत्यंत्य देखण्या अश्या घाटवाटांची - घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार.
सहयाद्रीतील काही जागाच अश्या आहेत ना कि बघताक्षणी प्रेम! त्या यादीतील बहुप्रतीक्षित अशी हि भटकंती होती. मागच्या वर्षी काही ट्रेकभिडु जाऊन आलेले तेव्हा फोटो बघूनच जायचे नक्की केलेले तर तो योग आज जुळून आला.
आता घोडेपाण्याची नाळ चढताना दिसणारे सहयाद्रीचे अद्वितीय रूप पाहायचे असेल तर पहिले "सिंगापूर" ला जाणे आले. मग काय सकाळी ब्राम्हमुहूर्तावर पुण्यनगरी सोडून सिंगापूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रथाचे सारथी अत्यंत कुशल असल्याने तेवढ्या वेळात निद्रादेवीला प्रसन्न करून घेतले. ग्रुपमधले ट्रेकभिडु शरदभाऊंनी हा ट्रेक आधी दोन वेळेस केला असल्याने जायचा रस्ता, चढाईची वाट, वाटाड्या, gpx फाईल या कशाच्याही फंदात न पडता त्यांच्या पाठीमागे चालत सुटणे आणि निसर्गाच्या अदभूत सौन्दर्याने मंत्रमुग्ध होत जाणे एवढेच काय ते ध्येय होते.
नाणेघाट आणि दाऱ्या घाट या कोकण प्रदेश आणि देश यांना जोडणाऱ्या फार पूर्वीपासून प्रचलित अश्या वाटा होत्या. आजही स्थानिक लोक याच वाटांचा वापर करतात. या वाटांवर असलेल्या राबत्यामुळे त्या जिवंत राहिल्या तश्या या दोन वाटांच्या उदरात वसलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या वाटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच या वाटा जागत्या ठेवल्या तरच इथली दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील.
असो! तर सकाळी आठ वाजता घोडेपाण्याची नाळेची चढाई चालू झाली. पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा पत्ताच नव्हता. समोर जीवधन किल्ल्यावर आणि वनरलिंगीवर चढलेला सोनेरी रंग बघून नाळेच्या माथ्यावरून झकासपैकी दृश्य दिसणार याची खात्री झाली. वाटेने वाहणारे बारीकसे पाण्याचे प्रवाह ओलांडत पाण्याच्या वाटेने म्हणजे नळीतून मंडळी मार्गक्रमण करीत होती. रमतगमत आणि नियमित फोटो ब्रेक घेत चार तासात माथ्यावर पोहोचलो. येथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र राकट नजारा म्हणजे काय वर्णावा? शब्द आणि प्रतिभा दोन्ही तोकडं पडेल निव्वळ असा!
चढाई करताना अजस्त्र वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता थिटे वाटू लागले होते. या दोन सुळक्यांच्या मागून जीवधन किल्ला आणि वानरलिंगी उंच आभाळात झेपावलेले ! त्याच्या डावीकडून नानाचा अंगठा हळूच डोकं वर काढत होता. माथ्यावर संपूर्ण कारवीचेच साम्राज्य! एवढ्या दुर्गम जागेवर बिबट्याचची विष्ठा पाहून साहेब या प्रदेशात कुठेतरी असणार याची खात्री पटली. माथ्यावरून दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅव्हर्स मारून रिठ्याच्या दाराच्या तोंडाशी पोहोचलो. गर्द कारवीचे रान बघून हातापायांना "लालेलाल" साज चढणार या तयारीनेच नाळ उतरायला घेतले. कोणत्याही सजीवांचा मागमूस नसलेल्या वाटेने दोन-तीन मोठ्ठाले रॉकपॅच वळसा घालून उतरलो तेवढा संध्याकाळ होऊ लागली होती. अश्या प्रकारे एका अनवट, देखण्या आणि तितक्याच लोभस अश्या घाटवाटांची आठ तासांची, बारा किलोमीटर्सची भटकंती पार पडली.
असो! माथ्यावरून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील असे नजारे होते. त्यामुळे तूर्तास फोटोंची मजा घ्या .
काळू धबधबा अवरोहण ( म्हंजी मऱ्हाठित काळू वॉटरफॉल रॅपलिंग )
खिरेश्वर - काळू धबधबा अवरोहण - वाघ्याची वाडी - व्हालीवरे - माकडनाळ चढाई - हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाज्याने उतरून खिरेश्वर.
ट्रेकिंग चालू केल्यापासून काही दुर्गवाटा वाचून माहित होत्या पण त्यांच्या वाटेला जायचा योग नव्हता आणि खरेतर धारिष्ट्य हि नव्हतं. "आपल्याला जमायचं नाही" म्हणून ह्या वाटा कधी बकेट लिस्ट मध्ये नव्हत्याच. नियमित भटकंतीने जरा कॉन्फिडन्स का काय म्हणतात ते वाढल्याने अश्या वेगळ्या वाटा ढुंढाळण्याचा प्रयत्न सुरु केला. या "आपल्याला जमायचं नाही" लिस्टमधल्याच दोन गोष्टी म्हणजे काळू धबधब्याचे १२५० फुटाचे अवरोहण आणि हरिश्चंद्रगडाच्या सोळा वाटांपैकी अवघड अशी माकडनाळेची चढाई. डोंगरदेवांचा आशीर्वाद लाभला आणि दोन्ही गोष्टी आपसूकच पूर्ण झाल्या.
सोमवारची सुट्टी टाकून मंडळी शनिवारी रात्री खिरेश्वरला पोहोचली. प्लॅन होता - खिरेश्वर - काळू धबधबा अवरोहण - वाघ्याची वाडी - व्हालीवरे - माकडनाळ चढाई - हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाज्याने उतरून खिरेश्वर. सकाळी सकाळी रॅपलिंगची आभूषणे घेऊन आडराई जंगलाच्या वाटेने काळू धबधब्याच्या तोंडाशी पोहाचलो. आयोजकांनी रॅपलिंगचा सेटअप लावूपर्यंत फोटो-बिटो भंकस झाली आणि मग सुरु झाला अस्सल थरार! कमरेला हार्नेस, त्याला बांधलेली मेनलाईन आणि बिलेची दोरी, पाठीवर भल्यामोठ्या सॅक, तोंडावर "घाबरले नसल्याचे अविर्भाव" आणि पोटात उठलेला गोळा असे सगळे घेऊन पहिल्या टप्प्याचे ४५० फुटांचे अवरोहण सुरु झाले. मावळे मोठ्या मानाने दुसर्यांना "जा तू आधी" म्हणून संधी देत होते ( जेणेकरून दुसऱ्यांचे पाहून थोडा धीर एकवटता येईल. ). गणरायाचे नाव घेऊन अवरोहणाला सुरुवात केली आणि दोन पाय कातळाला समांतर ठेऊन, उजव्या हाताने रोप सोडत खाली उतरायला सुरु केले. आधी 'अलंग' आणि 'कांचन' सुळक्यावर रॅपलिंग केले असल्याने पंधरा - वीस फूट खाली ठीकठाक उतरलो आणि जसा पाय टेकवता येणारा कातळ संपला आणि ओव्हरहँग चालू झाला तत्क्षणी आपल्या हिंदू संस्कृतीतील तेहेतीस कोटी देवता क्षणात डोळ्यासमोर दर्शन देऊन गेल्या. जी काही टरकली होती त्याची तुलना कशाशीही नाही. खाली बघता खालची माणसे मुंग्या एवढी भासत होती. भरीस भर ओव्हरहँग मुळे हवेत गोल-गोल फिरायला लागलो तेव्हा तर जी काय तंतरली म्हणता! तो अनुभव विसरणे शक्य नाही!
पहिला ४०० फुटी टप्पा अवरोहण करून खाली आल्यावर मात्र चांगला आत्मविश्वास वाटायला लागला आणि पुढचे चार टप्पे उतरायला त्याची फार मदत झाली. जसे जसे अवरोहणाचे तंत्र जमू लागले तशी मात्र मजा यायला लागली. दुसरा टप्पा उतरताना मध्ये उभं राहायला चांगली जागा होती त्यामुळे तो सोपा वाटला. तिसऱ्या टप्पा उतरताना असाच ओव्हरहँग वर गोल-गोल फिरायला लागलो तेव्हा मात्र आजूबाजूचा निसर्ग छान न्याहाळता आला. सह्याद्रीच्या अश्या कडे-कपारी जेथून फक्त पाण्याला आणि वाऱ्याला जायची मुभा आहे त्या वाटेने आमचा स्वप्नवत प्रवास चालू होता. चौथा टप्पा वाकून खाली बघितले तर मोट्ठे खोल असे तळे. आपण त्या तळ्याच्या शेजारी उतरतो आणि चार टप्प्यांच्या अवरोहण परिश्रमाचे श्रमपरिहार करायला पाण्यात डुबकी मारायची. निव्वळ कमाल असा अनुभव.
पाच टप्पे उतरून जेव्हा काळू धबधबाच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला निघालेले. येथून तासा-दोन तासांची चाल करून थिटबी गावाच्या जवळ पोहोचलो. येथून पुढे एक डोंगर चढून वल्हीवरे नावाच्या गावात मुक्कामी जायचे होते. संधीप्रकाशात माकडनाळेचा शेंडी सुळका विलोभनीय भासत होता. अंधार पडल्याने वल्हीवरे गावात चालत जायचा प्लॅन रद्द करून गाडीने वल्हीवरे पोहोचलो. वाटाड्याच्या घरी आज रात्रीचा मुक्काम होता. तांदुळाची भाकरी, रस्सा, लोणचे पापड असा फक्कड बेत झाल्यानंतर दारात येऊन बसलो. घराच्या दारात बसल्यावर समोर पहिला दिसतो तो म्हणजे हरिश्चंद्राचा कोकणकडा. दारातून कोकणकडयांचे अजस्त्र रूप तिन्ही त्रिकाळ दिसावे म्हणजे '"श्रीमंती" यापेक्षा वेगळे असे काही नसावे!'
आजचा अविस्मरणीय अनुभव डोळ्यात साठवून मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली. उद्याचे लक्ष्य होते - माकडनाळेने हरीशचंद्र गडाची चढाई.
वाचत राहा ...
अभिप्राय कळवत राहा..