बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

निसणीची वाट उतराई आणि बोचेघोळ चढाई

दिवस १ : माणगाव - जननीदेवी देवराई - चांदर - निसणीची वाट - पाने ( मुक्काम ) १६ km
दिवस २ : पाने - हेडमाची - बोचेघोळ - खानू डिगेवस्ती - माणगाव - १६ km



माघी पोर्णिमेकडे दिवस हळूहळू कलू लागलेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. माणगावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय त्यामुळे अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. घाटमाथ्यावरून समोर दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड, आजूबाजूला घाटमाथ्यावरून रायगड प्रभावळीत उतरणाऱ्या ऐतिहासिक घाटवाटा, डावीकडे लिंगाणा तर उजवीकडे कोकणदिवा या पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


तर आजचा बेत होता तो रायगड प्रभावळीतील घाटवाटा भटकण्याचा. निसणीच्या वाटेने कोकणात पाने गावात उतरून बोचेघोळ वाटेने पुन्हा माथ्यावर चढाई. पहाटे चार वाजता पुण्यनगरीतून पानशेतच्या पुढ माणगावला प्रयाण केले. येथून पहिला टप्पा होता तो जननीदेवीच्या देवराईतून चांदर गावापर्यंतचा. गर्द देवराईतून चढून डोंगरावर आलो तेव्हा समोर खानू डिगेवस्ती आणि चांदर गाव दिसू लागले. लांबवर रायगड दिसू लागला तर उजवीकडे कोकणदिवा. येथून बारकू नामक वाटाड्या घेऊन सुरु झाली निसणीच्या वाटेची झाडोऱ्यातील उतराई. पाऊण-एक तासाच्या भर उन्हातल्या पायपिटीनंतर आता नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. गच्च कारवीतून घसाऱ्याशी दोन हात करत कसेबसे माचीवर पोहचलो आणि तेथून पुढे दोन तासात रायगड जिल्ह्यातील पाने गावात. साडे चारला गावात पोहोचलो तेव्हा उन्हामुळे आणि पाठीवरच्या भल्या मोठ्या बॅगमुळे अंगातले त्राण निघून गेले होते. गावातले प्रशस्त राम मंदिर दिसताच रामरायाला वंदन करून त्याच्याच चरणाशी पथारी पसरली.








संध्याकाळी पाने गावातून दिसणारा भोवतालचा परिसर म्हणजे स्वर्गसुख. पश्चिमेकडे रायगडाच्या टकमक टोकावर केशरी झालर उमटू लागलेली. पूर्वेकडे आकाशाला भिडलेला लिंगाणा आणि रायलिंग पठार, शेजारी टोकेरी दातांसारखे दिसणारे सुळके आणि त्यातून उतरणाऱ्या बोराट्याची नाळ, निसणी, गायदरा, बोचेघोळ त्यापुढे कावळ्या आणि कोकणदिवा अश्या घाटवाटा. सूर्यास्त झाला तसे आजूबाजूच्या वस्त्या शांत होऊ लागल्या. एका घरात पिठलं -भाकरी -ठेच्याचे जेवण करून मंडळी निद्रादेवीची आराधना करण्यास सज्ज झाली.


दुसऱ्या दिवशी बोचेघोळ वाटेने ९५० मीटर्सची चढाई करून खानूचा डिगा आणि पुढे माणगाव असा सात-आठ तासांचा प्रवास असल्याने पहाटे पाचला मंडळी तयार झाली. सगळे जमले पण वाटाड्याचा पत्ता नव्हता तो त्याच्या बहिणीच्या घरी झोपणार होता मग त्याची शोधाशोध सुरु झाली. आपले जगणे घड्याळाशी बांधले असल्याने आपल्याला ते पाच काय, सहा काय, वेळेचे ते कौतुक. काळ्या मातीत आयुष्यभर राबलेल्या, आकाश पांघरून, दगडाची उशी घेऊन झोपणाऱ्याला आणि निसर्गाला दैवत मानून त्यावर दिनचक्र असलेल्याना कसली आलीये घाई? बाबांना उठवून चला म्हंटल्यावर हातात काठी घेऊन बाबा तयार!


सहा वाजता बोचेघोळ वाटेची खडी चढाई चालू झाली. एक तासात हेडमाची पोहोचलो तेव्हा सर्वांगाला घामाने अंघोळ झालेली. त्याशेजारील गायनाळ आता पडझड झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे असे समजले. डावीकडे कोकणदिवा अखंड सोबतीला होता. रायगडावरील जगदीश्वर मंदिर आता नुसत्या डोळ्याने दिसू लागले. खाली पायथाशी वाघेरी, वारंगी गावं हळूहळू जागी होत होती. एक मोठा ट्रॅव्हर्स मारून खिंडीतून खडी चढाई करून घाटमाथ्यावर पोहोचलो. पाच तास छोटे ब्रेक घेत चढाई करून मध्यान्ह झाली तेव्हा खानूच्या डिग्यावर पोहोचलो. इतक्या सुंदर जागेला नजर नको लागूदे असं गाव म्हणावं तर नजर लागलीच होती. JCB डोंगरफोडीची कामे अविश्रांत करत होता. आता डोक्यावर जळता सूर्य घेऊन वाटचाल चालू झाली. लवकरात लवकर देवराई गाठली आणि थोडा वेळ मस्त ताणून दिली. शेवटची कंटाळवाणी चाल करून एकदा काय ते माणगाव पोहोचलो. ग्रुपच्या सदस्यांनी भाकरी -रस्सा - भात - मठ्ठा - बाकरवडी असे साग्रसंगीत जेवण बनवलेले. त्यांचे मनोमन आभार मानून पोटोबा झाला आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.




दोन दिवस सह्याद्रीतील दोन नवीन दुर्गम वाटा भटकत्या आल्या. या वाटा आपणच जागत्या ठेवल्या पाहिजेत.
असो. फोटोचा आनंद घ्या!



रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

घोल - रडतोंडीची वाट - वाघजाई घाट - बडदे माची - बोरमाची - तेल्याची नाळ - घोल

 घोल - रडतोंडीची वाट - वाघजाई घाट - बडदे माची - बोरमाची - तेल्याची नाळ - घोल १८ किमी.



पहाटे पहाटे भर थंडीत मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथला आजही निसर्ग तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली वाघजाई घाटाची भटकंती.



घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. पश्चिमेचा डोंगर ओलांडून एका छोटेखानी खिंडीतून वाघजाई जाणाऱ्या मोठ्या पठारावर आलो. येथून डोळ्यासमोर अथांग असा सह्याद्रीचा पसारा. कोकणदिवा, कावळ्याची खिंड, कावळ्याचे सुळके, पोमाड्याचा डोंगर आणि पुसटसा दिसणारा रायगड. अफलातून असे दृश्य. या वाटेला स्थानिक रडतोंडीची वाट म्हणतात.

अडीच तीन तासात वाघजाई घाटाला लागलो. बांधीव पायऱ्या आणि सोपी वाट म्हणून स्थानिक याच वाटेचा वापर करतात. आता सूर्यनारायण डोईवर आले होते आणि आम्ही जंगल ओलांडून बडदे माचीवर. आजच्या जमान्यातही वीज रस्ते पाणी नसलेले आणि बाहेरच्या जगाचा गंध नसलेले छोटीशी वाडी. इथे पाठीवरची वजने पोटात ढकलून बोरमाचीला प्रयाण केले. गावातली सगळी मंडळी कामानिमित्त बाहेर असल्याने आजचा सुट्टीचा रविवार त्यांचा पाणवठयाजवळील माती उकरून खेकडे पकडण्याचा होता. त्यांना राम राम करून बोरमाचीत पोहोचलो एका घरात. वाटाड्या काकांची बहीण त्या घरात दिली होती. स्वतः लांबून आणूनही त्या माउलीने पाणी आणून दिले. तेथून पाणी भरून तेल्याच्या नाळेच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले.

पूर्वी घोल गावाला पुणे जिल्ह्यातून रस्ता नव्हता तेव्हा गाव आणि माचीवरच्या लोकांचा रायगड वा जिते गावाशी बाजार असायचा. जिते गावात येणारे तेलाचे डबे बोरमाचीतून समोरच्या नाळेतून घाटमाथ्यावर यायचे म्हणून तेल्याची नाळ. (इति वाटाड्या.) हे ऐकून वाट सोपी असेल या कायासाने चढाई चालू केली पण बघता बघता नाळेने घाम काढला. नाळेतून मागे बघताना कुर्डूगड "मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणत होताच. कुर्डुगडाशी या वर्षात झालेली चौथी भेट! यंदाच्या पावसाळ्यातील पाऊस भरीला असताना पाहिलेले लिंग्या घाटाचे आणि कुर्डुगडाचे रूप कायम मनात राहील. हवेत छान गारवा असल्याने आणि पूर्ण वाट झाडोऱ्यातून असल्याने चढाईला उन्हाचा त्रास झाला नाही. दोन तासाच्या खड्या चढाईने माथ्यावर पोहोचलो तेव्हा पश्चिमेकडे कोकणदिव्याला सोनेरी मुकुट चढला होता. वाटेत साळींदराचे काटे दिसले म्हणून काही उचलून आणले. गावात येऊन मारुतीच्या मंदिरात वामकुक्षीसाठी पथारी पसरली तेव्हा पाच वाजत आले होते.

चहा पिऊन सात तासांची १८ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !






😅