शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव २०२४

दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव २०२४


।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।
।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।


'हर हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अश्या जयघोषांनी दुर्ग चंदन - वंदन वरील अवघा आसमंत व्यापला होता. आज मार्गशीर्ष  शुद्ध अष्टमीचा पवित्र दिवस. साडे तीनशे वर्षांपूर्वी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभून हा प्रदेश स्वराज्यात सामील झाला होता. गुलाल, भंडाऱ्याने जयघोषांच्या तालावर स्वार होऊन चंदन-वंदन  या जोडगोळीच्या  किल्ल्यांना जोडणाऱ्या पठारावरचे सारे वातावरण शुचिर्भूत केले होते. भगवे ध्वज निळ्याशार आसमंतात उंचच उंच भिडू लागलेले. मध्येच एखादा प्राणप्रणाने फुंकलेला शंख या सर्व जल्लोषाच्या सीमा भेदून उपस्थित मावळ्यांना स्फुरण चढवत होता. तुतारीच्या ललकारी आणि टाळांचा गजराने वातावरण भारलेले होते. स्वराज्याचा कर्ता मूर्तरूपात मानाच्या पालखीत बसून हा सर्व सोहोळा बघत होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखी भेटीचे औचित्य साधून अवघे भगवे फेटेधारी धारकरी आज चंदन-वंदन किल्ल्यावर जमले होते. निमित्त होते ते म्हणजे दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखीची चंदन-वंदन गडाच्या पठारावर भेट झाली आणि अवघा मुलुख पिवळ्या भंडाऱ्याने पावन झाला. 


छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी 

चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी अफजुल्ल्याचा कोथळा बाहेर काढतानाची रांगोळी 

               

तीनशे चौसष्ठ वर्षांपूर्वी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करून जावळीचा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्ग जोडी चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून आपल्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात केली. याच घटनेचे स्मरण म्हणून दुर्ग चंदन-वंदन गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाई तालुक्यातून अमृतवाडी - पाचवड-किकली-बेलमाची गावातून वंदन गडाच्या पठारावर चढते तर धर्मवीर संभाजी महाराजांची पालखी कोरेगाव तालुक्यातून पळशी फाटा - आंबवडे मार्गाने गणेशखिंडीतुन पुढे चंदन गडावरून वंदन गडावर येते. दोन्ही पालख्यांची दोन्ही गडांना जोडणाऱ्या पठारावर भेट होऊन त्यांची आरती होते आणि त्यानंतर वंदन गडावरील प्रवेशद्वार, माची, आणि श्री वंदनेश्वर शिवालयाच्या पुढे अशी प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्या गावातून जमलेल्या मावळ्यांच्या हस्ते आरती होते. पाहुण्यांचे उद्बोधक विचार ऐकून लाठीकाठीचे प्रात्यक्षिकाने आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


पालखी खिंडीत येताना 


श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी हा सगळा सोहोळा घडवून आणण्यात अपार मेहनत घेतली आहे. अगदी जनरेटर पासून मांडवाचे साहित्य, प्रसादापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सगळ्या  वस्तू या मावळ्यांनी खांद्यावर उचलून आणल्या होत्या.वंदनगडाचे पूर्णपणे मातीत गाडले गेलेले दुसरे प्रवेशद्वार श्रमदान करून मोकळे केले आहे. श्री वंदनेश्वर शिवालयाच्या शिवपिंडीवर वाहायला बेलाची पाने हवीत म्हणून मंदिरासमोर बेलाचे झाड लावून किल्ल्यांच्या पायथ्यापासून हंड्यात पाणी उचलून आणून झाडाला घातलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहे. गेली आठ वर्षे या मावळ्यांनी वंदनगड संवर्धनासाठी कष्ट घेतले असून  प्रसंगी स्वतःच्या खिशाला कात्री लावून वंदनगडाचे अस्तित्व जपले आहे. गडावर झालेल्या हिरव्या चादरींचे अतिक्रमण आणि वनखाते / तत्कालीन सरकारचे दुर्लक्ष्य या सगळ्याशी लढत आजवर संस्थेने वंदनगड विकासासाठी सर्वोतोपरी कार्य केले आहे. 

शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील आज अजून एक किल्ला हिरव्या अतिक्रमणामुळे आपल्यापासून दूर जातोय कि काय अशी स्थिती आहे सध्या मित्रांनो. चंदनगड हा पूर्ण हिरव्या चादरींनी वेढलेला आहे आणि वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेला आहे. वंदनगडावर काही दिवसांपूर्वी दर्ग्याखाली शिवपिंडी सापडल्याने प्रशासनाने वंदनगड पर्यटन बंद केले आहे. आज अजून एक किल्ला आपल्यासाठी बंद झाला आहे. अश्या स्थितीत महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्यात मिळवलेल्या या गडकोटांची जपणूक हि आपले कर्तव्य आणि जबाबदारी दोन्हीही आहे. पुढील वर्षी आठ डिसेंबर रोजी हा नेत्रदीपक सोहोळा पुन्हा अनुभवाची संधी आहे तेव्हा आपण मोठ्या संख्येने जमुयात आणि भगवा उंचच उंच जात राहील यासाठी प्रयत्न करूयात. 

तळटीप : कोणाला जर या दुर्गसंवर्धन कार्यास कोणत्याही स्वरूपात हातभार लावायची ईच्छा असल्यास माझ्याशी अथवा श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान यांच्याशी संपर्क साधावा. 



किल्ले वंदनगड प्रवेशद्वार 

पालखीचे आगमन 

धर्मवीर संभाजी महाराज पालखी 

पालखी नाचवताना 

वंदनेश्वर महादेव 




जल्लोष 








बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

रोहिदास घळने चढाई - रोहिदास शिखर - माकडनाळेने उतराई


वाघ्याची वाडी - रोहिदास घळ - रोहिदास शिखरावरून  सूर्योदय - माकडनाळ - वल्हीवरे - बाजारपेठेची वाट -  दिवाणपाडा - वाघ्याची वाडी 


रात्रीच्या गर्द अंधारात गाडी वाघ्याच्या वाडीकडे मार्गक्रमण करीत होती. आजपर्यंत विचारही न केलेली भटकंती आज घडणार असल्याने थंडीशी दोन हात करीत मंडळी आनंदात होती. माळशेज घाटातून उतरू लागल्यावर दोन्ही बाजूला काळ्या काळोखातही उंचच उंच गगनाशी भिडलेल्या डोंगरांच्या रांगा दिसू लागल्या . सावर्णे फाटा शोधात जेव्हा आम्ही तेथे पोहाचलो तेव्हा एक बाजूस महाकाय देवदौन्डया तर समोर हरिश्चंद्रगडाचा भलामोठा पसारा आणि त्यावर अवकाशात चढलेली चांदण्यांची झालर म्हणजे "क्या बाssssत है" असा नजारा होता. मूंबई वरून एक टीम येणार होती म्हणून थोडा वेळ तिथल्याच एका धाब्यावर थांबलो. तेवढ्या वेळात त्या ढाबेमालकाने कर्कश गाण्यांनी आम्हाला जेरीस आणले. ट्रेकभिडु जमले आणि वाघ्याची वाडी गावाच्या दिशेने आम्ही निघालो. 

प्रत्येक वेळी हरिश्चंद्रगड मुक्कामी जातो तेव्हा तारामती शिखरावरून सूर्योदय पाहत आलो. कोकणकडा गेल्यावर "ते बघ! तो समोर डावीकडे सुळका दिसतोय तो रोहिदास यापलीकडे "रोहिदास" शी ओळख नव्हती. रोहिदास शिखरावरून कोकणकडा कसा अंतर्वक्र दिसत असेल याची उत्सुकता वाटायची. आज या शिखरावरून अरुणोदय बघावा आणि सकाळच्या शुचिर्भूत कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघालेले अजस्त्र अश्या कोकणकड्याचे ते रूप डोळ्यात साठवावे यासाठी सर्व ट्रेकभिडु रात्रीच्या चढाईस एकमताने तयार झाले आणि बरोबर रात्रीच्या दहा वाजता आम्ही रोहिदास घळ चढाईस सुरुवात केली.


                      

घोणस 


चढाई चालू केल्यावर पहिल्या दहा मिनिटातच आमचा रस्ता क्रॉस करणारे घोणस पिल्लू दिसले.  चला! ट्रेकची सुरुवात तर मस्त झाली. आता अजून काय काय दिसतंय बघत , एका हातात टॉर्च आणि दुसऱ्यात काठी असे स्वतःला सावरत नाळेची चढाई चालू होती. भर थंडीतही घाम पुसत, मध्ये पाण्याचे ब्रेक घेत आरामात जात होतो तेच एका दगडावर जणू आमचीच वाट बघत बसलाय असा चापड्या / बांबू पिट व्हायपर साप दिसला. याला बघताच आम्ही आमची वाट बदलून पुढे निघलो. मोठमोठाले बोल्डर्स , दगडे चढत सुमारे सहा तासांच्या सलग चढाईने आम्ही माकडनाळेच्या मुखाशी असणाऱ्या लिंगी सुळक्याला पोहोचलो. तेथून रोहिदासच्या पायथ्याशी एक मोठासा कातळ बघून थोडा वेळ विश्रांती घेतली. 


रात्री रोहिदास शिखरावर जमलेले नक्षत्र 


आसमंतात नक्षत्रे जुळून आली होती आणि रोहिदास शिखर या ताऱ्यांच्या वर्षावात उठून दिसू लागलेला. बोचऱ्या थंडीने बर्फासारखे थंड पडलेले हात शेकण्यासाठी मग शेकोटी लावली आणि तासभर त्याची ऊब घेत निवांत बसून राहिलो. सहा वाजता शिखराकडे प्रयाण केले. शिखराची चढाई पूर्ण घसाऱ्याची आहे आणि अंगावर आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात आता पूर्वेकडे केशरी झालर उमटू लागलेली. पन्नास मिनिटात शिखरावर पोहोचलो आणि लागलीच सूर्यनारायण प्रकट झाले. थोड्याच वेळात समोर सह्याद्रीचे मनमोहक रूप झळाळू लागले. रोहिदास शिखरावर असणाऱ्या भैरोबाच्या ठाण्याचे वंदन करून फोटोग्राफी सुरु झाली. समोर नाफ्ता, डोमा , कलाडगड , सीतेचा डोंगर, कोकणकडा , तारामती डोळ्यात मावत नव्हते तर मागे सिंदोळ्यापासून किरडा, भोजगिरी, देवदौन्डया ते अगदी वऱ्हाडी सुळक्यांपर्यंत दुर्गदर्शन झाले. फोटो आवरून सुमारे नऊच्या सुमारास उतराई चालू केली आणि माचीवर पोटोबा करून सुळक्याचे दर्शन घेऊन माकडनाळेच्या नाळेत घुसलो. 

रोहिदास शिखर 


रोहिदास उतराई 

रोहिदास माथ्यवरून नजारा 

                  

रोहिदास कडून माकडनाळ / शेंडी सुळक्याकडे जाताना 


दोन वर्ष्यांपुर्वी माकडनाळेने चढाई करून बारा पायरी वाटेने आडराई उतरलो होतो तर आज माकडनाळेची उतराई करायची होती. मध्ये टेक्निकल पॅच लागतो तेथे गावातीलच एक वाट्याड्या घेतला होता त्याची मदत घेतली होती. असंख्य दगडांच्या राशीतून न हलणारे दगड वेचत त्यावर पाय ठेऊन नाळ उतरायची कसरत चालू झाली.  अरुंद अश्या  नाळेतून उतराई करताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. माकडनाळ तुम्हाला मान वरती करण्याची संधीच देत नाही. अश्या वाटांनी भटकलो कि सहयाद्रीच्या राकट देशा . कणखर देशा , दगडांच्या देशा हे शब्द अगदी समर्पक वाटू लागतात.  दोन असेच मोठे पॅच उतरून खाली आलो तेव्हा मागे वक्राकार कोकणकडा रौद्र भासत होता. दोन तासांच्या चालीने बेलपाडा पोहोचून वाटाड्याचा निरोप घेतला. येथून आता अजून तासाभराची चाल बाकी होती. बेलपाड्यातून पुढे निघून बाजारपेठेच्या वाटेने डोंगरात खिंडीत पोहोचलो आणि तिथें पुढे वाघ्याच्या वाडीला उतरलो आणि २० किंलोमीटर्सचा हा तगडा ट्रेक संपवला. 


माकडनाळ 




माकडनाळ 



अश्या वाटांवर भटकताना दिसणारे सह्याद्रीचे रांगडे रूप हि केवळ डोळ्यात साठवण्याची गोष्ट. रोहिदास वरून दिसणारा अंतर्वक्र कोकणकडा, लिंगी सुळक्यापासून समोर दिसणारा सीतेचा डोंगर आणि नळीची वाट. अगदी बेलपाडा  गावातून मागे नाफ्त्याचा उठवलेला कडा , माकडनाळेतून खोलवर दिसणारी नाळ अशी खासम खास खास निसर्गचित्रे.  किती फोटो काढू आणि किती नको अश्या सगळ्या फ्रेम्स होत्या. असो ! तूर्तास फोटोंची मजा घ्या!


सागर 

पोस्ट मधले काही फोटो ग्रुप मधील लोकांकडून साभार 


कोकणकडा 












गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार

रविवारची भटकंती : 

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतील अवघड पण अत्यंत्य देखण्या अश्या घाटवाटांची -

 घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार. 



सहयाद्रीतील काही जागाच अश्या आहेत ना कि बघताक्षणी प्रेम! त्या यादीतील बहुप्रतीक्षित अशी हि भटकंती होती. मागच्या वर्षी काही ट्रेकभिडु जाऊन आलेले तेव्हा फोटो बघूनच जायचे नक्की केलेले तर तो योग आज जुळून आला. 


आता घोडेपाण्याची नाळ चढताना दिसणारे सहयाद्रीचे अद्वितीय रूप पाहायचे असेल तर पहिले "सिंगापूर" ला जाणे आले. मग काय सकाळी ब्राम्हमुहूर्तावर पुण्यनगरी सोडून सिंगापूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रथाचे सारथी अत्यंत कुशल असल्याने तेवढ्या वेळात निद्रादेवीला प्रसन्न करून घेतले. ग्रुपमधले ट्रेकभिडु शरदभाऊंनी हा ट्रेक आधी दोन वेळेस केला असल्याने जायचा रस्ता, चढाईची वाट, वाटाड्या, gpx फाईल या कशाच्याही फंदात न पडता त्यांच्या पाठीमागे चालत सुटणे आणि निसर्गाच्या अदभूत सौन्दर्याने मंत्रमुग्ध होत जाणे एवढेच काय ते ध्येय होते. 


नाणेघाट आणि दाऱ्या घाट या कोकण प्रदेश आणि देश यांना जोडणाऱ्या फार पूर्वीपासून प्रचलित अश्या वाटा होत्या. आजही स्थानिक लोक याच वाटांचा वापर करतात. या वाटांवर असलेल्या राबत्यामुळे त्या जिवंत राहिल्या तश्या या दोन वाटांच्या उदरात वसलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या वाटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच या वाटा जागत्या ठेवल्या तरच  इथली दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील. 


असो! तर सकाळी आठ वाजता घोडेपाण्याची नाळेची चढाई चालू झाली. पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा पत्ताच नव्हता. समोर जीवधन किल्ल्यावर आणि वनरलिंगीवर चढलेला सोनेरी रंग बघून नाळेच्या माथ्यावरून झकासपैकी दृश्य दिसणार याची खात्री झाली. वाटेने वाहणारे बारीकसे पाण्याचे प्रवाह ओलांडत पाण्याच्या वाटेने म्हणजे नळीतून मंडळी मार्गक्रमण करीत होती. रमतगमत आणि नियमित फोटो ब्रेक घेत चार तासात माथ्यावर पोहोचलो. येथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र राकट नजारा म्हणजे काय वर्णावा? शब्द आणि प्रतिभा दोन्ही तोकडं पडेल निव्वळ असा!


चढाई करताना अजस्त्र वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता थिटे वाटू लागले होते. या दोन सुळक्यांच्या मागून जीवधन किल्ला आणि वानरलिंगी उंच आभाळात झेपावलेले ! त्याच्या डावीकडून नानाचा अंगठा हळूच डोकं वर काढत होता. माथ्यावर संपूर्ण कारवीचेच साम्राज्य! एवढ्या दुर्गम जागेवर बिबट्याचची विष्ठा पाहून साहेब या प्रदेशात कुठेतरी असणार याची खात्री पटली. माथ्यावरून  दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅव्हर्स मारून रिठ्याच्या दाराच्या तोंडाशी पोहोचलो. गर्द कारवीचे रान बघून हातापायांना "लालेलाल" साज चढणार या तयारीनेच नाळ उतरायला घेतले. कोणत्याही सजीवांचा मागमूस नसलेल्या वाटेने दोन-तीन मोठ्ठाले रॉकपॅच वळसा घालून उतरलो तेवढा संध्याकाळ होऊ लागली होती. अश्या प्रकारे एका अनवट, देखण्या आणि तितक्याच लोभस अश्या घाटवाटांची आठ तासांची, बारा किलोमीटर्सची भटकंती पार पडली. 


असो! माथ्यावरून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील असे नजारे होते. त्यामुळे तूर्तास फोटोंची मजा घ्या .


घोडेपाण्याच्या नाळेतून दिसणारे ददृश्य 

नाळेची चढाई 


माथ्यावरून व्ह्यू 



रिठ्याचे दार उतराई 

रिठ्याचं दार उतराई, खाली सिंगापूर 



शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग २ [ सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड ]

 

दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : 

सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड

पूर्व लेख : 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]

=================================================

दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]

=================================================================

दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त मालवणच्या किनाऱ्यावर फिरायचं आणि वॉटर स्पोर्ट्स करायचा प्लॅन होता. सकाळी हे सगळे आटोपून पुढे ओवळिये येथील सिद्धगड आणि पेंढुर येथील वेताळगड बघून धामापूर तलाव बघत संध्याकाळी सूर्यास्ताला तारकर्ली किंवा देवबाग जाऊ असा प्लॅन केलेला. 


सकाळी सकाळी कुटुंबासहित डॉल्फिन राईडने दिवसाची सुरुवात झाली. सात पॉईंट दाखवणार म्हणून सुरुवातील सांगितलेल्या राइडने सगळी ठिकाणे लांबूनच दाखवुंन अपेक्षेप्रमाणेच गंडवले होते. काहींच्या काही पॉईंट स्वतः ठरवून बोटीतूनच ते बघा हा तो अमका पॉईंट, हा बघा तमका पॉईंट असे दोन तास फिरवून आठशे रुपयांनी खिसा हलका करून आम्ही परतलो. येताना डॉल्फिन दिसले म्हणून त्यातल्या त्यात समाधान मानून स्कुबा डायविंग साठी निघालो. ऑफ सिझन असल्याने म्हणजे दिवाळीपूर्व असल्याने चारशे रुपयात स्कुबा सांगत होता. हे म्हणजे फक्त पाण्यात बुडवून खाली दहा पंधरा फूट नेऊन मास्यांना खायला देऊन त्यांच्यासमवेत काढलेल्या व्हिडिओचे पैसे होते. पण तरीही पहिल्यांदाच केल्याने मजा आली. बरीचशी लोक पैसे भरूनही घाबरून तळाशी जात नव्हती. माश्याना पावाचे तुकडे टाकून मासे आपल्या जवळ आणतात आणि व्हिडिओ काढतात. असो पाचच मिनिटात स्कुबा झालं आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. राजकोट येथील महाराजांचा पुतळा पडल्याने पोलीस तेथे सोडत नव्हते तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग आधी पाहून झाल्याने रॉक गार्डन बघून आम्ही निघालो सिद्धगड आणि वेताळगड. 

ओवाळिये येथील सिद्धगड:

दरवर्षी कोकणात यायचं म्हणजे कितीवेळ समुद्र बघणार म्हणून आज दोन किल्ले ठरवले होते. मालवण पासून ३५ किलोमीटर्स वर कसाल गाव आणि तेथून सात किमी ओवाळिये येथील सिद्धगड पाहण्यास आम्ही निघालो. वाटेत दोन कामगार बसची वाट पाहत होते त्यांना उचलून गाडीत घेतले तर एक सिद्धगडाच्या जवळील सिद्धगड वाडीतीलच निघाला. त्याने आम्हाला सड्यापर्यंत सोडून राम राम  केला. सड्यावरून सर्वत्र पुरुषभर उंचीचे गवत उगवलेले त्यातच गाडी पार्क करून वाट शोधत किल्ल्याला निघालो. दुर्गवीर संस्थेने बोर्ड लावल्याने किल्ला सापडतो नाहीतर नवख्या माणसाला सापडणे अवघड आहे. 

संपूर्ण किल्ला झाडाझुडुपांनी वेढलेला आहे. एक ठिकाणी तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. येथे माणसांचा वावर नसल्याने सरपटणाऱ्या जनावरांचा धोका आहे. एकटाच असल्याने मोबाईल वर गाणी लावून धाडस करून किल्ल्यात निघालो. मोठमोठाली झाडे, त्यावरील मुंग्यांचे वारूळ, पायात अडकणाऱ्या वेली, उध्वस्त अश्या वास्तू, वानरांचा आवाज अश्या हॉरर पिक्चर मध्ये शोभेल अश्या  परिस्थितीत किल्ल्यात घुसलो. एका ठिकाणी महाराजनची मूर्ती पाहून थोडेसे बळ मिळाले. पुढे थोड्या अंतरावर पुरातन असे देवीचे मंदिर आणि त्यासमोरील दगडी द्विपमाळा आपले लक्ष वेधून घेतात.  पंधरा मिनिटात गडफेरी आटोपून आल्या मार्गाने परत निघालो पेंढुर गावातील वेताळगडाकडे. 





पेंढुर येथील वेताळगड : 

हा किल्ला मॅप्स वर किंवा नेटवर शोधला तर संभाजीनगर मधील वेताळवाडी किल्ला दाखवतो म्हणून पेंढुर शोधात तेथून पत्ता विचारात जावे. कट्टा गावातून पेंढुर पुढे मोगरणे फाट्याने गावडेवाडी येथे जावे. पायथ्यापर्यंत गाडी जाते. येथून एक घरातून कसे जायचे विचारून एकटाच किल्ल्यावर निघालो. घरातील आजींनी तुम्हाला सापडणार नाही जाऊ नका म्हणून पहिल्यांदाच सांगितले. तरीही ट्राय करू म्हणून निघालो. वेताळगड संपूर्ण जंगलाने वेढलेला असून माथ्यावरची उंचच उंच झाडांमुळे कुठून कुठे जायचा हाच पत्ता लागत नाही. पावसाळ्यानंतर अजून येथे कोणीही फिरकले नसल्याने आणि गावकरीही जात नसल्याने वाटा सापडत नव्हत्या. तासभर गावत तोडत भटकलो आणि कसातरी माथ्यावर पोहोचलो. आता येथून पुढे गेलो तर परत येताना मार्ग सापडणार नाही अशी परिस्थिती पाहून परत मागे फिरलो. माथ्यावरील वेताळाचे स्थान आणि कोरीव पाऊले बघायची राहिली. असो! पुन्हा कधीतरी येऊ. 

एव्हाना संध्याकाळ होत आली होती. वेताळगडावरून आल्यामार्गे कट्टा पोहोचून परत मालवणचा रस्ता धरला. सूर्यास्त पाहण्यासाठी खास जागा म्हणून देवबाग संगम येथे पोहोचलो. देवबाग तारकर्ली येथील फेमस किनारे फिरत सूर्यास्त झाला. आजची मुक्कामाची सोय म्हून हॉटेल्स विचारता कमीत कमी पाच हजार रेट होता. उद्या देवगड वरून रत्नागिरी आणि राजापूर जवळची कातळशिल्पे पाहायचा प्लॅन असल्याने मालवण आणि रस्त्नागिरी यांच्या मध्ये कुठे तरी राहू म्हणून विचार करतानाच कुणकेश्वर आठवले. दोन वर्ष्यांपुर्वी कोस्टल कर्नाटकची ट्रिप करून येथेच राहिलो होतो. मग काय मालवणला जेवण करून दोन तासात कुणकेश्वर गाठले आणि भक्तनिवात रूम घेऊन आजचा दिवस संपवला. आज जास्त न फिरताही ९० किमी झाले होते. आता पुढचे डेस्टिनेशन खुणावत होते ते म्हणजे राजापूर!  अश्वयुगीन कालखंडात कोरलेल्या कातळशिल्पांचा मागोवा घेत त्या अपरिचित वाट शोधण्याचा ! 

         


पुढचा भाग : 

अपरिचित वाटांवरून भटकताना अश्मयुगीन कालखंडात आदिमानवाने कोरलेल्या भन्नाट, अगम्य अश्या कातळशिल्पांचा शोध


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]

दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : रामगड - भरतगड - भगवंतगड 


दरवर्षी दिवाळीनंतरची सुट्टी म्हणजे कर्नाटकाची रोडट्रीप असे झालेले समीकरण यावर्षी साधता आले नाही. जून मधली स्पिती आणि ऑक्टोबर मधली तीन केदार ट्रिप नंतर आता अजून सुट्टी मागितली असती तर शाल आणि श्रीफळ घरी कुरियरने आले असते म्हणून त्यातल्या त्यात शॉर्ट ट्रिप म्हणून मालवणची रोड ट्रिप ठरवली. सिंधुदुर्ग मधील समुद्री किल्ले झाले होते पण घाटातले किल्ले करायचे बाकी होते. हि अशी आडवाटेवरची ठिकाणे व  किल्ले भटकताना कोकणातल्या खऱ्या सुंदरतेचे दर्शन होते. राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नव्याने प्रकाशात आलेली अश्मयुगीन कातळशिल्पे म्हणजे मती गुंग करणारी अद्भुत आणि कला आवर्जून पाहायची होतीच. राजापूर म्हणजे खास आवडीची जागा असल्याने तेथेही जाणे होईल म्हणून खास प्लॅन झाला तो असा - 

=================================================================

दिवस १ : कोथरूड - कोल्हापूर - राधानगरी येथील राऊतवाडी धबधबा - दाजीपूर अभयारण्य - किल्ले रामगड - किल्ले भरतगड - किल्ले भगवंतगड - चिवळा बीच मालवण मुक्काम  [ ४२० KM ]


दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]


दिवस ३ : कुणकेश्वर बीच - पोखरबाव दाभोळे येथील कातळशिल्प - श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव - श्री विमलेश्वर मंदिर - साखर गावातील कातळशिल्पे - निवळी कातळशिल्पे - किल्ले यशवंतगड ( नाटे) - किल्ले आंबोळगड - गगनगिरी महाराज मठ ( आंबोळगड ) - रुंधे कातळशिल्पे - देवीहसोळ कातळशिल्पे - देवाचे गोठणे कातळशिल्पे - राजापूर - माणगाव . [ ४२५ KM ]


दिवस ४ : किल्ले तळागड - कुडा लेणी - ताम्हिणीने कोथरूड [ १२५ KM ]

=================================================================

मालवण आणि तेथील हे माहित नसलेले किल्ले करताना पाहायला मिळालेले हे आडवाटेवरचे कोकण जे काही आहे ना ते म्हणजे कमाल. नारळ-पोफळीच्या बागांमधून जाणारे चिंचोळे रस्ते, कोकणी मालवणी भाषेचा हेल, चिऱ्याच्या भक्कम तटबंदीचे पण निर्मनुष्य असे किल्ले, खाडी आणि समुद्राचा संगम, ऐसपैस कौलारू टुमदार घरे, प्राचीन मंदिरे, घनदाट जंगले, देवराई, त्यांचे राखणदार त्यांची मंदिरे. सोलकढी मोदकाची मेजवानी.. सगळे काही केवळ लाजवाब! 

दिवाळीच्या चार दिवस आधी गेल्याने कुठेही गर्दी लागली नाही. सगळ्यात जास्त ट्राफिक लागले ते १२०० किमी जाऊन आल्यानंतर भूगाव मध्ये. येताना राजापूर ते घर असा मोठा पल्ला गाठायचा होता पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचलो तरी चालण्यासारखे होते म्हणून माणगाव येथे गाडीतच दोन-तीन तास झोप काढून तळगड, घोसाळगडचा ऐनवेळी प्लॅन केला. 

पहिल्याच दिवशी मध्यरात्री तीन वाजता निघून थेट राधानगरी गाठली. राऊतवाडी नावाचा कोकणात उतरणाऱ्या रस्तावरच असलेला धबधबा अजूनही खळाळत वाहत होता. बऱ्यापैकी पाणी होते बघून कावळ्याची अंघोळ उरकली. उंचावरून वेगाने पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हाने छानसे इंद्रधनुष्य रेखाटले होते.  येथे एक कॉलेजचा मित्र खास आमच्यासाठी दाजीपूर अभयारण्यातील शिवगड फिरवण्यासाठी कोल्हापूरवरून आलेला होता. खूप दिवसांनी भेटीगाठी झाल्या आणि मंडळी शिवगडच्या दिशेने निघाली. 

दाजीपूर अभयारण्यातील शिवगड किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला निर्मनुष्य प्रदेश. उन्हाळ्यात गावात कमी झाल्यावर लोक इथे येतात. पावसाळ्यानंतर येथे येणारे आम्ही पहिलेच असल्याने सकाळच्या वेळेत अस्वले असू शकतील असे दाजीपूरमधल्या एक माणसाने सांगितले. फॅमिली बरोबर असल्याने आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने तो बेत रद्द करून राधानगरी बॅकवॉटर जवळ थोडी भटकंती केली. येथून पुढे कणकवली मार्गे कोकणात उतरून पुढे तीन चार किल्ले करायचे असल्याने पुढे निघालो. 

राऊतवाडी धबधबा 

                 

रामगड किल्ला : 

कणकवलीतुन आचऱ्याच्या दिशेने जाताना पहिला किल्ला लागतो तो किल्ले रामगड. मॅप लोकेशन अगदी बरोबर आपल्याला पायथ्याशी आणून सोडते. अर्ध्या -पाऊण तासाचा छोटासा किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन आम्ही निघालो. गावातून दहा मिनिटात सड्यावर येताच सुंदर असे भैरव मंदिर लागते. मंदिराच्या समोरच गजशिल्पे आहेत. येथून पुढे दहा मिनिटांच्या चढाईने आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असून गोमुखी बांधणीचे आहे त्याच्या बाजूस १८ फूट बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायवाटेने सरळ गेल्यास आपण होळीच्या माळावर पोहोचतो. येथे सात पुरातन तोफा निकामी करून जमिनीत उलट्या गाडून ठेवलेल्या दिसतात. तोफा चोरीस जाऊ नये म्हणून कोणीतरी नामी शक्कल केलेली दिसते. त्यासमोरच दुसरे प्रवेशद्वार असून त्याची वाट नामशेष झाली आहे. किल्ल्याच्या मध्यभागी चौथऱ्यावर गणपतीची मूर्ती आहे. तटबंदीवरुन चालत आपली गडफेरी पूर्ण होते. 






किल्ले भरतगड : 

रामगड पाहून मसुरेचा भरतगड पाहायला निघालो. एव्हाना तीन वाजत आले होते. भरतगड पाहून भगवंतगड जायचे होते आणि तेथून तोंडवळी किंवा मालवण पोहोचायचे होते. मॅपने गंडवले म्हणून विचारात विचारत मसुरे येथे गावात पोहोचलो. गाडी लावून चढाईस सुरुवात केली. सिंधुदुर्ग मधली हि अशी निर्मनुष्य पण अनवट ठिकाणे खऱ्या  अर्थाने कोकणातल्या सौन्दर्याची जाणीव करून देतात. पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो. पुरुषभर उंचीचे गवत, त्यातून वाट काढत किल्ल्यात पोहोचलो. याही किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे असून तटबंदी भक्कम आणि सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या मध्ये एक मंदिर असून तटबंदीने भटकून आपली गडफेरी पूर्ण झाली. पूर्ण किल्ला हा झाडोऱ्याने वेढलेला आहे. 

                




किल्ले भगवंतगड :  

मसुरे गावातून आता भगवंतगड जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक फार लांबचा आणि एक जवळचा पण छोट्याश्या बंधाऱ्यावरून जाणारा. रस्ता सांगतानाच लोक म्हणायची कि तुम्हाला जमणार असेल गाडी काढायला तरच जा नाहीतर वांधे होतील म्हणून. बघून तर येऊ मन्नत बंधाऱ्यापाशी पोहोचलो. छोटी कार कट-टू-कट जाईल एवढ्या पुलावरून गाडी घालायची म्हणजे जाम टेन्शन आले. वेळेचं अभाव बघता देवाचं एनव्ही घेऊन गाडी घातली. बायको बाहेरून डावीकडे-उजवीकडे घे म्हणून गाईड करत होती तर मुलगा - "बाबा नीट चालवा नाहीतर गाडी खाडीत पाण्यात पडेल" म्हणून भीती वाढवत होता. शेवटी कशीबशी गाडी दुसऱ्या साईडला पोहचली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. येथेच खाडीपाशी गाडी लावून समोरच्या भगवंतगडाकडे पळत पळत प्रस्थान केले. अंधार पडायला आल्याने धावपळ करीत एकट्याने किल्ल्यावर पोहोचलो. येथे किल्ल्यावर फक्त एक मंदिर आहे आणि एक पडक्या स्थितीत प्रवेशद्वार आहे. सकाळी अस्वलाची कहाणी ऐकल्याने आणि इथे एकटाच असल्याने  थोडी पाकपुक झाली पण पटकन गडफेरी उरकून खाली आलो. 




भगवंतगड येथून आता तोंडवळी बीचला मुक्काम करू असं आपलं ठरला होता पण मालवण येथे राहण्याची जास्त सोया असेल विचार करून मालवण गाठले. चिवळा बीचच्या अगदी समोर खोली घेऊन जेवायला गावातल्या एकमेव अश्या व्हेज हॉटेलच्या शोधार्थ निघालो. एव्हाना ४२५ किलोमीटर्स झाले होते. आता अजून गाडी चालवण्याचा पेशन्स नसल्याने आणि हॉटेल जवळ असेल म्हणून चालत निघालेलो तर ते दीड किलोमीटर होते. पायाचे तुकडे पडायचे बाकी अश्या स्थितीत येऊन परत समुद्रावर जाऊन दिवस संपवला. 



भगवंतगड येथे जाणारा बंधारा. 


तिन्ही किल्ल्यांवर आमच्याखेरीज चिटपाखरू पण नव्हते. सगळे किल्ले प्रचंड झाडोऱ्याने वेढलेले आहेत. पावसाळ्यानंतर लगेच गेल्यामुळे असेल बहुतेक. हे शक्यतो उन्हाळ्यात करायला हवेत पण घामाने आणि उकाड्याने वाट लागेल हे नक्की. 


पुढच्या भागात - 

मालवण मधील भटकंती , स्कुबा डायविंग ची मजा आणि भर जंगलातील निर्मनुष्य असा सिद्धगड आणि चकवा लावणारा वेताळगड.