मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

घनन-घन, घनन-घन घनगड

कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड

पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.
भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर. कोथरूड वरून मग आमची वरात निघाली ताम्हिणी घाटात.

"ह्या किल्ल्याला मुळशी रस्त्याने बाइकवर जाऊ नका" असे मिळालेले अनाहूत सल्ले आम्ही न मानता आमचेच 'घोडे' दामटले, आणि मग तेच 'घोडे' पंक्चर झाल्यावर ६ किमी ढकलत नेताना आमचे मालकाचे म्हणणे न ऐकणारे 'गाढव' झाले.

ऐतिहासिक संदर्भ :

भौगोलिक संदर्भ :
मुळशी परिसर हा पावसाळ्यात खरंच जन्नत असते. याच मुळशी मावळच्या पश्चिमेकडे पुण्यातून जवळपास ८० किमी अंतरावर घनगड आहे. लोणावळ्यापासून जवळपास ५० किमी असून येथून रस्ता जर बरा आहे.
घनगडाच्याजवळच तैलबैला, कैलासगड (वद्रे), सुधागड, सरसगड, कोरीगड आहेत.

येण्याजाण्याच्या वाटा : 
घनगडावर जाण्यासाठी 'एकोले' गावातूनच वाट आहे. हे एकदम छोटे असे गाव असून जवळपास १०० लोकांची वस्ती असावी. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता केलेला आहे. गावात गाडी पार्क करूनही किल्ल्यावर जाता येते.
पुण्याहून :
एकोलेगावात पोहोचण्यासाठी पुण्यातून ताम्हीणीमार्गे जाता येते. चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले
 रस्ता फार खराब असून दुचाकीवर जाणे अवघड आहे. टायर चांगले असतील तर ठीक. गाडी पंक्चर झाल्यावर निवे आणि भांबुर्डे गावाशिवाय कोठेही सोय नाही.
स्वारगेट येथून सकाळी नऊला भांबुर्डे बस असून तीच बस दुपारी दोनला परत जाते. एक दुपारची बस येथे मुक्कामी येते.
लोणावळ्याहून : 
लोणावळ्याहून भांबुर्डेगावात येणारी ST बस आहे. ती बस दिवसातून दोन वेळच आहे.सकाळी दहा आणि दुपारी चार. आंतरजालावर मुबलक बस असल्याची नोंद आहे पण तसे नाही.
भांबुर्डे  ते एकोले अंतर २० मिनिटे,३ किमी आहे. रिक्षा व इतर कुठल्याही गाड्यांची सोय नाही.

आमचा ट्रेक अनुभव:
सकाळी नऊ ला आम्ही गाडीला टांग मारली. एक गाडी दोघे जण. बरेच पुढे गेल्यावर अत्यंत गावंढळ पब्लिक कसेही रस्त्यावर हिंडत होते. त्यावरून आम्ही पौड आले हे ओळखले.
ताम्हिणीला लागलो आणि मस्त प्रवासाची सुरवात झाली. सकाळची वेळ असल्याने जास्त गर्दी नव्हती. बरेच अंतर कापून गेल्यावर लोणावळ्याचा फाटा आला. तेथून उजवीकडे वळून घनगडाच्या मार्गास लागलो.

मध्येच येणारे तीव्र चढण आणि खराब रस्ते याने गाडीचा जीव जायची सुरवात झालीच होती. गप्पा टप्पा मारत वेळ कसा गेला ते कळले नाही पण वद्रे गावापर्यंत यायला जवळपास अकरा वाजले होते.
वद्रे गावानजीकच कैलासगड आहे. कैलासगड हा फक्त डोंगर असून त्यावर विशेष पाहण्यासारखे काही नाही. किल्ला चढून उतरायला एक तास पुरेसा आहे. आमचे मुख्य लक्ष घनगड आणि तैलबैला असल्याने थोडा वेळ चढून आम्ही परत खाली आलो.


पूर्णतः निर्मनुष्य रस्त्यावर निवांत गाडी मारत आमची स्वारी चालली होती. 


मध्येच एक भारी स्पॉट लागला. पावसाळ्यात हा स्पॉट जन्नत असेल. चारही बाजूने रखरखते डोंगर कडे आणि मध्ये दरीतून पाण्याला काढून दिलेली वाट. 



एवढ्या रखरखत्या उन्हात मृगजळ दिसावे तसे हि गाडी पार्क केलेली दिसली. काय थाट होता तिचा वा !
 

निवे गावापर्यंत आलो. आता भूक लागली होती पण वेळ घालवायचा नव्हता. मग गाडी चालवतानाच प्याटीस खाऊन घेतले. निवे गावापासून ५-६ किमी आलो आणि फारच खराब रस्ता लागला म्हणून गाडीवरून उतरून ढकलत नेऊन पुढे जायचो. गाडी चालवताना मनात धाकधूक होती ती म्हणजे गाडी पंक्चर होण्याची. आणि थोड्या वेळातच ती धाकधूक संपली कारण गाडी खरंच पंक्चर झाली होती.


हा फोटो काढला आणि गप्प गाडीवरून उतरून गाडी ढकलायला लागलो. बघतो तर टायर शेवटचा श्वास मोजत होता. 


येथे आजूबाजूला सर्वत्र डोंगर रांगा आणि निर्मनुष्य रस्ता. एका माणसाकडून कळले की येथून ५ किमी मागे निवे गावात पंक्चरची सोय होईल अथवा पुढे १२ किमी भांबुर्डे गावात. हे ऐकूनच पोटात गोळा आला. नाईलाजाने ६ किमी गाडी ढकलत नेऊन अक्षरशः छाती भरून आली. एके क्षणी वाटले की "इथेच स्मारक होतेय की काय आपले."
६ किमी गाडी ढकलून 'आडगाव पाझरे' गावात पोहोचलो. तिथे एक आज्जी ना विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील मुलांना आवाज दिला. ती मुले बाहेर आली आणि म्हणाली की " पंक्चर काढणारा बाहेर गेला आहे, आमच्याकडे सगळी हत्यारे आहेत. आम्ही ट्राय करू"
तसेही माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. म्हटले ठीक आहे.
आता 'पंक्चर काढणे' सोहळा सुरू झाला. तीन मुले हत्यारे घेऊन आली, त्यांचे वडील मोठी परात घेऊन आले. आज्जी लगबगीने जाऊन त्यात पाणी घेऊन आल्या. तिघांनी चर्चा करून टायर काढायला चालू केले. 'अरे हे असे कर', ते तसे कर अश्या सूचना पालन करत काम चालले होते. सहा लोक मिळून पंक्चर काढत होते. शेवटी दीड तासाने हा सोहळा संपन्न झाला. आजींनी 'प्रसाद' म्हणून काही कैऱ्या दिल्या आणि थोडे पाणीही दिले. आता त्या पाण्याची चवही आम्हाला अधिक तजेलदार वाटली.

एव्हाना बारा वाजले होते. परत गाडी दामटवायला चालू केले. जाताना हा डोंगर अगदी माहुली सारखा दिसत होता. 'पुण्याचा माहुली' म्हणूनही तो खपला असता. 


भांबुर्डे नावाच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिथून सरळ घनगडाच्या पायथ्याशी. गावात गाडी लावून पुढे चालत जाऊ शकतो पण आम्ही मात्र अर्ध्या वाटेपर्यंत गाडी वर नेली. आता जे काही होईल ते बघून घेऊ असे म्हणत.
पायथ्याकडून दिसणारा घनगड.

गाडी पायथ्याशी लावली आणी थोडे १५ मिनिटे चालत वरती आलो तर लगेच 'गारजाई देवीचे' मंदिर दिसले. थोडा वेळ परत विश्रांती झाली. 

आता येथूनच किल्ल्याचा एक बुरूज दिसत होता. त्याचा माग काढत सरळसोट अश्या रस्त्याने चढाई सुरू झाली.




 येथून थोडे वर आल्यावर घनगड आणि त्या शेजारचा डोंगर यांच्यामधील खिंडीत एक वाट जाते. तेथे एकावर एक दगडांची रास केल्यासारखा एक एक कमाल स्पॉट आहे.


तेथून परत फिरून किल्ल्याची वाट धरली. मग वाटेतच थोडी हौस करून घेतली. 

एवढा सोपा किल्ला असून नेहमीप्रमाणे आम्ही येथून वाट चुकून दरीच्या मार्गाला लागलो. वेळीच पाय आखडता घेतला आणि जीव सांभाळत परत मागे आलो. 

मंदिरापासून अर्धा ते पाऊण तासातच आपण किल्ल्याच्या महादरवाज्याशी पोहोचतो. दोन भक्कम आणि बुलंदी बुरुजांनी झाकले गेलेले प्रवेशद्वार दृष्टीस पडले. 

प्रवेशद्वाराशीच असलेल्या बुरुजाने गडाची सुरक्षितता आणखीनच अभेद्य झाली होती. 





मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच पाण्याची टाकी नजरेस पडली.


येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी येथे एक शिडी लावलेली आहे. आधी या उभ्या कातळात केलेल्या खोबणीतून चढाई करावी लागे. आता ह्या शिडीमुळे फारच सोपे झाले आहे. 


येथून खाली बघितल्यास बुरूज आणि प्रवेशद्वार दिसत होते. 
 आता शिडी चढून वर आलो. थोडा डोंगर बाजूला झाला आणि बालेकिल्ल्यात पोहोचताच दोन बुरूज आणि समोर तैल-बैल कातळकड्यानी लक्ष वेधून घेतले.




 तैल-बैल कातळ कड्यांचे अप्रतिम असे दर्शन झाले. 

दिवसभर उन्हाने तापलेल्या वातावरणात जरा गारवा आला. क्षणात निसर्ग कूस बदलून घेतो याची प्रचीती आली.

थोडे फोटोसेशन झाल्यावर जेवण पदरात पडून घेतले. थोडेसे ढगाळ वातावरण, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच.  गोड शिरा, छोले उसळ. कमाल बेत झाला होता.


थोडी कारागिरी झाली आणि मग परतीची वाट धरली.


 आम्ही किल्ला उतरताच किल्ल्यावर ढग दाटून आले. क्षणात वातावरण बदलले.

पायथ्याशी लावलेली गाडी काढली आणी लोणावळ्याच्या दिशेने निघालो. 




Aamby Vally च्या जवळपास आलो आणि येथून एकदम चांगले रस्ते सुरू झाले. 

कोरीगड आधीच झाला होता त्यामुळे लांबूनच कोरीगडला टाटा केला आणि लायन्स पॉइंट ला निघालो. 



जरा वेळ इथे टिपी केला आणी लोणावळा स्टेशन मार्गे निघालो. भूषण लोणावळ्यावरून मुंबईला गेला आणि मग आम्ही हाय-वे पकडून दोन तासात घरी. 
"कोथरूड ->चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले->भांबुर्डे -> लोणावळा-> चांदणी चौक-> कोथरूड "
एकंदर फारच मोठा राउंड झाला होता पण बरीच ठिकाणे पाहता आली. या प्रदेशात स्वतःची गाडी असेल तर बरीच भटकंती करता येते.  एका दिवसात आरामात "चांदणी चौक-> ताम्हिणी -> कैलासगड -> घनगड -> तैल-बैला -> कोरीगड-> लायन्स पॉइंट-> लोणावळा - चांदणी चौक" अशी ट्रीप /ट्रेक होऊ शकतो.

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

अदभुत अविष्कार (२): इंद्रवज्र

अद्भुत आविष्कार
अदभुत अविष्कार (१): कपारीतील चुनकळीची गाय

अदभुत अविष्कार (२): इंद्रवज्र

सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.


साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.


इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला  आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी  गोलाकृती आकृतीत उमटते.

दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली.  जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.


इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )


खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल. 



अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. पावसात वा धुके असताना इंद्रधनुष्य दिसते असे ग्राह्य ठरवले तर पाऊस नसताना आणी मुख्यत्वे विमानातून दिसणारी सप्तरंगी किनार कशी निर्माण होत असावी हे ही मला अजून न उलगडलेले गूढच आहे.


असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील लेख :
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्याची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज.  

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय?
काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. !
नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा.  देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर!

सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच !
असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी. पण च्यायला, एका रात्रीत जाऊन तो सिंहगडचा गाडीरस्ता खोदून यायला पाहिजे. 

पाऊस चालू झाला की, लोकांमध्ये विशेतः अमराठी लोकांमध्ये काय खाज सुटते कळत नाही. सगळे निघाले उंडारायला सिंहगडावर वा भूशी तलाव. तेही एक बरेच आहे म्हणा, सगळे तिकडे गेल्याने बाकीची ठिकाणे चांगली राहतात. 
हे हि असो, आपले काय त्यांच्याशीही वैर नाहीये. जाऊदे बापड्यांना, घेऊदे आनंद त्यांनाही, एका छोट्या डबक्यात १०-१५ जणांचा घोळका करून आणि डोक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अर्ध्या क्षेत्रफळा एवढे मोठाले गॉगल घालून एवरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात फोटो काढण्याचा.

आता आपण मूळ भजी वर येऊयात म्हणजे मूळ मुद्द्यावर येऊयात. 

आमचा एक मुंबई चा मित्र बरेच दिवस मागे लागलाय की सिंहगडावर जाऊयात म्हणून. 
"तुझ्या घरापासून किती जवळ आहे रे ! चल जाऊन येऊ !"
त्याची ही  मागणी आजपर्यंत मी नानाविध कारणे देऊन थोपवून धरली आहे. 
कारण असे की, जेव्हा मी पहिल्यांदी मुंबई फिरायला गेलो तेव्हा याने मला पहिल्यांदाच 'हाजी आली' ला नेले होते. म्हणजे तो नेतच नव्हता. म्हणत होता की, "आता येशील तिथे पण "कुठे पण नेतो' म्हणून हेच आयुष्यभर ऐकवशील मला". तरीही मीच हौसेने गेलो होतो. पण ते जे काही होते ते कहर होते. त्याचे वर्णन मी आता इथे लिहितं नाही ( त्यासाठी दुसरा लेखच लिहीन, विनोद आणि अपमान एकाच लेखात नको म्हणून !) 
त्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत त्याला आम्ही ज्या अमाप शिव्या दिल्या आहेत, त्याची साभार परतफेड तो एकाच ट्रेक मध्ये करू शकतो. तो म्हणजे सिंहगड !

त्याने बरेच कौतुक करून म्हणजे प्लस पॉइंट सांगून मला तयार केले किल्ल्यावर जायला की मी त्याला तेवढीच स्ट्रॉंग कारणे देतो. पण जेव्हा जेव्हा कोण सिंहगडावरील भजी पिठलं आणि दही याबद्दल बोलते तेव्हा मग आमची फ़ेमस रेसिपी चालू होते. ती म्हणजे "मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी "!

कोणी पिठलं भाकरी, भजी च्या नावाने मिटक्या मारल्या तर आम्ही "ती भजी कशी बनते?" हे रसग्रहण त्याला इतके आक्रमकपणे, पूर्वग्रहदूषितपणे, विरोधात्मक पटवून देतो की तो माणूस सिंहगड जाणे रद्द करतो. त्यातही तो अजून चिकट असेल तर गडावर जातो पण भजी मात्र खात नाही. 
अजून कोणी कहरच असेल तर भजीही खातो, पण मग आम्हाला त्याचा सुगावा लागू देत नाही. उदा. म्हणजे तेवढे भजीचेच फोटो वैगरे कॉम्पुटर वरून हाईंड वैगरे करणे वैगरे. 
काय म्हणता, "भजीचे फोटोज"?? 
अहो हो, पहिल्यांदाच जो तिथे गेलेला असतो तो नुसते भजीचेच काय तर वरून प्रदूषणाने अंधुक दिसणाऱ्या खडकवासला धरणापासून ते देव टाक्यांतले अंधारातील पाणी आणि दूरदर्शन च्या टॉवर पासून ते 'या चटई वर आम्ही बसलो होतो' इथपर्यंत फोटो काढतो.
( तरीही एकदा एकाने घेतलेल्या भजी चे फोटो दाखवले होते तेव्हा त्याला मी " हि भजी जर जास्त पिवळी वाटतीये नाही? " अशी कमेंट दिली होती. त्यानंतर बरेच दिवस आमचे संभाषण बंद होते. कारण कळेल लेखाच्या शेवटी!) 

असो तर ती समजुतीची वाक्ये ( भजीची रेसिपी) अशी काहीतरी असतात. 

"अरे नको जायला सिंहगडावर! तो काय गड आहे का ? दुकान आहे ते शिवकालीन इतिहासाचे!
"नाही रे चल मला जायचे आहे रे खूप दिवसापासून. "
"अरे मग दुसरीकडे जाऊ ना , राजगड चल बेस्ट आहे. "
"नको रे तो हेक्टिक होईल हा निवांत आहे. प्लस जेवणाचीही सोय होईल. "
"अ पळ हा, तिथे एकतर जायचेच नाहीये आणि वरती जेवायचे बिवायचे तर अजिबातच नाहीये. "
"मला भजी आणि पिठले भाकरी खायचीये तिकडची"
"अरे गंडला आहे का तू, किल्ल्यावर जाऊन कसली भजी वैगरे खातोस? घरी कधी भाकरी खात नाहीस!"
"अरे तिकडची 'भारी ssssssss' असते म्हणे. "

( आता आमची गाडी मेन गियर वर येते. पण जरा वेगळ्या वळणाने जाते. )
"कसली भारी असते? काही भारी बिरी नसते.
पण एक खरे आहे. ती विकणारी लोक हि तिथेच गावात राहणारी लोक आहेत. गरीब बिचारी! खूप कष्ट करतात रे ती ! रोज सकाळी लागणारा शिधा गोळा करायचा. तो गावातून वाण्याकडून घरी आणून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल तीन तास गड चढून वर जायचे ते पण सामान घेऊन. अरेरे किती कष्ट !
नुसते एकटे नाही तर कुटुंबासहित वरती यायचे. बाया योग्य जागी 'चूल' आणि अयोग्य जागी 'मूल' मांडून ठेवतात.  तर बापडे गडाच्या प्रवेशद्वाराशीच सावज टिपत असतात. तू त्यांच्याकडे नुसते बघून भूतदयेने हसलास जरी, तरी तू त्यांचा(च) 'गिऱ्हाईक'(च) होऊन(च) जातोस(च). मग तुला नो ऑप्शन. तुला त्यांच्याकडे नसले खायची भजी तरी गप्प गुमाने खायला लागणारच."

"असू दे की मी नाही म्हणेन त्यांना !"

"नाही,  मग तू ज्यांच्याकडे भजी खाशील त्यांच्या 'भज्या' म्हणजे त्यांनी बनवलेल्या 'भज्या' तुझ्या तोंडात असतानाच त्यांच्याशी ती पहिली बाई आणि बापडा इतकी सुमधुर भांडणे करतील की ज्याने तुझी मराठी भाषा अजून प्रगल्भ तर होईलच. पण भजी तोंडात असल्याने तू एक अवाक्षर बोलू शकणार नाहीस.आणि हे प्रकरण इथे न संपता तुला त्या पहिल्या बाई कडे 'सर्दी झाली असली तरी' वा 'पाऊस असला तरी' कमीत कमी 'दही' नामक पाणी तरी प्यायलाच लागेल."

"असू दे रे, चालायचेच!. कोणाकडे तरी खायचीच आहे भजी. कोणाला तरी द्यायचेच आहेत न पैसे मग पहिलीलाच देऊ. काय फरक पडतोय. "

एवढा चिकट माणूस असला तरी त्या समोर पराभूत झालो तर पुणेकर कसले?  मग पराभवाचे सूतोवाच होऊ लागले की हुकमी अस्त्र बाहेर काढतो. 

"नाही रे चांगली नसते तिच्याकडची भजी म्हणूनच ती गिऱ्हाईक भांडून मिळवते ना. हे बघ ती सकाळी उठून किल्ला चढून येते. माहीत पण नाही अंघोळ वैगरे केलीये का नाही. घाईने येते म्हणून स्वयंपाक करताना आवरते केस वैगरे ! ते जाऊदे !
खालून येताना फक्त शिधाच आणते म्हणजे भांडी इथेच असतात पर्मनंट, कधी धूत असेल ती काय माहीत?
तिच्याकडे फक्त १ पातेले, १ जग आणि ४-५ प्लेट्स आणि पेले असतात. ज्या पातेल्यात ती तुझे  पिठले करते त्यातच ती दुसऱ्यांचे पिठले करते. भाकरी सांगितलीस तर पीठही त्यातच मळते. हात धुतले असतीलच याची खात्री नाही. हे पण जाऊदे !
कोणी नॉन व्हेज सांगितले तर अंडीही त्या पातेलीतच फोडते. याउप्पर कोंबडी हि त्यातच कापते. ज्याने कोंबडी कापते त्यानेच कांदे, बटाटे कापते. म्हणूनच भजी थोडीशी लालसर असते. हे ही असो.
ज्या 'जगात' तुला पाणी देते त्यातच सरबत करते, ताक करते. तोच काहीजण तोंड लावून पितात. एकानी तर त्या 'जगा'मध्ये बेडूक पकडून आणला होता एकदा. तर काही तंबाखू खाल्लेली माणसे तोच 'जग' घेऊन गुळण्या करतात. काही तर त्यानेच तोंड धुतात.
यातच कहर म्हणजे जर 'जगा'च्या मालकांना निसर्गाची हाक आली तर तोच जग घेऊन .............. !"

"हरामखोरा, गप्प बस आता ! नाही न्यायचेय तर नको नेऊस ! पण तोंड बंद कर !"

या त्याच्या उत्स्फूर्त दादेने सिंहगडावर जायचा विषय त्याच्यापुरता तरी कायमचा संपतो!  

सागर

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

हा खडक काही केल्या पाझरत नाही.

 हा खडक काही केल्या पाझरत नाही.

साल्हेर किल्ल्याच्या त्याच पायऱ्या वेगवेगळ्या ऋतूत कश्या वेगवेगळे पेहराव करून बसतात.
तेच तेच जीवन म्हणून त्या कधीच कंटाळत नसतील का? 
काय तर रोज आपल्या अंगावरून कोणाला तरी वर किल्ल्यावर जाऊन द्यायचे.  
लाईफ स्याच्युरेट झालेय असे त्यांनाही वाटेल असेल का ? 
रोज तेच तेच, काहीच टेम्प्टिंग नाही म्हणून त्याही बोर होत असतील का ?
का ऋतूंशी स्पर्धा करत निसर्ग साज लेऊन नटत असाव्यात उगाचच? 
आपसातही हितगुज चालत असतील का त्यांची ? 
कधी त्यांच्यावर उगवणाऱ्या हिरव्या झाडांशी आनंदाने गप्पा टाकत असतील तर कधी उन्हाळ्याने सुकून चाललेल्या पालवीला धीर देत असाव्यात. 
असो,पण तरीही हा खडक पाझरत नाही तेच बरे आहे. खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे. 






हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

---

संदीप खरे.

संदीपचा मी फुल स्पीड पंखा आहे.  पण कधी त्याच्या कविता अश्या कॉपी करून टाकल्या नाहीत कधीच. ही कविता मात्र अगदीच भारी आहे. 
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
आमच्या आयुष्यात कोडीच कोडी आहेत त्यातच सार्थक मानतो सध्या आम्ही. ना कशाचे सुख न कशाचे दुख, दिवाळीही पूर्वीसारखी राहिली नाही आमची.  खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे. 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय


अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.

"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.

आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला. बराच दुर्लक्षित असा हा किल्ला असल्याने तेथे जास्त वर्दळ नसते. पायथ्याचे गाव सोडले की क्वचित एखादा गुराखी दिसेल असा निर्मनुष्य. धोडप किल्ल्यावर जायच्या दोन वाटा आहेत. एक "हट्टी" नावाच्या गावातून जे किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. आणि एक वाट आहे 'ओतूर' नावाच्या गावातून. जे बरेच लांब असून या वाटेने येताना दोन डोंगर ओलांडून यावे लागते. 

धोडप किल्ल्याच्या शेजारीच "विखारा" नावाचा एक किल्ला/डोंगर आहे. गूगल नकाशे वर तो मी लोकेट केला आहे. याचा उल्लेख आजपर्यंत मी कुठेच ऐकला/वाचला नाहीये. पण श्रावणात एक दिवशी ( कोणता तो लक्षात नाही) कुटुंबासहित या किल्ल्यावरच्या मंदिरात जाण्याची  प्रथा ओतूर मध्ये होती.

 या नकाश्यात आपल्याला अंदाज येऊ शकेल. हट्टी गावाच्या वर एक काळा गोल आहे तो लक्षात ठेवा हा. सांगतो तो कसला आहे ते.

हे 'ओतूर' गाव नाशिक मधील कळवण तालुक्यातील आहे. आणि 'अलंग' जे दाखवले आहे तो किल्ला नसून धोडप किल्ल्याच्या माचीवर वसलेले १०-१५ घरांचे छोटे गाव आहे.


असो, मुद्द्यावर येतो. तर धोडप किल्ल्यावर आम्ही निघालो. मी, माझा एक मित्र आणि त्याच्या भाऊ.  त्याच्या भाऊ हा ओतूर गावातच राहत असल्याने त्याला किल्ल्यावर जायची वाट माहीत होती. पण तोही लहान असताना किल्ल्यावर  गेला होता. ( मी पुण्यात राहून शनिवार वाडा किती वेळा गेलो बरे? ).

निघता निघता, मित्राच्या मामाने  सांगितले की "किल्ल्याच्या पायथ्याशी एक 'गाय' आहे ती आवर्जून बघून या. सापडणार नाही तुम्हाला ती कारण ती आता कपारीत घुसली आहे.  पण दिसली तर बघा."

मी म्हटले "गाय काय बघायची? आणि कपारीत घुसली म्हणजे काय?"

मग कळले की, "चुनकळीच्या दगडाची चालणारी गाय"! काय ??????????

त्यानंतर कळलेल्या वर्णनानंतर, "बस्स! ती गाय शोधून काढायचीच" असे ठरले. जाताना ओळखीच्या माणसांना विचारून पाहिले त्यांनीही त्या बद्दल ऐकले होते ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

ऐकलेल्या वर्णनावरून, ती दगडी गाय हट्टी गावाच्या दिशेला असावी असा अंदाज बांधला. आणि परस्पर विरोधी वाट जोडत आम्ही निघालो. पावसाळ्यात असे काही सापडणे शक्यच नव्हते. आम्ही पावसाळ्या पूर्वी गेलो होते हे बरे होते. जवळ जवळ अर्ध्या किल्ल्याला वळसा घालून आम्ही ओतूर गावाकडून येणाऱ्या वाटेने विखारा किल्ल्याच्या खिंडीतून धोडप किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलो. किल्ल्यावर जाणारी वाटही जोडीला होतीच.


पहिल्यांदा लगीन गायीचे मग किल्ल्याचे असा निर्णय करून किल्ला सोडून २-३ तास कडे कपारी धुंडाळत राहिलो.
२-३ तास हिंडून गाय तर काही सापडली नाही पण वेळही चालला होता. मग त्या गायीचे परत कधीतरी 'दर्शन' घेऊ म्हणून किल्ल्याची वाट धरली.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर १-२ घरे दिसत होती. त्यांच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या आकाराच्या 'कढया' ( कढई) ठेवल्या होत्या. पण आजूबाजूला माणसाचा लवलेशही नव्हता. हट्टी गावातून येणारी वाट एका ठिकाणी ओतूर गावातून येणाऱ्या वाटेला मिळते. तिथपासून हि आम्हाला कोणी गुराखी दिसला नव्हता वा किल्ल्यावर पोहोचल्यावरही खाली कुणी दिसत नव्हते.

मनसोक्त किल्ला हिंडून आलो आणि परतीची वाट धरली. किल्ला उतरून दुसऱ्या प्रवेशद्वार सोडून पुढे आलो. वर जाताना दिसलेली १-२ घरे सोडली आणि पहिल्या प्रवेशद्वारास जाण्यासाठी निघालो. यावेळी 'विखारा' बद्दल माहिती कळली होती. पुढच्या वेळी जाऊ असे ठरले. उगाच जरा हौस म्हणून 'विखाराचे' फोटो काढायला थोडेसे वाट सोडून दरीच्या दिशेने ( हट्टी गावाच्या उताराकडे ) गेलो. थोडा वेळ फोटो काढले आणि निवांत टेकलो.


तेवढ्यात एक माणूस समोर आला. पूर्ण परिसरात एकाही माणूस दिसला नसताना हा कसा काय आला? म्हणून आम्ही त्याला विचारले.

"सकाळीच आलोय. गुरे घेऊन आलोय चरायला. वाट चुकली काय तुमची?"

"नाही, असाच फिरतोय. "

 तो गुराखी होता. एवढ्या वेळ एकाही माणूस नसताना हा मध्येच कसा उगवला? त्याची गुरेही दिसत नव्हती. पांढरा सदरा आणि पायजमा, डोक्यावर दक्षिणोत्तर पांढरी टोपी.  त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या चावल्याच्या खुणा होत्या. त्याचे नाव होते सूरदास.

"ती कुठली कपारीतील गाय कुठे आहे माहीत आहे का हो तुम्हाला"

"हो माहिती आहे"

"काय ????? माहिती आहे?????"

"इथेच आहे का ती? किती वेळ लागेल जायला? आम्हाला जाता येईल का त्या कपारीत? तुम्हाला कशी माहिती ती" असे अनेक प्रश्न आम्ही त्याला विचारले. तो काहीच बोलला नाही.

फक्त म्हणाला "चला, दाखवतो ती गाय"

तडक निघालो. तो घेऊन जाईल तिकडे चालत सुटलो. काही वाटा लागल्या तर थोड्या वेळाने प्रचंड झाडी झुडपे लागली. कुठे चाललो आहे याचे तर भान नव्हतेच पण याच रस्त्याने परत येऊ शकू का याची पण शाश्वती नव्हती.

जाता जाता त्याच्याकडूनच काही माहिती मिळवली. त्याच्याकडून ऐकलेली आणि आतापर्यंत ऐकलेली सगळी एकत्रित माहिती अशी:
"फार पूर्वी, म्हणजे मित्राच्या मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आजोबांनी हि गाय पहिली होती. पूर्णतः दगडाची वा चुनकळीची फरशी असते त्याची. मित्राच्या मामाला ( ज्याचे वय आता ६०-६५ असेल) त्याच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी हे सांगितले होते. त्यांचे आजोबांनी जेव्हा त्याच्या डोळ्यांनी ती गाय (म्हणजे गाई चा पुतळा म्हणता येईल.) पाहिली  तेव्हा ती 'हट्टी' गावाच्या आणि धोडप किल्ल्याच्या मधील मोठ्या मोकळ्या जागेवर होती. पहिल्या फोटोत काळा गोल काढला आहे तिथे जवळपास.


हा गायीचा पुतळा इथे होता तर त्याच्या परस्पर विरोधी दिशेला म्हणजे धोडप किल्ल्याच्या उत्तरेकडे खूप लांब अश्या एका गावात असाच चुनकळीच्या दगडाचे वासरू होते. निसर्गाने म्हणजे साक्षात धोडप किल्ल्याने त्या माय-लेकराची ताटातूट केली होती.


हा वासराचा पुतळा जेथे होता तेथे त्या गावातील लोकांनी विटांचा का कसलातरी कारखाना काढला होता. त्या पुतळ्याची अडचण म्हणून एक दिवशी एकाने रात्री तो पुतळा तोडून तो घरी गेला. आणि आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो पुतळा तसा च्या तसा होता. त्यानंतर सर्व लोकांच्या साक्षीने तोडलेला तो पुतळा दुसऱ्या दिवशीही तसाच अभेद्य होता.


किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस असलेली गाय आणि वासरू हे एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात होते. एकमेकांकडे 'चालत' मार्गक्रमण करत होते. 


हि 'गाय' म्हणजे 'गायीचा पुतळा' दर 'वसुबारस' आणि 'कोजागरीला' काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकते.
त्यानंतर, हि माहिती देणाऱ्या मामांनी त्यांच्या लहानपणी स्वतः हि गाय जेव्हा पाहिली, तेव्हा ती मोकळ्या जागेतून धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पहिली होती. त्यानंतर खुद्द मित्राच्या आईनेही ती गाय पहिली तेव्हा ती गाय एका कड्याला समांतर अशी होती. म्हणजे ती आता या कड्यांत कपार करून घुसेल की काय अशी. आणि त्यांनी तेव्हा ऐकल्याप्रमाणे विरुद्ध गावातील वासरू हे मार्गक्रमण करीत डोंगरात कपार पाडून त्या कपारीत घुसलेही होते. आता ते वासरू कुठे आहे कोणालाच माहीत नाही. ( पण, आज मला माहिती आहे की ती गाय कुठे आहे.)


या सर्व कथा आणि संदर्भाप्रमाणे आता ती 'गायही' डोंगराला कपार पाडून कपारीत आत घुसली असली पाहिजे. असा तर्क आम्ही केला आणि एका ठिकाणी पोहोचलो.

हे सगळे प्रथमदर्शनी खरे वाटले नाही. म्हणजे 'असे कसे असू शकते?' इथपासून ते 'अंधश्रद्धा असावी' इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर मात्र जे डोळ्यांनी पाहिले आणि हातांनी अनुभवले त्याने माझी मती गुंग झाली. 

माझ्या डोळ्यासमोरच डोंगराचे पोट उभे फाडल्यासारखी कपार होती. जेवढा किल्ला आम्ही फिरलो होतो तेथे कुठेही अशी उभी कपार पहिली नव्हती मी. खतरनाक दिसत होती ती. मानव निर्मित असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे दिसण्यावरून वाटत नव्हती.

आत जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून दोघांनी एकत्र जायचे ठरले. पण ती कपार इतकी बारीक होती की आत काय चावले-बिवले  तर दोघांना निघतानाही येणार नाही म्हणून मग भूषण पहिल्यांदी आत गेला.


हीच ती खोल दिसणारी कपार. मध्यभागी आत एक गाई सदृश आकृती ( मागून गाय जशी दिसते तशी) दिसते आहे. मागचे दोन पाय स्पष्ट दिसत असून शेपटी हि दिसत आहे. गाय मागून बघितल्यास दुधाचे पान्हे जसे दिसतात तसेच दिसत आहे.
 

आता हे अजून जवळून बघायला आम्ही कपारी मध्ये शिरलो. कोंदट असा वास येत होता. आम्ही आत शिरताच आतली काही वटवाघुळे आमच्या डोक्याला धडकून उडून गेली. आता मी तर फुल टू टरकलो पण भूषण अजून आत गेला.

हा जवळून फोटो. अगदी गायच वाटत आहे नाही? वाटत आहे म्हणजे काय आहेच ती गाय !

विशेष म्हणजे त्या कपारीची साइज पण फक्त गाई एवढीच होती. जर ती नैसर्गिक असावी तर पर्फेक्ट त्याच मापाची कशी?


या गायीच्या पाठीवरून पुढे हात घालून पहिले तर थोडा डोक्यासारखा उंचवटा भासला. फ्ल्याश मारून डोके सदृश भागाचा काढलेला फोटो.


आत कपारीतून बाहेरचा काढलेला फोटो. खूप भीती वाटत होती आत. वटवाघुळे आमच्यावर पेटून गेलीच होती पण मोठाले कोळी पण अंगावर यायला लागले होते. आणि काहीतरी चावले तर इथून बाहेरही पडता येणार नाही अशी स्थिती.


हा मी. आत गेलो कसाबसा पण मावलो नाही त्या कपारीत.
हाच तो अद्भुत 'सूरदास' आणि मागे विखारा किल्ला.



थोडेसे तिथेही फोटो सेशन झाल्यावर आम्ही परत निघालो. त्याने आम्हाला कुठल्या वाटेने इथपर्यंत आणले आणि कुठल्या वाटेने परत नेले हे आजही आठवत नाही. आता मी परत तिथे गेलो तरीही मी ती कपार शोधू शकणार नाही. घरी येऊन मामांना या गायीचे फोटो दाखवले. काय बोलावे त्यांनाही सुचेना. "लहानपणी पहिली होती तेव्हा ती गाय किल्ल्यावर चढत होती. कमाल केलीत तुम्ही पोरांनो!"
जे काही पहिले ऐकले ते केवळ अद्भुत. सांगीव कथांवर विश्वास बसत नाही पण जे पाहिले 'ते तरी कसे काय झाले असेल?' याचाही उलगडा होत नाही. 

याला खोटे म्हणावे तर ते तरी कसे? मामांनी त्यांच्या आजोबांनी आणि मित्राच्या आईनेही ती पहिली होती. गावातील जुन्या लोकांनी पहिली होती. आज आम्हीही स्वतः पाहिली आणि पाहून विश्वास बसला.
 
कळत नाही की सध्या गावात राहणाऱ्या  कोणाला न सापडणारी हि गाय 'सूरदास' ला कशी माहिती होती? त्याला आम्ही जाताना चहा पाण्यासाठी काही पैसे दिले. त्याने तेही घेतले नाहीत. नेमकी तो तेव्हाच तिथे कसा आला? पहिल्यांदा शोध शोध शोधून न सापडलेले हे गूढ रहस्य नंतर आम्हाला अर्ध्या तासात सापडले. याआधी किती जणांना ते सापडले असेल? काहीच उमगेनासे झालेय. 

निळे आकाश, हिरवा निसर्ग,आत आत जाणारी ती कोंदट कपार, मी, माझे प्रश्न ,

त्या दुर्गांवरती मी का माझ्या मनाच्या खोलात हा शंकांचा दुर्ग?

पैसे देऊन मी सूरदासाला मदत केली? का त्याला गरजच नव्हती अश्या मदतीची?

जर तो गुराखी होता, तर त्याची एकही गाय व शेळी कशी दिसली नाही?

आणि जर तो गावातूनच वर आला होता तर त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या कश्या काय चावल्या होत्या?

वाट सोडून गेल्यावर तो दिसला. मग जेव्हा वाटेने जात होतो तेव्हा तो कुठे असावा?

मी परत जाईन तेव्हा कुठे आणि कपारीत किती खोल  गेली असेल ती गाय? मुळात मला सापडेल का ती गाय?

किती खोल पोहोचले आहे तिचे वासरू? कधी भेट होईल त्यांची? होईल का ?

कित्येक वर्षे चालू असेल हे सगळे? 

काय होईल जेव्हा त्यांची भेट होईल? डोंगराच्या पोटात लुप्त होऊन जातील दोघे का डोंगर फोडून बाहेर येतील?

विखार्यावर एक मंदिर आहे, कसले आहे ते? या वासराचेच तर नसावे.?

त्या वासराच्या ओढीने पुढे जाणाऱ्या गाई साठी कोण खणत असेल कपार?

त्या कपारीत अजून आत गेलो तर काय असेल आत?

हे  प्रश्न काही केल्या सुटतच नाही. मी मात्र अजून आत आत जात राहतो त्या गूढ कपारीसारखा. 


असो,
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे, हेही असू शकते आयुष्याचे सार्थक!
सागर


तळटीप : 
लेखातील अनुभव हा खरा आणि याची देही, याची डोळा अनुभव असला तरी लेख गूढकथा अथवा फँटसी प्रकारातील लिहिलेला आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील लेख :
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्याची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज.  

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार

अद्भुत आविष्कार 

निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते.

निसर्गात कुठे कधी आणि काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. सर्व काही नशिबाचाच खेळ.  ते क्षण डोळ्यात आणि मनात साठवून घेणे एवढेच आपल्या हातात उरते. त्या गोष्टींचा ना कुठे शोध लागतो ना कुठे त्याची माहिती. अनुत्तरित असेच बरेच प्रश्न, भारावलेले मन, स्तब्ध कॅमेरे आणी डोक्याच्या खोल आडामध्ये शिंपल्यांप्रमाणे आत आत जाणारा एकच प्रश्न. "हे कसे शक्य आहे?"

इंटरनेटवर  क्षणात माहितीचा खजिना उघडून देणाऱ्या संकेत स्थळांच्या चेहऱ्यावर हि आठ्या येतात. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशीच त्याची पण भांबावलेली अवस्था. आपल्या आधी हे आविष्कार किती जणांनी पाहिले असावेत कुणास ठाऊक. त्यातून त्यांना काय बोध झाला असावा हेही वादातीत. डोळ्यांनी जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा असे मानले तर किती साऱ्या गोष्टीपासून आपण अनभिज्ञच. आणि हेच आविष्कार सत्य म्हणूनच पुढात उभे राहिले तर?

एका थिअरी प्रमाणे, एक 'पाय चार्ट' काढला आणि त्याचे असे काहीसे भाग केले.
१. मला माहीत आहे की हे मला माहीत आहे.(known knowns; there are things we know that we know.)
टक्केवारी : २% 
उदा. मला माहीत आहे की जेवायचे कसे हे मला माहीत आहे.

२. मला माहीत आहे की हे मला माहीत नाही.(known unknowns;there are things that we now know we don't know.) -
 टक्केवारी : ३%
 उदा. मला माहीत आहे की, 'विमान' कसे उडवायचे असते हे मला माहीत नाही.

३. मला माहीत नाही की हे मला माहीत आहे/नाही. (unknown unknowns – there are things we do not know we don't know.)  -
 टक्केवारी : ९५%
उदा. मला हे माहीत(च) नाही की ........


समजा, असे काही आविष्कार/चमत्कार दिसले की, आपल्या मनाची वाटचाल तिसऱ्या मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे होईल. तर?
अधिक सोपे करून, एखादी गोष्ट आहे, डोळ्यांना समोर दिसते आहे, डोक्याला लॉजिकली पटते आहे. पण त्याचा काही मागमूस लागत नाही.
किती मजा येईल ना?

असो, मूळ मुद्द्यावर येतो. आजपर्यंत भटकंतीच्या निमित्ताने जिथे जिथे गेलो, प्रत्येक वेळी हा निसर्ग वेगळाच भासला. आडवाटांनी हिंडताना जे काही गूढ,इतिहास असलेल्या पण अनाकलनीय गोष्टी मला दिसल्या त्या शब्दबद्ध करण्याचा माझा मानस आहे. काही गोष्टींना इतिहास आहे तर काहींना ऐकीव पार्श्वभूमी. काहींना विज्ञान आहे तर काही आजही अनुत्तरित.

 या लेखन मालिकेत माझ्या डोक्याला गती मंद करणाऱ्या काही जागा, ठिकाणे यांची मिळवलेली माहिती देतो आहे. अर्थात, थोडे तिखट मीठ लावून.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, फोटो बरोबर दिलेली माहिती हि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांकडून मिळवलेली ऐकीव माहिती आहे. त्यामुळे त्याला पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक जोड आहे.
पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक ऐकीव माहिती आणि अंधश्रद्धा या मध्ये पुसटशी बारीक रेषा आहे. मला जेवढे उमगले ते मांडतो आहे.

लवकरच हे ५ भाग (लिहून) प्रकाशित करत आहे.
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील चुनकळीची गाय
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्यांची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज. 

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

एकमेवाद्वितीय इंद्रवज्र

साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.


सकाळची वेळ, सह्याद्रीचा महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला,कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे आकाशात डोक खुपसून बसलेले उंचच उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! सह्याद्रीच्या साक्षीने हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.



इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला  आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी  गोलाकृती आकृतीत उमटते.

दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली.  जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.


इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )


खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल. 



अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. ( म्हणूनच हा एवढा लेखनप्रपंच).
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

सागर