बुधवार, १ जानेवारी, २०१४

२०१३! फुल टू कमाई !

 २०१३! फुल टू कमाई !

लोक्स हो, आमचे पुराण लावण्याआधी सर्व वाचक मित्र-मैत्रीणीना अगदी मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्या योजना, संकल्प (थोडे तरी) पूर्ण होवोत ही अपेक्षा. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१३..  बघता बघता पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही. जरा बारीक झालोय पण नजर लागायला नको म्हणून सांगत नाही.

असो, तर "वर्षभरात मी काय काय केले? वा काय कमावले आणि काय गमावले?" अश्या प्रश्नाने आयुष्याचा, वर्षाचा आढावा घेण्याइतके मी काही केले आहे असे वाटत नाही. काय कमावले आणि काय गमावले या दोन्हीचीही उत्तरे मला सुचत नाहीयेत. तरीही पूर्ण दिवस काढून यावर विचार केला.(म्हणजे पूर्ण दिवस सुट्टी काढून ५-७ मिनिटे विचार केला.)

काय गमावले?
काहीच गमावले नाही. कारण गमावण्यासाठी प्रथम काहीतरी असावे लागते जवळ. (हे तत्वज्ञान आमचे आम्हाला सुचले आहे.)

आणि काय कमावले?
काहीच कमावले नाही. (खरतर मी याची लिस्ट खूप मोठी केली होती पण तीच बनवताना बँकेतून फोन आला आणि त्यांनीच याचे उत्तर दिले.)

असो,
मग, ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यांच्या वाटेला कशाला जा? म्हणून मग प्रश्नच बदलला.

"वर्षभरात मी कुठे कुठे काय काय केले?
- या अश्या प्रश्नाला मात्र माझ्याकडे 'पुराव्याने शाबित' करण्यासारखे उत्तर आहे. आणि तो पुरावा म्हणजे आमचा कृष्ण वर्ण. वर्षभर भटक भटक भटकून स्व-कर्तुत्वाने मिळवलेला 'कृष्ण वर्ण'. 

हे हि असो.वर्षभर कुठे कुठे हिंडलो याचा थोडक्यात आढावा घेतानाच एक सांगावेसे वाटते कि, मी जिथे जिथे भटकलो, त्याबद्दल वाचकांनाही माहिती मिळावी आणि त्याचा उपयोग व्हावा ह्याच एकाच हेतूने हा लिहायचा घाट घातला गेला आहे. अर्थात स्वतःचा आनंद मी यात शोधतच असतो आणि फोटोग्राफीची आवडही पूर्ण करून घेत असतो.

जानेवारी :  साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, उद्धव महाराज समाधी, मांगी-तुंगी

वर्षाची सुरवातच दणक्यात झाली. पहिल्याच महिन्यात बागलाणातील साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, उद्धव महाराज समाधी, मांगी-तुंगी एकापेक्षा एक असे किल्ले करण्याचा योग आला.
या ब्लॉग चा जन्म पण याच महिन्यातला. :) 
साल्हेर -सालोटा 
 सर्वोच्च किल्ल्यावरचे सर्वोच्च मंदिर- परशुराम मंदिर
 मुल्हेर किल्ला - गणेश मंदिर
 मोरागड
 मांगी -तुंगी
याचे याथासार वर्णन तुम्ही वाचले असेलच. नसेल वाचले तर हे दुवे बघा.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी 
  

फेब्रुवारी : कर्नाळा अभयारण्य/ किल्ला 

वर्षाच्या सुरवातीलाच दणदणीत ट्रेक झाल्याने आता थोडे रील्याक्स.

 बालेकिल्ला


यावर एक लेख खरडायचा बाकी आहे अजून.

मार्च : खांडस मार्गे भीमाशंकर  


हा पण एक खतरु ट्रेक होता. अक्षरशः जीव गेला होता भर उन्हात. पण एकदा करावाच असा ट्रेक आहे हा. 
यावर लिहिलेला लेख हि वाचकांच्या पसंतीस उतरलेला दिसतो. 
हौसेने उन्हाचा भिमाशंकर होणे.

एप्रिल : वसई चा किल्ला 

यावेळी जरा इतिहासाचा माग घ्यायचा मूड होता. भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला. ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला.





त्या आणि पोर्तुगीज कालीन इतर ६ घंटांचा शोध लावताना उगाच केलेली हुशारी इथे वाचू शकता. 
वसईच्या घंटेचा शोध


मे : अर्नाळा किल्ला 
बेक्कार ऊन असल्याने जास्त दमवणूक करणारा ट्रेक नको म्हणून मग मोर्चा जलदुर्गांकडे वळवला.  
आता यापुढे जरी कदाचित पोर्तुगीजांची सत्ता आली, आणि त्यांनी विरारला दुसरा नवा किल्ला बांधून त्याच्यासाठी "महान(!!) ट्रेकर(!!)" म्हणून मला बोलावले, तरीही मी विरार ला परत पाऊल ठेवणार नाहीये. अगदी त्यांच्या देशाच्या ग्रीन कार्ड चे आमिष दाखवले तरीही नाही. नाही म्हणजे नाहीच :) 







सतरा तासांचा प्रवास येथे वाचू शकता. 
चाळीस मिनिटांचा किल्ला,सतरा तास प्रवास : अर्नाळा किल्ला

जून : कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड
पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.







बऱ्याच उशिरा यावर लिहायचा मुहूर्त लागला. 
घनन-घन, घनन-घन घनगड


जुलै : इंग्लंड - बरी सेंट एडमंडस, केम्ब्रिज 
हा आणि पुढचा महिन्याचे केवळ एका शब्दात वर्णन करता येईल. "स्वप्नपूर्ती" 
ज्या गोष्टीची मनापासून आस असते आणि त्याचा प्रचंड ध्यास असतो तेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात येतेच. आमच्या हपिसातर्फे इंग्लंड ला जायची संधी मिळाली. डोळे भरून राणीचा देश पाहून घेतला.  







यावर "राणीचा देश" हि ६ भाग असलेली लेखंमालिका लवकरच प्रकाशित करेन.

ऑगस्ट: लंडन , इंग्लंड
एक महिना "Bury St. Edmands" टाऊन मध्ये होतो. त्यानंतर लंडनला आलो. भल्याभल्यांना भुरळ पाडणारे हे शहर "आयुष्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे" असे आहे.  खर्या अर्थाने परदेश प्रवास झाला म्हणता येईल. "डोळ्याचे पारणे फिटणे" म्हणजे काय ते उमगले.









लाख जग हिंडा, आईच्या हातचा गरम वरण भात आणि सह्याद्रीला कुठेच पर्याय नाही.

सप्टेंबर : पुरंदर किल्ला 
आता परत सह्याद्रीकडे मोर्चा वळवला. 





ऑक्टोबर : साल्हेर- सालोटा परत !
साल्हेर -सालोटा ने तर मनात घरच केले आहे. पावसाळ्यातले त्याचे रुपडे टिपण्यासाठी आम्ही परत पोहोचलो वाघाम्बेला.
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य लाभले.








नोव्हेंबर : हरगड किल्ला 
मागच्या वेळेस मुल्हेर मोरा किल्ले झाले होते पण हरगड राहिला होता. तो यावेळी फत्ते जाहला.






यावरही लवकरच एक लेख खरडला जाईल.

माथेरान : 





डिसेंबर: प्रसन्नगड(चावंड),पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर, जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे.यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

 




यावर सध्या लिखाण चालू आहे. खालील दोन भाग प्रकाशित झाले आहेत.


वा, खरेच मस्त गेले हे वर्ष. ट्रेकचा आकडा ४८ वर आलाय तर. बरच काही कमावले म्हणजे मी ! डोळ्यात आणि मनात. डोळ्यात साठवलेले क्षण आणि अनुभव हे केवळ शब्दातीत. त्या बँकवाल्याला काय कळणार आहे म्हणा. असो. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर: या सगळ्या फोटोंमध्ये कुठेही टिपिकल सुर्य मावळतानाचा फोटो टाकला नाहीये. मावळत्या दिनकरा वैगरे अलंकारिक शब्दात वर्षाचा शेवटचा सूर्यास्त वैगरे.
मुळात जी एकमेव गोष्ट या जगात शाश्वत आहे वा ढळढळीत सत्य आहे ती म्हणजे 'सूर्याचे प्रकाशमान चैतन्य. भले तो कसा अस्ताला जाईल? कीव करावी ती आपल्या क्षुद्र विचारांची. कारण तेवढेच आपल्या हातात आहे. मुळात सूर्योदय वा सूर्यास्त हे सगळे आपल्या मनासाठीचे खेळ आहेत. तो मात्र चिरंतन आहे वर्षानुवर्षे वा युगानुयुगे. अगदी आहे तेथेच.
अति अवांतर: अवांतर 'जास्तच' झाले असेल तर माफ असावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चला आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.लोभ असू द्या.

सागर शिवदे
sagarshivade07@gmail.com

सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

जीर्णनगरी मुशाफिरी :पांडवकालीन कुकडेश्वर मंदीर


जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर 

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. 

इतिहास : 
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

जायचे कसे : 
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. 
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे. 

बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
सद्यस्थिती : 
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

आमची मुशाफिरी : 
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
 

आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.  


पश्चिमाभिमुख शिवमंदिर : 
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम  पूर्वी कधी पहिले नव्हते. 

मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )

प्रवेशद्वारावरील शिल्पे :

मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित. 
 
त्याच्या पुढच्याच/समोरच्या  खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी.  हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
 हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.


 महादेव पिंड :

उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
रात्री ८ वाजता एकही लाईट नसताना गडद अंधारात काढलेला फोटो : 


एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.

आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच  पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !

तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.

मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी 'गॅलेक्सी' आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय?  असो.

पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी 'कॅण्डल लाईट डिनर' चा खरा अर्थ कळला.

जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला 'कच्चा रस्ता' म्हणणे  म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त 'हमर' घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!

घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला. 

राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात. 

अजून काही : 
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय  तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे. 
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे.            गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो ( नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.

जुन्नर तालुक्यातील क- वर्गीय तीर्थक्षेत्रे :
श्रीक्षेत्र पारूंडे जुन्नर
श्रीक्षेत्र आळे ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र ओतूर चैतन्य महाराज समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र आणे, रंगदास स्वामी महाराज  समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र लेण्याद्री जुन्नर
श्रीक्षेत्र ओझर जुन्नर
श्रीक्षेत्र कुकडेश्वर जुन्नर
श्रीक्षेत्र वडज खंडेराय देवस्थान जुन्नर
श्रीक्षेत्र नारायणगाव मुक्ताबाई व काळोबा मंदिर जुन्नर

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड