शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

२०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !

पूर्व लेख :  

 २०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !

लोक्स हो, आमचे पुराण लावण्याआधी सर्व वाचक मित्र-मैत्रीणीना अगदी मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्या योजना, संकल्प (थोडे तरी) पूर्ण होवोत ही अपेक्षा. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

असो. आठ-आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही. जरा बारीक ( ते मागच्या वर्षी, यावर्षी गोरा :) ) झालोय पण नजर लागायला नको म्हणून सांगत नाही.

असो, तर "वर्षभरात मी काय काय केले? वा काय कमावले आणि काय गमावले?" अश्या प्रश्नाने आयुष्याचा, वर्षाचा आढावा घेण्याइतके मी काही केले आहे असे वाटत नाही. काय कमावले आणि काय गमावले या दोन्हीचीही उत्तरे मला सुचत नाहीयेत.

या ब्लॉग ने मात्र बरेच काही कमावले. ABP माझा आयोजित ब्लॉग स्पर्धेला या पठ्ठयाला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. नेटाने नेटवर झळकला हे हि नसे थोडके. आमची पण स्थिती अगदी वाईट नाही. आयुष्यभर लक्षात राहील असे काही तरी गवसलेले आहे यावर्षी.

असो,

वर्षाची सुरवात खासच झाली आणी शेवटही अगदी गोग्गोड! आयुष्यभर जपून ठेवावे असे काही क्षण, असे काही आवाज, अशी काही ठिकाणे आणी शब्दातीत अशी नात्यांची ती गुंफण.त्या लाघवी क्षणांमध्ये विरघळून जायचा अवकाश. नवीन नाते आयुष्याला वेगळे वळण देऊन गेले खरे पण त्यातही आमचा मूळ पिंड आम्हाला स्वस्थ बसू देईना आणी मग सुरूच राहिली भटक्या मनाची वाटचाल.
"पुराव्यांनी शाबित करून देईन" या चालीवर वर्षभरात कुठे कुठे भटकंती झाली याची हि चित्ररुपी झलक .

जानेवारी :  सॉलीट्युड शिवनेरी , मल्हारगड 

काहीही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कमीत कमी खर्चात आणी मनसोक्त भटकणे.
शिवाजीनगर जाऊन जुन्नर बस पकडली. यावेळी कॅमेरा पण नव्हता घेतला मुद्दामून. पण नंतर बरेच काही मिस केले असे वाटायला लागले म्हणून पुढच्या वेळेस कॅमेरा पण बरोबर. 
दुसऱ्या वेळेस सरळ गाडी काढली आणि पोहोचलो दिवे घाट. मल्हारगड.  





फेब्रुवारी : सॉलीट्युड हडसर किल्ला 

यावेळेस एकट्याने कोणत्याही साधनांची मदत न घेता कडा चढण्याचे दिव्य केले गेले. ते असे:-
जवळपास ७०% चढाई करून, एक हलणारी, खिळखिळी झालेली हाताने खुंटी पकडून, दंडाला बांधलेले जोडे सांभाळत, कड्याला लगटून चढाई करतानाही, पोट आणी कडा यामधील जुजबी अंतर भरून काढणारी कॅमेरा bag दोन्ही हात बिझी असल्याने हिसका देऊन दूर सरकवत, उजव्या बाजूने थोडे काह्ली डोकावत कॅमेरा पकडला आणी ४-५ खटाखट क्लिक मारले. त्यातही पहिल्यांदी क्लिकच होईनात म्हणून बघितले तर कॅमेरा Manual मोडला ठेवलेला. मग स्वतालाच शिव्या देत दातांनी मोड चेंज केला. 
एवढे उपद्याप. का? तर माहीत नाही. उगाच हौस.



यावर एक डिटेल लेख खरडण्यात आलेला आहे. जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर

मार्च : कोअर कोकण- राजापूर, धोपेश्वर 

जरा कुठे स्वस्थ बसू म्हंटले तर भावाने कोकणात चाललो असल्याची वर्दी दिली. आणी मग काय, आम्हीही गंगेत (राजापूरच्या) आमचे घोडे  नाहून घेतले. 
हि एक कायम लक्षात राहील अशी सफर झाली. कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारे अशी असलेली समजूत लख्ख पुसून टाकली या ट्रीपने. कोअर कोकण म्हणतात ते हेच काय? रात्नांगीचे ते आंबा पोफळीची वने, चिरंतन निसर्ग सौंदर्य आणी आजूबाजूला अनेक "अंतू बर्वा" सदृश्य मंडळी. कमाल !





यावर बरेच लेख लिहायचे आहेत पण शेवटच्या फोटोतल्या होर्न-बिल पक्ष्याच्या जे काही मी प्रेमात पडलो की त्यावर एक पहिले प्रेम लिहिले गेले.

एप्रिल : सफर जलदुर्गांची- विजयदुर्ग, आंबोळगड, यशवंतगड, कनकादित्य सूर्यमंदिर  

जिथे दर महिन्याला एक ट्रेक जमवायची मारामार त्यात एकाच ट्रिप मध्ये २ दिवसात ३ किल्ले म्हणजे मेजवानीच.



मे : सासवडचिये नगरी- संगमेश्वर,लोणी भापकर

लोणी भापकर तेथील यज्ञवराह - विष्णूच्या वराहवताराचे प्रतिक.
दगडाची चढवलेली झूल आणी त्यावर कोरलेल्या १४२ विष्णू प्रतिमा!! सर्वोत्कृठ शिल्पकलेचा एकमेवाद्वितीय अविष्कार !! कमाल !!





याच साठी केला होता अट्टाहास !!  
या सफरीचा वृत्तांत :  सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर ,
                               सासवडचीये नगरी : लोणी भापकर
                               सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला

जुन : दोनाचे चार हात 

दुनिया किसी पे हारो तो जानो क्या जीत है ये दुनिया,
एक डोर बांधे, सातो जनम को वो प्रीत है ये दुनिया !

आता यावर मात्र कोणताही लेख डकवला जाणार नाहीये तेव्हा वाचकांनी निश्चिंत असावे. :)

जुलै : बंदीपूर अभयारण्य,देडाबेट्टा, मडेकरी(कुर्ग), म्हैसूर 



 

ऑगस्ट:पाबे घाट, तिकोना 

पावसाचा लुफ्त "नव्याने" अनुभवण्यासाठी मग जवळच्या जवळ.


 

सप्टेंबर :विसापूर 

सुटलेले पोट घेऊन परत सह्याद्रीकडे मोर्चा.

 

ऑक्टोबर :भुलेश्वर 




 भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर

नोव्हेंबर :महाबळेश्वर 





 

 

डिसेंबर: मृगगड ( भेलीवचा किल्ला)

लाख ट्रिप्स करा, सह्याद्रीला पर्याय नाही.




वा, खरेच मस्त गेले हे वर्ष. ट्रेकचा आकडा ७१ वर आलाय तर. बरच काही कमावले म्हणजे मी ! डोळ्यात आणि मनात. डोळ्यात साठवलेले क्षण आणि अनुभव हे केवळ शब्दातीत.

चला आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.लोभ असू द्या.


भेटत राहू …… वाचत राहा ….अभिप्राय कळवत राहा !

सागर शिवदे
sagarshivade07@gmail.com
९९७५७१३४९४

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर


 सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सॉलीट्युड हौसेचे दुसरे व्हर्जन म्हणून सासवडला प्रयाण केले. सकाळी ७ ला उठलो, चहा पाणी झाल्यावर आईला शाळेत सोडायला निघालो. "जवळच पुढे कुठे तरी जाऊन येऊ " असा विचार करून एक पाण्याची बाटली आणी थोडा खाऊ पाठीवर पाठ -पिशवीत टाकले आणी निघतानाच घरी सांगितले की संध्याकाळी घरी येईन थोडा फिरून.
सासवड मधली शिवमंदिरे व लोणी भापकर येथील यज्ञवराह याबद्दल बरेच वाचले होते अंतरजालावर . सो 'सॉलीट्युड'च्या हौशी प्रमाणे ऐनवेळी ठरलेली भटकंती आणी ऐनवेळी ठरलेले ठिकाण हे समीकरण जुळून आले. कोथरूड पासून वारजे ला निघालेलो मी, पुढे सासवड, मोरगाव, जेजुरी, लोणी भापकर असा फिरत फिरत येताना त्यातही हौस म्हणून एक छोटेखानी किल्ला पण करून ९ च्या आत घरात आलो. 

कात्रजला कात्रज डेअरी मध्ये जाऊन ४ पिशव्या फ्लेवर्ड मिल्क/ पिस्ता स्वादाचे दुध घेतले आणि गाडीला टांग मारून पोहोचलो बोपदेव घाटात. २ पिशव्या तेथे फस्त केल्यावर अजून उत्साहाने पुढे सरकलो. सकाळी साडे सातला निघालो घरातून ते वारजे, कात्रज कोंढवा रोड ने सासवड पर्यंत येताना १० वाजले होते.

पहिले डेस्टीनेशन होते संगमेश्वर मंदिर. भर सासवड गावात, सासवड-चौफुला फाट्यापासून ३-४ किमी अंतरावर नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर बरेच प्रसिद्ध आहे.

आजूबाजूचा मस्त शांत परीसर. त्या शांततेत फक्त कपडे धुणाऱ्या बायकांचा कलकलाट. मंदिरात माझ्याखेरीज अजून कोणीच नव्हते. एक छोटासा पूलाने आपण मंदिराच्या समोर पोहोचतो. थोड्या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या सभा मंडपात पोहोचतो.
पूर्ण मंदिर दगडातून बांधलेले असल्याने भर उन्हातही आत मस्त थंडगार वाटत होते.

पोहोचताच थेट गाभाऱ्यात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. बाहेर पडून मग मंदिराची प्रदक्षिणा मारताना त्यावरची शिल्प आणी त्याचा इतिहास याचा सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु झाला.

मंदिर एकाच दगडात कोरून काढले असावे असे वाटले. याचा कळस सोडला तर मुख्य मंदिराची रचना बरीच साध्यर्म असलेली वाटली. येथूनच उजवीकडे एक छोटी वाट खाली जाते तेथेही छोटी छोटी मंदिरे आहेत.

कळसावर केलेले मुर्तीकाम वा कातळकला लक्ष वेधून घेत होती.

येथे कळसावर खूप पक्षी बसले होते आणी सगळे एकत्र मिळून ओरडत होते. तो एक कलकलाट. पण हा मात्र हवाहवासा वाटणारा होता. रोज पारवे बघणाऱ्या नजरांना तेवढाच हिरवागार चेंज. असो.

हे महाशय बराच वेळ कळसावर फुटलेल्या एका झाडावर बसून टेहळणी करत होते.

एकटाच असल्याने यथेच्च फोटो काढत काढत फिरताना घड्याळाकडे लक्ष गेले आणी एकदम पुढचा लोणी भापकर पर्यंतचा बाकी असलेला प्रवास दिसू लागला. 
चला आता येथून पाने घ्यायची वेळ झाली. येथून पुढे 'चांगवटेश्वर' मंदिरात जायचे होते. कसे जायचे याची खात्रीजमा झाल्यावर दम खात बसलेल्या गाडीला टांग मारली आणी निघालो.

मंदिरासमोरच्या पुलावरून काही फोटो काढले त्यातला हा खालचा. मंदिरापासून संगमावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत तेथे हा गणपती आहे. एरवी वरून दिसला नसता.



थोडीशी पेटपूजा करून निघालो 'चांगवटेश्वर' मंदिरात.संगमेश्वर मंदिरापासून १० मिनिटांवर चांगवटेश्वर आहे.
हे सुद्धा पूर्णतः दगडात कोरलेले मंदिर असावे. तेथील पुजारी काकांनी येथे बरीच डागडुजी केलेली आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कुल-पुजारी म्हणून मन असलेल्या या मंदिराचा इतिहास जाणून घेऊन स्व-हस्ताक्षरात एक माहिती फलक लिहिलेला आहे.

आत आजूबाजूला बरीच छोटेखानी मंदिरे आहेत. त्यांचीही थोडी पडझड झाली असली तरी मुख्य मंदिर सुरक्षित आहे.

येथील प्रत्येक खांबांवर यथेच्च शिल्पकला केलेली आहे. भुलेश्वर मंदिराप्रमाणे येथेही महाभारतातील काही युद्धाचे वा द्वंदाचे प्रसंग कोरलेले आहेत.

सभा मंडपापासून ते गाभारा आणी पूर्ण मंदिरभर कातळ कलेचे अप्रतिम दर्शन येथे घडते. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठ्ठे बकुळीचे झाड आहे. दुसर्या वेळेस पावसाळ्यात तेथे गेलो तेव्हा ते झाड पूर्ण पांढऱ्या फुलांची शाल पांघरून उन खात पहुडलेले होते.

येथे फोटो काढायची परवानगी घ्यावी लागते. पुजारीकाकानी लगेच परवानगी दिली पण जाताना दानपेटीत स्वइच्छेने काहीतरी देण्याच्या बोलीवर.  असो. एकंदर आजूबाजूचा स्वछ परीसर पाहून देणगी देताना काही वाटले नाही. ( नाहीतरी आम्ही देऊन देऊन किती ती देणगी देणार? पण असो फुल न फुलाची पाकळी.)

येथेही अज्जिबात गर्दी नव्हती. मी, पुजारीकाका आणी एक नुकतेच लग्न ठरलेले दोघे. माझा कॅमेरा बघून "त्याने" मला तेवढ्यातल्या तेवढ्यात "त्यांचे" सोनेरी क्षण टिपण्याच्या बिनपगारी कामास लावले.

आता जवळपास बारा वाजले होते. येथून डबा खाऊन पुढे जाणार होतो पण मला जेवण लोणी-भापकरलाच करायचा होता म्हणून मग उरलेल्या दोन पिस्ता मिल्क पाठीवरून पोटात ढकलले आणी निघालो पुढे मोरगाव …
मोरगावला पोहोचलो ते डायरेक्ट मंदिराच्या मुख्य दरवाज्यापर्यंत गाडी घेऊन. एकदोन "भक्त" मंडळी डाफरली पण "जल्दी जानेका हय रे बाबा मेरेकू."
येथे तुरळक गर्दी होती. अष्टविनायक टाईप पब्लिक आलेले होते. गणपती सोडून त्यांना बाकी सगळ्यात इंटरेस्ट होता. काही "महान" भक्तांनी रांगेत उभे असल्याचा त्रास रिफ्लेक्ट करत गणपतीला मोबाईलवर गाणी लाऊन साद घातली होती. अश्या लोकांचे पाप उदरात घेणारा धन्य तो लंबोदर ! प्रणाम !
रांगेत वैगरे उभे राहणे शक्यच नव्हते. लांबूनच नमस्कार केला आणी थोडावेळ बसून तिकडची स्पेशल अंजिरे पोटात ढकलली.

आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.

यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!

त्याबद्दल पुढील भागात :
सासवडचीये नगरी : लोणी भापकर
सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला

वाचत राहा.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

"नवसंजीवनी"

"नवसंजीवनी"

नमस्कार लोक्स, आज या पोस्टने माझ्या समाधी अवस्थेत जाऊ घातलेल्या ब्लॉगला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळत आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला शेवटच्या लेखाला.मधील काळात बऱ्याच सुखद घडामोडी घडल्या त्यांना वेळ देत यावा म्हणून हा आमचा लक्ष्मण असाच संजीवनी आणायला गेलेल्या हनुमानाची वाट बघत होता. 

असो, वाचक लोक नवीन लेखांच्या प्रतीक्षेत व्याकूळ झाली आहेत, आणी लेख पडताच त्यावर कधी तुटून पडतोय अश्या आशेने माझ्याकडे नवीन लेखांची लाडीक मागणी करतायेत, लेख आणी अक्षर दोन्हीचे तोंड भरून कौतुक करतायेत असे दिवस आम्हाला कुठले दिसायला? आम्ही मात्र कधी दिवाळीच्या चकल्या संपवतो आणी इथे चकल्या पडायला येतो अशी मानसिक अवस्था घेऊन लाडू संपवतो आहोत. हे ही असो. 

पुरेसे बोर करून झाल्यावर मूळ मुद्द्यावर येतो.मध्यंतरी 'एबीपी माझा'ची 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित झाली होती. त्यात प्रवेशिका पाठवली होती. आणी अनपेक्षितपणे "शिसारा उवाच" ला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. शेकडो ब्लॉग्जपैकी फक्त 13 दर्जेदार ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान या परीक्षकांसमोर होतं म्हणे :) 
असो, उत्तेजनार्थ बक्षीस का असेना, माझ्याखेरीज अजून कोणीतरी मी खरडलेले काहीतरी वाचतोय हे ही नसे थोडके.

पुरस्कार सोहोळ्या ला पोटापाण्याच्या गोष्टींमुळे उपस्थित राहाता आले नाही याची आता खंत वाटते. नंतर तो कार्यक्रम प्रसारीत झाला आणी एका नातेवाईकाचा फोन आला तेव्हा कळले. गेलो असतो तर तेवढाच लग्नातला ब्लेझर खपवता आला असता. त्यांच्या साईटवर नाव आले आणी चार-पाच लोकानी केलेले 'कवती क' हाच काय तो आमचा आनंद.
त्यांनी आम्हाला पुरस्काराचे बक्षीस ही पाठवले होते म्हणून ते मिळाले की त्याचा फोटू टाकून वाचकांना "पुराव्यांनी शाबित" करून दाखवता येईल म्हणून थांबलो होतो पण त्या देवाचे अजून मंदिरात येणे झालेले नाही.

या वर्षीचे पुरस्कार विजेते आणी उत्तेजनार्थ ब्लॉग्स खालच्या दुव्यावरून बघता येतील. विजेत्यांचे अभिनंदन.
http://abpmajha.abplive.in/mumbai/blog-majha-winners-134721 


मधला शांत काळात आमचे ब्लॉग लिहिणारे हात दोनाचे चार झाले. आता अधिकधिक भटकंती होऊन चार हातानी नवीन उर्जेने लेख लिहीन असे म्हणतोय. तसे मी बरेच दिवस बरेच म्हणतोय पण तूर्तास थांबतो. 

मध्ये एका रविवारी मुंबईच्या 'मी मराठी' नावाच्या दैनिकात ह्या ब्लॉगची एक पोस्ट छापून आली होती. त्याचे चित्र खाली चिटकवत आहे. ( अंधुक दिसत असेल तर चित्रावर क्लिक करून मोठे करा. तरीही अंधुक दिसत असेल तर चष्मा लावा. त्यातूनही अंधुक दिसत असेल तर वरचे अगम्य वाचून तुम्ही भावूक झालेले दिसता, तोंड धुवून या ( स्वतःच).)


 असो तर मग हासत रहा, वाचत रहा , रियाज करत रहा("कट्यार"पासून हे एक नवीन.( घ्या चालवून :) )

निरोप.

शनिवार, २ मे, २०१५

जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट 
जीर्णनगरी मुशाफिरी : थरारक !! 
 
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर  

नवीन वर्षाच्या भटकंतीची सुरुवात कमाल झाली. दरवेळी प्रमाणे नवीन वर्षाचा संकल्प सोडताना यावेळी जरा वेगळी कल्पना लढवायचा प्रयत्न केला गेला. टोटल सोलीट्युड ! 
कुठे आणि कसे जायचे हे ही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून रन टाईम किल्ला ठरवून, एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कुठेही काहीही खर्च न करता,कमीत कमी खर्चात मनसोक्त भटकणे.
माणसाळलेला शिवनेरी असो वा एकलकोंडा कोकणदिवा. कधी सिमेंटच्या पायऱ्यानी भेटणारे महादरवाजे तर कधी ऊन पावसाशी अखंड टक्कर देत देत तसूभर ही न झीजणारा उभा प्रचंड कातळ.  कधी रुजलेल्या वहिवाटीच्या पायवाटा तर कधी जंगल सदृश्य वाटावी अशी घनदाट झाडातील गुरांच्या वाटा. कधी डोके ढगांच्या दुलईत खुपसून बसलेली शिखरे तर कधी नतमस्तक करणारी सर्वोच्च शिखरावरील मंदिरे. 
शांत, गूढ अश्या पुर्वाचीन अश्या लेण्या, त्यात कोरलेली आणी प्राचीन सुवर्ण युगाची आठवण करून देणारी भित्तीचित्रे.
कधी पाबे घाटात गाडी लावून एकट्यानेच बसून काढलेले दोन तास, कधी तोरण्याला गवसणी घालून लाल मातीत टायरची नक्षी काढत डोंगर दरयात केलेला मुक्त विहार. दिवाळीच्या दिवसात झगमग वातावरण सोडून सिंगापूर नामक गावातील फराळ वाटप, त्याक्षणी तेथील मुलांचे कोणत्याही झगमगाटाला लाजवतील असे उजळलेले चेहेरे !
अश्या अनेक गोष्टींचा त्या क्षणाचा केवळ एक मूक साक्षीदार. टोटल सोलीट्युड. !!! 

असो. 
वरती जे काही खरडले आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिला डेमो झाला तो किल्ले शिवनेरी.परत येताना विचार केल्यास असे उमगले की आपला संकल्प अगदीच चुकीचा नाही. येथे अनेक लोक असल्याने एखाद्या निर्जन ठिकाणी एकटे गेल्यास खरे अनुभव येतील. 
मग यावेळेस तो अनुभव घेण्यासाठी ,सकाळी उठलो,डबा घेतला आणी निघालो ते डायरेक्ट हडसर गाव. तेथे उतरल्यावर एका मुलाबरोबर खुंटीच्या वाटेच्या खिंडीत आलो. वास्तविक किल्ल्याचा अभ्यास केला तेव्हा दोन वाटा माहिती होत्या त्या अतिशय सोप्या होत्या. ही खुंटीची वाट ऐनवेळी आल्यावर कळली. 
एकटाच आहात तर या वाटेने जाऊ नका असे सल्ले आले पण म्हंटले जाऊन तर बघू नाही जमले तर परत फिरू.
खुंटीच्या वाटेने चढायचे आणी दुसऱ्या बाजूस असलेल्या पायऱ्यांच्या वाहीवाटेने उतरायचे असे ठरवले. 
सकाळी काही न खाल्याने पोट गडबड झालेले. त्यातच ऊन लागल्याने डोके जरा जड झाले. पायथ्याशी बसून गोड शिरा खाऊन घेतला. थोडावेळ तरतरी आली पण परत चढाई चालू केल्यावर फार त्रास जाणवू लागला. सुमारे १ तास चढाई केल्यावर वाटले कि बास ! आहे इथून परत जाऊ. इथे चक्कर वैगरे आली तर मदत तर सोडाच कोणाला काही कळायलाही वाव नाही. पूर्ण निर्मनुष्य प्रदेश आणी तेथे मी एकटा. 
बरेच पाणी पिऊन अजून अर्धा तास चढाई केली. आता मात्र असह्य झाल्यावर एका दगडाच्या सावलीत बसलो. 
समोर पाहिले तर ४०-४५ फुटी कातळकडा. पुढे कोठेच वाट सापडेना म्हंटल्यावर तो कातळकडा निरखून पहिला आणी मग साक्षात्कार झाला कि हाच कडा आपल्याला एकट्याला चढून जायचे आहे. हीच ती खुंटीची वाट. उभ्या कातळात खुंट्या मारून हातानं पकडण्यासाठी सोय केलेली आहे. म्हणून खुंटीची वाट.

आवरा ! जमणार नाही म्हणून परत गावात जायचे ठरवले. आता १२ वाजून गेलेले. परत उतरणार कधी आणि गावातून दुसऱ्या वाटेने चढणार कधी? गप्प बसून राहिलो सावलीत. तब्बल अर्धा तास एकाच जागी बसून काढल्यावर मग बरे वाटायला लागले. मग मात्र रिस्क घेतली आणी चढाई चालू केली.

त्यानंतर जे काही अनुभव आले ते म्हणजे केवळ थरारक. अविस्मरणीय !!
चढाई चालू केली. बूट घालून चढता येत नव्हते म्हणून बूट काढले. पण आता ते ठेवायचे कुठे असा प्रश्न आला. कॅमेरा bag पण होती.चढाई करताना फोटो काढायची पण खाज होती. 
मग, पाठीला sack, डाव्या हातात मानेवरून कॅमेरा bag, उजव्या हातातून मानेला कॅमेरा लटकवला. शूज चा अजून हिशोब लागत नव्हता मग त्यांची लेस सोडून, मोठी करून दंडाला शूज बांधले. T-shirt चे हात छोटे केले आणी अश्या अवतारात चढाई चालू. निव्वळ थ्रिल. 
खाली एका दगडावर पांढरा बाण दिसतोय तो बेस होता.  

वरून खाली पाहिले मग मात्र भीती वाटायला लागली. येथून खाली उतरणे तर अज्जीबातच शक्य नव्हते. सो तो विचारच सोडून दिला. गणपतीचे नाव घेत पुढे चढत गेलो आणी नशिबाने सुस्थितीत वरती पोहोचलो.

हा बघा पोहोचलोच !! याचसाठी केला होता अट्टाहास !! 

शेवटच्या टप्प्यात जरा जीवात जीव आला. सुखरूप पुढे पोहोचू शकू असा आत्मविश्वास आला. मग जरा डोकेही चालायला लागले. सामान जर कोंबून कोंबून शिफ्ट केले. अर्धा लिटर पाणी पिउन घेतले आणी जीवाची शांती करून घेतली. माणसात आल्यावर राहिलेले थोडे चढून किल्ल्याच्या मार्गी लागलो.
 हा पट्टा थोडा सोपा होता. 


एका ढासळलेल्या बुरुजापाशी आल्यावर किल्ल्याचा अंदाज घेतला. कुठे काहीच दिसत नव्हते. सगळीकडे पुरुषभर उंचीचे गवत. समोर छोटा डोंगर दिसत होता म्हंटले तो चढून वर गेल्यावर काहीतरी कल्पना येईल म्हणून त्यादिशेने कूच केले. बरेच गवत तुडवत चालताना एका ठिकाणी सळ sss सळ sss आवाज आला. डोकावून बघितले तर भलामोठा साप. मग जे काही टरकलो की जीवाच्या आकांताने परत बुरुजापाशी आलो. 

वाट सापडत नव्हती त्यातून मी एकटाच. बाकी साप आणी ससाणे होते जोडीला पण मला त्यांचा फराळ बनायचे नव्हते सो दुसरी वाट पकडली अन चालू लागलो. या वाटेत २ पाण्याची टाकी लागली मग मात्र हुश्श केले.

माझ्याकडे दीड लिटर पुण्याचे पाणी होते म्हणून आनंदाने हा फोटो काढता आला. नाहीतर अवघड होते. वेल, हरगडला अश्याच टाक्यातील पाणी ५ वेळा गाळून घेऊन पिले होते त्यामुळे याचे नो कौतुक.

थोडे अजून चालल्यावर महादेव मंदिर दिसले अन मग काय विचारता, पळत पळत ते गाठून पहिल्यांदी अर्धा लिटर पाणी पिले. देवाचे आभार मानले आणी फ्रेश होऊन मंदिरात गेलो.
आपोआप हात जोडले गेले.
आताशा दीड वाजत आला होता. पोटात पण सळसळ ( कावळे वैगरे नाही सगळीकडे सापच दिसत होता.) चालू झाली होती. मंदिरात प्रवेश केला तर गारेगार आणी समोरच गरुडरुपी हनुमान ! आता काय शहाम्मत आहे कोणाची चावायची! 
खच्याक ! खच्याक! फोटो परत चालू झाले. थोडेसे खाऊन घेतले. आणी निघालो दुर्गदर्शनास. 

किल्ल्यावर महादेव मंदिर, तलाव, धान्य कोठार/गुहा, बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. समोर उभा ठाकलेला निमगिरी पर्वत. लांबवर दिसणारा माणिकडोह, किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य. आणी इतर बरेच काही. पण या सगळ्यात सगळ्यात बघणेबल गोष्ट म्हणजे वाहीवाटेने येताना लागणारे अभेद्य दरवाजे आणी दगडात लपलेल्या मुख्य दरवाज्याला जोडणाऱ्या पायऱ्या. बघता क्षणी टाच आपटून साल्युट!
धान्य कोठार वा गुहा :
 
 येथून आत गेलो तर छोटे काहीतरी खपदाड असेल असे वाटले होते. मुख्य दरवाज्यातून आत गेलो तर फुल अंधार. एकदोन वटवाघुळे माझ्यावर सुट्टीचे डिस्टर्ब केले म्हणून केकाटत पेटून गेली. flash मारत आत बघितले तर ती साधी सुधी गुहा नव्हती तर अख्खा २ BHK FLAT होता. 
 

आता वाहिवाटेने उतरायला चालू केले.  इतके कमाल आर्किटेक्चर होते न बास! लांबून सुगावा पण लागणार नाही असा लपवलेला महादरवाजा. अत्यंत सुबक कोरलेल्या पायर्या, पावसाळ्यात पायर्यांवर पाणी येउन त्या घसरड्या होऊ नयेत यासाठी पायर्यांच्या सुरवातील पावसाळी पन्हाळी. एवढे डिटेल काम कोणी केले असेल राव?


मुख्य दरवाजा :
 वाह ! कमाल !


या अभेद्य उभ्या ठाकलेल्या महादरवाज्यावर ज्या कोणी निलेश ने नाव लिहिलंय न त्याच्या तर पिंडाला कावळा शिवलाच नाही पाहिजे. ( आमची मजल इथपर्यंतच) :)

पूर्ण किल्ल्यावर मी एकटाच हिंडत होतो. मनसोक्त फोटो काढले. एक उंच दगड बघितला आणी बसलो टेहळणी करत अर्धा तास.
वेळ बघितली आणी उडालोच. सव्वा चार! सव्वा पाच शेवटची ST होती. पटकन गाशा गुंढाळला आणी पळत सुटलो.
किल्ल्याचा/दुर्ग-दर्शनाचा म. सा. वी अजून बाकी होता. ROCK COVERED STEPS !!

उभ्या कातळात खोदलेल्या आणी तेतक्याच बेमालूमपणे दगडात लपवलेल्या मुख्य दरवाज्याकडे जाणार्या पायऱ्या.
ब्रिटिशांनी जेव्हा हडसर ताब्यात घेतला तेव्हा ह्या पायऱ्याची बरीच नासधूस केली. त्यांनी हरीहरचा न्याय इथे लावला असता तर? असो ब्रिटिशांवर आपला नो राग !
 


जवळच एक पुरातन छोटेखानी मंदिर होते, त्यातला गणपती.
कमाल आर्किटेक्चर !!

खटाखट क्लिक मारले आणी पळत सुटलो. उतरताना पायर्यांच्या वाटेने उतरलो आणी मधूनच एक शोर्टकट मारला. पायर्यांची वाट २ किमी पुढे उतरते. तीही चालली असती कारण आमचा ट्रेकी दोस्त निमगिरीहून येणार होता.
 उतरताना एक गावकरी भेटला त्याने सांगितले की "किल्ल्याच्या पोटात आख्खे गाव मावेल एवढी गुहा आहे. आम्ही पावसाळ्यात तिथेच जातो रहायला. चला दावतो ! " म्हंटले नको गाडी जायची. पावसाळ्यात नक्की येतो राहायलाच.!
मी हडसर गावात पोहोचायला आणी आमचा, लाल शर्ट घालून हिंडत फिरणारा दोस्त यायला एकच वेळ झाली.


माणिकडोह धरण : येथेच टायगर रिझर्व आहे. जुन्नर परिसरात पकडण्यात येणारे वाघ/ बिबटे पकडून येथे ठेवतात. सध्या २२ वाघ आहेत.
उतरताना एक गोल्डन ईगल दिसला.

जुन्नर पोहोचलो. एक इको कारवाला मला गाठून पुणे सोडतो म्हणाला, तसे आम्ही कायम यष्टीनेच फिरणारी लोक. म्हंटले जाऊ एकदा म्हणून बसलो. चांगला माणूस होता. पण त्याला लेफ्ट साईड जजमेंट अज्जिबात नव्हते. आणी मी साईड सीट बसलेलो. जाम टरकून तीन तास देवाचा धावा करत होतो. त्याला म्हंटले की प्रेमाने चालव रे बाबा गाडी, अजून लग्न व्हायचे आहे माझे! :)

त्याचा फोन बंद होता आणि त्याला कोणालातरी फोन करायचा होता. मी विचारले की बंद झाला का मोबाईल? तर म्हणाला नाही चालू आहे पण विमान आलंय स्क्रीनवर!

विमान ?????
स्क्रीनवर ????

आज अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल हे ऐकायला जिवंत नाही या विचाराने मला गदगदून आले. त्याचेही डोळे स्वर्गात नक्कीच डबडबले असणार! कसले विमान आले आहे बघायला फोन घेतला तेव्हा कळले की प्लेन मोड वर फोन गेला होता. मग आम्ही ते "एअर चायना" व्यवस्थित टेक ऑफ करून दिले. :)

असो. तर ९ ला पुण्यनगरी गाठली आणी एका थरारक ट्रेकची समाप्ती जाहली.हडसर खरच जाण्यासारखा तर आहेच पण या छोटेखानी गडावर एकटे हिंडायची मजा काही वेगळीच भासली. समोरच निमगिरी बोलावत होता पण त्याला म्हंटले नेक्स्ट टाईम भेटू !!

एकंदर खासच अनुभव होता. 
सकाळी जुन्नर समजून औरंगाबादची पकडलेली ST, कंडक्टरने "सभ्य" शब्दात केलेला अपमान, स्वतावरच हासत दोन किलोमीटरची केलेली पायपीट, खुंटीच्या वाटेचे थरारक अनुभव, किल्ल्यावर १-२ साप दिसल्यावर एकट्यानेच वाळलेल्या गवतातून जाताना मनात असलेली प्रचंड भीती आणी त्यात वाट सापडत नसल्याने हेल्पलेस कंडीशन आणी देवाचा धावा. न सापडणारी वाट सापडल्यावर झालेला आनंद, किल्ल्याचे दुर्गवैभव पाहून निवलेले डोळे,महादेवाच्या मंदिराच्या समोरच गरुडरूपातील हनुमान.वाळलेल्या गवतातून जाणवणारी सळसळ, किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाला एकट्यानेच बसून केलेली टेहळणी, अश्या जन्नत ठिकाणी डबा उघडला असता गोड शिरा आणी लोणचे. अहाहा !! सगळेच शब्दातीत. 

चला, आता पाने घेतो. नेक्स्ट टाईम भेटू निमगिरीवर ! त्यावेळी सोलीट्युड वैगरे फालतूपणा न करता जोडीला कोणीतरी असेल याची खात्री वाटत आहे.

वाचत राहा !!

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

पक्षी जाय दिगंतरा !

पक्षी जाय दिगंतरा
मुळात पक्षी हे उच्छाद आहेत का ते पाळणारे खरे उच्छाद आहेत? या पुलं च्या प्रश्नाचे उत्तर अजूनतरी मला  सापडल्याने कोणताही पक्षी पाळण्याचे धाडस केले गेलेले नाही. ( उपमा चुकली आहे पण कोण्या मोठ्या लेखकाचे नाव कोणत्याही संदर्भहीन वाक्यात घुसडून लेखाची सुरवात केली गेली तर उगाचच काहीतरी भारी लिहितोय असे फिलिंग येते म्हणून.) असो. 

ग्रेट पाइड होर्नबिल पक्षी पहिल्यापासून मला पक्ष्यांविषयी जरा कुतूहल निर्माण झाले आहे. पक्षी निरीक्षण आणी त्यांची ओळख या विषयात मी अगदी बाळबोध ( मॉडर्न वाचकांनी 'ज्युनिअर केजी' वाचावे)) असलो तरी काहीच्या काही फोटो काढून सुरवात झाली हे ही नसे थोडके! 

ग्रेट पाइड होर्नबिल/ धनेश :












 गोल्डन ईगल :

किंगफ़िशर: White throtted kingfisher