रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

ढगातील डोंगरदेव



पूर्व लेख: 
3. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
4. हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला


मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत, ढगातील डोंगरदेव 


तब्बल ८ महिन्यांपेक्षा काळ लोटला आणी दोन संसारी जीव पाठीवर पिशव्या अडकवून आज परत सज्ज झाले अर्थात पूर्व परवानगीने. शुक्रवार कसाबसा संपवून रात्री साडे-दहाच्या त्रंबक यष्टीची वाट पाहणे आले. मुसंडी मारून मिळवलेली जागा आरक्षित असल्याच्या साक्षात्कार यष्टी निघाल्यावर झाल्याने शेवटचा बाक पकडला आणी खांदा पाठीच्या स्नायूंची ड्युरॅबिलिटी टेस्टिंग करून घेतली. आता यंत्रांच्या आवाजात सर्व आवाज विरून गेले आणी पहाटेच्या सुमारास गोदावरी उगमाशी पोहोचलो. 
पहाटे पहाटे एका टपरीवर चहाच्या नावाखाली एक अशक्य भिकार पेय ग्रहण करून शिवमंदिराकडे निघालो. गर्दी बघता देवाला लांबूनच नमस्कार कळवला. कुशावर्त तलावात पापे धुण्यासाठी लागलेली रीघ बघता आल्या पावली यष्टी पकडून अंजनेरी फाटा. दोन वर्षांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. जिथे झोपायचे होते ते कार्तिक स्वामी मंदिर रस्ता मोठा झाल्याने कॉम्पॅक्ट झाले. येथेच पथारी टाकून सूर्यनारायणाची प्रतीक्षा करणे आले. 

उन्हे आली पण अंजनेरी सुळक्यावर ढगांनी ठाण मांडलेच होते. आता दिवसभर यांची साथ निश्चित होती. ढगात डोकी खुपसून बसलेले नवरा नवरी सुळके उजव्या हाताशी ठेवत सिद्ध हनुमान मंदिरात येताच भव्य रूपाने हात जोडले गेले. मागच्या वेळेचाच पुजारी आणी त्याची  जीर्णोद्धारासाठी देणगीची टेप दुर्लक्ष करून गावात शिरलो. 


आज गावातली मुले निवांत उनाडक्या करत होती. शनिवारची शाळा नाही का रे ? नाय आज शाळा. शिक्षक आज गेलेत मोर्च्याला. नाशिक मध्ये त्या दिवशी मराठा मोर्चा म्हणून शाळेतील सगळ्या शिक्षकांना शाळा सोडून यायला सांगितले होते. "चिमुरड्यांचा लक्षणीय सहभाग" या वाक्यासाठी शाळेतली मुले न मुली टेम्पोत भरून नेण्यात येत होती. त्रंबकच्या पुढच्या आदिवासी पाड्यातूनही लोक आज गाडीत भरून आणले गेले होते. एकाकडे विचारपूस केली असता, एक बाटली अन तीनशे रुपये यासाठी  खटाटोप चालला होता. असो. शाळा  बंद ठेऊन मोर्चे काढत फिरणाऱ्या त्या महान शिक्षकांना आरक्षणाची खरी गरज आहे हेच खरे. असो. 

आता पाड्यावरून अंजनी मातेचे दर्शन घेऊन चढाई चालू झाली. रस्ता माहिती असल्याने जवळचे रस्ते घेऊन पहिल्या खिंडीत पोहोचलो. पावसाने आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आणी खिंडीत आल्यावर पावसाबरोबर माकडांनीही आमची साथ करण्याचा निर्धार केला. 



डागडुजी करण्याच्या हेतूने नको तिथे रेलिंग्स लावून किल्ल्याची यथेच्छ वाट लावलेली आहे. खिंडीतली जैन गुहा ग्रील लावून बंद केलेली होती. मागच्या खेपेस आतून पहिली असल्याने येथे फारसे लक्ष न देता पठारावर आलो. 
आता येथे जोरदार वारा खरंतर ढग इकडून तिकडे घिरट्या घालत पाण्याचा हलकासा शिडकावा करत आमच्या वाटचालीस शुभेच्छा देत होते. थोडेसे ढग बाजूला झाले कि रस्ता दिसायचा. फोटो तर काही धड येत नव्हते पण पठारावर फुललेली रंगांची उधळण मात्र लक्ष देण्यास भाग पाडत होती. सात वर्ष्याने येणारा कारवीचा बहर पूर्ण नजरभर पसरला होता. 

लांबच लांब पसरलेले हिरवेगार गालिचे. त्यावर ही नैसर्गिक मुक्त उधळण. ढगातले पाण्याचे थेंब अंगा-अंगावर थबकून अगदी पापण्यांवरही जमा झालेले दवबिंदू. मोकळ्या आकाशाखालची मुक्त भटकंती. सगळे काही मनाप्रमाणे घडून यावे असे. 




मागच्या वर्षी पावसाळा लवकर संपून वातावरण लवकर क्लिअर झाले होते. हा खालचा मागच्या वर्षीचा सेम फ्रेम फोटो.



धुक्यातून वाट काढत अंजनीमातेच्या मंदिरापाशी आलो. २-३ काकड्या सोलून तिखट मीठ लावून खाल्ल्यावर जो काही अमृततुल्य भास झाला त्याची सर कशालाच नाही.
पोटोबा झाल्यावर कारवीच्या फुलांमधून वाट काढत आश्रमापाशी येऊन ठेपलो. ओझरते दर्शन करत सीता गुंफा गाठली.



गर्द जंगल आणी दाट धुके यामुळे मस्त माहोल झाला होता. अंधाऱ्या वाटेने कूच करत, दम खात, सुमारे साडे तीन तासाने अंजनेरी पर्वतावरच्या शिखरावर असलेल्या मारुतीच्या जन्मस्थानी पोहोचलो. 



शिखरावर मारुतीच्या मंदिरात तर कमाल वातावरण झाले होते. मंदिरात देवही दिसत नव्हता एवढे धुके होते. आम्ही नारळ फोडून आल्याची वर्दी देवाला दिली आणी प्रसाद संपवायच्या कामगिरीवर रुजू झालो.




आताशा ४ वाजून गेले होते आणी पायथ्याशी असलेली रामायणकालीन भग्न मंदिरे खुणावत होती. एक संकल्प पूर्ण झाला होता. मंदिरात शांत वातावरणात, ढगांशी मस्ती करत काढलेला अर्धा तास मनाला बराच थंडावा  घेऊन आला.

आल्या पावली निघालो तरीही ढगांनी साथ मात्र काही सोडली नाही. अंजनेरी परीसरात सापडणारी अति दुर्मिळ सेरीजोपिया अंजनेरिका वनस्पती शोधण्याचा बराच खटाटोप झाला पण त्यामुळे बाकीच्या फुलांची मस्त छायाचित्रे मिळाली.




हे बघून अवतार आठवला. स्वयंप्रकाशी वनस्पती तत्सम हे जे काही होत ते कमाल होत.








किल्ल्यावरून उतरून पुरातन मंदिरे पाहण्यात १ तास घालवला. १८ कोटी रुपयांची तरतूद या मंदिरांच्या डागडुजी साठी एप्रिल मध्ये मंजूर होऊनही अजून तरी एकही दगड जागचा हललेला नाही. 
आता डागडुजीचे नावाखाली या रामायणकालीन मंदिरांना सिमेंटने लिंपून पेंट मारला नाही म्हणजे मिळवले. 


अंजनेरी फाट्यावरच असलेल्या हॉटेल मध्ये मागच्या वेळी चांगली ओळख झाली होती. काकूंनी खास आले वैगरे टाकून फक्कड चहा बनवला. येथे २ चहा पिऊन, सामान उचलून यष्टीची वाट बघत बसलो रामशेजला जायला. मोर्च्यामुळे ठप्प असलेलं सर्व कामकाज सुरळीत होऊ लागलं होतं. नेताना गाडीत भरून नेलेली माणसे मिळेल त्या वाहनाने परतत होते. त्रंबकवरून आलेल्या गाडीला हात दाखवला आणी निघालो पेठ. 

६ वर्ष अजिंक्य राहिलेल्या रामशेज किल्ल्याने आमची उत्सुकता तर वाढवलीच होती. रामशेजच्या जवळच भूषणची सासुरवाडी असल्याने रात्रीचा राहायचा प्रश्न निकालात निघाला. 

आता उद्या लक्ष होते रामशेज आणी चामरलेणी. आता त्याबद्दल पुढच्या लेखात. 

वाचत राहा. 




रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

!! गणरायांचे आगमन !!

!! गणरायांचे आगमन !!


बाप्पांच्या सुबक व शास्त्रशुद्ध गणेश मूर्तींची नोंदणी चालू झाली आहे. 
आजच आपला आवडता बाप्पा बुक करा. 
आर्या एंटरप्रायजेस , कोथरूड ,पुणे ३८.




आता स्वतःचा ब्लॉग असताना झैरात करायची म्हणजे सोपेच काम की हो. 
असो, गणपती नंतर आपण चाललोय हंपी आणी बदामीला या ब्लॉगमधून. तेव्हा लक्ष असू द्या. 
अगदी "स्टे ट्यून" वैगरे गरज नाहीये. छापला लेख की कळवेनच फुकाच्या पुस्तकावर. :) 


आपलाच,
सागर 

शनिवार, १६ जुलै, २०१६

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 


मागच्याच काही महिन्यात रत्नागिरीची कायम लक्षात राहील अशी सफर करून , (अजून)काळा पडून सुखरूप परत आलो. विशेष म्हणजे या पाचही दिवसात एकदाही समुद्रकिनारी गेलो नाही. कारण गेलो होतो ते फक्त कोअर कोकण अनुभवायला. आंबा, सुपारीच्या हक्काच्या बागेत पडून राहायला.  कौलारू घराच्या मोठ्या परसातील एका झोपळ्यावर निवांत बसून तासन तास पक्षी निरीक्षण करायला. अजून एक "अंतू बर्वा" तेथे अजून आहे त्याला अनुभवायला. कोकणी माणसे, कोकणस्थ टोमणे, वर्षभराचा ऑक्सिजन आणी अनेक आठवणी. कमाल अनुभव !

राजापूर म्हणजे माझ्या भावाच्या मामाचे गाव. आमच्या नशिबी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणणे नसल्याने होळीसाठी भाऊ पळाला का कि त्याच्या मागे पळणे क्रमप्राप्त होते. कोकण म्हणजे समुद्रकिनारे असे असणारे समीकरण बदलून खरे लाल माती अनुभवायला मिळते. राजापुरी जाण्याचे निमित्त असते ते होळीनंतर पुढचे ३ दिवस धोपेश्वर नामक गावात साजरा होणारा 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील समाधी सोहळा. पण जोडीला झोपल्यावर तासान तास बसून, एकावर एक चहा रिचवत पक्षी निरीक्षण करणे, मृदानी नदीच्या अगम्य जंगलात दिवसभर भटकणे. सुपारीच्या बागेत यथेच्च ताणून देणे, शिमग्याला वाड्यान वाड्या पालथ्या घालणे. अश्या बऱ्याच गोष्टी असल्यावर तर  मग काय कोकण दौरा एक प्रकारचा सोहळाच बनून जातो.

चला तर मग राजपूरी पाहुणचार घेऊया.

लाल डब्यातुन उतरले की लाल मातीने आपल्यावर अधिराज्य गाजवायला सुरवात केलेली असते. ताडा-माडाची वने आपल्याला फॉलो करत येऊन पोहोचलेली असतातच. कंडक्टरने आल्याची वर्दी दिली नाही, तोच परत मार्गाची असंख्य बोचकी खिडकी मार्गे ईच्छस्थळी पोहोचतात. हे गनिम चुकवत उरलेल्या पैशांचा हिशेब संपवायचा आणि अर्जुना नदी काठशी  मी मी म्हणत उभ्या लिंबू-सरबत ठेल्याशी ऑर्डर द्यायची.
सरबताबरोबर आजूबाजूची आल्हाददायक हवा मनात भरून घ्यायची आणि कूच करायचे धोपेश्वर गावकडे.

थोड़े चालुन घाटीवर आलो की राजापुर नगरी आपले स्वागत करतें. येथून धूत पापेश्वर मंदिराकडे न जाता उजवा हात पकडायचा कारण धूत पापेश्वर मंदिरात आपण मागच्याच भागात जाऊन आलो की. नसेल गेलात तर तिथे पाहिले जाऊन या. या इथून. राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर
 


कमानीतुन पुढ़े जाताना आजूबाजूला दरवळणाऱ्या हापुसची कलमे आपल्याला लक्ष देण्यास भाग पाडतात. डोक्यावर कधी रातांबी तर कधी सागाच्या झाडावरून कोकीळ साद घालेल तर कधी हॉर्नबिल कर्ण-कर्कश्य आरोळी ठोकुन अपली उपस्थिती मार्क करेल. याच झाडांच्या आजूबाजूला रातकिड़े संध्याकाळ पासूनच आपले अड्डे जमावतील.
असो. त्यांना "नंतर भेटू" म्हणून अमिष दाखवायचे आणि सरळ आपली वाड़ी गाठायची. 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील.

घरात पोहोचतच एक रम्य सकाळ आपल्याला सुखवुन जाते. सकाळची आटोपत आलेली देवपूजेच्या घंटीचा आवाज आणि तुळशी वृंदावनातील सुवासित उदबत्ती आपल्या मना-मनात सुगंध भरते.

चहा-पाणी-गुळवणी झाली की अंगणात झुलत बसायचे. तोपर्यंत उन्हे वर यायला लागतात आणी अशी ताजी-ताजी टवटवीत सकाळ आता सुर्य-किरणांनी सुवर्णमयी होत जाते.

आता मध्यान्ह होत आली तसे अंगातले शर्ट खुंटीवर जायला लागले आणी स्वयंपाक घरात लगबग दिसू लागली. पुणे-मुंबई वरून तसेच इतर ठिकाणाहून येणारे रघुनाथ महाराजांचे भक्त येथे एकत्र जमून कामे वाटून घेऊन आल्या आल्या कामाला पण लागली.

झाडावरचे फणस खाली उतरवून घेण्यात आले तसे आजचा फणसाच्या भाजीचा बेत कळाला. कोणीतरी गोणी भरून नारळ घेऊन आले तसे सोलकढीची तयारी चालू झाली. केळीच्या पानाचा ढीग येऊन अंगणात स्थिरावला. मंदिराची सजावट सुरू झाली. केळीच्या खुंटांची तोरणे लागली आणी उत्सवाचे सूतोवाच जाहले. 

उत्सव तर उद्यापासून सुरू आहे मग आज पुरणपोळी का? कारण आज शिमगा आहे. शिमग्याचो सण.
जशी उन्हे कलू लागली तशी वाडीत हालचाल जाणवायला लागली. गावातील अनेक मुले व गावकरी एकत्र जमले होते. एक लांब-लचक  सुपारीचे खोड मुळासकट उपटून शिमगा खेळायला आणले गेले.


                                                        शिमगा खेळायला या पाव्हणं





थोडा वेळ खेळ पाहिल्यावर होळी साठी काही थांबलो नाही.आता जरा गावात फेरफटका मारून येऊ. गावातील ओळखीच्या लोकांना वर्दी देऊन येऊ म्हंटलं.



 या घाटावरून उतरून 'आशाताई' चा घरात आवाज द्यायचा. येथेही स्वागत, गूळ-पाणी झाल्यावर गावाचा अपडेट घ्यायचा. त्या नवीन नवीन गोष्टी घ्यायच्या हौशी आहेत या ज्ञानावर त्यांना "या वर्षी काय नवीन" असा प्रश्न करायचा आणी पुढचे २-३ तासांची निश्चिती होते. यावर्षी कॅनॉनचा DSLR आलाय त्यांच्याकडे तोही घरबसल्या स्नॅपडीलने. कमाल आहे.
मला एकदम चित्र डोळ्यासमोर आले. पोस्टमन तोंडाचा व्यायाम करत, नावे पुकारत, अळी गाजवत चाललाय आणी "पोस्त" म्हणून DSLR देतोय. वाह !वाह!




एव्हाना वानरांना नवीन कोणी आल्याची बातमी लागलेली असते. टोळी आपल्या समांतर मार्गक्रमण करीत असते. त्यांना दरडवायला छर्रेच्या बंदुका घराघरात तैनात असल्या तरी आपल्याला त्याची काही गरज नाहीये. आपले लक्ष कैरी/ काजू वर ठेवावे आणी एक डोळा तोडताना आपल्याला कोणी बघत नाही ना? यावर.

 
हे सगळे करताना कान आणी मान दोन्ही अलर्ट हवेत. कान, झाडावरून हॉर्नबिल चा कर्कश्य आवाज ऐकायला आणी मान त्याला झाडावर स्पॉट करायला. आम्ही तेच केले आणी या महाशयांचे दर्शन झाले.


"ग्रेट पाईड हॉर्नबिल  किंवा "राज धनेश". प्रेमात पडावा असा पक्षी होता खरच.केरळचे राष्ट्रीय पक्षी असलेले हे महाशय इथे रात्नांगीत काय करत होते देव जाणे पण नाकावर डबल वजन घेऊन ग्रुपने कल्ला करणारा राजधनेश बघण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच.

चला आजचा दिवस संपला उदयापासून उत्सव सुरू होतोय. तेच पुढच्या भागात चला ....
काका महाराज पुराणिक समाधी मंदीर आणी मृदानी नदीच्या जंगलात. 

 वाचत रहा......... 

शनिवार, ४ जून, २०१६

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर 

धोपेश्वरी जाण्याचा योग आला आणि बोलावणे आल्यासारखे आमचे पाय धूत-पापेश्वर मंदिराकडे आपसूकच वळले. पहिली भेटीतच हा परिसर खूपच छान वाटला. धूत पापेश्वराचे मंदिर, आजूबाजूने सुपारी-पोफळी च्या झाडांची अभेद्य तटबंदी, मृदानी नदीच्या काठावर वसलेले राजापूरवासीयांचे ग्रामदैव, कोटीतीर्थ धबधबा व त्यातील शिवलिंगे, मुख्यतः कोकणात अगदी माहेरपण जगणारे होर्नबील, खंड्या व इतर पक्षी आणि धूत-पापेश्वर शिव अवताराचा इतिहास सगळेच काही एकदा जरूर पाहावे ऐकावे असे.

राजापूर म्हणजे रत्नागिरी मधले तालुक्याचे गाव. कोकमाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द. कोअर रत्नागिरी.
आमचे पहिल्यांदा प्रवेश झाला तो डायरेक्ट गाभार्यात. ओळखीचा फायदा घेऊनच. पण गाभार्यात जाऊन शिवलिंग बारकाईने बघितले आणी ऐकलेल्या धूत-पापेश्वराच्या इतिहास डोळ्यासमोर आला.

असो. मंदिर आणि त्याचे लोकेशन अगदी मस्त आहे. सुमारे ५० मीटर सभामंडप असून मंदिराचे खांब आणि छत दोन्ही मस्त रंगकाम करून सजवलेल्या आहेत. सभामंडपातून पुढे जाताच गर्भ गृहाच्या चौथर्यावर ५ विरगळ ठेवलेले आहेत. रामायणातील काही प्रसंग त्यावर कोरलेले आढळतात. 

विरगळी च्या जवळच दग्तात कोरलेले लंबोदर आहे आणि इतर देवांच्या शिळेतून घडवलेल्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे राशी-शिळाचक्र. 
 एकाच अभेद्य दगडात कोरलेल्या या सप्तराशी ओळखणे मात्र अवघड आहे. कोणी माहितगार माणूस असेल तर तो नक्की सांगू शकतो. रोजची पूजा आणी बाकी इतर गोष्टींमुळे याची झीज होत आहे आणी म्हणून त्यातल्या राशी ओळखणे दुरापास्त झालय.

मुख्य मंदिरातून शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूने,मृदानी नदीच्या प्रवाहावर बांधलेल्या छोट्याश्या पुलावरून मागील दत्त मंदिराकडे जाता येते.  दत्त मंदिरापासून मात्र आजूबाजूचा परिसर सुखावह वाटतो. 

मंदिराच्या परिसरात काजू आंबा सुपारीच्या झाडांची रेलचेल असल्याने अनेक पक्षी आणि वानरे यांची मात्र येथे चैन आहे. फोटोमध्ये दिसल्याप्रमाणे खाली नदीपात्रात उतरणाऱ्या पायर्या कोटी तीर्थ कडे जातात. पावसाळ्यात नदीला पाणी असताना हा मार्ग बंद होत असला तरी येथे प्रकटणारा धबधबा प्रवाहातील कोटी-तीर्थ ( छोट्याश्या  गुहेत असलेली अनेक शिवलिंगे ) याला अभिषेक करतो.

दत्त मंदिरातून दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र बघून खाली यावे आणी येथील माहितगार माणसाला पकडून इतिहास जाणून घ्यावा. अस्सल राजापुरी माणूस जर तुम्हाला भेटला तर मंदिराच्या  इतिहासापासून ते मंदिराच्या ट्रस्टच्या व्यवहाराबद्दलचे स्वताच्या अनुभवाचे गाठोडे तुम्हाला देऊ करेल.

याखेरीज, राजापूरची गंगा हा सृष्टीचा चमत्कार आहे. गंगा नदी काही काळासाठी येथील डोंगरावरील मंदिरात अवतरते. अचानक प्रकट होणे व अचानक गुप्त होणे हे वैशिष्ट्य.काही कुंडामधे गरम पाणी असते. या पाण्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात.  
 

मंदिरात फोटू काढायला परवानगी नाही. ( मी काढलेत पण येथे देत नाही. तसेच इतिहास पण येथे लिहित नाही. कधी गेलात तर शिवलिंगाचा काही भाग टवका उडाल्यासारखा तुटलेला का आहे ते विचारून बघा. )  

मंदिराच्या उजवीकडील बाजूस या फुलाचे झाड आहे. शिवचाफा याचे नाव. U आकाराच्या या फुलामध्ये पराग-कणांच्या  मधोमध छोटेसे शिवलिंग असते म्हणजे तसा आकार असतो. दिसायला सुरेख अश्या फुलाचा वास घ्यायची हिम्मत मात्र करू नका. जास्त वेळ वास घेतल्यास श्वसनाचे विकार होऊ शकतात असे ऐकीवात  आले. काही लोकांनी आमची हे फुल काढायची खटपट चाललेली बघून "ते विषारी झाड आहे" असे सांगितले. वानरे व माकडांनी या परिसरात कितीही उच्छाद मांडला तरी या झाडावर मात्र ते येत नाहीत.
असो. सुरवातीला देवाचे दर्शन घ्या आणी चला पुढे राजापुरात आणी धोपेश्वरात. 

भेटू पुढच्या भागात.
राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

वाचत राहा. 

रविवार, २२ मे, २०१६

राजापूर डायरीज

राजापूर डायरीज 


नमस्कार लोक्स, 
मोठ्या विश्रांतीनंतर एक लांबलचक अशी लेखमालिका सादर करतोय. किल्ल्यांची वा भेटी दिलेल्या स्थळांची डिटेलवार माहिती देण्यासाठी लांबलचक लेख पडण्याचा हुरूप आता मावळत चाललाय. आता थोडक्यात व बेताचे लेख लिहावे म्हणतो आणी सुरवात याच पासून करतो. 

बाकी कोकण म्हणजे काय बोलावे. प्रत्येक जणाने एक स्वताचा स्वर्ग म्हणून तो आधीच बुक करून ठेवलाच आहे.आमचाही आहे तो म्हणजे राजापूर. पहिल्याच भेटीत रात्रीचा प्रवास करताना गगन-बावडा घाटात गाडी थांबली आणी लहानपणा पासून ऐकलेली कोकणातली भूत मनात नाचायला लागली. ती भूत तेव्हा जी डोक्यावर बसली ती बसलीच. आता दरवर्षी हजेरी ही लागतेच. आमची! भूतांची नाही! :)

राजापूर म्हणजे माझ्या भावाच्या मामाचे गाव. आमच्या नशिबी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणणे नसल्याने होळीसाठी भाऊ पळाला का कि त्याच्या मागे पळणे क्रमप्राप्त होते. कोकण म्हणजे समुद्रकिनारे असे असणारे समीकरण बदलून खरे लाल माती अनुभवायला मिळते. राजापुरी जाण्याचे निमित्त असते ते होळीनंतर पुढचे ३ दिवस धोपेश्वर नामक गावात साजरा होणारा 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील समाधी सोहळा. पण जोडीला झोपल्यावर तासान तास बसून, एकावर एक चहा रिचवत पक्षी निरीक्षण करणे, मृदानी नदीच्या अगम्य जंगलात दिवसभर भटकणे. सुपारीच्या बागेत यथेच्च ताणून देणे, शिमग्याला वाड्यान वाड्या पालथ्या घालणे. अश्या बऱ्याच गोष्टी असल्यावर तर  मग काय कोकण दौरा एक प्रकारचा सोहळाच बनून जातो. धूतपापेश्वर- कनकादित्य, महाकाली स्थळांच्या भेटी आणी जलदुर्गांची साथ म्हणजे तर या सोहोळ्याचा म. सा. वी.च. 

असो. तर आगामी लेखांची आणी त्यातील फोटोंची झलक घ्या आणी तयार व्हा "रत्नांगी"च्या प्रवासाला. 

राजापूर डायरीज : राजापूर, धोपेश्वर 
राजापूर डायरीज : काका महाराज पुराणिक समाधी मंदीर 
राजापूर डायरीज : धूत-पापेश्वर मंदीर 
राजापूर डायरीज : मृदानी नदी जंगल 
राजापूर डायरीज : विजयदुर्ग 
राजापूर डायरीज : आंबोळगड, गगनगिरी महाराज समाधी 
राजापूर डायरीज : कनकादित्य, कशेळी 
राजापूर डायरीज : आर्यादुर्गा, देवीहासोळ 
राजापूर डायरीज : पूर्णगड 
राजापूर डायरीज : यशवंतगड, नाटे 


















शनिवार, ९ एप्रिल, २०१६

अजून उजाडत नाही ग !

अजून उजाडत नाही ग !


गूढ सावल्या काही हलती, देहाला ओलांडून ग !
सरकत येते अंधाराची लाट, अंगणी दाटून ग !
जिथवर पणती, तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग, 
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग, 
अजून उजाडत नाही ग, नाही ग !
                                                - संदीप खरे 

बरी सेंट एडमन्डस,  इंग्लंड 

बरी सेंट एडमन्डस,  इंग्लंड

एली, इंग्लंड

ओतूर, कळवण

भुलेश्वर 

केम्ब्रिज इंग्लंड

निळकंठेश्वर  


पांडेश्वर, पुरंदर 

सांदण दरी


सांदण दरी, भंडारदरा, इगतपुरी 


जीवधन, जुन्नर

हरगड, मुल्हेर


धोडपमाची, ओतूर, कळवण

अलंग-गाव , धोडपमाची, ओतूर, कळवण


राजापूर, रत्नागिरी

राजापूर, रत्नागिरी



शनिवार, १२ मार्च, २०१६

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .............२७ डिसेंबर २००७ रोजी हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी वेळ लाउन काढलेला हा फोटो !!! ४ डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीतही भुताचे अस्तित्व कायम रहाते !!!


सध्या काय टीव्हीवर वाढीव हेल काढून बोलणाऱ्या वाढीव लोकांची वाढीव सिरियल चालू झाल्यापासून कोकणातील भुतांना फारच गडद फुटेज मिळालेले दिसते. आता भूतांना भूतांची भिती वाटते का? या आमच्या शंकेचे निरसन झाले नसल्यामुळे आम्हाला भूतांची भिती तर सोडाच पण त्यांचा सावधान पोजिशन मधला फोटू काढण्या पर्यंत आमची मजल गेली आहे. 

आमच्या कुंडलीतच कुठला तरी ग्रह कुणाच्या तरी नीच स्थानी असून ते बापडे एकमेकांकडे वक्राकार वैगरे बघत असल्याने आणि अश्या दुर्मिळ ग्रहयोगामुळे आम्हाला अत्यंत दुर्मिळ असा स्पोर्ट्स शूज घातलेला आणि सावधान पोजिशन मध्ये खिशात हात घालून उभे असलेल्या भुताचे दर्शन घडले. आणी ते पण कुठे कोकणा-बिकणात न जाता चक्क हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी. 

आता हे गाव भौगोलिक दृष्ट्या मुंबई आणी अहमदनगरच्या सीमेवर आहे म्हणता अहमदनगरच्या पाणी-टंचाईची झळ त्याला बापड्यालाही बसलेली असणार म्हणूनच टेबलावर ठेवलेल्या बिसलरी बाटलीकडे भूत आकृष्ठ झाले असणार. पाण्याची शक्यता वगळता तिथे ठेवलेल्या डब्यातील गुळाच्या पोळ्यांचा मोह होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

असो लोक आजूबाजूला झोपली असतानाही त्यांचा निद्राभंग न करता, मागे टेबल असूनही शिस्तीत उभा राहणारे, चार डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेले हात खिशात लपवलेले, कोणताही अक्राळ-विक्राळ मेकअप न करता फुल पँट घालून आलेले, भूतांची सावली पडत नसूनही शंकेखोर लोकांच्या समाधानासाठी आपली सावली पाडणारे हे एका पुण्यात्मा माणसाचेच ते भूत असावे असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. ( काहीही निष्कर्ष का निघेनात, आपल्या 'बा' चे काय जातंय.) 

पण एक मात्र नक्की. विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .

(घाबरलेला) सागर