गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय?
काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. !
नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा.  देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर!

सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच !
असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी. पण च्यायला, एका रात्रीत जाऊन तो सिंहगडचा गाडीरस्ता खोदून यायला पाहिजे. 

पाऊस चालू झाला की, लोकांमध्ये विशेतः अमराठी लोकांमध्ये काय खाज सुटते कळत नाही. सगळे निघाले उंडारायला सिंहगडावर वा भूशी तलाव. तेही एक बरेच आहे म्हणा, सगळे तिकडे गेल्याने बाकीची ठिकाणे चांगली राहतात. 
हे हि असो, आपले काय त्यांच्याशीही वैर नाहीये. जाऊदे बापड्यांना, घेऊदे आनंद त्यांनाही, एका छोट्या डबक्यात १०-१५ जणांचा घोळका करून आणि डोक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अर्ध्या क्षेत्रफळा एवढे मोठाले गॉगल घालून एवरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात फोटो काढण्याचा.

आता आपण मूळ भजी वर येऊयात म्हणजे मूळ मुद्द्यावर येऊयात. 

आमचा एक मुंबई चा मित्र बरेच दिवस मागे लागलाय की सिंहगडावर जाऊयात म्हणून. 
"तुझ्या घरापासून किती जवळ आहे रे ! चल जाऊन येऊ !"
त्याची ही  मागणी आजपर्यंत मी नानाविध कारणे देऊन थोपवून धरली आहे. 
कारण असे की, जेव्हा मी पहिल्यांदी मुंबई फिरायला गेलो तेव्हा याने मला पहिल्यांदाच 'हाजी आली' ला नेले होते. म्हणजे तो नेतच नव्हता. म्हणत होता की, "आता येशील तिथे पण "कुठे पण नेतो' म्हणून हेच आयुष्यभर ऐकवशील मला". तरीही मीच हौसेने गेलो होतो. पण ते जे काही होते ते कहर होते. त्याचे वर्णन मी आता इथे लिहितं नाही ( त्यासाठी दुसरा लेखच लिहीन, विनोद आणि अपमान एकाच लेखात नको म्हणून !) 
त्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत त्याला आम्ही ज्या अमाप शिव्या दिल्या आहेत, त्याची साभार परतफेड तो एकाच ट्रेक मध्ये करू शकतो. तो म्हणजे सिंहगड !

त्याने बरेच कौतुक करून म्हणजे प्लस पॉइंट सांगून मला तयार केले किल्ल्यावर जायला की मी त्याला तेवढीच स्ट्रॉंग कारणे देतो. पण जेव्हा जेव्हा कोण सिंहगडावरील भजी पिठलं आणि दही याबद्दल बोलते तेव्हा मग आमची फ़ेमस रेसिपी चालू होते. ती म्हणजे "मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी "!

कोणी पिठलं भाकरी, भजी च्या नावाने मिटक्या मारल्या तर आम्ही "ती भजी कशी बनते?" हे रसग्रहण त्याला इतके आक्रमकपणे, पूर्वग्रहदूषितपणे, विरोधात्मक पटवून देतो की तो माणूस सिंहगड जाणे रद्द करतो. त्यातही तो अजून चिकट असेल तर गडावर जातो पण भजी मात्र खात नाही. 
अजून कोणी कहरच असेल तर भजीही खातो, पण मग आम्हाला त्याचा सुगावा लागू देत नाही. उदा. म्हणजे तेवढे भजीचेच फोटो वैगरे कॉम्पुटर वरून हाईंड वैगरे करणे वैगरे. 
काय म्हणता, "भजीचे फोटोज"?? 
अहो हो, पहिल्यांदाच जो तिथे गेलेला असतो तो नुसते भजीचेच काय तर वरून प्रदूषणाने अंधुक दिसणाऱ्या खडकवासला धरणापासून ते देव टाक्यांतले अंधारातील पाणी आणि दूरदर्शन च्या टॉवर पासून ते 'या चटई वर आम्ही बसलो होतो' इथपर्यंत फोटो काढतो.
( तरीही एकदा एकाने घेतलेल्या भजी चे फोटो दाखवले होते तेव्हा त्याला मी " हि भजी जर जास्त पिवळी वाटतीये नाही? " अशी कमेंट दिली होती. त्यानंतर बरेच दिवस आमचे संभाषण बंद होते. कारण कळेल लेखाच्या शेवटी!) 

असो तर ती समजुतीची वाक्ये ( भजीची रेसिपी) अशी काहीतरी असतात. 

"अरे नको जायला सिंहगडावर! तो काय गड आहे का ? दुकान आहे ते शिवकालीन इतिहासाचे!
"नाही रे चल मला जायचे आहे रे खूप दिवसापासून. "
"अरे मग दुसरीकडे जाऊ ना , राजगड चल बेस्ट आहे. "
"नको रे तो हेक्टिक होईल हा निवांत आहे. प्लस जेवणाचीही सोय होईल. "
"अ पळ हा, तिथे एकतर जायचेच नाहीये आणि वरती जेवायचे बिवायचे तर अजिबातच नाहीये. "
"मला भजी आणि पिठले भाकरी खायचीये तिकडची"
"अरे गंडला आहे का तू, किल्ल्यावर जाऊन कसली भजी वैगरे खातोस? घरी कधी भाकरी खात नाहीस!"
"अरे तिकडची 'भारी ssssssss' असते म्हणे. "

( आता आमची गाडी मेन गियर वर येते. पण जरा वेगळ्या वळणाने जाते. )
"कसली भारी असते? काही भारी बिरी नसते.
पण एक खरे आहे. ती विकणारी लोक हि तिथेच गावात राहणारी लोक आहेत. गरीब बिचारी! खूप कष्ट करतात रे ती ! रोज सकाळी लागणारा शिधा गोळा करायचा. तो गावातून वाण्याकडून घरी आणून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल तीन तास गड चढून वर जायचे ते पण सामान घेऊन. अरेरे किती कष्ट !
नुसते एकटे नाही तर कुटुंबासहित वरती यायचे. बाया योग्य जागी 'चूल' आणि अयोग्य जागी 'मूल' मांडून ठेवतात.  तर बापडे गडाच्या प्रवेशद्वाराशीच सावज टिपत असतात. तू त्यांच्याकडे नुसते बघून भूतदयेने हसलास जरी, तरी तू त्यांचा(च) 'गिऱ्हाईक'(च) होऊन(च) जातोस(च). मग तुला नो ऑप्शन. तुला त्यांच्याकडे नसले खायची भजी तरी गप्प गुमाने खायला लागणारच."

"असू दे की मी नाही म्हणेन त्यांना !"

"नाही,  मग तू ज्यांच्याकडे भजी खाशील त्यांच्या 'भज्या' म्हणजे त्यांनी बनवलेल्या 'भज्या' तुझ्या तोंडात असतानाच त्यांच्याशी ती पहिली बाई आणि बापडा इतकी सुमधुर भांडणे करतील की ज्याने तुझी मराठी भाषा अजून प्रगल्भ तर होईलच. पण भजी तोंडात असल्याने तू एक अवाक्षर बोलू शकणार नाहीस.आणि हे प्रकरण इथे न संपता तुला त्या पहिल्या बाई कडे 'सर्दी झाली असली तरी' वा 'पाऊस असला तरी' कमीत कमी 'दही' नामक पाणी तरी प्यायलाच लागेल."

"असू दे रे, चालायचेच!. कोणाकडे तरी खायचीच आहे भजी. कोणाला तरी द्यायचेच आहेत न पैसे मग पहिलीलाच देऊ. काय फरक पडतोय. "

एवढा चिकट माणूस असला तरी त्या समोर पराभूत झालो तर पुणेकर कसले?  मग पराभवाचे सूतोवाच होऊ लागले की हुकमी अस्त्र बाहेर काढतो. 

"नाही रे चांगली नसते तिच्याकडची भजी म्हणूनच ती गिऱ्हाईक भांडून मिळवते ना. हे बघ ती सकाळी उठून किल्ला चढून येते. माहीत पण नाही अंघोळ वैगरे केलीये का नाही. घाईने येते म्हणून स्वयंपाक करताना आवरते केस वैगरे ! ते जाऊदे !
खालून येताना फक्त शिधाच आणते म्हणजे भांडी इथेच असतात पर्मनंट, कधी धूत असेल ती काय माहीत?
तिच्याकडे फक्त १ पातेले, १ जग आणि ४-५ प्लेट्स आणि पेले असतात. ज्या पातेल्यात ती तुझे  पिठले करते त्यातच ती दुसऱ्यांचे पिठले करते. भाकरी सांगितलीस तर पीठही त्यातच मळते. हात धुतले असतीलच याची खात्री नाही. हे पण जाऊदे !
कोणी नॉन व्हेज सांगितले तर अंडीही त्या पातेलीतच फोडते. याउप्पर कोंबडी हि त्यातच कापते. ज्याने कोंबडी कापते त्यानेच कांदे, बटाटे कापते. म्हणूनच भजी थोडीशी लालसर असते. हे ही असो.
ज्या 'जगात' तुला पाणी देते त्यातच सरबत करते, ताक करते. तोच काहीजण तोंड लावून पितात. एकानी तर त्या 'जगा'मध्ये बेडूक पकडून आणला होता एकदा. तर काही तंबाखू खाल्लेली माणसे तोच 'जग' घेऊन गुळण्या करतात. काही तर त्यानेच तोंड धुतात.
यातच कहर म्हणजे जर 'जगा'च्या मालकांना निसर्गाची हाक आली तर तोच जग घेऊन .............. !"

"हरामखोरा, गप्प बस आता ! नाही न्यायचेय तर नको नेऊस ! पण तोंड बंद कर !"

या त्याच्या उत्स्फूर्त दादेने सिंहगडावर जायचा विषय त्याच्यापुरता तरी कायमचा संपतो!  

सागर

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

हा खडक काही केल्या पाझरत नाही.

 हा खडक काही केल्या पाझरत नाही.

साल्हेर किल्ल्याच्या त्याच पायऱ्या वेगवेगळ्या ऋतूत कश्या वेगवेगळे पेहराव करून बसतात.
तेच तेच जीवन म्हणून त्या कधीच कंटाळत नसतील का? 
काय तर रोज आपल्या अंगावरून कोणाला तरी वर किल्ल्यावर जाऊन द्यायचे.  
लाईफ स्याच्युरेट झालेय असे त्यांनाही वाटेल असेल का ? 
रोज तेच तेच, काहीच टेम्प्टिंग नाही म्हणून त्याही बोर होत असतील का ?
का ऋतूंशी स्पर्धा करत निसर्ग साज लेऊन नटत असाव्यात उगाचच? 
आपसातही हितगुज चालत असतील का त्यांची ? 
कधी त्यांच्यावर उगवणाऱ्या हिरव्या झाडांशी आनंदाने गप्पा टाकत असतील तर कधी उन्हाळ्याने सुकून चाललेल्या पालवीला धीर देत असाव्यात. 
असो,पण तरीही हा खडक पाझरत नाही तेच बरे आहे. खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे. 






हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

---

संदीप खरे.

संदीपचा मी फुल स्पीड पंखा आहे.  पण कधी त्याच्या कविता अश्या कॉपी करून टाकल्या नाहीत कधीच. ही कविता मात्र अगदीच भारी आहे. 
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
आमच्या आयुष्यात कोडीच कोडी आहेत त्यातच सार्थक मानतो सध्या आम्ही. ना कशाचे सुख न कशाचे दुख, दिवाळीही पूर्वीसारखी राहिली नाही आमची.  खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे. 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय


अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.

"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.

आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला. बराच दुर्लक्षित असा हा किल्ला असल्याने तेथे जास्त वर्दळ नसते. पायथ्याचे गाव सोडले की क्वचित एखादा गुराखी दिसेल असा निर्मनुष्य. धोडप किल्ल्यावर जायच्या दोन वाटा आहेत. एक "हट्टी" नावाच्या गावातून जे किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. आणि एक वाट आहे 'ओतूर' नावाच्या गावातून. जे बरेच लांब असून या वाटेने येताना दोन डोंगर ओलांडून यावे लागते. 

धोडप किल्ल्याच्या शेजारीच "विखारा" नावाचा एक किल्ला/डोंगर आहे. गूगल नकाशे वर तो मी लोकेट केला आहे. याचा उल्लेख आजपर्यंत मी कुठेच ऐकला/वाचला नाहीये. पण श्रावणात एक दिवशी ( कोणता तो लक्षात नाही) कुटुंबासहित या किल्ल्यावरच्या मंदिरात जाण्याची  प्रथा ओतूर मध्ये होती.

 या नकाश्यात आपल्याला अंदाज येऊ शकेल. हट्टी गावाच्या वर एक काळा गोल आहे तो लक्षात ठेवा हा. सांगतो तो कसला आहे ते.

हे 'ओतूर' गाव नाशिक मधील कळवण तालुक्यातील आहे. आणि 'अलंग' जे दाखवले आहे तो किल्ला नसून धोडप किल्ल्याच्या माचीवर वसलेले १०-१५ घरांचे छोटे गाव आहे.


असो, मुद्द्यावर येतो. तर धोडप किल्ल्यावर आम्ही निघालो. मी, माझा एक मित्र आणि त्याच्या भाऊ.  त्याच्या भाऊ हा ओतूर गावातच राहत असल्याने त्याला किल्ल्यावर जायची वाट माहीत होती. पण तोही लहान असताना किल्ल्यावर  गेला होता. ( मी पुण्यात राहून शनिवार वाडा किती वेळा गेलो बरे? ).

निघता निघता, मित्राच्या मामाने  सांगितले की "किल्ल्याच्या पायथ्याशी एक 'गाय' आहे ती आवर्जून बघून या. सापडणार नाही तुम्हाला ती कारण ती आता कपारीत घुसली आहे.  पण दिसली तर बघा."

मी म्हटले "गाय काय बघायची? आणि कपारीत घुसली म्हणजे काय?"

मग कळले की, "चुनकळीच्या दगडाची चालणारी गाय"! काय ??????????

त्यानंतर कळलेल्या वर्णनानंतर, "बस्स! ती गाय शोधून काढायचीच" असे ठरले. जाताना ओळखीच्या माणसांना विचारून पाहिले त्यांनीही त्या बद्दल ऐकले होते ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

ऐकलेल्या वर्णनावरून, ती दगडी गाय हट्टी गावाच्या दिशेला असावी असा अंदाज बांधला. आणि परस्पर विरोधी वाट जोडत आम्ही निघालो. पावसाळ्यात असे काही सापडणे शक्यच नव्हते. आम्ही पावसाळ्या पूर्वी गेलो होते हे बरे होते. जवळ जवळ अर्ध्या किल्ल्याला वळसा घालून आम्ही ओतूर गावाकडून येणाऱ्या वाटेने विखारा किल्ल्याच्या खिंडीतून धोडप किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलो. किल्ल्यावर जाणारी वाटही जोडीला होतीच.


पहिल्यांदा लगीन गायीचे मग किल्ल्याचे असा निर्णय करून किल्ला सोडून २-३ तास कडे कपारी धुंडाळत राहिलो.
२-३ तास हिंडून गाय तर काही सापडली नाही पण वेळही चालला होता. मग त्या गायीचे परत कधीतरी 'दर्शन' घेऊ म्हणून किल्ल्याची वाट धरली.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर १-२ घरे दिसत होती. त्यांच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या आकाराच्या 'कढया' ( कढई) ठेवल्या होत्या. पण आजूबाजूला माणसाचा लवलेशही नव्हता. हट्टी गावातून येणारी वाट एका ठिकाणी ओतूर गावातून येणाऱ्या वाटेला मिळते. तिथपासून हि आम्हाला कोणी गुराखी दिसला नव्हता वा किल्ल्यावर पोहोचल्यावरही खाली कुणी दिसत नव्हते.

मनसोक्त किल्ला हिंडून आलो आणि परतीची वाट धरली. किल्ला उतरून दुसऱ्या प्रवेशद्वार सोडून पुढे आलो. वर जाताना दिसलेली १-२ घरे सोडली आणि पहिल्या प्रवेशद्वारास जाण्यासाठी निघालो. यावेळी 'विखारा' बद्दल माहिती कळली होती. पुढच्या वेळी जाऊ असे ठरले. उगाच जरा हौस म्हणून 'विखाराचे' फोटो काढायला थोडेसे वाट सोडून दरीच्या दिशेने ( हट्टी गावाच्या उताराकडे ) गेलो. थोडा वेळ फोटो काढले आणि निवांत टेकलो.


तेवढ्यात एक माणूस समोर आला. पूर्ण परिसरात एकाही माणूस दिसला नसताना हा कसा काय आला? म्हणून आम्ही त्याला विचारले.

"सकाळीच आलोय. गुरे घेऊन आलोय चरायला. वाट चुकली काय तुमची?"

"नाही, असाच फिरतोय. "

 तो गुराखी होता. एवढ्या वेळ एकाही माणूस नसताना हा मध्येच कसा उगवला? त्याची गुरेही दिसत नव्हती. पांढरा सदरा आणि पायजमा, डोक्यावर दक्षिणोत्तर पांढरी टोपी.  त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या चावल्याच्या खुणा होत्या. त्याचे नाव होते सूरदास.

"ती कुठली कपारीतील गाय कुठे आहे माहीत आहे का हो तुम्हाला"

"हो माहिती आहे"

"काय ????? माहिती आहे?????"

"इथेच आहे का ती? किती वेळ लागेल जायला? आम्हाला जाता येईल का त्या कपारीत? तुम्हाला कशी माहिती ती" असे अनेक प्रश्न आम्ही त्याला विचारले. तो काहीच बोलला नाही.

फक्त म्हणाला "चला, दाखवतो ती गाय"

तडक निघालो. तो घेऊन जाईल तिकडे चालत सुटलो. काही वाटा लागल्या तर थोड्या वेळाने प्रचंड झाडी झुडपे लागली. कुठे चाललो आहे याचे तर भान नव्हतेच पण याच रस्त्याने परत येऊ शकू का याची पण शाश्वती नव्हती.

जाता जाता त्याच्याकडूनच काही माहिती मिळवली. त्याच्याकडून ऐकलेली आणि आतापर्यंत ऐकलेली सगळी एकत्रित माहिती अशी:
"फार पूर्वी, म्हणजे मित्राच्या मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आजोबांनी हि गाय पहिली होती. पूर्णतः दगडाची वा चुनकळीची फरशी असते त्याची. मित्राच्या मामाला ( ज्याचे वय आता ६०-६५ असेल) त्याच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी हे सांगितले होते. त्यांचे आजोबांनी जेव्हा त्याच्या डोळ्यांनी ती गाय (म्हणजे गाई चा पुतळा म्हणता येईल.) पाहिली  तेव्हा ती 'हट्टी' गावाच्या आणि धोडप किल्ल्याच्या मधील मोठ्या मोकळ्या जागेवर होती. पहिल्या फोटोत काळा गोल काढला आहे तिथे जवळपास.


हा गायीचा पुतळा इथे होता तर त्याच्या परस्पर विरोधी दिशेला म्हणजे धोडप किल्ल्याच्या उत्तरेकडे खूप लांब अश्या एका गावात असाच चुनकळीच्या दगडाचे वासरू होते. निसर्गाने म्हणजे साक्षात धोडप किल्ल्याने त्या माय-लेकराची ताटातूट केली होती.


हा वासराचा पुतळा जेथे होता तेथे त्या गावातील लोकांनी विटांचा का कसलातरी कारखाना काढला होता. त्या पुतळ्याची अडचण म्हणून एक दिवशी एकाने रात्री तो पुतळा तोडून तो घरी गेला. आणि आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो पुतळा तसा च्या तसा होता. त्यानंतर सर्व लोकांच्या साक्षीने तोडलेला तो पुतळा दुसऱ्या दिवशीही तसाच अभेद्य होता.


किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस असलेली गाय आणि वासरू हे एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात होते. एकमेकांकडे 'चालत' मार्गक्रमण करत होते. 


हि 'गाय' म्हणजे 'गायीचा पुतळा' दर 'वसुबारस' आणि 'कोजागरीला' काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकते.
त्यानंतर, हि माहिती देणाऱ्या मामांनी त्यांच्या लहानपणी स्वतः हि गाय जेव्हा पाहिली, तेव्हा ती मोकळ्या जागेतून धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पहिली होती. त्यानंतर खुद्द मित्राच्या आईनेही ती गाय पहिली तेव्हा ती गाय एका कड्याला समांतर अशी होती. म्हणजे ती आता या कड्यांत कपार करून घुसेल की काय अशी. आणि त्यांनी तेव्हा ऐकल्याप्रमाणे विरुद्ध गावातील वासरू हे मार्गक्रमण करीत डोंगरात कपार पाडून त्या कपारीत घुसलेही होते. आता ते वासरू कुठे आहे कोणालाच माहीत नाही. ( पण, आज मला माहिती आहे की ती गाय कुठे आहे.)


या सर्व कथा आणि संदर्भाप्रमाणे आता ती 'गायही' डोंगराला कपार पाडून कपारीत आत घुसली असली पाहिजे. असा तर्क आम्ही केला आणि एका ठिकाणी पोहोचलो.

हे सगळे प्रथमदर्शनी खरे वाटले नाही. म्हणजे 'असे कसे असू शकते?' इथपासून ते 'अंधश्रद्धा असावी' इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर मात्र जे डोळ्यांनी पाहिले आणि हातांनी अनुभवले त्याने माझी मती गुंग झाली. 

माझ्या डोळ्यासमोरच डोंगराचे पोट उभे फाडल्यासारखी कपार होती. जेवढा किल्ला आम्ही फिरलो होतो तेथे कुठेही अशी उभी कपार पहिली नव्हती मी. खतरनाक दिसत होती ती. मानव निर्मित असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे दिसण्यावरून वाटत नव्हती.

आत जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून दोघांनी एकत्र जायचे ठरले. पण ती कपार इतकी बारीक होती की आत काय चावले-बिवले  तर दोघांना निघतानाही येणार नाही म्हणून मग भूषण पहिल्यांदी आत गेला.


हीच ती खोल दिसणारी कपार. मध्यभागी आत एक गाई सदृश आकृती ( मागून गाय जशी दिसते तशी) दिसते आहे. मागचे दोन पाय स्पष्ट दिसत असून शेपटी हि दिसत आहे. गाय मागून बघितल्यास दुधाचे पान्हे जसे दिसतात तसेच दिसत आहे.
 

आता हे अजून जवळून बघायला आम्ही कपारी मध्ये शिरलो. कोंदट असा वास येत होता. आम्ही आत शिरताच आतली काही वटवाघुळे आमच्या डोक्याला धडकून उडून गेली. आता मी तर फुल टू टरकलो पण भूषण अजून आत गेला.

हा जवळून फोटो. अगदी गायच वाटत आहे नाही? वाटत आहे म्हणजे काय आहेच ती गाय !

विशेष म्हणजे त्या कपारीची साइज पण फक्त गाई एवढीच होती. जर ती नैसर्गिक असावी तर पर्फेक्ट त्याच मापाची कशी?


या गायीच्या पाठीवरून पुढे हात घालून पहिले तर थोडा डोक्यासारखा उंचवटा भासला. फ्ल्याश मारून डोके सदृश भागाचा काढलेला फोटो.


आत कपारीतून बाहेरचा काढलेला फोटो. खूप भीती वाटत होती आत. वटवाघुळे आमच्यावर पेटून गेलीच होती पण मोठाले कोळी पण अंगावर यायला लागले होते. आणि काहीतरी चावले तर इथून बाहेरही पडता येणार नाही अशी स्थिती.


हा मी. आत गेलो कसाबसा पण मावलो नाही त्या कपारीत.
हाच तो अद्भुत 'सूरदास' आणि मागे विखारा किल्ला.



थोडेसे तिथेही फोटो सेशन झाल्यावर आम्ही परत निघालो. त्याने आम्हाला कुठल्या वाटेने इथपर्यंत आणले आणि कुठल्या वाटेने परत नेले हे आजही आठवत नाही. आता मी परत तिथे गेलो तरीही मी ती कपार शोधू शकणार नाही. घरी येऊन मामांना या गायीचे फोटो दाखवले. काय बोलावे त्यांनाही सुचेना. "लहानपणी पहिली होती तेव्हा ती गाय किल्ल्यावर चढत होती. कमाल केलीत तुम्ही पोरांनो!"
जे काही पहिले ऐकले ते केवळ अद्भुत. सांगीव कथांवर विश्वास बसत नाही पण जे पाहिले 'ते तरी कसे काय झाले असेल?' याचाही उलगडा होत नाही. 

याला खोटे म्हणावे तर ते तरी कसे? मामांनी त्यांच्या आजोबांनी आणि मित्राच्या आईनेही ती पहिली होती. गावातील जुन्या लोकांनी पहिली होती. आज आम्हीही स्वतः पाहिली आणि पाहून विश्वास बसला.
 
कळत नाही की सध्या गावात राहणाऱ्या  कोणाला न सापडणारी हि गाय 'सूरदास' ला कशी माहिती होती? त्याला आम्ही जाताना चहा पाण्यासाठी काही पैसे दिले. त्याने तेही घेतले नाहीत. नेमकी तो तेव्हाच तिथे कसा आला? पहिल्यांदा शोध शोध शोधून न सापडलेले हे गूढ रहस्य नंतर आम्हाला अर्ध्या तासात सापडले. याआधी किती जणांना ते सापडले असेल? काहीच उमगेनासे झालेय. 

निळे आकाश, हिरवा निसर्ग,आत आत जाणारी ती कोंदट कपार, मी, माझे प्रश्न ,

त्या दुर्गांवरती मी का माझ्या मनाच्या खोलात हा शंकांचा दुर्ग?

पैसे देऊन मी सूरदासाला मदत केली? का त्याला गरजच नव्हती अश्या मदतीची?

जर तो गुराखी होता, तर त्याची एकही गाय व शेळी कशी दिसली नाही?

आणि जर तो गावातूनच वर आला होता तर त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या कश्या काय चावल्या होत्या?

वाट सोडून गेल्यावर तो दिसला. मग जेव्हा वाटेने जात होतो तेव्हा तो कुठे असावा?

मी परत जाईन तेव्हा कुठे आणि कपारीत किती खोल  गेली असेल ती गाय? मुळात मला सापडेल का ती गाय?

किती खोल पोहोचले आहे तिचे वासरू? कधी भेट होईल त्यांची? होईल का ?

कित्येक वर्षे चालू असेल हे सगळे? 

काय होईल जेव्हा त्यांची भेट होईल? डोंगराच्या पोटात लुप्त होऊन जातील दोघे का डोंगर फोडून बाहेर येतील?

विखार्यावर एक मंदिर आहे, कसले आहे ते? या वासराचेच तर नसावे.?

त्या वासराच्या ओढीने पुढे जाणाऱ्या गाई साठी कोण खणत असेल कपार?

त्या कपारीत अजून आत गेलो तर काय असेल आत?

हे  प्रश्न काही केल्या सुटतच नाही. मी मात्र अजून आत आत जात राहतो त्या गूढ कपारीसारखा. 


असो,
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे, हेही असू शकते आयुष्याचे सार्थक!
सागर


तळटीप : 
लेखातील अनुभव हा खरा आणि याची देही, याची डोळा अनुभव असला तरी लेख गूढकथा अथवा फँटसी प्रकारातील लिहिलेला आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील लेख :
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्याची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज.  

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार

अद्भुत आविष्कार 

निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते.

निसर्गात कुठे कधी आणि काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. सर्व काही नशिबाचाच खेळ.  ते क्षण डोळ्यात आणि मनात साठवून घेणे एवढेच आपल्या हातात उरते. त्या गोष्टींचा ना कुठे शोध लागतो ना कुठे त्याची माहिती. अनुत्तरित असेच बरेच प्रश्न, भारावलेले मन, स्तब्ध कॅमेरे आणी डोक्याच्या खोल आडामध्ये शिंपल्यांप्रमाणे आत आत जाणारा एकच प्रश्न. "हे कसे शक्य आहे?"

इंटरनेटवर  क्षणात माहितीचा खजिना उघडून देणाऱ्या संकेत स्थळांच्या चेहऱ्यावर हि आठ्या येतात. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशीच त्याची पण भांबावलेली अवस्था. आपल्या आधी हे आविष्कार किती जणांनी पाहिले असावेत कुणास ठाऊक. त्यातून त्यांना काय बोध झाला असावा हेही वादातीत. डोळ्यांनी जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा असे मानले तर किती साऱ्या गोष्टीपासून आपण अनभिज्ञच. आणि हेच आविष्कार सत्य म्हणूनच पुढात उभे राहिले तर?

एका थिअरी प्रमाणे, एक 'पाय चार्ट' काढला आणि त्याचे असे काहीसे भाग केले.
१. मला माहीत आहे की हे मला माहीत आहे.(known knowns; there are things we know that we know.)
टक्केवारी : २% 
उदा. मला माहीत आहे की जेवायचे कसे हे मला माहीत आहे.

२. मला माहीत आहे की हे मला माहीत नाही.(known unknowns;there are things that we now know we don't know.) -
 टक्केवारी : ३%
 उदा. मला माहीत आहे की, 'विमान' कसे उडवायचे असते हे मला माहीत नाही.

३. मला माहीत नाही की हे मला माहीत आहे/नाही. (unknown unknowns – there are things we do not know we don't know.)  -
 टक्केवारी : ९५%
उदा. मला हे माहीत(च) नाही की ........


समजा, असे काही आविष्कार/चमत्कार दिसले की, आपल्या मनाची वाटचाल तिसऱ्या मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे होईल. तर?
अधिक सोपे करून, एखादी गोष्ट आहे, डोळ्यांना समोर दिसते आहे, डोक्याला लॉजिकली पटते आहे. पण त्याचा काही मागमूस लागत नाही.
किती मजा येईल ना?

असो, मूळ मुद्द्यावर येतो. आजपर्यंत भटकंतीच्या निमित्ताने जिथे जिथे गेलो, प्रत्येक वेळी हा निसर्ग वेगळाच भासला. आडवाटांनी हिंडताना जे काही गूढ,इतिहास असलेल्या पण अनाकलनीय गोष्टी मला दिसल्या त्या शब्दबद्ध करण्याचा माझा मानस आहे. काही गोष्टींना इतिहास आहे तर काहींना ऐकीव पार्श्वभूमी. काहींना विज्ञान आहे तर काही आजही अनुत्तरित.

 या लेखन मालिकेत माझ्या डोक्याला गती मंद करणाऱ्या काही जागा, ठिकाणे यांची मिळवलेली माहिती देतो आहे. अर्थात, थोडे तिखट मीठ लावून.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, फोटो बरोबर दिलेली माहिती हि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांकडून मिळवलेली ऐकीव माहिती आहे. त्यामुळे त्याला पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक जोड आहे.
पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक ऐकीव माहिती आणि अंधश्रद्धा या मध्ये पुसटशी बारीक रेषा आहे. मला जेवढे उमगले ते मांडतो आहे.

लवकरच हे ५ भाग (लिहून) प्रकाशित करत आहे.
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील चुनकळीची गाय
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्यांची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज. 

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

एकमेवाद्वितीय इंद्रवज्र

साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.


सकाळची वेळ, सह्याद्रीचा महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला,कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे आकाशात डोक खुपसून बसलेले उंचच उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! सह्याद्रीच्या साक्षीने हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.



इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला  आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी  गोलाकृती आकृतीत उमटते.

दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली.  जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.


इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )


खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल. 



अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. ( म्हणूनच हा एवढा लेखनप्रपंच).
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

सागर 

मंगळवार, २५ जून, २०१३

बागलाणचे शिलेदार:- साल्हेर,सालोटा,मुल्हेर,मोरागड,हरगड,मांगी तुंगी

बागलाणचे शिलेदार 
ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य,  गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.
ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच... साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,हरगड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते. 

साल्हेर-सालोटा :
आमच्या स्वप्नातीत ट्रेकची सुरवात झाली ती साल्हेर सालोटा ट्रेक ने. एका शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून (पुणे- सटाणा- वाघाम्बे) साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाशी पोहोचलो. साल्हेर हा  महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेने गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो.
 उजवीकडे साल्हेर आणि डावीकडे सालोटा 
सर्व वाट रुळलेल्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही सामान जास्त असेल तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचे असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो.

सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीचा असल्याने सुमारे एक तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवण करण्यासाठी उपयोग होत असावा. या किल्ल्यावर पाणी नाही. येथून साल्हेर किल्ल्याचे पिर्यामिड सारखे रूप डोळ्यात भरते. 


साल्हेर हा किल्ला कळसूबाई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून त्यास अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक  पार्श्वभूमी आहे. सालोटा उतरून खिंडीत आल्यावर, येथून आपण चार ते पाच तासात साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी जाऊ शकतो. साल्हेर वर जाण्याच्या मार्गात अनेक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. किल्ल्यावर दोन गुहा असून राहण्यासाठी योग्य आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी असून गुहेच्या समोरच गंगासागर तलाव आहे. या तलावात कायम पाणी असते. ते पिण्यायोग्य नसले तरी उकळून पिणे चांगले.
या किल्ल्यावरचे सर्वात बघण्यासारखे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असे परशुराम मंदिर. गुहेपासून ४५ मिनिटे चालून गेल्यावर सर्वात उंच अश्या ह्या किल्ल्यावर छोटी टेकडी दिसते. त्यावर हे मंदिर बांधलेले असून तेथून आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य आपले डोळे दिपवून टाकते. थंड गार वारा, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, तेथून दिसणारा सालोटा, सूर्यास्ताला पश्चिमेकडे येणारी केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य. केवळ अप्रतिम असे अनुभव.
या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख, दगडात कोरलेले गणपती, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
वाघाम्बे गावातून चढाई करून दुसऱ्या दिवशी साल्हेर वाडी गावातून उतरावे. वाघाम्बे गावातून पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. येथे पाहण्यासारखी अनेक स्पॉट असल्याने येथे जास्त वेळ हाताशी ठेवावा.

मुल्हेर आणि मोरागड
येथूनच पुढे मुल्हेर गावी जाऊन पुढच्या दिवशी मुल्हेर आणी मोरागड दोन्ही करता येतात.मुल्हेर गावातील शाळा, देवालय आणि उद्धव महाराज समाधी पाहण्यासारखी आहे.

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये असून किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी सधन आहेत.
 मुल्हेर किल्ल्याला लागूनच हरगड असून दोन दिवसात हे तिन्ही किल्ले करणे शक्य आहे.

मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरापासून सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेले आहेत. ते पाहून वाट बरोबर असल्याची खात्री होते.
तेथून थोडे पुढे गेल्यास गणेश मंदिर आणि सोमेश्वर मंदिर लागते.गणेश मंदिरासमोर असलेल्या तलावात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब पाहून डोळे सुखावून जातात. चौदाशे साली किल्ल्यामध्ये गाव वसलेले होते, त्याच्या खुणाही येथे सापडतात.
 सोमेश्वर मंदिर:
'सोमेश्वर मंदिर' हे १४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो. गाभारा पाताळात असून तेथे जाण्यासाठी भुयारी पायऱ्या आहेत. मंदिरात असलेले पुरुषभर उंचीचा नंदी आणि दगडात कोरलेले कासव आपले लक्ष वेधून घेते.
येथून  गडावर जाण्यास सुमारे तीन तास लागतात. येथून अनेक 'गुरांच्या वाटा' फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. वाटेत मोती टाके असून त्याच्या उजवीकडून रस्ता वर जातो. वाटेत अजून एक कातळात कोरलेला मारुती दिसतो.
किल्ल्याला अतिशय भक्कम अशी सात प्रवेशद्वारे असून एका-आड  एक अशी त्यांची रचना आहे. वाटेत दोन  गुहा असून किल्ल्यावर पोहोचल्यावर नऊ पाण्याची टाकी आहेत. मुल्हेर वरून मोरगडा वर जाताना वाटेत राजवाड्याचे भग्न अवशेष आणि भडंगनाथाचे मंदिर लागते.
किल्ल्यावरून विस्तीर्ण अशी पर्वतरांग दृष्टीस पडते. दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नाहीत.
मुल्हेरवरून मोरा कडे जाणाऱ्या प्रवेशद्वारात दरड कोसळली असल्याने जायचा मार्ग छोटा बनला आहे.  मुल्हेर आणि मोरागडाच्या खिंडीत अभेद्य अशी तटबंदी असून तेथून  दगडात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला मोरागडावर घेऊन जातात.

मोरागडाचा हा पहिला व अभेद्य दरवाजा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो.
पुढे मोरागडावर काही विशेष पाहण्यासारखे नाही. येथून मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, ताम्बोळ्या असे अनेक दुर्गांचे दर्शन होते.

मांगी-तुंगी :
मांगी-तुंगी हे जुळे किल्ले ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हे किल्ले  गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान ही आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याचे जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. येथून पुढे गुजरात राज्य चालू होते

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्टच्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे.
मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.
मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? )  
मांगी गडावरून तुंगी शिखराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते.

दोन्ही गडांवर असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यातला काही कोटिग करून जपलेल्या आहेत. 
येथून आजूबाजूच्या परिसराचे सुरेख दर्शन होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या ठाकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे असे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत. 
येथून उतरून तुंगी शिखरावर जाता येते. जवळपास तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून आपण येथे पोहोचतो.
पायथ्याशी प्रसादाची आणि पाण्याची सोय असून मंदिरात ट्रस्ट तर्फे जेवणाचीही सोय होते. 

हे सहाही किल्ले व्यवस्थित प्लानिग केले तर चार दिवसात होऊ शकतात. सटाण्यापासून पुणे- मुंबई ला जाणाऱ्या अनेक गाड्या मिळू शकतात. या पूर्ण ट्रेक ला तिकीट भाडे धरूनही रु. १५०० पेक्षा जास्त खर्च येत नाही. 
निसर्गाचे खरे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर हा खरेच तुफान ट्रेक होऊ शकतो. महाराष्ट्रात असे काही अविस्मरणीय गडकिल्ले आहेत, याबाबत आपण खरेच सुदैवी आहोत. 
------------------------------------------------xxxxxx ------------------------------------------------

हा लेख महाराष्ट्र टाइम्स मधेही प्रकाशित झाला होता. या किल्ल्यांबद्दल अजून यथासांग माहिती आपण खालील दुव्यांवरून मिळवू शकता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी


सागर शिवदे 
sagarshivade07@gmail.com
9975713494

गुरुवार, २० जून, २०१३

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

 गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. 

आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.

असो, सांगायचा मुद्दा हा की,  एकदा का तुम्ही सायकल शिकलात की पुढच्या आयुष्यभर त्या दोन पायांना जी काही भिंगरी लागते की शेवटी या दोन पायांखेरीज तिसरा आधार म्हणून काठी आली की ती थांबते. पण पोहोण्याचे मात्र तसे नाही .
आता मी पण पोहोण्याचा क्लास जॉईन केला तो हि गरजेपोटीच. तेव्हा करियर ची एकंदरीतच बोंबाबोंब. त्यामुळे नौदलात जाऊ असा विचार करून अस्मादिकांनी कॉलेजातील 'NCC' नावाचा प्रकारात आपले नाव नोंदवले. कोणीही फालतू माणूसही भारतीय सैन्यात जाऊ शकतो असे आम्हाला कळले असल्याने आपली वर्णी सहज लागेल असा आत्मविश्वास.

या 'NCC' पेक्षा भिकार या जगात अजून दुसरी गोष्ट आहे यावर माझा विश्वासच नाहीये. आता हे निरीक्षण अर्थात तेथे काही दिवस जाऊन आल्यानंतरचे आहे. काही गोष्टी मला अजूनही नाही कळाल्या त्या अश्या की,
१. सगळ्या लोकांची डोकी भुंडी का असतात? जरा बरे केस असलेला आणि व्यवस्थित भांग बिंग पाडलेला माणूस या लोकांना का पचत नाही?
२. प्रत्येक गोष्टीला बेडूक उड्या मारणे किंवा लोळत क्रॉलिंग करणे हीच शिक्षा असू शकते का?
३. एकाही शिवी न देणारा ( आणि दिलेली ऐकून न घेणारा) माणूस किती दिवस येथे टिकू शकतो?

हे हि असो, तर कहाणी होती आमच्या पोहोण्याची. NCC मध्ये गरजेचे म्हणून आम्ही पोहोण्याचा क्लास लावला. बरोबर १ महिन्याने त्यांची पोहोण्याची परीक्षा होणार होती आणि ती पण ५० फुटी तलावात. आता पाण्यात पडल्यावर ते पन्नास फुटी खोल असो व दहा फुटी काय फरक पडतोय? पण या लोकांना भारी हौस मिरवायची.

पूर्ण एक महिना क्लास ला जाऊन 'शेवटी' म्हणजे क्लास चे पैसे संपायच्या शेवटी आम्ही कसेबसे हातपाय झोडत पाण्यात तरंगायला लागलो. आता आमचा कोन्फीडन्स का काय म्हणतात ते भलताच वाढला होता. शेवटचे काही दिवस तर आम्ही  'भाड्याने' आणलेल्या (म्हणजे भाडे देऊन आणलेल्या, गैरसमज नको !") उसन्या, पोहायच्या टोप्या आणि गॉगल लावून पोहू शकत होतो.

अखेर तो दिवस उजाडला जेव्हा आमची परीक्षा होणार होती. शे दीडशे लोक जमली होती एका ठिकाणी. लगेचच म्हणजे दीड तासाने मिलेटरीचे तीन ट्रक आले. मग भाज्या कोंबतात तसे आम्हाला कोंबून ते ट्रक निघाले. मिलेटरीचे मळके पट्या-पट्या चे शर्ट घालून आलेले ती लोक जेवढा करता येईल तेवढा मग्रूरपणा  करीत इतर लोकांना 'हाकत' होते. 

आता पोहोण्याची परीक्षा देण्यासाठी आम्ही तलावात उतरलो. ३०० मीटर तलावात ३ फेऱ्या मारून एका ३० फुटी भागात फ्लोटिंग करायचे होते. 
अस्मादिकांची हि पहिलीच परीक्षा असल्याने आम्ही पोहोण्याचा चष्मा, टोपी वैगरे घालून तयार. माझ्या बरोबरीच्या लोकांना अचानक न्यूनगंड का काय ते वाटायला लागले असावे. एकंदर माझी तयारी आणि हौस बघून हा "भारी स्विमर" असेल असे लोकांना वाटले. मी फुल टू टोपी-बिपी गॉगल घालून. पण खरी परिस्थिती नंतर लोकांच्या लक्षात आली. 

हि पोहोण्याची स्पर्धा नव्हती.  फक्त ३ फेऱ्या पूर्ण करून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते. पण शेवटचा माणूस फेरी पूर्ण करून जेव्हा फ्लोटिंग ला येईन तेव्हापासून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते नाहीतर फेल. 

फ्लाग उडाला आणि सगळी लोक पोहायला चालू झाली. सगळी इतर मुले 'बटरफ्लाय' व 'गावठी' पोहोत होती.ती सपासप पोहत पुढे निघून गेली. मी मात्र नुकतेच शिकलो असल्याने 'ब्रेथ स्ट्रोक'मारत हळूहळू. पोहत जेव्हा मी अर्ध्या अंतरावर आलो तेव्हा काही लोक ती फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीसाठी पोहत होती. 
काही वेळ पोहल्यानंतर माझे तलावाच्या बाहेर लक्ष गेले. एक गार्ड माझ्या पोहोण्याच्या स्पीडने वरती चालत होता. की कधी हा माणूस बुडेल आणि कधी उडी टाकून याला एकदाचे बाहेर काढेन या उद्देशाने. 

पहिल्या फेरीतच मला दम लागलाय हे पाहून तो म्हणाला की "टेक युवर ओन टाइम". 
हे वाक्य मी इतके मनावर घेतले की माझा वेग अजून कमी झाला. मी दुसऱ्या फेरीसाठी निघालो तेव्हा काही लोक फ्लोटिंग पर्यंतही पोहोचली होती. 

वेळ माहीत नाही पण बऱ्याचं वेळाने मी फ्लोटिंग ला पोहोचलो. अंगातला जीव तर गेलाच होता. पण येथे जर मी हातपाय गाळले असते तर गॉगल आणि टोपी सकट माझा "टायट्यानिक" झाला असता. आणि माझे सोडा पण ज्यांची चष्मा, टोपी मी आणली होती त्यांच्या आत्म्यालाही  शांती लाभली नसती. 

मी पोहून गेलो आणि फ्लोटिंग ची वेळ चालू झाली. जी लोक लवकर पोहोचली होती त्यांच्यावर माझ्यामुळे २५  मिनिटांपेक्षा जास्त वेळ तरंगत राहायची वेळ आली होती. काही मस्तपैकी पाण्यात उलटी झोपली होती. काही नाईलाजाने तरंगत होती. काही पाण्यात काहीतरी हरवलेय असे काहीतरी करीत होती. तर माझ्यासारखे नवशिके ज्यांना पोहणे शिकवले होते पण तरंगणे नाही, असे लोक जीवाच्या आकांताने हातपाय झोडीत होते. 
काहींना एवढा वेळ तरंगणे न जमल्याने काहींनी तलावाच्या कडेला पकडले आणि नापास झाले. 

मी तरंगायला चालू केले आणि पुढची ती दहा मिनिटे माझ्या आयुष्यातली मी कधीच विसरणार नाही. मिनिटा-मिनिटा गणिक माझे हातपाय झोडणे कमी होत होते. अंगातली शक्ती संपली होती. बाहेरचा माणूस आठ, सात, सहा, पाच गणती करत होता. तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांची गणती करतोय असे वाटू लागले. 
आता आकडा चारवर आला. एका वेळेला वाटले, गेले उडत करियर-बिरीयर. आपण जगलो तर करियर होईल ना? मोठ्या कष्टांनी तलावाच्या शेजारचा पाइप धरायला हात पुढे केला. पाइप धरला की नापास हे तेथेही आठवत होते.
तो 'तीन' म्हणाला. मी पाइप धरायला गेलो आणि एकदम मागील महिन्यात या पोहोण्यासाठी केलेले क्लास, त्याचे पैसे सगळे आठवले. म्हटले बस्स, आता नापास झालो तर येथून बाहेर आणि हे सगळे एफर्टस वाया. 

देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता. 
लगेच "फिनिश" असा शब्द आला आणि मी सुस्थ पडलो. मला त्या तलावाच्या बाहेर कोणी काढले हेही मला आठवत नाही. मला राहून राहून आजही वाटते की माझी हि एकंदर परिस्थिती बघूनच तीन ते एक अंतर लवकर काटले गेले असावे. 

मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मी पास झालो होतो पण माझ्यामुळे जास्त वेळ तरंगायला लागल्यामुळे आणि ते न जमल्याने तीन मुले नापास झाली होती. बरे झाले की मी गॉगल घातला होता की त्यामुळे मला त्यांच्याकडे काणाडोळा करता आला. कुठल्याही क्षणी ती आपल्याला पकडून परत तलावात टाकतील असे मला वाटायला लागले. 

गॉगल, टोपी घालून पोहोण्याआधी मी लोकांना 'मायकेल फेल्प्स' वाटलो होतो म्हणे, पण नंतर माझी पत पार्ट-टाइम 'वाघ' होणाऱ्या 'राहुल रॉय' एवढीही शिल्लक नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो उधारीचा चष्मा आणि टोपी देऊन टाकली.

तेथे पास होऊन मी NCC जॉईन केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षात सोडली. ते जर तेव्हा सोडले नसते तर मी अजूनही 'सावधान, विश्रामच' करत बसलो असतो.  आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट?

भविष्यात, मी जर माझे वर्तमानपत्र चालू केले(च) तर मी रोज(च) दोन(च) बातम्या हेडलाईन म्हणून(च) छापेन(च).
१. NCC पेक्षा भिकार जगात काहीच नसून सुज्ञांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. 
२. सिंहगडावर जाणारा गाडीरस्ता कालच्या मंद लहरी भूकंपांनी नामशेष. आता सिंहगड चढून जाण्यासाठी पर्याय नाही.

त्यानंतर बऱ्याचं वर्षांनी फिटनेस साठी म्हणून पोहायचा क्लास लावला. पोहता येते म्हणून पहिल्याच दिवशी 'स्विमिंग टेस्ट' द्यायला मी परत पाण्यात उतरलो. पूर्ण एक तास प्रयत्न करूनही मला पोहता आले नाही. "आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते. दुसऱ्या दिवशी मी गप्प माझे रजिस्ट्रेशन रद्द केले आणि उरलेले पैसे परत घेऊन आलो. 

आता मी चुकूनही पोहोण्याच्या नादी लागत नाही.समुद्रकिनारी गेलो तरी जास्त रमत नाही. हुशारीने पावसाळ्यात मुंबईला जात नाही. "मी मासा असतो तर" अश्या आशयाचे निबंध हि वाचणे मी आता बंद केले आहे. डिस्कवरीवरची माणसे समुद्रात पोहायला लागली की, मी वाहिनी बदलतो आणि अन्नू मलिकची हिडीस गाणी लावतो.
"उची है बिल्डिंग, ट्या नाआआअ "
लिफ्ट तेरी बंद है ट्या नाआआअ "

( दुःख पचवायला हो ! कारण अस्मादिक कोणतेही व्यसन करत नाहीत.आणि म्हणतात ना "लोहे को लोह काटता है".)
असो, पण हा एवढा छोटा प्रसंग, माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.

सागर