शनिवार, २५ एप्रिल, २०१५

पक्षी जाय दिगंतरा !

पक्षी जाय दिगंतरा
मुळात पक्षी हे उच्छाद आहेत का ते पाळणारे खरे उच्छाद आहेत? या पुलं च्या प्रश्नाचे उत्तर अजूनतरी मला  सापडल्याने कोणताही पक्षी पाळण्याचे धाडस केले गेलेले नाही. ( उपमा चुकली आहे पण कोण्या मोठ्या लेखकाचे नाव कोणत्याही संदर्भहीन वाक्यात घुसडून लेखाची सुरवात केली गेली तर उगाचच काहीतरी भारी लिहितोय असे फिलिंग येते म्हणून.) असो. 

ग्रेट पाइड होर्नबिल पक्षी पहिल्यापासून मला पक्ष्यांविषयी जरा कुतूहल निर्माण झाले आहे. पक्षी निरीक्षण आणी त्यांची ओळख या विषयात मी अगदी बाळबोध ( मॉडर्न वाचकांनी 'ज्युनिअर केजी' वाचावे)) असलो तरी काहीच्या काही फोटो काढून सुरवात झाली हे ही नसे थोडके! 

ग्रेट पाइड होर्नबिल/ धनेश :












 गोल्डन ईगल :

किंगफ़िशर: White throtted kingfisher



शनिवार, २८ मार्च, २०१५

पहिले प्रेम !

आमचे पहिले 'पक्षी' प्रेम !

लेखाचे फक्त नाव वाचून तुम्ही जेवढ्या उत्सुकतेने हा लेख उघडला आहे ती उत्सुकता शिर्षक वाचून मावळली असेल अशी अपेक्षा करतो. :)  तरीही काही उत्सुकता उरली असेल तर ती आता अजून न ताणता तुमचा भ्रमनिरास झाला असेल आणी ज्या अपेक्षेने वाचक येथे आले आहेत ती येथे पूर्ण होत नसली तरी नवीन काही वाचायला मिळू शकेल याची खात्री देतो. शिर्षक अगदीच चुकीचे नसले तरी "आमचे पहिले पक्षी प्रेम" या नावाखाली लेख खपून जायला हरकत नाही.

असो.
मागच्याच आठवड्यात रत्नागिरीची कायम लक्षात राहील अशी सफर करून , (अजून)काळा पडून सुखरूप परत आलो. विशेष म्हणजे या पाचही दिवसात एकदाही समुद्रकिनारी गेलो नाही. कारण गेलो होतो ते फक्त कोअर कोकण अनुभवायला. आंबा, सुपारीच्या हक्काच्या बागेत पडून राहायला.  कौलारू घराच्या मोठ्या परसातील एका झोपळ्यावर निवांत बसून तासन तास पक्षी निरीक्षण करायला. अजून एक "अंतू बर्वा" तेथे अजून आहे त्याला अनुभवायला. कोकणी माणसे, कोकणस्थ टोमणे, वर्षभराचा ऑक्सिजन आणी अनेक आठवणी. कमाल अनुभव !

हे ही असो. तर मुद्दा असा की, पक्षी निरीक्षण आणी पक्ष्यांचे फोटो वैगरे गोष्टींशी माझा तसा काही संबंध नव्हता. जे लोक पक्षी निरीक्षण करून त्यांचे आवाज, त्यांच्या जाती, त्यांची मराठी, इंग्रजी आणी याही पुढे त्यांची शास्त्रीय नावे याची माहिती गोळा करायचे त्यांचे  मला कायम अप्रूप वाटत आले आहे. डोळ्याला दुर्बीण लावून तासन तास (खरे) पक्षी बघत बघायचा पेशन्स मला कधी नव्हता सो त्या वाटेला कधी गेलो नाही.

येथे यावेळी मात्र सगळे जुळून आले. जेथे गेलो होतो त्या घरात बाकीची हौशी मंडळी असल्याने आणी ती याबाबत बर्यापैकी जाणकार असल्याने भारीतल्या दुर्बिणी, कॅमेरे, जाणकार मंडळी, मुख्यत्वे वेळच वेळ इत्यादि हाताशी तर होतेच त्याशिवाय आवर्जून बघावे असे पक्षीही होते. हे खरे महत्वाचे.

पाच-पाच तास झोपाळ्यावर बसून, ठराविक वेळेने चहा नामक अमृत प्राशन करत, दुर्बिणीने पक्षी शोधत, सापडला की तो सगळ्यांनी बघून त्यावर चर्चा करत, एका जाणकाराने मोबाईल मध्ये टिपलेले त्यांचे आवाज ऐकत ५ दिवस काढण्याची मजाच काही और !!

पक्षी निरीक्षणाची सुरवात करताना या तमाम पक्षी दुनियेतला पहिला पक्षी मला खूप आवडला तो म्हणजे "ग्रेट पाईड हॉर्नबिल  किंवा "राज धनेश". प्रेमात पडावा असा पक्षी होता खरच.



केरळचे राष्ट्रीय पक्षी असलेले हे महाशय इथे रात्नांगीत काय करत होते देव जाणे पण आजवर मी कधीही न पाहिलेलें हे पक्षी इथे बरेच पाहायला मिळाले. उंचच उंच आणी जास्त झाडी असलेल्या प्रदेशात हे पक्षी दिसत असले तरी त्यांच्या मोठ्या आकारावरून आणी याच्या असामान्य स्वरुपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दिड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात.

काही मी काढलेले फोटो येथे डकवले आहेत. बघून जरा एक्स्ट्रा ऑर्डेनरी वाटतच आहे. मोठी पिवळी चोच आणी डोक्यावर घातलेले हेल्मेट सदृश्य  शिरेटोप . ( रत्नागिरीतपण हेल्मेट सक्ती लागू झाली काय? )


सुमारे १५० सेमी. लांबीचा हा राज धनेश दिसायला जेवढा सुंदर तेवढाच त्याचा आवाज डेंजर असतो. करवतीने लाकूड कापताना जसा आवाज येतो त्या सदृश्य ओरडून हे महाशय टोळीने असले कि जबरदस्त कल्ला करतात.

एखादी गोष्ट पाहता क्षणीच आवडावी असे होते न अगदी तसेच माझे याच्या बाबतीत झाले.आधी मी रिओ चित्रपटात हा पक्षी पहिला होता आज प्रत्यक्ष पहिला. माझ्यासाठी हा खूप मोठा अपग्रेड आहे.

 जोड्याने बागडणारे धनेश खूप लाजाळू तर असतातच पण थोडाश्या आवाजाने वा माणसाच्या चाहुलीने उडून जातात. आकाराने मोठे असल्याने ते फारच कमी उंचीवरून उडतात. निरव शांतता असेल तर त्यांच्या उडण्याचा आवाज दीड किमी ऐकू जातो असे ऐकले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसंग २:
सकाळी सकाळी सुर्योदया पूर्वीची वेळ. थंड वारा आणी अनेक पक्ष्यांची किलबिल. मध्येच ऐकू येणारे वानरांचे चित्कार. वाऱ्याने झाडांची चाललेली ढकलाढकली.
परत निघायचे असल्याने आणि सकळी ७ ची गाडी असल्याने घरात सगळ्यांची लगबग. आवरणे , अंघोळ अश्या फालतू गोष्टीत इंटरेस्ट नसल्याने अस्मादिक एकटेच परसातल्या झोपल्यावर टेहळणी करत बसलेले.

चंद्राचे फोटो काढण्याचे काही निष्फळ प्रयत्न चालू असतानाच अ ते ज्ञ पर्यंत अक्षरांनी लिहिता न येण्यासारखे ओरडण्याचे पण उडण्याचे झूssssssssssssssssssssssssssssप ! झूssssssssssssssssssssssssssssप! असे चमत्कारिक आवाज मोठ्याने यायला लागले. आपल्याकडे हेलीकोप्टर जाताना आवाज येतो तेव्हा आपण लगेच वर बघतो तसे आपसूक नजर कॅमेरातून बाहेर आकाशाकडे गेली. फोटोवरून वातावरणाचा अंदाज येईल.

जसा आवाज वाढत गेला तसे नजर अजून शोधत राहिली. आणि एकदम दोन होर्नबील पक्षी जोड्याने या झाडाच्या आणि घराच्या थोडेसेच वरून उडत गेले. जो काही त्यांचा उडण्याचा आवाज होता न बास ! थेट प्रेमात ! 
-----------------------------------------------------------------------------------------------------------

पक्षांचा विषय चालू असताना डॉ. सलीम अलींना कोण विसरेल? त्यांच्याविषयी माहिती मिळवताना खालचे चित्र मिळाले. आणी त्यांच्याविषयी अजून रिस्पेक्ट वाढला. 

विकिपीडिया वर मस्त माहिती मिळू शकेल. ज्याने कोणी अपडेट केली असेल तोही याचा चाहता असावा.


अजून कोकणाचा वृतांत पुढच्या लेखातून येतच राहील.

वाचत राहा.

सोमवार, २ मार्च, २०१५

थरारक !!

थरारक !! 

 नवीन वर्षाच्या भटकंतीची सुरुवात मस्त झाली. दरवेळी प्रमाणे नवीन वर्षाचा संकल्प सोडताना यावेळी जरा वेगळी कल्पना लढवायचा प्रयत्न केला गेला. तो असा की, दरवेळी ट्रेक ला जाताना व्यवस्थित प्लान करून सगळी सोय बघून घड्याळ्याच्या काट्यावर नियोजन असते त्या प्रकाराला फाटा देऊन नवीन प्रकार. 

टोटल सोलीट्युड. 

काहीही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कमीत कमी खर्चात आणी मनसोक्त भटकणे. 

माणसाळलेला शिवनेरी असो वा एकलकोंडा कोकणदिवा. कधी सिमेंटच्या पायऱ्यानी भेटणारे महादरवाजे तर कधी ऊन पावसाशी अखंड टक्कर देत देत तसूभर ही न झीजणारा उभा प्रचंड कातळ.  कधी रुजलेल्या वहिवाटीच्या पायवाटा तर कधी जंगल सदृश्य वाटावी अशी घनदाट झाडातील गुरांच्या वाटा. कधी डोके ढगांच्या दुलईत खुपसून बसलेली शिखरे तर कधी नतमस्तक करणारी सर्वोच्च शिखरावरील मंदिरे. 
शांत, गूढ अश्या पुर्वाचीन अश्या लेण्या, त्यात कोरलेली आणी प्राचीन सुवर्ण युगाची आठवण करून देणारी भित्तीचित्रे. अश्या अनेक गोष्टींचा त्या क्षणाचा केवळ एक मूक साक्षीदार. टोटल सोलीट्युड. !!! 

असो. 
वरती जे काही खरडले आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिला डेमो झाला तो किल्ले शिवनेरी.
ठरल्याप्रमाणे काहीच प्लान न करता जाणे असल्याने त्यातल्या त्यात माणसाळलेले ठिकाण निवडले म्हणजे अगदीच हौस त्यात पडला पाऊस असे नको. फक्त मोबाईल आणी डबा, पाणी घेतले. सकाळी उठून घरी सांगितले. शिवाजीनगर जाऊन जुन्नर बस पकडली. यावेळी कॅमेरा पण नव्हता घेतला मुद्दामून. पण नंतर बरेच काही मिस केले असे वाटायला लागले म्हणून पुढच्या वेळेस कॅमेरा पण बरोबर. 

यावेळेस हडसर ला गेलो तेव्हाही असेच. सकाळी उठलो. डबा घेतला निघालो. डायरेक्ट हडसर गाव. तेथे उतरल्यावर एका मुलाबरोबर खुंटीच्या वाटेच्या खिंडीत आलो. वास्तविक किल्ल्याचा अभ्यास केला तेव्हा दोन वाटा माहिती होत्या त्या अतिशय सोप्या होत्या. ही खुंटीची वाट ऐनवेळी आल्यावर कळली. 
एकटाच आहात तर या वाटेने जाऊ नका असे सल्ले आले पण म्हंटले जाऊन तर बघू नाही जमले तर परत फिरू. 

त्यानंतर जे काही अनुभव आले ते म्हणजे केवळ थरारक. अविस्मरणीय !!

सकाळी काही न खाल्याने पोट गडबड झालेले. त्यातच ऊन लागल्याने डोके जर जड झाले. पायथ्याशी बसून गोड शिरा खून घेतले. थोडावेळ तरतरी आली पण परत चढाई चालू केल्यावर फार त्रास जाणवू लागला. सुमारे १ तास चढाई केल्यावर वाटले कि बास ! आहे इथून परत जाऊ. इथे चक्कर वैगरे आली तर मदत तर सोडाच कोणाला काही कळायलाही वाव नाही. पूर्ण निर्मनुष्य प्रदेश आणी तेथे मी एकटा. 
बरेच पाणी पिऊन अजून अर्धा तास चढाई केली. आता मात्र असह्य झाल्यावर एका दगडाच्या सावलीत बसलो. 

समोर पाहिले तर ४०-४५ फुटी कातळकडा. पुढे कोठेच वाट सापडेना म्हंटल्यावर तो कातळकडा निरखून पहिला आणी मग साक्षात्कार झाला कि हाच कडा आपल्याला एकट्याला चढून जायचे आहे. हीच ती खुंटीची वाट. उभ्या कातळात खुंट्या मारून हातानं पकडण्यासाठी सोय केलेली आहे. म्हणून खुंटीची वाट. 

फार अस्वस्थ वाटायला लागल्यावर परत निघायचा निर्णय घेतला. अजिबात चालवेना. थोडा गार वारा लागल्यावर मग एका पाठोपाठ एक ५ उलट्या झाल्या. मग मात्र थोडे बरे वाटू लागले. 

तब्बल अर्धा तास एकाच जागी बसून काढल्यावर मग बरे वाटायला लागले. मग मात्र रिस्क घेतली आणी चढाई चालू केली.

त्यावेळी मनात काय विचार चालले होते माहीत नाही पण आता विचार करता अंगावर काटा येतो. पूर्णतः निर्मनुष्य प्रदेश, जीवाच्या आकांताने आरोळ्या ठोकल्या तरी त्या ऐकायलाही कोणी नाही. अगदीच वाईट काही झाले तर ते कळण्याचाही काही स्कोप नाही. जेव्हा परत कधी कोणीतरी अशी हौस करायला येईल तेव्हा त्याला कळेल तोपर्यंत काहीच क्लू नाही. एकटाच असल्याने सर्व सामान घेऊन जावे लागणार होते. कडा चढताना सामानाने तोल जायचा संभव. अर्धा चढून गेल्यावर पुढे कितीही अवघड असला तरी परत मागे फिरणे शक्य नाही आणी पुढात अजून काय वाढून ठेवले असेल याचाही अंदाज नाही. टोटल रिस्क !!

चढाई चालू केली. बूट घालून चढता येत नव्हते म्हणून बूट काढले. पण आता ते ठेवायचे कुठे असा प्रश्न आला. कॅमेरा bag पण होती.चढाई करताना फोटो काढायची पण खाज होती. 

मग, पाठीला sack, डाव्या हातात मानेवरून कॅमेरा bag, उजव्या हातातून मानेला कॅमेरा लटकवला. शूज चा अजून हिशोब लागत नव्हता मग त्यांची लेस सोडून, मोठी करून दंडाला शूज बांधले. T-shirt चे हात छोटे केले आणी अश्या अवतारात चढाई चालू. निव्वळ थ्रिल. 

हि उगाच हौस करताना काढलेले काही फोटो. त्यात फ्रेम वैगरे काहीच दिसणार नाही. ते कसे, कश्या परिस्थितीत आणी किती बावळटपणा करून काढलेले आहेत त्याची तुम्हाला कल्पना येईलच. :)


जवळपास ७०% चढाई करून, एक हलणारी, खिळखिळी झालेली हाताने खुंटी पकडून, दंडाला बांधलेले जोडे सांभाळत, कड्याला लगटून चढाई करतानाही, पोट आणी कडा यामधील जुजबी अंतर भरून काढणारी कॅमेरा bag दोन्ही हात बिझी असल्याने हिसका देऊन दूर सरकवत, उजव्या बाजूने थोडे काह्ली डोकावत कॅमेरा पकडला आणी ४-५ खटाखट क्लिक मारले. त्यातही पहिल्यांदी क्लिकच होईनात म्हणून बघितले तर कॅमेरा Manual मोडला ठेवलेला. मग स्वतालाच शिव्या देत दातांनी मोड चेंज केला. 
एवढे उपद्याप. का? तर माहीत नाही. उगाच हौस. 

Great thrill but total risk !! केवळ थरारक अनुभव !! अविस्मरणीय !!

खाली एका दगडावर पांढरा बाण दिसतोय तो बेस होता.
याचसाठी केला होता अट्टाहास !!

वरून खाली पाहिले मग मात्र भीती वाटायला लागली. येथून खाली उतरणे तर अज्जीबातच शक्य नव्हते. सो तो विचारच सोडून दिला. गणपतीचे नाव घेत पुढे चढत गेलो आणी नशिबाने सुस्थितीत वरती पोहोचलो.

 हा पुढचा टप्पा होता. हा तुलनेने सोपा होता. इथे पाय ठेवायला खाचा केलेल्या होत्या. खुंट्याही मोठ्या आणि चांगल्या स्थितीत आहेत.

 शेवटच्या टप्प्यात जरा जीवात जीव आला. सुखरूप पुढे पोहोचू शकू असा आत्मविश्वास आला. मग जरा डोकेही चालायला लागले. सामान जर कोंबून कोंबून शिफ्ट केले. अर्धा लिटर पाणी पिउन घेतले आणी जीवाची शांती करून घेतली. माणसात आल्यावर राहिलेले थोडे चढून किल्ल्याच्या मार्गी लागलो. 

असो. Lifetime Experiance होता. सोलीट्युड वैगरे बळच हौस होती ती शमली. आता पुढचे दोन आठवडे गप घरी. 
अश्या गोष्टीही आपण कधी करणार? असा विचार करून सोलो क्लायंबिंगची मजा अनुभवली. एकट्याने अश्या प्रसंगात डोके शांत ठेऊन निर्णय घेणे किती महत्वाचे असते हे कळले. 

किल्ल्यावर १-२ साप दिसल्यावर एकट्यानेच वाळलेल्या गवतातून जाताना मनात असलेली प्रचंड भीती आणी त्यात वाट सापडत नसल्याने हेल्पलेस कंडीशन आणी देवाचा धावा. न सापडणारी वाट सापडल्यावर झालेला आनंद, किल्ल्याचे दुर्गवैभव पाहून निवलेले डोळे,महादेवाच्या मंदिराच्या समोरच गरुडरूपातील हनुमान.वाळलेल्या गवतातून जाणवणारी सळसळ, किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाला एकट्यानेच बसून केलेली टेहळणी, अश्या जन्नत ठिकाणी डबा उघडला असता गोड शिरा आणी लोणचे. अहाहा !! सगळेच शब्दातीत. 

असा बावळटपणा कधीतरी करायला काय हरकत आहे? मनाने तुम्ही अजून तरुण व्हाल हे मात्र नक्की !!


जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट 

असो. लोभ असू द्या.
वाचत राहा! भेटत राहा !!

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

काही असेच भेटलेले...

काही असेच भेटलेले … मनात घर करून गेलेले 

त्यांचे वय वेगळे …  अनुभव वेगळे ….
त्यांच्या कहाण्या वेगळ्या…  त्यांचे जग वेगळे …
मिळालेल्या आयुष्याचे आनंदात राहून सोने करायचे शिकवण देऊन गेले. 
पण शिकवणच फक्त !!
सुखाच्या शोधात निघालेल्या आमच्या नजरांना कसले आनंद? कसले सोने?
 राहून राहून ते एकच वाक्य पटते,
पूर्वीसारखा माझा चेहरा टवटवीत दाखवणारे आरसे फारसे मिळत नाहीत सध्या !!
--------------------------------------------------------------------------------------------------
"मनात घर, सुखाच्या शोधार्थ निघालेल्या नजरा" वैगरे वैगरे …असे काही लिहिले कि उगाचच एखादा अलौकिक अनुभव घेतल्याचे फिलिंग येते. म्हणून उगाच खरडपट्टी !  हेडिंग हा जर "मथळा" मानला तर वरचे अतर्क्य लॉजिक "कोथळा" मानता येईल. असो.
खरा उद्देश खाली डकवलेले फोटो खपवणे हा असून नुसते फोटो पाहणार्यांना मनस्ताप होईल याची काळजी घेण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी ……… काहीच वाचायची गरज नाहीये. :) 
--------------------------------------------------------------------------------------------------
















मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला

पूर्व लेख: 
3. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.

हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला
अंजनेरी येथील पुरातन मंदिरे बघून आता आम्ही गावात चौकश्या चालू केल्या. ऑफ-कोर्स हरीहरला जाण्याच्या.हरीहर किल्ल्याला कसे जायचे? अनेक मतप्रवाह ऐकायला मिळाले. काही म्हणाले की, त्रंबक ला जा तिथे राहा आणि सकाळी बस पकडा तर काहींचे म्हणणे होते की पेगलवाडी फाटा , घोटी रोडला उतरा तेथून खच गाड्या आहेत त्या पकडून हरीहरला जा आणि तेथेच राहा. काही म्हणाले, "रावा कि आमच्या गावात! मंदिरात झोपा अन हाटेलात या जेवायला.". एकाचे तर आम्ही हरीहर किल्ल्याला जाऊच नये असे जहाल मत होते. "काय बघायचीत ती डोंगर अन दगडे!" असो. 

यस्टी पकडून आम्ही उतरलो पेगलवाडी फाटा! तेथे राहायची काही सोय नाही हे ऐकून भरून पावलो. नंतर मग  गोग्गोड बोलून एका आश्रमात राहायची सोय केली. पण मग पोटाचे काय? फाट्या वरच्या एका अलिशान हाटेलात गेलो तर फक्त चहा होता. जवळपास ४०-५० ट्युबा जाळून बिचारा फक्त चहा विकत होता. खानदानी चहावाला असावा आणी व्यवसायाशी इमानी असावा. :)  असो. 
मग दुसरी यस्टी पकडून त्रंबक. तेथे समर्थ मठात ४० रु मध्ये भरपेट जैन घरघुती जेवण करून परत आश्रमात आलो. बेक्कार तंगडतोड झाल्याने मस्त झोप लागली. 

सकाळी उठून फाट्यावरून जीप पकडली ती डायरेक्ट निरगुडफाटा. जेथे जीप सोडून गेली त्या पाड्यात भात तोडणी ची कामे चालली होती. मोजून १५-२० घरे होती आणी एक शाळा.
जीप सोडून गेल्यावर एक साक्षात्कार झाला. तो असा की वळकटी केलेले पांघरूण जीप मध्येच राहिल्याने निरगुड पाडा पर्यंत पोहोचले आहे. मग गावात जीपवाला ओळखीचा असल्याने परत तो आणून देईल तर घेण्यासाठी सेटिंग लावले आणी मग काय … मिशन हरीहर !!
पायथ्यापासूनचे पहिले दर्शन.




मोजके सामान बरोबर घेतले बाकी गावात ठेवले. सुमारे एक तासात खिंडीत का पठारावर आलो. आता किल्ला दृष्टीक्षेपात येऊ लागला होता.

किल्ला, आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवागार शालू नेसून आणी त्यावर जांभळ्या फुलांची झालर चढवून तयार होते. जास्त उन नसल्याने स्वछ वातावरण होते. पूर्ण निर्मनुष्य परिसर. पिनड्रोप सायलेन्स!

आजूबाजूचे डोंगर रवळ्या जावळ्या ची आठवण करून देत होते.
थोडे चाललो आणी मग जे पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते ते प्रत्यक्षात आले.
याचीसाठी केला होता अट्टाहास!! आजचा दिवस पावन झाला !!



येथे अजून एक हौशी ग्रुप आम्हाला जॉईन झाला.
हरीहर किल्ल्यावर जायचा प्लान केला तोच मुळी हरीहर किल्ल्याच्या एका अखंड कातळात ७० अंश कोनामध्ये असलेल्या खोदीव पायऱ्या बघूनच. नुसता फोटो पाहूनच आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते.  

प्रत्येक पायरीला वरच्या कातळात आधारासाठी बोटाने पकडायला खाचा केलेल्या आहेत. या पायऱ्या चढण्याचे आणी मुख्यतः पावसाळ्यात उतरण्याचे थ्रिल काही औरच आहे. 


बरीच भंकस करत २-३ तासात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर सपाट पठार लागले. लगेचच समोर हनुमान मंदीर आले. किल्ला म्हंटला की हनुमानाचे मंदिर हे हवेच.
 
सोबतच हे काका भेटले. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. बरीच किल्ल्याविषयीची रहस्ये कळली. त्यांची पर्सनल लाईफ त्यांनी सांगितली. खरेतर त्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. जे काही ते जगलेत आजपर्यंत ते केवळ आणी केवळ भक्ती. रामाचा अद्वितीय भक्त हनुमानाच्या साक्षीने, या आजच्या काळात राहूनही आणी बायको मुले असूनही, संन्यास घेतलेल्या या भक्ताचा त्याच्या गुरुसाठी तीळ तीळ तुटणारा जीव पाहून खरेच काय प्रतिक्रिया द्यावी कळेनासे झाले.
काका, तुम्ही परत कधी भेटाल माहीत नाही, पण जर कधी भेटलात तर थोडासा दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकवाल मला. सलाम तुम्हाला !!

येथून दिसणारे नजारे डोळ्यात साठवत भटकंती चालू झाली. पठारावर दोन मंदिरे, मोठा तलाव आणी आजूबाजूची डोंगरशिल्पे! बास अजून काय हवंय?



ब्रम्हगिरी पर्वत समोरच उभा ठाकलेला दिसत होता.
मग थोडा बळच क्लिक्लीकाट केला.
हौशी लोक तलावात पोहायला उतरली होती. मस्त थंडगार पाणी होते. आमच्या पत्रिकेत मोठ्या टायपात लिहिलेले "पाण्यापासून भीती' अशी अक्षरे दिसू लागल्याने आम्ही मोह आवरला. :) म्हंटले उगाच रिस्क नको, अजून लग्न करायचे बाकी आहे !! :)


कसलेतरी मंदिर होते. आत गेलो पण कळले नाही.

थोडा वेळ भटकून परतीची वाट धरली. एका ठिकाणी जवळ होते ते खाऊन घेतले. मस्त गाणी म्हणत, ओले गावात तुडवत चालत होतो. जसे काही आमच्याच बापाचा किल्ला आहे. 
तेवढ्यात एका झर्यापाशी सळसळ आवाज आला. बघतो तर काय? भलामोठा घोणस!
गप लैनीत आलो आणी पळत सुटलो !!


तेवढ्यात भूषणने पॉवर सेल्स म्हणजे काकड्या काढल्या. मस्त साली काढून तिखट मीठ लाऊन !! सोललेल्या काकडीच्या सालेने भीमाशंकरचा ट्रेक आठवला. उन्हाने डी-हायड्रेशन होऊन मरणप्राय अवस्थेत त्या काकडीच्या सालींनी आम्हाला जीवदान दिले होते.
५-३-२ आठवले का ?


जवळजवळ १०००+ फोटो झालेच होते. सध्या "दाखवायच्या फोटों"चा क्रंच असल्याने अनेक निष्फळ प्रयत्न झाले. मग एक ग्रुप फोटो झालाची पाहिजे.



संध्याकाळ ४ च्या सुमारास परत गावात उतरलो. गाववाल्यांनी माझे विसरलेले समान घेऊन ठेवलेच होते. त्यांना अनेक धन्यवाद दिले. ज्या घरात समान ठेवले होते तेथे राहिलेले पण न फोडलेले बिस्कीट पुडे दिले. गनबोटेचा मक्याचा चिवडा म्हणजे जीव की प्राण !! तोही दिला. बरीच लहान मुले जमली त्यांनी मस्त स्माईल देऊन आम्हाला निरोप दिला.


मुंबईकर खोडाळा मार्गे गेले तर पुणेकर ५ ची शेवटची यस्टी पकडून नाशिक ला गेले. नाशिक स्थानकाजवळ पोहोचताच "अतिथी" आणी त्यांचा खास म्हैसूर मसाला डोसा मनसोक्त खाल्ला. मग डायरेक्ट घरी.

२ दिवस कसे गेले कळलेच नाही. कांदेपोहे कार्यक्रमात ब्रेक पाहिजेच होता. मस्त रिफ्रेश झालो. २ दिवसात अंजनेरी त्रंबक हरीहर फिरून झाले. थोडे घाई केली असती तर ब्रह्मगिरी पण झाला असता पण जाऊदे! नेक्स्ट टाइम!

डोळ्यात मात्र एकाच नजारा होता पुढचा आठवडाभर !! हरीहर !! केवळ कमाल !!
 

हरीहर करताना वाटेत एक ग्रुप आम्हाला भेटला. हौशी कलाकार होते सगळे. त्यांची बरीच कलाकुसर चालली होती. एकाने मला फोटो काढताना विचारले की तुला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतंय!! मग अनेक गेसेस झाल्यावर तो म्हणाला प्रत्यक्ष नसेल पाहिले, ब्लॉग वा मायबोली असे कुठे लिहितो का? मग आयतीच आलेली ब्लॉगची जाहिरात करायची संधी मीही सोडली नाही.

३-४ दिवस एका लेखासाठी इनवेस्ट करून, फोटो सिलेक्शन, एडिटिंग अशी सव्यापसव्ये करून , BSNL चे  इंटरनेट वापरताना कमालीचा पेशन्स बाळगून हा एवढा लेखनप्रपंच करून, कोणीतरी आपला ब्लॉग (नाईलाजाने का होईना पण) वाचतो आहे हे ऐकून खरोखर आनंद झाला. त्याची अशी पावती मिळालेली बघून हर्षेगडावर हर्ष तर झालाच पण आणखी फिरत राहून त्यावर खरडण्याचा माझा उत्साहही  वाढला.

असो तर मग,
वाचत राहा ! अभिप्राय कळवत राहा !