रविवार, ९ जानेवारी, २०२२

शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी

 रविवारची भटकंती - शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी

सोळाशे शतकातला काळ असावा. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची सुवर्ण घडी जवळ आलेली. मुरुंबदेवाच्या डोंगरावर आनंदी आनंद पसरलेला. तांबडफुटीच्या "सुवेळी" महाराजांनी "सुवेळा" माचीवरून नारायणाच्या उदयाचा सोहोळा बघून संजीवनी माचीकडे प्रस्थान ठेवले असेल.मोहिमेस निघण्यापूर्वी आपल्या आद्य गुरूंचे दर्शन घ्यायचे म्हणजे सुंदर मठासी जाणे प्राप्त. श्री समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनार्थ अळू दरवाज्यातून भुतोंड्याकडे उतरून शिवथर घळीकडे प्रयाण केले असेल. वाटेत येणारी बेळवंडी नदी आणि कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाटाच्या खिंडीतून उतरून शिवथरघळी जलप्रपातातील पवित्र पाणी घेऊन समर्थांच्या चरणी अर्पण केले असेल. "जय जय रघुवीर समर्थ" चा निनाद अवघ्या जावळीत दणाणला असेल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

गोप्या घाटाची चढाई करताना घामाच्या धारांबरोबर हा असा कल्पनाविलास मनातल्या मनात रंगत होता. आज आपण चाललो आहोत त्या मार्गाने कधीकाळी महाराजांनी, समर्थांनी आणि स्वराज्याच्या अनेक लढवय्यांनी अनेक वेळा येणे जाणे केले असेल या विचारानेच स्फूर्ती येत होती. इथल्या दऱ्याखोऱ्यात "जय जय रघुवीर समर्थ" चा नाद अनेक वेळा घुमला असेल. बहिर्जी नाईकांचे गुप्तहेर खाते रात्रंदिनी या घाटवाटांनी स्वराज्याच्या गडकिल्ल्यावर लक्ष ठेऊन असतील. अश्या या ऐतिहासिक वाटा आपणच जागत्या ठेवल्या पाहिजेत. दगडाशी ईमान राखले तरच दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील.

असो, तर मागच्या रविवारी भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी अशी बारा तासांची, तीन घाटवाटांची ३५ किलोमीटर्सची तुफान तंगडतोड झाल्यामुळे आज जरा बेताचा ट्रेक पाहून मंडळी आनंदाने पहाटे उठून जमलेली. पुण्यनगरीतून साडेचारला पहाटे प्रस्थान ठेऊन वरंधा घाटात कावळ्या किल्ल्याच्या जोडीने थोडीशी पेटपूजा झाली. शिवथरघळीत पोहोचलो तेव्हा गुहेत कोणीही नव्हते. चारशे पाचशे वर्षांपूर्वी समर्थानी हि जागा कशी काय शोधली असेल याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. "धबाबा तोय आदळे" या वाक्याची प्रचिती आजही येते.

आंबे शिवथर गावातून ट्रेक चालू झाला. अग्निशिखा प्रजातीच्या फुलांनी सुरवातीलाच स्वागत केले. या फुलांना बाहेर आला कि अख्खे रान पेटल्यासारखे वाटते. जमिनीवर सुरु झालेली मुंगळ्यांची लगबग पाहून पाऊस पडणार असे वाटून गेले. सह्याद्रीतल्या या गमतीजमती कोणी अनुभवी माणूस बरोबर असल्याशिवाय कळणे अवघड. रमतगमत सुमारे तासाभरात माचीवर येऊन पोहोचलो. येथून समोर डोंगरच्या कपारीत घाटाची खिंड दिसत होती. उजवीकडे सुपेनाळ तर डावीकडे आंबेनळी, उपांड्या घाट डोंगररांगेत लपून बसलेले. भूस्खलन झाल्याने बरीचशी वाट मोडलेली. आज माचीवरची विहीर त्यामुळे गायब झालीये. वाटेच्या शोधार्थ थोडफार भरकटलो तोच रानात जनावरांना घेऊन आलेल्या एका आज्जीनी पुढची वाट दाखवली. खड्या चढाईला येथून सुरवात झाली. सर्वांगाला घामाचा अभिषेक जाहला. याचे निमित्त साधून लिंबू पाणी, ताक, इलेक्ट्रॉल, चिक्की इत्यादी पदार्थानी पाठपिशवीतुन पोटात बदली करून घेतली. सुमारे अडीच तासांच्या चढाईनंतर गोप्या घाटाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर एक कोरीव पाण्याचे टाकं आणि वीरगळ आहे. त्या अज्ञात शूराला वंदन करून त्यासमोरच आमच्या पथाऱ्या पसरल्या.

नुकतीच दिवाळी झाल्यामुळे मंडळींनी चकली चिवडा लाडू फराळाच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. भरल्या पोटाने आता पुढची वाटचाल सुरु झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव बोपे डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे भोर तालुक्यातील सांगवी गावाची वाट धरली. मागे लांबवर तोरणा दिसत होता. छोट्या छोट्या टेकड्या पार करत सांगवी पर्यंत दीड एक तासाचे पायपीट झाली. जोडीला काठोकाठ भरलेले भाटघर धरणाचे पाणी. पाण्यात चार पाच डुबक्या मारल्यावर जीवाची शांती झाली.

संपूर्ण ट्रेक मध्ये निर्मनुष्य अश्या जंगलातून भटकताना खासकरून गोप्याघाट ते सांगवी या कसल्याही आधुनिकतेचा मागमूस नसलेल्या प्रदेशातून जाताना समर्थांच्या खालील पंक्ती आजही खऱ्या ठरतात!

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥

वरंधा घाटातली सकाळची पेटपूजा


समर्थांच्या गुहेत डोंगरदेव

अग्निशिखा फुलांना आलेला बहर

सुपे नाळ

दुपारचं झोपूनही देत नाहीत हि लोक! पूर्वीच पुणे राहिलं नाही छ्या !

थम्सअप डोंगर

गोप्या घाटाची चढाई चालू

गोप्या घाटाच्या माथ्याशी लागलेली घनदाट झाडी.

घाटमाथा

घाटमाथ्यवरील पाण्याचे टाके. हे पाणी निःश्चिन्त होऊन प्या. आजारी पडलात तर मी स्वतः डॉक्टरकडे घेऊन जाईन असे समूहाच्या नेत्याने सांगितले. २००% ऑक्सिजन.

माथ्यवरून सावळ गावाकडे वाटचाल.

भाटघर धरणाचे पाणी. येथे मस्त अंघोळ झाली.

वाचत रहा!

सागर

शनिवार, १ जानेवारी, २०२२

२०२१ वर्षातील भटकंती

 २०२१ वर्षातील भटकंती 

जानेवारी - 

ढवळे ते मढीमहल / आर्थरसीट पॉईंट 

अलंग मदन कुलंग 

 

फेब्रुवारी - 

किल्ले रतनगड - सांदण दरी 

कळसुबाई - सर्वतीर्थ टाकेद - किल्ले विश्रामगड - औंढा - आडगड - डुबेरगड - गोंदेश्वर 

धामणओहोळ - देवघाट - कुर्डूगड - निसणीची वाट 

 

मार्च - 

नेकलेस पॉईंट , मुलखेड 

 

जून - 

किल्ले मोरगिरी - श्री वाघेश्वर 

तळपेवाडी - बैलघाट - कोथळीगड - कौल्याची धार - तळपेवाडी 

 

जुलै - 

नसरापूर - माळेगाव ते कुसगाव 

 

ऑगस्ट -

पिंपरी - अंधारबन - हिर्डी - घुटके

           ढेपे वाडा , वाळेन धबधबा  

मढे घाट 

 

सप्टेंबर - 

धामणओहोळ - लिंग्या घाट - कुर्डूगड - निसणीची वाट 

ठोसेघर - कास पठार - जुंगटी  

आंबेवाडी - उंबरवाडी - हाश्याची पट्टी - माथेरान - जुमापट्टी - नेरळ 

 

ऑक्टोबर - 

कुडाळ - मेरुलिंग - मेढा - महाबळेश्वर

नेकलेस पॉईंट , मुलखेड  

ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे ( मुठा , मोसे, आंबी नद्यांचे खोरे ) 

अवसरी खुर्द - किल्ले हडसर 

राजगड ते तोरणा रेंज ट्रेक 

 

नोव्हेंबर - 

भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी 

शिवथरघळ - गोप्या घाट - सांगवी 

कुंडलिका व्हॅली - सावळघाट 

कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग कोस्टल रोड ट्रिप 

पुणे - खानापूर - दांडेली - अंकोला - गोकर्ण - मिरजन किल्ला - याना केव्ह्स - मुरुडेश्वर - कारवार - खोलगड - म्हापसा - पारा - तेरेखोल किल्ला - रेडीचा यशवंतगड - निवती किल्ला - सिंधुदुर्ग - कुणकेश्वर - देवगड किल्ला - श्री क्षेत्र विमलेश्वर - श्री क्षेत्र रामेश्वर - विजयदुर्ग किल्ला - गगनगिरी किल्ला / मठ - पुणे 

किल्ले कांचन मंचन , चंद्रेश्वर किल्ला नाशिक       

 

     

डिसेंबर - 

वैशाखरे - नाणेघाट - घाटघर - जीवधन किल्ला - नाणेघाट 

समरभूमी उंबरखिंड - चावणी - कुरवंडे घाट - नागफणी - खंडाळा 

घोल - रडतोंडीची वाट - वाघजाई घाट - बडदे माची - बोरमाची - तेल्याची नाळ - घोल 

किल्ले कल्याणगड , जरंडेश्वर , कुडाळ , किकलीचे हेमांडपंथी भैरवनाथ मंदिर 

किल्ले कावनई 

किल्ले मोरधन

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

किल्ले कांचन - मंचन - कांचन सुळका प्रस्तरारोहण - किल्ले चंद्रेश्वर

कांचन सुळका प्रस्तरारोहण - किल्ले चंद्रेश्वर


दिवस १ : किल्ले कांचना आणि कांचन सुळका प्रस्तरारोहण
दिवस २ : चांदवडचा किल्ला, इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि चंद्रेश्वर मंदिर.



मागचा पूर्ण आठवडा सुट्टी मिळाल्याने कर्नाटक ते सिंधुदुर्ग किनारी भागाची १६०० किमी.ची भटकंती झाली. गुरुवारी परत आल्यानंतर उरलेले तीन दिवसही सत्कारणी लागावे म्हणून नाशिकला जायचा बेत केला. अजिंठा सातमाळ रांगेतले कांचन आणि कोळधेर हे दोनच किल्ले राहिले होते त्यामुळे कांचन करून चांदवड मार्गे कोळधेर जायचा प्लॅन असलेला एका संस्थेच्या कार्यक्रमात सामील झालो. मुख्य आकर्षण होते ते १५० फुटी कांचन सुळक्याचे प्रस्तरारोहण करण्याचे. या क्षेत्रात कधी अनुभव नसल्याने सुरक्षिततेचे उपाय योजून प्रस्तरारोहण (Rock climbing) व अवरोहण (rappelling) करायला मस्त मजा आली.

शनिवारी तांबडफुटीची वेळ कांचनबारीत पोहोचलो. १७ ऑक्टोबर १६७० चा इतिहास असा डोळ्यासमोर तरळून गेला.
आज आत्ता आपण उभे आहोत त्या ठिकाणी साडेचारशे वर्षांपूर्वी सुरतेची लूट घेऊन येणाऱ्या मराठ्यांची मुघल सरदारांशी सुमारे पाच हजार सैन्य ताकदीने लढाई झालेली. महाराज स्वतः त्यांच्या रणधुरंधर सहकाऱ्यांसमवेत लढाईस उभे. दाऊदखानाचा सैन्याची धूळधाण उडालेली. उभे असलेल्या कांचनबारी मधून परास्त सैन्य सैरावैरा धावतय.... सगळे काही कल्पित असे डोळ्यासमोर येऊन गेले.
चढाई चालू केली पण सर्व वाट मोडल्याने कांचन किल्ल्यावर पोहोचायला मोठी कसरत झाली. मुघलांशी लढताना सह्याद्रीच्या गवताच्या पात्याचे भाले झाले असे ऐकलेले त्याचा आज याची देही याची डोळा अनुभव आला. गवताची कुसळ कपडे बुटांमध्ये शिरून सुई सारखे टोचत होते. त्याच्याशी लढत मंचन माथ्यावर पोहोचलो. कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याची टाकी, उध्वस्त प्रवेशद्वाराचे अवशेष बघून कांचन च्या दुसऱ्या टप्प्यात आलो. कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती आणि दगडांच्या आकाराने बनलेला गणपती पाहून कांचन सुळक्याचे दिशेने चढाई चालू झाली. अंगावर येणारा चढ चढून कोरीव पण तुटलेल्या पायऱ्यांनी सुळक्यापर्यंत पोहोचलो. आता वेळ होती सुळक्याला भिडायची. गणेशाचे स्मरण करून एक शिलेदार फ्री क्लाईम करून वर पोहोचला आणि सुळक्याच्या माथ्यावरून "जय भवानी जय शिवाजी" घोषणा आसमंतात दुमदुमल्या.

कांचन किल्ल्यावर .. मागे कांचना सुळका

कांचन सुळका प्रस्तरारोहण चालू.

चढाई करताना अस्मादिक


जमतंय... जमतंय ...

बाकीची मंडळी योग्य ती काळजी घेऊन चढाई करून पोहोचली तेव्हा दुपारचे तीन वाजत आलेले. आरोहण करताना मनगटातली खरी ताकद कळाली. चहूबाजूला अजंठा सातमाळ डोंगर रांगांचा हा गगनचुंबी, अजस्त्र, राकट, बेलाग असा पसारा. पश्चिमेकडे ओळीने हंड्या, विखारा सुळका, त्यामागे या रांगेतला सर्वात उंच किल्ला धोडप, त्यामागे रवळ्या -जावळ्या, मार्केंडेय तर पूर्वेकडे कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड आसमंताशी स्पर्धा करत उभे ठाकलेले.डोळ्यात साठवून ठेवावा असा अफलातून नजारा.

हंड्या, विखारा सुळका, त्यामागे या रांगेतला सर्वात उंच किल्ला धोडप, त्यामागे रवळ्या -जावळ्या, मार्केंडेय

विखारा सुळका आणि किल्ला धोडप

                                                    कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड रेंज

कांचना सुळका उतरून उर्वरित किल्ला पाहून निघण्यास सूर्यास्त झाला आणि संधीप्रकाशात उतराई चालू झाली. ज्या वाटेने चढून आलो त्या वाटेचे दिव्य बघून तेथून उतरणे शक्यच नव्हते म्हणून कांचन सुळक्याला प्रदक्षिणा मारून दुसऱ्या वाटेने निघालो. वीस मिनिटात अंधाराने गाठले तेव्हा माचीसुद्धा उतरले नव्हतो. आता चालू झाली दुहेरी लढाई. एक अंधारातून विजेरीने मोडलेली वाट शोधण्याची आणि दुसरी गवताचा भाल्यासारख्या कुसळांशी. महत्प्रयासाने कांचना गावाच्या समोरील खिंडीत आलो तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. येथून वाट सापडेना. विजेरीने गावाच्या दिशेने प्रकाश टाकला तसा गावातून प्रकाश आमच्यापर्यंत आला. कोणीतरी किल्ल्यावर वाट शोधतंय हे गावात कळल्याने काही लोक बॅटरी घेऊन आमच्या दिशेने वरती चढून आले. देवासारख्या धावलेल्या त्या माहात्म्यांना अनेक धन्यवाद देऊन गावात पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आलेले. पोटोबा करून टेन्ट लावून झोपून घेतले.

प्रस्तरारोहण व रात्रीच्या सुटकेचा विलक्षण अनुभव गाठीशी जोडून आजचा दिवस संपला.

कांचन सुळका


                                                                    कांचन सुळक्यावर

नयनरम्य नजारा

सूर्यास्त

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी


भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी


सकाळी सात ते सात - बारा तासांची, तीन घाटवाटांची ३५ किलोमीटर्सची तुफान तंगडतोड!



२०१३ साली काहीही तयारी न करता, भर एप्रिल मध्ये "खांडस मार्गे भीमाशंकर" ट्रेक केला होता तेव्हा झालेले हाल बघून आयुष्यात परत इथे येणार नाही असे ठरवले होते. आज सात वर्षांनी त्यापेक्षा तिप्पट तंगडतोड करण्याचा योग आला. तेव्हाही जीवाचे बारा वाजलेले आणि आजही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. 😁😁

असो तर आजचा बेत होता आपल्या शरीराची क्षमता तपासण्याचा. कितीही फिटनेस असला तरी सह्याद्री माथ्या पुढे नतमस्तक होण्याचा, भीमाशंकरच्या निर्मनुष्य जंगलात अनवट वाटा भटकत अखंड १२ तास पायपीट करण्याचा.

हिवाळ्यात लोक भोरगिरी ते भीमाशंकर, खांडस -शिडीची वाट - भीमाशंकर, खांडस गणपती घाट -भीमाशंकर, पदरगड असे वेगवेगळे ट्रेक करतात. आम्ही यावेळी भोरगिरी - भीमाशंकर - शिडी घाट - पदरवाडी - काठेवाडी - गणेश घाट - पदरगड - पेढ्याचा घाट - भोरगिरी अशी सुमारे ३५ ते ४० किलोमीटर्सची लांब पल्ल्याची वाट ठरवून तीन घाटवाटा आणि किल्ला पदरात पाडून घेतला. अर्थात ते करताना पाय हातात यायचे बाकी होते हा भाग अलहिदा.

पहाटे चार वाजता पुण्याहून निघून सात वाजता मंडळी भोरगिरीला पोहोचली. ६३ वर्षाचे आणि वनविभागातील नोकरीतील सुमारे २५ वर्षे भीमाशंकरच्या जंगलात वनरक्षक म्हणून काम केलेले सुपे काका आज आम्हाला वाट दाखवायला येणार होते. सुरवातीलाच त्यांनी "अंदाजे ३५ ते ४० किमी होईल, तयारी असेल तर चला" असे "समजावून" सांगितल्यावर सकाळी सकाळी न चालताच घाम फुटला. गणपती बाप्पाचे नाव घेऊन चालायला चालू केले. दिड तासात भीमाशंकर गाठून पुढे शिडीची वाट उतरायला घेतली.

भोरगिरी गावामधील सकाळ

काकांनी ३५ किलोमीटर्सची "समज" दिल्यावर ट्रेक चालू झाला.

कोकण पट्टा आता दृष्टीक्षेपात येत होता. सुरवातीलाच सिद्धगडाने स्वागत केले. पुढे थोडीशी पेटपूजा करून वाटेतल्या शिड्यांपर्यंत पोहोचलो. समोरच ढगांशी स्पर्धा करत पदरगड दिसू लागला. त्यामागे कोथळीगडाने दर्शन दिले. कोथळीगडाच्या डाव्या हाताला कौल्याची धार आणि वांद्रे माथ्यावरच्या एका लयीत डुलणाऱ्या पवनचक्क्या पुसटश्या दिसू लागल्या. त्याही मागचा बैलघाट डोळ्यांना तर दिसत होता पण कॅमेराची काही पोहोच नव्हती. खाली माचीवर पदरवाडीतील पाच-पंधरा घरे आणि त्यापुढे काठेवाडी, बैलपाडा , खांडस गावे ओळखू येऊ लागली.

पदरगड आणि त्यामागे कोथळीगड

अवघड ठिकाणी बसवलेल्या दोन शिड्या उतरलो. शिडी उतरायचा थरार संपला तसे पाय जड होऊ लागले. एव्हाना सूर्यनारायण डोईवर येऊन ठेपलेले. लिंबू पाणी, ताक, इलेक्ट्रॉल, चिक्की इत्यादी पदार्थानी पाठपिशवीतुन पोटात बदली करून घेतली. उसन्या तरतरीने कशीबशी काठेवाडी गाठली. वेळ रामराया जन्मला ती भर बाराची.
शिडी घाटाने कोकणात उतरताना


वाटेतील तीन शिड्या

आत्तापर्यंत सगळी उतरणचं होती त्यातच जीव अर्धा झालेला. आता आलो तेवढे सगळे अंतर चढाई करायची होती. तीन टप्प्यातील चढाई. कर्जत मार्गे जावे का असा एक विचार मनात आला पण होईल ते बघू म्हणत गणपती घाटाची वाट धरली. आता तीव्र चढाई चालू झाली. छातीचा भाता फुलला होता. सर्वांगाला घामाच्या धारांनी अभिषेक होत होता. ऊर धपापत कसेबसे गणपती मंदिरात येऊन पोहोचलो. घामाघूम झालेली मंडळीनी गणरायाच्या समोरचं लोटांगणे घातली. अर्धा तास शवासन केल्यानंतर पोटात काहीतरी भरून बॅग हलक्या केल्या पाहिजेत हा साक्षात्कार जाहला. जेवणे आणि थोडीशी विश्रांती झाली. एवढ्या दुर्गम ठिकाणी विराजमान बाप्पाला वंदन करून पदरगडाची वाट धरली.

पहिला चढ चालून पदरगडाच्या पठारावर पोहोचलो. किल्ल्याला वळसा घालून विहिरीपाशी पोहोचलो. येथून शिडी घाट स्पष्ट दिसत होता. आपण कुठून कुठे आलो याचा विचार करत बाटलीभर पाणी डोक्यावर ओतून जीवाची शांती करून घेतली. विहिरीपासून आता गणेश घाट सोडून पेढ्याची वाट पकडली. समोरच दिसणाऱ्या खिंडीतून, कारवीच्या गचपणातून दुसऱ्या टप्प्याची चढाई चालू झाली.

गणेश घाटाने पदरगडाच्या माचीवर पोहोचलो.

फोटोच्या डावीकडेची खाच दिसतीये ती आहे पदरगडावरून भोरगिरी जाणारी "पेढ्याची वाट "

इथे ७० अंशातल्या चढाईने प्रत्येक पावलागणिक भगवंताचे स्मरण होत होते. उन्हे मावळतीकडे कलू लागलेली. तीन वाजत आले तरी पेढ्याच्या वाटेला लागलो नव्हतो. आता जर पावले झपाझप उचलली नाहीत तर पेढ्याच्या वाटेने भोरगिरीत उतरायला अंधार होईल असे काकांनी वारंवार सांगूनही शरीर ढकलणे शक्य नव्हते. एकमेकांना आधार देत पेढ्याच्या वाटेच्या माथ्यावर एकदाचे पोहोचलो तेव्हा साडे चार वाजलेले. आसमंतात आता केशरी झालर उमटू लागलेली. समोर सोनेरी मुकुट धारण केलेल्या सह्याद्रीच्या रौद्रभीषण कड्यांचा शब्दातीत असा नजारा. पदरगडाचे कधीही न पाहिलेले रूप डोळे भरून पाहून घेतले. आंबेनळी घाट आणी त्याखाली राजपे गाव पाहून ही घाटवाट राहिलीये याची आठवण झाली.

पेढ्याच्या घाटमाथ्यावरून पदरगडाचे दिसणारे आगळे वेगळे रूप.

सूर्यास्त होत आला तरी हि मंडळी हालत-डुलत चाललीयेत म्हणून त्रासलेला एक भू-भू

सुपे काका नोकरीत असताना सकाळी सात वाजता निघून भोरगिरी - आंबेनळी उतरून - जांबरुंग गावातील कार्यालयातून रिपोर्ट घेऊन, राजपे गावातून गणेश घाटाने दुपारी तीनला जेवायला भीमाशंकर जायचे हे ऐकल्यावर त्या महात्म्याला मनोमन दंडवत घातला. मागे राहिलेले गडी माथ्यावर पोहोचले आणि तीन टप्य्याचा खडतर चढ संपल्याच्या आनंदात भोरगिरीची वाट धरली.आता वाटा जाणून घेणे, फोटो काढणे, गप्पाटप्पा सगळे बंद झाले आणि जड झालेली पावले उचलत काकांच्या पावलावर आपले शरीर ढकलणे एवढेच उरलेले. सूर्यास्त झाला तरी आपली डोंगरयात्रा अजून संपली नव्हती. विजेरीच्या प्रकाशात शेवटची दिड तासांची चाल झाली.

पेढ्याच्या घाटाने भोरगिरीच्या वाटेवर असतानाच सूर्यास्त झाला.


जसे अजून पुढे आलो तसे सुर्यबाप्पा थोडे वरती गेले कि काय?



भीमाशंकरच्या माणसांच्या मागमूस नसलेल्या जंगलातून चालताना भिती वाटत होती पण किर्रर्र अंधारात इथली जंगले पालथी घातलेले वाटाड्या बरोबर असल्याने मंडळी निर्धास्त होती. आसमंतात ताऱ्यांची आरास चढू लागलेली. त्यावर निरव शांततेचा साज. जंगल अनुभवणे म्हणतात ते हेच असावे!

महत्प्रयासाने भोरगिरी गाठली. काकांना त्यांचे मानधन देऊन परत एकदा मनोमन दंडवत घातला. त्यांचे जंगलातील एक पेक्षा एक अनुभव ऐकत एवढी लांब पल्ल्याची डोंगरयात्रा सुफळ संपूर्ण झाली. १२ तास अखंड चालत सुमारे ३५ किमीची कसदार भटकंती झाली.
सह्याद्रीचं कसं देवासारखा असतं, तो देत राहतो ..आपण आपल्या कुवतीनुसार आपल्या आयुष्याच्या माळेत माळत राहायच!
वाचत रहा ! भटकत रहा!
सागर शिवदे

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे [ ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे ]

 रविवारचा ट्रेक : मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे

ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे




तीन मावळात वाहणाऱ्या, सोनकीने बहरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्याकंच कड्यांवरून उगम पाऊन मुठा नदीत विलीन होणाऱ्या तीन नद्यांच्या खोऱ्यातून मनसोक्त केलेली भटकंती.  
तीन गावांदरम्यानची गर्द जंगलातील वाटचाल, मधूनच ऐकू येणारी हुप्य्यांची आरोळी, पावसाने समृद्ध केलेले वन्यजीवन, नजर जाते तोपर्यंत पसरलेले सह्याद्रीचे अवाढव्य रूप, आसमंतात चालू असलेला ऊन सावलीचा खेळ, चढाईवर धाप लागून उर धपापू लागताच दिसलेले इडलिंबूने यथोचित बहरलेले झाड, छोट्या छोट्या कीटकांनी अव्याहत चालवलेला उद्योग, आणि माणसाचा मागमूस नसलेल्या एवढ्या दुर्गम ठिकाणी अवचित प्रकट होणारी आणि पाड्यावरच्या घरात बोलावून जेवायला विचारणारी आभाळएवढी उंच माणसे. सगळे काही शब्दातीत. जंगल वाचण्याची प्रत्येकाची परिभाषाच वेगळी.

"नद्या या मानववस्तीच्या जीवनवाहिन्या आहेत" तत्सम छापील वाक्य आपण कधीतरी पुस्तकात वाचतो आणि सोडून देतो. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या नद्या नेमक्या कुठून उगम पावल्या असतील? किती मोठाले अंतर कापत, आपल्या कित्येक भावंडाना भेटत मार्गक्रमण करत असतील? प्रत्येक नदीच्या उगमाशी शिवाची स्थापना कोणी आणि केव्हा केली असेल याबद्दल कधी विचार करण्याची वेळ हि येत नाही.

यावेळेस योग आला तो पुण्यनगरीस पुरवठा करणाऱ्या, तीन मावळातील तीन नद्यांची खोरी भटकण्याचा.

ताम्हिणी गावातून सुरु झालेल्या चढाईने सुरवातीलाच दम काढला. मोडलेल्या वाटा तयार करत मंडळी पुढे जात होती. लुसलुशीत गवतावर गव्याने घातलेली लोळण आणि पायाचे ठसे बघून इथे बरेच दिवसातून कोणी फिरकले नसावे. सुमारे ८०० मीटर चढून मुठा खोरे ओलांडून आता पोहोचलो होतो मोसे खोऱ्यात. धामणओहोळ गावात. येथील डोंगरात मोसे नदी उगम पावते आणि त्यावर पुढे बाजी पासलकर म्हणजे वरसगाव धरण बांधलेले आहे. गावात पोहोचताच थोडी पेटपूजा झाली आणि चावडीवर गप्पा टाकत बसलेल्या मंडळींना राम राम केला. पाठीवरचा पिशवीतील ऐवज पोटात गेल्याने थोडी तरतरी आली होती. धामणओहोळ गावात नदीकाठच्या भैरवनाथाला वर्षातला तिसरा नमस्कार झाला आणि आता सुरु झाली रेडे खिंडीची चढाई.

ताम्हिणी ते धामणओहोळ मधील टप्पा. मुठा नदीचे खोरे.

पहिल्या काही मिनिटातच सर्वांगावरुन घामाचा वर्षाव चालू झाला. येथून पुढची चढाई सुमारे ९०० मीटरची होती आणि जेवणकरून सुस्त झालेली आमच्यासारखी मंडळी लिंबू पाणी, इलेक्ट्रॉलचा धावा करू लागली. सुमारे दोन तासांच्या चालीनंतर रेडे खिंड दृष्टीक्षेपात आली. भर धो धो पावसात इथे काय परिस्थिती असेल असा विचार करतच चालताना "जेवायचं का हो तुम्हाला" अशी ओढ्याच्या दिशेनं हाक ऐकू आली. रेडेखिंड वाडी मधल्या एक आज्जी भांडी धुवायला घेऊन इथपर्यंत आल्या होत्या . त्यांच्यामागे वाडीची वाट धरली आणि त्यांच्या घरासमोर पोहोचताच पेला भरून ताक समोर आले. यांच्या माणुसकीचा झरा हा आटण्यासाठी नसतोच. ताक पिऊन जीवाची क्षुधा शांती झाली आणि पाऊले दापसरे गावाच्या दिशेने चालू लागली. रेडे खिंड ओलांडून आता आपण अंबी नदीच्या खोऱ्यात प्रवेशते झालो होतो. दापसरे आणि त्याच्यापुढे वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव "घोळ" या दरम्यानच्या उंचच उंच डोंगरांमध्ये आंबी नदीचा उगम होतो आणि पुढे जाऊन त्यावर पानशेत धरण बांधले गेले.

पानशेत बॅकवॉटर
भटकंतीची आता अंतिम चाल बाकी होती. एका छोटेखानी मनोरा भासेल अश्या दगडावर बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला. समोरच पुसटसा कोकणदिवा दिसत होता तर पश्चिमेकडे आलेल्या केशरी झळाळीमध्ये ठिपठिप्या घाट लक्ष वेधून घेत होता. साखळेवाडी गावातील काही थोडीथोडकी घरे ओळखू येत होती. अश्या दुर्गम ठिकाणी सुखाने नांदणाऱ्या सह्याद्रीपुत्रांना मनोमन नमस्कार करून आंबी नदीच्या प्रवाहात उतरलो.

अंदाजे अठरा ते वीस किलोमीटरची पायपीट झाली होती.आमच्यातल्या काही मंडळींनी लवकर येऊन फक्कड चहा बनवलेला पाहिला आणि "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" या प्रश्नाला "मी" असे वाटून गेले. गाडीत बसताच निद्रादेवी प्रसन्न झाली. वाटेत एक ठिकाणी गाडी थांबली आणि शेजारून "स्वारगेट-घोळ" हि "यष्टी" जाताना पाहिली. एवढ्या दुर्गम ठिकाणी, एवढ्या रात्रीचे, आणि टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्यांवरून तुफान गाडी हाणणाऱ्या ड्राइव्हर ला मनातच दंडवत घातला. अश्या लोकांकडे खरंच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारात पुण्यनगरी अवतरली.

एकंदरीत काय तर, सह्याद्री आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो, आपण आपल्या कुवतीप्रमाणे आयुष्याच्या ओंजळीत भरून घ्यायचं !



सोनकीचा बहर

रेडे खिंडीच्या दिशेने चढाई चालू.

रेडे खिंड

ताक आणून देणाऱ्या दापसरे गावातील आजी.

आभाळाचे पांघरून आणि दगडाची उशी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी.

दापसरे डोंगरावरून दिसणारा विहंगम नजारा.

सागर शिवदे