रविवार, २१ डिसेंबर, २०१४

रामायणकालीन प्राचीन देवालये

पूर्व लेख: 

अंजनेरी येथील रामायणकालीन प्राचीन देवालये  

पूर्ण 'पर्वत' धुंडाळून,आजूबाजूचे मनोहारी दृश्ये डोळ्यात साठवत आता परतीची वाट पकडली. लवकर सूर्यास्त होण्यापूर्वी खाली उतरून जाऊन गावातील अतिप्राचीन हेमांडपंथी मंदिरे बघायची होती. किल्ला उतरतानाच काही मंदिरे लोकेट करून त्यादिशेने मोर्चा वळवला. 

डोंगरावरून सरपणासाठी सुकी लाकडे गोळा करून निघालेल्या एका ग्रामस्थाने आम्हाला रस्ता समजवला आणी अजून काय काय बघायला आहे इथपासून ते रात्री राहायला त्र्यंबकला जा इथपर्यंत सल्ले दिले. आता जवळजवळ साडे पाच वाजून गेले होते आणि फक्त एक दीड तास हातात होता. म्हणून मग पाय जोरात चालायला लागले. 

खाली उतरताना काही मस्त निसर्गचित्रे मिळाली. 



 ही एकाच झोपडी सदृश्य रचना सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत उभी होती.
 वाह! हा फोटो मला फार आवडला. पुढे-मागे मायक्रोसॉफ्ट ने माझ्याकडे मालकी हक्क दिले तर हा वॉलपेपर ठेवायला हरकत नाही. :)
( कायम मोठी स्वप्ने बघावी…………। म्हणजे भ्रमनिरास पण मोठा होतो. :)  इति ज्यु. ब्रह्मे )

आता वळलो या रामायणकालीन देवालयांकडे.
थोडा इतिहास शोधला असता, असे कळले की, रामायणकाळात राम वनवास भोगायला दंडकारण्यात होता तेव्हा त्याने या देवालायांची निर्मिती केली. दंडकारण्य परीसर म्हणजे आजचा अंजनेरी- त्रिंबक परिसर. गावातील बुजुर्ग लोकांनी ही रामायणकालीन असल्याचेच सांगितले.
तर काही ठिकाणी ही मंदिरे ११व्या शतकातील आहेत असा उल्लेख सापडला. 
प्रत्यक्ष बघता, या मंदिरांचे बांधकाम हे हेमांडपंथी रचने नुसार झालेले दिसले. की जी शैली इ.स. १५०० काळाच्या सुमारास उदयास आली.

असो, खरा इतिहास शोधायला पाहिजे आणि ते होईल तेव्हा होईल पण सध्या ह्या प्राचीन मंदिरांचे अवशेष बघून त्याकाळची स्थापत्यकला किती प्रगत होती याचा साक्षात्कार मात्र होतो.

सर्व मंदिरांची पडझड झालेली आहे. काही मंदिरे तर इथे पूर्वी एक मंदिर असावे असा संशय यावा इतकीच उरली आहेत. आपल्याकडे किती प्राचीन ठेवा आहे आणी तो जपला पाहिजे याची तिळमात्र जाणीव नसलेल्या भारत सरकार वा इतिहास संशोधक मंडळ वा तत्सम जो कोणी जबाबदार व्यक्ती व संस्था व रचना असेल त्याची कीवच करावी वाटते. 
त्यासाठी एकाच ओळ समर्पक आहे. 
" बुद्धी ज्याची दीन …… वृत्ती ज्याची हीन …… राग अश्याचा करावा …… कशापायी ……… !!!"

असो, 
हेमांडपंथी स्थापत्य शैली चे वैशिष्ट्य असे की, पूर्ण मंदिराची रचना ही एकाच दगडात कोरून केलेली असली तरी आवश्यक तेथे joint देताना दगडाची खोबण करून, एकात एक दगड गुंफून केलेली असते. त्यामुळे त्या शैलीतील मंदिरांमध्ये एक लेयर टाईप स्ट्रक्चर येते. आणी महत्वाचे हे की. एकात एक गुंफून केलेल्या मांडणीमुळे उभ्या दगडालाही जास्तीत जास्त आधार मिळतो आणी वर्षानुवर्षे वस्तू अभेद्य राहते. या शैलीतील बरीच मंदिरे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. यांची कोणत्याही कारणाने (नैसर्गिक व इतर) पडझड झाली तरी पूर्ण वास्तू कधीच पडत नाही. 

 



पडझड झालेल्या मंदिरांचे अवशेषही आपल्याला त्या सुवर्णयुगाचे व आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला प्रत्येक अन प्रत्येक दगड शिल्पांनी कोरलेला आहे. त्यावर कोरलेले संदेश, आकृत्या, देवांच्या मुद्रा केवळ अन केवळ थक्क करून सोडतात. एकाही दगड प्लेन व न कोरीवकाम केलेला दिसणार नाही. 
मुक्तहस्ते स्थापत्यकलेचे पाठ घालून देणारी ही देवालये पाहून खरच भुलून जायला होते. आत्ता या-क्षणी या भग्न देवालयाच्या साक्षीने आपण या गौरवशाली स्थापत्यकलेच्या प्रेमात पडत आहोत असे वाटायला लागते.

……आणी बुद्धही थिजला !!

पळत पळत नाशिक-त्रंबक महामार्गावर आलो आणी हरीहर किल्ल्याला जाण्यासाठी फाट्यावर उतरलो. 
येथे आमची रात्री झोपायची सोय झाली. मस्त झोप लागली होती.

चला जाता हु किसी की धून मै …………!!!!!

येथून पळालो ते हरीहर किल्ल्याचा पायथा. निरगुडपाडा . त्याबद्दल पुढील लेखात. 

-----------------------------------------------------------------------------------------------------
पुढचे लेख:
३. हरीहर किल्ला
४. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: