रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

निराधार वृद्ध महिलेसाठी मदतीचे आवाहन. 

माझ्या ओळखीच्या एक आज्जी नाव सुमन आज्जी वय ८०+ या निराधार असून त्यांना कोणीही पती अगर मुले नाहीत. त्या अवसरी खुर्द ,ता. मंचर येथे एका खाजगी मंदिरात राहत होत्या आणी देवीची पूजा व येणाऱ्या लोकांच्या मंदिरावर उदरनिर्वाह करत होत्या. 
१ जून रोजी सकाळी मंदिराशेजारील आजूबाजूच्या लोकांना त्या बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्यांनी तेथील डॉक्टरांना बोलावुन प्राथमिक उपचार केले. पक्षाघाताचा(ब्रेनस्ट्रोक)  झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या माहित असलेल्या नातेवाईकांना फोन करून कळवले. आजींच्या कोणत्याही नातेवाईकाने त्यांची जबाबदारी न घेतल्यामुळे,व माझ्या बाबांच्या त्या काकू लागत असल्याने, माणुसकी म्हणून मी त्यांना अवसरी,मंचर येथून पुण्यात आणून दीनानाथ मंगेशकर येथे त्यांचे ब्रेनस्ट्रोक आजाराचे उपचार केले.
त्यानंतर त्यांना एका वृद्धाश्रमात ठेवले असता २५ जून रोजी त्या घसरून पडून त्यांचे खुब्याचे हाड मोडले. त्यांचे दीनानाथ मंगेशकर येथे "हिप रिप्लेसमेंट" चे ऑपरेशन करून सध्या त्यांना भूगाव येथील "सहजीवन" नावाच्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्या सध्या बेड-रिडन आहेत.
या आज्जीना पती अगर मुले कोणीही नसल्याने त्यांचे वरील दोन्ही वैद्यकीय उपचार मी केले आहेत.  त्यांच्या या दोन्ही उपचारासाठी आजपर्यंत सुमारे १,५०,००० रु खर्च केले असून वृद्धश्रमाचे चार्जेस दरमहा ११०००रु व औषधोपचार,डायपर असे १४००० रु मी सध्या भरत आहे.एकदा त्यांची जबाबदारी घेतल्याने त्या हयात आहेत तोपर्यंत हा खर्च करणे मला भाग आहे.
दरमहा हा खर्च करणे आता अवघड होत चालले आहे म्हणून सध्या काही ट्रस्ट, देवस्थाने  वा कोणाची मदत त्यांना मिळवून देता येईल का ते बघत आहे. यातून जी काही मदत मिळेल त्याने मला नक्कीच मोठा मदतीचा हात मिळणार आहे.
आपली कोणाची मदत करायची ईच्छा असल्यास,  थेट "सहजीवन" या वृध्दाश्रमाला तुम्ही या आजींसाठी मदत म्हणून देऊ शकता. वृध्दाश्रमाच्या नावाने चेक ( "Sahajeevan" या नावाने) देऊ शकता  वा अकाउंट ट्रान्सफर करू शकता. या केसच्या सत्यतेबाबत शंका असल्यास तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. हॉस्पिटलचे बिल,वृद्धाश्रमाचे बिल असे शक्य ते पुरावे मी देऊ शकेन.  याखेरीज कोणाला अश्या वृद्ध लोकांचे सोय होईल असे ट्रस्ट , आश्रम असे काही माहित असल्यास त्यांचे संपर्क वा तिकडचे कोणी ओळखीचे लोक त्यांचा संपर्क असे काही असल्यास ती सुद्धा एक मदतच असेल. कोणाला स्वतः त्या वृद्धाश्रमात जाऊन औषधें, डायपर अशी छोटी मदत करायची असल्यास ते स्वतः ही तेथे जाऊ शकतात. पत्ता व डिटेल्स मी देईन.
माझ्याकडे मदत देण्यापेक्षा थेट वृद्धश्रमास "सुमन शिवदे" या नावाने दिल्यास उत्तम होईल. मदत देताना मला कळविले तर मला नक्की किती मदत तिथे मिळतिये ते कळेल आणी तेवढा माझा भार हलका होईल. माझ्याकडे देण्याची ईच्छा आणी विश्वास असेल तर माझा नंबर 9975713494 असून तुम्ही PaytM/GPay  करू शकता.
आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची रिसीट/पावती मी आपल्याशी शेअर करेन.
चेकवर नाव : Sahajeevan


माझा मोबाईल नं - ९९७५७१३४९४
सागर शिवदे

आभार !

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

जाता साताऱ्याला : केंजळगड, रायरेश्वर , धोम , मेणवली , वाई मेणवली

जाता साताऱ्याला : केंजळगड, रायरेश्वर , धोम , मेणवली , वाई

समाधी अवस्थेंत गेलेल्या या ब्लॉग ला आज परत थोडी नवसंजीवनी मिळाली आहे. कालची मस्त भटकंती आणि आजचा हापिसातला रिकामा दिवस असे योग नेहमी जुळून आले तर काय मजा येईल. अहाहा!

आठवड्याची कामे शनिवारी आटोपली आणि पावसाचे स्वागत करायला रविवारचे औचित्य साधून केंजळगड जाण्याचे ठरवले. आता तेथे चाललोच आहे तर आजूबाजूची चांगली ठिकाणे सोडायची कशी? मग ठरला असा प्लॅन.

कोथरूड -> नेकलेस पॉईंट भोर -> भोर राजवाडा -> आंबवडे येथील झुलता पूल आणि नागेश्वर शिवमंदिर -> केंजळगड -> रायरेश्वर -> धोम धरण आणी नरसिंह/शिवमंदिर -> मेणवली घाट -> वाई महागणपती - कोथरूड.

एक दिवसात एवढे सगळे म्हणजे दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखा. पहाटे ५:३० ला पुण्यनगरीतून निघून आरामात पोहोचलो नेकलेस पॉईंट. नीरा नदीच्या पाण्याचा अर्ध वर्तुळाकार प्रवाह पावसाळ्यात जेव्हा दुथडी भरून वाहतो आणी आजूबाजूचे हिरवेगार पठार म्हणजे केवळ लाजबाब !


नेकलेस पॉईंट भोर :


भोरला पोहोचलो. चहा घेऊन निघालो आंबवडे.  भोर राजवाडा अनेक वेळा पाहिल्याने आणी सध्या बंद असल्याने तो गेलो नाही. वाटेल दिसलेला विचित्रगड ( रोहिडा किल्ला). आधी जाऊन आल्यामुळे हा पण स्किप केला.
    


आंबवडेला पोहोचलो. रस्त्यावरच पंतसचिव वाडा आणी त्याला जोडणारा हा ३०० ते ४०० वर्ष्यांपुर्वी बांधलेला झुलता पूल ( सस्पेन्शन ब्रिज) दिसतो. त्याकाळी याच्या बांधणीस १०,०००/- रुपये खर्च झाले असल्याची नोंद आहे. यावरून चालत गेल्यास आपण पंतसचिव वाड्यात पोहोचतो. वाडा बंद असला तरी जाळीदार दारातून आत डोकावून पाहिल्यावर प्रशस्त असा वाडा, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणी अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो.
हा झुलता पूल आणी पंतसचिव वाडा दोन्ही भोर विभागात संरक्षित वारसा मध्ये गणला जातात.


आंबवडे येथील झुलता पूल :


वाडा बंद होता . समोरच मोठाले पिंपळाचे झाड आणी त्याच्या खाली आजूबाजूला अनेक वीरगळ दिसल्या. येथूनच एक वाट खाली नागेश्वर मंदिराकडे जाते. आजूबाजूला निरव अशी शांतता, आंबे, फणसाची मोठमोठाली झाडे, मंदिरासमोर पडलेला आंब्यांचा सडा, पूर्ण दगडात कोरलेला नंदी, गाभाऱ्यात पुजारी काकांचा एक तालात चाललेला अखंड "ओम नमः शिवाय" चा जयघोष ऐकून हात आपोआप जोडले गेले.

दर्शन घेऊन प्रसन्न मनाने निघालो पुढच्या डेस्टिनेशनला.


नागेश्वर शिवमंदिर :

आंबवडेतून सुमारे अर्ध्या तासात पोहोचलो रायरेश्वर/खावली गावात. बसची वाट पाहत असलेल्या एक आज्जीना लिफ्ट दिली आणी थोडेसे पुण्य मिळवले. घाटरस्त्याने गाडी हाकत केंजळगडाचा फाटा दिसला आणी १० मिनिटात केंजळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

पायथ्याला असलेला गावात सुमारे १०-१२ घरे आहेत. शंभर जवळपास लोकसंख्या आणि जिल्हा परिषदेची प्रार्थमिक शाळा सुद्धा आहे. आज रविवारी 'मास्तर' आल्याने आज शाळेचा पहिला दिवस होता. सगळा बालचमू नवीन कपडे घालून. सगळे आनंदाने शाळेत आले होते. मंदिरापाशी गाडी लावून पोटपूजा करून घेतली आणी निघालो.

केंजळगड चढाई सुरु :


२५-३० मिनिटात उभा कातळ तासून बनवलेल्या पायऱ्यांपाशी आलो. पाऊस नसला तरी वातावरण मस्त झाले होते. ढगांनी सूर्यदेवाना झाकोळले असल्याने सर्वत्र सावली पसरली होती.

उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या.



केंजळाई देवी मंदिर 



रायरेश्वराची टेहळणी 

सुमारे एक तासात किल्ला भटकून झाला. आता परतीचा मार्ग पकडला. अजून रायरेश्वर आणी वाई भटकंती बाकी होती.
  

केंजळगडाच्या पायथ्याच्या गावाशी शाळेपाशी गाड्या लावल्या होत्या. आज रविवार असूनही मास्तर शाळेत आले असल्याने आजही शाळा भरली होती. गावातली मंडळी सर्व कामे उरकून भोजनाच्या तयारीत गुंतले होते. एका घरात आम्ही पाठ-पिशव्या ठेवल्या होत्या त्या उचलल्या, लहानग्यांना थोडा खाऊ दिला. घरातल्या एक सदस्याने मध घ्यायचा का विचारलं, मग कळले की, त्यांनी मे महिन्यात पोळ्यातून मध काढून ठेवलेला आहे. उन्हाळा संपताना शक्यतो वर्षाचा मध काढतात. चव बघितल्यावर २ किलोची खरेदी झाली. 
" तुमच्या पुण्यात कुठे मिळायचा नाही असला मध, तिथे मिळते ते फक्त साखरेचे पाणी!"  
आता मात्र काका पेटायच्या आत निघाले पाहिजे. 

येथून निघून रायरेश्वराच्या कुशीत प्रयाण:



नको तेथे रेलिंग, पेव्हर ब्लॉक्सची पायवाट केलेली, वरती हॉटेल्स, मंदिरात रायरेश्वराच्या दर्शनासाठी डोकं टेकवताच गुरवांची "दानाची" मागणी असे अनुभव घेऊन गप्प आल्यापावली निघालो. 


येथून एक वाट वाई कडे उतरते. आता या वाटेने पुढे धोम तलाव,धोम येथील नरसिंहाचे (नृसिंह-लक्ष्मी)  मंदिर, पुढे मेणवली व वाई. सुमारे २० मिनिटात नृसिंह-लक्ष्मी मंदिरात पोहोचलो. पेशवेकालीन हे मंदीर अजूनही उत्तम स्थितीत असून पुष्करणीची रचना म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. कमळाच्या आकाराच्या पुष्करणीत कासवाच्या चौथऱ्यावर नंदी आसनस्थ आहे. संपूर्ण पुष्करणीचे कोरीवकाम लाजवाब. पुष्करणी च्या मधोमध कासव शिल्प आजपर्यंत कधी पहिले नव्हते. 

नृसिंह-लक्ष्मी मंदिर:


कासवरूपी पुष्करणी :


येथून पुढचा प्रवास तो म्हणजे मेणवली. स्वदेश, गंगाजल आणी असंख्य हिंदी/मराठी चित्रपटात तुम्ही हि जागा पाहिली असेलच. फक्त अशी वेळ साधायची की येथे आपल्याखेरीज कोणीही नसेल. संथ वाहणारी कृष्णामाई, निरव शांतता, पक्ष्यांचे रुंजन, शिवमंदिरात अवचित वाजणाऱ्या घंटेचा निनाद, झाडांची वाऱ्यासोबत चाललेली चुळबुळ,रम्य घाट, घाटाच्या पायऱ्यांवर येणाऱ्या पाण्याच्या लाटेचा मंद आवाज आणी संध्याकाळी आकाशाला आलेली केशरी झळाळी प्रतिबिंबित करणारी किरणे असे सगळे जमून आले की काही विलक्षण आनंदाची अनुभूती होते. 

या जागेचा इतिहास आणी संपूर्ण माहिती तुम्हाला अन्यत्र मिळेलच. नाना फडणवीसांच्या आठव्या पिढीने या वाड्याचे केलेले जतन केवळ कौतुकास्पद आहे. नाना फडणवीसांचा पुरातन वाडा आजही बघण्यास उपलब्ध असून तेथले सुरक्षारक्षक वा सदस्य आपल्याला आपुलकीने संपूर्ण वाडा दाखवतात. 

आम्ही गेलो तेव्हा नुकत्याच शाळा चालू झाल्या असल्याने शाळेतील मुलांना शालेय साहित्यवाटप चालू होते. पुण्याहून जाऊन स्वतःच्या खर्चाने समाजोपयोगी कामे करणाऱ्या त्या लोकांना अनेक आशीर्वाद नक्कीच मिळत असतील. एक सद्गृहस्थाने आम्हाला संपूर्ण वाडा दाखवला. सागवानी लाकडावरचे शिल्पकाम, छताला केलेल्या वेलबुट्टीचे लाकडी काम, शेण+मातीने लिंपलेल्या भिंती, अंगणात केलेले दगडी कारंजे सगळं काही निव्वळ इतिहासात घेऊन जाणारे!

आज कालपरत्वे केलेले उपाय पाहता पूर्वीच्या काळी या वाड्याने काय गतवैभव पहिले असेल याची प्रचिती येते. एकदा अवश्य भेट द्यायला हवी येथे. नक्की आवडेल अशी जागा आहे. 

मेणवली घाट : 



शिवमंदिर आणी नंदी :



चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर तेथून आणलेली एक भलीमोठी घंटा येथे पाहावयास मिळते. पंचधातूची हि घंटा असून त्यावर सेंट मेरीचे शिल्प कोरलेले असून १७०७ साल कोरलेले आहे. 1534 मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या म्हणजे १ मीटर व्यासाच्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.

बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.

आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास  हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात आहे असे ऐकले आहे. त्याखेरीज अजून २ घंटा पहिला मिळतात त्या म्हणजे -  थेऊरच्या गणपतिमंदिरातील घंटा, आणि मेणवलीमधील नाना फडणिसांच्या वाड्यामागील घाटावरली घंटा ह्या दोन्ही वसईच्याच आहेत.
या घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 

मेणवली येथील घंटा :


पूर्वी वसईच्या घंटा या विषयावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक :

आता उन्हे कलत चालली होती. अजून वाईच्या महागणपतीचे दर्शन घ्यायचे होते. १० मिनिटात वाई गाठून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा करून पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवले. मुबईकरांना ७:४५ ची शेवटची गाडी पकडायची असल्याने अजून कोठे न थांबता पुणे स्टेशन गाठले आणी एका भटकंतीची कहाणी सुफळ संपूर्ण जाहली . एक सत्कारणी लावलेला दिवस पुढच्या अनेक पोटासाठीच्या धावपळीची ऊर्जा देऊन जातो आज पुन्हा अनुभवल. 

असाच एक उनाड दिवस शोधा, तो तुम्हाला जगायचे का हे शिकवेल आणि निसर्गातली मौजमजा, आनंद हे सगळं बोनस!

काही छायाचित्रांचा आनंद घ्या! पूर्ण लोड होत नसतील तर क्रोम वापरा. 






वाचत रहा ! अभिप्राय कळवत रहा!