।। जय श्री केदारनाथ ।।
।। जय श्री मदमहेश्वर ।।
।। जय श्री तुंगनाथ ।।
तीन केदार यात्रा : श्री केदारनाथ , मध्यमहेश्वर , तुंगनाथ
कोणीतरी म्हटलंय - "एकदा का हिमालयाचे वेड लागले ना , मग तू दरवर्षी किमान एकदा तरी हिमालयात जाशील !" ( कोणीतरी म्हणजे काय मीच म्हटलंय, पण पु.ल. म्हणतात तसे कोणी तरी म्हटलंय म्हणल्यावर काय म्हटलंय हे ऐकायला आपण कान टवकारले नसतेत. )
मागील वर्षी जेव्हा फॅमिली बरोबर केदारनाथ, तुंगनाथ प्लॅन केला होता तेव्हाच दरवर्षी हिमालयात कुठेतरी का होईना पण भटकायला यायचे असे मनाशी ठरवले होते. सुरुवात म्हणून केदारनाथ यात्रा आणि पंच केदार करावे याविचाराने मागील वर्षी केदारनाथ आणि तुंगनाथ दोन केदार केले होते. दोन्हीच्या मध्ये असलेले नितांतसुंदर असे द्वितीय केदार करायचे राहिले असल्याने यावर्षी जून मध्ये मदमहेश्वरचा प्लॅन ठरवला होता. आठ वर्षाच्या मुलाला घेऊन मदमहेश्वर अवघड होईल अश्या काही लोकांच्या सल्ल्याने मदमहेश्वर रद्द करून स्पिती आणि किन्नोर प्रदेशाची सुंदर अशी सहल झाली होती. महादेवाची ईच्छा असेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता म्हणतात तसे घडून आले आणि ऑक्टोबर मध्ये तीन केदार यात्रा घडून आली.
हिमाचलच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये वसलेली छोटी छोटी पण अत्यंत सूंदर अशी गावे. स्वर्गाहून सुंदर भासणारी निसर्ग दृश्ये, निळेशार आकाश आणि त्यावर जणू आमच्यासाठीच कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरेशुभ्र ढग. आसमंताशी स्पर्धा करणाऱ्या पर्वतशिखरांचा शुभ्रधवल असा बर्फाचा जिरेटोप. साक्षात कैलासावरून भूलोकावर येणारा गंगारवं ( ग्लेशिअरचे किंवा गंगेचे पाणी). आपापसात दाटीदाटीने उभ्या उंचच उंच देवदार वृक्षांची चढाओढ. बर्फाने आच्छादित मनमोहक पर्वतशिखरे. निसर्गाच्या आव्हानाला तोंड देत ख्याली खुशालीने जगणारी पहाडी मंडळी, केदारनाथच्या मंदिराजवळ जाणवणारी ती अदृश्य, अलौकिक अशी सतेज ऊर्जा, भैरोबा डोंगरावरून दिसणारे दिलखेचक दृश्य, मदमहेश्वरची न संपणारी चढाई, माथ्यावरून प्रातः प्रहरी दिसणारी चौखंबा पर्वतांची सोनेरी झळाळी, चंद्रशिला शिखरावरून चौफेर दिसणारी हिमालय शिखरे, गात्रांना तृप्त करणारे शांत आणि थंड असे गंगेचे प्रवाह, विधात्याने चित्रे रेखाटावी अशी सुंदर निसर्गचित्रे. असे अनेक कायम आठवणीत राहतील असे प्रसंग जगता आले. "केल्याने देशाटन" या उक्तीचा पुरेपूर आलेला अनुभव.
एकंदर काय तर, कधीही न कोमेजणारी ही आठवणींची सोनपुष्पे, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं.
असो, तर पाच दिवसात ८८ किलोमीटर्सचा तीन केदार यात्रेचा प्लॅन तर तयार होता पण पाच दिवसात तीन केदार करायचे म्हणजे ट्रेक भिडू सुद्धा तसे तयारीचे आणि दमदार हवेत. आमच्या ऑफबीट ट्रेकर्सचे सात सदस्य तयार झाल्यावर सगळी जय्यत तयारी सुरु झाली. ऑफबीट ट्रेकर्सचा हा पहिला हिमालयीन ट्रेक.
ट्रेक प्लॅन झाला तो असा -
२८ सप्टेंबर - बांद्रा ते हरिद्वार.
२९ सप्टेंबर - सोनप्रयाग कडे प्रयाण. संध्याकाळी ५ पर्यंत सोनप्रयाग पोहोचून केदारनाथ चढाई चालू.
३० सप्टेंबर - रात्रभर ट्रेक करून पहाटे दोन-तीन वाजता केदारनाथ येथे पोहोचणे. पहाटेचे गर्भगृह दर्शन. दिवसभर केदारनाथ मंदिरापाशी. भैरव मंदिर आजूबाजूचे डोंगर. जमल्यास वासुकी ताल ट्रेक. केदारनाथ मुक्काम
१ ऑक्टोबर - पहाटे केदारनाथ वरून उतराई. ३-४ वाजेपर्यंत सोनप्रयाग पोहोचून उखीमठ आणि पुढे रांसी गावाला मुक्काम.
२ -ऑक्टोबर - रांसी पासून सकाळी ट्रेक चालू. मदमहेश्वर १८ किमी दुपारी ३-४ वाजेपर्यंत पोहोचू. मदमहेश्वर मुक्काम.
३ ऑक्टोबर - बुढा मदमहेश्वर चढाई , परत मंदिर मग मदमहेश्वर ते रांसी उतराई. रांसी ते उखीमठ ते चोपता. मुक्काम चोपता.
४ ऑक्टोबर - पहाटे चार-पाच ला तुंगनाथ चढाई चालू. तुंगनाथ दर्शन. पुढे तासभर चंद्रशिला शिखर चढाई. तुंगनाथ उतराई १२ पर्यंत. चोपता ते हरिद्वार प्रवास.
५ ऑक्टोबर - हरिद्वार स्थलदर्शन, गंगा स्नान, मनसा देवी मंदिर, खरेदी. हरिद्वार ते पुणे प्रवास
६ ऑक्टोबर - पूर्ण दिवस ट्रेन मध्ये. रात्री नऊ ला बोरिवली. बोरिवली ते दादर. दादर ते पुणे सातारा एक्सप्रेस ने पहाटे दोन वाजता पुणे. यात्रा समाप्त.
प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम :
रविवारी सकाळी हरिद्वारला पोहोचताच अजिबात वेळ न घालवता गाडीत बसून सोनप्रयागच्या दिशेने निघालो. आजचे टार्गेट होते ते संध्याकाळी सहाच्या आत गौरीकुंड पोहोचून चेकपोस्ट क्रॉस करणे. संध्याकाळी सहा नंतर गौरीकुंड पासून पुढे परवानगी मिळत नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत थांबावे लागले असते. मागील महिन्यात भूस्खलन झाल्याने संध्याकाळ नंतर पोलीस सोडत नाही असे कळले. सोनप्रयाग पार्किंगला संध्याकाळी पाचला पोहोचलो तेच लगेच पळत रेजिस्ट्रेशन स्कॅन करून पुढे निघून गौरीकुंड जाणारी टॅक्सी पकडली. मागच्या वर्षी जून मध्ये इथे पाय ठेवायला जागा नव्हती. आज ऑक्टोबर मध्ये निवांत बसलेले पोलीस पाहून गर्दी नसल्याची खात्री झाली.बरोब्बर सहा वाजता गौरीकुंड चेकपोस्ट क्रॉस करून हुश्श म्हंटलं आणि आता पूर्ण रात्र आपली म्हणत केदारनाथची चढाई चालू केली. मागील वर्षी जून मध्ये केलेली यात्रा, तेव्हाची गर्दी, घोड्यांचा त्रास सगळे पाहता आजची आमची चढाई फारच निवांत झाली. संपूर्ण मार्गावर फक्त आम्हीच होतो. सुमारे सात तासात ठराविक वेळ विश्रांती घेत मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा भर थंडीत घामाने अंघोळ झाली होती. रात्रीचा कमी ऑक्सिजन असल्यामुळे लींचोली गावापासून सुरु होणारी खडी चढाई चढताना जोरदार दम लागू लागला.
![]() |
देवप्रयाग |
![]() |
पहाटे दोन वाजताच दर्शन |
रात्री अडीच वाजता केदारनाथ मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा मनातील एक इप्सित पूर्ण झाले. सलग तीन वर्षे केदारनाथ करायची इच्छा आज दुसऱ्यांदा करून काही अंशी पूर्ण झाली. केदारनाथ मंदिराच्या समोर अगदी तुरळक गर्दी पाहून तो गर्दी नसलेला मंदिराच्या पुढे असा रेअर फोटो उरकला. मंदिरासमोर छोटीशी लाईन बघून उभा राहिलो तर कळले कि हि पैसे भरून दर्शनाची लाईन आहे. मग नेहमीच्या लाईनीत बसून पहाटे पाच पर्यंत वेळ काढला. पहाटे पाचला मंदिराचे द्वार उघडले आणि गर्भगृहात जाऊन केदारनाथ लिंगाचे सुखद दर्शन झाले. डोकं टेकवून, तुपाचा अभिषेक करून बाहेर आलो तेव्हा मंदिराच्या मागे पर्वत शिखरांवर मंगलमय सोहोळा चालू झाला होता. केदारनाथ ग्लेशिअर सोनेरी किरणांचा जिरेटोप घालून आकाशाशी स्पर्धा करत मनोहारी भासू लागला. आज पूर्ण दिवस मंदिरापाशीच घालवायचा असल्याने मनसोक्त फोटोग्राफी झाली. दुपारपर्यंत थोडीशी डुलकी काढून भैरव मंदिर आणि त्यावरच्या डोंगरावरून संपूर्ण केदारनाथ घाटीचा नजारा पाहत संध्याकाळ झाली.
संध्याकाळी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा अगदी २०-२५ लोक लाईनीत बघून परत एकदा दर्शनासाठी गेलो. संध्याआरती साठी जागा पकडून बसलो. आरती चालू झाली तसे एकंदर वातावरण कमालीचे बदलले. मंदिराच्या आवारात जी पॉसिटीव्ह एनर्जी जाणवते ते इथपर्यंतचा यायचा सगळं त्रास शून्य करते. आजही दुर्गम आणि खडतर असा प्रवास असणाऱ्या या मंदिराची ज्या कोणी अनामिक महंतांनी स्थापना केली असेल आणि त्यानंतर कित्येक वर्षे बर्फाखाली दडलेल्या या मंदिराचा शोध घेणारे श्री शंकराचार्य यांना मनोमन दंडवत घातला. संध्याआरती नंतर परत एकदा दर्शन घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
काळ मनसोक्त तीन वेळा दर्शन झाल्याने आज सकाळी सहा वाजताच उतराई चालू केली. अकरा वाजता सोनप्रयाग पोहोचून श्री शंकर- पार्वती यांचा विवाह झाला ते त्रियोगिनारायण मंदिर बघायला निघालो. सोनप्रयाग पासून जाणाऱ्या गाडीशी घासाघीस करून शेवटी ड्राइवर पटवून मंडळी निघाली त्रियोगिनारायण. येथे भगवान श्री शंकर आणि पार्वती यांचा विवाहस्थळ असून आजही ते यज्ञकुंड प्रज्वलित आहे असे म्हणतात. येथूनच निलय पर्वताचे म्हणजे ओम पार्वतीचे दर्शन होते. शिखरावर बर्फ असतो तेव्हा बर्फाचा आकार "ॐ" सारखा दिसतो. येथून सोनप्रयाग पोहोचून पुढे शेअरिंग गाडीने गुप्तकाशी पोहोचलो. येथील विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पुढे उखीमठ कडे निघालो. गुप्तकाशी येथील विश्वेश्वराचे मंदिर हे केदारनाथ मंदिराच्या धाटणीचे असून अवश्य पाहण्यासारखे आहे.
पुढे उखीमठ ते मदमहेश्वर ट्रेकचा बेस रांसी येथे पोहोचलो. आजही जेवायला वेळ मिळाला नसल्याने लोकांची वजने घटत चालली होती. रांसी गावात छानसा असा होम स्टे घेऊन ठेवला होता. मनसोक्त जेऊन मंडळी पायाला तेल लावण्याच्या कामात गुंतली. आज मोठ्या धावपळीनंतर छान आराम होणार होता. उद्या पुन्हा १८ किलोमीटर्स ची चढाई करायची तयारी ठेऊन मंडळी निद्रादेवीची आराधन करू लागली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा