रविवार, १४ एप्रिल, २०२४

तैलबैल - घोडेजिन घाट - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल


तैलबैल - घोडेजिन घाटाने उतराई - सुधागड दिंडी दरवाजा - सुधागड - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ / वाघूरघळ - तैलबैल  [ २४ किलोमीटर ] 

 तळपत्या उन्हातील दोन घाटवाटा आणि दोन किल्ल्यांची अनवट भटकंती - तैलबैल - सुधागड - तैलबैल रेंज ट्रेक . 

=================================================================

"रुपेश , ए रुपेश ऊठ रे जरा ! त्यो बघ तिथे एक साप आहे ती माणसे झोपलीयेत तिथे. मार जा तो ! ती माणसं घाबरतील " 

या काकूंच्या एका वाक्याने तैलबैल गावातील मारुती मंदिरात घोरणाऱ्या ट्रेकर्सची झोप तीन ताड उडाली. पहाटे साडे चारची किर्रर्र वेळ. रुपेशने शांतपणे  "काय शिंची कटकट ए! " अश्या अविर्भावात उठून हातात दंडुका घेऊन सापाला पुढच्या दिड मिनिटात यमसदनी धाडले आणि पुन्हा निद्रादेवीची आराधना करण्यास सुरुवात केली. झोप उडालेली ट्रेकर मंडळी कधी नव्हे तो "आज लवकर ट्रेक चालू करू" म्हणत आवरायला लागली.

=================================================================


    मागच्या आठवड्यात कोंडनाळ-हातलोट घाट असा फक्कड बेत झाल्याने भर उन्हात अजून काळे पडायला आपण सिद्ध आहोत याचा साक्षात्कार झाला. तैलबैला वरून कोकणात उतरणाऱ्या चार-पाच घाटवाटा सतत खुणावत होत्या. या आधी दोन वेळा ठाणाळे लेणी शोधण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते.  घोडेजिन - भोरप्याची नाळ किंवा वारसदार - वाघजाई घाट या दोनपैकी,  घोडेजिनने उतरून वाघूर घळ ने चढायचा प्लॅन फिक्स केला. यामध्ये सुधागड दिंडी दरवाजा पण करता येईल या हिशेबाने भल्या पहाटे ट्रेक सुरु झाला. सुरुवातीला फक्त दोन घाटवाटा करू असे ठरले मग नंतर महादरवाजा बघून परत मागे फिरू आणि मग पूर्ण सुधागड करून  दोन्ही वाटा करू असा मारुतीच्या शेपटीसारखा वाढत गेलेला ट्रेकने भटक्या मंडळींची चांगली पाकपुक केली. 


चैत्र पालवीचे दिवस, सकाळी सहा वाजताच तैलबैलाच्या कातळभिंती आसमंतात सूर्याची पहिली कोवळी किरणे लेवून सोनेरी जिरेटोप परीधान करून होत्या. वर्षानुवर्षे अभेद्य अश्या कातळभिंती आणि त्यामधोमध स्थानाप्पन्न असे भैरव यांना मनोमन नमस्कार करून घोडेजिन घाटाची वाट पकडली. तैलबैला गावातून कोकणात उतरायला वाघजाई. सवाष्णी, घोडेजिन , वारसदार अश्या चार वाटा आहेत. घोडेजिनही सुधागड ला जाणारी सगळ्यात जवळची वाट.  हि वाट तैलबैला पठार आणि सुधागड यातील गणेश खिंडीत उतरते, येथून पुढे नाळेने सुधागडच्या दिंडी दरवाज्याला जाऊन किल्ल्यावरून दुसरे टोक ठाकूरवाडी गाठायचे ठरले. भोरप्याची नाळ उर्फ वाघुरघळ स्थानिक कातकरी सोडून कोणीही वापरत नसल्याने वाट अशी नाहीच. जंगलातून काटेरी झाडांचा प्रसाद घेत अंदाजाने चढाई करणे क्रमप्राप्त. 


गावातून अर्ध्या तासात घोडेजिन घाटाच्या तोंडाशी आलो. वाटाड्या घेणे गरजेचे आहे पण या वाटांचा अभ्यास केल्याने gpx फाईलच्या जीवावर जायचे ठरले. तैलबैला कातळभिंती मागच्या बाजूने आता अजून रौद्र भासत होत्या. सकाळचे शुचिर्भूत वातावरण, आंब्याला आलेला मोहोर, कातळामागून उगवणारे सूर्यदेव. वाळलेल्या गवताच्या पात्यांवर कोवळे किरण पडल्यावर चमकणारे गवताचे भाले. पळसाच्या झाडावर चढलली पिवळेधमक तोरणं. समोर स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला भोरप्याचा डोंगर, त्यामागे तळगड, उजवीकडे सरसगड तर मागे बघता घनगड, केवणीचे पठार, नाणदांड घाट असे दुर्गवैभव. डोळे भरून हा निसर्गाचा सोहोळा बघून रामरायाचे नाव घेऊन घोडेजिनच्या घसाऱ्याने उतरायला सुरुवात केली. 

                                       घोडेजिन घाटमाथ्यावरून समोर दिसणारा सुधागड 

"आमचे रेल्वेच्या इंजिनात रिसर्वेशन झाले असले तरी आम्ही चुकीने गार्डाच्या डब्यातच शिरणार" या उक्तीप्रमाणे नाळ उतरताना  पहिल्यांदाच रस्ता चुकला. पूर्ण नाळ उतरून गणेश खिंडीत आलो तर रस्ता गायब. gpx ओरडून ओरडून थकलं कि "बाबांनो रस्ता चुकलाय".  मग काय धोंडसे गावातून सुधागड येणाऱ्या वाटेच्या समोर आल्यावर करवंदाच्या जाळीशी दोन हात करत गचपणातून मार्ग काढत कसेबसे योग्य त्या नाळेत आलो. रस्ता चुकल्यामुळे का होईना पण जंगलात घुसून उतरल्याने कमी वेळात धोंडसे गावातून येणाऱ्या वाटेला लागलो. सुरुवातीला वाटले होते कि दिंडी दरवाजा जवळ असेल. तो बघून याच रस्त्याने उतरून गणेश खिंड ओलांडू आणि भोरप्याच्या नाळेला जाऊ. घड्याळात बघता अकरा वाजत आलेले. या प्लॅनने दोन-तीन पर्यंत तैलबैला गावात पोहोचलो असतो पण भर उन्हाचा तडाखा अजून बसला नव्हता म्हणून दिंडी दरवाज्याने चढून सुधागड करून ठाकूरवाडी म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला उतरायचा निर्णय घेतला. 

                        

सुधागड दिंडी दरवाज्याच्या दिशेने चढून आलो. वाटेत एक मारुतीचे सुंदर मंदिर लागते. त्यापुढे भैरव आणि चॅन पाण्याची टाकी आहेत. महादरवाज्याचे सौन्दर्य ते काय वर्णावे? महाराजांनी रायगडा आधी सुधागडची निवड का केली असावी याची प्रचिती येते. आजही बुलंद असा गौमुखी पद्धतीचा दिंडी दरवाजा डोळ्याचे पारणे फेडतो हे नक्की.  

महादरवाज्याच्या वाटेत असणारे पाण्याची टाकी आणि भैरव 

महादरवाजा उर्फ त्रंबक दरवाजा 

              

यथेच्छ फोटो काढून भोराई देवीच्या मंदिरात पोहोचलो. पाठीवरची वजने पोटात ढकलून सचिव वाडा बघून ठाकूरवाडीच्या दिशेने उतरायला लागलो. आत्तापर्यंत झाडीतून चढाई होती म्हणून मंडळी आनंदात भटकत होती. सुधागडच्या माथ्यावरून समांतर जाताना जळता सूर्य डोक्यावर येऊन ठेपला होता. पाठीवरच्या आठ लिटर पाण्याचा साठा अर्ध्यावर आलेला. त्यात पाच्छापूर दरवाजाची वाट चुकून आम्ही पुन्हा भरकटलो. सुधागडची gpx नसल्याने दोन वेळा वाट चुकून कड्यावर उतरलो. एक ठिकाणी अगदी खालपर्यंत उतरून कडा लागल्याने परत उलटी चढाई करणे आले तेथे मंडळींचा पेशन्स संपला. तेवढ्या एक तासात जी काही एनर्जी , वेळ आणि पाणी  खर्च झाले त्यांची किमंत पुढे चुकवावी लागणार होती. 

सुधागडावरून दिसणारा तैलबैला .. बापरे एवढे अंतर अजून जायचे आहे. 


आत्तापर्यंत रमत गमत चाललेली मंडळीची दिड  तास वाया गेल्याने वेळेशी स्पर्धा चालू झाली. ठाकूरवाडीत उतरलो तेव्हा तीन वाजत आले होते. पूर्ण सुधागड ट्रॅव्हर्स मारून मागे परत तिवईचा वेढा आणि तेथून वाट शोधत भोरप्याची नाळ चढाईची होती. गावात पोहोचायला रात्र होणार हे नक्की झाले होते. आता झपाझप पाय उचलणे गरजेचे होते पण सुधागडच्या पट्ट्याने आणि उन्हाच्या तडाख्याने ट्रेकर मंडळी पुरती गळपटली होती. एकोले दरीतल्या नाळेत लागलो तेव्हा थोडीशी पेटपूजा करून घेतली. रस्त्यात आत्तापर्यंत कुठेही पाणी मिळालेले नव्हते. भोरप्याच्या नाळेत पाणी मिळेल हि एक अपेक्षा होती. भोरप्याच्या नाळेला स्थानिक वाघुरघळ म्हणतात. म्हणजे वाघ पाणी प्यायला येतो ती वाट. सुमारे तासभर चालल्यावर एक मोठा डोह दिसला. मिनिटा-मिनिटाला येणार घाम दिवसभर पुसत चाललेली मंडळी आहे तशी डोहात डुंबू लागली. 

                      


वेळेची आठवण झाल्यावर मंडळी निघाली आणि वाघूळघळ च्या शोधात जंगलात घुसली. असंख्य करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे रस्ता थोपवून उभी होती. अंग-खांद्यावर काट्यांची सही घेत मार्गक्रमण चालू झाले. gpx फाईल दाखवत असलेला मार्ग सोडायचा नाही म्ह्णून चालत होतो पण मध्ये मध्ये पडलेली झाडे, लॅन्ड्स्लाईड मार्ग बदलायला भाग पंडित होती. मध्येच एक ठिकाणी भलामोठा रानरेडा आमच्यावर नजर रोखून उभा होता. त्याचे अविर्भाव बघून पुन्हा वाट सोडली आणि नाळेत उतरलो.  दोन अडीच तासांच्या काट्याकुट्यांच्या मार्गाने एकदाचे भोरप्याच्या नाळेत पोहोचलो. 

gpx route 

भोरप्याची नाळ चढाई 


आताशा सगळ्यांचे पाणी संपत आले होते. दिवस पश्चिमेकडे कलू लागलेला. समोर केवणीचे पठार मावळतीचे रंग धारण करू लागलेला. येथून आता नाळेतून उभी चढाई करायची होती. प्रत्येक पाऊलागणिक श्वास फुलत होता. पाण्याने आणि उकाड्याने जीव बैचैन झाला होता. प्रत्येकाची इंच इंच लढाई चालू झाली. जवळपास अर्धी नाळ चढून झाली तेव्हा सूर्यनारायण ड्युटी संपवून निघून गेले होते. शेवटच्या संधी प्रकाशात सोळावा ब्रेक घेऊन बॅटरी काढून मंडळी पुन्हा चढाईला जुंपली. 

कोंडनाळची आठवण करून देणारी वाघुरघळ चढून माथ्यावर आलो तेव्हा तैलबैल खोरे अंधारात गुडूप झालेले. कातळावरील एकच भैरवाच्या मंदिरातला दिवा चमकत होता. सगळी मंडळी त्यांच्या सगळ्या अवयवांसकट सुखरूप असल्याची खात्री करून गावाच्या दिशेने निघालो. रणरणत्या उन्हातील २४ किलोमीटर्सचा ट्रेक संपवून रापलेल्या चेहऱ्याने घरी पोहोचलो तेव्हा घड्याळ दुसऱ्या दिवसाची तयारी करीत होते. 

"लाईफ मैं बहोत कुछ पेहली बार होता है रे " या मुन्नाभाईच्या वाक्याप्रमाणे आठ लिटर पाणी लागलेला हा पहिलाच ट्रेक म्हणावा लागेल. पूर्ण भटकंतीत प्यायला एक घोट पाणी नाही मिळाले पण पोहायला मिळाले अशीही पहिलीच वेळ. सकाळी साप तर संध्याकाळी रानरेड्याशी भेट हेही प्रथमच. असो आयुष्य समृद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या देणग्या आम्हाला वेळोवेळी मिळोत हीच रामराया चरणी प्रार्थना ! 

शेवटी काय तर ... तू रख यकीन बस अपने इरादों पर ........  तेरी हार तेरे होसलों से बडी नही होगी ! 


वाचत राहा . 


महत्वाच्या नोंदी : 
१. एवढा मोठा ट्रेक करायचा नसेल तर घोडेजिन ने उतरून गणेश खिंडीने भोरप्याच्या नाळेत जात येईल. साधारण तीन ते चार तास आणि सुधागड चढाई वाचेल. 
२. भर उन्हाळ्यातली हि माजमोडी भटकंती करताना कमीतकमी ६ ते ८ लिटर पाणी जवळ असणे महत्वाचे. 
३. गाईड शिवाय सुद्धा ट्रेक करता येईल. वेळेचे नियोजन मात्र महत्वाचे. 
४. सुधागड उतरून ठाकूरवाडी न जाता थोडे अलीकडून भोरप्याच्या नाळेत जाऊ शकतो. वाटेत पोहायला मस्त पाणी आहे. 
५. भोरप्याची नाळ म्हणजे वाट नाहीच. समोर नाळ बघून त्यादिशेने काट्याकुट्यातून चालत राहायचे आहे. वाटेत काही मोकळी जनावरे ( म्हशी रेडे ) सोडलेली आहेत. त्यांना सरप्राईज दिले तर जंगलात पळापळी अवघड होईल याची दाखला घेऊन जावे. 



भटकंतीचा नकाशा : 






रविवार, ३१ मार्च, २०२४

मधू-मकरंदगड - रौद्रभीषण कोंडनाळ - हातलोट घाट


भर उन्हातली भटकंती - 

हातलोट - मधू-मकरंदगड - रौद्रभीषण अश्या कोंडनाळने कोकणात उतराई - बिरमणी मुक्काम - हातलोट घाटाने देशावर चढाई - हातलोट ( २४ किलोमीटर्स )


    रानावनात वसंताची चाहूल लागलीये. दिवस हळूहळू मोठे होऊ लागलेत. थंडीची जागा आता उन्हाळा घेऊ पाहतोय. हातलोट गावात मात्र बांबूच्या वनात अजूनही तोच थंडावा जाणवतोय. पळस अंगाअंगाने मोहरून गेलाय त्यामुळे अग्निशिखेने अवघे रान पेटलेले भासतंय. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यातही आपल्या सुवासाने मोहित करतोय. नजर जाईल तेथपर्यंत सह्याद्रीच्या बेलाग रांगा अस्ताव्यस्त पसरल्यात. मकरंदगडाच्या माथ्यावरून समोर दिसणारा चकदेव पर्वत, कांदट खोरे, डावीकडे गगनचुंबी सुमारगड , महिपतगड मागे महाबळेश्वर. या पुराणपुरुषांच्या बाहुमधून निघालीये भटक्यांची डोंगरयात्रा.


उन्हाच्या झळा वाढू लागल्या तसे भटकंतीच्या नव्या जंगलवाटा शोधायला चालू केले. उन्हाळ्यात पायपीट करायची तर महाबळेश्वरचे जावळीचे खोरे म्हणजे बेश्ट! मागच्या ट्रेकला एका भिडूने कोंडनाळचा विषय काढला. आजपर्यंतची सर्वात आवडलेली आणि रौद्रभीषण अशी कोंडनाळ वर्णन ऐकूनच दोन दिवसांचा प्लॅन बनला. बरेच वाचन केल्यावर सगळ्या लेखात एक कॉमन उल्लेख होता तो म्हणजे कोकणातल्या आमचा जेथे मुक्काम असणार होता त्या गावातील आदरातिथ्याचा. ट्रेक भिडूंना तेथे आलेल्या माणुसकीच्या अनुभवांचा. हे सगळे वाचून उत्सुकता अजूनच वाढली. जोडीला वेळ मिळाला तर मधू-मकरंदगड पण होणार होते. मकरंद गडाच्या माथ्यावरून दिसणारे जावळीचे घनदाट जंगल म्हणजे काय वर्णावे ? निव्वळ कमाल ! 


सात मंडळी जमवून रात्री दहाच्या सुमारास गाडी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली. महाबळेश्वरपर्यंत रात्री जायचे काही टेन्शन नव्हते. रात्री एक वाजता सुद्धा रस्ते अडवून तिकीट घेणाऱ्याला फाट्यावर मारून आंबेनळी घाटाने उतरायला सुरवात केली. अर्धा घाट उतरून पार गावाच्या कमानीतून डावीकडे वळलो तेव्हा जावळीचे जंगल निद्रिस्त झाले होते. पार ते हातलोट रस्त्याने रात्री दोन वाजता जाताना कुठे तरी जंगलात डोळे चमकतील या आशेने मंडळी चालली होती. अडीच वाजता हातलोट गावात पोहोचून गावातील प्रशस्त अश्या कुंबलंजाई मंदिरात झोपून गेलो. 


तीन तासाची झोप पदरात पडून सकाळी सात ला मकरंदगडाच्या दिशेने निघालो. मकरंदवाडीत एक घरात इंद्रायणी तांदळाची ऑर्डर देऊन घोणसपूर दिशेने निघालो. तासात माचीवरील मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचलो. घामाने अंघोळ तर झालीच होती.  तसेच महादेवाच्या चरणी माथा टेकवून पाठीवरची वजने पोटात ढकलली. 


मल्लिकार्जुन मंदिर, घोणसपूर 


"कोंडनाळ तुम्हाला सापडणार नाही आणि खूप अवघड आहे गावातलं पण कोण येणार नाही. त्यापेक्षा परत गावात जाऊन हातलोट घाटाने जा" असे तीन सल्ले मिळाले. आता गावकरी अवघड आहे जाऊ नका म्हणतायत तर आमची काय अवस्था होईल याची पुसटशी कल्पना येऊ लागलेली. "कोंडनाळ अवघड तर आहेच पण नाळेचे तोंड कसे शोधणार हो तुम्ही? असे करा मंदिराच्या जवळ एक धनगराचा झाप आहे त्याला घेऊन जा बरोबर तो नाळेचे तोंड दाखवेल" या एकाच्या आशादायी बोलण्यावर मंडळी निघाली. जो लक्ष्मण नामक धनगर आमच्या कोंडनाळ उतरायच्या आशेचा किरण होता तोच आम्हाला मंदिरात भेटला आणि आमच्या समोर रानात निघून गेला. "आत्ता  तुम्ही नाळेच्या तोंडाशी पाहिजे होतात आता उन्हामुळे पुरते बेजार व्हाल" इति लक्ष्मण !  त्याला विनवणी केल्यावर तुम्ही किल्ल्यावर जाऊन या मी दिड तासात इथे मंदिरात येतो म्हणून निघून गेला. 


मकरंदगडावरून दिसणारा नजारा 


ग्रुपमधल्या बरेच लोकांचा मकरंदगड राहिला होताच मग हि संधी साधून किल्ल्यावर जाऊन कोंडनाळेचं जरा अंदाज घेतला.  तासाभरात खाली मंदिरात आलो तरी लक्ष्मण आलेला नव्हता. आमचा शेवटचा आशेचा किरण सुद्धा भर उन्हात मावळला. आता gpx आणि वाचलेल्या माहितीच्या आधारे नाळेचे तोंड शोधणे होते. अजून वेळ न घालवता मंडळी झपाझप निघाली.अर्ध्या तासात मकरंदगडाच्या मागील बाजूस पोहोचलो. येथून घसाऱ्याच्या वाटेने पश्चिम टोकाला पोहोचलो. येथून खाली धारदार, दरीत कोसळणारे सह्याद्रीचे कडे लक्ष् वेधून घेत होते. येथून पुढे वाट संपली आणि कोंडनाळच्या तोंडाशी पोहोचलो. सर्वात पहिल्यांदा येथून माणूस उतरू शकेल यावर विश्वासच बसत नव्हता. ग्रुपमधील काही मंडळी तर येथू जाऊच शकत नाही परत जाऊन वाटाड्याला आणू म्हणाली. gpx वर हाच उतरायचा बिंदू दाखवत होता मग काय ? रामरायाचे नाव घेऊन नाळेत उतराई सुरु केली. कोंडनाळ म्हणजे मराठीत एकाच शब्द ! रौद्रभीषण!


रौद्रभीषण 


एकमेकांना हाकाऱ्या देत,  अंतर ठेवत, gpx बघत उतराई चालू झाली. प्रचंड घसाऱ्याची उतराई बघून डोळे आणि डोके दोन्हीही फिरले. एक पाय ठेवल्यावर डझन दगड गडगडाट खाली जायचे. मग खालच्याला वॉच आऊट,वॉच आऊट च्या आरोळ्या चालू झाल्या. मोठे मोठे खात्रीचे दगड पाय ठेवताच आपली जागा सोडून विस्थापित होऊ लागले. प्रत्येक जण नियमित प्रसाद घेत काळजीपूर्वक उतरू लागला. बरे खाली दगड बघून उतराई करायची तर कारवीचे जंगल टोपी उडवायचे. या दोन्ही आघाडीवर लढाई करत उतरताना चाल मंदावली. सुमारे तासभर हा खेळ चालला आणि मग नाळेचा कातळमार्ग लागला. येथे मंडळींनी सगळे अवयव जागेवर आहेत याची खात्री करून मनाचा ठिय्या करून पुढची वाटचाल चालू केली. गावातील तीन चार लोकांनी अवघड आहे म्हणून सांगितलेली वाट खरंच खतरनाक निघाली. अगदीच हैराण वा वाईट अवस्था झाली नाही हि दैवी कृपा! 


वाटेतील एकमेव पाण्याचा स्रोत 


सुमारे पाच तास उतराई करून आम्ही सपाटीला पोहोचलो. चार लिटर पाणी संपत आले होते. आता हातलोट घाटाची नाळ पण येऊन मिळाली होती. येथूनच डावीकडे बिरमणी गावात जाणारा रस्ता होता पण तो न दिसून आम्ही नाळेने बिरमणी गावाच्या पुढे कळमणी गावापर्यंत पोहोचलो. gpx बेंबीच्या देठापासून तुम्ही चुकले आहात सांगत होते पण नाळ गावात जाईल या विचाराने आम्ही चाललो होतो. शेवटी नाळेतून क्रॉस मारून एक डोंगर चढून कसेबसे बिरमणी गावात पोहोचलो. गाव सुंदर आणि प्रसन्न होते. गावातील मुले क्रिकेट खेळात होती त्यांनी गावातील मारुती मंदिराची वाट दाखवली. आज आमचा मुक्काम याच मंदिरात होणार होता. पाच वाजता आम्ही वेळेत गावात पोहोचलो. सकाळी सात ते संध्याकाळी पाच अशी दहा तासांची चाल आज झाली. मंदिरासमोरच एक छोटेसे घर आणि दुकान आहे तेथे चहा आणि  जेवणाचे सांगून भटकायला निघालो. दोन क्रिकेटच्या मॅच खेळून परत आलो तेव्हा सायंकाळ झाली होती. बरोब्बर सातच्या ठोक्याला मंदिरात आरती करून रामरक्षेचा पाठ म्हंटला. गरम गरम रस्सा भात खाऊन मंडळी गुडूप होतील असे वाटले होते पण गावातील काही थोर मंडळी गप्पा मारायला आली आणि रात्री अकरा पर्यंत गप्पांचा फड जमला. 


आज अवघड अश्या कोंडनाळेची भटकंती कोणत्याही वाटाड्याशिवाय करता आली याबद्दल समाधान वाटले. खाली गावातून वरती कोंडनाळ बघता अजूनही येथू आपण उतरून आलो यावर विश्वास बसत नव्हता. चार पाच महिन्यांपूर्वी एकाला कोंडनाळेतून बेशुद्ध पडल्यामुळे रिस्क्यू केले होते त्या कहाण्या उतरताना सारख्या आठवत होत्या. लेखात वाचलेल्या गावातील आदरातिथ्याचा आम्हालाही अनुभव आला. चहाला दूध नव्हते तर एक घरातील काकांनी त्यांचे भांडभर दूध आणून दिले असे अनेक सुंदर अनुभव गाठीशी घेत आजचा दिवस संपवला. 


आजचा मुक्काम बिरमणी गावातील मारुती मंदिरात 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर हातलोट घाट चढून निघायचे ठरले जेणेकरून महाबळेश्वरचे पब्लिक टाळता येईल. सात वाजता निघालो तसे गावातील काळ क्रिकेट खेळणारी मुले आम्हाला हातलोट घाटाच्या सुरुवातीला सोडवण्यास आली. त्यांचे आभार मानून हातलोट घाटाची चढाई चालू केली. 


"कोंडनाळ" हा जर दहावीच्या बोर्डाच्या पेपरमधील "ड" गटाचे गणित असेल तर हातलोट घाट एकदम "अ" गटाचं गणित निघाले. मस्त गर्द झाडीमधून हळू हळू चढणारी वाट सुमारे अडीच तासात माथ्यावर घेऊन आली. माथ्यावर कातळकोरीव पायऱ्या आणि पाण्याचे टाके बघून ही वाट वहिवाटीची प्राचीन वाट असेल याची खात्री झाली. येथून रमतगमत हातलोट घाटात पोहोचलो तेव्हा अकरा वाजत आले होते. गावात एक घरात जेवण सांगितले होते. चवदार मुळ्याची भाजी, कोरडी मिरची असे पदार्थ खाऊन हातलोट गावातून निघालो. वाटेत महाराजांनी कोयना नदीवर बांधलेला शिवकालीन पूल बघून पार गावातील "रामवरदायिनी" देवीच्या दर्शनाला गेलो. 

हातलोट घाट चढाई 


आता महाबळेश्वर जायचे तर स्ट्रॉबेरी तर आणलाच पाहिजे नाही का? मग हातलोट गावाच्या जवळच एक शेतात जाऊन उरलेल्या स्ट्रॉबेरी तोडल्या आणि मग विनाथांबा पुण्यनगरीचा रस्ता धरला. अश्या प्रकारे एक कायम लक्षात राहील असा रौद्रभीषण अश्या कोंडनाळेचा ट्रेक सुफळ संपन्न जाहला. 


महत्वाचे असे काही :

  1. कोंडनाळ शक्यतो उतरावी आणि हातलोट घाटाने चढाई करावी. कोंडनाळ उतरताना पहिल्यांदा खूप घसारा आहे योग्य ते अंतर ठेऊन उतराई करावी. 
  2. उन्हाळ्यात नाळ सगळ्या बाजूने तापून दगड तापतो आणि जीव हैराण होतो असे दोन तीन अनुभव ऐकले होते. तयारीचे भिडू असल्याने आम्हाला तस्से काही वाटले नाही. 
  3. गाईड घेतला नसेल तर मल्लिकार्जुन मंदिराकडून पुढे आल्यावर एकधनगराचा झाप आहे तो ५०० रु घेऊन नाळेच्या तोंडाशी सोडू शकतो. 
  4. बिरमणी गावात राहायची आणि जेवायची उत्तम सोय आहे. खायचे काही नेले नाही तरी चालेल. आम्हाला हे माहित नसल्याने आम्ही दोन दिवसांचे जेवण नेले होते. 
  5. बिरमणी गावात जायला हातलोट घाट आणि कोंडनाळ जेथे संगम होतो तेथून लगेच डाव्या हाताला वळावे. सरळ गेल्यास कलामणी गावात पोहोचतो. 
  6. कोंडनाळ उतरायला अंदाजे पाच ते सहा तास लागतात तर हातलोट चढाई ३ तासांची आहे. 
  7. https://www.ramblr.com/web/explore येथे gpx फाईल मिळेल. 


असो! फोटोंची मजा घ्या!

सागर शिवदे 









भिडू लोक्स 

श्रमपरिहार 

रानमेवा 





सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

रविवारची अनवट भटकंती : पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड

रविवारची अनवट भटकंती : 

पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड  


रात्री दोनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. कोतुळ - ब्राम्हणवाडा - कोथळे अशी गावे मागे पडत होती. रात्री दहाला निघालेली मंडळी झोपेची थकबाकी गोळा करत करत पाचनई गावात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील रौद्रभीषण असा कोकणकडा त्यासमोरील सीतेच्या डोंगरावरून मनसोक्त न्याहाळणाचा. त्याचे विलोभनीय असे रुपडे डोळ्यात साठवून घेण्याचा, आणि कलाडगडावरुन दिसणारे दुर्गवैभव अनुभवण्याचा. 

 

जेव्हा जेव्हा कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहायचो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला जाताना नाफ्ता -डोमा, कलाडगड या शिखरांच्या मागे केशरी झालर चढलेली असायची. नाफ्ता-डोमाचे गगनचुंबी शिखरे कायम साद घालायची. कोकणकड्यावरून खाली बघताना डोळे फिरायचे पण त्यावेळेस कोकणकड्याचे अद्भुत अंतर्वक्र रूप समोरून पाहता येत तर काय मजा येईल या विचारताच सूर्यास्त व्हायचा. आज ते वेळ आली आणि ट्रेकभिडुनी प्लॅन ठरवल्यावर लागलीच पाच भटकी मंडळी निघाली. 


रात्री तीनला पाचनई गावात पोहोचून एक मंदिरात पथारी टाकली. तीन नंतर गाड्या भरून भरून पब्लिक यायला लागल्यावर थोडीफार तरी झोप होईल हि अपेक्षा सोडून दिली. साडे तीनच्या सुमारास रील बघून हरिश्चन्द्रगड "ट्रेकिंग" नव्हे तर "ट्रॅकिंग" करणारी मंडळींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. हिंदी पब्लिक आणि उत्साही पोरींनी पहाटे तीन वाजता हासत -खिदळत गावातील शांततेचा बाजार उठवला. थंडी असल्याने पांघरून ओढून पडून राहिलो. सकाळी सर्व आवरून पुढे निघालो. 


हरिश्चंद्र गडाच्या डोईवरून मनसोक्त विहार करणारे ढग 


पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले. आसमंतात जमलेले ढगांचे छोटे-छोटे पुंजके पश्चिमेच्या  प्रवासास लागले होते. सकाळची कोवळी किरणे लेंडी जांभळाच्या सदाहरित हिरव्यागार पानांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. समोर कलाडगड निश्चल ऊन खात पहुडलेला तर त्यामागे घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. सीतेचा डोंगर समोर बघून नाळेतून चढाई चालू केली. ओळीने येणाऱ्या मोठ्या मोठ्या गुहा पाहून पावसाळ्यात येथे काय कमाल वातावरण असेल या विचारात यथेच्छ फोटो काढत मंडळी दोन तासात डोंगरावर पोहोचली. 


थोडी उंची गाठली तसे कलाडगड खुजा वाटू लागला तर पश्चिमेकडे नाफ्ता शिखराचे दर्शन होऊ लागले. समोर शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव , आजोबा पर्वत लक्ष वेधून घेत होते. जसे डोंगर चढून माथ्यावर पोहोचलो तसे वरून दिसणारे दुर्गवैभव पाहून डोळे तृप्त झाले. नाणेघाटापासून ते हटकेश्वर पर्यंतची सगळी जुन्नर दिशेची डोंगररांग आता एका दृष्टीक्षेपात आली. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच काय ते आपल्या हातात!. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या. 


समोर आहे तो कलाडगड. त्यामागे घनचक्कर रांग. 

माथ्यावर चढाई मागे रोहिदास शिखर 

खिंडीतून छोटीशी चढाई करून सीतेच्या डोंगराचा माथा गाठला. समोर आता कोकणकडा दिसत होता. तारामती, बालेकिल्ला उन्हाचा सोनेरी मुकुट धारण करून ध्यानस्थ बसलेले. माकडनाळ, रोहिदास शिखर आणि त्याला लागून एकमेवाद्वितीय असा अंतर्वक्र कोकणकडा. बरोबर रोहिदास शिखराच्या मागे देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर दिसला. केवळ अद्भुत अशी निसर्गचित्रे! येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सुंदरतेच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस!


नाफ्ता - डोमा शिखरे. मध्ये हपट्याचा कडा 


देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर येथून दिसला. 

रोहिदास शिखर आणि माकडनाळ 

नाफ्ता-डोमा समोर तर मागे आजोबा - करंडा, कात्राबाई - गवळदेव - घनचक्कर- भैरवगड शिरपुंजे 


घड्याळात अकरा वाजलेले पाहून परतीचा रस्ता धरला. दिड तासात परतून कलाडगडाकडे कूच केले. एव्हाना आता उन्हाचा जोर वाढल्याने कलाडगडाची चढाई दम काढू लागली. वीस मिनिटात चढाई करून गेल्यावर कातळकोरीव पावट्यानी स्वागत केले. अश्या उंच ठिकाणी अशी कारागिरी करणाऱ्या त्या अनामिक हातांना सलाम! येथून पुढे चढून भैरव मंदिरात पोहोचलो. नमस्कार करून गड फेरीस निघालो तशी या माथ्यावरून मगाशी न दिसलेली नाफ्ता-डोमाच्या मागील दुर्गशृंखला उलगडत गेली.



येथून पॅराशूट जम्प केली तर डायरेक्ट वल्हीवरे गावात उतरता येईल .  


 कात्रा,करंडा,आजोबा ते मागे पाबरगड सगळी रेंज एका ओळीत दिसू लागली. पुन्हा एकदा हे अप्रतिम वैभव मनाच्या कप्प्यात साठवत कलाडगड उतरून खाली आलो. एक सुंदर मोठ्य्या झाडाशी जेवण करून अर्धा तास वामकुक्षी घेतली आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 


चक्रासन 




प्रथम फोटो आणि हे शेवटचे काही फोटो सौजन्य : श्री विनीत दाते. 


महत्वाचे असे काही : 
  • हरिश्चंद्रगडाचे आणि जुन्नर पर्वतरांगेचे  रौद्र सौन्दर्य आणि पाहायचे असेल तर यासारखी जागा नाही. 
  • पावसाळ्यात मोठे धबधबे असल्याने चढाई अवघड होईल.  उत्तम. 
  • हपट्याचा कडा हा सीतेचा डोंगर उतरून अर्धा पाऊण तास चाल आहे. 



शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

कुंडलिका व्हॅली 2024

  

कुंडलिका व्हॅली ट्रेक 


 सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट -  परातेवाडी 





शुक्रवारी पृथ्वीतलावरच्या काही रिकामटेकड्या लोकांची फोनाफोनी झाली आणी ती रिकामटेकडी मंडळी पाठीवर बोचकी घेऊन कुंडलिका व्हॅली ट्रेकला मार्गस्थ झाली. दरवर्षी नित्यनेमाने होणारा हा ट्रेक आज डोंगरदेवांच्या कृपेने आज  जुळून आला आणी सह्याद्रीचं रांगडं रूप पुन्हा एकदा मनात घर करून गेलं. 

पाच,सहा तास मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या  मारत दरीत पोहोचायच, पावसामुळे आणी कुंडलिका नदीच्या प्रवाहामुळे दरवर्षी मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल करायची, वाटेतले भले मोठाले रॉक पॅच, पाठीवरच् सामान आणि सुटलेले पोट हे दोन्ही घेऊन उतरायची कसरत , हिवाळ्यातही वाहणारे धबधबे आणी बारमाही पाण्याचे प्रवाह, तळ दाखवणाऱ्या हिरव्यागार पाण्यात पोहणे, दोन पुराणपुरुष भासणाऱ्या डोंगरांच्या घळीतून यथेच्छ भटकायचं, पूर्णवेळ सोबतीला अंधारबन, कुंडलिका आणी नावजी सुळके असतातच. पौर्णिमेचा चंद्र सोबतीला घ्यायचा आणी स्लिपींग बॅग मध्ये शिरून आकाशात ताऱ्यांचे मनोमन आकार बनवायचे, दरीच्या उत्तरार्धात सावळ घाटाच्या पुरातन पण सध्या वापरात नसल्याने मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत खडी चढाई सुरु करायची आणी कितीतरी हजारो वर्षांपूर्वी कोणी अनामिकाने कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणी खोदीव पायऱ्या बघून अचंबित व्हायचं. 

जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !


असो , तर कुंडलिका घळीचा हा ट्रेक मुळशी तालुकातल्या पिंपरी गावापासून सुरू होतो. सिनेर खिंडीमधून वाट काढत आपण कुंडलिका घळीमध्ये उतरतो. येथेच वनखात्याने सध्या चेकपोस्ट सुरु करून लोकांचा खिसा १०० रुपड्यानी हलका करायचा घाट घातलाय. आमच्या नशिबाने एवढ्या उन्हात कोणताही वनखात्याचा "वीर" सिनेर खिंड लढवत नव्हता. दक्षिणा वाचली या आनंदात मंडळी अजून चार-पाच फोटो काढून पुढे निघाली. 

घळीत पुढे जातानाच सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीत मोठमोठाले दगड-धोंडे निश्चल ऊन खात पडलेले असतात. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठमोठाले कातळ कापून काढलेले दिसतात मग हीच वाट पकडायची आणी गणपतीचे नाव घेत या दगडांवर उड्या मारत आपली मार्गक्रमणा चालू ठेवायची. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. थोडक्यात काय तर कुंडलिका व्हॅली आपल्याला मान वर करायलाच चान्स देत नाही. 



सुमारे ९ वाजता घळ उतरायला सुरु केली आणी रमतगमत मंडळी निघाली. वाटेत दिसणारे नजारे मात्र कमाल होते. असंख्य दगडांच्या राशी, त्यात जमलेले नितळ आणी हिरवेगार पाण्याचे प्रवाह, डोंगरांच्या कडयांवर नैसर्गिकपणे तयार झालेल्या काही प्रतिकृती , निर्मनुष्य असा प्रदेश आणी दूरवर दिसणारे घळीचे शेवटचे टोक बघत सुमारे ५ तासांची पायपीट झाली.आज दिवसभर आकाश ढगाळ असल्याने सूर्यनारायचे दर्शन फारच कमी झाले. मध्येच जेव्हा नारायण दिसायचे तेव्हा झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा, सोनसळी गवत किरणे परावर्तीत करू लागायची आणी शांत पाण्याच्या डोहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. हिवाळ्यातही असलेले धबधबे मिळून एक संपन्न निसर्गसोहोळाच बनून जायचा. आजही दिसणारे धबधबे, पावसाळ्यात त्यांचे रौद्र रूप दाखवत असतील हे नक्की. 





पाच-सहा तासांच्या वाटचालीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सामान / तंबूची मांडामांड झाली आणी मंडळी व्हेज दालचा करायच्या कार्यक्रमात गुंतली. येतानाच लाकडे गोळा करून आणल्यामुळे शेकोटीची सोय झाली .नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली. ड्युटी संपवून नारायण डोंगरात लुप्त होऊ लागले तरी किरणांचा कटाक्ष काही चुकार ढगांमधून जाणवत होता.आकाशाच्या छपराखाली आजची रात्र अविस्मरणीय होणार होती ! 


या तयारीला 

डिस्कवरी वर दाखवतात तसा काही 

जिथे आमची पथारी पसरली होती त्या शेजारूनच पाण्याचा प्रवाह वाहत होता. थंडीशी दोन हात करायला शेकोटीचा कार्यक्रम झाला. सगळ्या ग्रुप मेंबर्सची ओळखपरेड झाली आणी काही दिग्गज मंडळींशी  भेटी-गाठी झाल्या. पौर्णिमेचे औचित्य साधून हा ट्रेकचे नियोजन केले होते पण चांदोबा अजूनही ढगांमध्येच चाचपडत होता. जशी मंडळी निद्राधीन झाली तशी संपूर्ण दरीत निरव शांतता पसरली. स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आकाशातले कवतिक न्याहाळणे एवढाच काय तो उद्योग उरलेला. मध्यरात्री संपूर्ण आकाश निरभ्र झाले आणी चांदोबाने दर्शन दिले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध खाली दरीतून वरती आकाशाकडे बघताना, डोळ्यासमोर चंद्र डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणा करत आणी पाठीमागे तार्यांची रांगोळी काढत जाताना दिसला. केवळ शब्दातीत असा अनुभव !








सकाळी उजाडताच आवराआवर करून पुढची वाटचाल चालू झाली. न्याहारी आटपून पुढे निघालो आणी पुढे होते अजून एक सरप्राईज! मोठाले पाण्याचे डोह! मंडळी पाण्यात उड्या  मारायला वाऱ्यासारखी सुटली.गारेगार पाण्यात पोहून जरा आत्मा शांत करून घेतला. इथेच प्रत्येकी दोन लिटर पाणी भरून घेतले. एकदा का सावळघाट चढाई सुरु झाली कि कुठेही पाणी मिळणार नव्हते. 



आता लक्ष्य होते घाटमाथ्यावरचे परातेवाडी गाव आणी मध्ये होता सावळ घाटवाटेचा थरार ! सह्याद्रीतल्या अश्या अनेक प्राचीन घाटवाटा आज मात्र वापर नसल्याने "बिकटवाट" बनल्यात. राबता नसल्याने आणी प्रचंड पावसाने या प्राचीन घाटवाटा मोडून जातात. हजारो वर्षांपूर्वी कोणी अज्ञात लोकांनी खोदलेल्या उभ्या कातळातील पायऱ्या, पाण्याचे कुंड पाहिले की वाटते, सह्याद्रीची भटकंती म्हणजे फक्त डोंगरांवरची तंगडतोड नाही तर हि आहे इतिहासाची जिवंत सफर! 






तीव्र चढण चांगलीच दमछाक करत होती. वाटेचा अंदाज घेत आणी पूर्वीच्या खुणां शोधत सर्व जण निघालो. वाटेतील झाडे झुडपे मान वर करू देत नव्हती त्यांची काटछाट करत, एकमेकांना हाकाऱ्या देत, वाटेतील दगडांवर मागच्या लोकांसाठी खडूने खुणा मारत ७० अशांश कोणातली खडी चढाई सुरु होती. वाटेत निसटते धोंडे आले, घसारा आला वा झाड पडलेले दिसले की मग मागच्या फळीतले उत्साही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाच्या शोधात पुढे व्हायचे. 



सावळ घाट चढाई 

दोन तासांच्या चढाईने डोंगरांच्या घळीत पोहोचलो. आणी अहो आश्चर्यम!  उभ्या कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी. पाणी सध्यातरी पिण्यायोय नाही. एकदा का ही टाकी दिसली की, आपले सावळ घाटाचे दिव्य पार झाले समजावे. शेवटच्या टप्प्यात बांबूची वने लागतात आणी इथे तेथून डावीकडे गेल्यास लागतात खोदीव पायऱ्या आणी मोठाली पाण्याची टाकी. बघता क्षणी मन इतिहासात जाते. कोणी अनामिकाने कितीतरी हजारो वर्षांपूर्वी वाटसरूंच्या सोयीसाठी या पायऱ्या खोदल्या असतील ज्यावरून आज आपण प्रवास करतोय. इतक्या उंचीवर खोदलेल्या आणी अजूनही तुडुंब भरलेल्या टाक्या, त्याकाळी किती लोकांची क्षुधा शांत करत असतील?





इतिहासाचा विचार करता करता थोडे पुढे गेले की निसर्गाचे जे काही रुपडे दिसते त्याची तुलना कशाशीच नाही. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच आपल्या हातात! 




सामान खाली ठेऊन बराच वेळ निसर्गातील करामती बघत राहिलो. बरोबरची मंडळी पुढे निघून गेली होती. नाईलाजाने काढता पाय घेऊन परातेवाडी च्या दिशेने चालू लागलो. घाटमाथ्यावर येताच लाईटचे खांब दिसू लागतात त्याच्या दिशेने परातेवाडी गाव लागते. गावात पोहोचल्यावर थोडीशी पेटपूजा झाली. पुढे आलेल्या मेंबर्सने सगळी तयारी करून फक्कड मुगाची खिचडी बनवली होती. मनोमन त्यांचे आभार मानत  दोन घास खाऊन पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.


एकंदरीत कमाल असा अनुभव होता. खूप सारे सरप्रायजेस आणी निसर्गाचे लोभस रूप. 
जगणातल्या अश्या अविस्मरणीय क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य !

वाचत रहा !