रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे [ ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे ]

 रविवारचा ट्रेक : मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे

ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे




तीन मावळात वाहणाऱ्या, सोनकीने बहरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्याकंच कड्यांवरून उगम पाऊन मुठा नदीत विलीन होणाऱ्या तीन नद्यांच्या खोऱ्यातून मनसोक्त केलेली भटकंती.  
तीन गावांदरम्यानची गर्द जंगलातील वाटचाल, मधूनच ऐकू येणारी हुप्य्यांची आरोळी, पावसाने समृद्ध केलेले वन्यजीवन, नजर जाते तोपर्यंत पसरलेले सह्याद्रीचे अवाढव्य रूप, आसमंतात चालू असलेला ऊन सावलीचा खेळ, चढाईवर धाप लागून उर धपापू लागताच दिसलेले इडलिंबूने यथोचित बहरलेले झाड, छोट्या छोट्या कीटकांनी अव्याहत चालवलेला उद्योग, आणि माणसाचा मागमूस नसलेल्या एवढ्या दुर्गम ठिकाणी अवचित प्रकट होणारी आणि पाड्यावरच्या घरात बोलावून जेवायला विचारणारी आभाळएवढी उंच माणसे. सगळे काही शब्दातीत. जंगल वाचण्याची प्रत्येकाची परिभाषाच वेगळी.

"नद्या या मानववस्तीच्या जीवनवाहिन्या आहेत" तत्सम छापील वाक्य आपण कधीतरी पुस्तकात वाचतो आणि सोडून देतो. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या नद्या नेमक्या कुठून उगम पावल्या असतील? किती मोठाले अंतर कापत, आपल्या कित्येक भावंडाना भेटत मार्गक्रमण करत असतील? प्रत्येक नदीच्या उगमाशी शिवाची स्थापना कोणी आणि केव्हा केली असेल याबद्दल कधी विचार करण्याची वेळ हि येत नाही.

यावेळेस योग आला तो पुण्यनगरीस पुरवठा करणाऱ्या, तीन मावळातील तीन नद्यांची खोरी भटकण्याचा.

ताम्हिणी गावातून सुरु झालेल्या चढाईने सुरवातीलाच दम काढला. मोडलेल्या वाटा तयार करत मंडळी पुढे जात होती. लुसलुशीत गवतावर गव्याने घातलेली लोळण आणि पायाचे ठसे बघून इथे बरेच दिवसातून कोणी फिरकले नसावे. सुमारे ८०० मीटर चढून मुठा खोरे ओलांडून आता पोहोचलो होतो मोसे खोऱ्यात. धामणओहोळ गावात. येथील डोंगरात मोसे नदी उगम पावते आणि त्यावर पुढे बाजी पासलकर म्हणजे वरसगाव धरण बांधलेले आहे. गावात पोहोचताच थोडी पेटपूजा झाली आणि चावडीवर गप्पा टाकत बसलेल्या मंडळींना राम राम केला. पाठीवरचा पिशवीतील ऐवज पोटात गेल्याने थोडी तरतरी आली होती. धामणओहोळ गावात नदीकाठच्या भैरवनाथाला वर्षातला तिसरा नमस्कार झाला आणि आता सुरु झाली रेडे खिंडीची चढाई.

ताम्हिणी ते धामणओहोळ मधील टप्पा. मुठा नदीचे खोरे.

पहिल्या काही मिनिटातच सर्वांगावरुन घामाचा वर्षाव चालू झाला. येथून पुढची चढाई सुमारे ९०० मीटरची होती आणि जेवणकरून सुस्त झालेली आमच्यासारखी मंडळी लिंबू पाणी, इलेक्ट्रॉलचा धावा करू लागली. सुमारे दोन तासांच्या चालीनंतर रेडे खिंड दृष्टीक्षेपात आली. भर धो धो पावसात इथे काय परिस्थिती असेल असा विचार करतच चालताना "जेवायचं का हो तुम्हाला" अशी ओढ्याच्या दिशेनं हाक ऐकू आली. रेडेखिंड वाडी मधल्या एक आज्जी भांडी धुवायला घेऊन इथपर्यंत आल्या होत्या . त्यांच्यामागे वाडीची वाट धरली आणि त्यांच्या घरासमोर पोहोचताच पेला भरून ताक समोर आले. यांच्या माणुसकीचा झरा हा आटण्यासाठी नसतोच. ताक पिऊन जीवाची क्षुधा शांती झाली आणि पाऊले दापसरे गावाच्या दिशेने चालू लागली. रेडे खिंड ओलांडून आता आपण अंबी नदीच्या खोऱ्यात प्रवेशते झालो होतो. दापसरे आणि त्याच्यापुढे वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव "घोळ" या दरम्यानच्या उंचच उंच डोंगरांमध्ये आंबी नदीचा उगम होतो आणि पुढे जाऊन त्यावर पानशेत धरण बांधले गेले.

पानशेत बॅकवॉटर
भटकंतीची आता अंतिम चाल बाकी होती. एका छोटेखानी मनोरा भासेल अश्या दगडावर बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला. समोरच पुसटसा कोकणदिवा दिसत होता तर पश्चिमेकडे आलेल्या केशरी झळाळीमध्ये ठिपठिप्या घाट लक्ष वेधून घेत होता. साखळेवाडी गावातील काही थोडीथोडकी घरे ओळखू येत होती. अश्या दुर्गम ठिकाणी सुखाने नांदणाऱ्या सह्याद्रीपुत्रांना मनोमन नमस्कार करून आंबी नदीच्या प्रवाहात उतरलो.

अंदाजे अठरा ते वीस किलोमीटरची पायपीट झाली होती.आमच्यातल्या काही मंडळींनी लवकर येऊन फक्कड चहा बनवलेला पाहिला आणि "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" या प्रश्नाला "मी" असे वाटून गेले. गाडीत बसताच निद्रादेवी प्रसन्न झाली. वाटेत एक ठिकाणी गाडी थांबली आणि शेजारून "स्वारगेट-घोळ" हि "यष्टी" जाताना पाहिली. एवढ्या दुर्गम ठिकाणी, एवढ्या रात्रीचे, आणि टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्यांवरून तुफान गाडी हाणणाऱ्या ड्राइव्हर ला मनातच दंडवत घातला. अश्या लोकांकडे खरंच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारात पुण्यनगरी अवतरली.

एकंदरीत काय तर, सह्याद्री आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो, आपण आपल्या कुवतीप्रमाणे आयुष्याच्या ओंजळीत भरून घ्यायचं !



सोनकीचा बहर

रेडे खिंडीच्या दिशेने चढाई चालू.

रेडे खिंड

ताक आणून देणाऱ्या दापसरे गावातील आजी.

आभाळाचे पांघरून आणि दगडाची उशी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी.

दापसरे डोंगरावरून दिसणारा विहंगम नजारा.

सागर शिवदे

रविवार, ४ जुलै, २०२१

तळपेवाडी - बैल घाट - पेठचा किल्ला ( कोथळीगड ) - कौल्याची धार - तळपेवाडी

तळपेवाडी - बैल घाट - कोथळीगड  - कौल्याची धार - तळपेवाडी 





पावसाने सह्याद्री पर्वतरांगा हिरव्यागच्च होऊन नटल्यात. ढग थोडेसे खाली उतरून डोंगर शिखरांशी सलगी करू पाहतायेत. तळपेवाडीत लख्ख ऊन पडलय. शेतात काळ्याभोर जमिनीत भाताची रोपे तर वरती नाखिंदा टोकावर पवनचक्क्या त्याच लयीत डोलतायेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्यात, मग घराच्या डागडुजीची कामे चालू. गावातून धबधब्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली तेव्हा दक्षिणेकडे आसमंतात पेठच्या किल्ल्याचा ढगात हरवलेला मुकुट. गच्च कारवीच्या झाडोऱ्यामधून सुरु झाली बैल घाटाची उतराई. डोळ्यांची पारणे फेडणारा भीमाशंकर अभयारण्याचा आणि पेठच्या घाटवाटांचा नजारा आणि त्याचे अंतर बघून पोटात आलेला गलबला. 

चार तासांच्या चालीनंतर पेठ खिंडीत, कोथळीगडाच्या पायथ्याशी आलो आणि एवढ्या वेळ निर्मनुष्य जंगलात माणसांची चाहूल लागली. एका पुराण पुरुष भासणाऱ्या वडाच्या झाडाखाली पथाऱ्या पसरल्या आणि इलेक्ट्रोलची काही आवर्तने झाली. आता कोथळीगडाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. आंबिवलीवरून किल्ल्यावर येणारा लोकांचा महापूर बघून त्यात स्वतःला सामील करून घेतले. किल्ल्यावरून कौल्याची धार इथून स्पष्ट समांतर दिसत होती. किल्ला आधी झाला असल्याने पटकन आटोपून खिंडीतून डावीकडची वाट धरली आणि तळपता सूर्य डोक्यावर घेऊन सुरु झाली कौल्याच्या धारेची खडी चढाई. छातीचा फुललेला भाता थंड करायला मग इलेक्ट्रोल, खडीसाखर, लिंबू पाणी, काकड्या इत्यादी मंडळींची चढाओढ सुरु झाली. 


धारेवरून आता संपूर्ण प्रदेश चांगला दृष्टीक्षेपात आला होता. उजवीकडे बैलघाट , बैलदारा ( पायरीची वाट) तर कोथळीगड मागे पडत लहान लहान होत चालला होता. त्याच्या शेजारी लांबवर पदरगड, पुसटसा सिद्धगड आणि भिमाशंकर दर्शन देत होते. वांद्रे घाटमाथ्यावरून खाली उतरणाऱ्या पदरगडाच्या पोटातल्या वाटांचा आता अंदाज येत होता. अडीच तासांच्या कौल्याच्या धारेची चढाई कस पाहणारी होती. आता चढाई संपली असे वाटले कि दत्त म्हणून उभा पुढचा सुळका पायातले त्राण घालवत होता.  सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगा , दरीत कोसळणारे अभेद्य, अतिदुर्गम डोंगरकडे आणि निसर्गाची मुक्तहस्त सौन्दर्याची उधळण पाहताना मात्र जीव सुखावून जात होता.  माथ्यावर पोहोचताच पाण्याच्या ओहोळात तहान भागवली आणि पुढची दोन तासांची तंगडतोड करत तळपेवाडीत पालखी दाखल झाली. दोन घाटवाटांवर एक किल्ला फ्री म्हणत बारा तासात २८ किमीची जोरदार पायपीट झाली. 


एकंदरीत काय तर... जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !


तळपेवाडीतून धबधब्याच्या दिशेने जाताना ... 

तळपेवाडीतून सव्वा तासात माथ्यावर आल्यानंतर येथून होणारे कोथळीगडाचे प्रथम दर्शन. अजून एवढे अंतर कापायचे आहे. 
बैलघाट संपून किल्ल्याच्या माचीवर आलो. 

पेठ खिंडीतून दिसणारा अप्रतिम नजारा 

कौल्याच्या धारेची चढाई चालू ... 


उजवीकडे काहीतरी चमकतंय ते आंबिवली


वांद्रे कड्यावरील पवनचक्क्या 


पावसाळी ट्रेक म्हणून निघालो खरे पण ऊन्हानेच चांगला दम काढला. 

शेवटचा चढ 

तळपेवाडी माथ्यावर पोहोचलो तसे आभाळ दाटून आले. 





वाचत रहा. भटकत रहा!


शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

दुर्गदुर्गेश्वर रायगड परिक्रमा

दुर्गदुर्गेश्वर रायगड परिक्रमा.

दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हंटले कि आपल्याला वेगळेच स्फुरण चढते. इतिहासाची पाने ही अशी डोळ्यासमोर चाळवली जातात. टकमक टोक, जगदीश्वर मंदिर , हिरकणी बुरुज, महाराजांची समाधी ... हे सगळे बघताना काही क्षणांसाठी का होईना पण इतिहासात जाऊन जगता येते. आजचा आमचा बेत होता तो स्वराज्याच्या या राजधानीला प्रदक्षिणा करण्याचा. दुर्गदुर्गेश्वराची  परिक्रमा. पहाटे साडे पाच वाजता रायगडाच्या 'चित्त' दरवाज्यापासून भटकंती चालू केली आणि दुपारी दोनला तेथेच संपली.

पुण्यनगरीतून आदल्या दिवशी पाचाडला प्रयाण केले. पहाटे पाचाडला पोहोचलो तेव्हा जावळीच जंगल निद्राधीन झालेलं होत. चहा घेतला आणि उरली सुरली थंडी पळून गेली. चित्त दरवाज्याला पोहोचलो तेव्हा पूर्वेकडे आकाशात मंगलमय सोहोळा चालू झाला होता. गुलाबी आसमंतात टकमक टोक उठून दिसत होते. 






नारळ फोडून आणि शिवजयजयकार करून पुढचा ट्रेक चालू झाला. पूर्वेकडील आसमंतात आता केशरी झालर चमकू लागली होती. जंगलाही आता जागे होत होते.  कोवळ्या किरणांचा टकमक टोक कड्यावर वर्षाव होऊ लागला तसे त्याचे रांगडे रूप अभेद्य भासत होते. इथल्या कातळकड्यांमधून फक्त वाऱ्याला वर जाण्याची आणि पाण्याला भूस्पर्श करण्याची परवानगी आहे. महाराज म्हणाले होतेच- 

"राजा खास जाऊन पाहता , गड बहुत चखोट ... कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव उंच ... पर्जन्यकाळी या कड्यांवर गवतही उगवत नाही ... पाखरू बसू म्हणेल तर जागा नाही ... तख्तास जागा हाच गड करावा"

टकमक टोक 

असो , परिक्रमेस सुरुवात झाली आणि सुमारे सात तासांच्या चढाईत पायाचे,गुडघ्याचे,मानेचे आणि पाठीचे अगणित व्यायाम झाले. युथ हॊस्टेल, महाड या ग्रुपचे लोक दरवर्षी हा मार्ग तयार करतात आणि खुणा करतात असे समजले पण लॉकडाऊन नंतर सुमारे वर्षभर तेथे कोणी न फिरकल्याने आणि निसर्ग वादळामुळे सगळ्या वाटा मोडून आणि ढासळून गेल्या आहेत. कुठल्या खिंडीत जायचंय हे माहित असल्याने मग काय .... कोयत्याने झाडे कापत, नळीच्या वाटेने घसरत, तीन फूट झाडांच्या बोगद्यातून रांगत, वाटेतल्या काटेरी झाडांचा थोड्या थोड्या वेळाने नियमित प्रसाद घेत तंगडतोड चालू झाली. असंख्य पडलेली झाडे आणि जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेले वेलींचे साम्राज्य वाटा अडवत होत्या. पायात वेली अडकून कपाळमोक्ष व्हायचे काही प्रसंग झाले म्हणून खाली बघून चालायचे तर डोक्यावरच्या फांद्या टोपी उडवायच्या.त्यातून पाठीवरच्या बॅगेने 'मी प्रत्येक झुडुपात अडकणार' असा चंग बांधलेला. मग नमतं घेऊन गुडघ्यात वाकून चालायच्या करामती करायच्या. या सगळ्यात दोन्ही बाजूंनी काटेरी झाडे मी मी म्हणत सलगी करत होतीच.अर्ध्यापर्यंत पोहोचलो तेव्हा काहींच्या चेहेऱ्यावर , हातावर बँडेजचा दागिनाही चढला होता. 


सोनसळी सकाळ 


हे सगळे चालू असताना निसर्गाची किमया जाणवत होतीच. जंगल अनुभवण्यात मोठी मजा आहे. वर्षानुवर्ष एकमेकांत गुंतलेल्या वेलींचे नैसर्गिक झोपाळे, अग्निशिखा (कळलावी) झाडाची जंगलास आग लागल्यासारखी दिसणारी लालभडक फुले ( हि फुले प्रसूतीकळा येण्यासाठी वापरतात म्हणून स्थानिक भाषेत कळलावी म्हणतात ) , झाडावर ऊन खात बसलेल्या brown tree (ब्राउन कॅटस्नेक) सापाचे दर्शन, किड्यांनी घर म्हणून मिटून घेतलेली एका विशिष्ट झाडाची काही पाने, वानरांची पळापळी. मोठमोठाली वारुळे, थोडासा झाडोरा मोकळा झाला कि सह्याद्रीचे पहारेकरी - लिंगाणा आणि कोकणदिवा किल्ल्यांचे विहंगम दर्शन. हे सगळे अनुभवणे म्हणजे निव्वळ मजा.

ब्राउन कॅटस्नेक 

कोकणदिवा 

लिंगाणा 




हातावर, चेहेऱ्यावर व मनात  त्याची मोहोर उमटवित ट्रेक पूर्ण झाला. सध्या पूर्वेकडील खिंडीत जाणारी वाट मोडून गेल्याने प्रदक्षिणा काही पूर्ण होऊ शकली नाही. पण डबल तांगतोड करणारा १३ किमीचा ट्रेक मात्र छान झाला. संपूर्ण जंगलातून भटकंती असल्याने फोटो जास्त काढता आले नाहीत. अंदाजे अडीचच्या सुमारास रायगड पायथ्याशी पोहोचल्यावर मस्त गारेगार ताक आणि बाकरवाडीने क्षुधा शांती केली. पाच वाजता मंडळी पुण्यनगरीस मार्गस्थ झाली आणि आणखी एका पल्लेदार भटकंतीची सांगता झाली. 



नकाशा माहितीसाठी आंतरजालावरून साभार 


सर्व वाचकांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा. वाचत राहा , अभिप्राय कळवत राहा. 

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कुंडलिका व्हॅली ट्रेक - सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट

 

कुंडलिका व्हॅली ट्रेक 


 सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट -  परातेवाडी 





शुक्रवारी पृथ्वीतलावरच्या बेरोजगार लोकांच्या संख्येत एकने आमची भर पडली आणी रिकामटेकडी मंडळी कुंडलिका व्हॅली ट्रेक ला मार्गस्थ झाली. पावसाळ्यात अनेक वेळा या दरीचे ओले-कंच रूप वरून पहिले होते पण त्या दरीत कधी जाणे होईल असे वाटले नव्हते. नशिबाने आणि डोंगरदेवांच्या कृपेने आज काय तो योग आला आणी सह्याद्रीचं रांगडं रूप पुन्हा एकदा मनात घर करून गेलं. 

पाच,सहा तास मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या  मारत दरीत पोहोचायच, पावसामुळे आणी कुंडलिका नदीच्या प्रवाहामुळे दरवर्षी मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल करायची, वाटेतले भले मोठाले रॉक पॅच, पाठीवरच् सामान आणि सुटलेले पोट हे दोन्ही घेऊन उतरायची कसरत , हिवाळ्यातही वाहणारे धबधबे आणी बारमाही पाण्याचे प्रवाह, तळ दाखवणाऱ्या हिरव्यागार पाण्यात पोहणे, दोन पुराणपुरुष भासणाऱ्या डोंगरांच्या घळीतून यथेच्छ भटकायचं, पूर्णवेळ सोबतीला अंधारबन, कुंडलिका आणी नावजी सुळके असतातच. पौर्णिमेचा चंद्र सोबतीला घ्यायचा आणी स्लिपींग बॅग मध्ये शिरून आकाशात ताऱ्यांचे मनोमन आकार बनवायचे, दरीच्या उत्तरार्धात सावळ घाटाच्या पुरातन पण सध्या वापरात नसल्याने मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत खडी चढाई सुरु करायची आणी कितीतरी हजारो वर्षांपूर्वी कोणी अनामिकाने कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणी खोदीव पायऱ्या बघून अचंबित व्हायचं. 

जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !



असो , तर कुंडलिका घळीचा हा ट्रेक मुळशी तालुकातल्या पिंपरी गावापासून सुरू होतो. सिनेर खिंडीमधून वाट काढत आपण कुंडलिका घळीमध्ये उतरतो. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो आणी पुढे भिरा धरणात या पाण्याने विद्युतनिर्मिती होते. याच प्रकल्पाचे पाणी सकाळी जेव्हा सोडले जाते तेव्हा निसर्गाने पाण्याचा फोर्स वाढतो आणी कोलाड जवळ या पाण्यावर राफ्टिंग केले जाते. 

घळीत पुढे जातानाच सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीत मोठमोठाले दगड-धोंडे निश्चल ऊन खात पडलेले असतात. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठमोठाले कातळ कापून काढलेले दिसतात मग हीच वाट पकडायची आणी गणपतीचे नाव घेत या दगडांवर उड्या मारत आपली मार्गक्रमणा चालू ठेवायची. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. थोडक्यात काय तर कुंडलिका व्हॅली आपल्याला मान वर करायलाच चान्स देत नाही. 




सुमारे ९ वाजता घळ उतरायला सुरु केली आणी रमतगमत मंडळी निघाली. वाटेत दिसणारे नजारे मात्र कमाल होते. असंख्य दगडांच्या राशी, त्यात जमलेले नितळ आणी हिरवेगार पाण्याचे प्रवाह, डोंगरांच्या कडयांवर नैसर्गिकपणे तयार झालेल्या काही प्रतिकृती , निर्मनुष्य असा प्रदेश आणी दूरवर दिसणारे घळीचे शेवटचे टोक बघत सुमारे ५ तासांची पायपीट झाली.आज दिवसभर आकाश ढगाळ असल्याने सूर्यनारायचे दर्शन फारच कमी झाले. मध्येच जेव्हा नारायण दिसायचे तेव्हा झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा, सोनसळी गवत किरणे परावर्तीत करू लागायची आणी शांत पाण्याच्या डोहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. हिवाळ्यातही असलेले धबधबे मिळून एक संपन्न निसर्गसोहोळाच बनून जायचा. आजही दिसणारे धबधबे, पावसाळ्यात त्यांचे रौद्र रूप दाखवत असतील हे नक्की. 










पाच-सहा तासांच्या वाटचालीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सामान / तंबूची मांडामांड झाली आणी मंडळी भेळ करायच्या कार्यक्रमात गुंतली. येतानाच लाकडे गोळा करून आणल्यामुळे शेकोटीची सोय झाली .नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली. ड्युटी संपवून नारायण डोंगरात लुप्त होऊ लागले तरी किरणांचा कटाक्ष काही चुकार ढगांमधून जाणवत होता.आकाशाच्या छपराखाली आजची रात्र अविस्मरणीय होणार होती ! 




जिथे आमची पथारी पसरली होती त्या शेजारूनच पाण्याचा प्रवाह वाहत होता. थंडीशी दोन हात करायला शेकोटीचा कार्यक्रम झाला. सगळ्या ग्रुप मेंबर्सची ओळखपरेड झाली आणी काही दिग्गज मंडळींशी  भेटी-गाठी झाल्या. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून हा ट्रेकचे नियोजन केले होते पण चांदोबा अजूनही ढगांमध्येच चाचपडत होता. जशी मंडळी निद्राधीन झाली तशी संपूर्ण दरीत निरव शांतता पसरली. स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आकाशातले कवतिक न्याहाळणे एवढाच काय तो उद्योग उरलेला. मध्यरात्री संपूर्ण आकाश निरभ्र झाले आणी चांदोबाने दर्शन दिले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध खाली दरीतून वरती आकाशाकडे बघताना, डोळ्यासमोर चंद्र डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणा करत आणी पाठीमागे तार्यांची रांगोळी काढत जाताना दिसला. केवळ शब्दातीत असा अनुभव !









सकाळी उजाडताच आवराआवर करून पुढची वाटचाल चालू झाली. न्याहारी आटपून पुढे निघालो आणी पुढे होते अजून एक सरप्राईज! मोठाले पाण्याचे डोह! मंडळी पाण्यात उड्या  मारायला वाऱ्यासारखी सुटली.गारेगार पाण्यात पोहून जरा आत्मा शांत करून घेतला. इथेच प्रत्येकी दोन लिटर पाणी भरून घेतले. एकदा का सावळघाट चढाई सुरु झाली कि कुठेही पाणी मिळणार नव्हते. 





आता लक्ष्य होते घाटमाथ्यावरचे परातेवाडी गाव आणी मध्ये होता सावळ घाटवाटेचा थरार ! सह्याद्रीतल्या अश्या अनेक प्राचीन घाटवाटा आज मात्र वापर नसल्याने "बिकटवाट" बनल्यात. राबता नसल्याने आणी प्रचंड पावसाने या प्राचीन घाटवाटा मोडून जातात. हजारो वर्षांपूर्वी कोणी अज्ञात लोकांनी खोदलेल्या उभ्या कातळातील पायऱ्या, पाण्याचे कुंड पाहिले की वाटते, सह्याद्रीची भटकंती म्हणजे फक्त डोंगरांवरची तंगडतोड नाही तर हि आहे इतिहासाची जिवंत सफर! 

आता आव्हान होते सावळ घाटाची कुंडलिका दरीत उतरलेली सोंडशोधण्याची  शोधण्याची! दरवर्षी पावसाने वा भौगोलिक बदलाने या वाटा मोडतात किंवा सापडत नाहीत. इथे गरज असते ती अनुभवाची ! मी ज्या ग्रुप बरोबर गेलो होतो त्या सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे शिलेदार गेली २० वर्ष सह्याद्रीच्या या घाटवाटांमध्ये मनमुराद भटकत आहेत. अनुभवी ट्रेक लिडरने दरीतुन डोंगरात घुसलेली वाट शोधली आणी कुठे जायचंय हे सांगितले आणी मग हातात कोयता आणि काठ्या घेऊन चालू झाला सावळ घाटवाटेचा शोध !




तीव्र चढण चांगलीच दमछाक करत होती. वाटेचा अंदाज घेत आणी पूर्वीच्या खुणां शोधत सर्व जण निघालो. वाटेतील झाडे झुडपे मान वर करू देत नव्हती त्यांची काटछाट करत, एकमेकांना हाकाऱ्या देत, वाटेतील दगडांवर मागच्या लोकांसाठी खडूने खुणा मारत ७० अशांश कोणातली खडी चढाई सुरु होती. वाटेत निसटते धोंडे आले, घसारा आला वा झाड पडलेले दिसले की मग मागच्या फळीतले उत्साही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाच्या शोधात पुढे व्हायचे. 





दोन तासांच्या चढाईने डोंगरांच्या घळीत पोहोचलो. आणी अहो आश्चर्यम!  उभ्या कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी. पाणी सध्यातरी पिण्यायोय नाही. एकदा का ही टाकी दिसली की, आपले सावळ घाटाचे दिव्य पार झाले समजावे. शेवटच्या टप्प्यात बांबूची वने लागतात आणी इथे तेथून डावीकडे गेल्यास लागतात खोदीव पायऱ्या आणी मोठाली पाण्याची टाकी. बघता क्षणी मन इतिहासात जाते. कोणी अनामिकाने कितीतरी हजारो वर्षांपूर्वी वाटसरूंच्या सोयीसाठी या पायऱ्या खोदल्या असतील ज्यावरून आज आपण प्रवास करतोय. इतक्या उंचीवर खोदलेल्या आणी अजूनही तुडुंब भरलेल्या टाक्या, त्याकाळी किती लोकांची क्षुधा शांत करत असतील?





इतिहासाचा विचार करता करता थोडे पुढे गेले की निसर्गाचे जे काही रुपडे दिसते त्याची तुलना कशाशीच नाही. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच आपल्या हातात! 









सामान खाली ठेऊन बराच वेळ निसर्गातील करामती बघत राहिलो. बरोबरची मंडळी पुढे निघून गेली होती. नाईलाजाने काढता पाय घेऊन परातेवाडी च्या दिशेने चालू लागलो. घाटमाथ्यावर येताच लाईटचे खांब दिसू लागतात त्याच्या दिशेने परातेवाडी गाव लागते. गावात पोहोचल्यावर थोडीशी पेटपूजा झाली. पुढे आलेल्या मेंबर्सने सगळी तयारी करून फक्कड मुगाची खिचडी बनवली होती. मनोमन त्यांचे आभार मानत  दोन घास खाऊन पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.





एकंदरीत कमाल असा अनुभव होता. खूप सारे सरप्रायजेस आणी निसर्गाचे लोभस रूप. 
जगणातल्या अश्या अविस्मरणीय क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य !

वाचत रहा ! 
खूप दिवस निद्रित अवस्थेत असलेल्या या ब्लॉगला, या ट्रेकच्या निमित्ताने नवसंजीवनी मिळाली आहे. आपले अभिप्राय नक्की कळवा.