रविवार, ७ डिसेंबर, २०१४

मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत

मारुतीचे जन्मस्थान:  अंजनेरी पर्वत 
"बरेच दिवस ट्रेक ला जायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता.आणी मग तो कसा जुळून आला." अश्या आणी तत्सम वाक्यांनी टिपिकल सुरुवात न करता सरळ प्रवास अनुभव मांडायला चालू करतो. हल्ली लिहायचा घाट घालणे आणी मुळात त्यासाठी डोके चालवणे दुरापास्त झाले असल्याने याआधी काही ट्रेकचे फक्त फोटो डकवले होते. आताही काही वेगळी स्थिती नाही पण थोडेसे "समालोचन" लिहून नुसते फोटो बघणार्यांना हिरमोड  होईल याची काळजी घेतो.
 असो, तर यावेळचा प्लान होता त्रंबक रेंज मधील अंजनेरी पर्वत आणी हरीहर हर्षेगड किल्ला. 
खरा प्लान फक्त हरीहरच होता फक्त पण जरा शोधल्यावर कळले कि अंजनेरी पण ऑन रोड आणी जवळच आहे आणि तेथे मारुतीचे जन्मस्थान असून रामायणकालीन सुमारे २००० वर्षे जुनी हेमांडपंथी मंदिरे आहेत.
म्हणून मग प्लान चेंज करून पहिला अंजनेरी किल्ला केला आणि मग हरीहर किल्ला.

तसेही मारुतीला जायचा उद्देश देवाचे दर्शनाखेरीज वेगळाच होता पण तो आत्ता सांगत नाही. :)

शिवाजीनगर स्टेशन वरून रात्री शेवटची सव्वा दहाची ( १०:१५ ) त्र्यंबक यष्टी पकडली आणी खिडकी मोकाट सोडून झोपून घेतले. डायवर काका जोरदार गाडी मारत होते. टकलूची सुट्टी जोडून आल्याने आणी नवरात्र उत्सव चालू असल्याने त्र्यंबकेश्वर जाणार्यांची बर्यापैकी गर्दी होती. पहाटे ३ ला गाडी नाशिक ला आली तर तर लोक लोंढ्याने घुसत होते. कमाल आहे लोकांची !!

पहाटे ५ ला गाडी त्र्यंबक पोहोचली लगेच दुसरी त्र्यंबक-नाशिक गाडी पकडून अंजनेरी फाटा उतरलो. अजून पुरेसे उजाडले नव्हते. अंधारात एक गावकरी दिसला त्याला झोपायची सोय विचारताच त्याने एका मंदिराकडे बोट दाखवले. लगेच मंदिरात पोहोचून कसले मंदीर आहे ते न पाहताच आमचा डेरा टाकला.

तासभर झोप झाली आणी पुरते उजाडले असल्याने उठून बसलो. बरोबर त्र्यंबक-नाशिक रस्त्याच्या मधोमध असलेल्या आणि आता स्तलांतरित होत असलेल्या मंदिरात आम्ही झोपलो होतो. बसल्या जागेवरूनच मागे वळून पाहतो तर आमचा ट्रेकी दोस्त नवीन लाल शर्ट घालून हिंडत चालला होता.

याच मंदीरात आम्ही पसरलो होतो. हे कार्तिक स्वामींचे मंदीर होते. त्याच्या समोरच अजून एक प्रशस्त असे गणपती मंदीर होते.
कार्तिक स्वामीं मंदीर आणी पाठीमागे अंजनेरी डोंगराचे नवरा नवरी सुळके. 

पांघरूण आवरते घेतले आणी फोटो चालू केले. 

कार्तिक स्वामी मूर्ती 

गणपती मंदिरात असलेले शेंदूर लावलेली विरगळ

काका यष्टीची वाट बघत होते. त्यांना बोलते करून सगळी माहिती काढून घेतली.

नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने काही भाविक लोक देवीची कावड वाजतगाजत घेऊन निघाले होते. एक टेम्पो, त्यात मोठे स्पीकर, देवाची वाटत नसलेली पण असलेली धतींग गाणी आणी त्यामागे चालणारे असंख्य भाविक. खांद्यावर कावड, पाय अनवाणी, भगवी वस्त्रे आणी जोडीला देवीचा जागर. कमाल वाटत होते बघताना !!
त्र्यंबकमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. त्यामुळे तेथून दोन तांब्यात गोदावरी उगमाचे पाणी भरून घेऊन ते त्र्यंबक ते वणीची देवी असे जवळ जवळ १०० किमी अंतर चालत आणी ते पण चप्पल न घालता जातात . आणी मग १-२ आठवड्याने तेथे पोहोचल्यावर त्या पाण्याने देवीला अभिषेक करूनच मग अंघोळ करतात.
१०० किमी चालत ???? आपल्याला गाडीने जाणे होत नाही.

गावात शिरलो. छोटेसे तळे आहे गावात, तेथे फ्रेश झालो आणी अंजनेरी गावातील बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सिद्ध हनुमान मंदिरात आलो. ही हनुमानाची मूर्ती १५ फुट उंच आहे. त्याची गदाच ६ फुट आहे. :)
आम्ही दर्शन घेऊन पाणी भरून घेतले. आणी पुजारीकाकाना परत कसे जायचे आणी इतर माहिती विचारून अंजनेरी किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.


सिद्ध हनुमान मंदिरापासून मागे वाट जाते ती पकडून गावात गेलो. काही ढाबे आहेत गावात ते नुकतेच उघडत होते म्हणून जरा वेळ घालवला आणी एका हॉटेलात पोह्यांची ऑर्डेर दिली. पोहे खाऊन पकलो असलो तरी आज हे पोहे मस्त लागत होते कारण भूक लागली होती.
समोरच अवाढव्य असा अंजनेरी पर्वत उभा होता. "पर्वत" हा शब्द ऐकला की मनात धडकीच भरते. पण हा त्यामानाने ज्युनीअर म्हणता येईल.

कड्यासारखा दिसतोय तो डोंगर चढून त्यावर अजून एक डोंगर आहे. बरोबर ८:३० ला चढाई चालू केली आणी मग रमत गमत फोटो काढत, मंदिरे शोधत मंडळी निघाली. त्यात एक बरे कि ३च लोक असल्याने वेळ जायचा प्रश्नच नव्हता. जे सुटलो ते डायरेक्ट पायथ्याशी असलेल्या अंजनीमातेच्या मंदिरातच.

अंजनीमातेच्या मंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्याने आम्हाला अजून डिटेल्स दिले. २००० वर्षापूर्वीची मंदिरे जी आम्हाला किल्ला उतरून शोधायची होती ती लोकेट करून दिली. वरती काय काय पाहण्यासारखे इथपासून ते हनुमानाचा जन्म कसा झाला आणी किल्ल्यावरील तळ्याचा आकार डाव्या पायाच्या पंजासारखा आहे तो कसा झाला इथपर्यंत माहिती पुरवली.

त्यांचा नमस्कार घेऊन किल्ल्याच्या मुख्य वाटेला लागलो. प्रशस्त वाट आहे. बेसपर्यंत गाडी येते. तेथे कॅमेरा साठी २५ रुपये चार्ज लिहिलेला होता म्हणून कॅमेरे ठेऊन दिले. पण "वसुली" करणारे कोणीही दिसले व आले नाही सो परत कॅमेरे परत बाहेर !

गावातील मोठे तळे. पाणी भरपूर आहे आणी मंदिरांची तर रेलचेल आहे. हनुमानाची ६-७ मंदिरे तर वाटेतच पाहिली. शंकराची पुरातन मंदिरे पण २-३ लागली. अजून वरती एक बुद्ध पुतळा होता. काही जैन मंदिरे होती. या गावात १०८ पुरातन हेमांडपंथी स्थापत्य शैलीने बांधलेली मंदिरांचा इतिहासात नोंद आहे. पण आता त्यातील काहीच अस्तित्वात आहेत.

नवरा नवरी सुळके डावीकडे सोडत धोपट वाट चालत राहिलो.

डोंगराच्या खाचेतून खिंडी सदृश्य वाट वरती किल्ल्यावर घेऊन जाते. सिमेंट च्या पायर्या बनवलेल्या आहेत. त्या सोडून हि हौशी लोक उगाच कडे चढत बसले होते. :)

सुरुवातीलाच एक जैन गुहा असून त्यात बरीच शिल्पे कोरलेली आहेत. हे जैन लेणी म्हणून परिचित असून १०८ जैन लेणी आहेत असा उल्लेख आढळतो.
नक्की काय आहे ते झेपले नाही पण अंधार असल्याने फ्लाश मारून काहीतरी व्यर्थ प्रयत्न केला गेला.
गुहेच्या तोंडाशीच वरती २ फुट व्यासाचे चक्र कोरलेले आहे. 

या सिमेंटच्या पायर्यांनी १५-२० मिनिटात वर पोहोचलो. वर पोहोचताच गार वारा आणी लांबलचक पठार चालू झाले. अजून अर्धा तासाच्या पायपिटीनंतर अंजनी माता मंदिर आले. येथे आधीच बरेच लोक दम खात होते. सणांचे दिवस आणि जोडून सुट्टी असल्याने बरेच लोक कुटुंबासहित आले होते.


या मंदिरापासून पुढे अजून एक तास चालून गेलो तर एक अजून तळे होते. पायथ्याच्या अंजनी मातेच्या मंदिरातील पुजारी काकांनी सांगितले होते की "या तळ्याला सरळ न जाता प्रदक्षिणा मारून वरती जा. या तळ्याला प्रदक्षिणा मारली की ती अंजनेरी आणी त्र्यंबक मधील ब्रह्मगिरी ला प्रदक्षिणा मारल्यासारखे आहे. " 

या तळ्याचा आकार हा डाव्या पायाच्या पंजा सारखा आहे. हनुमानाने सुर्य पकडायला येथून झेप घेतली तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा आकार उमटून त्याचे आज तळे आहे असे लोकांकडून कळले. 

जरा फ्रेश झालो तळ्यात आणी प्रदक्षिणा मारून एका आश्रमात आलो. 

येथे एक बर्यापैकी मोठा आश्रम असून मस्त परीसर आहे. पाणी वैगरे सोय आहे तसेच राहण्याची सोयची होऊ शकते. तेथे बसून थोडेसे जेवण पदरात पडून घेतले आणी पाठीवरची वजने पोटात शिफ्ट करून सीता गुंफा दिशेने चालू लागलो.

सीता गुंफा - या गुहेतही गणपती हनुमान यांच्या मुर्त्या आहेत.

तेथून वर चढून आलो आणी पायर्यांची चढण चालू केली. 

वरून खाली बघितले तर खरच त्या तळ्याचा आकार हा डाव्या पायाच्या पंजासारखा आहे. मला फार कौतुक वाटल्याने आणी मस्त स्पॉट असल्याने येथे बरेच फोटू काढले गेले.

तळ्याच्या शेजारीच जमिनीत एक छोटेखानी भुयार खोदून या महाशयांनी आपली सोय केली होती. आमच्या आवाजाने "कोण शिंचे आलेत झोपमोड करायला?" असा लुक टाकत टेहळणी चालली होती.

या महाशयांनी आपली पूर्व-वस्त्रे तशीच टाकून नवरात्रीची नवीन वस्त्रे धारण केली असावीत. सापाची कात घरात ठेवली की संपत्ती वाढते असे ऐकले होते, पण ती कात मी घरी लावली असती तर मला आहे त्या वस्त्रानिशी दुसरे भुयार शोधावे लागले असते.

वाह ! कमाल! दुसरे शब्दच नाहीत. टाच आपटून टोपी काढून salute निसर्गाला !

थोडेसे चालून सुमारे १ तासात आम्ही अंजनेरी मंदिरात पोहोचलो.

सभोवताली कर्दळीचा फड जमला होता आणी पूर्ण ओसाड पठारावर एकच भगवा फडफडत होता.

अंजनी मातेची मूर्ती आणी शेजारी जो दगड आहेतो बाळ हनुमान . 

मंदिरात थोडा वेळ टेकलो. मग उगाच हौस करत जप करत बसलो. काही काळासाठी तिन्ही ट्रेकर मंडळी ध्यानस्थ झाली. जोरदार वारा अंगाला झोंबत होता आणी "पवन पुत्राय धीमही" नाव सार्थ करत होता.


मंदिरापासून आजूबाजूला अशी अनेक दगडांची रचलेली रास दिसत होती. लोक नवस म्हणून अंजनीमातेला इच्छा बोलून एकावर एक दगड रचून ठेवतात. जोपर्यंत नैसर्गिकरित्या हे दगड पडत नाहीत तोपर्यंत घराचे सुख अबाधित ठेव. असा काहीतरी अर्थाचे ते आहे.

आजूबाजूचे मनोहारी दृश्ये डोळ्यात साठवत आता परतीची वाट पकडली. लवकर सूर्यास्त होण्यापूर्वी खाली उतरून जाऊन गावातील अतिप्राचीन हेमांडपंथी मंदिरे बघायची होती. किल्ला उतरतानाच काही मंदिरे लोकेट करून त्यादिशेने मोर्चा वळवला. 


खाण्यापिण्याची सोय अंजनेरी गावात होऊ शकते. आणी झोपायची सोय गावात, पठारावरील अंजनी मातेच्या मंदिरात होऊ शकते.

उतरताना काही भन्नाट निसर्गचित्रे मिळाली. ती आणी रामायणकालीन मंदिराबद्दल दुसऱ्या भागात.

लोभ असू द्या.
सागर
-----------------------------------------------------------------------------------------------------
पुढचे लेख:
२. रामायणकालीन प्राचीन मंदिरे
३. हरीहर किल्ला
४. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
------------------------------------------------------------------------------------------------------

रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

कोकणदिवा

कोकणदिवा

एखादा रविवार पकडून बाईक पिदडवत कुठेतरी भटकून यायचे म्हणून यावेळी कोकणदिवा जायचा प्लान केला. याधीच्या रविवार भर दिवाळीत सारसबागेतील हिरवळ डावलून लिंगाणा आणि रायलिंग पठारावरची हिरवळ बघायला एकटाच गेल्याने जरा सोलो ट्रेकिंग करायचा कॉन्फिडन्स वाढला होता. 

यावेळीही सकाळी जास्त लवकर उठण्याचे कष्ट न घेता निवांत ८ वाजता उठून निघालो. थोडेसे पाणी आणि खायला घेऊन बाईक मारत खडकवासला-> शिवणे-> कोंढवे धावडे ->कुडजे -> निलकंठेश्वर-> पानशेत-> घोल ->गारजाई पर्यंत पोहोचलो.

पानशेत पर्यंत जाताना, निलकंठेश्वर फाटा फुटतो तेथे एक पांडवकालीन शिवमंदिर आहे. मंदिर खूप काही खास नसले तरी शिवलिंग आणी मंदिराबाहेरील विरगळ मात्र बघण्यासारखी आहे.


येथून पानशेत जवळपास ६ किमी असून मध्ये एक छोटा तलाव लागला. बरेच बगळे व तत्सम पक्षी जमले होते. आजूबाजूला डोंगररांगा, निर्मनुष्य रस्ता एकदम निरव शांतता.

मी गाडी लावताच अर्धे पक्षी उडून गेले. मोठी लेन्स नसल्याने फोटोसाठी जास्त प्रयत्न न करता काही बळच क्लिक मारले.

सुमारे ४ तासात मी "घोल" या कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. पानशेत पासून रस्ता बरा असला तरी आजूबाजूला मस्त हिरवागार डोंगररांगांच्या कुशीतून वळणे घेत जाताना बाईक दामटवायला मजा येते.

'घोल" पासून "गारजाई" गाव जवळपास ७-८ किमी असून घोळ पासून आधी पायवाटेने चालत जावे लागे. आता नुकताच कच्चा रस्ता झाल्याने बाईक जाऊ शकतात.
बाईक पंक्चर वैगरे झाली कि मात्र मजा आहे. ८ किमी ढकलून घोल गावात आणून मग दुसर्या दिवसाच्या ST ची वाट बघून त्यात गाडी टाकून पानशेत लाच पंक्चर काढून मिळते. सो टायर चांगले असतील तरच हुशारी करण्यात अर्थ आहे .

गारजाई गावातून रस्ता विचारून निघालो खरा, पण ३-४ तास शोधूनही काही सापडले नाही. GPS चालू केला पण कुठे आहोत आणि कुठे जायचे काहीहिऊ पत्ता लागेना. शेवटी ३ वाजले आणि आहे तेथून परतीची वाट पकडली.

उत्तुंग डोंगररांगा आणी पूर्णतः निर्मनुष्य प्रदेश. कुत्रे सुध्दा नाही कुठे. बराच भटकलो. एका खिंडीत जेवण करून परत वाट शोधायला निघालो पण २-३ तास भटकत कुठेतरी तिसरीकडेच चाललो होतो. शेवटी एकट्याला भीती वाटायला लागली सो गप निघालो परत. येऊ परत पावसाळ्यात आता.

कोकणदिव्यावर न जायचा/जाणारा एक रस्ता मला माहित झाला. आता किल्ल्यावर जायचा पुढच्या वेळी शोधू.

घोल गावातील काही बायका काहीतरी चाळत होत्या. काय चाळत होत्या ते मात्र कळले नाही. जाताना मात्र मला थांबवून त्यांनी विचारले कि या कच्या रस्त्यांनी का गाडी घेऊन गेलास? गाडी खराब झाली तर काय करशील अश्या ठिकाणी?
मी नुसताच हसलो पण जाताना आणि येताना मनात प्रचंड धाकधूक होती.


कर्दळीचा फड जमला होता.

पानशेत धरणाचे काही फोटो काढायला थांबलो. मस्त निळेशार पाणी होते. वाळलेले गवत पायाने मोडत पुढे चाललो होतो. एका ठिकाणी थांबून खालचा फोटो काढला अन तोच मागे काहीतरी सळसळ आवाज झाला. मागे बघतो तर भलामोठा घोणस ऊन खात पडलेला होता आणि माझ्यामुळे त्याची वामकुक्षी खंडित झाली होती.

"सळसळ" या आवाजाची मी प्रथम अशी अनुभूती घेतली. अजूनही तो आवाज कानात बसलाय. तो इतक्या झपकन निघून गेला पण मी मात्र असा टरकलो की जी काय बाईक काढली तेथून ते डायरेक्ट कोथरूड.

हा ब्रिज मस्त आहे. कुद्जे गावाहून पुढे आहे थोडा.

सुर्यनारायण आपली ड्युटी संपवून आपला अल्टरनेटीव ला handover देऊन चालले होतो. पण एक मस्त फोटो आला.

बाकी खूप खास लिहिण्यासारखे नाही. चेहेरा काळा पडायला या ट्रेक ने अजून थोडी मदत झाली आणी पुढच्या आठवड्यासाठी औताला जुंपून घ्यायला फ्रेश होऊन नव्या दमाने आम्ही सज्ज झालो.

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

रायलिंग पठार, सिंगापूर नाळ, लिंगाणा.

रायलिंग पठार, सिंगापूर नाळ, लिंगाणा.
दिवाळीचा ( अगदीच वेळ जात नसल्याने) उपक्रम: सिंगापूर येथे फराळ वाटप......
सिंगापूर गावात फराळाच्या पिशव्या वाटल्या मुलांना. पण नंतर लगेच सटकलो कारण लाडू कडक झाले होते. थांबलो असतो तर .............  
मस्त दिवाळीचे दिवस होते. दिवाळीचा तिसरा पाडव्याचा दिवस होता. घरी संध्याकाळी कार्यक्रम असल्याने सकाळी सारसबागेत हिरवळ पाहायला जायचा प्लान ठरलेला होता. पण मागील वर्षाचा अनुभव पाहता सारसबागेतील हिरवळ बघण्याऐवजी रायलिंग पठारावरील हिरवळ जास्त खुणावत होती. म्हणून मग सकाळी सकाळी गाडी काढून एकटाच निघालो हिंडायला. 
रायलिंग पठार आणी तेथून समोर काळजात धडकी भरवणारा लिंगाण्याचे ते अभेद्य रुपडे याची देही याची डोळा पहायचे फार दिवस मनात होते. फोटो बघून तर केव्हा मुहूर्त लागतोय असेच वाटत होते. रायलिंग कडे जाताना लागणारे सिंगापूर नावाच्या गावाबद्दलही उत्सुकता लागली होती. एकदाचा काय तो निकाल लावावा म्हणून बाईक काढली अन सुटलो पाबे घाटाकडे. 
दिवाळीचे दिवस असल्याने घरी फराळ बनवलेला होताच म्हणून मग त्याच्या काही पिशव्या बनवून घेऊन निघालो. सिंगापूर गावात जेथे मी गाडी लावणार होतो तेथील मुलांना फराळ वाटायचा एकट्यानेच घेतलेला उपक्रम पार पडायचा होता. जायचे कसे वैगरे माहिती आधीच काढली होती. 
कोथरूड->खडकवासला-> सिंहगड -> सिंहगडाच्या मागून पाबे घाट-> वेल्हे (तोरणा) -> तोरण्याच्या मागून केळद रोडने भट्टी खिंड -> हरपुड फाटा -> सिंगापूर.
सकाळी सकाळी खडकवासला धरण.
पाबे घाटातून दिसणारा तोरणा किल्ला.
तोरण्याची बुधला माची मागील बाजू.
केळद रस्त्याने भट्टी खिंड ओलांडून पुढे आलो कि हा बोर्ड दिसतो. या बोर्ड पासून लगेच पहिला उजवीकडे कच्चा रस्ता जातो तो सिंगापूर ला जातो. दुचाकी आरामात जाऊ शकते. अर्थात टायर चांगले असतील तर. :)
सिंगापूर रोड वरून दिसणारा तोरणा बालेकिल्ला आणि बुधला माची.
लिंगाणा प्रथम दर्शन कुसारपेठ गावातून.
दूरवर फक्त आणी फक्त डोंगररांगा. आणि माणसाचा पत्ताच नाही कुठे. 
खिंडीपासून सुमारे १ तासात सिंगापूर गावात पोहोचलो.
सिंगापूर गावातील टुमदार घर : जेथे आजतागायत रस्ता आणी वीज दोन्हीही नव्हते. ८ किमी पायपीट करून चालत यावे लागायचे. नुकताच मातीचा कच्चा रस्ता बनला आहे तोच लोकांनी डोंगर फोडून प्लॉट पडायला सुरवात केलीये. मोहरी गावात अजूनही ३ डोंगर ओलांडूनच जावे लागते.






लिंगाणा आणी पाठीमागे दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ला. शार्प कडा दिसतोय ते टकमक टोक.







लिंगाण्याला चढणे अशक्य तर लांबूनच चकलीची टोपी
.





या डोंगररांगांच्या कुशीतच मढेघाट, शेवत्या घाट , सिंगापूर नाळ लपलेले आहेत जे डायरेक्ट महाड तालुक्यात उतरतात.फोटोत नाव दिसतंय ती सिंगापूर नाळ असून ती लिंगणमाची नावाच्या गावात उतरते. तेथून लिंगाणा चढता येऊ शकतो. या पासून अजून पुढे बोराट्याची नाळ आहे जी दापोली गावात उतरते. तेथून रायगड जाता येते.


पूर्णतः निर्जन अश्या टापूत एकटाच हिंडत होतो म्हणून वाट चुकू नये यासाठी एका उपग्रहाला जोडीला घेतला. बाण दिसतोय तेथे गाडी लावली होती.